मुख्य सामग्रीवर वगळा

परशुराम कुंड, अरुणाचल.

अरुणाचल मधील टेंगापानी, नामसाईच्या गोल्डन पॅगोडाहुन परशुराम कुंड ला जाण्यासाठी आम्ही निघालो. ही गोष्ट आहे ऑक्टोबर २०१९ मधील. 
त्या दिवशी सतत पाऊस पडत होता. सगळीकडे हिरवेगार तर अरुणाचल मध्ये नेहमीच असते. पावसात भिजलेली झाडे, स्वच्छ हिरवळ, मध्येच ढगांत अदृश्य होणाऱ्या पर्वतरांगा, वाहणारे थंडगार वारे, फार सुंदर होते ते सगळे. 
अरुणाचल 
डोंगरातला रस्ता होता. तुफान वारा होता. त्या सगळ्या अवाढव्य डोंगराळ प्रदेशात आमची गाडी म्हणजे एक ठिपका होती. वाऱ्याने उडून जायला वेळ लागणार नाही इतका जोरात वारा वाहत होता.
एक खिडकी फोटो काढण्यासाठी उघडली तर ड्राइवर म्हणाला की दुसऱ्या बाजूची पण उघडा, नाहीतर आत आलेल्या वाऱ्याने गाडी हलायला लागेल. शेजारी खोल दरी दिसत असताना गाडी हलायच्या कल्पनेने अंगावर काटा आला आणि पहिली खिडकी देखील फोटो काढल्या काढल्या बंद केली..नकोच ती वाऱ्याची परीक्षा! 
रस्ता कसा होता हे प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी पुढे दिलेल्या लिंकवर क्लिक करून विडिओ नक्की बघा.
ह्या नदीचे नाव लोहित आणि ह्या जिल्ह्याचेही नाव लोहित. लोहितचा अर्थ रक्त किंवा रक्तवर्णी. भारत आणि चीनमधून वाहणारी ही नदी आहे. आत्ता जरी पाऊस पडत असल्याने, वाहून आलेल्या मातीने तिचा रंग गढूळला असला तरी एरवी लालसर दिसत असेल कदाचित. अन्यथा असे नाव का दिले असेल नदीला?
पायऱ्यांवरून दिसणारे कुंड 
लोहित जिल्ह्यातील तेलुंग प्रदेशातील मिश्मी भागातील परशुराम कुंड हे भारतातील एक प्रसिद्ध स्थान. भारत आणि नेपाळ मधून दर मकर संक्रांतीला लाखो हिंदू ह्या स्थानी, यात्रेसाठी येतात.
परशुराम हे दशावतारापैकी सहावा अवतार मानले जातात. ह्या ठिकाणाशी अनेक आख्यायिका जोडल्या गेल्या आहेत. त्या सर्वातला समान धागा हा की परशुराम इथे आले होते. त्यांनी इथे तप केले.
इथले पाणी अतिशय पवित्र मानले जाते. इथे स्नान केल्यास गंगास्नानाचे पुण्य मिळते असे म्हटले जाते. त्यामुळे स्नान करण्यासाठी भाविकांची गर्दी असते. 
पायथ्यापर्यंत गाडी जाते. नंतर मात्र आधी भरपूर पायऱ्या चढायला व उतरायला लागतात. म्हणजे आपण एक लहान डोंगर चढतो व पलीकडच्या बाजूने उतरून नदीशी जातो. 
जवळपास तीनशे पायऱ्या असतील. त्यापैकी काही अवघड आहेत. वयस्कर किंवा इतर काही शारीरिक व्याधी असणाऱ्या लोकांना कदाचित ह्या पायऱ्या अवघड जातील. नुकतेच भारत सरकारने हे ठिकाण सुव्यवस्थित करण्यासाठी मदत जाहीर केली आहे. तेव्हा आता हे चढणे उतरणे सोयीचे होईल.
आम्ही गेलो तेव्हा पूर्ण वेळ बारीक बारीक पाऊस पडत होता. कामलांग अभयारण्याचा हा भाग असल्याने सर्वत्र घनदाट झाडी दिसते. अगदी घनदाट जंगलात परशुराम कुंड हे ठिकाण असल्याने पायऱ्यांच्या आजूबाजूला गर्द झाडी आहे. त्यामुळे पायऱ्या चढण्याचा थकवा अजिबात जाणवत नाही.
पायऱ्यांवरून दिसणारे दृश्य अनुभवण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करून विडिओ नक्की बघा.
पायथ्याशी एक परशुराम मंदिर आहे. पायऱ्या चढताना अधूनमधून काही मंदिरे लागतात. रेणुका मातेचे मंदिर देखील आहे. ह्या सर्व मंदिरांच्या आसपास गायी मुक्तपणाने फिरत असतात. शेणही जागोजाग दिसत होते. पाऊस आणि शेण, दोन्हींमुळे चालताना खूपच जपून चालावे लागत होते. 
श्री परशुराम मंदिर 
इथे पूर्वी जे कुंड होते, ते १९५० च्या भूकंपामध्ये नाहीसे झाले. त्यावरून आता पाण्याचा वेगवान प्रवाह वाहतो आहे. पण आता त्याच जागी, आश्चर्यकारक रित्या, खडकांनी वेढलेला असा एक वर्तुळाकार भाग आपोआप निर्माण झाला आहे. पौराणिक काळातील कुंड भूकंपाने नाहीसे केले तरी निसर्गाने पुन्हा तिथे दुसरे कुंड निर्माण केले! 
परशुराम कुंड 
परशुराम कुंड 
परशुराम कुंड 
परशुराम कुंड 
ह्या ठिकाणाला भेट देण्याचा आनंद विलक्षण आहे. निसर्गाचे शांत रम्य रूप इथे दिसते तसेच अत्यंत रौद्र रूप देखील दिसते. अनेक भाविक ह्या कुंडात स्नान करण्यासाठी, काही पूजाविधी करण्यासाठी दूरवरून येतात. श्रद्धापूर्वक यात्रा करतात.
हा सर्व भाग महाभारतातील भीष्मक राजाचा आहे असे कोणीतरी सांगितले. पण भीष्मक राजा म्हणजे रुक्मिणीचे वडील, हे तर विदर्भात राहायचे असे आपण मानतो. तेव्हा कदाचित कामलांग अभयारण्य हे ज्याचे राज्य होते तो भीष्मक राजा वेगळा असावा. 
कुंडाला जाणाऱ्या रस्त्याच्या पायथ्याशी, जिथे गाड्या पार्क केल्या जातात तिथे जवळच काही लहानलहान दुकाने आणि खानावळी आहेत. आम्हाला तिथे ताजे, गरम, चविष्ट शाकाहारी जेवण मिळू शकले. अर्थात आम्ही आधी फोन केला होता व कुंडाला जाताना पण सांगून गेलो होतो की आम्ही आल्यावर जेवायला येतो म्हणून.
पूर्ण वेळ पावसात भिजत, इतक्या पायऱ्या चढ उतर केल्यावर गरम भजी, सुग्रास अन्न खाताना विशेष आनंद झाला. 
पाउस महाराष्ट्रातील असो वा अरुणाचलमधील, पावसात भिजल्यानंतर भजी खाताना सारखाच आनंद मिळतो हे महत्वाचे निरीक्षण इथे नोंदवून ठेवत आहे!!
वारा तर इतका होता की आमच्या पानातले पापड धरून ठेवण्याची कसरत करायला लागत होती. नाहीतर ते उडून जात होते!!
पाउस आणि भजी 
स्थानिक शाकाहारी जेवण 
कोरा चहा 
जेवण झाल्यावर रेस्टोरंटच्या मालकिणीने आम्हाला तिथला खास काळा चहा दिला. टी सेट खूपच वेगळा दिसला म्हणून मी तिला विचारले की कुठून आणला? तर तिने सांगितले की ब्रम्हदेशाच्या बाजारातून! कसे काय विचारताच ती म्हणाली, हा जो मागे डोंगर दिसतो आहे ना? तो पार केला की ब्रम्हदेश आहे!
मला जे तिच्या बोलण्यातून समजले ते असे, काही जनजातीच्या लोकांना तिथे जायला किंवा तिकडून इथे यायला परवानगी आहे. अर्थात सीमेवर एक बॉर्डर पोस्ट आहे पण ते दूर आहे. अरुणाचल प्रदेश, नागालँड, मिझोराम आणि मेघालय ह्या चार राज्यात भारत ब्रम्हदेश सीमाभाग आहे. जवळपास १५०० किलोमीटरची ही सीमा आहे.
असे हे भारताच्या सीमेजवळ असणारे, भाविकांचे श्रद्धास्थान असणारे निसर्गरम्य परशुराम कुंड. नक्की भेट द्या. प्रवास अवघड आहे पण आनंददायी आहे.

टिप्पण्या

  1. तुझी प्रवास वर्णन छान असतात.पर्शुराम कुंडाची माहिती माझ्यासाठी नविन आहे.सोप्या मराठी भाषेत लिहिलेले वाचताना खूप आनंद मिळतो.
    शुभेच्छा.

    उत्तर द्याहटवा
  2. Photography and overall description very nice mam...loved it will certainly plan to visit ..

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कोस्टल कर्नाटक ३. -कुरु बेट, अनेगुड्डे श्री विनायक मंदिर, मणिपाल लेक

  कोस्टल कर्नाटक सहलीचा आमचा तिसरा दिवस देखील फार आनंदात गेला. काही गोष्टी ठरवल्याप्रमाणे होऊ शकल्या. काही गोष्टी ठरवल्याप्रमाणे अजिबात झाल्या नाहीत. पण तरी जमेची बाजूच जड झाली हे खरे.  उडुपीला सकाळी गाडी बोलावली होती आणि ती आम्हाला काही तास फिरवून आणणार होती. पहिले ठिकाण होते त्रासी मारवंते बीच.  फोटो बघूनच हा बीच पाहण्याची खूप उत्सुकता वाटत होती. हा अत्यंत अनोखा बीच आहे. रस्त्याच्या एक बाजूला सौपर्णिका नदी, दुसऱ्या बाजूला अरबी समुद्र - सिंधूसागर! त्रासी मरवंथे बीच  📷https://karnatakatourism.org/en/destinations/udupi उडुपीपासून निघून इकडे येऊन पोचलो. एका बाजूला नदी दिसत होती. दुसऱ्या बाजूला समुद्र किनाराही दिसत होता. पण फोटोत दाखवल्याप्रमाणे ठिकाण काही दिसेना.  मग चौकशी केल्यावर कळले की असे फक्त ड्रोनने काढलेल्या फोटोत दिसते. डोळ्यांना असे दिसत नाही!! एरवी आपण म्हणतो की डोळ्यांना जितके सुंदर दिसते तितके फोटोत उतरत नाही. पण इथे उलटे झाले होते!फोटोतल्याइतके सुंदर डोळ्यांना दिसत नव्हते!! पण असे दिसले नाही म्हणून काय झाले? रस्त्याच्या एका बाजूला नदी वाहते आहे...

कोस्टल कर्नाटक ६ - अविस्मरणीय शरावती बॅकवॉटर बोटिंग, शरावती कांडला मॅन्ग्रोव्ह बोर्ड वॉक

मी आधीच्या पोस्टमध्ये सांगितले होते की आजचा सूर्यास्त समुद्रात होता तर उद्याचा सूर्योदय शरावती नदीत असणार आहे! तोच हा सूर्योदय शरावती नदीत, कमळांच्या मध्ये.  शरावती बॅकवॉटर बोटिंग  दुसऱ्या दिवशी सकाळी सव्वा सहापर्यंत आम्ही बोटिंगच्या ठिकाणी पोचलो. कारण आम्हाला सूर्योदय चुकवायचा नव्हता. होनावर जवळचे शरावती नदीतील बोटिंग हा एक अविस्मरणीय अनुभव आहे.  आजूबाजूची शांतता, संथ पाणी, स्वच्छ नितळ पाण्यात वाकून आपले प्रतिबिंब न्याहाळणारी नारळाची झाडे, पाण्यात अध्ये मध्ये असलेली लहानशी बेटे, खारफूटीची जंगले, कमळाची पाण्यावर तरंगणारी पाने, उगवत्या सूर्याची पाण्यात मिसळणारी किरणे, त्याने तांबूस झालेले पाणी .. एक वेगळेच जग असते ते. तुम्ही जितक्या वेळासाठी बोट ठरवलेली असेल.. तास दीड तास..  तो वेळ, तुमच्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षणांपैकी एक असणार हे मी अगदी खात्रीने सांगू शकते.  आपोआप जगाचा, आयुष्याचा कोलाहल मंद होत जातो. पहाटेचा मवाळ प्रकाश, पाण्यावर हेलकावणारी नाव, हवेतला अगदी किंचितसा सुखद गारवा आणि मुरत जाणारी शांतता ह्या सगळ्याने मन निवळत जाते.  आम्ही गेलो त्या दिवशी,...

'रानी की वाव'

पाटण सर्वांना माहिती असते ते 'रानी की वाव' तिथे आहे म्हणून. भारतातील समृद्ध हातमाग कौशल्याचा उत्तम नमुना असलेली पटोला साडीदेखील पाटणचीच.  गुजराथमधील अहमदाबाद पासून साधारण दीडशे किलोमीटरवर असणारे पाटण जागतिक पर्यटनाच्या नकाशावर मानाचे स्थान पटकावून बसले आहे. युनेस्को चे जागतिक वारसा स्थळ म्हणून मानांकन मिळवलेले हे ठिकाण आहे.  रानी की वाव  रानी की वाव  रानी की वाव  रानी की वाव  रानी की वाव  'रानी की वाव' नावावरूनच आपल्या लक्षात येते की ही राणीने बांधलेली विहीर आहे. पण खरे तर ही नुसती वाव म्हणजे विहीर नसून  सुमारे 64 मीटर लांब, 20 मीटर रुंद आणि 27 मीटर खोल म्हणजे साधारण  सात मजल्यांइतकी खोली असलेले विष्णूचे मंदिर आहे असेच म्हणावे लागेल.  जमिनीपासून खोल खोल उतरत जाणारी अशी ही रचना आहे.  राणी उदयमती हिने तिचा पती  राजा भीमदेव पहिला याच्या स्मरणार्थ हे मंदिर बांधले म्हणून याचे नाव 'रानी की वाव' असे पडले. राजा भीमदेव पहिला म्हणजे अनहिलवाड किंवा अनहिल्लपूर पाटणच्या सोळंकी वंशाचा संस्थापक मुलराज ह्याचा मुलगा होता. ह्या वंशाने अनेक पराक्...

सोमनाथ - प्रभास पट्टण.

१९४७चे दीपावली पर्व. स्थळ होते सिंधुसागराच्या तीरावर असलेल्या सोमनाथ मंदिराच्या अवशेषांचे प्रवेशद्वार. तिथे उभे राहून सरदार वल्लभभाई पटेल यांनी दृढनिश्चय व्यक्त केला की भारतीय जनता आपले आराध्य दैवत असलेल्या सोमनाथ मंदिराला त्याची पूर्व प्रतिष्ठा आणि पूर्व वैभव प्राप्त करून देईल.  काय कारण होते ह्या प्रतिज्ञेचे? जर भारतीय जनतेचे आराध्य दैवत होते सोमनाथ तर आता मंदिराचे अवशेषच का उरले होते?  ह्या साठी आपल्याला जाणून घ्यावे लागेल सोमनाथ मंदिराच्या इतिहासाविषयी आणि सोमनाथच्या हिंदू जनमानसातील स्थानाविषयी.  हिंदूंन पूजनीय असलेल्या बारा ज्योतिर्लिंगापैकी सर्वात पहिले नाव असलेल्या आणि प्रथम स्थानी असलेले सोमनाथ. आपल्या सर्वाना माहिती असलेल्या स्तोत्राची सुरुवातच होते ती 'सौराष्ट्रे सोमनाथंच' पासून. त्यामुळेच त्याला 'आदि ज्योतिर्लिंग' म्हणून ओळखले जाते.  ऋग्वेदात तसेच अनेक पुराणात ज्याचा उल्लेख झाला आहे असे हे तीर्थधाम. ह्याविषयी आपल्याला अनेक कथा सापडतात.  शतकानुशतकांच्या मंदिराच्या इतिहासात नैसर्गिक रित्या पडझड झाल्यानंतर ते अनेक राजांकडून, भक्तांकडून सोने, च...

लोकमान्य टिळक जन्मस्थान, रत्नागिरी

लोकमान्य टिळक म्हणजेच   बाळ गंगाधर टिळक हे भारतीय स्वातंत्र्यसंग्रामातील एक महत्वाचे नाव.  केसरी आणि मराठाचे संपादक, गणित आणि कायदयाचे शिक्षक, स्वातंत्र्यसमराला दिशा देणारे एक प्रभावी राष्ट्रीय नेतृत्व, गीतेवर भाष्य लिहिणारे तत्वचिंतक, संशोधक अशा विविध रूपांत आपण त्यांना ओळखतो.  त्यांनी म्हटलेले 'स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच ' हे नुसते वाक्य किंवा घोषणा राहिली नाही तर ती भावना प्रत्येक भारतीयाच्या मनात रुजली. स्वातंत्र्यसंग्रामाला ह्यातून ऊर्जा मिळाली.  वंदे मातरमचा घोष बंगालासोबतच संपूर्ण देशांत गुंजला आणि स्वातंत्र्याची प्रेरणा बनला. त्यात 'लाल बाल पाल' ह्या त्रयीचा मोठा वाटा होता.  ब्रिटिश सरकार त्यांना 'भारतीय असंतोषाचे जनक' असे म्हणत असे. निद्रिस्त समाजाला जागे करण्याचे श्रेय लोकमान्य टिळकांना जाते.  त्यांचा जन्म २३ जुलै १८५६ ला रत्नागिरी येथे झाला. आज आपण पाहणार आहोत ते जिथे त्यांचा जन्म झाला ते रत्नागिरीमधील घर. आता तिथे स्मारक केलेले आहे.  वयाच्या साधारण दहाव्या वर्षापर्यंत लोकमान्य टिळक ह्या वास्तूत राहिले. ही वास्तू रत...

कवी केशवसुत स्मारक, मालगुंड

एका कवीचे स्मारक असावे आणि तेही कवीला साजेसे असावे ही दुर्मिळ गोष्ट आहे! पण असे एक स्मारक आपल्या महाराष्ट्रात आहे. रत्नागिरीजवळ मालगुंड येथे कवी केशवसुत म्हणजेच कृष्णाजी केशव दामले ह्यांचे एक सुंदर स्मारक उभारले आहे.  कवी केशवसुत जन्मस्थान  मार्गावरील फलक  प्रवेशद्वारातून दिसणारे दृश्य  कोकण मराठी साहित्य परिषदेने ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री मधू मंगेश कर्णिक ह्यांच्या संकल्पनेला प्रत्यक्षात उतरवले आहे.  एखाद्या कवीचे स्मारक कसे असावे हे एखाद्या साहित्यिकालाच चांगले कळू शकणार! स्मारकाच्या प्रवेशद्वारातून आपण आत गेलो की समोरच दिसते ते केशवसुत जन्मस्थान. हे जुने घर डागडुजी करून नीटनेटके ठेवले आहे. पडवीत मोठा झोपाळा आहे.  कवीच्या घरात कवीचे पुस्तक वाचताना  तिथेच केशवसुतांची काही पुस्तके तसेच को.म.सा.प.ची काही प्रकाशने विक्रीसाठी उपलब्ध आहेत.  घरातील आतल्या खोल्या तशा रिकाम्याच आहेत. काही थोडे जुने सामान तिथे ठेवले आहे .  माजघर  घराच्या मागच्या बाजूला कवीचे खरे स्मारक आहे. केशवसुतांनी त्या काळात म्हणजे दीडशे वर्षांपूर्वी कवितेत नवा प्रवाह आणला...

गणपतीपुळे

कोकणच्या निसर्गाविषयी किती आणि कितीदाही लिहिले तरी कमीच आहे. कोकणातल्या नारळी पोफळीच्या वाड्या, आंब्याची फणसाची झाडे, केळीच्या बागा, कौलारू घरे ह्यांनी नटलेली धरती, सोनचाफा बकुळीच्या सुगंधाने घमघमणारा आसमंत आणि कानावर येणारी समुद्राची गाज सारेच कसे मन प्रसन्न करणारे असते.  चराचरात वसणारा परमतत्वाचा अंश ह्या भूमीत प्रकर्षाने प्रत्ययाला येतो. ह्या भूमीत अनेक देवस्थाने नसती तरच नवल होते. ह्या देवस्थानांच्या जागा विलक्षण सुंदर आहेत. गणपतीपुळे हे असेच एका सुंदर स्थानी वसलेले श्री गणेशाचे स्वयंभू मंदिर. सिंधुसागराचा किनारा, चमकदार वाळूची पुळण आणि पाठीमागे गार्ड हिरव्या वनराईने झाकलेला डोंगर असे ह्या मंदिराचे नयनमनोहर ठिकाण आहे.  श्री गणपतीपुळे देवस्थान  ह्या स्वयंभू मूर्तीचा दृष्टांत पाचशे वर्षांपूर्वी भिडे गुरुजींना झाला. तिथे त्यांनी साधे गवताचे छप्पर उभारून पूजेला सुरुवात केली. त्यांची समाधी आपल्याला मंदिराच्या आवारातच बघायला मिळते.  समाधी  पुढे मग वेळोवेळी निरनिराळ्या भक्तांनी ह्या वास्तूची पुनर्बांधणी आणि दुरुस्ती केली. छत्रपती शिवाजी महाराजांचे सचिव अण्णाजी दत्त...

कोस्टल कर्नाटक ४ - शृंगेरी, मुकाम्बिका

कोस्टल कर्नाटक ४ - शृंगेरी, मुकाम्बिका  आज उडुपीहून लवकर निघून शृंगेरीला पोचण्याचा बेत आखला होता. त्याप्रमाणे आम्ही सकाळीच निघालो. रस्ता खूपच छान होता. आता खरं सांगायचे तर कोस्टल कर्नाटक प्रवासात रस्ता सुंदर होता म्हणणे ही द्विरुक्तीच आहे.  सगळ्या सडका अगदी एका पातळीतील आणि गुळगुळीत आहेत. खड्डे खळगे, रस्ते वर खाली असणे असे काही नसल्याने महाराष्ट्रातून गेलेल्या आम्हाला थोडे चुकल्यासारखे वाटले खरे!!! शिवाय रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे, स्वच्छता ह्यामुळे प्रवास फार आनंदाचा होतो. उडुपी शृंगेरी रस्ता तर आगुंबे जंगलातून जातो. त्यामुळे दाट झाडी होती. रस्त्यात सुप्रसिद्ध आगुंबे घाटही येतोच. सकाळची प्रसन्न वेळ आणि इतका छान रस्ता..दिवसाची चांगली सुरुवात होण्यासाठी आणखी काय पाहिजे?!!  आम्हाला वाटले होते इतक्या लवकर फारसे कोणी श्रुंगेरीत आलेले नसेल. पण शृंगेरीला पोचल्यावर लक्षात आले की आमच्यासारखाच विचार अनेकांनी केला होता!  अनेक बस रात्रभराचा प्रवास करून सकाळी शृंगेरीला पोचल्या होत्या. त्या लोकांच्या प्रातर्विधी आणि अंघोळीसाठी अनेक ठिकाणी माफक पैसे घेऊन उत्तम सोय केलेली होती....

कोस्टल कर्नाटक १ - मंगळुरू

  मंगळुरू- कुडला - मंगलोर - मंगलापूरम ही सगळी एकाच गावाची नावे. मंगलादेवी मंदिरावरून ह्या गावाचे नाव पडले मंगळुरू. दक्षिण कन्नड जिल्ह्याचे हे प्रमुख ठिकाण. सुंदर मंदिरे, स्वच्छ समुद्रकिनारे, नारळी-पोफळीची झाडे, आधुनिकतेच्या खुणा मिरवणारे मॉल्स आणि शहराबाहेरची पण तशी जवळच असणारी अनेक पर्यटन स्थळे.. ह्या साऱ्यामुळे मंगळुरु नेहमीच पर्यटकांचे आवडते राहिलेले आहे.  मंगळूरूला जाणारे आमचे विमान नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून होते. हा विमानतळ पाहण्याची उत्सुकता होतीच.  हा अतिशय भव्य आणि सुव्यवस्थित विमानतळ आहे. अनेक विमाने एकावेळी विमानतळावर आली तरी येणाऱ्या आणि जाणाऱ्या प्रवाशांच्यासाठी सर्व आवश्यक सुविधा केलेल्या आहेत.  जशी वर्दळ वाढेल तशी विमानतळावर जाण्यासाठी वाहतुकीची साधने देखील वाढतील अशी आशा आहे.  नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ  नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ  नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ  नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ  लहानशा प्रवासानंतर विमान मंगळुरुला उतरले. मंगळुरु विमानतळ म्हणजे टेबलटॉप रनवेज असणाऱ्या भारतातील मोजक्या विमानतळ...

रवींद्रनाथ टागोरांनाही भुरळ घालणारे 'कारवार'

कारवार - पांढऱ्या वाळूचे स्वच्छ समुद्रकिनारे, हिरव्या झाडांनी नटलेले डोंगर, काळी नदी, लाल माती असलेले सुंदर शहर. शहर होऊ पाहणाऱ्या किंवा खरे तर आता शहर झालेल्या कारवारने अजून आपले गावपण थोडे तरी टिकवून ठेवले आहे. शहरी बकालपणा मात्र टाळता आलेला नाही.   गोवा, कर्नाटक आणि महाराष्ट्र असा तिन्हींचा संगम आपल्याला कारवारमध्ये दिसतो. मराठी बोलणारी माणसेही भेटत राहतात.  गोव्यासारखे पर्यटकांचे लोंढे दिसत नाहीत. कदाचित आम्ही मार्चच्या अगदी सुरुवातीला गेलो तेव्हा अजून पर्यटकांचा ऐन हंगाम सुरु झाला नसावा!! उत्तर कन्नड जिल्ह्याची जीवनरेखा असणारी काळी नदी सदाशिवगड जवळ समुद्राला मिळते. तिथे एक मोठा पूल बांधलेला आहे. कारवार आणि गोव्याला जोडणारा हा पूल आता एक पर्यंटनस्थळच झाला आहे. सूर्योदय बघण्यासाठी पादचारी पुलावर जमलेले तुरळक पर्यटक, धावण्याचा सराव करणारे धावपटू, सायकलस्वार ह्यांच्या खेरीज सकाळच्या वेळी तिथे कोणीही नसते. आपल्या निसर्ग सौदर्यामुळे आणि शांततेमुळे हे ठिकाण अवश्य भेट देण्याजोगे आहे. आमचे हॉटेल ह्या पुलाच्या अगदी जवळ असल्याने आम्ही सूर्योदय अगदी मनसोक्त वेळ देऊन पाहू शकलो....