Skip to main content

नागाव

 नागाव म्हणजे माडापोफळींच्या वाड्या. नागाव म्हणजे केळीच्या बागा. नागाव म्हणजे सुंदर स्वच्छ समुद्रकिनारा. नागाव म्हणजे वस्त्रगाळ मऊ वाळूचा किनारा. नागाव म्हणजे अनेक मंदिरे. नागाव म्हणजे लक्षवेधी दीपमाळा. नागाव म्हणजे कोपऱ्या कोपऱ्यावर भेटणारे तळे! नागाव म्हणजे तळ्यात फुललेलीअनेकानेक कमळे!!

नागावच्या शेजारचे अक्षी, चौल, रेवदंडा ही देखील अशीच गावे. नितांतसुंदर, साधी. अलिबाग आणि ह्या सर्व गावांना मिळून अष्टागर असे म्हणत असत. आठ गावांचा समूह. 

अलिबाग पर्यटन स्थळ म्हणून ७० च्या दशकापासूनच प्रसिद्ध झाले होते. तेव्हा शांत निवांत असलेले अलिबाग नंतर खूपच गजबजले आणि मग दुसऱ्या सहस्त्रकात अलिबागशेजारील रेवदंडा, नागाव, चौल ही लहान लहान गावे देखील पर्यटनस्थळे म्हणून विकसित होऊ लागली. 

ह्या निवांत, शांत गावांना जणू अचानक खडबडून जाग आली. तिथेही पर्यटकांची गर्दी वाढू लागली. स्थानिक लोकांना रोजगार, विकासाची संधी, अर्थार्जनाची संधी त्यात दिसली. गावांवर आधुनिक पेहराव चढला आणि तिथे उदयाला आली मुंबईकरांची आवडती पर्यटनस्थळे. 

आता तर परिस्थिती अशी आहे की जवळ जवळ एका आड एका वाडीत आपल्याला रिसॉर्ट झालेला दिसतो. राहण्या जेवण्याची अनेक ठिकाणी सोय होते आहे. आता नुसती वाडी क्वचितच बघायला मिळते आहे. शनिवार रविवार ही सगळी गावे पर्यटकांनी ओसंडून वाहत असतात. गावात शिरायच्या आधीच ट्रॅफिक जामने त्रस्त असतात. 

मुंबई पासून शंभर एक किलोमीटर वर आणि पुण्यापासून साधारण दीडशे -पावणेदोनशे किलोमीटर वर असलेली, अगदी एक दिवसाची ट्रिप करण्याच्या अंतरावर असलेली ही ठिकाणे आहेत. पण ह्या गावांचे सौंदर्य, हिरवाई, शांतता अनुभवायची असेल तर तिथे एक दिवस राहायलाच हवे. 

 अजूनही हा परिसर नयनरम्य आहे. इथली हिरवाई सुखावणारी आहे. देखभाल आणि व्यवस्था नीट होत असल्याने इथली मंदिरे सुस्थितीत आहेत. नित्य पूजाअर्चा होत असल्याने जागती आहेत. 

सुरुवात करू या वंखनाथ मंदिरापासून. 

मंदिरासमोरील पुष्करणी 

वंखनाथ मंदिर अतिशय सुंदर मंदिर आहे. तिथे गेल्या गेल्या लक्ष वेधून घेते ती सुंदर भव्य पुष्करणी. काळ्या घडीव दगडातील बांधकाम, चौकोनी आकार असलेली ही पुष्करणी, घडवलेल्या पायऱ्या, चारी बाजूचे कोरीव काम ह्यामुळे विशेष सुंदर दिसते. उन्हाळ्यात पाणी कमी होते तेव्हा सगळे कोरीवकाम नीट पाहता येत असेल. 

त्याच्या समोरची दीपमाळ एकेकाळी मंदिर परिसराचा भाग असणार. आज त्या आवाराचा संकोच होऊन मधून एक रस्ता गेला आहे. त्यामुळे रस्त्याच्या एका बाजूला पुष्करणी आणि एका बाजूला तळे अशी रचना दिसते आहे. 

ह्या मंदिराचे बांधकाम आणि स्थापना अठराव्या शतकाच्या अखेरीस, साधारण १७९० च्या सुमारास  अहिल्याबाई होळकर ह्यांनी दिलेल्या निधीतून झाली. 

मंदिराचे तीन कळस दिसतात. गर्भगृहावरील कळस अर्थातच सर्वात उंच आणि कोरीवकामाने शोभिवंत आहे. 

श्री वंखनाथ मंदिर
सभागृह 

मंदिरात आत शिरताच काळ्या कुळकुळीत दगडातील नंदी, नक्षीदार लाकडी खांब आणि अष्टकोनी सभागृह दिसते. छताला लाकडी तुळयांचा आधार दिलेला दिसतो. 

नंदी 
मुख्य गाभाऱ्याच्या दोन्ही बाजूला असलेल्या भिंतीमध्ये गणेश आणि कालभैरवाच्या सुंदर मूर्ती आहेत. 
गणेश 
कालभैरव 
गर्भगृहातील शिवलिंग सोनेरी पत्र्याने मढवलेले आहे. त्याचे आरशातील प्रतिबिंब अगदी प्रवेशद्वारापासूनच आपल्याला दिसू लागते. मागे पार्वतीची सुंदर मूर्ती आहे. 
प्रतिबिंबासह शिवलिंग 
पार्वती 
पुष्करणीतील शिल्पे तसेच मंदिरातील शिल्पे पाहून गतकाळातील मंदिराच्या वैभवाची कल्पना येते. नवीन काही इतके सुंदर निर्माण करता येणे अवघड आहे. निदान  आहे त्याचे जतन  तरी आपण करायला हवे, ही वारंवार होणारी जाणीव पुन्हा एकदा इथे होते. 

 असेच दुसरे, काही शतके जुने असलेले मंदिर म्हणजे नागेश्वर मंदिर, नागाव. अगदी साधे, सुंदर मंदिर. मंदिरासमोरील तळे, दीपमाळ, जवळच असलेली समाधी सगळा परिसरच खूप शांत असतो. मंदिराच्या दुसऱ्या मजल्यावरील नक्षीदार खांबांचा सज्जा गतवैभवाची साक्ष देतो. आता मंदिराला डागडुजीची गरज आहे असेही सांगत राहतो. 

नागेश्वर मंदिर 
नागेश्वर मंदिर दीपमाळ 
नागाव मध्ये अनेक प्राचीन मंदिरे आहेत. भीमेश्वर मंदिर हे त्या पैकी एक. मंदिराबाहेर येथे फोटो काढू नयेत अशी पाटी लावलेली असल्याने मी तिथले फोटो काढलेले नाहीत. हा बाहेरचा फोटो असा दिसतो. अर्थातच इथेही मंदिरासमोर पुष्करणी आहेच. दीपमाळ आहेच. 
मंदिरात आत सुंदर हंड्या झुंबरे टांगलेली आहेत. 
भीमेश्वर  मंदिर 
भीमेश्वर मंदिर 
नागावमध्ये मंदिरासमोर पुष्करणी नसेल तर फाउल मानला जातो की काय त्याची कल्पना नाही!! जवळपास सर्व मंदिरांच्या समोर पुष्करणी आहेच! पण अशी मंदिरे बघताना एक विशेष प्रसन्नता वाटते हे खरेच. 
पाणी, हिरवाई, स्वच्छता, शांतता ह्या सगळ्यांमुळे मन निवळत जाते. 

नागाव हे नाव कसे पडले असेल? नाग आणि गाव मिळून झाले असेल का? असे मनात यायचे कारण म्हणजे नागाव ला असलेले नऊ नाग स्वयंभू देवस्थान. जमीन खणत असताना इथे ह्या मूर्ती सापडल्या आणि मग त्यांच्यासाठी मंदिर उभे केले गेले. एका वाडीत असावे असेच हे मंदिर आहे. सगळीकडे झाडे, वेली, फुलांनी वेढलेले हे मंदिर खरे तर अगदी रस्त्याला लागून आहे. पण पटकन लक्षात येत नाही. 
नऊ नाग मंदिर
म्हणताना नऊ नाग मंदिर म्हटले तरी प्रत्यक्षात तिथे दहा नाग प्रतिमा आहेत. मंदिरात मागे नवनाग स्तोत्र आणि आरती लावलेली आहे. ती सहसा इतरत्र पाहायला मिळत नाही. 
नऊ नाग आरती आणि स्तोत्र 

मंदिरात अनेक घंटा वाऱ्या सोबत झुलताना दिसतात. नवसाच्या घंटा इकडे बांधल्या जातात असे कळले. 

नागावचा समुद्रकिनारा विशेष सुंदर आहे. सरळच्या सरळ किनाऱ्याची रेषा सिंधूसागराशी गप्पा मारत मारत पुढे जाते. किनाऱ्यावरच्या मऊ वाळूमूळे धडकणाऱ्या समुद्राच्या लाटा देखील मवाळ होऊन जातात. अगदी स्वच्छ आणि तुलनेने निर्धोक असा हा किनारा पर्यटकांचा आवडता आहे. अनेक वॉटर स्पोर्ट्स देखील इथे आहेत. त्यामुळे शनिवार रविवारी इथे भरपूर गर्दी असते. ह्या समुद्रकिनाऱ्याचा खरा आनंद घ्यायचा तर थोडी शांतता हवी. 
तुम्ही नागाव ला असाल आणि सूर्यास्ताच्या वेळी समुद्रकिनाऱ्यावर गेला नाहीत तर मात्र नक्कीच फाऊल मानला जातो बरं का!! हा किनाराही भुरळ पाडणारा असाच आहे. 
समुद्राचे पहिले दर्शन हे असे होते. 
आणि मग आत्ता आत्ता तर भेटलो आहोत असे म्हणताना त्याच्याशी मैत्रीच होऊन जाते. 






नागावच्या समुद्रकिनाऱ्यावरून निघताना पावले जड होतात. आणाभाका न घेताही आता तो समुद्रकिनारा कायमचा लक्षात राहणार असतोच. 
नागावच्या परिसरातील अजून काही मंदिरांच्या विषयी लिहायचे आहे. पण ते पुन्हा कधीतरी. आजच्यापुरते इतकेच. 

#alibag #alibagbeach #nagaon #navgav #nagavbeach #alibaug #travelmaharashtra #kokan # kokanbeaches 
# onedaytravelfrommumbai 



Comments

Popular posts from this blog

लक्ष्मीकेशव मंदिर, कोळीसरे

  मंदिर म्हणजे एक उर्जाकेंद्र! प्राचीन काळापासून भाविक मंदिरात देवतांच्या दर्शनासाठी जात आले आहेत. आजही हिंदू लोक मंदिरात जाऊन, चित्त एकाग्र करून ध्यान, पूजा आणि आरती करतात. यामुळे त्यांना ऊर्जा आणि शांततेचा अनुभव मिळतो. प्रत्येक देवी-देवतेचे एक विशिष्ट मंदिर असते.  असेच कोळीसरे येथे श्री विष्णूचे - लक्ष्मीकेशवाचे सुंदर मंदिर आहे . रत्नागिरी शहरापासून फक्त ५० किलोमीटर अंतरावर किंवा गणपती पुळ्यापासून २१ किलोमीटर अंतरावर निसर्गसुंदर कोळीसरे गाव आहे. पुणे मुंबई हून रत्नागिरी जिल्ह्यातील कोळीसरे येथे जायचे असल्यास चिपळूण मार्गे जाता येईल. परशुराम - कोळीसरे रस्त्यात अशी नयनरम्य दृश्ये अनेकदा दिसतात. परशुराम कोळिसरे रस्ता अगदी कमी लोकवस्तीचे, घनदाट झाडी असलेले हे गाव कोळीसरे फाट्याहून आत गेल्यावर दीड दोन किलोमीटर प्रवास केल्यावर येते. रत्नागिरीहून बसने जाता येते अन्यथा मंदिरापर्यंत पोचण्यासाठी स्वतःचे वाहन असणे सोयीचे आहे.  गाडी पार्क केल्यानंतर काही पायऱ्या उतरून मग घनदाट झाडीत वसलेल्या ह्या मंदिरात जाता येते. ह्या रस्त्यावरून व्हील चेयर जाउ शकत नाही. पार्किंग पासून उ...

पैसाच्या खांबाचे मंदिर!

पैसाच्या खांबाचे मंदिर! अनेक वर्षांपूर्वी दुर्गा बाईंचे ' पैस ' हे पुस्तक वाचनात आले. त्यात होता हा पैसाचा खांब. पैस म्हणजे अवकाश. जिथे ज्ञानेश्वरी लिहिली गेली तो हा पैसाचा खांब. ज्ञानेश्वरीचे जन्मस्थान! खांबाला टेकून बसलेले, ज्ञानेश्वरी सांगत असलेले ज्ञानेश्वर आणि ती लिहून घेत असलेले लेखनिक सच्चिदानंद बाबा असे चित्र आधीही अनेकदा पाहिलेले होते. पण त्या खांबाला ' पैसाचा खांब' म्हणतात हे माहितीच नव्हते. पैस ह्या पुस्तकातील पैसाचा खांब हे प्रकरण वाचले आणि अक्षरशः थरारून गेले. 'पैसाच्या खांबाचे मंदिर' अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा या प्रवरा नदीच्या तीरावरील गावी आहे. नेवासे गावाच्या पश्चिमेला हे मंदिर आहे. 'शके बाराशे बारोत्तरे| तैं टीका केली ज्ञानेश्वरे| सच्चिदानंद बाबा आदरे| लेखकू जाहला|' असा उल्लेख सापडतो. मूर्त आणि अमूर्त ह्याची अशी जोडणी म्हणजे ज्ञानाच्या अनंत अवकाशात जाण्याची पहिली पायरीच जणू. ज्ञानेश्वरी वाचण्याएवढी आणि कळण्याएवढी योग्यता ह्या जन्मात अंगी येईल की नाही माहिती नाही. पण हा खांब पाहू या कधीतरी असे ठरवून टाकले. अवघड नव्हतेच जाणे. संभाजीनगर...

हनुमान जन्मस्थळ आणि शबरी धाम, जय श्रीराम, जय जय राम!

आज आपण रामायणातील दोन ठिकाणांना भेट देणार आहोत आणि दोन महान राम भक्तांच्या भेटीसाठी तुम्हाला घेऊन जाताना मला अतिशय आनंद झालेला आहे.  पहिल्यांदा आपण जाऊयात, हनुमानाच्या जन्मस्थानी अंजनेय टेकडीवर. ही टेकडी कर्नाटक मध्ये हंपीजवळच्या भागात आहे असे मानले जाते. ही जागा अंजनीच्या पुत्राचे, अंजनेयाचे म्हणजेच हनुमानाचे जन्मस्थळ आहे.  भारतात अजूनही इतर काही ठिकाणे आहेत की जी हनुमानाचे जन्मस्थळ म्हणून सांगितली जातात. पण अंजनेय टेकडी हे हनुमानाचे जन्मस्थळ असणे मला सर्वात जास्त संयुक्तिक वाटते. कारण ऋष्यमूक पर्वत, जिथे सुग्रीव, हनुमान आणि भगवान श्रीराम यांची भेट झाली होती तो इथून जवळच आहे. हंपीपासून अंजनेय टेकडीपर्यंतचा रस्ता नैसर्गिक सृष्टिसौंदर्याने अतिशय समृद्ध आहे. तुंगभद्रेच्या किनाऱ्यावर असल्यामुळे हा संपूर्ण प्रदेश अत्यंत सुपीक आहे रस्त्याच्या दोन्ही बाजूला सतत तुम्हाला भात शेती, नारळाची झाडे, केळीच्या बागा आणि अर्थातच प्रचंड मोठे खडक, जे ह्या भागाचे वैशिष्ट्य आहेत ते दिसत राहतात. हा संपूर्ण परिसर रामायणातला किष्किंधा भाग मानला जातो. भात शेती केळीच्या बागा भातशेतीचा मखमली गालिचा टे...

श्री व्याडेश्वर देवस्थान, गुहागर

  कोकणावर निसर्गाचा वरदहस्त आहेच. त्यातही काही गावांनी आपल्या सौंदर्याने विशेष स्थान मिळवले आहे. त्यातील एक महत्वाचे नाव म्हणजे गुहागर. सुंदर लहानसे गाव आहे. एक मुख्य रस्ता, त्याच्या दोन्ही बाजूला घरे, घरांच्या मागे नारळ सुपारीच्या वाड्या. रस्त्याच्या एका बाजूच्या प्रत्येक घराच्या मागच्या वाडीतून समुद्राला जाण्याचा रस्ता, भव्य स्वच्छ समुद्रकिनारा असे हे मोहात पाडणारे गुहागर गाव.  गुहागर प्रसिद्ध आहे व्याडेश्वरासाठी. व्याडेश्वर हे शंकराचे मंदिर अनेक कोकणवासीयांचे कुलदैवत आहे. कोकणातील सर्वात महत्त्वाच्या शिवमंदिरांपैकी एक म्हणजे गुहागरमधील श्री व्याडेश्वर देवस्थान.  श्री व्याडेश्वर देवस्थान.  श्री व्याडेश्वर देवस्थान.  तुम्हाला जर का कधी दक्षिणेतील मंदिरे पाहून वाटले असेल की अशी मंदिरे आपल्या महाराष्ट्रात का नाही?!! तर गुहागरच्या व्याडेश्वर मंदिराला भेट द्या. भव्य सुंदर देवालय आहे. मंदिराचे आवार स्वच्छ, प्रशस्त आहे. मुख्य म्हणजे अगदी नांदते, जागते मंदिर आहे. मंदिराची साफसफाई, निगराणी केली जाते आहे. आवारात भरपूर झाडे आहेत. श्री व्याडे...

महेश्वर

महेश्वर हे मध्यप्रदेश पर्यटन निगमच्या पर्यटन स्थळांमधले एक महत्वाचे नाव आहे. पण करोडो भारतीयांसाठी ते केवळ एक पर्यटन स्थळ नाही तर एक तीर्थस्थान असते. लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या वास्तव्याने पुनीत झालेले स्थान आहे.  महेश्वर किल्ला प्रवेशद्वार  राजवाडा प्रवेशद्वार  बाह्यरूप  पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर  राजवाडा प्रवेशद्वार  अहिल्याबाई होळकर हे केवळ भारताच्याच नव्हे तर विश्वाच्या इतिहासातील एक सोनेरी पान. संपूर्ण मानव विश्वातील यशस्वी स्त्री राज्यकर्त्यांची सूची करायची झाली तर अहिल्याबाई होळकरांचे नाव ठळकपणे लिहायला लागेल.   31 मे 2025 ला त्यांची तीनशेवी जयंती आहे. पण 300 वर्षांपूर्वी होऊन गेलेल्या अहिल्याबाईंचे आयुष्य अगदी आजच्या आधुनिक काळातल्या आव्हानातही मार्गदर्शक ठरावे असेच आहे.  त्यांच्याविषयीचा आदर मनात घेऊनच आपण महेश्वरला जातो आणि त्या भावनेच्या प्रकाशात महेश्वर पाहतो. महेश्वरला फार मोठी प्राचीन परंपरा आहे. स्कंद पुराणाच्या रेवा खंडात आणि वायू पुराणाच्या नर्मदा रहस्य मध्ये महिष्मती म्हणजे महेश्वरचे वर्णन आलेले आहे. 'गुप्...

श्री क्षेत्र गिरनार

  गिरनार माझ्यासाठी ते मोहक फळ होते, जे मिळायला अवघड होते आणि कितीही हवेहवेसे वाटले तरी त्यासाठी माझ्याकडून प्रयत्न मात्र अजिबात केले गेले नव्हते. गिरनारच्या अद्भुत कथा खूप ऐकल्या, वाचल्या होत्या. गिरनारची मनात ओढ होती. पण ते सगळे मनातच. प्रत्यक्षात कोणतेही ट्रीप ठरवताना, कुठे जायचे याचा विचार करताना पुढे होऊन गिरनारला जाऊयात असे कधी म्हटले नव्हते हेही तितकेच खरे.  श्री क्षेत्र गिरनार  काय आहे गिरनार?  गिरनार हा पर्वत समूह आहे. दत्तात्रेयांचा इथे निवास असल्याने ते हिंदूंच्यासाठी अत्यंत पवित्र आणि महत्वाचे धार्मिक स्थळ आहे.  हिमालयापेक्षाही जुना असलेला हा पर्वत अनेक नावांनी प्राचीन साहित्यात आलेला आहे. रेवतक हे त्यातील सर्वात जास्त माहिती असलेले नाव.  जैन लोकांसाठी देखील हे अत्यंत महत्वाचे ठिकाण आहे कारण इथे जैन मंदिर समूह देखील आहे. नेमिनाथ, आदिनाथ, मल्लिनाथ आणि इतर तीर्थंकरांची मंदिरे आहेत.  कुठे आहे गिरनार ? गुजराथ, सौराष्ट्र मधील जुनागढ जवळ गिरनारच्या पायथ्याचे, तलेटी नावाचे गाव आहे.  गिरनारला लोक का जातात? तेथील द...

हिंदवी स्वराज्याची राजधानी - किल्ले रायगड

रायगड! हे नाव घेताच मनात उठणारे भावतरंग अवर्णनीय असेच असतात. ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी म्हणजे 'शिव राज्याभिषेक दिन', 'हिंदू साम्राज्य दिन'. अभिमानाचा, गौरवाचा दिवस. भारतीय इतिहास हा संघर्षाचा व विजयाचा आहे. त्यातील झळाळून उठणारे तेजस्वी, सोनेरी पान म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे कर्तृत्व! शिवाजी महाराज आणि त्यांच्या मावळ्यांचे अविश्रांत परिश्रम पूर्णत्वाला पोचले ते ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी, १६७४ ह्या दिवशी. हा केवळ राज्याभिषेक नव्हता. हिंदवी स्वराज्याची स्थापना झाल्याची केवळ अधिकृत घोषणा नव्हती. तर संतांच्या उपदेशांनी जागलेली सज्जन शक्ती, मावळ्यांच्या रूपातील सामान्य जनतेच्या मनात जागलेली वीरवृत्ती ह्यांच्या संगमाने घडलेला तो एक अभूतपूर्व अविष्कार होता. राज्याभिषेक ही शिवाजी महाराजांची व्यक्तिगत महत्वाकांक्षा नव्हती. रोहिडेश्वर येथे लहानपणी घेतलेली प्रतिज्ञा अथक प्रयत्नांनी पूर्ण झाली होती. "हे हिंदवी स्वराज्य व्हावे हे तो श्रींची इच्छा" हे वचन सार्थ झाले होते. पण राज्याभिषेकाच्या निमित्ताने शिवाजीमहाराजांनी मोठ्या युक्तीने त्यांच्यावर असलेली लोकांची निष्ठा सिंहा...

परशुराम कुंड, अरुणाचल.

अरुणाचल मधील टेंगापानी, नामसाईच्या गोल्डन पॅगोडाहुन परशुराम कुंड ला जाण्यासाठी  आम्ही निघालो. ही गोष्ट आहे ऑक्टोबर २०१९ मधील.  त्या दिवशी सतत पाऊस पडत होता. सगळीकडे हिरवेगार तर अरुणाचल मध्ये नेहमीच असते. पावसात भिजलेली झाडे, स्वच्छ हिरवळ, मध्येच ढगांत अदृश्य होणाऱ्या पर्वतरांगा, वाहणारे थंडगार वारे, फार सुंदर होते ते सगळे.  अरुणाचल  डोंगरातला रस्ता होता. तुफान वारा होता. त्या सगळ्या अवाढव्य डोंगराळ प्रदेशात आमची गाडी म्हणजे एक ठिपका होती. वाऱ्याने उडून जायला वेळ लागणार नाही इतका जोरात वारा वाहत होता. एक खिडकी फोटो काढण्यासाठी उघडली तर ड्राइवर म्हणाला की दुसऱ्या बाजूची पण उघडा, नाहीतर आत आलेल्या वाऱ्याने गाडी हलायला लागेल. शेजारी खोल दरी दिसत असताना गाडी हलायच्या कल्पनेने अंगावर काटा आला आणि पहिली खिडकी देखील फोटो काढल्या काढल्या बंद केली..नकोच ती वाऱ्याची परीक्षा!  रस्ता कसा होता हे प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी पुढे दिलेल्या लिंकवर क्लिक करून विडिओ नक्की बघा. Namsai- Parshuram kund road ह्या नदीचे नाव लोहित आणि ह्या जिल्ह्याचेही नाव लोहित. लोहितचा अर्थ रक्त किंवा रक्...

सिद्धेश्वर मंदिर, टोके - प्रवरा संगमावर उमललेले दगडी बिल्वपत्र

भिंतीवरील कोरीवकाम  महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्ह्यातले टोके हे एक लहान गाव. अहिल्यानगर कडून छत्रपती संभाजीनगरला जाताना डावीकडे नदीच्या काठावर हे सुंदर मंदिर आपल्याला दिसते. जगप्रसिद्ध वेरूळ, अजिंठा लेणी बघायची असतील तर सांभाजीनगरला जावे लागते हे आपल्याला माहिती असेलच. सिद्धेश्वर मंदिर, टोके हे मला एखाद्या दगडी बेलपत्राप्रमाणे वाटले. हे बेलपत्र उमलले आहे अमृतवाहिनी प्रवरा आणि दक्षिणगंगा गोदावरीच्या संगमावर. त्या संगमाच्या, ज्याला प्रवरा संगम म्हणतात त्या परिसरात सिद्धेश्वर, घटेश्वर, मुक्तेश्वर, रामेश्वर, संगमेश्वर अशी अनेक मंदिरे आहेत. पण सर्वात खास आणि सुंदर आहे ते सिद्धेश्वर मंदिर. सिद्धेश्वर मंदिर परिसर बघा असा दिसतो! हा फोटो घेतला होता सप्टेंबर २०१९ मध्ये. पावसाळा भरपूर बरसून आता आपला मुक्काम आवरत होता आणि नद्यांना भरपूर पाणी होते तेव्हाचा! मंदिराचा परिसर  सिद्धेश्वर मंदिर समूह हा तुलनेने नवा समूह आहे, अठराव्या शतकात बांधला गेलेला. पेशव्यांच्या काळात बांधल्या गेलेल्या ह्या मंदिराला सभोवताली एखाद्या छोट्या किल्ल्यासारखी किंवा गढीसारखी उंच भिंत आहे. मुख्य मंदिर आहे शंकराचे...