Skip to main content

सिद्धेश्वर मंदिर, टोके - प्रवरा संगमावर उमललेले दगडी बिल्वपत्र


भिंतीवरील कोरीवकाम 
महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्ह्यातले टोके हे एक लहान गाव. अहिल्यानगर कडून छत्रपती संभाजीनगरला जाताना डावीकडे नदीच्या काठावर हे सुंदर मंदिर आपल्याला दिसते. जगप्रसिद्ध वेरूळ, अजिंठा लेणी बघायची असतील तर सांभाजीनगरला जावे लागते हे आपल्याला माहिती असेलच.
सिद्धेश्वर मंदिर, टोके हे मला एखाद्या दगडी बेलपत्राप्रमाणे वाटले. हे बेलपत्र उमलले आहे अमृतवाहिनी प्रवरा आणि दक्षिणगंगा गोदावरीच्या संगमावर. त्या संगमाच्या, ज्याला प्रवरा संगम म्हणतात त्या परिसरात सिद्धेश्वर, घटेश्वर, मुक्तेश्वर, रामेश्वर, संगमेश्वर अशी अनेक मंदिरे आहेत. पण सर्वात खास आणि सुंदर आहे ते सिद्धेश्वर मंदिर.
सिद्धेश्वर मंदिर परिसर बघा असा दिसतो! हा फोटो घेतला होता सप्टेंबर २०१९ मध्ये. पावसाळा भरपूर बरसून आता आपला मुक्काम आवरत होता आणि नद्यांना भरपूर पाणी होते तेव्हाचा!
मंदिराचा परिसर 
सिद्धेश्वर मंदिर समूह हा तुलनेने नवा समूह आहे, अठराव्या शतकात बांधला गेलेला. पेशव्यांच्या काळात बांधल्या गेलेल्या ह्या मंदिराला सभोवताली एखाद्या छोट्या किल्ल्यासारखी किंवा गढीसारखी उंच भिंत आहे. मुख्य मंदिर आहे शंकराचे, सिद्धेश्वर महादेवाचे.
सिद्धेश्वर मंदिराचे विहंगम दृश्य 
📷विकिमीडिया कॉमन्स 
शंकराचे वाहन असलेला नंदी, शंकर मंदिरात नेहमी हजर असतोच. गाभाऱ्यातील शंकराच्या पिंडीकडे तोंड करून ध्यान लावून बसलेला असतो. सर्वात सुंदर कोरीवकामाने सजवलेल्या नंदींपैकी एक नंदी तुम्हाला सापडेल तो ह्या सिद्धेश्वर महादेवासमोर.
त्या घुंगुरमाळा, छोट्या घंटांच्या माळा, वेगवेगळ्या साखळ्या हे सगळे तो नंदी अगदी जिवंत असल्याचा भास उत्पन्न करतात. नंदीच्या पाठीवरची झूलदेखील कोरलेली आहे!
सुशोभित नंदी 
गाभाऱ्याकडे तोंड करून ध्यान लावलेला नंदी नेहमी भक्तांना सांगतो की परमेश्वराकडे लक्ष एकाग्र करा!
नंदी बघून झाल्यावर आपण समोर बघितले की आपल्याला दिसते एक अर्धी भिंत, शिव मंदिराच्या सभागृहाला वेढणारी. चारी बाजूला त्या भिंतीवर अतिशय सुंदर अशा मूर्ती कोरलेल्या आहेत. रामायण, महाभारतातील विविध प्रसंग तर आहेतच पण इतरही अनेक मूर्ती आहेत.
एका भिंतीवर तर राजा मिरवणुकीने देव दर्शनासाठी जातो आहे असा प्रसंग कोरलेला आहे. असे म्हणतात की नानासाहेब पेशवे सिद्धेश्वर महादेवाच्या दर्शनाला येत आहेत असा प्रसंग कोरलेला आहे.
द्वारपाल आणि भिंतीवरील कोरीवकाम 
राम रावण युद्ध 
ह्या पॅनेलवर रामायणातील एक महत्वाचा प्रसंग, राम-रावण युद्ध बघायला मिळतो. दहा शिरे, वीस हात असलेला रावण आणि राम लक्ष्मण ह्यांचे युद्ध. राम लक्ष्मण धनुष्याला बाण लावून, प्रत्यंचा ताणून युद्धासाठी सज्ज आहेत. त्यांच्या आकारातील फरक बघा. रावण असुर/राक्षस असल्याने अजस्र दाखवलेला आहे, तर राम लक्ष्मण माणसाइतक्याच आकाराचे दाखवले आहेत. झाडावर बसलेला हनुमान देखील पाहायला विसरू नका.
हनुमान आणि द्रोणागिरी 
📷जयंत अभ्यंकर 
हा प्रसंग आहे, हनुमानाने रामलक्ष्मणासाठी औषधी वनस्पती असलेला द्रोणागिरी पर्वत उचलून आणण्याचा. आता खाली तिथे ती संदूक काय करते आहे मला कल्पना नाही! बहुधा त्या संदुकीत शस्त्रे ठेवत असावेत. त्यावरचे डिझाईन, त्याच्या कड्या किती सुंदर कोरलेल्या आहेत.
कृष्ण 
📷जयंत अभ्यंकर 
बहुतेक तरी हा प्रसंग कृष्ण आणि गोपींचा असावा. गोपी नदीत स्नान करीत असताना, कृष्ण त्यांची वस्त्रे घेऊन झाडावर ठेवून देतो आणि मग त्या, 'वस्त्रे परत दे' अशी प्रार्थना करतात तो प्रसंग असेल. "दे रे कान्हा, चोळी अन लुगडी" बरोबर गाणे आठवले आहे तुम्हाला आणि त्या सोबतच लता मंगेशकरांचा स्वर्गीय आवाज कानात गुंजत असेलच!
सुकेशिनी 
📷जयंत अभ्यंकर 
लांब केस असलेली ही स्त्री, सुकेशिनी, केशरचना करण्याच्या प्रयत्नात आहे. त्या खाली असलेल्या पक्षाला बहुधा ते कमळाचे दांडे असावेत असा भास झाला असेल का? त्याने केस तोंडात धरून ओढायला सुरुवात केली आहे!! आता ती सुकेशिनी, त्या पक्ष्याच्या तोंडातून केस ओढून घेण्याचा प्रयत्न करते आहे.
तिच्या अंगावरचे अलंकार बघा, किती बारकाईने कोरलेले आहेत. तेव्हा लांब आणि मोठ्या कर्णभूषणांची नक्कीच फॅशन होती!!!
भीम आणि हनुमान 
हा आहे महाभारतातील एक प्रसंग, भीमाच्या गर्व हरणाचा. जेव्हा भीमाला असा गर्व झाला की तोच ह्या पृथ्वीतलावरील सर्वात शक्तिमान आहे, तेव्हा हनुमान एका म्हाताऱ्या माकडाचे रूप घेऊन, भीमाच्या वाटेत शेपटी ठेवून बसला. भीम म्हणाला, "शेपटी बाजूला कर." तेव्हा हनुमान म्हणाला, "आता वय इतके झाले आहे की शेपटी बाजूला करण्या इतकी पण ताकद अंगात नाही राहिली. तूच दे बाबा शेपटी बाजूला करून." भीमाने खूप प्रयत्न केला पण त्याला काही ती शेपटी उचलून बाजूला ठेवता आली नाही आणि अर्थातच त्याचे गर्व हरण झाले.
नर्तिका 
सभागृह - सिद्धेश्वर महादेव मंदिर 
आपण मंदिरात आत जातो घुमटाच्या आकाराचे छत दिसते. आत जरी फारसे कोरीवकाम केलेलं नसले, तरी आपल्याला काही मूर्ती दिसतात. दिशांच्या देवता असतील, खांबावरचे छत तोलून धरणारे यक्ष असतील किंवा खांबा, कोनाड्यांवरचे कोरीवकाम असेल. आत प्रवेश करताच जमिनीवर एक कासव आहे.
हिंदू मंदिरांचा अविभाज्य भाग असलेले कासव दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांना अलिप्तता, चिकाटी, ज्ञानार्जनाची इच्छा आणि इतरही अनेक गोष्टी अंगात असल्या पाहिजेत असे सांगत राहते.
सिद्धेश्वर महादेव - गर्भगृह 
आपण शिव मंदिरातून बाहेर आलो की अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण रचना असलेले एक मंदिर बघायला मिळते. चांदणीच्या आकाराच्या ह्या मंदिराला चांदणीसारखीच टोके आहेत. हे देवीचे मंदिर आहे आणि बाहेरच्या बाजूला देवीची मातृकासदृश्य अनेक रूपे कोरलेली आढळतात.
देवी मंदिर 
देवी मंदिराच्या बाहेरच्या बाजूला आढळणारी देवीची विविध रूपे.
देवी 
📷जयंत अभ्यंकर 
ही देवी चतुर्हस्त धारण करणारी आहे. तिचे वाहन मोर आहे. उजव्या मागच्या हातात शस्त्र दिसते आहे. डाव्या मागच्या हातात एक भले मोठे फळ धरलेले आहे. बहुतेक म्हाळुंग असावे. डाव्या पुढच्या हातात कमंडलू आहे. चौथ्या हातात काय आहे ते मला कळले नाही. तुमच्या लक्षात आले असेल तर कृपया कॉमेंट बॉक्स मध्ये लिहा. मला जाणून घेण्याची उत्सुकता आहे.
देवी 
📷जयंत अभ्यंकर 
ही देवी देखील चतुर्हस्त धारिणी आहे. उजव्या हातात त्रिशूल आणि तलवार आहेत. डाव्या मागच्या हातात डमरू आहे. तिच्या चौथ्या हातात विड्याचे पान आहे की नुसतीच वरद मुद्रा आहे, कळले नाही.
देवी 
📷जयंत अभ्यंकर 
ह्या देवीने आपल्या चार हातांपैकी तीन हातात अंकुश, डमरू आणि तलवार धारण केलेले आहेत. चौथा हात वरद मुद्रेत आहे. तिचे वाहन असलेला नंदी तिच्या बरोबर आहे. बहुतेक ही माहेश्वरी असावी.
देवी 
📷जयंत अभ्यंकर 
ह्या देवीने एका हातात एक लोट्याच्या आकाराचे पण उंच मानेचे भांडे धरलेले आहे, सुरईपेक्षा वेगळा आहे हा आकार. दुसऱ्या हातात वाडगा आहे. मागच्या हातात तलवार आहे आणि मागच्या दुसऱ्या हातात बहुतेक कमळ आहे. तिचे वाहन वाघ तिच्याबरोबर आहे. त्या प्राण्याचे तोंड वाघासारखे आहे पण गळ्यावर कोरलेली आहे ती आयाळ असेल का? म्हणजे हा सिंह असेल का?
मंदिराच्या गाभाऱ्यातील देवी. 
ह्या आवारातील तिसरे मंदिर आहे विष्णूचे. विष्णूचे वाहन असणारा गरुड आपल्याला मंदिराच्या समोरच दिसतो.
गरुड 
मंदिर आवार आणि गरुड 
विष्णू मंदिर 
विष्णू मंदिराच्या सुंदर कमानी 
आपण मगाशी गरुडाचा फोटो पाहिला होता. त्याच्या मागच्या बाजूला हा हनुमान आहे. ह्या वरच्या फोटोत आपल्याला तो हनुमान दिसतो आहे.
सुंदर कोरीवकाम 
मंदिर आवार 
ही सर्व मंदिरे आणि त्यावरील कोरीवकाम सुंदर आहे. त्यांचे पुरातत्व शास्त्राच्या दृष्टीने महत्व आहे तसेच इतिहासाच्या दृष्टीने पण महत्व आहे. अठराव्या शतकात बांधलेली आणि इतके कोरीवकाम असलेली फार कमी मंदिरे बघायला मिळतात.
देवळाच्या बाहेरच्या बाजूला नदीत उतरणारे सुंदर घाट आहेत. तसेच मेणवलीच्या मंदिरात आपण पाहिली होती तशी एक घंटा देखील आहे. पण आम्ही हे दोन्हीही बघू शकलो नाही.
मला नेहमी ह्या मंदिराचा विचार करताना आश्चर्य वाटते. आजच्या मानाने हे आवार नक्कीच भव्य आहे. पण तेव्हाच्या काळाचा विचार केला तर ही जागा थोडी कमीच वाटते. तटबंदीच्या आत आणि इतक्या जवळ जवळ ही तिन्ही मंदिरे का बांधली गेली असतील? विशेषतः ते चांदणीच्या आकारातील देवी मंदिर! त्याच्या आजूबाजूला थोडी जास्त मोकळी जागा असती तर त्या रचनेचे सौंदर्य आणखी खुलले असते.
मंदिराच्या तटबंदीला असलेली दुसऱ्या मजल्यावरची दर्शिका/ गॅलरी हा ह्या मंदिराचा विशेष आहे. त्या दर्शिकेच्या कमानी देखील अतिशय प्रमाणबद्ध आहेत. आपल्याला वरच्या एका फोटोत त्या बघायला मिळाल्याच आहेत. त्या गॅलरीतून नदी, घाट, झाडे असे सुंदर दृश्य आत्ताही दिसते.
पैसाचा खांब असलेले ज्ञानेश्वर मंदिर, मोहिनीराज मंदिर, देवगड दत्त संस्थान इत्यादी ठिकाणे ह्या टोक्याच्या सिद्धेश्वर मंदिरापासून अगदी जवळ आहेत. फार फार तर १५ किलोमीटर अंतरावर.
जास्त लोकांनी ह्या सर्व ठिकाणांना भेटी देऊन वास्तुशास्त्रातील आणि अध्यात्मातील आश्चर्याचे दर्शन घेतले पाहिजे. मूर्तिशास्त्राच्या अभ्यासकांना देखील हे मंदिर बघण्यात, ह्या मूर्ती कोणाच्या आहेत ते उलगडण्यात आनंद वाटेल.
आपल्याही परिसरात किंवा पाहण्यात अशी अनोखी  मंदिरे असल्यास त्या विषयी इतरांना सांगायला हवे. लिहायला हवे. माणसांची ये जा होत राहिली तर मंदिरे जागती राहतात.
मी सुरुवातीला म्हटले होते, की टोक्याचे सिद्धेश्वर मंदिर म्हणजे अमृतवाहिनी प्रवरा आणि दक्षिणगंगा गोदावरीच्या संगमावर वसलेले एक दगडी बिल्वपत्र वाटते.  बेल त्रिदल का? तर तीन मंदिरे एका आवारात इतकी जवळ जवळ आणि मुख्य मंदिर शंकराचे आहे म्हणून. पण त्यावरील कोरीवकाम पाहिल्यावर मात्र नदीच्या किनारीवर उमललेले तीन पाकळ्यांचे फुल वाटते!!



#Dronagiri #PeshaveEraTemple #EighteenthCenturyCarvings #TemplesOnConfluence #MaharashtraTempleArchitecture

Comments

  1. छान माहिती आहे 😍 🙏🙏

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद अरुंधती!  

      Delete

Post a Comment

Popular posts from this blog

लक्ष्मीकेशव मंदिर, कोळीसरे

  मंदिर म्हणजे एक उर्जाकेंद्र! प्राचीन काळापासून भाविक मंदिरात देवतांच्या दर्शनासाठी जात आले आहेत. आजही हिंदू लोक मंदिरात जाऊन, चित्त एकाग्र करून ध्यान, पूजा आणि आरती करतात. यामुळे त्यांना ऊर्जा आणि शांततेचा अनुभव मिळतो. प्रत्येक देवी-देवतेचे एक विशिष्ट मंदिर असते.  असेच कोळीसरे येथे श्री विष्णूचे - लक्ष्मीकेशवाचे सुंदर मंदिर आहे . रत्नागिरी शहरापासून फक्त ५० किलोमीटर अंतरावर किंवा गणपती पुळ्यापासून २१ किलोमीटर अंतरावर निसर्गसुंदर कोळीसरे गाव आहे. पुणे मुंबई हून रत्नागिरी जिल्ह्यातील कोळीसरे येथे जायचे असल्यास चिपळूण मार्गे जाता येईल. परशुराम - कोळीसरे रस्त्यात अशी नयनरम्य दृश्ये अनेकदा दिसतात. परशुराम कोळिसरे रस्ता अगदी कमी लोकवस्तीचे, घनदाट झाडी असलेले हे गाव कोळीसरे फाट्याहून आत गेल्यावर दीड दोन किलोमीटर प्रवास केल्यावर येते. रत्नागिरीहून बसने जाता येते अन्यथा मंदिरापर्यंत पोचण्यासाठी स्वतःचे वाहन असणे सोयीचे आहे.  गाडी पार्क केल्यानंतर काही पायऱ्या उतरून मग घनदाट झाडीत वसलेल्या ह्या मंदिरात जाता येते. ह्या रस्त्यावरून व्हील चेयर जाउ शकत नाही. पार्किंग पासून उ...

नागाव

  नागाव म्हणजे माडापोफळींच्या वाड्या. नागाव म्हणजे केळीच्या बागा. नागाव म्हणजे सुंदर स्वच्छ समुद्रकिनारा.  नागाव म्हणजे वस्त्रगाळ मऊ वाळूचा किनारा.  नागाव म्हणजे अनेक मंदिरे. नागाव म्हणजे लक्षवेधी दीपमाळा. नागाव म्हणजे कोपऱ्या कोपऱ्यावर भेटणारे तळे! नागाव म्हणजे तळ्यात फुललेलीअनेकानेक कमळे!! नागावच्या शेजारचे  अक्षी, चौल, रेवदंडा ही देखील अशीच गावे. नितांतसुंदर, साधी. अलिबाग आणि ह्या सर्व गावांना मिळून अष्टागर असे म्हणत असत. आठ गावांचा समूह.  अलिबाग पर्यटन स्थळ म्हणून ७० च्या दशकापासूनच प्रसिद्ध झाले होते. तेव्हा शांत निवांत असलेले अलिबाग नंतर खूपच गजबजले आणि मग दुसऱ्या सहस्त्रकात अलिबागशेजारील रेवदंडा, नागाव, चौल ही लहान लहान गावे देखील पर्यटनस्थळे म्हणून विकसित होऊ लागली.  ह्या निवांत, शांत गावांना जणू अचानक खडबडून जाग आली. तिथेही पर्यटकांची गर्दी वाढू लागली. स्थानिक लोकांना रोजगार, विकासाची संधी, अर्थार्जनाची संधी त्यात दिसली.  गावांवर आधुनिक पेहराव चढला आणि तिथे उदयाला आली मुंबईकरांची आवडती पर्यटनस्थळे.  आता तर परिस्थिती अशी आहे की जवळ जवळ एका...

हनुमान जन्मस्थळ आणि शबरी धाम, जय श्रीराम, जय जय राम!

आज आपण रामायणातील दोन ठिकाणांना भेट देणार आहोत आणि दोन महान राम भक्तांच्या भेटीसाठी तुम्हाला घेऊन जाताना मला अतिशय आनंद झालेला आहे.  पहिल्यांदा आपण जाऊयात, हनुमानाच्या जन्मस्थानी अंजनेय टेकडीवर. ही टेकडी कर्नाटक मध्ये हंपीजवळच्या भागात आहे असे मानले जाते. ही जागा अंजनीच्या पुत्राचे, अंजनेयाचे म्हणजेच हनुमानाचे जन्मस्थळ आहे.  भारतात अजूनही इतर काही ठिकाणे आहेत की जी हनुमानाचे जन्मस्थळ म्हणून सांगितली जातात. पण अंजनेय टेकडी हे हनुमानाचे जन्मस्थळ असणे मला सर्वात जास्त संयुक्तिक वाटते. कारण ऋष्यमूक पर्वत, जिथे सुग्रीव, हनुमान आणि भगवान श्रीराम यांची भेट झाली होती तो इथून जवळच आहे. हंपीपासून अंजनेय टेकडीपर्यंतचा रस्ता नैसर्गिक सृष्टिसौंदर्याने अतिशय समृद्ध आहे. तुंगभद्रेच्या किनाऱ्यावर असल्यामुळे हा संपूर्ण प्रदेश अत्यंत सुपीक आहे रस्त्याच्या दोन्ही बाजूला सतत तुम्हाला भात शेती, नारळाची झाडे, केळीच्या बागा आणि अर्थातच प्रचंड मोठे खडक, जे ह्या भागाचे वैशिष्ट्य आहेत ते दिसत राहतात. हा संपूर्ण परिसर रामायणातला किष्किंधा भाग मानला जातो. भात शेती केळीच्या बागा भातशेतीचा मखमली गालिचा टे...

पैसाच्या खांबाचे मंदिर!

पैसाच्या खांबाचे मंदिर! अनेक वर्षांपूर्वी दुर्गा बाईंचे ' पैस ' हे पुस्तक वाचनात आले. त्यात होता हा पैसाचा खांब. पैस म्हणजे अवकाश. जिथे ज्ञानेश्वरी लिहिली गेली तो हा पैसाचा खांब. ज्ञानेश्वरीचे जन्मस्थान! खांबाला टेकून बसलेले, ज्ञानेश्वरी सांगत असलेले ज्ञानेश्वर आणि ती लिहून घेत असलेले लेखनिक सच्चिदानंद बाबा असे चित्र आधीही अनेकदा पाहिलेले होते. पण त्या खांबाला ' पैसाचा खांब' म्हणतात हे माहितीच नव्हते. पैस ह्या पुस्तकातील पैसाचा खांब हे प्रकरण वाचले आणि अक्षरशः थरारून गेले. 'पैसाच्या खांबाचे मंदिर' अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा या प्रवरा नदीच्या तीरावरील गावी आहे. नेवासे गावाच्या पश्चिमेला हे मंदिर आहे. 'शके बाराशे बारोत्तरे| तैं टीका केली ज्ञानेश्वरे| सच्चिदानंद बाबा आदरे| लेखकू जाहला|' असा उल्लेख सापडतो. मूर्त आणि अमूर्त ह्याची अशी जोडणी म्हणजे ज्ञानाच्या अनंत अवकाशात जाण्याची पहिली पायरीच जणू. ज्ञानेश्वरी वाचण्याएवढी आणि कळण्याएवढी योग्यता ह्या जन्मात अंगी येईल की नाही माहिती नाही. पण हा खांब पाहू या कधीतरी असे ठरवून टाकले. अवघड नव्हतेच जाणे. संभाजीनगर...

श्री व्याडेश्वर देवस्थान, गुहागर

  कोकणावर निसर्गाचा वरदहस्त आहेच. त्यातही काही गावांनी आपल्या सौंदर्याने विशेष स्थान मिळवले आहे. त्यातील एक महत्वाचे नाव म्हणजे गुहागर. सुंदर लहानसे गाव आहे. एक मुख्य रस्ता, त्याच्या दोन्ही बाजूला घरे, घरांच्या मागे नारळ सुपारीच्या वाड्या. रस्त्याच्या एका बाजूच्या प्रत्येक घराच्या मागच्या वाडीतून समुद्राला जाण्याचा रस्ता, भव्य स्वच्छ समुद्रकिनारा असे हे मोहात पाडणारे गुहागर गाव.  गुहागर प्रसिद्ध आहे व्याडेश्वरासाठी. व्याडेश्वर हे शंकराचे मंदिर अनेक कोकणवासीयांचे कुलदैवत आहे. कोकणातील सर्वात महत्त्वाच्या शिवमंदिरांपैकी एक म्हणजे गुहागरमधील श्री व्याडेश्वर देवस्थान.  श्री व्याडेश्वर देवस्थान.  श्री व्याडेश्वर देवस्थान.  तुम्हाला जर का कधी दक्षिणेतील मंदिरे पाहून वाटले असेल की अशी मंदिरे आपल्या महाराष्ट्रात का नाही?!! तर गुहागरच्या व्याडेश्वर मंदिराला भेट द्या. भव्य सुंदर देवालय आहे. मंदिराचे आवार स्वच्छ, प्रशस्त आहे. मुख्य म्हणजे अगदी नांदते, जागते मंदिर आहे. मंदिराची साफसफाई, निगराणी केली जाते आहे. आवारात भरपूर झाडे आहेत. श्री व्याडे...

श्री क्षेत्र गिरनार

  गिरनार माझ्यासाठी ते मोहक फळ होते, जे मिळायला अवघड होते आणि कितीही हवेहवेसे वाटले तरी त्यासाठी माझ्याकडून प्रयत्न मात्र अजिबात केले गेले नव्हते. गिरनारच्या अद्भुत कथा खूप ऐकल्या, वाचल्या होत्या. गिरनारची मनात ओढ होती. पण ते सगळे मनातच. प्रत्यक्षात कोणतेही ट्रीप ठरवताना, कुठे जायचे याचा विचार करताना पुढे होऊन गिरनारला जाऊयात असे कधी म्हटले नव्हते हेही तितकेच खरे.  श्री क्षेत्र गिरनार  काय आहे गिरनार?  गिरनार हा पर्वत समूह आहे. दत्तात्रेयांचा इथे निवास असल्याने ते हिंदूंच्यासाठी अत्यंत पवित्र आणि महत्वाचे धार्मिक स्थळ आहे.  हिमालयापेक्षाही जुना असलेला हा पर्वत अनेक नावांनी प्राचीन साहित्यात आलेला आहे. रेवतक हे त्यातील सर्वात जास्त माहिती असलेले नाव.  जैन लोकांसाठी देखील हे अत्यंत महत्वाचे ठिकाण आहे कारण इथे जैन मंदिर समूह देखील आहे. नेमिनाथ, आदिनाथ, मल्लिनाथ आणि इतर तीर्थंकरांची मंदिरे आहेत.  कुठे आहे गिरनार ? गुजराथ, सौराष्ट्र मधील जुनागढ जवळ गिरनारच्या पायथ्याचे, तलेटी नावाचे गाव आहे.  गिरनारला लोक का जातात? तेथील द...

हिंदवी स्वराज्याची राजधानी - किल्ले रायगड

रायगड! हे नाव घेताच मनात उठणारे भावतरंग अवर्णनीय असेच असतात. ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी म्हणजे 'शिव राज्याभिषेक दिन', 'हिंदू साम्राज्य दिन'. अभिमानाचा, गौरवाचा दिवस. भारतीय इतिहास हा संघर्षाचा व विजयाचा आहे. त्यातील झळाळून उठणारे तेजस्वी, सोनेरी पान म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे कर्तृत्व! शिवाजी महाराज आणि त्यांच्या मावळ्यांचे अविश्रांत परिश्रम पूर्णत्वाला पोचले ते ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी, १६७४ ह्या दिवशी. हा केवळ राज्याभिषेक नव्हता. हिंदवी स्वराज्याची स्थापना झाल्याची केवळ अधिकृत घोषणा नव्हती. तर संतांच्या उपदेशांनी जागलेली सज्जन शक्ती, मावळ्यांच्या रूपातील सामान्य जनतेच्या मनात जागलेली वीरवृत्ती ह्यांच्या संगमाने घडलेला तो एक अभूतपूर्व अविष्कार होता. राज्याभिषेक ही शिवाजी महाराजांची व्यक्तिगत महत्वाकांक्षा नव्हती. रोहिडेश्वर येथे लहानपणी घेतलेली प्रतिज्ञा अथक प्रयत्नांनी पूर्ण झाली होती. "हे हिंदवी स्वराज्य व्हावे हे तो श्रींची इच्छा" हे वचन सार्थ झाले होते. पण राज्याभिषेकाच्या निमित्ताने शिवाजीमहाराजांनी मोठ्या युक्तीने त्यांच्यावर असलेली लोकांची निष्ठा सिंहा...

परशुराम कुंड, अरुणाचल.

अरुणाचल मधील टेंगापानी, नामसाईच्या गोल्डन पॅगोडाहुन परशुराम कुंड ला जाण्यासाठी  आम्ही निघालो. ही गोष्ट आहे ऑक्टोबर २०१९ मधील.  त्या दिवशी सतत पाऊस पडत होता. सगळीकडे हिरवेगार तर अरुणाचल मध्ये नेहमीच असते. पावसात भिजलेली झाडे, स्वच्छ हिरवळ, मध्येच ढगांत अदृश्य होणाऱ्या पर्वतरांगा, वाहणारे थंडगार वारे, फार सुंदर होते ते सगळे.  अरुणाचल  डोंगरातला रस्ता होता. तुफान वारा होता. त्या सगळ्या अवाढव्य डोंगराळ प्रदेशात आमची गाडी म्हणजे एक ठिपका होती. वाऱ्याने उडून जायला वेळ लागणार नाही इतका जोरात वारा वाहत होता. एक खिडकी फोटो काढण्यासाठी उघडली तर ड्राइवर म्हणाला की दुसऱ्या बाजूची पण उघडा, नाहीतर आत आलेल्या वाऱ्याने गाडी हलायला लागेल. शेजारी खोल दरी दिसत असताना गाडी हलायच्या कल्पनेने अंगावर काटा आला आणि पहिली खिडकी देखील फोटो काढल्या काढल्या बंद केली..नकोच ती वाऱ्याची परीक्षा!  रस्ता कसा होता हे प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी पुढे दिलेल्या लिंकवर क्लिक करून विडिओ नक्की बघा. Namsai- Parshuram kund road ह्या नदीचे नाव लोहित आणि ह्या जिल्ह्याचेही नाव लोहित. लोहितचा अर्थ रक्त किंवा रक्...

शिवथरघळ

जर आपण भारताचा नकाशा पाहिला  तर आपल्याला नकाशात डावीकडे, गुजरात ते कन्याकुमारीपर्यंत काळसर  हिरवी रेषा दिसते. ही रेषा  गुजराथ येथून सुरु होते  आणि महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, तामिळनाडू मार्गे जाऊन केरळला पोहोचते. ती रेषा म्हणजेच पश्चिम घाट आहे. पश्चिम घाट म्हणजे दख्खनच्या पठाराची जणू किनारच आहे. दख्खन पठाराच्या काठावरच्या ह्या पर्वत रांगा आहेत.  या भागात बरीच जंगले, जलसाठे, धबधबे आहेत आणि जैवविविधता तसेच त्याचे वय यामुळे या भागाला 'युनेस्को जागतिक वारसा' म्हणून ओळखले गेले आहे. पश्चिम घाट हिमालयापेक्षाही जुना आहे! वरंधा घाट  📷विकिमीडिया कॉमन्स  पश्चिम घाट हा अनेक मुख्य नद्यांचे उगमस्थान आहे. वरील छायाचित्रात दिसते आहे त्या प्रमाणे, वर्षा ऋतूत या प्रदेशात अनेक धबधबे पाहायला मिळतात.  पश्चिम घाटातील (महाराष्ट्र) अनेक सुंदर धबधब्यांपैकी एक म्हणजे शिवथरघळ धबधबा. जेव्हा मुसळधार पाऊस पडतो तेव्हा धबधबा त्याच्या पूर्ण रौद्र सौंदर्यानिशी आणि ताकदीनिशी रोरावत खाली येताना दिसतो.  हा धबधबा सुमारे शंभर फूट उंचीवर...