'सिल्व्हर व्हेगन ट्रॅव्हल्स' सोबत अनुभवा जगभराची सांस्कृतिक सफर. प्राचीन मंदिरे, निसर्गरम्य ठिकाणे आणि प्रवासात व्हेगन जीवनशैली जपण्याचे रंजक अनुभव.
हा ब्लॉग शोधा
नागाव
नागाव म्हणजे माडापोफळींच्या वाड्या. नागाव म्हणजे केळीच्या बागा. नागाव म्हणजे सुंदर स्वच्छ समुद्रकिनारा. नागाव म्हणजे वस्त्रगाळ मऊ वाळूचा किनारा. नागाव म्हणजे अनेक मंदिरे. नागाव म्हणजे लक्षवेधी दीपमाळा. नागाव म्हणजे कोपऱ्या कोपऱ्यावर भेटणारे तळे! नागाव म्हणजे तळ्यात फुललेलीअनेकानेक कमळे!!
नागावच्या शेजारचे अक्षी, चौल, रेवदंडा ही देखील अशीच गावे. नितांतसुंदर, साधी. अलिबाग आणि ह्या सर्व गावांना मिळून अष्टागर असे म्हणत असत. आठ गावांचा समूह.
अलिबाग पर्यटन स्थळ म्हणून ७० च्या दशकापासूनच प्रसिद्ध झाले होते. तेव्हा शांत निवांत असलेले अलिबाग नंतर खूपच गजबजले आणि मग दुसऱ्या सहस्त्रकात अलिबागशेजारील रेवदंडा, नागाव, चौल ही लहान लहान गावे देखील पर्यटनस्थळे म्हणून विकसित होऊ लागली.
ह्या निवांत, शांत गावांना जणू अचानक खडबडून जाग आली. तिथेही पर्यटकांची गर्दी वाढू लागली. स्थानिक लोकांना रोजगार, विकासाची संधी, अर्थार्जनाची संधी त्यात दिसली. गावांवर आधुनिक पेहराव चढला आणि तिथे उदयाला आली मुंबईकरांची आवडती पर्यटनस्थळे.
आता तर परिस्थिती अशी आहे की जवळ जवळ एका आड एका वाडीत आपल्याला रिसॉर्ट झालेला दिसतो. राहण्या जेवण्याची अनेक ठिकाणी सोय होते आहे. आता नुसती वाडी क्वचितच बघायला मिळते आहे. शनिवार रविवार ही सगळी गावे पर्यटकांनी ओसंडून वाहत असतात. गावात शिरायच्या आधीच ट्रॅफिक जामने त्रस्त असतात.
मुंबई पासून शंभर एक किलोमीटर वर आणि पुण्यापासून साधारण दीडशे -पावणेदोनशे किलोमीटर वर असलेली, अगदी एक दिवसाची ट्रिप करण्याच्या अंतरावर असलेली ही ठिकाणे आहेत. पण ह्या गावांचे सौंदर्य, हिरवाई, शांतता अनुभवायची असेल तर तिथे एक दिवस राहायलाच हवे.
अजूनही हा परिसर नयनरम्य आहे. इथली हिरवाई सुखावणारी आहे. देखभाल आणि व्यवस्था नीट होत असल्याने इथली मंदिरे सुस्थितीत आहेत. नित्य पूजाअर्चा होत असल्याने जागती आहेत.
सुरुवात करू या वंखनाथ मंदिरापासून.
मंदिरासमोरील पुष्करणी
वंखनाथ मंदिर अतिशय सुंदर मंदिर आहे. तिथे गेल्या गेल्या लक्ष वेधून घेते ती सुंदर भव्य पुष्करणी. काळ्या घडीव दगडातील बांधकाम, चौकोनी आकार असलेली ही पुष्करणी, घडवलेल्या पायऱ्या, चारी बाजूचे कोरीव काम ह्यामुळे विशेष सुंदर दिसते. उन्हाळ्यात पाणी कमी होते तेव्हा सगळे कोरीवकाम नीट पाहता येत असेल.
त्याच्या समोरची दीपमाळ एकेकाळी मंदिर परिसराचा भाग असणार. आज त्या आवाराचा संकोच होऊन मधून एक रस्ता गेला आहे. त्यामुळे रस्त्याच्या एका बाजूला पुष्करणी आणि एका बाजूला तळे अशी रचना दिसते आहे.
ह्या मंदिराचे बांधकाम आणि स्थापना अठराव्या शतकाच्या अखेरीस, साधारण १७९० च्या सुमारास अहिल्याबाई होळकर ह्यांनी दिलेल्या निधीतून झाली.
मंदिराचे तीन कळस दिसतात. गर्भगृहावरील कळस अर्थातच सर्वात उंच आणि कोरीवकामाने शोभिवंत आहे.
श्री वंखनाथ मंदिर
सभागृह
मंदिरात आत शिरताच काळ्या कुळकुळीत दगडातील नंदी, नक्षीदार लाकडी खांब आणि अष्टकोनी सभागृह दिसते. छताला लाकडी तुळयांचा आधार दिलेला दिसतो.
नंदी
मुख्य गाभाऱ्याच्या दोन्ही बाजूला असलेल्या भिंतीमध्ये गणेश आणि कालभैरवाच्या सुंदर मूर्ती आहेत.
गणेश
कालभैरव
गर्भगृहातील शिवलिंगसोनेरी पत्र्याने मढवलेले आहे. त्याचे आरशातील प्रतिबिंब अगदी प्रवेशद्वारापासूनच आपल्याला दिसू लागते. मागे पार्वतीची सुंदर मूर्ती आहे.
प्रतिबिंबासह शिवलिंग
पार्वती
पुष्करणीतील शिल्पे तसेच मंदिरातील शिल्पे पाहून गतकाळातील मंदिराच्या वैभवाची कल्पना येते. नवीन काही इतके सुंदर निर्माण करता येणे अवघड आहे. निदान आहे त्याचे जतन तरी आपण करायला हवे, ही वारंवार होणारी जाणीव पुन्हा एकदा इथे होते.
असेच दुसरे, काही शतके जुने असलेले मंदिर म्हणजे नागेश्वर मंदिर, नागाव. अगदी साधे, सुंदर मंदिर. मंदिरासमोरील तळे, दीपमाळ, जवळच असलेली समाधी सगळा परिसरच खूप शांत असतो. मंदिराच्या दुसऱ्या मजल्यावरील नक्षीदार खांबांचा सज्जा गतवैभवाची साक्ष देतो. आता मंदिराला डागडुजीची गरज आहे असेही सांगत राहतो.
नागेश्वर मंदिर
नागेश्वर मंदिर दीपमाळ
नागाव मध्ये अनेक प्राचीन मंदिरे आहेत. भीमेश्वर मंदिर हे त्या पैकी एक. मंदिराबाहेर येथे फोटो काढू नयेत अशी पाटी लावलेली असल्याने मी तिथले फोटो काढलेले नाहीत. हा बाहेरचा फोटो असा दिसतो. अर्थातच इथेही मंदिरासमोर पुष्करणी आहेच. दीपमाळ आहेच.
मंदिरात आत सुंदर हंड्या झुंबरे टांगलेली आहेत.
भीमेश्वर मंदिर
भीमेश्वर मंदिर
नागावमध्ये मंदिरासमोर पुष्करणी नसेल तर फाउल मानला जातो की काय त्याची कल्पना नाही!! जवळपास सर्व मंदिरांच्या समोर पुष्करणी आहेच! पण अशी मंदिरे बघताना एक विशेष प्रसन्नता वाटते हे खरेच.
पाणी, हिरवाई, स्वच्छता, शांतता ह्या सगळ्यांमुळे मन निवळत जाते.
नागाव हे नाव कसे पडले असेल? नाग आणि गाव मिळून झाले असेल का? असे मनात यायचे कारण म्हणजे नागाव ला असलेले नऊ नाग स्वयंभू देवस्थान. जमीन खणत असताना इथे ह्या मूर्ती सापडल्या आणि मग त्यांच्यासाठी मंदिर उभे केले गेले. एका वाडीत असावे असेच हे मंदिर आहे. सगळीकडे झाडे, वेली, फुलांनी वेढलेले हे मंदिर खरे तर अगदी रस्त्याला लागून आहे. पण पटकन लक्षात येत नाही.
नऊ नाग मंदिर
म्हणताना नऊ नाग मंदिर म्हटले तरी प्रत्यक्षात तिथे दहा नाग प्रतिमा आहेत. मंदिरात मागे नवनाग स्तोत्र आणि आरती लावलेली आहे. ती सहसा इतरत्र पाहायला मिळत नाही.
नऊ नाग आरती आणि स्तोत्र
मंदिरात अनेक घंटा वाऱ्या सोबत झुलताना दिसतात. नवसाच्या घंटा इकडे बांधल्या जातात असे कळले.
नागावचा समुद्रकिनारा विशेष सुंदर आहे. सरळच्या सरळ किनाऱ्याची रेषा सिंधूसागराशी गप्पा मारत मारत पुढे जाते. किनाऱ्यावरच्या मऊ वाळूमूळे धडकणाऱ्या समुद्राच्या लाटा देखील मवाळ होऊन जातात. अगदी स्वच्छ आणि तुलनेने निर्धोक असा हा किनारा पर्यटकांचा आवडता आहे. अनेक वॉटर स्पोर्ट्स देखील इथे आहेत. त्यामुळे शनिवार रविवारी इथे भरपूर गर्दी असते. ह्या समुद्रकिनाऱ्याचा खरा आनंद घ्यायचा तर थोडी शांतता हवी.
तुम्ही नागाव ला असाल आणि सूर्यास्ताच्या वेळी समुद्रकिनाऱ्यावर गेला नाहीत तर मात्र नक्कीच फाऊल मानला जातो बरं का!! हा किनाराही भुरळ पाडणारा असाच आहे.
समुद्राचे पहिले दर्शन हे असे होते.
आणि मग आत्ता आत्ता तर भेटलो आहोत असे म्हणताना त्याच्याशी मैत्रीच होऊन जाते.
नागावच्या समुद्रकिनाऱ्यावरून निघताना पावले जड होतात. आणाभाका न घेताही आता तो समुद्रकिनारा कायमचा लक्षात राहणार असतोच.
नागावच्या परिसरातील अजून काही मंदिरांच्या विषयी लिहायचे आहे. पण ते पुन्हा कधीतरी. आजच्यापुरते इतकेच.
कोस्टल कर्नाटक सहलीचा आमचा तिसरा दिवस देखील फार आनंदात गेला. काही गोष्टी ठरवल्याप्रमाणे होऊ शकल्या. काही गोष्टी ठरवल्याप्रमाणे अजिबात झाल्या नाहीत. पण तरी जमेची बाजूच जड झाली हे खरे. उडुपीला सकाळी गाडी बोलावली होती आणि ती आम्हाला काही तास फिरवून आणणार होती. पहिले ठिकाण होते त्रासी मारवंते बीच. फोटो बघूनच हा बीच पाहण्याची खूप उत्सुकता वाटत होती. हा अत्यंत अनोखा बीच आहे. रस्त्याच्या एक बाजूला सौपर्णिका नदी, दुसऱ्या बाजूला अरबी समुद्र - सिंधूसागर! त्रासी मरवंथे बीच 📷https://karnatakatourism.org/en/destinations/udupi उडुपीपासून निघून इकडे येऊन पोचलो. एका बाजूला नदी दिसत होती. दुसऱ्या बाजूला समुद्र किनाराही दिसत होता. पण फोटोत दाखवल्याप्रमाणे ठिकाण काही दिसेना. मग चौकशी केल्यावर कळले की असे फक्त ड्रोनने काढलेल्या फोटोत दिसते. डोळ्यांना असे दिसत नाही!! एरवी आपण म्हणतो की डोळ्यांना जितके सुंदर दिसते तितके फोटोत उतरत नाही. पण इथे उलटे झाले होते!फोटोतल्याइतके सुंदर डोळ्यांना दिसत नव्हते!! पण असे दिसले नाही म्हणून काय झाले? रस्त्याच्या एका बाजूला नदी वाहते आहे...
१९४७चे दीपावली पर्व. स्थळ होते सिंधुसागराच्या तीरावर असलेल्या सोमनाथ मंदिराच्या अवशेषांचे प्रवेशद्वार. तिथे उभे राहून सरदार वल्लभभाई पटेल यांनी दृढनिश्चय व्यक्त केला की भारतीय जनता आपले आराध्य दैवत असलेल्या सोमनाथ मंदिराला त्याची पूर्व प्रतिष्ठा आणि पूर्व वैभव प्राप्त करून देईल. काय कारण होते ह्या प्रतिज्ञेचे? जर भारतीय जनतेचे आराध्य दैवत होते सोमनाथ तर आता मंदिराचे अवशेषच का उरले होते? ह्या साठी आपल्याला जाणून घ्यावे लागेल सोमनाथ मंदिराच्या इतिहासाविषयी आणि सोमनाथच्या हिंदू जनमानसातील स्थानाविषयी. हिंदूंन पूजनीय असलेल्या बारा ज्योतिर्लिंगापैकी सर्वात पहिले नाव असलेल्या आणि प्रथम स्थानी असलेले सोमनाथ. आपल्या सर्वाना माहिती असलेल्या स्तोत्राची सुरुवातच होते ती 'सौराष्ट्रे सोमनाथंच' पासून. त्यामुळेच त्याला 'आदि ज्योतिर्लिंग' म्हणून ओळखले जाते. ऋग्वेदात तसेच अनेक पुराणात ज्याचा उल्लेख झाला आहे असे हे तीर्थधाम. ह्याविषयी आपल्याला अनेक कथा सापडतात. शतकानुशतकांच्या मंदिराच्या इतिहासात नैसर्गिक रित्या पडझड झाल्यानंतर ते अनेक राजांकडून, भक्तांकडून सोने, च...
पाटण सर्वांना माहिती असते ते 'रानी की वाव' तिथे आहे म्हणून. भारतातील समृद्ध हातमाग कौशल्याचा उत्तम नमुना असलेली पटोला साडीदेखील पाटणचीच. गुजराथमधील अहमदाबाद पासून साधारण दीडशे किलोमीटरवर असणारे पाटण जागतिक पर्यटनाच्या नकाशावर मानाचे स्थान पटकावून बसले आहे. युनेस्को चे जागतिक वारसा स्थळ म्हणून मानांकन मिळवलेले हे ठिकाण आहे. रानी की वाव रानी की वाव रानी की वाव रानी की वाव रानी की वाव 'रानी की वाव' नावावरूनच आपल्या लक्षात येते की ही राणीने बांधलेली विहीर आहे. पण खरे तर ही नुसती वाव म्हणजे विहीर नसून सुमारे 64 मीटर लांब, 20 मीटर रुंद आणि 27 मीटर खोल म्हणजे साधारण सात मजल्यांइतकी खोली असलेले विष्णूचे मंदिर आहे असेच म्हणावे लागेल. जमिनीपासून खोल खोल उतरत जाणारी अशी ही रचना आहे. राणी उदयमती हिने तिचा पती राजा भीमदेव पहिला याच्या स्मरणार्थ हे मंदिर बांधले म्हणून याचे नाव 'रानी की वाव' असे पडले. राजा भीमदेव पहिला म्हणजे अनहिलवाड किंवा अनहिल्लपूर पाटणच्या सोळंकी वंशाचा संस्थापक मुलराज ह्याचा मुलगा होता. ह्या वंशाने अनेक पराक्...
एका कवीचे स्मारक असावे आणि तेही कवीला साजेसे असावे ही दुर्मिळ गोष्ट आहे! पण असे एक स्मारक आपल्या महाराष्ट्रात आहे. रत्नागिरीजवळ मालगुंड येथे कवी केशवसुत म्हणजेच कृष्णाजी केशव दामले ह्यांचे एक सुंदर स्मारक उभारले आहे. कवी केशवसुत जन्मस्थान मार्गावरील फलक प्रवेशद्वारातून दिसणारे दृश्य कोकण मराठी साहित्य परिषदेने ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री मधू मंगेश कर्णिक ह्यांच्या संकल्पनेला प्रत्यक्षात उतरवले आहे. एखाद्या कवीचे स्मारक कसे असावे हे एखाद्या साहित्यिकालाच चांगले कळू शकणार! स्मारकाच्या प्रवेशद्वारातून आपण आत गेलो की समोरच दिसते ते केशवसुत जन्मस्थान. हे जुने घर डागडुजी करून नीटनेटके ठेवले आहे. पडवीत मोठा झोपाळा आहे. कवीच्या घरात कवीचे पुस्तक वाचताना तिथेच केशवसुतांची काही पुस्तके तसेच को.म.सा.प.ची काही प्रकाशने विक्रीसाठी उपलब्ध आहेत. घरातील आतल्या खोल्या तशा रिकाम्याच आहेत. काही थोडे जुने सामान तिथे ठेवले आहे . माजघर घराच्या मागच्या बाजूला कवीचे खरे स्मारक आहे. केशवसुतांनी त्या काळात म्हणजे दीडशे वर्षांपूर्वी कवितेत नवा प्रवाह आणला...
काल दिनांक १८ ऑगस्ट २०२५. श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे ह्यांची ३२५ वी जयंती. श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे पुतळा, बर्वेवाडा श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे पुतळा, बर्वेवाडा श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे पुतळा, बर्वेवाडा आता बाजीराव म्हटले की केवळ बाजीराव मस्तानीच आठवणाऱ्या लोकांसाठी बाजीराव कोण ते सांगायला हवे. छत्रपती शिवाजी महाराजांनी पाहिलेले हिंदवी स्वराज्याचे स्वप्न प्रत्यक्षात जगणारे आणि हिंदवी साम्राज्य निर्माण करणारे बाजीराव बाळाजी पेशवे/ विश्वनाथ बल्लाळ भट हे शाहूछत्रपतींचे पेशवे म्हणजेच पंतप्रधान होते. आपल्या वीस वर्षांच्या पेशवे म्हणून कारकीर्दीत ते चाळीसहून अधिक लढाया लढले आणि त्या सर्व लढायांत ते अजिंक्य राहिले. त्यांनी आपल्या कर्तृत्वाने मराठ्यांचे वर्चस्व अखंड भारतावर प्रस्थापित केले. त्यांचा जन्म १८ ऑगस्ट १७००, भाद्रपद पौर्णिमा ह्या दिवशी डुबेरे येथे झाला. डुबेरे आजच्या सिन्नर तालुक्यात नाशिक जिल्ह्यात आहे. ह्या गावी बाजीरावांच्या मातोश्री राधाबाई ह्यांचे भाऊ मल्हारराव बर्वे राहत असत. त्या बर्वे वाड्यात बाजीरावांचा जन्म झाला. बर्वे वाडा अवघ...
कोकणच्या निसर्गाविषयी किती आणि कितीदाही लिहिले तरी कमीच आहे. कोकणातल्या नारळी पोफळीच्या वाड्या, आंब्याची फणसाची झाडे, केळीच्या बागा, कौलारू घरे ह्यांनी नटलेली धरती, सोनचाफा बकुळीच्या सुगंधाने घमघमणारा आसमंत आणि कानावर येणारी समुद्राची गाज सारेच कसे मन प्रसन्न करणारे असते. चराचरात वसणारा परमतत्वाचा अंश ह्या भूमीत प्रकर्षाने प्रत्ययाला येतो. ह्या भूमीत अनेक देवस्थाने नसती तरच नवल होते. ह्या देवस्थानांच्या जागा विलक्षण सुंदर आहेत. गणपतीपुळे हे असेच एका सुंदर स्थानी वसलेले श्री गणेशाचे स्वयंभू मंदिर. सिंधुसागराचा किनारा, चमकदार वाळूची पुळण आणि पाठीमागे गार्ड हिरव्या वनराईने झाकलेला डोंगर असे ह्या मंदिराचे नयनमनोहर ठिकाण आहे. श्री गणपतीपुळे देवस्थान ह्या स्वयंभू मूर्तीचा दृष्टांत पाचशे वर्षांपूर्वी भिडे गुरुजींना झाला. तिथे त्यांनी साधे गवताचे छप्पर उभारून पूजेला सुरुवात केली. त्यांची समाधी आपल्याला मंदिराच्या आवारातच बघायला मिळते. समाधी पुढे मग वेळोवेळी निरनिराळ्या भक्तांनी ह्या वास्तूची पुनर्बांधणी आणि दुरुस्ती केली. छत्रपती शिवाजी महाराजांचे सचिव अण्णाजी दत्त...
मंगळुरू- कुडला - मंगलोर - मंगलापूरम ही सगळी एकाच गावाची नावे. मंगलादेवी मंदिरावरून ह्या गावाचे नाव पडले मंगळुरू. दक्षिण कन्नड जिल्ह्याचे हे प्रमुख ठिकाण. सुंदर मंदिरे, स्वच्छ समुद्रकिनारे, नारळी-पोफळीची झाडे, आधुनिकतेच्या खुणा मिरवणारे मॉल्स आणि शहराबाहेरची पण तशी जवळच असणारी अनेक पर्यटन स्थळे.. ह्या साऱ्यामुळे मंगळुरु नेहमीच पर्यटकांचे आवडते राहिलेले आहे. मंगळूरूला जाणारे आमचे विमान नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून होते. हा विमानतळ पाहण्याची उत्सुकता होतीच. हा अतिशय भव्य आणि सुव्यवस्थित विमानतळ आहे. अनेक विमाने एकावेळी विमानतळावर आली तरी येणाऱ्या आणि जाणाऱ्या प्रवाशांच्यासाठी सर्व आवश्यक सुविधा केलेल्या आहेत. जशी वर्दळ वाढेल तशी विमानतळावर जाण्यासाठी वाहतुकीची साधने देखील वाढतील अशी आशा आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लहानशा प्रवासानंतर विमान मंगळुरुला उतरले. मंगळुरु विमानतळ म्हणजे टेबलटॉप रनवेज असणाऱ्या भारतातील मोजक्या विमानतळ...
कारवार - पांढऱ्या वाळूचे स्वच्छ समुद्रकिनारे, हिरव्या झाडांनी नटलेले डोंगर, काळी नदी, लाल माती असलेले सुंदर शहर. शहर होऊ पाहणाऱ्या किंवा खरे तर आता शहर झालेल्या कारवारने अजून आपले गावपण थोडे तरी टिकवून ठेवले आहे. शहरी बकालपणा मात्र टाळता आलेला नाही. गोवा, कर्नाटक आणि महाराष्ट्र असा तिन्हींचा संगम आपल्याला कारवारमध्ये दिसतो. मराठी बोलणारी माणसेही भेटत राहतात. गोव्यासारखे पर्यटकांचे लोंढे दिसत नाहीत. कदाचित आम्ही मार्चच्या अगदी सुरुवातीला गेलो तेव्हा अजून पर्यटकांचा ऐन हंगाम सुरु झाला नसावा!! उत्तर कन्नड जिल्ह्याची जीवनरेखा असणारी काळी नदी सदाशिवगड जवळ समुद्राला मिळते. तिथे एक मोठा पूल बांधलेला आहे. कारवार आणि गोव्याला जोडणारा हा पूल आता एक पर्यंटनस्थळच झाला आहे. सूर्योदय बघण्यासाठी पादचारी पुलावर जमलेले तुरळक पर्यटक, धावण्याचा सराव करणारे धावपटू, सायकलस्वार ह्यांच्या खेरीज सकाळच्या वेळी तिथे कोणीही नसते. आपल्या निसर्ग सौदर्यामुळे आणि शांततेमुळे हे ठिकाण अवश्य भेट देण्याजोगे आहे. आमचे हॉटेल ह्या पुलाच्या अगदी जवळ असल्याने आम्ही सूर्योदय अगदी मनसोक्त वेळ देऊन पाहू शकलो....
कोकण सुंदर आहेच. कोकणावर निसर्गाची अपरंपार कृपा आहे. काय नाही कोकणात? डोंगर, दऱ्या, नद्या, समुद्र, नारळीपोफळीच्या वाडया, आंब्या फणसाची झाडे, केळीच्या बागा हे तर आहेच. इतर फुलेही कोकणच्या मातीत जास्तच बहरतात. बकुळ, चाफ्याचे सगळे प्रकार, जास्वंद किती नावे लिहावीत!! कौलारू घरे, लाल मातीचे रस्ते, ताजा खवलेला नारळ घातलेले अवीट चवीचे खाद्यपदार्थ .. कोकणांत जायची किती कारणे हवीत अजून? ह्या सोबत किंवा खूप जणांसाठी ह्याच्याही आधी कोकणात जाण्याचे महत्वाचे कारण असते ते म्हणजे तेथील मंदिरे. तर आज आपण आंजर्ले येथील एक मंदिर पाहणार आहोत. दापोली, गुहागर,आंजर्ले हा सगळा परिसर तर निसर्गसौंदर्याने नटलेला आहे. शहरीकरण, पर्यटकांची अमर्याद संख्या, गल्लोगल्ली झालेले होमस्टे, रिसॉर्ट्स आणि खानावळी इतके सगळे पचवून सुद्धा अजूनही इथले वातावरण फार सुखद आहे. रत्नागिरी जिल्ह्यात दापोलीजवळ आंजर्ले गाव आहे. त्या गावाच्या जवळ एका डोंगरावर असलेले मंदिर म्हणजे 'कड्यावरचा गणपती.' पूर्वी पायऱ्या चढून जाणे हा एकमेव मार्ग होता. आता चारचाकी गाडी सुद्धा आरामात मंदिरापर्यंत जाऊ श...
आमच्या कोस्टल कर्नाटक सहलीचा दुसरा दिवस सुरु झाला तो काद्री मंजुनाथ मंदिर भेटीने. हे मंदिर अतिशय प्राचीन आहे. भारद्वाज संहितेत ह्या मंदिराचा उल्लेख आहे. त्या काळात ह्या भागाला सुवर्ण कदलीवन म्हटले जात होते आणि ह्या मंदिराला सर्वसिद्धिमहास्थान किंवा सर्वसौभाग्यदायक महास्थान असे म्हटले जाई. परशुरामाच्या तपाने प्रसन्न होऊन ब्रह्म,विष्णू आणि महेश ह्यांनी एकत्रितपणे मंजूनाथाच्या रूपात स्वतःला प्रगट केले असे कथा सांगते. नाथ संप्रदायाच्या गोरक्षनाथ आणि मच्छिन्द्रनाथ ह्यांनी देखील ह्या मंदिराला भेट दिली होती आणि ह्या भागात वास्तव्य केले होते असे सांगितले जाते. मंदिर खूप भव्य आहे. मुख्य देवता शंकर - मंजुनाथ आहे. मंदिराच्या आवारात गणेश, दुर्गा, हनुमान,अय्यप्पा, नागदेवता अशी मंदिरे आहेत. जवळच एक तलाव आहे. हे मंदिर काद्री टेकडीवर वसलेले आहे. जवळच काद्री हिल पार्क नावाचे एक भव्य उद्यान आहे. एक लहानसे तळे देखील जवळच आहे. स्नानासाठी कुंड ह्या मंदिराच्या आवारातच आहेत. एकूणच परिसर रम्य आणि मंदिरातील ऊर्जेने भारलेला आहे. अनेक भाविक इथे भेट देत असतात. काद्री मंजुनाथ मंदिर का...
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा