Skip to main content

तवांग युद्ध स्मारक आणि बुमला पास 

 

मागच्या पोस्टमध्ये आपण होतो नुरानंग फॉल्स आणि तवांग मठात

आज आपण जाणार आहोत तवांग मधील आणि आजूबाजूच्या काही ठिकाणांना भेट देण्यासाठी. 

जसे मी आधी सांगितले आहेच, त्याप्रमाणे अरुणाचल मध्ये प्रवेश करण्यासाठी तुम्हाला इनरलाईन परमिट लागते. ते प्रत्यक्ष जाउन तुम्हाला गुवाहाटी विमानतळावर किंवा रेल्वे स्टेशनवर मिळू शकते. त्यासाठी तुमचे फोटोज, ओळखपत्र, आणि निवासाचा दाखला लागतो. इनरलाईन परमिट ऑनलाईन देखील घेऊ शकता. 

तवांग शहरात तुम्ही कुठेही फिरलात, तरी तुम्हाला तिथून, बुद्धाचा प्रचंड मोठा पुतळा दिसत राहतो. स्थानिक लोक त्याला बिग बुद्ध म्हणतात. ते तसे नवेच बांधकाम आहे, २०१५ मध्ये बांधले गेलेले. एका छोट्याशा टेकडीवर बसून बुद्ध, शाक्यमुनी सगळ्या परिसराकडे पाहत आहेत. त्या पुतळ्याच्या खाली मंदिर आणि प्रार्थना स्थळ आहे.

मंदिरात गुरु पद्मसंभव ह्यांची मोठी मूर्ती आहे. त्यांना तिबेटियन बुद्ध धर्माचे, इतिहासाने सिद्ध करता येतील, असे संस्थापक म्हटले जाते. मंदिरात तसे लिहिलेले होते. 

बुद्धाच्या जीवनातील प्रसंग मंदिरांच्या भिंतींवर चित्रित केलेले आहेत. सिद्धार्थाचा बुध्दापर्यंतचा प्रवास देखील आपल्याला ह्या चित्रात दिसतो. ह्या चित्रातील सिद्धार्थ आणि यशोधरा खूपच खास आहेत, सुंदर आहेत. बुद्ध आपण नेहमी पाहतो तो वैराग्याचे, शांतीचे प्रतीक म्हणून. इथे रंगवलेला सिद्धार्थ आयुष्यातील तारुण्याचे, जीवनेच्छेचे प्रतीक वाटतो. त्यामुळेच नंतर वैराग्य धारण केलेला बुद्ध, विरोधाभासामुळे जास्त उठून दिसतो.

प्रचंड बुद्ध मूर्ती, तवांग 

बुद्ध मूर्ती - जरा जवळून अशी दिसते!

गुरु पद्मसंभव मूर्ती आणि दलाई लामा फोटो

प्रकाश 

बोधी स्तूप 

सर्व जाणणारा बुद्ध 

फोटोसाठी पोज देताना!

ह्या ठिकाणाहून दिसणारे दृश्य अतिशय विलोभनीय आहे. तुम्हाला सुंदरतेचे आणि भव्यतेचे जे जे विशेषण माहिती असेल त्यापेक्षाही हिमालयाच्या पर्वत रांगा सुंदर आहेत. निळेशार आकाश, शांत वातावरण आणि ह्या भागाचे विशेष असणाऱ्या पताका हे सगळे मिळून मनात एक शांती, एक तृप्तता अनुभवता येते.

तवांग शहरातील बाजारात तर ह्या पताकांचा जणू मांडवच असावा तसे दिसत होते. 

तवांग बाजारपेठ 

१९६२ च्या भारत चीन युद्धातील एका घनघोर संग्रामाचे ठिकाण म्हणजे तवांग. तवांग युद्ध स्मारक शहरापासून साधारण एक किलोमीटर अंतरावर आहे. स्थानिक भावनांना आणि मान्यतांना साजेशी अशी ही स्तुपासारखी इमारत आहे. त्या संग्रामात, भारतभूमीच्या रक्षणासाठी, स्वतःच्या प्राणांचे बलिदान दिलेल्या सैनिकांची नावे इथे लिहिलेली आहेत. २४०० हुन अधिक नावे... वाचताना तुम्ही आदराने नतमस्तक होऊन जाता. 

युद्धाचा इतिहास, तसेच सैनिकांच्या वापरातील वस्तू, काही शस्त्रे तुम्हाला तेथील संग्रहालयात पाहायला मिळतात. ह्या भागाची, मॅकमॅहॉन रेषेसकट, केलेली एक प्रतिकृती तिथे आहे. सैन्यातील अधिकारी तुम्हाला हे सगळे कसे कसे घडले, युद्ध का झाले, युद्धाचा परिणाम काय झाला हे सगळे नीट समजावून सांगतात.

सर मॅकमॅहॉन ह्यांनी नकाशावर ही रेषा काढली होती ती भारत आणि तिबेट मधील अधिकृत रेषा म्हणून. सर मॅकमॅहॉन हे ब्रिटिश राजवटीतील परराष्ट्र सचिव होते. त्यांनी काढलेली रेषा भारत आणि तिबेट ला मान्य होती. पण नंतर हीच रेषा भारत आणि चीन मधील विसंवादाचे कारण बनली. कारण चीनच्या मते तिबेटला असे परस्पर काही मान्य करण्याचा अधिकार तेव्हाही म्हणजे १९१४ साली देखील नव्हता. अरुणाचल मधील बराचसा भाग आपला आहे असा चीनचा दावा असतो. 

युद्ध स्मारकाच्या जवळ तुम्हाला काही तोफा बघायला मिळतील. इथे फोटो आहे हा बोफोर्स ४० M L/ Light anti air craft gun चा. ही लाईट म्हणजे अगदीच लाईट आहे, अवघे २,४०० किलो वजन आहे! ह्या प्रकारच्या तोफा दुसऱ्या महायुद्धात पण अत्यंत परिणामकारक ठरल्या होत्या. 

बोफोर्स 

जवळच छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे. 

छत्रपती शिवाजी महाराज पुतळा 

शिवाजी महाराज की जय

अरुणाचल प्रदेश मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पाहून फार आनंद आणि अभिमान वाटतो. तवांग युद्ध स्मारक बघणे ही तर आगळीच भावना आहे. आदर, अभिमान, दुःख, अपराधीपण ..सर्वच भावनांचा कल्लोळ मनात उसळतो. असे म्हटले जाते की तेव्हा इतके भारतीय सैनिक गेले, त्यांच्या रक्तामुळे तवांग जवळून वाहणारे झरे देखील लाल झाले होते. सगळे भारतीय नागरिक सुरक्षित राहावे म्हणून ते सैनिक शत्रूशी लढले आणि धारातिर्थी पडले, अमर झाले. 

तवांग युद्ध स्मारक 

तवांग युद्ध स्मारक 

तवांग युद्ध स्मारक 

संध्याकाळी, सूर्यास्तानंतर युद्ध स्मारकाच्या परिसरात एक ध्वनी प्रकाश कार्यक्रम होतो. खरे म्हणजे ही एक फिल्मच आहे, १९६२ च्या युद्धासंबंधी, भारतीय जवानांसंबंधी माहिती देणारी. 

वर छप्पर असले तरी बाकी मोकळे मैदान आहे. त्यामुळे थंडीसाठी योग्य ते कपडे सोबत ठेवा. शो बहुतेकदा हाऊसफुल असतो, त्यामुळे थोडे लवकरच तिथे पोचा. सोबत एक टॉर्च अवश्य ठेवा. शो संपतो तेव्हा अगदी गडद अंधार झालेला असतो. पार्किंग लांब असल्याने तो रस्ता दिसण्यासाठी टॉर्च उपयोगी पडतो. पण शो मात्र नक्की बघा. 

Before the show

दुसऱ्या दिवशी आम्ही बुमला पासला जाण्यासाठी निघालो. बुमला पास ला जाण्यासाठी तुमची गाडी उपयोगाची नाही. त्या रस्त्यांवरून जाऊ शकतील अशाच गाड्या हव्यात. पण त्या गाड्या आणि वाहनचालक तवांग शहरात सहज मिळतात. आधी बुकिंग मात्र करायला हवे. तुमच्या हॉटेलचा स्टाफ देखील तुम्हाला ह्या व्यवस्थेत मदत करू शकेल.

बुमला येथे फक्त भारतीय नागरिकच जाउ शकतात. त्यांनादेखील एक विशेष परवानगी घेऊन मगच जाता येते. हे परवानगीपत्र तवांगमधून घ्यायला लागते. मिलिटरी चेक पोस्ट वर ते तपासले जाते आणि मगच तुम्ही बुमला च्या रस्त्यावरून जाउ शकता. 

रस्ता एकतर डोंगराळ भागातला आहे आणि अतिशय खड्ड्या,खळग्यांचा आहे. गाडीत बसून जातानादेखील रस्ता किती अवघड आहे याची जाणीव तुमची सगळी हाडे ठेचकाळून तुम्हाला देतील. पण स्वतःला सुदैवी समजा की आता रस्ता आहे, जाण्यासाठी गाडी आहे. आपले सैनिक १९६२ मध्ये शेकडो किलोमीटर, ते देखील, पाठीवर आपापले सामान घेऊन, डोंगर-दऱ्या तुडवत, खायला मिळाले तर मिळाले, नाही तर उपाशी पोटी.. अशा अवस्थेत बुमला ला पोचले आणि लगेच लढले देखील. आपल्याला तर काय, नुसता गाडीत बसून प्रवास करायचा आहे. 

बुमला पास ला पोचल्यावर एन्ट्री गेटच्या बाहेर गाडी पार्क करायला लागते. हे ठिकाण समुद्र सपाटी पासून 15200 ft उंचीवर आहे. . ऑफिसमध्ये पोहोचेपर्यंत हुडहुडी भरते. तुमचे सगळे सामान, अगदी फोन, पर्स,पाकिटे सगळे तिथे ठेवून घेतले जाते आणि मग तुम्हाला प्रत्यक्ष बॉर्डर जवळ जाता येते. तिथे फोटोग्राफी करायला परवानगी नाही.

तिथे पोचायला खरे तर अगदी थोडेच चालायला लागते. पण अतोनात थंडी आणि ऑक्सिजन चे अल्प प्रमाण ह्यामुळे आपण किती चाललो आहोत असे वाटते. काही सामान नसताना, नुसते चालण्यासाठी देखील आपल्याला कष्ट होतात. सैनिक इथे कसे लढले आणि लढत असतील?

तिथे पोचल्यावर एक सैन्य अधिकारी युद्धाच्या वेळी काय काय झाले, कुठे सैनिक होते, युद्ध कसे झाले ते सगळे निवेदन करतात. चीनची सीमा लांबवर दिसत असते. तुमच्या तोंडून आपोआपच भारत माता की जय, वंदे मातरम अशा घोषणा निनादत राहतात. 

प्रत्येकाने एकदा तरी बुम ला पास ला जायलाच हवे. आपले हात पाय काम करेनासे होतात अशा वातावरणात सैनिक जीवावर उदार होऊन युद्ध करत असतात.. ते कोणासाठी? कशासाठी? आपण काय जाणीव ठेवतो त्यांची? आपण त्यांच्यासाठी काय करतो? इथे जाऊन आल्यावर हे सगळे प्रश्न तुम्हाला पडायला लागतील आणि कदाचित त्यांच्या योग्य उत्तरांच्या दिशेने वाटचाल होईल. 

बुमला पास 

मिलिटरी चेकपोस्ट 

अभिमानचिन्ह 

बुमला पास आणखीही एका गोष्टीसाठी स्मरणात राहते. चीनच्या अत्याचारांमुळे दलाई लामांना, तिबेटमधून निर्वासित होऊन भारतात आश्रय घ्यावा लागला, तेव्हा त्यांनी ह्याच मार्गाने भारतात प्रवेश केला होता. 

बुमला पासहून तवांगला परतताना, जरी अगदी वाटेत नसले तरी, थोडा वळसा घेऊन सुप्रसिद्ध माधुरी लेक ला जाता येते. ह्या तलावाचे मूळ नाव आहे सांगेत्सर तलाव. इथे कोयला ह्या सिनेमाचे चित्रीकरण झाले. त्यामुळे माधुरी दीक्षितच्या नावावरून ह्या तलावाला माधुरी लेक असे नाव पडले. 

१९५० मध्ये झालेल्या भूकंपाने आणि ढगफुटीमुळे हा तलाव तयार झाला. हे ठिकाण खूपच निसर्गरम्य आहे. बर्फाच्छादित पर्वत, तलाव आणि आजूबाजूचे वृक्ष सगळेच सुंदर दिसते. 

त्या वादळामुळे तलावातील झाडांची नुसती खोडे उरली आहेत. पण ती देखील खांबांप्रमाणे भासतात आणि तलावाला आगळेच सौंदर्य प्रदान करतात. तलावाभोवती चालण्यासाठी नयनरम्य रस्ता आहे. तसेच देखावा बघण्यासाठी आच्छादित व्यू पॉईंटस पण आहेत. एकूणच फोटो काढण्याच्या शेकडो जागा आहेत!!!

हा भाग वर्षभर थंड असतो. खूपदा बर्फ असते. कधी कधी तर तलावाच्या पाण्याचे पण बर्फ झालेले असते! आम्ही गेलो होतो तेव्हा सुदैवाने तळ्यात पाणीच होते!


आम्ही बुमला पास पासून माधुरी लेक पर्यंत प्रवास केला. तो दिवस होता ३१ ऑक्टोबर २०१९. हा देखील रस्ता चांगला नाहीच. त्या रस्त्यावरून प्रवास करायला खूप वेळ लागतो. म्हणून अंतर कमी असले तरी काही तास प्रवास करून आम्ही माधुरी लेकला पोचलो. आम्ही पोचल्यावर पाच मिनिटातच अचानक हवा बदलली. चेहऱ्यावर थंडगार वाऱ्याचे सपकारे बसू लागले. अंगात भरपूर गरम कपडे असूनही थंडी सहन होईना. आभाळ भरून आले. तिथे उभे राहणे देखील कठीण झाले. तिथे जितके पर्यटक आलेले होते ते सर्व आपापल्या वाहनांकडे पळाले. 

हवेत असे अचानक बदल होणे हे अरुणाचल प्रदेशात नित्याचे आहे. जरी आम्ही प्रवासासाठी काही तास घालवले तरी तळ्याच्या जवळ आम्हाला पाच मिनिटेच थांबता आले. कधी कधी असे होणे हा देखील प्रवासाचाच अटळ भाग आहे. आपण काही योजना आखतो, पण ती यशस्वी होईल की नाही हे मात्र आपल्या हातात नसते. खूपदा त्या बाबतीत आपण काहीच करू शकत नाही..आयुष्यासारखेच! 

घरी राहा, सुरक्षित राहा. आता थोडेच महिने आणि मग कोरोना गायब होईल!! तोपर्यंत ट्रॅव्हल ब्लॉग वाचण्याचा आनंद अनुभवत राहा!!

#BomdilaTawangRoute #OneDayTourFromTawang #IndiaChinaBorder #1962IndiaChinaWar #WhatToDoInTawang


#14thDalaiLama






























Comments

Post a Comment

Popular posts from this blog

लक्ष्मीकेशव मंदिर, कोळीसरे

  मंदिर म्हणजे एक उर्जाकेंद्र! प्राचीन काळापासून भाविक मंदिरात देवतांच्या दर्शनासाठी जात आले आहेत. आजही हिंदू लोक मंदिरात जाऊन, चित्त एकाग्र करून ध्यान, पूजा आणि आरती करतात. यामुळे त्यांना ऊर्जा आणि शांततेचा अनुभव मिळतो. प्रत्येक देवी-देवतेचे एक विशिष्ट मंदिर असते.  असेच कोळीसरे येथे श्री विष्णूचे - लक्ष्मीकेशवाचे सुंदर मंदिर आहे . रत्नागिरी शहरापासून फक्त ५० किलोमीटर अंतरावर किंवा गणपती पुळ्यापासून २१ किलोमीटर अंतरावर निसर्गसुंदर कोळीसरे गाव आहे. पुणे मुंबई हून रत्नागिरी जिल्ह्यातील कोळीसरे येथे जायचे असल्यास चिपळूण मार्गे जाता येईल. परशुराम - कोळीसरे रस्त्यात अशी नयनरम्य दृश्ये अनेकदा दिसतात. परशुराम कोळिसरे रस्ता अगदी कमी लोकवस्तीचे, घनदाट झाडी असलेले हे गाव कोळीसरे फाट्याहून आत गेल्यावर दीड दोन किलोमीटर प्रवास केल्यावर येते. रत्नागिरीहून बसने जाता येते अन्यथा मंदिरापर्यंत पोचण्यासाठी स्वतःचे वाहन असणे सोयीचे आहे.  गाडी पार्क केल्यानंतर काही पायऱ्या उतरून मग घनदाट झाडीत वसलेल्या ह्या मंदिरात जाता येते. ह्या रस्त्यावरून व्हील चेयर जाउ शकत नाही. पार्किंग पासून उ...

नागाव

  नागाव म्हणजे माडापोफळींच्या वाड्या. नागाव म्हणजे केळीच्या बागा. नागाव म्हणजे सुंदर स्वच्छ समुद्रकिनारा.  नागाव म्हणजे वस्त्रगाळ मऊ वाळूचा किनारा.  नागाव म्हणजे अनेक मंदिरे. नागाव म्हणजे लक्षवेधी दीपमाळा. नागाव म्हणजे कोपऱ्या कोपऱ्यावर भेटणारे तळे! नागाव म्हणजे तळ्यात फुललेलीअनेकानेक कमळे!! नागावच्या शेजारचे  अक्षी, चौल, रेवदंडा ही देखील अशीच गावे. नितांतसुंदर, साधी. अलिबाग आणि ह्या सर्व गावांना मिळून अष्टागर असे म्हणत असत. आठ गावांचा समूह.  अलिबाग पर्यटन स्थळ म्हणून ७० च्या दशकापासूनच प्रसिद्ध झाले होते. तेव्हा शांत निवांत असलेले अलिबाग नंतर खूपच गजबजले आणि मग दुसऱ्या सहस्त्रकात अलिबागशेजारील रेवदंडा, नागाव, चौल ही लहान लहान गावे देखील पर्यटनस्थळे म्हणून विकसित होऊ लागली.  ह्या निवांत, शांत गावांना जणू अचानक खडबडून जाग आली. तिथेही पर्यटकांची गर्दी वाढू लागली. स्थानिक लोकांना रोजगार, विकासाची संधी, अर्थार्जनाची संधी त्यात दिसली.  गावांवर आधुनिक पेहराव चढला आणि तिथे उदयाला आली मुंबईकरांची आवडती पर्यटनस्थळे.  आता तर परिस्थिती अशी आहे की जवळ जवळ एका...

पैसाच्या खांबाचे मंदिर!

पैसाच्या खांबाचे मंदिर! अनेक वर्षांपूर्वी दुर्गा बाईंचे ' पैस ' हे पुस्तक वाचनात आले. त्यात होता हा पैसाचा खांब. पैस म्हणजे अवकाश. जिथे ज्ञानेश्वरी लिहिली गेली तो हा पैसाचा खांब. ज्ञानेश्वरीचे जन्मस्थान! खांबाला टेकून बसलेले, ज्ञानेश्वरी सांगत असलेले ज्ञानेश्वर आणि ती लिहून घेत असलेले लेखनिक सच्चिदानंद बाबा असे चित्र आधीही अनेकदा पाहिलेले होते. पण त्या खांबाला ' पैसाचा खांब' म्हणतात हे माहितीच नव्हते. पैस ह्या पुस्तकातील पैसाचा खांब हे प्रकरण वाचले आणि अक्षरशः थरारून गेले. 'पैसाच्या खांबाचे मंदिर' अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा या प्रवरा नदीच्या तीरावरील गावी आहे. नेवासे गावाच्या पश्चिमेला हे मंदिर आहे. 'शके बाराशे बारोत्तरे| तैं टीका केली ज्ञानेश्वरे| सच्चिदानंद बाबा आदरे| लेखकू जाहला|' असा उल्लेख सापडतो. मूर्त आणि अमूर्त ह्याची अशी जोडणी म्हणजे ज्ञानाच्या अनंत अवकाशात जाण्याची पहिली पायरीच जणू. ज्ञानेश्वरी वाचण्याएवढी आणि कळण्याएवढी योग्यता ह्या जन्मात अंगी येईल की नाही माहिती नाही. पण हा खांब पाहू या कधीतरी असे ठरवून टाकले. अवघड नव्हतेच जाणे. संभाजीनगर...

हनुमान जन्मस्थळ आणि शबरी धाम, जय श्रीराम, जय जय राम!

आज आपण रामायणातील दोन ठिकाणांना भेट देणार आहोत आणि दोन महान राम भक्तांच्या भेटीसाठी तुम्हाला घेऊन जाताना मला अतिशय आनंद झालेला आहे.  पहिल्यांदा आपण जाऊयात, हनुमानाच्या जन्मस्थानी अंजनेय टेकडीवर. ही टेकडी कर्नाटक मध्ये हंपीजवळच्या भागात आहे असे मानले जाते. ही जागा अंजनीच्या पुत्राचे, अंजनेयाचे म्हणजेच हनुमानाचे जन्मस्थळ आहे.  भारतात अजूनही इतर काही ठिकाणे आहेत की जी हनुमानाचे जन्मस्थळ म्हणून सांगितली जातात. पण अंजनेय टेकडी हे हनुमानाचे जन्मस्थळ असणे मला सर्वात जास्त संयुक्तिक वाटते. कारण ऋष्यमूक पर्वत, जिथे सुग्रीव, हनुमान आणि भगवान श्रीराम यांची भेट झाली होती तो इथून जवळच आहे. हंपीपासून अंजनेय टेकडीपर्यंतचा रस्ता नैसर्गिक सृष्टिसौंदर्याने अतिशय समृद्ध आहे. तुंगभद्रेच्या किनाऱ्यावर असल्यामुळे हा संपूर्ण प्रदेश अत्यंत सुपीक आहे रस्त्याच्या दोन्ही बाजूला सतत तुम्हाला भात शेती, नारळाची झाडे, केळीच्या बागा आणि अर्थातच प्रचंड मोठे खडक, जे ह्या भागाचे वैशिष्ट्य आहेत ते दिसत राहतात. हा संपूर्ण परिसर रामायणातला किष्किंधा भाग मानला जातो. भात शेती केळीच्या बागा भातशेतीचा मखमली गालिचा टे...

श्री व्याडेश्वर देवस्थान, गुहागर

  कोकणावर निसर्गाचा वरदहस्त आहेच. त्यातही काही गावांनी आपल्या सौंदर्याने विशेष स्थान मिळवले आहे. त्यातील एक महत्वाचे नाव म्हणजे गुहागर. सुंदर लहानसे गाव आहे. एक मुख्य रस्ता, त्याच्या दोन्ही बाजूला घरे, घरांच्या मागे नारळ सुपारीच्या वाड्या. रस्त्याच्या एका बाजूच्या प्रत्येक घराच्या मागच्या वाडीतून समुद्राला जाण्याचा रस्ता, भव्य स्वच्छ समुद्रकिनारा असे हे मोहात पाडणारे गुहागर गाव.  गुहागर प्रसिद्ध आहे व्याडेश्वरासाठी. व्याडेश्वर हे शंकराचे मंदिर अनेक कोकणवासीयांचे कुलदैवत आहे. कोकणातील सर्वात महत्त्वाच्या शिवमंदिरांपैकी एक म्हणजे गुहागरमधील श्री व्याडेश्वर देवस्थान.  श्री व्याडेश्वर देवस्थान.  श्री व्याडेश्वर देवस्थान.  तुम्हाला जर का कधी दक्षिणेतील मंदिरे पाहून वाटले असेल की अशी मंदिरे आपल्या महाराष्ट्रात का नाही?!! तर गुहागरच्या व्याडेश्वर मंदिराला भेट द्या. भव्य सुंदर देवालय आहे. मंदिराचे आवार स्वच्छ, प्रशस्त आहे. मुख्य म्हणजे अगदी नांदते, जागते मंदिर आहे. मंदिराची साफसफाई, निगराणी केली जाते आहे. आवारात भरपूर झाडे आहेत. श्री व्याडे...

महेश्वर

महेश्वर हे मध्यप्रदेश पर्यटन निगमच्या पर्यटन स्थळांमधले एक महत्वाचे नाव आहे. पण करोडो भारतीयांसाठी ते केवळ एक पर्यटन स्थळ नाही तर एक तीर्थस्थान असते. लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या वास्तव्याने पुनीत झालेले स्थान आहे.  महेश्वर किल्ला प्रवेशद्वार  राजवाडा प्रवेशद्वार  बाह्यरूप  पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर  राजवाडा प्रवेशद्वार  अहिल्याबाई होळकर हे केवळ भारताच्याच नव्हे तर विश्वाच्या इतिहासातील एक सोनेरी पान. संपूर्ण मानव विश्वातील यशस्वी स्त्री राज्यकर्त्यांची सूची करायची झाली तर अहिल्याबाई होळकरांचे नाव ठळकपणे लिहायला लागेल.   31 मे 2025 ला त्यांची तीनशेवी जयंती आहे. पण 300 वर्षांपूर्वी होऊन गेलेल्या अहिल्याबाईंचे आयुष्य अगदी आजच्या आधुनिक काळातल्या आव्हानातही मार्गदर्शक ठरावे असेच आहे.  त्यांच्याविषयीचा आदर मनात घेऊनच आपण महेश्वरला जातो आणि त्या भावनेच्या प्रकाशात महेश्वर पाहतो. महेश्वरला फार मोठी प्राचीन परंपरा आहे. स्कंद पुराणाच्या रेवा खंडात आणि वायू पुराणाच्या नर्मदा रहस्य मध्ये महिष्मती म्हणजे महेश्वरचे वर्णन आलेले आहे. 'गुप्...

श्री क्षेत्र गिरनार

  गिरनार माझ्यासाठी ते मोहक फळ होते, जे मिळायला अवघड होते आणि कितीही हवेहवेसे वाटले तरी त्यासाठी माझ्याकडून प्रयत्न मात्र अजिबात केले गेले नव्हते. गिरनारच्या अद्भुत कथा खूप ऐकल्या, वाचल्या होत्या. गिरनारची मनात ओढ होती. पण ते सगळे मनातच. प्रत्यक्षात कोणतेही ट्रीप ठरवताना, कुठे जायचे याचा विचार करताना पुढे होऊन गिरनारला जाऊयात असे कधी म्हटले नव्हते हेही तितकेच खरे.  श्री क्षेत्र गिरनार  काय आहे गिरनार?  गिरनार हा पर्वत समूह आहे. दत्तात्रेयांचा इथे निवास असल्याने ते हिंदूंच्यासाठी अत्यंत पवित्र आणि महत्वाचे धार्मिक स्थळ आहे.  हिमालयापेक्षाही जुना असलेला हा पर्वत अनेक नावांनी प्राचीन साहित्यात आलेला आहे. रेवतक हे त्यातील सर्वात जास्त माहिती असलेले नाव.  जैन लोकांसाठी देखील हे अत्यंत महत्वाचे ठिकाण आहे कारण इथे जैन मंदिर समूह देखील आहे. नेमिनाथ, आदिनाथ, मल्लिनाथ आणि इतर तीर्थंकरांची मंदिरे आहेत.  कुठे आहे गिरनार ? गुजराथ, सौराष्ट्र मधील जुनागढ जवळ गिरनारच्या पायथ्याचे, तलेटी नावाचे गाव आहे.  गिरनारला लोक का जातात? तेथील द...

हिंदवी स्वराज्याची राजधानी - किल्ले रायगड

रायगड! हे नाव घेताच मनात उठणारे भावतरंग अवर्णनीय असेच असतात. ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी म्हणजे 'शिव राज्याभिषेक दिन', 'हिंदू साम्राज्य दिन'. अभिमानाचा, गौरवाचा दिवस. भारतीय इतिहास हा संघर्षाचा व विजयाचा आहे. त्यातील झळाळून उठणारे तेजस्वी, सोनेरी पान म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे कर्तृत्व! शिवाजी महाराज आणि त्यांच्या मावळ्यांचे अविश्रांत परिश्रम पूर्णत्वाला पोचले ते ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी, १६७४ ह्या दिवशी. हा केवळ राज्याभिषेक नव्हता. हिंदवी स्वराज्याची स्थापना झाल्याची केवळ अधिकृत घोषणा नव्हती. तर संतांच्या उपदेशांनी जागलेली सज्जन शक्ती, मावळ्यांच्या रूपातील सामान्य जनतेच्या मनात जागलेली वीरवृत्ती ह्यांच्या संगमाने घडलेला तो एक अभूतपूर्व अविष्कार होता. राज्याभिषेक ही शिवाजी महाराजांची व्यक्तिगत महत्वाकांक्षा नव्हती. रोहिडेश्वर येथे लहानपणी घेतलेली प्रतिज्ञा अथक प्रयत्नांनी पूर्ण झाली होती. "हे हिंदवी स्वराज्य व्हावे हे तो श्रींची इच्छा" हे वचन सार्थ झाले होते. पण राज्याभिषेकाच्या निमित्ताने शिवाजीमहाराजांनी मोठ्या युक्तीने त्यांच्यावर असलेली लोकांची निष्ठा सिंहा...

परशुराम कुंड, अरुणाचल.

अरुणाचल मधील टेंगापानी, नामसाईच्या गोल्डन पॅगोडाहुन परशुराम कुंड ला जाण्यासाठी  आम्ही निघालो. ही गोष्ट आहे ऑक्टोबर २०१९ मधील.  त्या दिवशी सतत पाऊस पडत होता. सगळीकडे हिरवेगार तर अरुणाचल मध्ये नेहमीच असते. पावसात भिजलेली झाडे, स्वच्छ हिरवळ, मध्येच ढगांत अदृश्य होणाऱ्या पर्वतरांगा, वाहणारे थंडगार वारे, फार सुंदर होते ते सगळे.  अरुणाचल  डोंगरातला रस्ता होता. तुफान वारा होता. त्या सगळ्या अवाढव्य डोंगराळ प्रदेशात आमची गाडी म्हणजे एक ठिपका होती. वाऱ्याने उडून जायला वेळ लागणार नाही इतका जोरात वारा वाहत होता. एक खिडकी फोटो काढण्यासाठी उघडली तर ड्राइवर म्हणाला की दुसऱ्या बाजूची पण उघडा, नाहीतर आत आलेल्या वाऱ्याने गाडी हलायला लागेल. शेजारी खोल दरी दिसत असताना गाडी हलायच्या कल्पनेने अंगावर काटा आला आणि पहिली खिडकी देखील फोटो काढल्या काढल्या बंद केली..नकोच ती वाऱ्याची परीक्षा!  रस्ता कसा होता हे प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी पुढे दिलेल्या लिंकवर क्लिक करून विडिओ नक्की बघा. Namsai- Parshuram kund road ह्या नदीचे नाव लोहित आणि ह्या जिल्ह्याचेही नाव लोहित. लोहितचा अर्थ रक्त किंवा रक्...

सिद्धेश्वर मंदिर, टोके - प्रवरा संगमावर उमललेले दगडी बिल्वपत्र

भिंतीवरील कोरीवकाम  महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्ह्यातले टोके हे एक लहान गाव. अहिल्यानगर कडून छत्रपती संभाजीनगरला जाताना डावीकडे नदीच्या काठावर हे सुंदर मंदिर आपल्याला दिसते. जगप्रसिद्ध वेरूळ, अजिंठा लेणी बघायची असतील तर सांभाजीनगरला जावे लागते हे आपल्याला माहिती असेलच. सिद्धेश्वर मंदिर, टोके हे मला एखाद्या दगडी बेलपत्राप्रमाणे वाटले. हे बेलपत्र उमलले आहे अमृतवाहिनी प्रवरा आणि दक्षिणगंगा गोदावरीच्या संगमावर. त्या संगमाच्या, ज्याला प्रवरा संगम म्हणतात त्या परिसरात सिद्धेश्वर, घटेश्वर, मुक्तेश्वर, रामेश्वर, संगमेश्वर अशी अनेक मंदिरे आहेत. पण सर्वात खास आणि सुंदर आहे ते सिद्धेश्वर मंदिर. सिद्धेश्वर मंदिर परिसर बघा असा दिसतो! हा फोटो घेतला होता सप्टेंबर २०१९ मध्ये. पावसाळा भरपूर बरसून आता आपला मुक्काम आवरत होता आणि नद्यांना भरपूर पाणी होते तेव्हाचा! मंदिराचा परिसर  सिद्धेश्वर मंदिर समूह हा तुलनेने नवा समूह आहे, अठराव्या शतकात बांधला गेलेला. पेशव्यांच्या काळात बांधल्या गेलेल्या ह्या मंदिराला सभोवताली एखाद्या छोट्या किल्ल्यासारखी किंवा गढीसारखी उंच भिंत आहे. मुख्य मंदिर आहे शंकराचे...