'सिल्व्हर व्हेगन ट्रॅव्हल्स' सोबत अनुभवा जगभराची सांस्कृतिक सफर. प्राचीन मंदिरे, निसर्गरम्य ठिकाणे आणि प्रवासात व्हेगन जीवनशैली जपण्याचे रंजक अनुभव.
हा ब्लॉग शोधा
गणपतीपुळे
कोकणच्या निसर्गाविषयी किती आणि कितीदाही लिहिले तरी कमीच आहे. कोकणातल्या नारळी पोफळीच्या वाड्या, आंब्याची फणसाची झाडे, केळीच्या बागा, कौलारू घरे ह्यांनी नटलेली धरती, सोनचाफा बकुळीच्या सुगंधाने घमघमणारा आसमंत आणि कानावर येणारी समुद्राची गाज सारेच कसे मन प्रसन्न करणारे असते.
चराचरात वसणारा परमतत्वाचा अंश ह्या भूमीत प्रकर्षाने प्रत्ययाला येतो. ह्या भूमीत अनेक देवस्थाने नसती तरच नवल होते. ह्या देवस्थानांच्या जागा विलक्षण सुंदर आहेत. गणपतीपुळे हे असेच एका सुंदर स्थानी वसलेले श्री गणेशाचे स्वयंभू मंदिर. सिंधुसागराचा किनारा, चमकदार वाळूची पुळण आणि पाठीमागे गार्ड हिरव्या वनराईने झाकलेला डोंगर असे ह्या मंदिराचे नयनमनोहर ठिकाण आहे.
श्री गणपतीपुळे देवस्थान
ह्या स्वयंभू मूर्तीचा दृष्टांत पाचशे वर्षांपूर्वी भिडे गुरुजींना झाला. तिथे त्यांनी साधे गवताचे छप्पर उभारून पूजेला सुरुवात केली. त्यांची समाधी आपल्याला मंदिराच्या आवारातच बघायला मिळते.
समाधी
पुढे मग वेळोवेळी निरनिराळ्या भक्तांनी ह्या वास्तूची पुनर्बांधणी आणि दुरुस्ती केली. छत्रपती शिवाजी महाराजांचे सचिव अण्णाजी दत्तो, नानासाहेब पेशवे, रमाबाई पेशवे, गोविंदपंत बुंदेले, माधवराव बर्वे हे मान्यवर ह्या मंदिराच्या साठी योगदान देत होते असा उल्लेख आढळतो.
आज जे मंदिर दिसते ते साधारण पंचवीस वर्षांपूर्वी बांधले गेले. लाल दगडातील कोरीवकाम, शिल्पे असलेले हे मंदिर आहे. गाभाऱ्यावरील उंच घुमटाकार कळस आणि सभागृहावरील कोरीवकाम असलेले छप्पर लक्ष वेधून घेतात. मंदिराच्या आवारात सुंदर दीपमाळा आहेत. दोन्ही बाजूला मिळून ह्या दहा दीपमाळा त्रिपुरी पौर्णिमेला दिव्यांच्या प्रकाशाने तेजाळतात.
देवस्थानचे प्रवेशद्वार
सभागृह
गाभारा
उपक्रम
उंदीरमामा
रात्रीच्या वेळी मंदिर असे दिसते!
मंदिरामागचा डोंगर हा गणेशाचे स्वयंभू स्थान म्हणून संरक्षित आहे. गणेशाला प्रदक्षिणा घालायची म्हणजे त्या डोंगराला प्रदक्षिणा घालायची.
दगडी बांधणीचा हा प्रदक्षिणा मार्ग घनदाट झाडी असलेला असा आहे. त्यामुळे पक्ष्यांचे आवाज, गार वारा ह्यामुळे साधारण ३ किलोमीटर ची प्रदक्षिणा घालण्याचे कष्ट अजिबात जाणवत नाहीत.
प्रदक्षिणा मार्ग
प्रदक्षिणा मार्ग
प्रदक्षिणा मार्गावर ठिकठिकाणी असे अनेक रंगीबेरंगी पक्षी दिसतात. घनदाट झाडी आहे. मोठाले प्राचीन वृक्ष आहेत. त्यावरील फळे खाण्यासाठी पक्ष्यांची सतत ये जा सुरु असते.
प्रदक्षिणा मार्ग
प्रदक्षिणा मार्ग
प्रदक्षिणा घालणारे भाविक!
प्रदक्षिणा अनवाणी घालायची असल्याने दुपार टाळली तर बरे. आम्ही अगदी भल्या पहाटे गेलो होतो. अतिशय सुंदर आणि सुखद वातावरण होते.
प्रदक्षिणा मार्गावर श्लोक लिहिलेले आहेत. ते वाचत चालण्याची मजा काही वेगळीच.
श्लोक
काही लहान मंदिरे आहेत. शुंडास्थान मंदिर मोठे आहे.
शुंडास्थान
शुंडास्थान मंदिर
त्यानंतर मग डोंगर उतार सुरु होतो. इतक्या वेळ चढत्या असणाऱ्या पायऱ्या उतरत्या होऊ लागतात.
प्रदक्षिणा मार्ग
प्रदक्षिणा मार्ग
मध्ये एक मठ आहे. पण आम्ही गेलो तेव्हा तिकडे काहीतरी काम चालू होते. तो शेंबेकर स्वामींचा मठ आहे. तसेच एक पाण्याचे टाके आहे.
पाण्याचे टाके
संपूर्ण प्रदक्षिणा मार्ग असा दिसतो.
https://youtu.be/yrMLWxeNGro डोंगराभोवती प्रदक्षिणा घालून परत मंदिरात आल्यावर दर्शन घेऊन मंदिराला प्रदक्षिणा घातली. मंदिरात फोटो काढायला अनुमती नाही. पण बाहेरून केलेली विडिओ आपण इथे पाहू शकता. मंदिराच्या बाहेरील भिंतीवरील सुंदर मूर्ती आपल्याला इथे बघता येतील.
https://youtu.be/nNchdHysFyM
आम्ही २०२५ च्या ऑक्टोबर महिन्यात गेलो होतो तेव्हा आम्हाला दीपपूजा पाहण्याची संधी मिळाली. मंदिरात ओळीने ठेवलेल्या पितळी दिवे असलेल्या दीपमाळा त्यात कापसाची वात आणि तेल घालून प्रकाशमान केल्या गेल्या. त्या शेकडो दिव्याचा प्रकाश अनुभवण्यासाठी विजेचे दिवे बंद केले गेले.
त्या प्रकाशात आरती आणि पूजा पाहणे हा एक विलक्षण अनुभव होता. काही शतकांपूर्वीचे दृश्य आपण अनुभवत आहोत असेच वाटत होते.
गणपतीपुळे तेथील निसर्गरम्यतेमुळे आणि समुद्रकिनाऱ्यामुळेदेखील एक भरपूर गर्दीचे पर्यटनस्थळ झालेले आहे. गणपतीपुळे इथे जाण्यासाठी रत्नागिरी हे सर्वात जवळचे रेल्वे स्थानक आहे. रत्नागिरीहून गणपतीपुळ्याला जाण्यासाठी टॅक्सी, रिक्षा, बस मिळू शकतात. साधारण २५ किलोमीटरचे अंतर आहे.
गणपतीपुळ्याला राहण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. मंदिराचे भक्तनिवास किंवा एमटीडीसी दोन्हीचे आरक्षण ऑनलाईन होऊ शकते. ह्याशिवाय अनेक हॉटेल्स आहेत. होमस्टे आहेत. आम्ही एमटीडीसीमध्ये राहिले होतो. मंदिराच्या अगदी समोर असल्याने मंदिरात बऱ्याचदा जाता आले. शाकाहारी जेवणासाठी देखील अनेक रेस्टॉरंट्स आहेत.
गणपतीपुळेच्या जवळ बघण्याजोगी अनेक चांगली ठिकाणे आहेत. मालगुंडला केशवसुतांचे स्मारक आहे, आरेवारे बीच आहे, कोळिसरेला लक्ष्मीकेशवाचे निसर्गरम्य मंदिर आहे. (त्याची माहिती आपण
https://silvervegantravels.blogspot.com/2025/03/blog-post.html इथे वाचू शकाल.) त्याच रस्त्यावर कऱ्हाटेश्वराचे सुंदर स्थान आहे.
कुठेच न जाता गणपतीपुळ्याच्या समुद्रकिनाऱ्यावर गेलात तरी समुद्र आणि आकाश पाहण्यात वेळ कसा जातो कळणार नाही.
इथे बीच बघता येईल.
https://youtu.be/1nSsu1FN5BE
फक्त समुद्रात आत जाणार असाल तर तिथे पाट्या लावलेल्या असतील किंवा तटरक्षक सांगतील त्या नियमांचे नीट पालन करा. काही ठिकाणी गणपतीपुळ्याचा समुद्रकिनारा धोकादायक आहे.
भारताच्या पश्चिम द्वाराचा रक्षक असणारी ही देवता आहे असे म्हटले जाते. मावळता सूर्य पश्चिम क्षितिजावर येताना, सूर्य, समुद्र आणि मंदिर अतिशय रमणीय दिसते. संध्याकाळच्या वेळी आकाशातील विलोभनीय रंग छटा , ढगांचे निरनिराळे आकार पाहताना मन हरपून जाते.
दिशा सांजावताना
दिशा सांजावताना
दिशा सांजावताना
कहीं दूर जब दिन ढल जाए ..
पूर्वेचे आकाश
#Ganapatipule #Ratnagiri #Konkan railway #GaneshTemple #Seashore #beaches in Maharashtra
कोस्टल कर्नाटक सहलीचा आमचा तिसरा दिवस देखील फार आनंदात गेला. काही गोष्टी ठरवल्याप्रमाणे होऊ शकल्या. काही गोष्टी ठरवल्याप्रमाणे अजिबात झाल्या नाहीत. पण तरी जमेची बाजूच जड झाली हे खरे. उडुपीला सकाळी गाडी बोलावली होती आणि ती आम्हाला काही तास फिरवून आणणार होती. पहिले ठिकाण होते त्रासी मारवंते बीच. फोटो बघूनच हा बीच पाहण्याची खूप उत्सुकता वाटत होती. हा अत्यंत अनोखा बीच आहे. रस्त्याच्या एक बाजूला सौपर्णिका नदी, दुसऱ्या बाजूला अरबी समुद्र - सिंधूसागर! त्रासी मरवंथे बीच 📷https://karnatakatourism.org/en/destinations/udupi उडुपीपासून निघून इकडे येऊन पोचलो. एका बाजूला नदी दिसत होती. दुसऱ्या बाजूला समुद्र किनाराही दिसत होता. पण फोटोत दाखवल्याप्रमाणे ठिकाण काही दिसेना. मग चौकशी केल्यावर कळले की असे फक्त ड्रोनने काढलेल्या फोटोत दिसते. डोळ्यांना असे दिसत नाही!! एरवी आपण म्हणतो की डोळ्यांना जितके सुंदर दिसते तितके फोटोत उतरत नाही. पण इथे उलटे झाले होते!फोटोतल्याइतके सुंदर डोळ्यांना दिसत नव्हते!! पण असे दिसले नाही म्हणून काय झाले? रस्त्याच्या एका बाजूला नदी वाहते आहे...
मी आधीच्या पोस्टमध्ये सांगितले होते की आजचा सूर्यास्त समुद्रात होता तर उद्याचा सूर्योदय शरावती नदीत असणार आहे! तोच हा सूर्योदय शरावती नदीत, कमळांच्या मध्ये. शरावती बॅकवॉटर बोटिंग दुसऱ्या दिवशी सकाळी सव्वा सहापर्यंत आम्ही बोटिंगच्या ठिकाणी पोचलो. कारण आम्हाला सूर्योदय चुकवायचा नव्हता. होनावर जवळचे शरावती नदीतील बोटिंग हा एक अविस्मरणीय अनुभव आहे. आजूबाजूची शांतता, संथ पाणी, स्वच्छ नितळ पाण्यात वाकून आपले प्रतिबिंब न्याहाळणारी नारळाची झाडे, पाण्यात अध्ये मध्ये असलेली लहानशी बेटे, खारफूटीची जंगले, कमळाची पाण्यावर तरंगणारी पाने, उगवत्या सूर्याची पाण्यात मिसळणारी किरणे, त्याने तांबूस झालेले पाणी .. एक वेगळेच जग असते ते. तुम्ही जितक्या वेळासाठी बोट ठरवलेली असेल.. तास दीड तास.. तो वेळ, तुमच्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षणांपैकी एक असणार हे मी अगदी खात्रीने सांगू शकते. आपोआप जगाचा, आयुष्याचा कोलाहल मंद होत जातो. पहाटेचा मवाळ प्रकाश, पाण्यावर हेलकावणारी नाव, हवेतला अगदी किंचितसा सुखद गारवा आणि मुरत जाणारी शांतता ह्या सगळ्याने मन निवळत जाते. आम्ही गेलो त्या दिवशी,...
पाटण सर्वांना माहिती असते ते 'रानी की वाव' तिथे आहे म्हणून. भारतातील समृद्ध हातमाग कौशल्याचा उत्तम नमुना असलेली पटोला साडीदेखील पाटणचीच. गुजराथमधील अहमदाबाद पासून साधारण दीडशे किलोमीटरवर असणारे पाटण जागतिक पर्यटनाच्या नकाशावर मानाचे स्थान पटकावून बसले आहे. युनेस्को चे जागतिक वारसा स्थळ म्हणून मानांकन मिळवलेले हे ठिकाण आहे. रानी की वाव रानी की वाव रानी की वाव रानी की वाव रानी की वाव 'रानी की वाव' नावावरूनच आपल्या लक्षात येते की ही राणीने बांधलेली विहीर आहे. पण खरे तर ही नुसती वाव म्हणजे विहीर नसून सुमारे 64 मीटर लांब, 20 मीटर रुंद आणि 27 मीटर खोल म्हणजे साधारण सात मजल्यांइतकी खोली असलेले विष्णूचे मंदिर आहे असेच म्हणावे लागेल. जमिनीपासून खोल खोल उतरत जाणारी अशी ही रचना आहे. राणी उदयमती हिने तिचा पती राजा भीमदेव पहिला याच्या स्मरणार्थ हे मंदिर बांधले म्हणून याचे नाव 'रानी की वाव' असे पडले. राजा भीमदेव पहिला म्हणजे अनहिलवाड किंवा अनहिल्लपूर पाटणच्या सोळंकी वंशाचा संस्थापक मुलराज ह्याचा मुलगा होता. ह्या वंशाने अनेक पराक्...
१९४७चे दीपावली पर्व. स्थळ होते सिंधुसागराच्या तीरावर असलेल्या सोमनाथ मंदिराच्या अवशेषांचे प्रवेशद्वार. तिथे उभे राहून सरदार वल्लभभाई पटेल यांनी दृढनिश्चय व्यक्त केला की भारतीय जनता आपले आराध्य दैवत असलेल्या सोमनाथ मंदिराला त्याची पूर्व प्रतिष्ठा आणि पूर्व वैभव प्राप्त करून देईल. काय कारण होते ह्या प्रतिज्ञेचे? जर भारतीय जनतेचे आराध्य दैवत होते सोमनाथ तर आता मंदिराचे अवशेषच का उरले होते? ह्या साठी आपल्याला जाणून घ्यावे लागेल सोमनाथ मंदिराच्या इतिहासाविषयी आणि सोमनाथच्या हिंदू जनमानसातील स्थानाविषयी. हिंदूंन पूजनीय असलेल्या बारा ज्योतिर्लिंगापैकी सर्वात पहिले नाव असलेल्या आणि प्रथम स्थानी असलेले सोमनाथ. आपल्या सर्वाना माहिती असलेल्या स्तोत्राची सुरुवातच होते ती 'सौराष्ट्रे सोमनाथंच' पासून. त्यामुळेच त्याला 'आदि ज्योतिर्लिंग' म्हणून ओळखले जाते. ऋग्वेदात तसेच अनेक पुराणात ज्याचा उल्लेख झाला आहे असे हे तीर्थधाम. ह्याविषयी आपल्याला अनेक कथा सापडतात. शतकानुशतकांच्या मंदिराच्या इतिहासात नैसर्गिक रित्या पडझड झाल्यानंतर ते अनेक राजांकडून, भक्तांकडून सोने, च...
लोकमान्य टिळक म्हणजेच बाळ गंगाधर टिळक हे भारतीय स्वातंत्र्यसंग्रामातील एक महत्वाचे नाव. केसरी आणि मराठाचे संपादक, गणित आणि कायदयाचे शिक्षक, स्वातंत्र्यसमराला दिशा देणारे एक प्रभावी राष्ट्रीय नेतृत्व, गीतेवर भाष्य लिहिणारे तत्वचिंतक, संशोधक अशा विविध रूपांत आपण त्यांना ओळखतो. त्यांनी म्हटलेले 'स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच ' हे नुसते वाक्य किंवा घोषणा राहिली नाही तर ती भावना प्रत्येक भारतीयाच्या मनात रुजली. स्वातंत्र्यसंग्रामाला ह्यातून ऊर्जा मिळाली. वंदे मातरमचा घोष बंगालासोबतच संपूर्ण देशांत गुंजला आणि स्वातंत्र्याची प्रेरणा बनला. त्यात 'लाल बाल पाल' ह्या त्रयीचा मोठा वाटा होता. ब्रिटिश सरकार त्यांना 'भारतीय असंतोषाचे जनक' असे म्हणत असे. निद्रिस्त समाजाला जागे करण्याचे श्रेय लोकमान्य टिळकांना जाते. त्यांचा जन्म २३ जुलै १८५६ ला रत्नागिरी येथे झाला. आज आपण पाहणार आहोत ते जिथे त्यांचा जन्म झाला ते रत्नागिरीमधील घर. आता तिथे स्मारक केलेले आहे. वयाच्या साधारण दहाव्या वर्षापर्यंत लोकमान्य टिळक ह्या वास्तूत राहिले. ही वास्तू रत...
एका कवीचे स्मारक असावे आणि तेही कवीला साजेसे असावे ही दुर्मिळ गोष्ट आहे! पण असे एक स्मारक आपल्या महाराष्ट्रात आहे. रत्नागिरीजवळ मालगुंड येथे कवी केशवसुत म्हणजेच कृष्णाजी केशव दामले ह्यांचे एक सुंदर स्मारक उभारले आहे. कवी केशवसुत जन्मस्थान मार्गावरील फलक प्रवेशद्वारातून दिसणारे दृश्य कोकण मराठी साहित्य परिषदेने ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री मधू मंगेश कर्णिक ह्यांच्या संकल्पनेला प्रत्यक्षात उतरवले आहे. एखाद्या कवीचे स्मारक कसे असावे हे एखाद्या साहित्यिकालाच चांगले कळू शकणार! स्मारकाच्या प्रवेशद्वारातून आपण आत गेलो की समोरच दिसते ते केशवसुत जन्मस्थान. हे जुने घर डागडुजी करून नीटनेटके ठेवले आहे. पडवीत मोठा झोपाळा आहे. कवीच्या घरात कवीचे पुस्तक वाचताना तिथेच केशवसुतांची काही पुस्तके तसेच को.म.सा.प.ची काही प्रकाशने विक्रीसाठी उपलब्ध आहेत. घरातील आतल्या खोल्या तशा रिकाम्याच आहेत. काही थोडे जुने सामान तिथे ठेवले आहे . माजघर घराच्या मागच्या बाजूला कवीचे खरे स्मारक आहे. केशवसुतांनी त्या काळात म्हणजे दीडशे वर्षांपूर्वी कवितेत नवा प्रवाह आणला...
कोस्टल कर्नाटक ४ - शृंगेरी, मुकाम्बिका आज उडुपीहून लवकर निघून शृंगेरीला पोचण्याचा बेत आखला होता. त्याप्रमाणे आम्ही सकाळीच निघालो. रस्ता खूपच छान होता. आता खरं सांगायचे तर कोस्टल कर्नाटक प्रवासात रस्ता सुंदर होता म्हणणे ही द्विरुक्तीच आहे. सगळ्या सडका अगदी एका पातळीतील आणि गुळगुळीत आहेत. खड्डे खळगे, रस्ते वर खाली असणे असे काही नसल्याने महाराष्ट्रातून गेलेल्या आम्हाला थोडे चुकल्यासारखे वाटले खरे!!! शिवाय रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे, स्वच्छता ह्यामुळे प्रवास फार आनंदाचा होतो. उडुपी शृंगेरी रस्ता तर आगुंबे जंगलातून जातो. त्यामुळे दाट झाडी होती. रस्त्यात सुप्रसिद्ध आगुंबे घाटही येतोच. सकाळची प्रसन्न वेळ आणि इतका छान रस्ता..दिवसाची चांगली सुरुवात होण्यासाठी आणखी काय पाहिजे?!! आम्हाला वाटले होते इतक्या लवकर फारसे कोणी श्रुंगेरीत आलेले नसेल. पण शृंगेरीला पोचल्यावर लक्षात आले की आमच्यासारखाच विचार अनेकांनी केला होता! अनेक बस रात्रभराचा प्रवास करून सकाळी शृंगेरीला पोचल्या होत्या. त्या लोकांच्या प्रातर्विधी आणि अंघोळीसाठी अनेक ठिकाणी माफक पैसे घेऊन उत्तम सोय केलेली होती....
मंगळुरू- कुडला - मंगलोर - मंगलापूरम ही सगळी एकाच गावाची नावे. मंगलादेवी मंदिरावरून ह्या गावाचे नाव पडले मंगळुरू. दक्षिण कन्नड जिल्ह्याचे हे प्रमुख ठिकाण. सुंदर मंदिरे, स्वच्छ समुद्रकिनारे, नारळी-पोफळीची झाडे, आधुनिकतेच्या खुणा मिरवणारे मॉल्स आणि शहराबाहेरची पण तशी जवळच असणारी अनेक पर्यटन स्थळे.. ह्या साऱ्यामुळे मंगळुरु नेहमीच पर्यटकांचे आवडते राहिलेले आहे. मंगळूरूला जाणारे आमचे विमान नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून होते. हा विमानतळ पाहण्याची उत्सुकता होतीच. हा अतिशय भव्य आणि सुव्यवस्थित विमानतळ आहे. अनेक विमाने एकावेळी विमानतळावर आली तरी येणाऱ्या आणि जाणाऱ्या प्रवाशांच्यासाठी सर्व आवश्यक सुविधा केलेल्या आहेत. जशी वर्दळ वाढेल तशी विमानतळावर जाण्यासाठी वाहतुकीची साधने देखील वाढतील अशी आशा आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लहानशा प्रवासानंतर विमान मंगळुरुला उतरले. मंगळुरु विमानतळ म्हणजे टेबलटॉप रनवेज असणाऱ्या भारतातील मोजक्या विमानतळ...
कारवार - पांढऱ्या वाळूचे स्वच्छ समुद्रकिनारे, हिरव्या झाडांनी नटलेले डोंगर, काळी नदी, लाल माती असलेले सुंदर शहर. शहर होऊ पाहणाऱ्या किंवा खरे तर आता शहर झालेल्या कारवारने अजून आपले गावपण थोडे तरी टिकवून ठेवले आहे. शहरी बकालपणा मात्र टाळता आलेला नाही. गोवा, कर्नाटक आणि महाराष्ट्र असा तिन्हींचा संगम आपल्याला कारवारमध्ये दिसतो. मराठी बोलणारी माणसेही भेटत राहतात. गोव्यासारखे पर्यटकांचे लोंढे दिसत नाहीत. कदाचित आम्ही मार्चच्या अगदी सुरुवातीला गेलो तेव्हा अजून पर्यटकांचा ऐन हंगाम सुरु झाला नसावा!! उत्तर कन्नड जिल्ह्याची जीवनरेखा असणारी काळी नदी सदाशिवगड जवळ समुद्राला मिळते. तिथे एक मोठा पूल बांधलेला आहे. कारवार आणि गोव्याला जोडणारा हा पूल आता एक पर्यंटनस्थळच झाला आहे. सूर्योदय बघण्यासाठी पादचारी पुलावर जमलेले तुरळक पर्यटक, धावण्याचा सराव करणारे धावपटू, सायकलस्वार ह्यांच्या खेरीज सकाळच्या वेळी तिथे कोणीही नसते. आपल्या निसर्ग सौदर्यामुळे आणि शांततेमुळे हे ठिकाण अवश्य भेट देण्याजोगे आहे. आमचे हॉटेल ह्या पुलाच्या अगदी जवळ असल्याने आम्ही सूर्योदय अगदी मनसोक्त वेळ देऊन पाहू शकलो....
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा