महेश्वर हे मध्यप्रदेश पर्यटन निगमच्या पर्यटन स्थळांमधले एक महत्वाचे नाव आहे. पण करोडो भारतीयांसाठी ते केवळ एक पर्यटन स्थळ नाही तर एक तीर्थस्थान असते. लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या वास्तव्याने पुनीत झालेले स्थान आहे.
 |
महेश्वर किल्ला प्रवेशद्वार |
 |
राजवाडा प्रवेशद्वार |
 |
बाह्यरूप |
.jpg) |
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर |
 |
राजवाडा प्रवेशद्वार |
अहिल्याबाई होळकर हे केवळ भारताच्याच नव्हे तर विश्वाच्या इतिहासातील एक सोनेरी पान. संपूर्ण मानव विश्वातील यशस्वी स्त्री राज्यकर्त्यांची सूची करायची झाली तर अहिल्याबाई होळकरांचे नाव ठळकपणे लिहायला लागेल.
31 मे 2025 ला त्यांची तीनशेवी जयंती आहे. पण 300 वर्षांपूर्वी होऊन गेलेल्या अहिल्याबाईंचे आयुष्य अगदी आजच्या आधुनिक काळातल्या आव्हानातही मार्गदर्शक ठरावे असेच आहे. त्यांच्याविषयीचा आदर मनात घेऊनच आपण महेश्वरला जातो आणि त्या भावनेच्या प्रकाशात महेश्वर पाहतो.
महेश्वरला फार मोठी प्राचीन परंपरा आहे. स्कंद पुराणाच्या रेवा खंडात आणि वायू पुराणाच्या नर्मदा रहस्य मध्ये महिष्मती म्हणजे महेश्वरचे वर्णन आलेले आहे. 'गुप्तकाशी' या नावाने देखील ते प्रसिद्ध होते. मांधाता हा महेश्वरचा सार्वभौम राजा होता.
हैहयया वंशाने महिष्मतीवर २८ पिढ्या राज्य केले. या वंशातील प्रसिद्ध राजा म्हणजे कृतवीर्याचा वंशज अर्जुन. त्यालाच 'कार्तवीर्य, सहस्त्रार्जुन, सहस्त्रबाहू' या नावाने ओळखले जाते.
त्यानंतर सहाव्या शतकात महिष्मतीचे नाव 'चेदी देश' होते. आठव्या शतकात अवंती नगरीच्या दक्षिणेचा भाग 'दक्षिण पथ' म्हणून प्रसिद्ध होता. या शासकांची राजधानी महिष्मती होती.
मंडन मिश्रा आणि आद्य शंकराचार्य यांच्यातला शास्त्रार्थ प्रसिद्ध आहे. तो याच नगरीत झाला होता असे म्हणतात. याचा विशेष म्हणजे या शास्त्रार्थाची परीक्षक होती मंडन मिश्राची पत्नी भारती! त्या काळातील सुशिक्षित, निःपक्षपाती व ज्ञान समृद्ध स्त्रियांचे जणू प्रतीक.
चिनी प्रवासी ह्यू एन सांग ने आपल्या ग्रंथात महिष्मतीचे नाव 'महेश फलो पुलो' असे लिहिले आहे. हे वाचून 'दुधो नहाओ पुतो फलो' हा आशीर्वाद दिला जातो त्याचीच आठवण येते!
मध्य इतिहासाच्या काळात महेश्वर मोगलांकडे होते. त्यावेळी महेश्वरचा किल्ला मातीचा होता. पुढे महेश्वर मराठ्यांच्या अखत्यारीत आले.
१७३४ मध्ये थोरल्या बाजीराव पेशव्यांनी गौतमाबाईंना जी सनद दिली त्यात महेश्वरचा समावेश होता. त्यानंतर मल्हाररावांनी महेश्वरच्या किल्ल्याचे पुन्हा बांधकाम करून तो मजबूत बनवला.
१७६७ मध्ये अहिल्यादेवींनी महेश्वरला राजधानीचा दर्जा दिला. त्या तिथे राहायला आल्या आणि महेश्वरचे भाग्य उजळले. त्यांनी महेश्वरचा किल्ला काळ्या दगडाने बांधून आणखी मजबूत केला.
त्यांनी केलेल्या बांधकामाचे उल्लेख आहेत, त्यात लिहिले आहे की प्रथम सरकार वाडा बांधवला. नंतर नर्मदा घाट आणि श्री काशी विश्वेश्वराचे मोठे मंदिर बांधले. किल्ल्यावर राम मंदिर, कृष्ण मंदिर, रेवाकाठी विठोबाचे देऊळ बांधले. एकीकडे किल्ल्याखाली गाव वसवले.
सुभेदार मल्हार होळकरांनी सहस्र बाहू कार्तवीर्य अर्जुनाच्या पुरातन राजेराजेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार आधीच केला होता. तसेच केशव राजाचे मंदिर गौतमाबाईनी बांधवून घेतले होते.
राजवाड्याच्या भव्य आवारात अगदी साधी अशी अहिल्यादेवींची सदर आहे. घोंगडी आणि त्यावर टाकलेली पांढरी चादर. इतका दीर्घकाळ प्रभावी सुशासन करुनही त्यांचे वैयक्तिक जीवन अतिशय साधे आणि वैराग्यपूर्ण होते ह्याचा दाखलाच ती सदर देते. राजा जनकाप्रमाणेच विश्वस्त भावनेने राज्य करता येते ह्याची साक्ष ती सदर देते.
 |
अहिल्यादेवी प्रतिमा 📷नेहा खरे |
.jpg) |
सदर आणि वाड्याचे अंतरंग |
 |
वैशिष्ट्यपूर्ण बेल |
शिव आराधक अहिल्यादेवींच्या सदरेजवळ बेलाचे झाड असणे अगदीच स्वाभाविक वाटते. हा बेल फार वैशिष्ट्यपूर्ण आहे. त्याच्या पानाचा जवळून घेतलेला फोटो पाहून आपल्यालाही कल्पना येईल.
हे झाड अहिल्यादेवी असताना होते की नंतरचे आहे ह्याचा मात्र उलगडा झाला नाही. बेलाचे झाड काही शतके जगू शकते. पण महेश्वरला सांगितले जाते तसे हे झाड तीनशे वर्षे जुने असेल की नाही माहिती नाही.
नर्मदेचे दर्शन अहिल्यादेवींनी अतिशय प्रिय होते. महेश्वरचा किल्ला नर्मदेच्या तीरावरच बांधलेला आहे. राजवाड्यातून ठिकठिकाणी नर्मदा दर्शन होईल अशी व्यवस्था केलेली आहे.
 |
चौकातून होणारे नर्मदा दर्शन |
 |
नर्मदामैय्या |
 |
शिलालेख |
 |
प्रातिनिधिक खोली |
 |
माहिती |
तिथून आपण जातो ते अहिल्यादेवींचे देवघर पाहण्यासाठी. सुंदर, प्रसन्न, जिथे नित्यपूजा होते आहे असे देवघर बघताना अतिशय समाधान वाटते. अहिल्यादेवींच्या हातात बघतो ते तसेच त्यांच्या नित्यपूजेतील इतर शिवलिंगे बघता येतात. तिथे फोटो काढायला अनुमती नाही.
 |
वाड्याचा अंतर्भाग |
 |
वाड्याचा अंतर्भाग |
 |
वाड्याचा अंतर्भाग |
अहिल्यादेवींनी सुरु केलेली लिंगार्चन पूजा अजूनही सुरु आहे. आम्हाला पूजा तर पाहायला मिळाली नाही. पण त्या पूजेचा पाट मात्र पाहता आला.
 |
लिंगार्चनाचा पाट |
 |
लिंगार्चन माहिती |
राजवाड्याचा बराचसा भाग आता अहिल्या फोर्ट हॉटेलमध्ये रूपांतरित झाला आहे. त्यामुळे तो बघता येत नाही.
 |
अंतर्भाग |
 |
अंतर्भाग |
तिथून बाहेर पडल्यावर आपण जातो ते अनेक मंदिरे आणि नर्मदेचा घाट बघण्यासाठी. महेश्वर किल्ल्यात अनेक सुंदर आणि ऐतिहासिक मंदिरे आहेत.
 |
मंदिरांकडे जाताना |
 |
मंदिरांकडे जाताना |
अतिशय प्राचीन असे राजराजेश्वर मंदिर म्हणजे कार्तवीर्य सहस्रार्जुनाच्या काळापासून असलेले मंदिर. तेथील नंदादीप अखंड ठेवतो आहे. ११ दिव्यांच्या रूपात असलेला हा अखंडदीप अक्षय ठेवण्यासाठी तेथील पुजाऱ्यांच्या पिढ्यानपिढ्या जागरूकतेने काम करत आहेत.
ह्या मंदिराची विशेषता म्हणजे वैष्णव राजाचे हे शिवमंदिर आहे. भक्तिधारांचा एक अनोखा संगम इथे झालेला आपल्याला आढळतो.
 |
राजराजेश्वर मंदिर |
 |
राजराजेश्वर मंदिर |
त्याच आवारात सहस्रार्जुनाची मूर्ती असलेले देखील एक मंदिर आहे.
 |
सहस्त्रार्जुन मंदिर |
 |
सहस्त्रार्जुन मंदिर |
त्याच आवारात श्री रामदत्त मंदिर आहे. सूर्यनारायणाचे देखील मंदिर आहे.
 |
मंदिर परिसर |
पुण्यश्लोक अहिल्यादेवींचे आराध्य दैवत असलेल्या काशी विश्वनाथाचे मंदिर त्यांनी महेश्वरला आल्याआल्याच निर्माण करवले होते. अगदी नर्मदेच्या तीरावर असलेले हे साधे मंदिर खूप शांतता देऊन जाते.
 |
काशी विश्वनाथ मंदिर |
 |
काशी विश्वनाथ मंदिर |
.jpg) |
काशी विश्वनाथ मंदिर |
 |
मंदिरातून दिसणारे दृश्य |
काशी विश्वनाथाच्या मंदिरातून दिसणारे नर्मदेचे भव्य पात्र, डौलात फडकणारा भगवा आणि काठीवर निवांत बसून ह्या सगळ्याकडे पाहणारा पक्षी हे सगळे पाहताना मन भारावून गेले होते.
ह्या मंदिरात अहिल्यादेवी शेकडो वेळा आल्या असतील. सर्व प्रापंचिक दुःखाचे हलाहल प्राशन करण्याचे आणि तरी दीर्घकाळ धवल, उन्नत सुशासन करण्याचे सामर्थ्य त्यांना त्यांच्या ईश्वरावरील अढळ श्रद्धेतून मिळाले असावे.
अहिल्यादेवींच्या स्मरणार्थ नंतर बांधले गेलेले अहिल्येश्वराचे मंदिर आणि एकूणच परिसरात सुंदर दगडी बांधकाम आणि कोरीव काम आहे.
पण सर्वात महत्वाचे वाटते ते हे की कधीकाळी अहिल्यादेवी इथे बसल्या असतील. राजकारणाच्या कटकटीतून त्यांच्या मनाला दोन घटका विश्रांती मिळाली असेल. वैयक्तिक आयुष्यातील दुःखांनी पोळलेले मन शांतले असेल.
Comments
Post a Comment