Skip to main content

श्री क्षेत्र गिरनार

 गिरनार माझ्यासाठी ते मोहक फळ होते, जे मिळायला अवघड होते आणि कितीही हवेहवेसे वाटले तरी त्यासाठी माझ्याकडून प्रयत्न मात्र अजिबात केले गेले नव्हते. गिरनारच्या अद्भुत कथा खूप ऐकल्या, वाचल्या होत्या. गिरनारची मनात ओढ होती. पण ते सगळे मनातच. प्रत्यक्षात कोणतेही ट्रीप ठरवताना, कुठे जायचे याचा विचार करताना पुढे होऊन गिरनारला जाऊयात असे कधी म्हटले नव्हते हेही तितकेच खरे. 

श्री क्षेत्र गिरनार 
काय आहे गिरनार? 

गिरनार हा पर्वत समूह आहे. दत्तात्रेयांचा इथे निवास असल्याने ते हिंदूंच्यासाठी अत्यंत पवित्र आणि महत्वाचे धार्मिक स्थळ आहे. 

हिमालयापेक्षाही जुना असलेला हा पर्वत अनेक नावांनी प्राचीन साहित्यात आलेला आहे. रेवतक हे त्यातील सर्वात जास्त माहिती असलेले नाव. 

जैन लोकांसाठी देखील हे अत्यंत महत्वाचे ठिकाण आहे कारण इथे जैन मंदिर समूह देखील आहे. नेमिनाथ, आदिनाथ, मल्लिनाथ आणि इतर तीर्थंकरांची मंदिरे आहेत. 

कुठे आहे गिरनार ?

गुजराथ, सौराष्ट्र मधील जुनागढ जवळ गिरनारच्या पायथ्याचे, तलेटी नावाचे गाव आहे. 

गिरनारला लोक का जातात?

तेथील दत्त पादुकांचे दर्शन घेणे, तेथील वातावरणातील अध्यात्मिक सामर्थ्याचा अनुभव घेणे, अंबामातेचे दर्शन घेणे, कमंडलू तीर्थाचे दर्शन घेणे, गोरक्षनाथ मंदिराचे दर्शन घेणे, इतकी अवघड शिखरे चढताना स्वतःचे शारीरिक आणि मानसिक सामर्थ्य तपासून पाहणे .. ही आणि अशीच अनेक कारणे असतात. प्रत्येकाचे आपापले कारण वेगळे. पण सगळ्यांना गिरनारला जायचे असते हे खरे. 

गिरनारला मी का गेले?

नित्य पूजा अर्चा, जप, वाचन, साधना, तपस्या असे कोणते ही सामर्थ्य आणि पाठबळ माझ्याकडे नव्हते. मी तितकीशी भाविकही नव्हते. पण तरीही मनाला गिरनारची ओढ मात्र नक्की होती. कदाचित हिंदू असणाऱ्या, भारतीय असणाऱ्या प्रत्येकाच्याच मनात अशी ओढ असेल. 

अकल्पितरित्या या दिवाळीत तो योग जुळून आला. आता परत नव्या उत्साहाने, नव्या नजरेने गिरनारची वर्णने वाचायला घेतली आणि आधी वाटले होते त्याच्यापेक्षाही अवघड आहे चढून उतरणे हे लक्षात आले. पण एक चांगले होते की आम्ही अर्धे अंतर म्हणजे अंबाजी पर्यंत रोप वे ने जाणार होतो. 

थोडीशी मानसिक तयारी आणि थोडी शारीरिक तयारी सुरू केली. थोडे चालायला, पायऱ्या चढायला सुरुवात केली. तरी जाणवत होते की ही तयारी पुरेशी नाही. 

आणि एक दिवस अचानक जाणवले की आपण कुठले तरी युद्ध जिंकायचंय अशा अस्वस्थ मनाने का तयारी करतोय? गिरनारला जाणे ही तर प्रेमाने, विश्वासाने, श्रद्धेने अगदी सहज घडून यायला हवी अशी गोष्ट आहे ना? मग आपली मानसिकताही तशीच हवी. ह्या विचाराने मनाला खूप स्वस्थता लाभली. 

तयारी

  •  हलके आणि सुटसुटीत कपडे

  • खांद्यावर घेता येईल अशी हलकी सॅक, ज्याच्यात आवश्यक गोष्टी म्हणजे फोन, पाण्याची बाटली, रुमाल, टोपी, थोड्या गोळ्या, पैसे आणि कार्ड याची प्लास्टिकची पिशवी, पाऊस आला तर पॉन्चो, अत्यावश्यक औषधे 

  • चांगले बूट जे आपल्या सवयीचे आहेत. 

ग्रहण?

केबल कारचे सर्वात पहिले म्हणजे सकाळी सात वाजताचे ऑनलाईन बुकिंग झाले होते. 

आदल्या दिवशी दुपारी आम्ही जुनागढला हॉटेलमध्ये पोचलो. तिथे शेजारी असलेल्या एका ग्रुपशी सहज बोलत होते. त्यांनी सांगितले की दुसऱ्या दिवशी ग्रहण म्हणून बहुतेक मंदिर बंद आहे. सगळी मंदिरे ग्रहणाच्या दिवशी बंद असतात. 

हा तर आमच्यासाठी मोठाच धक्का होता. असे काही असते याची आम्हाला अजिबात कल्पना नव्हती आणि ज्या गिरनारसाठी एवढ्या लांबून आलो, इतका प्रवास केला त्याचे दर्शन होणार नाही??? मनात खूप चलबिचल झाली. पण मग हॉटेलच्या डेस्कवर चौकशी केली. त्या मॅनेजरने अजून दोन-तीन ठिकाणी चौकशी करून, खात्री करून घेऊन सांगितले की उद्या मंदिर बंद नाही आणि मग कुठे जीवाला शांतता वाटली!

केबल कार 

नुकतीच आम्ही बातमी वाचली होती की दिवाळीच्या वेळेला गर्दी होणार म्हणून आणि नंतर नेहमीसाठीच रोपवे मध्ये जास्तीच्या केबल कार्स लावण्यात आल्या होत्या. आम्ही खुश झालो. याचाच अर्थ तिथे लावायला लागणारी लाईन कमी झाली. कारण जरी तुम्ही ऑनलाईन तिकीट काढले असले तरी, तुम्हाला वेळेचा स्लॉट मिळालेला असला तरी, आत जाण्यासाठी लाईन लावायलाच लागते. 

आम्हाला असेही कळले होते की जरी आमचे तिकीट सात ते आठ ह्या स्लॉट चे असेल तरी सध्या दिवाळी असल्याने गर्दी होईल म्हणून थोडे लवकर सुरू करतील. त्यानुसार आम्ही तिथे सहा वाजता पोहोचलो. 

केबल कार स्टेशन प्रवेशद्वार 

केबल कार स्टेशन अतिशय अद्ययावत आणि सुनियोजित व्यवस्था असलेले असे आहे. तिथे रेस्ट रूम्स, प्यायचे पाणी सर्व सोय आहे. सर्व स्टाफ कर्तव्यदक्ष आणि वागणुकीला नम्र आहे. 

केबल कार स्टेशन - प्रतीक्षा गृह 
केबल कार स्टेशन प्रतीक्षा गृह 
खरोखरच साडेसहाला केबल कार निघाली आणि आम्ही अंबा माता की जय म्हणत अंबाजीच्या दर्शनाला सज्ज झालो!

केबल कार 
दिसणारी हिरवाई, डोंगर शिखरे आणि केबल कार चढत असलेला तीव्र चढ हे सर्व खूप वेगळा अनुभव देणारे असे होते. 

विहंगम दृश्य 
केबल कार मध्ये 
केबल कार मधून जैन मंदिर समूह तसेच पाण्याने भरलेले तलाव सुंदर दिसतात.

केबल कार मधून दिसणारे तलाव 
केबल कार मधून दिसणारे जैन मंदिर समूह 
केबल कार मधून दिसणारे जैन मंदिर समूह 
आपण केबल कार मधून उतरलो आणि काही पायऱ्या चढलो की लगेचच अंबाजी मंदिर येते. मंदिरात जाण्यासाठी देखील पुन्हा अगदी उभ्या चढाच्या पायऱ्या चढायला लागतात.

आत शिरताच मनाचे शांतवन व्हावे असा अंबामातेचा सुंदर मुखवटा आहे. गोलाकार, प्रसन्न आणि तेजस्वी तांदळा बघताना आपल्यालाही अत्यंत सकारात्मक अशी ऊर्जा मिळते. हजारो वर्ष जुने असे हे शक्तिपीठ आहे. ५१ शक्तिपीठांपैकी एक आहे.

हे मंदिर समुद्रसपाटीपासून साधारण तीन हजार तीनशे फूट उंचीवर आहे. पूर्वी जे भाविक संपूर्ण गिरनार पर्वत चढू शकत नसत ते निदान अंबाजीपर्यंत तरी चढायचा प्रयत्न करायचे. 

अंबाजी मंदिरापर्यंत केबल कार झाल्याने आता सर्वांची खूपच सोय झालेली आहे आणि अंबाजीचे दर्शन सर्वांसाठी सुलभ झाले आहे

अंबाजी मंदिरा शेजारीच एक छोटे दुकान आहे जिथे प्रसाद वगैरे मिळतो. तिथेच काठ्याही असतात. त्यातून निवडून एक पातळ, गुळगुळीत, हाताला तुसं लागणार नाहीत अशी आणि भक्कम काठी निवडून मी दुकानदाराला पन्नास रुपये दिले. आपण परत आलो की काठी परत करायची असते आणि मग तो वीस रुपये आपल्याला परत देतो. 

सगळ्यांनी काठी नक्की घ्यावी असेच मी सांगेन. चढताना आणि उतरताना दोन्ही वेळेला काठीचा फार उपयोग होतो. 

अंबाजी मंदिरा शेजारून दिसणारे गुरुशिखर 
शक्य तितका खोल आणि दीर्घ श्वास घेत मनात सतत ‘दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा’ असा मंत्र जपत मी पायऱ्या चढायला सुरुवात केली. पायऱ्या बऱ्यापैकी बांधलेल्या आहेत. अधून मधून काही ठिकाणी दोन्ही बाजूला कडे नाहीत. पण इतर ठिकाणी कठडा आणि काठी असा दोन्हीचा आधार घेत मस्त पायऱ्या चढता उतरता येतात. 

पायऱ्या 
अशी आहे वाट गुरुशिखराची 
गिरनार हा जाताना चढायचा आणि येताना उतरायचा असा प्रवास नाही. एक डोंगर चढून उतरायचा, दुसरा छोटा डोंगर चढून उतरायचा आणि तिसरा चढायचा असे केले की मग आपण गुरुशिखरावर पोहोचतो. परत येताना देखील तसाच उलट्या दिशेने प्रवास. जाताना देखील पायऱ्या चढायला आणि उतरायला लागतात आणि तसेच येताना देखील पायऱ्या उतरायला आणि चढायला लागतात. त्यामुळे दोन्ही वेळेला आपल्याला एनर्जी आणि उत्साह टिकवायला हवा हे मनात पक्के होते. 

अंबाजी मंदिरानंतर थोड्या पायऱ्या गेल्यावरच समोर पाहिले आणि समोरचे उंचच उंच शिखर आणि भोवतालच्या खोल खोल दऱ्या पाहून डोळे क्षणभर भिरभिरले, पाय लटपटले. मग ठरवले की आपल्या पुढच्या चार पायऱ्या इतकाच आपण आत्ता विचार करूया आणि तसेच केले. मग सगळेच सोपे होऊन गेले. 

सोपे होऊन गेले असे म्हटले तरी प्रत्यक्षात अधून मधून पाय लटपटले, धाप लागली, हृदयाचे ठोके अगदी कंठाशी पडतात असे वाटून गेले. त्या त्या प्रत्येक क्षणी थोडे चालून जाऊन पुढच्या कोपऱ्यावर टेकून क्षणभर उभे राहायचे, कुठेही बसायचे नाही असे मी केले. तशीही बसायला तिथे फारशी जागा नसतेच. कुठे कुठे एखाद दुसरे बाक आहेत पण ते तुम्हाला बसायला रिकामे क्वचितच दिसतील! पायऱ्यांवरच बसू शकता. पण मला वाटते की एकदा आपण बसलो की पुन्हा उठून उभे राहून चालायला सुरुवात करायला मनाची आणि शरीराची जास्त शक्ती लागते. म्हणून पूर्ण चढून उतरून येईपर्यंत कुठेच बसले नाही. 

गोरक्ष शिखर 

त्यानंतर येते ते गोरख शिखर. 

गोरक्ष आणि गुरु शिखर 

गोरक्ष शिखर 
ह्यातील निळ्या पेनने मार्क केलेले ते गोरक्ष शिखर. पिवळ्या पेन ने मार्क केलेले गुरुशिखर. 

समुद्रसपाटीपासून साधारण ३६६६फूट उंचीवर हे गोरक्षनाथ टूंक आहे. इथे गोरखनाथांच्या पादुका आहेत. शेजारीच एक धुनी आहे. त्याचे समोर एक बाबांचा आश्रम आहे. पुढे उजवीकडे एक अशी जागा आहे की जिथून सरपटत जायला लागते. पण मी इतर कुठेही न जाता पायरीवरूनच गोरखनाथांच्या पादुकांना नमस्कार केला. मनोमन त्यांच्या भक्तीला वंदन केले आणि बाकी आश्रम, पाणपोई, गुहा हे न बघता सरळ वरचा रस्ता धरला. 

कुठेही फोटो काढायची अनुमती नाही. त्यामुळे माझ्याकडे ते फोटो नाहीत. 

कमंडलू तीर्थ 

 मध्ये वाटेत दोन कमानी लागतात. त्यातली डावीकडची कमान गुरुशिखरा कडे जाते तर उजवीकडची कमंडलू तीर्थाकडे जाते. 

दोन वेगळे मार्ग 
तिथे एक सतत प्रज्वलित असणारी धुनी आहे जिथे दर्शन घ्यायचे तर सोमवारी पहाटे जायला लागते. तसेच त्या तीर्थाचे पाणी पिता येते आणि तिथे सतत अन्नछत्र देखील चालू असते. त्यामुळे गिरनार चढणारे लोक प्रसाद घेण्यासाठी तिथे अवश्य जातात. 

त्या उंचावर अन्नधान्य वाहून नेणे, थंडी- वारा- पावसाची तमा न करता तिथे स्वयंपाक करणे, नैवेद्य दाखवणे हे सर्व करणाऱ्या सेवेकऱ्यांना शतशः नमन. 

या सगळ्याचा खर्च खूप आहे. रोज अन्नधान्य वर पोहोचवण्यासाठी लागणारी मजुरीच काही हजारांच्या घरात आहे असे कळले. अर्थात तिथे जाणारे लोक यथाशक्ती, यथामती शिधा किंवा दक्षिणा देऊनच मग प्रसाद ग्रहण करतात. 

कमंडलू तीर्थावर जाण्यासाठी काही पायऱ्या उतरायला लागतात आणि अर्थातच परत येण्यासाठी काही पायऱ्या चढायला लागतात. हा साधारण दोन्ही मिळून हजार दीड हजार पायऱ्यांचा ऐवज आहे. त्यामुळे मी ठरवले की जाताना तर आपण इथे जायचे नाही. येताना बघुयात. वाटले तर जाऊयात. 

सरळ गुरुशिखराकडे चालायला सुरुवात केली. आपल्या आजूबाजूला अनेक जण चढत असतात, उतरत असतात. शिवाय आपल्या मनात चालू असलेल्या नामस्मरणाची सोबत असते. अगदी सेकंदभरही आपण एकटे आहोत याची काळजी व भीती वाटत नाही हे इथले वैशिष्ट्य वाटले. 

वाटेत अनेक डोली वाले आपल्याला विचारतात, डोली घ्या सांगतात. हे चढणे इतके अवघड आहे, तुम्हाला त्रास होईल असेही सांगतात. त्यांच्या मनातली आपल्याविषयीची काळजी आपण समजून घ्यायची आणि त्यांना नमस्कार करायचा!

माझ्या पांढऱ्या केसांनी तर अनेकांना प्रेरणा दिली! अनेकजण ‘वो देखो! वो दादीमा भी चढ रही है! तो हम तो चढ ही सकते है!” असे आपापसात म्हणताना ऐकू येत होते. 

एक हिंदी भाषिक ताई वरपर्यंत जाऊन नमस्कार करून, घामाघूम होऊन खाली आल्या होत्या. त्या मला कळवळून सांगत होत्या,”कावड (डोली) ले लो, बहुत तकलीफ होगी आपको” किती छान होते हे! अजिबात ओळख नसलेल्या कोणी आपली काळजी करणे! माझ्या आजूबाजूला सांगलीचा एक मराठी भाषिक ग्रुप चढत होता. त्यांच्या गप्पा ही ऐकू येत होत्या. एखाद दुसऱ्या वाक्याची देवाण-घेवाण होत होती. 

पर्वत शिखरांचा चढ अगदी कमी अंतरात आपण चढतो. त्यामुळे पायऱ्या उभ्या आणि उंच आहेत. केबल कार मध्ये चढायच्या आधी जेव्हा सिक्युरिटी चेक होतो, तेव्हाच त्यांनी पाण्याची बाटली काढून घेतली होती. पण मध्ये जी छोटी दुकाने लागतात, त्यातून मी पाण्याची बाटली घेतली होती. त्याचा अगदी लहानसा घोट अधून मधून घेतला. 

गुरुशिखराच्या जवळ चपला बूट काढायला जागा नाही त्यामुळे त्याच्या आधी एक साधारण पन्नास पायऱ्या जिथे थोडी तरी जागा आहे तिथे बूट काढले. 

श्री गुरुशिखर 
जेव्हा आपण वर चढून जातो तेव्हा तिथे दत्तगुरूंची पदचिन्हे - पादुका आहेतच. त्यामागे दत्तात्रयांची एक अतिशय विलोभनीय मूर्ती आहे. त्या मूर्तीच्या चेहऱ्यावरचे प्रसन्न हास्य आणि पादुकांचे दर्शन, चढण्याचा सगळा शीण नाहीसा करते. 

हजारो वर्ष जुने असे हे तीर्थस्थान. इथे प्रत्यक्ष स्वतः दत्तात्रेयांनी तपश्चर्या केली असे सांगतात. ज्या ठिकाणी श्रीराम जाऊन आले आहेत, पांडव जाऊन आले आहेत असे हे स्थान. ज्या ठिकाणी अनेक सिद्ध पुरुष तपस्या करतात असे हे स्थान. 

वर अगदी आठ दहा लोकांपुरतीच जागा आहे. तेव्हा तिथे फार वेळ न थांबता खाली आले. थोड्या पायऱ्या उतरून मग उभे राहायला जागा मिळाली तिथे टेकून आपण काय पाहिले त्याचे स्मरण केले. 

तिथे क्षणभर टेकले. आजूबाजूच्या पर्वतरांगा आणि सर्व दृश्य डोळे भरून पाहून घेतले. 

परतीचा प्रवास सुरू झाला. जसा चढण्याचा प्रवास आहे तसाच उतरण्याचा देखील आहे. असे हे अद्भुत ठिकाण! नुसता चढ किंवा नुसता उतार कुठेच नाही. दोन्हीत म्हणजे चढामध्ये आणि उतारात, खरे तर आयुष्यातच समतोल साधला जावा याचीच जणू ही शिकवण. 

परतीच्या प्रवासासाठी केबल कार स्टेशन जवळ. 
काय मिळाले? 
न सांगता, न मोजता येणारे असे तर उदंड मिळाले. सांगता येण्याजोगे सांगायचे तर काही काळासाठी का होईना पण मनाची स्थिरता मिळाली. निश्चयाचे बळ मिळाले. आत्मविश्वास वाढला. शारीरिक क्षमता वाढवल्या पाहिजेत याची चरचरीत जाणीव झाली. एक हिंदू म्हणून, एक भारतीय म्हणून मी जायलाच पाहिजे अशा एका ठिकाणी मला जाता आले याचा आनंद मिळाला. 

#girnar #jaintemple #junagadh #girnari #india #gujarat #giriraj #temple #junagadhtourism #jaigirnari #Datta mandir 



Comments

Post a Comment

Popular posts from this blog

लक्ष्मीकेशव मंदिर, कोळीसरे

  मंदिर म्हणजे एक उर्जाकेंद्र! प्राचीन काळापासून भाविक मंदिरात देवतांच्या दर्शनासाठी जात आले आहेत. आजही हिंदू लोक मंदिरात जाऊन, चित्त एकाग्र करून ध्यान, पूजा आणि आरती करतात. यामुळे त्यांना ऊर्जा आणि शांततेचा अनुभव मिळतो. प्रत्येक देवी-देवतेचे एक विशिष्ट मंदिर असते.  असेच कोळीसरे येथे श्री विष्णूचे - लक्ष्मीकेशवाचे सुंदर मंदिर आहे . रत्नागिरी शहरापासून फक्त ५० किलोमीटर अंतरावर किंवा गणपती पुळ्यापासून २१ किलोमीटर अंतरावर निसर्गसुंदर कोळीसरे गाव आहे. पुणे मुंबई हून रत्नागिरी जिल्ह्यातील कोळीसरे येथे जायचे असल्यास चिपळूण मार्गे जाता येईल. परशुराम - कोळीसरे रस्त्यात अशी नयनरम्य दृश्ये अनेकदा दिसतात. परशुराम कोळिसरे रस्ता अगदी कमी लोकवस्तीचे, घनदाट झाडी असलेले हे गाव कोळीसरे फाट्याहून आत गेल्यावर दीड दोन किलोमीटर प्रवास केल्यावर येते. रत्नागिरीहून बसने जाता येते अन्यथा मंदिरापर्यंत पोचण्यासाठी स्वतःचे वाहन असणे सोयीचे आहे.  गाडी पार्क केल्यानंतर काही पायऱ्या उतरून मग घनदाट झाडीत वसलेल्या ह्या मंदिरात जाता येते. ह्या रस्त्यावरून व्हील चेयर जाउ शकत नाही. पार्किंग पासून उ...

नागाव

  नागाव म्हणजे माडापोफळींच्या वाड्या. नागाव म्हणजे केळीच्या बागा. नागाव म्हणजे सुंदर स्वच्छ समुद्रकिनारा.  नागाव म्हणजे वस्त्रगाळ मऊ वाळूचा किनारा.  नागाव म्हणजे अनेक मंदिरे. नागाव म्हणजे लक्षवेधी दीपमाळा. नागाव म्हणजे कोपऱ्या कोपऱ्यावर भेटणारे तळे! नागाव म्हणजे तळ्यात फुललेलीअनेकानेक कमळे!! नागावच्या शेजारचे  अक्षी, चौल, रेवदंडा ही देखील अशीच गावे. नितांतसुंदर, साधी. अलिबाग आणि ह्या सर्व गावांना मिळून अष्टागर असे म्हणत असत. आठ गावांचा समूह.  अलिबाग पर्यटन स्थळ म्हणून ७० च्या दशकापासूनच प्रसिद्ध झाले होते. तेव्हा शांत निवांत असलेले अलिबाग नंतर खूपच गजबजले आणि मग दुसऱ्या सहस्त्रकात अलिबागशेजारील रेवदंडा, नागाव, चौल ही लहान लहान गावे देखील पर्यटनस्थळे म्हणून विकसित होऊ लागली.  ह्या निवांत, शांत गावांना जणू अचानक खडबडून जाग आली. तिथेही पर्यटकांची गर्दी वाढू लागली. स्थानिक लोकांना रोजगार, विकासाची संधी, अर्थार्जनाची संधी त्यात दिसली.  गावांवर आधुनिक पेहराव चढला आणि तिथे उदयाला आली मुंबईकरांची आवडती पर्यटनस्थळे.  आता तर परिस्थिती अशी आहे की जवळ जवळ एका...

हनुमान जन्मस्थळ आणि शबरी धाम, जय श्रीराम, जय जय राम!

आज आपण रामायणातील दोन ठिकाणांना भेट देणार आहोत आणि दोन महान राम भक्तांच्या भेटीसाठी तुम्हाला घेऊन जाताना मला अतिशय आनंद झालेला आहे.  पहिल्यांदा आपण जाऊयात, हनुमानाच्या जन्मस्थानी अंजनेय टेकडीवर. ही टेकडी कर्नाटक मध्ये हंपीजवळच्या भागात आहे असे मानले जाते. ही जागा अंजनीच्या पुत्राचे, अंजनेयाचे म्हणजेच हनुमानाचे जन्मस्थळ आहे.  भारतात अजूनही इतर काही ठिकाणे आहेत की जी हनुमानाचे जन्मस्थळ म्हणून सांगितली जातात. पण अंजनेय टेकडी हे हनुमानाचे जन्मस्थळ असणे मला सर्वात जास्त संयुक्तिक वाटते. कारण ऋष्यमूक पर्वत, जिथे सुग्रीव, हनुमान आणि भगवान श्रीराम यांची भेट झाली होती तो इथून जवळच आहे. हंपीपासून अंजनेय टेकडीपर्यंतचा रस्ता नैसर्गिक सृष्टिसौंदर्याने अतिशय समृद्ध आहे. तुंगभद्रेच्या किनाऱ्यावर असल्यामुळे हा संपूर्ण प्रदेश अत्यंत सुपीक आहे रस्त्याच्या दोन्ही बाजूला सतत तुम्हाला भात शेती, नारळाची झाडे, केळीच्या बागा आणि अर्थातच प्रचंड मोठे खडक, जे ह्या भागाचे वैशिष्ट्य आहेत ते दिसत राहतात. हा संपूर्ण परिसर रामायणातला किष्किंधा भाग मानला जातो. भात शेती केळीच्या बागा भातशेतीचा मखमली गालिचा टे...

पैसाच्या खांबाचे मंदिर!

पैसाच्या खांबाचे मंदिर! अनेक वर्षांपूर्वी दुर्गा बाईंचे ' पैस ' हे पुस्तक वाचनात आले. त्यात होता हा पैसाचा खांब. पैस म्हणजे अवकाश. जिथे ज्ञानेश्वरी लिहिली गेली तो हा पैसाचा खांब. ज्ञानेश्वरीचे जन्मस्थान! खांबाला टेकून बसलेले, ज्ञानेश्वरी सांगत असलेले ज्ञानेश्वर आणि ती लिहून घेत असलेले लेखनिक सच्चिदानंद बाबा असे चित्र आधीही अनेकदा पाहिलेले होते. पण त्या खांबाला ' पैसाचा खांब' म्हणतात हे माहितीच नव्हते. पैस ह्या पुस्तकातील पैसाचा खांब हे प्रकरण वाचले आणि अक्षरशः थरारून गेले. 'पैसाच्या खांबाचे मंदिर' अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा या प्रवरा नदीच्या तीरावरील गावी आहे. नेवासे गावाच्या पश्चिमेला हे मंदिर आहे. 'शके बाराशे बारोत्तरे| तैं टीका केली ज्ञानेश्वरे| सच्चिदानंद बाबा आदरे| लेखकू जाहला|' असा उल्लेख सापडतो. मूर्त आणि अमूर्त ह्याची अशी जोडणी म्हणजे ज्ञानाच्या अनंत अवकाशात जाण्याची पहिली पायरीच जणू. ज्ञानेश्वरी वाचण्याएवढी आणि कळण्याएवढी योग्यता ह्या जन्मात अंगी येईल की नाही माहिती नाही. पण हा खांब पाहू या कधीतरी असे ठरवून टाकले. अवघड नव्हतेच जाणे. संभाजीनगर...

श्री व्याडेश्वर देवस्थान, गुहागर

  कोकणावर निसर्गाचा वरदहस्त आहेच. त्यातही काही गावांनी आपल्या सौंदर्याने विशेष स्थान मिळवले आहे. त्यातील एक महत्वाचे नाव म्हणजे गुहागर. सुंदर लहानसे गाव आहे. एक मुख्य रस्ता, त्याच्या दोन्ही बाजूला घरे, घरांच्या मागे नारळ सुपारीच्या वाड्या. रस्त्याच्या एका बाजूच्या प्रत्येक घराच्या मागच्या वाडीतून समुद्राला जाण्याचा रस्ता, भव्य स्वच्छ समुद्रकिनारा असे हे मोहात पाडणारे गुहागर गाव.  गुहागर प्रसिद्ध आहे व्याडेश्वरासाठी. व्याडेश्वर हे शंकराचे मंदिर अनेक कोकणवासीयांचे कुलदैवत आहे. कोकणातील सर्वात महत्त्वाच्या शिवमंदिरांपैकी एक म्हणजे गुहागरमधील श्री व्याडेश्वर देवस्थान.  श्री व्याडेश्वर देवस्थान.  श्री व्याडेश्वर देवस्थान.  तुम्हाला जर का कधी दक्षिणेतील मंदिरे पाहून वाटले असेल की अशी मंदिरे आपल्या महाराष्ट्रात का नाही?!! तर गुहागरच्या व्याडेश्वर मंदिराला भेट द्या. भव्य सुंदर देवालय आहे. मंदिराचे आवार स्वच्छ, प्रशस्त आहे. मुख्य म्हणजे अगदी नांदते, जागते मंदिर आहे. मंदिराची साफसफाई, निगराणी केली जाते आहे. आवारात भरपूर झाडे आहेत. श्री व्याडे...

देवरियाताल चंद्रशिला ट्रेक - भाग 4 - स्यालमी - बनियाकुंड

आदल्या संध्याकाळी भुरभुरत असलेल्या पावसाने हवेतला गारवा अजूनच वाढवला होता. इतक्या लहान तंबूमध्ये झोपण्याची पहिलीच वेळ होती. पण सुरुवातीचे दोन तास सोडले तर नंतरचे पाच तास चांगली झोप झाली. अगदी प्रसन्न जाग आली.काल एकदाच क्षणभर का होईना, मनात तरळून गेलेला,"आपण ट्रेक इथेच थांबवावा का?"ह्या विचाराचा आज कुठे मागमूसही उरला नव्हता. मनात होते,  "इरादे अगर पक्के हो, तो डगमगाए कदम क्यु? हौसले बुलंद हो तो सहमा सा हो मन क्यु? मंज़िल अब दूर नहीं.. बस संभल के चलना, कभी न रुकना, हार ना मानना, बस्स .. चलते रहना।" - वृंदा टिळक आमच्या सगळ्याच कॅम्पसाईट्स भन्नाट जागांवर होत्या. आजची स्यालमीची कॅम्प साईट देखील त्याला अपवाद नव्हती. नजर पोचेल तिथपर्यंत फक्त पर्वत रांगा आणि जंगल. मानवी वस्तीची जवळपास काहीच चाहूल नाही.  📷Samrat Darda  सगळ्यांचे आवरून वॉर्म अप करून आम्ही निघालो. आजचा सगळा रस्ता सुंदर असणार होता. काल इतके चढ उतार चढून उतरून आता सगळ्यांची चांगली तयारी झाली होती. शिवाय आज मी नीकॅप्स देखील घातल्या होत्या!! त्यामुळे समजा जरी आज रस्ता अवघड असला असता तरी काळजीचे काही कारण नव्हते....

देवरियाताल चंद्रशिला ट्रेक - भाग 3 - देवरियाताल -स्यालमी

ट्रेकचा तिसरा दिवस. कालचा सारी- देवरियाताल प्रवास तर खूपच छान झाला होता. पायही दुखले नव्हते की थकल्यासारखे देखील वाटले नव्हते. त्यामुळे उत्साहाने आजच्या दिवसाला सुरुवात केली. आजचा दिवस तसा अवघड असेल अशी, इंडियाहाईक्सच्या  वेब साईटवरचे वर्णन वाचून कल्पना आली होती. आज अंतर नऊ किलोमीटरपेक्षा जास्त होते. पण वाटेत अनेक शिखरे दिसणार होती. घनदाट जंगलातून जाणार होतो त्यामुळे अनेक पक्षीही दिसणार होते. त्याचीही उत्सुकता होती. सगळेजण देवरियाताल कॅम्पसाईट मधून बाहेर पडलो. अवघे एक दिवस वास्तव्य केलेले असले तरी मन थोडेतरी गुंतलेले असतेच.  देवरियातालच्या रस्त्याच्या डाव्या बाजूने एक जंगलवाटेचा फाटा होता. त्या वाटेने आम्ही निघालो. थोडा वेळ चालल्यावर आम्हाला पुन्हा एकदा चंद्रशिला शिखर दिसणार होते. अधून मधून दिसणारे हे शिखर आपल्याला कुठे पोचायचे आहे त्याची जाणीव करून द्यायचे, त्यानेही एक नवे बळ मिळायचे. पण आज आकाश इतके ढगाळ होते की शिखर दिसलेच नाही.उजवीकडे पुन्हा एकदा सारी गाव मात्र दिसले. 📷Cotrekker 📷Sumati Dhembre ह्या फोटोवरून कशा रस्त्याने आम्ही चालत होतो, चढ किती होता त्याची कल्पना येईल....

देवरियाताल चंद्रशिला ट्रेक - भाग 5- अंतिम भाग - बनियाकुंड- तुंगनाथ- चंद्रशिला

  📷Samrat Darda १५ एप्रिल, बनियाकुंड कॅम्पसाईट मधून काढलेला चंद्राचा सुंदर फोटो. त्या दिवशी शुक्ल पक्षातील सप्तमी किंवा अष्टमी असावी. कारण १७ एप्रिलला रामनवमी होती. सुंदर काळ्याभोर रात्रीचा सघन अंधार.. पौर्णिमा अजून साताठ दिवसांवर असली तरीही आत्तापासूनच तेजाळलेला चंद्र.. चमचमणारे, मध्येच ढगांच्या आड लपणारे चांदणे, आमच्या मनातील समिटविषयीची उत्सुकता..फार अनोखी रात्र होती ती.  उद्या पहाटे दोन वाजताचा वेकप कॉल असणार होता. आम्हाला आवरून, ब्रेकफास्ट करून तीन वाजता निघायचे होते. न विसरता घेण्याच्या गोष्टी तशा तर डे पॅक मध्ये भरूनच ठेवल्या होत्या. हेडलॅम्पच्या उजेडात सामान देखील आवरून ठेवले होते. पहाटे निघताना बाकी सामान मेन टेन्ट मध्ये नेऊन ठेवायचे होते.  इतक्या उंचीवर जायचे होते. काही तासांत आम्ही ४००० फुटांचा अल्टीट्युड गेन करणार होतो. झोपण्यासाठी डोळे मिटले खरे, पण मिटल्या डोळ्यांपुढेही बर्फाच्छादित शिखरांचीच दृश्ये तरळत होती. कधीतरी झोप लागली. सतत अधूनमधून जाग येऊन घड्याळात बघत होते. सगळे दोन वाजता उठणार, त्या आधी आपण आपले आवरून घेऊ या असा विचार डोक्यात होता तो बहुधा सतत ज...

हिंदवी स्वराज्याची राजधानी - किल्ले रायगड

रायगड! हे नाव घेताच मनात उठणारे भावतरंग अवर्णनीय असेच असतात. ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी म्हणजे 'शिव राज्याभिषेक दिन', 'हिंदू साम्राज्य दिन'. अभिमानाचा, गौरवाचा दिवस. भारतीय इतिहास हा संघर्षाचा व विजयाचा आहे. त्यातील झळाळून उठणारे तेजस्वी, सोनेरी पान म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे कर्तृत्व! शिवाजी महाराज आणि त्यांच्या मावळ्यांचे अविश्रांत परिश्रम पूर्णत्वाला पोचले ते ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी, १६७४ ह्या दिवशी. हा केवळ राज्याभिषेक नव्हता. हिंदवी स्वराज्याची स्थापना झाल्याची केवळ अधिकृत घोषणा नव्हती. तर संतांच्या उपदेशांनी जागलेली सज्जन शक्ती, मावळ्यांच्या रूपातील सामान्य जनतेच्या मनात जागलेली वीरवृत्ती ह्यांच्या संगमाने घडलेला तो एक अभूतपूर्व अविष्कार होता. राज्याभिषेक ही शिवाजी महाराजांची व्यक्तिगत महत्वाकांक्षा नव्हती. रोहिडेश्वर येथे लहानपणी घेतलेली प्रतिज्ञा अथक प्रयत्नांनी पूर्ण झाली होती. "हे हिंदवी स्वराज्य व्हावे हे तो श्रींची इच्छा" हे वचन सार्थ झाले होते. पण राज्याभिषेकाच्या निमित्ताने शिवाजीमहाराजांनी मोठ्या युक्तीने त्यांच्यावर असलेली लोकांची निष्ठा सिंहा...