मुख्य सामग्रीवर वगळा

बांते स्रेइ- एक सुखद स्वप्न

 Banteay Srei - बांते स्रेइ हे एक सुखद स्वप्न आहे. अंगकोरवाट मंदिर समूहातील काळी राखाडी मंदिरे, त्यांची अवाढव्य आणि कलापूर्ण रचना, त्यांचे ढासळणारे चिरे पाहून मन एकाचवेळी विस्मयचकित आणि खिन्न झालेले असते. अशा वेळी जेव्हा बांते स्रेइ समोर येते तेव्हा मन सुखावते. 

बांते स्रेइ अनेक कारणांसाठी पर्यटकांचे आवडते ठिकाण आहे. एकतर ह्या कामासाठी गुलाबी लालसर दगड वापरला आहे. त्यामुळे त्याला डोळ्यांना सुखावणारा सुंदर रंग आहे. दुसरे म्हणजे त्याचा आकार बाकी मंदिरांच्या आकारांच्या तुलनेत लहान आहे. शिवाय एकाच स्तरावर असल्याने अंगकोरवाटप्रमाणे वर जिने चढणे, उतरणे, अनेक किलोमीटर चालणे असे काही करायला लागत नाही. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकदेखील संपूर्ण मंदिर बघू शकतात. तिसरे म्हणजे त्यावरील कोरीवकाम बऱ्याच प्रमाणात चांगले राहिले आहे. 

आत्तापर्यंत इतक्यांदा 'बांते स्रेइ' असे नाव घेतले. पण ते काय आहे ते सांगितलेच नाही. बांते स्रेइ आहे कंबोडियातील एक प्राचीन मंदिर. साधारण दहाव्या शतकात बांधले गेलेले हे मंदिर वेगळे आहे ह्याचे कारण म्हणजे हे तेथील एकमेव मंदिर आहे जे राजाने बांधलेले नाही . हे मंदिर बांधले आहे राजदरबारातील दोन जणांनी. त्यांची नावे होती यज्ञवराह आणि विष्णुकुमार. कदाचित राजाने बांधलेले नसल्यानेच मंदिराचा आकार लहान असेल. 

ह्या ठिकाणचे मूळ नाव होते ईश्वरपूर आणि मंदिराचे नाव होते त्रिभुवनमहेश्वर. तिन्ही जगांचा स्वामी असलेला शंकर इथली मुख्य देवता. काळाच्या ओघात मंदिराचे नाव बदलले. तिथल्या ख्मेर भाषेत आता नाव आहे Prasat Banteay Srei. नावावरील संस्कृत प्रभावामुळे आपल्याला अर्थ सहज कळतो . तो आहे सुंदर स्त्रियांचा महाल, किल्ला किंवा शहर. 

शंकराचे मंदिर असताना नाव असे का बदलले असेल? तर त्या मंदिरात असणारे स्त्रियांचे सुंदर पुतळे हे ह्याचे कारण असू शकेल. जनसामान्य एकमेकांशी बोलताना, कोणते शंकराचे मंदिर ह्याची खूण सांगताना म्हणत असतील की जिथे सुंदर स्त्रियांचे पुतळे आहेत किंवा स्त्रियांचे सुंदर पुतळे आहेत ते मंदिर!! 

देवता 

देवता 

अंगकोरवाटच्या मंदिरापेक्षाही हे मंदिर जुने असूनदेखील त्याच्या
तुलनेने सुस्थितीत कसे? तर त्याचे जीर्णोद्धार वेळोवेळी यशस्वी पणे करता आले. बऱ्याचदा केले गेले हेच कारण.

सियाम रीप पासून साधारण ३० किलोमीटर आणि अंगकोरवाट मंदिर समूहांपासून २०-२५ किलोमीटर अंतरावर आहे हे मंदिर. रस्त्यात लहान लहान गावे, शेते, झाडे,रस्त्यावर फुले,भाज्या विकणारे स्थानिक ह्या सगळ्यांत प्रवास अगदी पटकन होतो. 

मंदिर आणि प्रतिबिंब 
मंदिर आणि प्रतिबिंब 
मंदिर आणि प्रतिबिंब 
मंदिराभोवती खंदक, पाण्याचा कालवा, मग आत मंदिराभोवती सज्जा आणि त्याच्या आत एकामध्ये एक असलेले प्राकार अशी मंदिराची साधारण संरचना आहे. आम्ही गेलो तेव्हा पाण्याच्या कालव्यात कमळे फुललेली होती. 
कमलवनचिताम्बुः 
कमल पुष्प 
एकात एक असलेले प्राकार असल्याने बाहेरपासून आतपर्यंत थोड्या थोड्या अंतराने अशी प्रवेशद्वारे दिसतात. 

सुंदर कलापूर्ण द्वार 
बांते स्रेइमधील प्रवेशद्वाराची रचना साधारण अशी आहे. अतिशय सुंदर नक्षीदार खांबांची नाजूक चौकट. त्या द्वारशाखेवर भली मोठी त्रिकोणी आकाराची रचना. त्यावर रामायण महाभारत व इतर हिंदू कथांमधील प्रसंग कोरलेले. 

सज्जाचे मात्र आता फक्त खांब उरले आहेत. एकूणच बांते स्रेइमध्ये आच्छादित भाग कमी असल्याने इथे सकाळी लवकर किंवा संध्याकाळी उन्हे उतरू लागल्यावर जाणे सोयीचे होते. नाहीतर कडक उन्हाच्या माऱ्यामुळे मंदिर नीट बघता येत नाही. शिवाय प्रखर उन्हात फोटो चांगले येत नाहीत ते वेगळेच. 

आवार 
खांब - (मधला नव्हे !!- आजूबाजूचे !!)
खांबांवरचे कोरीवकाम देखील अगदी नाजूक आणि सुंदर आहे. 

नक्षीदार खांब 
नक्षीदार खांब 
तुम्हाला झूम करून बघता आले हे सगळे फोटोज तर त्या नक्षीचा आनंद घेता येईल. 

नक्षीदार खांब 
नक्षीदार खांब 
शैव मंदिर असल्याने शंकराशी संबंधित बरेच प्रसंग आपल्याला शिल्पात चित्रित केलेले आढळतात. 

नटराज 
इथे ह्या दरवाजाच्या द्वारशाखेवर जी त्रिकोणी रचना आहे त्यावर आपल्याला नृत्यमग्न शंकर - नटराज दिसतो आहे. एक हात आणि पाय भंगलेला असूनदेखील त्या नृत्याचे सौंदर्य आणि लालित्य लक्षात आल्यावाचून राहत नाही. द्वारशाखेवर देखील अतिशय बारीक सुंदर काम केलेले आहे. 

द्वारशाखा 
रावण गर्वहरण 
इथे आपल्याला कैलास हलवू पाहणारा रावण दिसत आहे. कैलास हलवण्यासाठी जोर यावा म्हणून त्याने जमिनीवर रोवलेले पाय, एका बाजूला झुकल्याने त्याची वाकलेली मान, त्यावरची त्याच्या दहा मस्तकांची एकावर एक अशी चमत्कृतीपूर्ण रचना, त्याच्या वस्त्रावरील चुण्या, कानातील कुंडले, मुगुटांवरची नक्षी इतकेच काय वेगवेगळ्या चेहऱ्यांवरचे निरनिराळे भाव आपल्याला ह्या शिल्पात पाहायला मिळतात. 

कैलासावर तीन थरांत अनेक आकृती दिसतात. खालच्या थरातले प्राणी घाबरलेले आहेत. काही पळत आहेत. मधल्या थरात प्राण्यांचे चेहरे असलेल्या मनुष्याकृती आहेत. अगदी वरच्या थरातले ऋषी विचार विनिमय करत आहेत. त्यांच्यावर आहेत कैलासावर बसलेले उमा महेश. पण दुर्दैवाने त्यांचाच फोटो आला नाही. खालच्या द्वारशाखेचा फोटो घेण्याच्या नादात वरचे महत्वाचे काही फ्रेममध्ये घ्यायचे राहून गेले हे तेव्हा लक्षातच आले नाही. 

पण मग बाकी फोटो पाहत असताना एका सुंदर दाराचा फोटो दिसला. त्यात हा संपूर्ण प्रसंग फोटोत आलेला होता. 

सुंदर दार 

रावण गर्वहरण 
वर बसलेल्या शंकरांचा पाय दिसतो आहे. मांडीवर पार्वती बसलेली आहे. शक्तिमान रावण कैलास हलवत असताना शंकरांनी केवळ पायाचा अंगठा खाली दाबून रावणाच्या गर्वाचे हरण केले ही कथा आपल्याला माहितीच आहे. 

आणखी एका द्वारशाखेच्या वर आपल्याला 'काळ' चित्रित केलेला दिसतो. शंकराचे एक रूप असलेला काळ, समयाचे प्रतीक असणारा काळ. 

काळ 
आणखी एक वैशिष्टयपूर्ण शिल्प आहे ते नृसिंहावताराचे. सहसा आपण पाहतो त्यात नृसिंहाच्या मांडीवर आडवा हिरण्यकश्यपू असतो. पण इथल्या शिल्पात मात्र हिरण्यकश्यपूचे तोंड आपल्याला नृसिंहाच्या मांडीवरून उलटे आपल्याकडे बघताना दिसते. दुसरे वैशिष्ट्य म्हणजे हिरण्यकश्यपूचा चेहरा दैत्यासारखा किंवा घाबरलेला न दाखवता सौम्य दाखवला आहे. त्यामुळे नृसिंह हिरण्यकश्यपूचा पोट फाडतो आहे का नाही असाच आपल्याला प्रश्न पडतो!! 

नृसिंह - हिरण्यकश्यपू 
नृसिंह - हिरण्यकश्यपू 

रामायण प्रत्येक देशात थोडे थोडे तिथले काहीतरी वेगळेपण किंवा लोककथा घेऊन प्रचलित झाले. कंबोडिया मधील रामायणात रावणाच्या आधी विराधाने सीतेला पळवण्याचा प्रयत्न केला होता व रामाने त्याला मारले होते अशी कथा आहे. त्याचे चित्रण आपल्याला एका शिल्पात दिसते. 

सीताहरण 
रामायणातील आणखी एक प्रसंग इथे दिसला तो म्हणजे वाली सुग्रीव युद्ध. सुग्रीवाच्या विनंतीवरून रामाने त्या युद्धात केलेला हस्तक्षेप आणि वालीचा वध. 

वाली-सुग्रीव युद्ध 

वैभवाचे, समृद्धीचे प्रतीक असणारी गजलक्ष्मी आपल्याला एका दारावर चित्रित केलेली दिसते. 

गजलक्ष्मी 
आता हा पुढचा फोटो पहा. अतिशय सुंदर रचना अत्यंत बारकाईने चित्रित केलेले हे संपूर्ण दारच नयनरम्य आहे. 

नक्षीदार दार!
पण मला तुमचे लक्ष वेधायचे आहे ते त्यावर कोरलेल्या खांडव वनाच्या शिल्पाकडे. इतके बारकाईने कोरलेले शिल्प आपल्याला आश्चर्यचकित करते. 

खांडववन दहन 
अग्नीला खांडव वन जाळायचे असते. पण जेव्हा जेव्हा तो प्रयत्न करतो तेव्हा तेव्हा इंद्र पाऊस पाडतो आणि खांडव वनाला लागलेली आग विझून जाते. कारण तिथला नागराजा तक्षक हा इंद्राचा मित्र असतो. 

मग अग्नी, अर्जुन आणि कृष्णाकडे भिक्षुकांचे रूप घेऊन जातो आणि मदतीची भिक्षा मागतो. मदत करण्याचे वचन दिल्यामुळे कृष्ण आणि अर्जुन अग्नीच्या मदतीला खांडववनाशी येतात. अग्नीने खांडववन भस्मसात करायला सुरुवात केल्यावर नेहमीप्रमाणे इंद्र पाऊस पडण्यास सुरुवात करतो. पण कृष्ण आणि अर्जुन अस्त्रे सोडून पाऊस रोखून धरतात. खांडव वन जळू लागते. प्राणी इतस्ततः धावू लागतात. वनातून बाहेर पळू लागतात.त्यांच्या मध्यभागी दोघेजण दाखवले आहेत ते ह्या आगीतून कसे वाचावे ह्याचा विचार करत आहेत. 

इतकी सगळी गोष्ट ह्या शिल्पात अत्यंत सुंदर रित्या, सर्व बारकाव्यांसह दाखवली आहे. तीन हत्ती असलेल्या रथात आरूढ इंद्र सर्वात वर. खरे तर एरवी तो ऐरावतावर असतो. मग आता तीन हत्ती का? त्याचे काही विशेष महत्व आहे का, ह्याची मला उत्सुकता वाटते आहे. इंद्राने वर्षाव केलेल्या पर्जन्यधारा, त्या अडवणारे कृष्णार्जुनाच्या बाणांचे कवच, जंगलातील वृक्षांची पाने, उडणारे पक्षी, घाबरलेले प्राणी, रथात आरूढ असलेले कृष्ण आणि अर्जुन ..किती म्हणून बारकावे टिपावे! नीट पाहिलेत तर दिसेल की रथाचे घोडे धावत आहेत ती गती पण स्पष्ट कळते आहे. त्यांची शेपटी हवेत उडते आहे. पण सारथ्याने लगाम ओढला आहे. त्यामुळे गतीला अवरोध झाला आहे. मागचे पाय दुमडले गेले आहे. इतकेच नाही तर घोड्यांच्या गळयातील माळेचे मणीदेखील हिंदकाळले आहेत. 

इतके आणि असे बारकावे शिल्पात कोरून अजरामर करणाऱ्या शिल्पकाराचे अपार कौतुक वाटते. आता मला सांगा, मंदिर लहान असले तरी इतकी सुंदर शिल्पे बघायला वेळ लागणारच ना! 

मंदिर 


द्वारपाल 
द्वारपाल 
द्वारपालांच्या अशा आकृती दरवाजांपुढे आहेत. त्या अगदी सजीव भासतात. आम्ही बांते स्रेइला गेलो होतो २५ डिसेंबर २०१२ ह्या दिवशी सकाळी. तेव्हाचे हे सगळे फोटो आहेत. अगदी आतपर्यंत मात्र जाउ देत नव्हते त्या वेळी. काहीतरी दुरुस्तीचे काम चालू असावे बहुधा. त्यामुळे आत शिवलिंग आहे की नाही ते पाहण्याची संधी मिळाली नाही. 

लाकडावर करावे इतके नजाकतीने केलेले दगडातील शिल्पकाम, सोन्यावर असावे इतके मौल्यवान, मिळालेल्या जागेचा इंच न इंच नाजूक आणि अर्थपूर्ण सुंदर आकारांनी आणि आकृतींनी व्यापलेला असे हे बांते स्रेइ , 'ख्मेर कलेचा मुकुटमणी', 'अंगकोरचे रत्न ' ही सर्व बिरुदे सार्थ करणारे असेच आहे. 

#banteaysrei #cambodia #siemreap #angkorwat #angkor #angkorwattemple #angkorwatcambodia #angkorthom #angkorwattour #angkortemple #siemreapcambodia #angkorwatsunrise #explorecambodia #siemreaptrip #siemrep #Pinktemple 








टिप्पण्या

  1. वाह अगदी चवीने आणि भरपूर वेळ घेऊन लिहिलेला लेख अतिशय आवडला. भारताचा दैदिप्यमान इतिहास जपण्यासाठी तुम्ही मोलाची भर घातली आहे हे विशेष भावले!

    उत्तर द्याहटवा
  2. वृंदा किती बारकाईने निरीक्षण केले आहेस मंदिराचे....आम्ही सुद्धा angorvat मंदिर पाहिले पण हे मंदिर नव्हते पाहिले व जरी पाहिले असते तरी तुझ्याइतकी निरीक्षणशक्ती व कल्पनाशक्तीची आमच्याकडे नक्कीच नाही....प्रणाम तुझ्या सर्वच शक्तींना !!!

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कोस्टल कर्नाटक ३. -कुरु बेट, अनेगुड्डे श्री विनायक मंदिर, मणिपाल लेक

  कोस्टल कर्नाटक सहलीचा आमचा तिसरा दिवस देखील फार आनंदात गेला. काही गोष्टी ठरवल्याप्रमाणे होऊ शकल्या. काही गोष्टी ठरवल्याप्रमाणे अजिबात झाल्या नाहीत. पण तरी जमेची बाजूच जड झाली हे खरे.  उडुपीला सकाळी गाडी बोलावली होती आणि ती आम्हाला काही तास फिरवून आणणार होती. पहिले ठिकाण होते त्रासी मारवंते बीच.  फोटो बघूनच हा बीच पाहण्याची खूप उत्सुकता वाटत होती. हा अत्यंत अनोखा बीच आहे. रस्त्याच्या एक बाजूला सौपर्णिका नदी, दुसऱ्या बाजूला अरबी समुद्र - सिंधूसागर! त्रासी मरवंथे बीच  📷https://karnatakatourism.org/en/destinations/udupi उडुपीपासून निघून इकडे येऊन पोचलो. एका बाजूला नदी दिसत होती. दुसऱ्या बाजूला समुद्र किनाराही दिसत होता. पण फोटोत दाखवल्याप्रमाणे ठिकाण काही दिसेना.  मग चौकशी केल्यावर कळले की असे फक्त ड्रोनने काढलेल्या फोटोत दिसते. डोळ्यांना असे दिसत नाही!! एरवी आपण म्हणतो की डोळ्यांना जितके सुंदर दिसते तितके फोटोत उतरत नाही. पण इथे उलटे झाले होते!फोटोतल्याइतके सुंदर डोळ्यांना दिसत नव्हते!! पण असे दिसले नाही म्हणून काय झाले? रस्त्याच्या एका बाजूला नदी वाहते आहे...

सोमनाथ - प्रभास पट्टण.

१९४७चे दीपावली पर्व. स्थळ होते सिंधुसागराच्या तीरावर असलेल्या सोमनाथ मंदिराच्या अवशेषांचे प्रवेशद्वार. तिथे उभे राहून सरदार वल्लभभाई पटेल यांनी दृढनिश्चय व्यक्त केला की भारतीय जनता आपले आराध्य दैवत असलेल्या सोमनाथ मंदिराला त्याची पूर्व प्रतिष्ठा आणि पूर्व वैभव प्राप्त करून देईल.  काय कारण होते ह्या प्रतिज्ञेचे? जर भारतीय जनतेचे आराध्य दैवत होते सोमनाथ तर आता मंदिराचे अवशेषच का उरले होते?  ह्या साठी आपल्याला जाणून घ्यावे लागेल सोमनाथ मंदिराच्या इतिहासाविषयी आणि सोमनाथच्या हिंदू जनमानसातील स्थानाविषयी.  हिंदूंन पूजनीय असलेल्या बारा ज्योतिर्लिंगापैकी सर्वात पहिले नाव असलेल्या आणि प्रथम स्थानी असलेले सोमनाथ. आपल्या सर्वाना माहिती असलेल्या स्तोत्राची सुरुवातच होते ती 'सौराष्ट्रे सोमनाथंच' पासून. त्यामुळेच त्याला 'आदि ज्योतिर्लिंग' म्हणून ओळखले जाते.  ऋग्वेदात तसेच अनेक पुराणात ज्याचा उल्लेख झाला आहे असे हे तीर्थधाम. ह्याविषयी आपल्याला अनेक कथा सापडतात.  शतकानुशतकांच्या मंदिराच्या इतिहासात नैसर्गिक रित्या पडझड झाल्यानंतर ते अनेक राजांकडून, भक्तांकडून सोने, च...

'रानी की वाव'

पाटण सर्वांना माहिती असते ते 'रानी की वाव' तिथे आहे म्हणून. भारतातील समृद्ध हातमाग कौशल्याचा उत्तम नमुना असलेली पटोला साडीदेखील पाटणचीच.  गुजराथमधील अहमदाबाद पासून साधारण दीडशे किलोमीटरवर असणारे पाटण जागतिक पर्यटनाच्या नकाशावर मानाचे स्थान पटकावून बसले आहे. युनेस्को चे जागतिक वारसा स्थळ म्हणून मानांकन मिळवलेले हे ठिकाण आहे.  रानी की वाव  रानी की वाव  रानी की वाव  रानी की वाव  रानी की वाव  'रानी की वाव' नावावरूनच आपल्या लक्षात येते की ही राणीने बांधलेली विहीर आहे. पण खरे तर ही नुसती वाव म्हणजे विहीर नसून  सुमारे 64 मीटर लांब, 20 मीटर रुंद आणि 27 मीटर खोल म्हणजे साधारण  सात मजल्यांइतकी खोली असलेले विष्णूचे मंदिर आहे असेच म्हणावे लागेल.  जमिनीपासून खोल खोल उतरत जाणारी अशी ही रचना आहे.  राणी उदयमती हिने तिचा पती  राजा भीमदेव पहिला याच्या स्मरणार्थ हे मंदिर बांधले म्हणून याचे नाव 'रानी की वाव' असे पडले. राजा भीमदेव पहिला म्हणजे अनहिलवाड किंवा अनहिल्लपूर पाटणच्या सोळंकी वंशाचा संस्थापक मुलराज ह्याचा मुलगा होता. ह्या वंशाने अनेक पराक्...

कवी केशवसुत स्मारक, मालगुंड

एका कवीचे स्मारक असावे आणि तेही कवीला साजेसे असावे ही दुर्मिळ गोष्ट आहे! पण असे एक स्मारक आपल्या महाराष्ट्रात आहे. रत्नागिरीजवळ मालगुंड येथे कवी केशवसुत म्हणजेच कृष्णाजी केशव दामले ह्यांचे एक सुंदर स्मारक उभारले आहे.  कवी केशवसुत जन्मस्थान  मार्गावरील फलक  प्रवेशद्वारातून दिसणारे दृश्य  कोकण मराठी साहित्य परिषदेने ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री मधू मंगेश कर्णिक ह्यांच्या संकल्पनेला प्रत्यक्षात उतरवले आहे.  एखाद्या कवीचे स्मारक कसे असावे हे एखाद्या साहित्यिकालाच चांगले कळू शकणार! स्मारकाच्या प्रवेशद्वारातून आपण आत गेलो की समोरच दिसते ते केशवसुत जन्मस्थान. हे जुने घर डागडुजी करून नीटनेटके ठेवले आहे. पडवीत मोठा झोपाळा आहे.  कवीच्या घरात कवीचे पुस्तक वाचताना  तिथेच केशवसुतांची काही पुस्तके तसेच को.म.सा.प.ची काही प्रकाशने विक्रीसाठी उपलब्ध आहेत.  घरातील आतल्या खोल्या तशा रिकाम्याच आहेत. काही थोडे जुने सामान तिथे ठेवले आहे .  माजघर  घराच्या मागच्या बाजूला कवीचे खरे स्मारक आहे. केशवसुतांनी त्या काळात म्हणजे दीडशे वर्षांपूर्वी कवितेत नवा प्रवाह आणला...

गणपतीपुळे

कोकणच्या निसर्गाविषयी किती आणि कितीदाही लिहिले तरी कमीच आहे. कोकणातल्या नारळी पोफळीच्या वाड्या, आंब्याची फणसाची झाडे, केळीच्या बागा, कौलारू घरे ह्यांनी नटलेली धरती, सोनचाफा बकुळीच्या सुगंधाने घमघमणारा आसमंत आणि कानावर येणारी समुद्राची गाज सारेच कसे मन प्रसन्न करणारे असते.  चराचरात वसणारा परमतत्वाचा अंश ह्या भूमीत प्रकर्षाने प्रत्ययाला येतो. ह्या भूमीत अनेक देवस्थाने नसती तरच नवल होते. ह्या देवस्थानांच्या जागा विलक्षण सुंदर आहेत. गणपतीपुळे हे असेच एका सुंदर स्थानी वसलेले श्री गणेशाचे स्वयंभू मंदिर. सिंधुसागराचा किनारा, चमकदार वाळूची पुळण आणि पाठीमागे गार्ड हिरव्या वनराईने झाकलेला डोंगर असे ह्या मंदिराचे नयनमनोहर ठिकाण आहे.  श्री गणपतीपुळे देवस्थान  ह्या स्वयंभू मूर्तीचा दृष्टांत पाचशे वर्षांपूर्वी भिडे गुरुजींना झाला. तिथे त्यांनी साधे गवताचे छप्पर उभारून पूजेला सुरुवात केली. त्यांची समाधी आपल्याला मंदिराच्या आवारातच बघायला मिळते.  समाधी  पुढे मग वेळोवेळी निरनिराळ्या भक्तांनी ह्या वास्तूची पुनर्बांधणी आणि दुरुस्ती केली. छत्रपती शिवाजी महाराजांचे सचिव अण्णाजी दत्त...

श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे जन्मस्थान - बर्वेवाडा, डुबेरे

काल दिनांक १८ ऑगस्ट २०२५. श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे ह्यांची ३२५ वी जयंती. श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे पुतळा, बर्वेवाडा श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे पुतळा, बर्वेवाडा श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे पुतळा, बर्वेवाडा आता बाजीराव म्हटले की केवळ बाजीराव मस्तानीच आठवणाऱ्या लोकांसाठी बाजीराव कोण ते सांगायला हवे. छत्रपती शिवाजी महाराजांनी पाहिलेले हिंदवी स्वराज्याचे स्वप्न प्रत्यक्षात जगणारे आणि हिंदवी साम्राज्य निर्माण करणारे बाजीराव बाळाजी पेशवे/ विश्वनाथ बल्लाळ भट हे शाहूछत्रपतींचे पेशवे म्हणजेच पंतप्रधान होते.  आपल्या वीस वर्षांच्या पेशवे म्हणून कारकीर्दीत ते चाळीसहून अधिक लढाया लढले आणि त्या सर्व लढायांत ते अजिंक्य राहिले. त्यांनी आपल्या कर्तृत्वाने मराठ्यांचे वर्चस्व अखंड भारतावर प्रस्थापित केले.  त्यांचा जन्म १८ ऑगस्ट १७००, भाद्रपद पौर्णिमा ह्या दिवशी डुबेरे येथे झाला. डुबेरे आजच्या सिन्नर तालुक्यात नाशिक जिल्ह्यात आहे.  ह्या गावी बाजीरावांच्या मातोश्री राधाबाई ह्यांचे भाऊ मल्हारराव बर्वे राहत असत. त्या बर्वे वाड्यात बाजीरावांचा जन्म झाला.  बर्वे वाडा  अवघ...

कोस्टल कर्नाटक ४ - शृंगेरी, मुकाम्बिका

कोस्टल कर्नाटक ४ - शृंगेरी, मुकाम्बिका  आज उडुपीहून लवकर निघून शृंगेरीला पोचण्याचा बेत आखला होता. त्याप्रमाणे आम्ही सकाळीच निघालो. रस्ता खूपच छान होता. आता खरं सांगायचे तर कोस्टल कर्नाटक प्रवासात रस्ता सुंदर होता म्हणणे ही द्विरुक्तीच आहे.  सगळ्या सडका अगदी एका पातळीतील आणि गुळगुळीत आहेत. खड्डे खळगे, रस्ते वर खाली असणे असे काही नसल्याने महाराष्ट्रातून गेलेल्या आम्हाला थोडे चुकल्यासारखे वाटले खरे!!! शिवाय रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे, स्वच्छता ह्यामुळे प्रवास फार आनंदाचा होतो. उडुपी शृंगेरी रस्ता तर आगुंबे जंगलातून जातो. त्यामुळे दाट झाडी होती. रस्त्यात सुप्रसिद्ध आगुंबे घाटही येतोच. सकाळची प्रसन्न वेळ आणि इतका छान रस्ता..दिवसाची चांगली सुरुवात होण्यासाठी आणखी काय पाहिजे?!!  आम्हाला वाटले होते इतक्या लवकर फारसे कोणी श्रुंगेरीत आलेले नसेल. पण शृंगेरीला पोचल्यावर लक्षात आले की आमच्यासारखाच विचार अनेकांनी केला होता!  अनेक बस रात्रभराचा प्रवास करून सकाळी शृंगेरीला पोचल्या होत्या. त्या लोकांच्या प्रातर्विधी आणि अंघोळीसाठी अनेक ठिकाणी माफक पैसे घेऊन उत्तम सोय केलेली होती....

कोस्टल कर्नाटक १ - मंगळुरू

  मंगळुरू- कुडला - मंगलोर - मंगलापूरम ही सगळी एकाच गावाची नावे. मंगलादेवी मंदिरावरून ह्या गावाचे नाव पडले मंगळुरू. दक्षिण कन्नड जिल्ह्याचे हे प्रमुख ठिकाण. सुंदर मंदिरे, स्वच्छ समुद्रकिनारे, नारळी-पोफळीची झाडे, आधुनिकतेच्या खुणा मिरवणारे मॉल्स आणि शहराबाहेरची पण तशी जवळच असणारी अनेक पर्यटन स्थळे.. ह्या साऱ्यामुळे मंगळुरु नेहमीच पर्यटकांचे आवडते राहिलेले आहे.  मंगळूरूला जाणारे आमचे विमान नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून होते. हा विमानतळ पाहण्याची उत्सुकता होतीच.  हा अतिशय भव्य आणि सुव्यवस्थित विमानतळ आहे. अनेक विमाने एकावेळी विमानतळावर आली तरी येणाऱ्या आणि जाणाऱ्या प्रवाशांच्यासाठी सर्व आवश्यक सुविधा केलेल्या आहेत.  जशी वर्दळ वाढेल तशी विमानतळावर जाण्यासाठी वाहतुकीची साधने देखील वाढतील अशी आशा आहे.  नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ  नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ  नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ  नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ  लहानशा प्रवासानंतर विमान मंगळुरुला उतरले. मंगळुरु विमानतळ म्हणजे टेबलटॉप रनवेज असणाऱ्या भारतातील मोजक्या विमानतळ...

रवींद्रनाथ टागोरांनाही भुरळ घालणारे 'कारवार'

कारवार - पांढऱ्या वाळूचे स्वच्छ समुद्रकिनारे, हिरव्या झाडांनी नटलेले डोंगर, काळी नदी, लाल माती असलेले सुंदर शहर. शहर होऊ पाहणाऱ्या किंवा खरे तर आता शहर झालेल्या कारवारने अजून आपले गावपण थोडे तरी टिकवून ठेवले आहे. शहरी बकालपणा मात्र टाळता आलेला नाही.   गोवा, कर्नाटक आणि महाराष्ट्र असा तिन्हींचा संगम आपल्याला कारवारमध्ये दिसतो. मराठी बोलणारी माणसेही भेटत राहतात.  गोव्यासारखे पर्यटकांचे लोंढे दिसत नाहीत. कदाचित आम्ही मार्चच्या अगदी सुरुवातीला गेलो तेव्हा अजून पर्यटकांचा ऐन हंगाम सुरु झाला नसावा!! उत्तर कन्नड जिल्ह्याची जीवनरेखा असणारी काळी नदी सदाशिवगड जवळ समुद्राला मिळते. तिथे एक मोठा पूल बांधलेला आहे. कारवार आणि गोव्याला जोडणारा हा पूल आता एक पर्यंटनस्थळच झाला आहे. सूर्योदय बघण्यासाठी पादचारी पुलावर जमलेले तुरळक पर्यटक, धावण्याचा सराव करणारे धावपटू, सायकलस्वार ह्यांच्या खेरीज सकाळच्या वेळी तिथे कोणीही नसते. आपल्या निसर्ग सौदर्यामुळे आणि शांततेमुळे हे ठिकाण अवश्य भेट देण्याजोगे आहे. आमचे हॉटेल ह्या पुलाच्या अगदी जवळ असल्याने आम्ही सूर्योदय अगदी मनसोक्त वेळ देऊन पाहू शकलो....

'कड्यावरचा गणपती.' - आंजर्ले

कोकण सुंदर आहेच. कोकणावर निसर्गाची अपरंपार कृपा आहे. काय नाही कोकणात? डोंगर, दऱ्या, नद्या, समुद्र, नारळीपोफळीच्या वाडया, आंब्या फणसाची झाडे, केळीच्या बागा हे तर आहेच. इतर फुलेही कोकणच्या मातीत जास्तच बहरतात. बकुळ, चाफ्याचे सगळे प्रकार, जास्वंद किती नावे लिहावीत!! कौलारू घरे, लाल मातीचे रस्ते, ताजा खवलेला नारळ घातलेले अवीट चवीचे खाद्यपदार्थ .. कोकणांत जायची किती कारणे हवीत अजून?  ह्या सोबत किंवा खूप जणांसाठी ह्याच्याही आधी कोकणात जाण्याचे महत्वाचे कारण असते ते म्हणजे तेथील मंदिरे. तर आज आपण आंजर्ले येथील एक मंदिर  पाहणार आहोत.  दापोली, गुहागर,आंजर्ले हा सगळा परिसर तर निसर्गसौंदर्याने नटलेला आहे. शहरीकरण, पर्यटकांची अमर्याद संख्या, गल्लोगल्ली झालेले होमस्टे, रिसॉर्ट्स आणि खानावळी इतके सगळे पचवून सुद्धा अजूनही  इथले वातावरण फार सुखद आहे.  रत्नागिरी जिल्ह्यात दापोलीजवळ आंजर्ले गाव आहे. त्या गावाच्या जवळ एका डोंगरावर असलेले मंदिर म्हणजे  'कड्यावरचा गणपती.'  पूर्वी पायऱ्या चढून जाणे हा एकमेव मार्ग होता.  आता चारचाकी गाडी सुद्धा आरामात मंदिरापर्यंत जाऊ श...