Skip to main content

परशुराम कुंड, अरुणाचल.

अरुणाचल मधील टेंगापानी, नामसाईच्या गोल्डन पॅगोडाहुन परशुराम कुंड ला जाण्यासाठी आम्ही निघालो. ही गोष्ट आहे ऑक्टोबर २०१९ मधील. 
त्या दिवशी सतत पाऊस पडत होता. सगळीकडे हिरवेगार तर अरुणाचल मध्ये नेहमीच असते. पावसात भिजलेली झाडे, स्वच्छ हिरवळ, मध्येच ढगांत अदृश्य होणाऱ्या पर्वतरांगा, वाहणारे थंडगार वारे, फार सुंदर होते ते सगळे. 
अरुणाचल 
डोंगरातला रस्ता होता. तुफान वारा होता. त्या सगळ्या अवाढव्य डोंगराळ प्रदेशात आमची गाडी म्हणजे एक ठिपका होती. वाऱ्याने उडून जायला वेळ लागणार नाही इतका जोरात वारा वाहत होता.
एक खिडकी फोटो काढण्यासाठी उघडली तर ड्राइवर म्हणाला की दुसऱ्या बाजूची पण उघडा, नाहीतर आत आलेल्या वाऱ्याने गाडी हलायला लागेल. शेजारी खोल दरी दिसत असताना गाडी हलायच्या कल्पनेने अंगावर काटा आला आणि पहिली खिडकी देखील फोटो काढल्या काढल्या बंद केली..नकोच ती वाऱ्याची परीक्षा! 
रस्ता कसा होता हे प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी पुढे दिलेल्या लिंकवर क्लिक करून विडिओ नक्की बघा.
ह्या नदीचे नाव लोहित आणि ह्या जिल्ह्याचेही नाव लोहित. लोहितचा अर्थ रक्त किंवा रक्तवर्णी. भारत आणि चीनमधून वाहणारी ही नदी आहे. आत्ता जरी पाऊस पडत असल्याने, वाहून आलेल्या मातीने तिचा रंग गढूळला असला तरी एरवी लालसर दिसत असेल कदाचित. अन्यथा असे नाव का दिले असेल नदीला?
पायऱ्यांवरून दिसणारे कुंड 
लोहित जिल्ह्यातील तेलुंग प्रदेशातील मिश्मी भागातील परशुराम कुंड हे भारतातील एक प्रसिद्ध स्थान. भारत आणि नेपाळ मधून दर मकर संक्रांतीला लाखो हिंदू ह्या स्थानी, यात्रेसाठी येतात.
परशुराम हे दशावतारापैकी सहावा अवतार मानले जातात. ह्या ठिकाणाशी अनेक आख्यायिका जोडल्या गेल्या आहेत. त्या सर्वातला समान धागा हा की परशुराम इथे आले होते. त्यांनी इथे तप केले.
इथले पाणी अतिशय पवित्र मानले जाते. इथे स्नान केल्यास गंगास्नानाचे पुण्य मिळते असे म्हटले जाते. त्यामुळे स्नान करण्यासाठी भाविकांची गर्दी असते. 
पायथ्यापर्यंत गाडी जाते. नंतर मात्र आधी भरपूर पायऱ्या चढायला व उतरायला लागतात. म्हणजे आपण एक लहान डोंगर चढतो व पलीकडच्या बाजूने उतरून नदीशी जातो. 
जवळपास तीनशे पायऱ्या असतील. त्यापैकी काही अवघड आहेत. वयस्कर किंवा इतर काही शारीरिक व्याधी असणाऱ्या लोकांना कदाचित ह्या पायऱ्या अवघड जातील. नुकतेच भारत सरकारने हे ठिकाण सुव्यवस्थित करण्यासाठी मदत जाहीर केली आहे. तेव्हा आता हे चढणे उतरणे सोयीचे होईल.
आम्ही गेलो तेव्हा पूर्ण वेळ बारीक बारीक पाऊस पडत होता. कामलांग अभयारण्याचा हा भाग असल्याने सर्वत्र घनदाट झाडी दिसते. अगदी घनदाट जंगलात परशुराम कुंड हे ठिकाण असल्याने पायऱ्यांच्या आजूबाजूला गर्द झाडी आहे. त्यामुळे पायऱ्या चढण्याचा थकवा अजिबात जाणवत नाही.
पायऱ्यांवरून दिसणारे दृश्य अनुभवण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करून विडिओ नक्की बघा.
पायथ्याशी एक परशुराम मंदिर आहे. पायऱ्या चढताना अधूनमधून काही मंदिरे लागतात. रेणुका मातेचे मंदिर देखील आहे. ह्या सर्व मंदिरांच्या आसपास गायी मुक्तपणाने फिरत असतात. शेणही जागोजाग दिसत होते. पाऊस आणि शेण, दोन्हींमुळे चालताना खूपच जपून चालावे लागत होते. 
श्री परशुराम मंदिर 
इथे पूर्वी जे कुंड होते, ते १९५० च्या भूकंपामध्ये नाहीसे झाले. त्यावरून आता पाण्याचा वेगवान प्रवाह वाहतो आहे. पण आता त्याच जागी, आश्चर्यकारक रित्या, खडकांनी वेढलेला असा एक वर्तुळाकार भाग आपोआप निर्माण झाला आहे. पौराणिक काळातील कुंड भूकंपाने नाहीसे केले तरी निसर्गाने पुन्हा तिथे दुसरे कुंड निर्माण केले! 
परशुराम कुंड 
परशुराम कुंड 
परशुराम कुंड 
परशुराम कुंड 
ह्या ठिकाणाला भेट देण्याचा आनंद विलक्षण आहे. निसर्गाचे शांत रम्य रूप इथे दिसते तसेच अत्यंत रौद्र रूप देखील दिसते. अनेक भाविक ह्या कुंडात स्नान करण्यासाठी, काही पूजाविधी करण्यासाठी दूरवरून येतात. श्रद्धापूर्वक यात्रा करतात.
हा सर्व भाग महाभारतातील भीष्मक राजाचा आहे असे कोणीतरी सांगितले. पण भीष्मक राजा म्हणजे रुक्मिणीचे वडील, हे तर विदर्भात राहायचे असे आपण मानतो. तेव्हा कदाचित कामलांग अभयारण्य हे ज्याचे राज्य होते तो भीष्मक राजा वेगळा असावा. 
कुंडाला जाणाऱ्या रस्त्याच्या पायथ्याशी, जिथे गाड्या पार्क केल्या जातात तिथे जवळच काही लहानलहान दुकाने आणि खानावळी आहेत. आम्हाला तिथे ताजे, गरम, चविष्ट शाकाहारी जेवण मिळू शकले. अर्थात आम्ही आधी फोन केला होता व कुंडाला जाताना पण सांगून गेलो होतो की आम्ही आल्यावर जेवायला येतो म्हणून.
पूर्ण वेळ पावसात भिजत, इतक्या पायऱ्या चढ उतर केल्यावर गरम भजी, सुग्रास अन्न खाताना विशेष आनंद झाला. 
पाउस महाराष्ट्रातील असो वा अरुणाचलमधील, पावसात भिजल्यानंतर भजी खाताना सारखाच आनंद मिळतो हे महत्वाचे निरीक्षण इथे नोंदवून ठेवत आहे!!
वारा तर इतका होता की आमच्या पानातले पापड धरून ठेवण्याची कसरत करायला लागत होती. नाहीतर ते उडून जात होते!!
पाउस आणि भजी 
स्थानिक शाकाहारी जेवण 
कोरा चहा 
जेवण झाल्यावर रेस्टोरंटच्या मालकिणीने आम्हाला तिथला खास काळा चहा दिला. टी सेट खूपच वेगळा दिसला म्हणून मी तिला विचारले की कुठून आणला? तर तिने सांगितले की ब्रम्हदेशाच्या बाजारातून! कसे काय विचारताच ती म्हणाली, हा जो मागे डोंगर दिसतो आहे ना? तो पार केला की ब्रम्हदेश आहे!
मला जे तिच्या बोलण्यातून समजले ते असे, काही जनजातीच्या लोकांना तिथे जायला किंवा तिकडून इथे यायला परवानगी आहे. अर्थात सीमेवर एक बॉर्डर पोस्ट आहे पण ते दूर आहे. अरुणाचल प्रदेश, नागालँड, मिझोराम आणि मेघालय ह्या चार राज्यात भारत ब्रम्हदेश सीमाभाग आहे. जवळपास १५०० किलोमीटरची ही सीमा आहे.
असे हे भारताच्या सीमेजवळ असणारे, भाविकांचे श्रद्धास्थान असणारे निसर्गरम्य परशुराम कुंड. नक्की भेट द्या. प्रवास अवघड आहे पण आनंददायी आहे.

Comments

  1. तुझी प्रवास वर्णन छान असतात.पर्शुराम कुंडाची माहिती माझ्यासाठी नविन आहे.सोप्या मराठी भाषेत लिहिलेले वाचताना खूप आनंद मिळतो.
    शुभेच्छा.

    ReplyDelete
  2. खूप छान माहिती, फोटो...! धन्यवाद..!

    ReplyDelete
  3. Photography and overall description very nice mam...loved it will certainly plan to visit ..

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

लक्ष्मीकेशव मंदिर, कोळीसरे

  मंदिर म्हणजे एक उर्जाकेंद्र! प्राचीन काळापासून भाविक मंदिरात देवतांच्या दर्शनासाठी जात आले आहेत. आजही हिंदू लोक मंदिरात जाऊन, चित्त एकाग्र करून ध्यान, पूजा आणि आरती करतात. यामुळे त्यांना ऊर्जा आणि शांततेचा अनुभव मिळतो. प्रत्येक देवी-देवतेचे एक विशिष्ट मंदिर असते.  असेच कोळीसरे येथे श्री विष्णूचे - लक्ष्मीकेशवाचे सुंदर मंदिर आहे . रत्नागिरी शहरापासून फक्त ५० किलोमीटर अंतरावर किंवा गणपती पुळ्यापासून २१ किलोमीटर अंतरावर निसर्गसुंदर कोळीसरे गाव आहे. पुणे मुंबई हून रत्नागिरी जिल्ह्यातील कोळीसरे येथे जायचे असल्यास चिपळूण मार्गे जाता येईल. परशुराम - कोळीसरे रस्त्यात अशी नयनरम्य दृश्ये अनेकदा दिसतात. परशुराम कोळिसरे रस्ता अगदी कमी लोकवस्तीचे, घनदाट झाडी असलेले हे गाव कोळीसरे फाट्याहून आत गेल्यावर दीड दोन किलोमीटर प्रवास केल्यावर येते. रत्नागिरीहून बसने जाता येते अन्यथा मंदिरापर्यंत पोचण्यासाठी स्वतःचे वाहन असणे सोयीचे आहे.  गाडी पार्क केल्यानंतर काही पायऱ्या उतरून मग घनदाट झाडीत वसलेल्या ह्या मंदिरात जाता येते. ह्या रस्त्यावरून व्हील चेयर जाउ शकत नाही. पार्किंग पासून उ...

नागाव

  नागाव म्हणजे माडापोफळींच्या वाड्या. नागाव म्हणजे केळीच्या बागा. नागाव म्हणजे सुंदर स्वच्छ समुद्रकिनारा.  नागाव म्हणजे वस्त्रगाळ मऊ वाळूचा किनारा.  नागाव म्हणजे अनेक मंदिरे. नागाव म्हणजे लक्षवेधी दीपमाळा. नागाव म्हणजे कोपऱ्या कोपऱ्यावर भेटणारे तळे! नागाव म्हणजे तळ्यात फुललेलीअनेकानेक कमळे!! नागावच्या शेजारचे  अक्षी, चौल, रेवदंडा ही देखील अशीच गावे. नितांतसुंदर, साधी. अलिबाग आणि ह्या सर्व गावांना मिळून अष्टागर असे म्हणत असत. आठ गावांचा समूह.  अलिबाग पर्यटन स्थळ म्हणून ७० च्या दशकापासूनच प्रसिद्ध झाले होते. तेव्हा शांत निवांत असलेले अलिबाग नंतर खूपच गजबजले आणि मग दुसऱ्या सहस्त्रकात अलिबागशेजारील रेवदंडा, नागाव, चौल ही लहान लहान गावे देखील पर्यटनस्थळे म्हणून विकसित होऊ लागली.  ह्या निवांत, शांत गावांना जणू अचानक खडबडून जाग आली. तिथेही पर्यटकांची गर्दी वाढू लागली. स्थानिक लोकांना रोजगार, विकासाची संधी, अर्थार्जनाची संधी त्यात दिसली.  गावांवर आधुनिक पेहराव चढला आणि तिथे उदयाला आली मुंबईकरांची आवडती पर्यटनस्थळे.  आता तर परिस्थिती अशी आहे की जवळ जवळ एका...

हनुमान जन्मस्थळ आणि शबरी धाम, जय श्रीराम, जय जय राम!

आज आपण रामायणातील दोन ठिकाणांना भेट देणार आहोत आणि दोन महान राम भक्तांच्या भेटीसाठी तुम्हाला घेऊन जाताना मला अतिशय आनंद झालेला आहे.  पहिल्यांदा आपण जाऊयात, हनुमानाच्या जन्मस्थानी अंजनेय टेकडीवर. ही टेकडी कर्नाटक मध्ये हंपीजवळच्या भागात आहे असे मानले जाते. ही जागा अंजनीच्या पुत्राचे, अंजनेयाचे म्हणजेच हनुमानाचे जन्मस्थळ आहे.  भारतात अजूनही इतर काही ठिकाणे आहेत की जी हनुमानाचे जन्मस्थळ म्हणून सांगितली जातात. पण अंजनेय टेकडी हे हनुमानाचे जन्मस्थळ असणे मला सर्वात जास्त संयुक्तिक वाटते. कारण ऋष्यमूक पर्वत, जिथे सुग्रीव, हनुमान आणि भगवान श्रीराम यांची भेट झाली होती तो इथून जवळच आहे. हंपीपासून अंजनेय टेकडीपर्यंतचा रस्ता नैसर्गिक सृष्टिसौंदर्याने अतिशय समृद्ध आहे. तुंगभद्रेच्या किनाऱ्यावर असल्यामुळे हा संपूर्ण प्रदेश अत्यंत सुपीक आहे रस्त्याच्या दोन्ही बाजूला सतत तुम्हाला भात शेती, नारळाची झाडे, केळीच्या बागा आणि अर्थातच प्रचंड मोठे खडक, जे ह्या भागाचे वैशिष्ट्य आहेत ते दिसत राहतात. हा संपूर्ण परिसर रामायणातला किष्किंधा भाग मानला जातो. भात शेती केळीच्या बागा भातशेतीचा मखमली गालिचा टे...

पैसाच्या खांबाचे मंदिर!

पैसाच्या खांबाचे मंदिर! अनेक वर्षांपूर्वी दुर्गा बाईंचे ' पैस ' हे पुस्तक वाचनात आले. त्यात होता हा पैसाचा खांब. पैस म्हणजे अवकाश. जिथे ज्ञानेश्वरी लिहिली गेली तो हा पैसाचा खांब. ज्ञानेश्वरीचे जन्मस्थान! खांबाला टेकून बसलेले, ज्ञानेश्वरी सांगत असलेले ज्ञानेश्वर आणि ती लिहून घेत असलेले लेखनिक सच्चिदानंद बाबा असे चित्र आधीही अनेकदा पाहिलेले होते. पण त्या खांबाला ' पैसाचा खांब' म्हणतात हे माहितीच नव्हते. पैस ह्या पुस्तकातील पैसाचा खांब हे प्रकरण वाचले आणि अक्षरशः थरारून गेले. 'पैसाच्या खांबाचे मंदिर' अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा या प्रवरा नदीच्या तीरावरील गावी आहे. नेवासे गावाच्या पश्चिमेला हे मंदिर आहे. 'शके बाराशे बारोत्तरे| तैं टीका केली ज्ञानेश्वरे| सच्चिदानंद बाबा आदरे| लेखकू जाहला|' असा उल्लेख सापडतो. मूर्त आणि अमूर्त ह्याची अशी जोडणी म्हणजे ज्ञानाच्या अनंत अवकाशात जाण्याची पहिली पायरीच जणू. ज्ञानेश्वरी वाचण्याएवढी आणि कळण्याएवढी योग्यता ह्या जन्मात अंगी येईल की नाही माहिती नाही. पण हा खांब पाहू या कधीतरी असे ठरवून टाकले. अवघड नव्हतेच जाणे. संभाजीनगर...

श्री व्याडेश्वर देवस्थान, गुहागर

  कोकणावर निसर्गाचा वरदहस्त आहेच. त्यातही काही गावांनी आपल्या सौंदर्याने विशेष स्थान मिळवले आहे. त्यातील एक महत्वाचे नाव म्हणजे गुहागर. सुंदर लहानसे गाव आहे. एक मुख्य रस्ता, त्याच्या दोन्ही बाजूला घरे, घरांच्या मागे नारळ सुपारीच्या वाड्या. रस्त्याच्या एका बाजूच्या प्रत्येक घराच्या मागच्या वाडीतून समुद्राला जाण्याचा रस्ता, भव्य स्वच्छ समुद्रकिनारा असे हे मोहात पाडणारे गुहागर गाव.  गुहागर प्रसिद्ध आहे व्याडेश्वरासाठी. व्याडेश्वर हे शंकराचे मंदिर अनेक कोकणवासीयांचे कुलदैवत आहे. कोकणातील सर्वात महत्त्वाच्या शिवमंदिरांपैकी एक म्हणजे गुहागरमधील श्री व्याडेश्वर देवस्थान.  श्री व्याडेश्वर देवस्थान.  श्री व्याडेश्वर देवस्थान.  तुम्हाला जर का कधी दक्षिणेतील मंदिरे पाहून वाटले असेल की अशी मंदिरे आपल्या महाराष्ट्रात का नाही?!! तर गुहागरच्या व्याडेश्वर मंदिराला भेट द्या. भव्य सुंदर देवालय आहे. मंदिराचे आवार स्वच्छ, प्रशस्त आहे. मुख्य म्हणजे अगदी नांदते, जागते मंदिर आहे. मंदिराची साफसफाई, निगराणी केली जाते आहे. आवारात भरपूर झाडे आहेत. श्री व्याडे...

श्री क्षेत्र गिरनार

  गिरनार माझ्यासाठी ते मोहक फळ होते, जे मिळायला अवघड होते आणि कितीही हवेहवेसे वाटले तरी त्यासाठी माझ्याकडून प्रयत्न मात्र अजिबात केले गेले नव्हते. गिरनारच्या अद्भुत कथा खूप ऐकल्या, वाचल्या होत्या. गिरनारची मनात ओढ होती. पण ते सगळे मनातच. प्रत्यक्षात कोणतेही ट्रीप ठरवताना, कुठे जायचे याचा विचार करताना पुढे होऊन गिरनारला जाऊयात असे कधी म्हटले नव्हते हेही तितकेच खरे.  श्री क्षेत्र गिरनार  काय आहे गिरनार?  गिरनार हा पर्वत समूह आहे. दत्तात्रेयांचा इथे निवास असल्याने ते हिंदूंच्यासाठी अत्यंत पवित्र आणि महत्वाचे धार्मिक स्थळ आहे.  हिमालयापेक्षाही जुना असलेला हा पर्वत अनेक नावांनी प्राचीन साहित्यात आलेला आहे. रेवतक हे त्यातील सर्वात जास्त माहिती असलेले नाव.  जैन लोकांसाठी देखील हे अत्यंत महत्वाचे ठिकाण आहे कारण इथे जैन मंदिर समूह देखील आहे. नेमिनाथ, आदिनाथ, मल्लिनाथ आणि इतर तीर्थंकरांची मंदिरे आहेत.  कुठे आहे गिरनार ? गुजराथ, सौराष्ट्र मधील जुनागढ जवळ गिरनारच्या पायथ्याचे, तलेटी नावाचे गाव आहे.  गिरनारला लोक का जातात? तेथील द...

हिंदवी स्वराज्याची राजधानी - किल्ले रायगड

रायगड! हे नाव घेताच मनात उठणारे भावतरंग अवर्णनीय असेच असतात. ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी म्हणजे 'शिव राज्याभिषेक दिन', 'हिंदू साम्राज्य दिन'. अभिमानाचा, गौरवाचा दिवस. भारतीय इतिहास हा संघर्षाचा व विजयाचा आहे. त्यातील झळाळून उठणारे तेजस्वी, सोनेरी पान म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे कर्तृत्व! शिवाजी महाराज आणि त्यांच्या मावळ्यांचे अविश्रांत परिश्रम पूर्णत्वाला पोचले ते ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी, १६७४ ह्या दिवशी. हा केवळ राज्याभिषेक नव्हता. हिंदवी स्वराज्याची स्थापना झाल्याची केवळ अधिकृत घोषणा नव्हती. तर संतांच्या उपदेशांनी जागलेली सज्जन शक्ती, मावळ्यांच्या रूपातील सामान्य जनतेच्या मनात जागलेली वीरवृत्ती ह्यांच्या संगमाने घडलेला तो एक अभूतपूर्व अविष्कार होता. राज्याभिषेक ही शिवाजी महाराजांची व्यक्तिगत महत्वाकांक्षा नव्हती. रोहिडेश्वर येथे लहानपणी घेतलेली प्रतिज्ञा अथक प्रयत्नांनी पूर्ण झाली होती. "हे हिंदवी स्वराज्य व्हावे हे तो श्रींची इच्छा" हे वचन सार्थ झाले होते. पण राज्याभिषेकाच्या निमित्ताने शिवाजीमहाराजांनी मोठ्या युक्तीने त्यांच्यावर असलेली लोकांची निष्ठा सिंहा...

सिद्धेश्वर मंदिर, टोके - प्रवरा संगमावर उमललेले दगडी बिल्वपत्र

भिंतीवरील कोरीवकाम  महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्ह्यातले टोके हे एक लहान गाव. अहिल्यानगर कडून छत्रपती संभाजीनगरला जाताना डावीकडे नदीच्या काठावर हे सुंदर मंदिर आपल्याला दिसते. जगप्रसिद्ध वेरूळ, अजिंठा लेणी बघायची असतील तर सांभाजीनगरला जावे लागते हे आपल्याला माहिती असेलच. सिद्धेश्वर मंदिर, टोके हे मला एखाद्या दगडी बेलपत्राप्रमाणे वाटले. हे बेलपत्र उमलले आहे अमृतवाहिनी प्रवरा आणि दक्षिणगंगा गोदावरीच्या संगमावर. त्या संगमाच्या, ज्याला प्रवरा संगम म्हणतात त्या परिसरात सिद्धेश्वर, घटेश्वर, मुक्तेश्वर, रामेश्वर, संगमेश्वर अशी अनेक मंदिरे आहेत. पण सर्वात खास आणि सुंदर आहे ते सिद्धेश्वर मंदिर. सिद्धेश्वर मंदिर परिसर बघा असा दिसतो! हा फोटो घेतला होता सप्टेंबर २०१९ मध्ये. पावसाळा भरपूर बरसून आता आपला मुक्काम आवरत होता आणि नद्यांना भरपूर पाणी होते तेव्हाचा! मंदिराचा परिसर  सिद्धेश्वर मंदिर समूह हा तुलनेने नवा समूह आहे, अठराव्या शतकात बांधला गेलेला. पेशव्यांच्या काळात बांधल्या गेलेल्या ह्या मंदिराला सभोवताली एखाद्या छोट्या किल्ल्यासारखी किंवा गढीसारखी उंच भिंत आहे. मुख्य मंदिर आहे शंकराचे...

शिवथरघळ

जर आपण भारताचा नकाशा पाहिला  तर आपल्याला नकाशात डावीकडे, गुजरात ते कन्याकुमारीपर्यंत काळसर  हिरवी रेषा दिसते. ही रेषा  गुजराथ येथून सुरु होते  आणि महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, तामिळनाडू मार्गे जाऊन केरळला पोहोचते. ती रेषा म्हणजेच पश्चिम घाट आहे. पश्चिम घाट म्हणजे दख्खनच्या पठाराची जणू किनारच आहे. दख्खन पठाराच्या काठावरच्या ह्या पर्वत रांगा आहेत.  या भागात बरीच जंगले, जलसाठे, धबधबे आहेत आणि जैवविविधता तसेच त्याचे वय यामुळे या भागाला 'युनेस्को जागतिक वारसा' म्हणून ओळखले गेले आहे. पश्चिम घाट हिमालयापेक्षाही जुना आहे! वरंधा घाट  📷विकिमीडिया कॉमन्स  पश्चिम घाट हा अनेक मुख्य नद्यांचे उगमस्थान आहे. वरील छायाचित्रात दिसते आहे त्या प्रमाणे, वर्षा ऋतूत या प्रदेशात अनेक धबधबे पाहायला मिळतात.  पश्चिम घाटातील (महाराष्ट्र) अनेक सुंदर धबधब्यांपैकी एक म्हणजे शिवथरघळ धबधबा. जेव्हा मुसळधार पाऊस पडतो तेव्हा धबधबा त्याच्या पूर्ण रौद्र सौंदर्यानिशी आणि ताकदीनिशी रोरावत खाली येताना दिसतो.  हा धबधबा सुमारे शंभर फूट उंचीवर...