मुख्य सामग्रीवर वगळा

तवांग युद्ध स्मारक आणि बुमला पास 

 

मागच्या पोस्टमध्ये आपण होतो नुरानंग फॉल्स आणि तवांग मठात

आज आपण जाणार आहोत तवांग मधील आणि आजूबाजूच्या काही ठिकाणांना भेट देण्यासाठी. 

जसे मी आधी सांगितले आहेच, त्याप्रमाणे अरुणाचल मध्ये प्रवेश करण्यासाठी तुम्हाला इनरलाईन परमिट लागते. ते प्रत्यक्ष जाउन तुम्हाला गुवाहाटी विमानतळावर किंवा रेल्वे स्टेशनवर मिळू शकते. त्यासाठी तुमचे फोटोज, ओळखपत्र, आणि निवासाचा दाखला लागतो. इनरलाईन परमिट ऑनलाईन देखील घेऊ शकता. 

तवांग शहरात तुम्ही कुठेही फिरलात, तरी तुम्हाला तिथून, बुद्धाचा प्रचंड मोठा पुतळा दिसत राहतो. स्थानिक लोक त्याला बिग बुद्ध म्हणतात. ते तसे नवेच बांधकाम आहे, २०१५ मध्ये बांधले गेलेले. एका छोट्याशा टेकडीवर बसून बुद्ध, शाक्यमुनी सगळ्या परिसराकडे पाहत आहेत. त्या पुतळ्याच्या खाली मंदिर आणि प्रार्थना स्थळ आहे.

मंदिरात गुरु पद्मसंभव ह्यांची मोठी मूर्ती आहे. त्यांना तिबेटियन बुद्ध धर्माचे, इतिहासाने सिद्ध करता येतील, असे संस्थापक म्हटले जाते. मंदिरात तसे लिहिलेले होते. 

बुद्धाच्या जीवनातील प्रसंग मंदिरांच्या भिंतींवर चित्रित केलेले आहेत. सिद्धार्थाचा बुध्दापर्यंतचा प्रवास देखील आपल्याला ह्या चित्रात दिसतो. ह्या चित्रातील सिद्धार्थ आणि यशोधरा खूपच खास आहेत, सुंदर आहेत. बुद्ध आपण नेहमी पाहतो तो वैराग्याचे, शांतीचे प्रतीक म्हणून. इथे रंगवलेला सिद्धार्थ आयुष्यातील तारुण्याचे, जीवनेच्छेचे प्रतीक वाटतो. त्यामुळेच नंतर वैराग्य धारण केलेला बुद्ध, विरोधाभासामुळे जास्त उठून दिसतो.

प्रचंड बुद्ध मूर्ती, तवांग 

बुद्ध मूर्ती - जरा जवळून अशी दिसते!

गुरु पद्मसंभव मूर्ती आणि दलाई लामा फोटो

प्रकाश 

बोधी स्तूप 

सर्व जाणणारा बुद्ध 

फोटोसाठी पोज देताना!

ह्या ठिकाणाहून दिसणारे दृश्य अतिशय विलोभनीय आहे. तुम्हाला सुंदरतेचे आणि भव्यतेचे जे जे विशेषण माहिती असेल त्यापेक्षाही हिमालयाच्या पर्वत रांगा सुंदर आहेत. निळेशार आकाश, शांत वातावरण आणि ह्या भागाचे विशेष असणाऱ्या पताका हे सगळे मिळून मनात एक शांती, एक तृप्तता अनुभवता येते.

तवांग शहरातील बाजारात तर ह्या पताकांचा जणू मांडवच असावा तसे दिसत होते. 

तवांग बाजारपेठ 

१९६२ च्या भारत चीन युद्धातील एका घनघोर संग्रामाचे ठिकाण म्हणजे तवांग. तवांग युद्ध स्मारक शहरापासून साधारण एक किलोमीटर अंतरावर आहे. स्थानिक भावनांना आणि मान्यतांना साजेशी अशी ही स्तुपासारखी इमारत आहे. त्या संग्रामात, भारतभूमीच्या रक्षणासाठी, स्वतःच्या प्राणांचे बलिदान दिलेल्या सैनिकांची नावे इथे लिहिलेली आहेत. २४०० हुन अधिक नावे... वाचताना तुम्ही आदराने नतमस्तक होऊन जाता. 

युद्धाचा इतिहास, तसेच सैनिकांच्या वापरातील वस्तू, काही शस्त्रे तुम्हाला तेथील संग्रहालयात पाहायला मिळतात. ह्या भागाची, मॅकमॅहॉन रेषेसकट, केलेली एक प्रतिकृती तिथे आहे. सैन्यातील अधिकारी तुम्हाला हे सगळे कसे कसे घडले, युद्ध का झाले, युद्धाचा परिणाम काय झाला हे सगळे नीट समजावून सांगतात.

सर मॅकमॅहॉन ह्यांनी नकाशावर ही रेषा काढली होती ती भारत आणि तिबेट मधील अधिकृत रेषा म्हणून. सर मॅकमॅहॉन हे ब्रिटिश राजवटीतील परराष्ट्र सचिव होते. त्यांनी काढलेली रेषा भारत आणि तिबेट ला मान्य होती. पण नंतर हीच रेषा भारत आणि चीन मधील विसंवादाचे कारण बनली. कारण चीनच्या मते तिबेटला असे परस्पर काही मान्य करण्याचा अधिकार तेव्हाही म्हणजे १९१४ साली देखील नव्हता. अरुणाचल मधील बराचसा भाग आपला आहे असा चीनचा दावा असतो. 

युद्ध स्मारकाच्या जवळ तुम्हाला काही तोफा बघायला मिळतील. इथे फोटो आहे हा बोफोर्स ४० M L/ Light anti air craft gun चा. ही लाईट म्हणजे अगदीच लाईट आहे, अवघे २,४०० किलो वजन आहे! ह्या प्रकारच्या तोफा दुसऱ्या महायुद्धात पण अत्यंत परिणामकारक ठरल्या होत्या. 

बोफोर्स 

जवळच छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे. 

छत्रपती शिवाजी महाराज पुतळा 

शिवाजी महाराज की जय

अरुणाचल प्रदेश मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पाहून फार आनंद आणि अभिमान वाटतो. तवांग युद्ध स्मारक बघणे ही तर आगळीच भावना आहे. आदर, अभिमान, दुःख, अपराधीपण ..सर्वच भावनांचा कल्लोळ मनात उसळतो. असे म्हटले जाते की तेव्हा इतके भारतीय सैनिक गेले, त्यांच्या रक्तामुळे तवांग जवळून वाहणारे झरे देखील लाल झाले होते. सगळे भारतीय नागरिक सुरक्षित राहावे म्हणून ते सैनिक शत्रूशी लढले आणि धारातिर्थी पडले, अमर झाले. 

तवांग युद्ध स्मारक 

तवांग युद्ध स्मारक 

तवांग युद्ध स्मारक 

संध्याकाळी, सूर्यास्तानंतर युद्ध स्मारकाच्या परिसरात एक ध्वनी प्रकाश कार्यक्रम होतो. खरे म्हणजे ही एक फिल्मच आहे, १९६२ च्या युद्धासंबंधी, भारतीय जवानांसंबंधी माहिती देणारी. 

वर छप्पर असले तरी बाकी मोकळे मैदान आहे. त्यामुळे थंडीसाठी योग्य ते कपडे सोबत ठेवा. शो बहुतेकदा हाऊसफुल असतो, त्यामुळे थोडे लवकरच तिथे पोचा. सोबत एक टॉर्च अवश्य ठेवा. शो संपतो तेव्हा अगदी गडद अंधार झालेला असतो. पार्किंग लांब असल्याने तो रस्ता दिसण्यासाठी टॉर्च उपयोगी पडतो. पण शो मात्र नक्की बघा. 

Before the show

दुसऱ्या दिवशी आम्ही बुमला पासला जाण्यासाठी निघालो. बुमला पास ला जाण्यासाठी तुमची गाडी उपयोगाची नाही. त्या रस्त्यांवरून जाऊ शकतील अशाच गाड्या हव्यात. पण त्या गाड्या आणि वाहनचालक तवांग शहरात सहज मिळतात. आधी बुकिंग मात्र करायला हवे. तुमच्या हॉटेलचा स्टाफ देखील तुम्हाला ह्या व्यवस्थेत मदत करू शकेल.

बुमला येथे फक्त भारतीय नागरिकच जाउ शकतात. त्यांनादेखील एक विशेष परवानगी घेऊन मगच जाता येते. हे परवानगीपत्र तवांगमधून घ्यायला लागते. मिलिटरी चेक पोस्ट वर ते तपासले जाते आणि मगच तुम्ही बुमला च्या रस्त्यावरून जाउ शकता. 

रस्ता एकतर डोंगराळ भागातला आहे आणि अतिशय खड्ड्या,खळग्यांचा आहे. गाडीत बसून जातानादेखील रस्ता किती अवघड आहे याची जाणीव तुमची सगळी हाडे ठेचकाळून तुम्हाला देतील. पण स्वतःला सुदैवी समजा की आता रस्ता आहे, जाण्यासाठी गाडी आहे. आपले सैनिक १९६२ मध्ये शेकडो किलोमीटर, ते देखील, पाठीवर आपापले सामान घेऊन, डोंगर-दऱ्या तुडवत, खायला मिळाले तर मिळाले, नाही तर उपाशी पोटी.. अशा अवस्थेत बुमला ला पोचले आणि लगेच लढले देखील. आपल्याला तर काय, नुसता गाडीत बसून प्रवास करायचा आहे. 

बुमला पास ला पोचल्यावर एन्ट्री गेटच्या बाहेर गाडी पार्क करायला लागते. हे ठिकाण समुद्र सपाटी पासून 15200 ft उंचीवर आहे. . ऑफिसमध्ये पोहोचेपर्यंत हुडहुडी भरते. तुमचे सगळे सामान, अगदी फोन, पर्स,पाकिटे सगळे तिथे ठेवून घेतले जाते आणि मग तुम्हाला प्रत्यक्ष बॉर्डर जवळ जाता येते. तिथे फोटोग्राफी करायला परवानगी नाही.

तिथे पोचायला खरे तर अगदी थोडेच चालायला लागते. पण अतोनात थंडी आणि ऑक्सिजन चे अल्प प्रमाण ह्यामुळे आपण किती चाललो आहोत असे वाटते. काही सामान नसताना, नुसते चालण्यासाठी देखील आपल्याला कष्ट होतात. सैनिक इथे कसे लढले आणि लढत असतील?

तिथे पोचल्यावर एक सैन्य अधिकारी युद्धाच्या वेळी काय काय झाले, कुठे सैनिक होते, युद्ध कसे झाले ते सगळे निवेदन करतात. चीनची सीमा लांबवर दिसत असते. तुमच्या तोंडून आपोआपच भारत माता की जय, वंदे मातरम अशा घोषणा निनादत राहतात. 

प्रत्येकाने एकदा तरी बुम ला पास ला जायलाच हवे. आपले हात पाय काम करेनासे होतात अशा वातावरणात सैनिक जीवावर उदार होऊन युद्ध करत असतात.. ते कोणासाठी? कशासाठी? आपण काय जाणीव ठेवतो त्यांची? आपण त्यांच्यासाठी काय करतो? इथे जाऊन आल्यावर हे सगळे प्रश्न तुम्हाला पडायला लागतील आणि कदाचित त्यांच्या योग्य उत्तरांच्या दिशेने वाटचाल होईल. 

बुमला पास 

मिलिटरी चेकपोस्ट 

अभिमानचिन्ह 

बुमला पास आणखीही एका गोष्टीसाठी स्मरणात राहते. चीनच्या अत्याचारांमुळे दलाई लामांना, तिबेटमधून निर्वासित होऊन भारतात आश्रय घ्यावा लागला, तेव्हा त्यांनी ह्याच मार्गाने भारतात प्रवेश केला होता. 

बुमला पासहून तवांगला परतताना, जरी अगदी वाटेत नसले तरी, थोडा वळसा घेऊन सुप्रसिद्ध माधुरी लेक ला जाता येते. ह्या तलावाचे मूळ नाव आहे सांगेत्सर तलाव. इथे कोयला ह्या सिनेमाचे चित्रीकरण झाले. त्यामुळे माधुरी दीक्षितच्या नावावरून ह्या तलावाला माधुरी लेक असे नाव पडले. 

१९५० मध्ये झालेल्या भूकंपाने आणि ढगफुटीमुळे हा तलाव तयार झाला. हे ठिकाण खूपच निसर्गरम्य आहे. बर्फाच्छादित पर्वत, तलाव आणि आजूबाजूचे वृक्ष सगळेच सुंदर दिसते. 

त्या वादळामुळे तलावातील झाडांची नुसती खोडे उरली आहेत. पण ती देखील खांबांप्रमाणे भासतात आणि तलावाला आगळेच सौंदर्य प्रदान करतात. तलावाभोवती चालण्यासाठी नयनरम्य रस्ता आहे. तसेच देखावा बघण्यासाठी आच्छादित व्यू पॉईंटस पण आहेत. एकूणच फोटो काढण्याच्या शेकडो जागा आहेत!!!

हा भाग वर्षभर थंड असतो. खूपदा बर्फ असते. कधी कधी तर तलावाच्या पाण्याचे पण बर्फ झालेले असते! आम्ही गेलो होतो तेव्हा सुदैवाने तळ्यात पाणीच होते!


आम्ही बुमला पास पासून माधुरी लेक पर्यंत प्रवास केला. तो दिवस होता ३१ ऑक्टोबर २०१९. हा देखील रस्ता चांगला नाहीच. त्या रस्त्यावरून प्रवास करायला खूप वेळ लागतो. म्हणून अंतर कमी असले तरी काही तास प्रवास करून आम्ही माधुरी लेकला पोचलो. आम्ही पोचल्यावर पाच मिनिटातच अचानक हवा बदलली. चेहऱ्यावर थंडगार वाऱ्याचे सपकारे बसू लागले. अंगात भरपूर गरम कपडे असूनही थंडी सहन होईना. आभाळ भरून आले. तिथे उभे राहणे देखील कठीण झाले. तिथे जितके पर्यटक आलेले होते ते सर्व आपापल्या वाहनांकडे पळाले. 

हवेत असे अचानक बदल होणे हे अरुणाचल प्रदेशात नित्याचे आहे. जरी आम्ही प्रवासासाठी काही तास घालवले तरी तळ्याच्या जवळ आम्हाला पाच मिनिटेच थांबता आले. कधी कधी असे होणे हा देखील प्रवासाचाच अटळ भाग आहे. आपण काही योजना आखतो, पण ती यशस्वी होईल की नाही हे मात्र आपल्या हातात नसते. खूपदा त्या बाबतीत आपण काहीच करू शकत नाही..आयुष्यासारखेच! 

घरी राहा, सुरक्षित राहा. आता थोडेच महिने आणि मग कोरोना गायब होईल!! तोपर्यंत ट्रॅव्हल ब्लॉग वाचण्याचा आनंद अनुभवत राहा!!

#BomdilaTawangRoute #OneDayTourFromTawang #IndiaChinaBorder #1962IndiaChinaWar #WhatToDoInTawang


#14thDalaiLama






























टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कोस्टल कर्नाटक ३. -कुरु बेट, अनेगुड्डे श्री विनायक मंदिर, मणिपाल लेक

  कोस्टल कर्नाटक सहलीचा आमचा तिसरा दिवस देखील फार आनंदात गेला. काही गोष्टी ठरवल्याप्रमाणे होऊ शकल्या. काही गोष्टी ठरवल्याप्रमाणे अजिबात झाल्या नाहीत. पण तरी जमेची बाजूच जड झाली हे खरे.  उडुपीला सकाळी गाडी बोलावली होती आणि ती आम्हाला काही तास फिरवून आणणार होती. पहिले ठिकाण होते त्रासी मारवंते बीच.  फोटो बघूनच हा बीच पाहण्याची खूप उत्सुकता वाटत होती. हा अत्यंत अनोखा बीच आहे. रस्त्याच्या एक बाजूला सौपर्णिका नदी, दुसऱ्या बाजूला अरबी समुद्र - सिंधूसागर! त्रासी मरवंथे बीच  📷https://karnatakatourism.org/en/destinations/udupi उडुपीपासून निघून इकडे येऊन पोचलो. एका बाजूला नदी दिसत होती. दुसऱ्या बाजूला समुद्र किनाराही दिसत होता. पण फोटोत दाखवल्याप्रमाणे ठिकाण काही दिसेना.  मग चौकशी केल्यावर कळले की असे फक्त ड्रोनने काढलेल्या फोटोत दिसते. डोळ्यांना असे दिसत नाही!! एरवी आपण म्हणतो की डोळ्यांना जितके सुंदर दिसते तितके फोटोत उतरत नाही. पण इथे उलटे झाले होते!फोटोतल्याइतके सुंदर डोळ्यांना दिसत नव्हते!! पण असे दिसले नाही म्हणून काय झाले? रस्त्याच्या एका बाजूला नदी वाहते आहे...

कोस्टल कर्नाटक ६ - अविस्मरणीय शरावती बॅकवॉटर बोटिंग, शरावती कांडला मॅन्ग्रोव्ह बोर्ड वॉक

मी आधीच्या पोस्टमध्ये सांगितले होते की आजचा सूर्यास्त समुद्रात होता तर उद्याचा सूर्योदय शरावती नदीत असणार आहे! तोच हा सूर्योदय शरावती नदीत, कमळांच्या मध्ये.  शरावती बॅकवॉटर बोटिंग  दुसऱ्या दिवशी सकाळी सव्वा सहापर्यंत आम्ही बोटिंगच्या ठिकाणी पोचलो. कारण आम्हाला सूर्योदय चुकवायचा नव्हता. होनावर जवळचे शरावती नदीतील बोटिंग हा एक अविस्मरणीय अनुभव आहे.  आजूबाजूची शांतता, संथ पाणी, स्वच्छ नितळ पाण्यात वाकून आपले प्रतिबिंब न्याहाळणारी नारळाची झाडे, पाण्यात अध्ये मध्ये असलेली लहानशी बेटे, खारफूटीची जंगले, कमळाची पाण्यावर तरंगणारी पाने, उगवत्या सूर्याची पाण्यात मिसळणारी किरणे, त्याने तांबूस झालेले पाणी .. एक वेगळेच जग असते ते. तुम्ही जितक्या वेळासाठी बोट ठरवलेली असेल.. तास दीड तास..  तो वेळ, तुमच्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षणांपैकी एक असणार हे मी अगदी खात्रीने सांगू शकते.  आपोआप जगाचा, आयुष्याचा कोलाहल मंद होत जातो. पहाटेचा मवाळ प्रकाश, पाण्यावर हेलकावणारी नाव, हवेतला अगदी किंचितसा सुखद गारवा आणि मुरत जाणारी शांतता ह्या सगळ्याने मन निवळत जाते.  आम्ही गेलो त्या दिवशी,...

'रानी की वाव'

पाटण सर्वांना माहिती असते ते 'रानी की वाव' तिथे आहे म्हणून. भारतातील समृद्ध हातमाग कौशल्याचा उत्तम नमुना असलेली पटोला साडीदेखील पाटणचीच.  गुजराथमधील अहमदाबाद पासून साधारण दीडशे किलोमीटरवर असणारे पाटण जागतिक पर्यटनाच्या नकाशावर मानाचे स्थान पटकावून बसले आहे. युनेस्को चे जागतिक वारसा स्थळ म्हणून मानांकन मिळवलेले हे ठिकाण आहे.  रानी की वाव  रानी की वाव  रानी की वाव  रानी की वाव  रानी की वाव  'रानी की वाव' नावावरूनच आपल्या लक्षात येते की ही राणीने बांधलेली विहीर आहे. पण खरे तर ही नुसती वाव म्हणजे विहीर नसून  सुमारे 64 मीटर लांब, 20 मीटर रुंद आणि 27 मीटर खोल म्हणजे साधारण  सात मजल्यांइतकी खोली असलेले विष्णूचे मंदिर आहे असेच म्हणावे लागेल.  जमिनीपासून खोल खोल उतरत जाणारी अशी ही रचना आहे.  राणी उदयमती हिने तिचा पती  राजा भीमदेव पहिला याच्या स्मरणार्थ हे मंदिर बांधले म्हणून याचे नाव 'रानी की वाव' असे पडले. राजा भीमदेव पहिला म्हणजे अनहिलवाड किंवा अनहिल्लपूर पाटणच्या सोळंकी वंशाचा संस्थापक मुलराज ह्याचा मुलगा होता. ह्या वंशाने अनेक पराक्...

सोमनाथ - प्रभास पट्टण.

१९४७चे दीपावली पर्व. स्थळ होते सिंधुसागराच्या तीरावर असलेल्या सोमनाथ मंदिराच्या अवशेषांचे प्रवेशद्वार. तिथे उभे राहून सरदार वल्लभभाई पटेल यांनी दृढनिश्चय व्यक्त केला की भारतीय जनता आपले आराध्य दैवत असलेल्या सोमनाथ मंदिराला त्याची पूर्व प्रतिष्ठा आणि पूर्व वैभव प्राप्त करून देईल.  काय कारण होते ह्या प्रतिज्ञेचे? जर भारतीय जनतेचे आराध्य दैवत होते सोमनाथ तर आता मंदिराचे अवशेषच का उरले होते?  ह्या साठी आपल्याला जाणून घ्यावे लागेल सोमनाथ मंदिराच्या इतिहासाविषयी आणि सोमनाथच्या हिंदू जनमानसातील स्थानाविषयी.  हिंदूंन पूजनीय असलेल्या बारा ज्योतिर्लिंगापैकी सर्वात पहिले नाव असलेल्या आणि प्रथम स्थानी असलेले सोमनाथ. आपल्या सर्वाना माहिती असलेल्या स्तोत्राची सुरुवातच होते ती 'सौराष्ट्रे सोमनाथंच' पासून. त्यामुळेच त्याला 'आदि ज्योतिर्लिंग' म्हणून ओळखले जाते.  ऋग्वेदात तसेच अनेक पुराणात ज्याचा उल्लेख झाला आहे असे हे तीर्थधाम. ह्याविषयी आपल्याला अनेक कथा सापडतात.  शतकानुशतकांच्या मंदिराच्या इतिहासात नैसर्गिक रित्या पडझड झाल्यानंतर ते अनेक राजांकडून, भक्तांकडून सोने, च...

कवी केशवसुत स्मारक, मालगुंड

एका कवीचे स्मारक असावे आणि तेही कवीला साजेसे असावे ही दुर्मिळ गोष्ट आहे! पण असे एक स्मारक आपल्या महाराष्ट्रात आहे. रत्नागिरीजवळ मालगुंड येथे कवी केशवसुत म्हणजेच कृष्णाजी केशव दामले ह्यांचे एक सुंदर स्मारक उभारले आहे.  कवी केशवसुत जन्मस्थान  मार्गावरील फलक  प्रवेशद्वारातून दिसणारे दृश्य  कोकण मराठी साहित्य परिषदेने ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री मधू मंगेश कर्णिक ह्यांच्या संकल्पनेला प्रत्यक्षात उतरवले आहे.  एखाद्या कवीचे स्मारक कसे असावे हे एखाद्या साहित्यिकालाच चांगले कळू शकणार! स्मारकाच्या प्रवेशद्वारातून आपण आत गेलो की समोरच दिसते ते केशवसुत जन्मस्थान. हे जुने घर डागडुजी करून नीटनेटके ठेवले आहे. पडवीत मोठा झोपाळा आहे.  कवीच्या घरात कवीचे पुस्तक वाचताना  तिथेच केशवसुतांची काही पुस्तके तसेच को.म.सा.प.ची काही प्रकाशने विक्रीसाठी उपलब्ध आहेत.  घरातील आतल्या खोल्या तशा रिकाम्याच आहेत. काही थोडे जुने सामान तिथे ठेवले आहे .  माजघर  घराच्या मागच्या बाजूला कवीचे खरे स्मारक आहे. केशवसुतांनी त्या काळात म्हणजे दीडशे वर्षांपूर्वी कवितेत नवा प्रवाह आणला...

गणपतीपुळे

कोकणच्या निसर्गाविषयी किती आणि कितीदाही लिहिले तरी कमीच आहे. कोकणातल्या नारळी पोफळीच्या वाड्या, आंब्याची फणसाची झाडे, केळीच्या बागा, कौलारू घरे ह्यांनी नटलेली धरती, सोनचाफा बकुळीच्या सुगंधाने घमघमणारा आसमंत आणि कानावर येणारी समुद्राची गाज सारेच कसे मन प्रसन्न करणारे असते.  चराचरात वसणारा परमतत्वाचा अंश ह्या भूमीत प्रकर्षाने प्रत्ययाला येतो. ह्या भूमीत अनेक देवस्थाने नसती तरच नवल होते. ह्या देवस्थानांच्या जागा विलक्षण सुंदर आहेत. गणपतीपुळे हे असेच एका सुंदर स्थानी वसलेले श्री गणेशाचे स्वयंभू मंदिर. सिंधुसागराचा किनारा, चमकदार वाळूची पुळण आणि पाठीमागे गार्ड हिरव्या वनराईने झाकलेला डोंगर असे ह्या मंदिराचे नयनमनोहर ठिकाण आहे.  श्री गणपतीपुळे देवस्थान  ह्या स्वयंभू मूर्तीचा दृष्टांत पाचशे वर्षांपूर्वी भिडे गुरुजींना झाला. तिथे त्यांनी साधे गवताचे छप्पर उभारून पूजेला सुरुवात केली. त्यांची समाधी आपल्याला मंदिराच्या आवारातच बघायला मिळते.  समाधी  पुढे मग वेळोवेळी निरनिराळ्या भक्तांनी ह्या वास्तूची पुनर्बांधणी आणि दुरुस्ती केली. छत्रपती शिवाजी महाराजांचे सचिव अण्णाजी दत्त...

श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे जन्मस्थान - बर्वेवाडा, डुबेरे

काल दिनांक १८ ऑगस्ट २०२५. श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे ह्यांची ३२५ वी जयंती. श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे पुतळा, बर्वेवाडा श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे पुतळा, बर्वेवाडा श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे पुतळा, बर्वेवाडा आता बाजीराव म्हटले की केवळ बाजीराव मस्तानीच आठवणाऱ्या लोकांसाठी बाजीराव कोण ते सांगायला हवे. छत्रपती शिवाजी महाराजांनी पाहिलेले हिंदवी स्वराज्याचे स्वप्न प्रत्यक्षात जगणारे आणि हिंदवी साम्राज्य निर्माण करणारे बाजीराव बाळाजी पेशवे/ विश्वनाथ बल्लाळ भट हे शाहूछत्रपतींचे पेशवे म्हणजेच पंतप्रधान होते.  आपल्या वीस वर्षांच्या पेशवे म्हणून कारकीर्दीत ते चाळीसहून अधिक लढाया लढले आणि त्या सर्व लढायांत ते अजिंक्य राहिले. त्यांनी आपल्या कर्तृत्वाने मराठ्यांचे वर्चस्व अखंड भारतावर प्रस्थापित केले.  त्यांचा जन्म १८ ऑगस्ट १७००, भाद्रपद पौर्णिमा ह्या दिवशी डुबेरे येथे झाला. डुबेरे आजच्या सिन्नर तालुक्यात नाशिक जिल्ह्यात आहे.  ह्या गावी बाजीरावांच्या मातोश्री राधाबाई ह्यांचे भाऊ मल्हारराव बर्वे राहत असत. त्या बर्वे वाड्यात बाजीरावांचा जन्म झाला.  बर्वे वाडा  अवघ...

कोस्टल कर्नाटक ४ - शृंगेरी, मुकाम्बिका

कोस्टल कर्नाटक ४ - शृंगेरी, मुकाम्बिका  आज उडुपीहून लवकर निघून शृंगेरीला पोचण्याचा बेत आखला होता. त्याप्रमाणे आम्ही सकाळीच निघालो. रस्ता खूपच छान होता. आता खरं सांगायचे तर कोस्टल कर्नाटक प्रवासात रस्ता सुंदर होता म्हणणे ही द्विरुक्तीच आहे.  सगळ्या सडका अगदी एका पातळीतील आणि गुळगुळीत आहेत. खड्डे खळगे, रस्ते वर खाली असणे असे काही नसल्याने महाराष्ट्रातून गेलेल्या आम्हाला थोडे चुकल्यासारखे वाटले खरे!!! शिवाय रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे, स्वच्छता ह्यामुळे प्रवास फार आनंदाचा होतो. उडुपी शृंगेरी रस्ता तर आगुंबे जंगलातून जातो. त्यामुळे दाट झाडी होती. रस्त्यात सुप्रसिद्ध आगुंबे घाटही येतोच. सकाळची प्रसन्न वेळ आणि इतका छान रस्ता..दिवसाची चांगली सुरुवात होण्यासाठी आणखी काय पाहिजे?!!  आम्हाला वाटले होते इतक्या लवकर फारसे कोणी श्रुंगेरीत आलेले नसेल. पण शृंगेरीला पोचल्यावर लक्षात आले की आमच्यासारखाच विचार अनेकांनी केला होता!  अनेक बस रात्रभराचा प्रवास करून सकाळी शृंगेरीला पोचल्या होत्या. त्या लोकांच्या प्रातर्विधी आणि अंघोळीसाठी अनेक ठिकाणी माफक पैसे घेऊन उत्तम सोय केलेली होती....

कोस्टल कर्नाटक १ - मंगळुरू

  मंगळुरू- कुडला - मंगलोर - मंगलापूरम ही सगळी एकाच गावाची नावे. मंगलादेवी मंदिरावरून ह्या गावाचे नाव पडले मंगळुरू. दक्षिण कन्नड जिल्ह्याचे हे प्रमुख ठिकाण. सुंदर मंदिरे, स्वच्छ समुद्रकिनारे, नारळी-पोफळीची झाडे, आधुनिकतेच्या खुणा मिरवणारे मॉल्स आणि शहराबाहेरची पण तशी जवळच असणारी अनेक पर्यटन स्थळे.. ह्या साऱ्यामुळे मंगळुरु नेहमीच पर्यटकांचे आवडते राहिलेले आहे.  मंगळूरूला जाणारे आमचे विमान नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून होते. हा विमानतळ पाहण्याची उत्सुकता होतीच.  हा अतिशय भव्य आणि सुव्यवस्थित विमानतळ आहे. अनेक विमाने एकावेळी विमानतळावर आली तरी येणाऱ्या आणि जाणाऱ्या प्रवाशांच्यासाठी सर्व आवश्यक सुविधा केलेल्या आहेत.  जशी वर्दळ वाढेल तशी विमानतळावर जाण्यासाठी वाहतुकीची साधने देखील वाढतील अशी आशा आहे.  नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ  नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ  नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ  नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ  लहानशा प्रवासानंतर विमान मंगळुरुला उतरले. मंगळुरु विमानतळ म्हणजे टेबलटॉप रनवेज असणाऱ्या भारतातील मोजक्या विमानतळ...

रवींद्रनाथ टागोरांनाही भुरळ घालणारे 'कारवार'

कारवार - पांढऱ्या वाळूचे स्वच्छ समुद्रकिनारे, हिरव्या झाडांनी नटलेले डोंगर, काळी नदी, लाल माती असलेले सुंदर शहर. शहर होऊ पाहणाऱ्या किंवा खरे तर आता शहर झालेल्या कारवारने अजून आपले गावपण थोडे तरी टिकवून ठेवले आहे. शहरी बकालपणा मात्र टाळता आलेला नाही.   गोवा, कर्नाटक आणि महाराष्ट्र असा तिन्हींचा संगम आपल्याला कारवारमध्ये दिसतो. मराठी बोलणारी माणसेही भेटत राहतात.  गोव्यासारखे पर्यटकांचे लोंढे दिसत नाहीत. कदाचित आम्ही मार्चच्या अगदी सुरुवातीला गेलो तेव्हा अजून पर्यटकांचा ऐन हंगाम सुरु झाला नसावा!! उत्तर कन्नड जिल्ह्याची जीवनरेखा असणारी काळी नदी सदाशिवगड जवळ समुद्राला मिळते. तिथे एक मोठा पूल बांधलेला आहे. कारवार आणि गोव्याला जोडणारा हा पूल आता एक पर्यंटनस्थळच झाला आहे. सूर्योदय बघण्यासाठी पादचारी पुलावर जमलेले तुरळक पर्यटक, धावण्याचा सराव करणारे धावपटू, सायकलस्वार ह्यांच्या खेरीज सकाळच्या वेळी तिथे कोणीही नसते. आपल्या निसर्ग सौदर्यामुळे आणि शांततेमुळे हे ठिकाण अवश्य भेट देण्याजोगे आहे. आमचे हॉटेल ह्या पुलाच्या अगदी जवळ असल्याने आम्ही सूर्योदय अगदी मनसोक्त वेळ देऊन पाहू शकलो....