Skip to main content

ता प्रोह्म आणि प्रेह खान - अजब न्याय नियतीचा

 जयवर्मन सप्तम

अंगकोरवाट मंदिर समूहांविषयी विचार करताना जयवर्मन सप्तमला विशेष महत्व आहे. त्याला ओलांडून पुढे जाणे अशक्य. अनेक महत्वाची मंदिरे त्याने बांधली. केवळ इतकेच नाही तर चांगल्या रस्त्यांचे जाळे निर्माण केले.अनेक मोठी रुग्णालये आणि धर्मशाळा बांधल्या. दर १५ किलोमीटरवर एक रुग्णालय/ धर्मशाळा ही अत्यंत उपयुक्त संकल्पना त्याने बाराव्या शतकात प्रत्यक्षात आणली. 

आज आपण पाहणार आहोत त्यानेच बांधलेली दोन मंदिरे..ठिकाणे वेगवेगळी. पण उद्देश एकच. तो हा की पालकांना मानवंदना देणे. त्याने आईच्या गौरवार्थ बांधलेले मंदिर आहे ता प्रोह्म आणि वडिलांच्या स्मरणार्थ बांधलेले मंदिर आहे प्रेह खान.

ता प्रोह्म

ता प्रोह्म मधील प्रोह्म म्हणजे ब्रम्हा. ब्रम्हदेव, सृष्टीचा निर्माता. बाराव्या शतकात बांधल्या गेलेल्या ह्या मंदिरात हिंदू आणि बौद्ध संकल्पनांचा संगम आढळतो. मंदिराचे मूळ नाव होते राजविहार. बौद्ध भिक्षूंना राहण्यासाठी विहार, अभ्यासासाठी विद्यालय, वाचनालय इत्यादी असलेले असे हे मंदिर. राजाने स्वतःच्या आईच्या - राणी श्री जयराजचूडामणीच्या गौरवार्थ बांधलेले हे मंदिर. मंदिरात मुख्य मूर्ती होती बुद्धाची, ती प्रज्ञापरमिता नावाची. 

ह्या मंदिराच्या अपार वैभवाचे वर्णन साहित्यात आणि शिलालेखांतून केलेले आढळते. तिथे राहणारे २०००० लोक आणि आजूबाजूच्या गावात राहणारे, ह्या मंदिराच्या व्यवस्थेत असणारे जवळपास ८०००० लोक होते. मंदिराच्या संपत्तीत ५०० किलो तर नुसते सोने होते. त्याखेरीज हिरे, मोती, अन्य मौल्यवान रत्ने, रेशीम हे वेगळेच. 

कंबोडियातील सियामरीप जवळील अंगकोरवाट मंदिरापासून साधारण तीन किलोमीटर वर ता प्रोह्म हे मंदिर आहे. आता सध्या हे मंदिर त्याचा जीर्णोद्धार करता येणार नाही अशा अवस्थेत आहे. मोठमोठ्या झाडांनी मंदिराच्या दगडात आपली मुळे अशा प्रकारे रुतवलेली आहेत की ती मुळे बाजूला करायची तर मंदिरच ढासळेल. झाडे वाढत आहेत, क्षणाक्षणाला मंदिराच्या भिंती कमकुवत करत आहेत. 


काळाचा अजस्त्र पंजा मानवी निर्मितीला जखडून टाकत आहे, ताब्यात घेत आहे अशी काहीशी भावना ही झाडांची मुळे आणि खोडे  पाहून  मनात  येते.

हा शेवटचा फोटो नीट पाहिलात की तुमच्या लक्षात येईल, आधी झाडाने भिंतीचा आधार घेतला. नंतर त्या भिंतीतच मुळे रोवली. आता ती महाकाय मुळे भिंतीचे दगड खिळखिळे करत त्यातून बाहेर येत आहेत.

झाड तोडावे तर त्याबरोबरच भिंत आणि ते मंदिर तुटणार हे नक्कीच. शेवटी तज्ज्ञांनी असा निर्णय घेतला आहे की आहे ह्या स्थितीत फार फेरफार करायचा नाही. ते अजून खराब होणार नाही एवढेच आपण करायचे. ह्या प्रकल्पात भारताचा मुख्य वाटा आहे. 

एकेकाळी शेकडो मूर्ती, शेकडो खोल्या आणि प्रचंड मोठा विस्तार असणारे हे मंदिर आज झाडांनी व्यापलेले आहे. जंगल टेम्पल म्हणून ओळखले जात आहे. थोडे फार कोरीवकाम शिल्लक आहे. पण मंदिर आज मुख्यतः: ओळखले जाते आहे ते तिथल्या अजस्त्र झाडांमुळे. हॉलिवूड सिनेमे, कादंबऱ्या, म्युझिक अल्बम्स सगळ्यांनाच ह्या गूढ रौद्र सौंदर्याची भूल पडली आहे. 

ही झाडे नक्की कोणती आहेत? काही सिल्ककॉटन ट्रीज असावीत, काही स्ट्रँगलर फिग ट्रीज असावीत, काही टेट्रामेलिस असावीत असे म्हणतात. 

अनेक एकमजली इमारती, त्यांना जोडणारे लांबलचक रस्ते, अनेक प्राकार, अनेक खोल्या असे ह्या मंदिराचे स्वरूप आहे. आत्तापर्यंत ९३ लहान लहान विहार सापडले आहेत. अजून बरेच सापडतील असा अंदाज आहे. 

आता बरेचसे भाग सुरक्षेच्या कारणासाठी बंदच ठेवतात. पण तरीही हे मंदिर पाहायला जाताना, कोणत्यातरी अंधाऱ्या रस्त्याने एकटे न जाता, सतत आपण गाइडबरोबर असणे योग्य ठरते. 

हे सर्व फोटोज आहेत डिसेंबर २०१२ मधील. तेव्हा बरेच काम सुरु होते ह्या मंदिरात. आता कदाचित काम पूर्ण होऊन मंदिर जरा बऱ्या स्थितीत आले असेल. 

फारच थोडे कोरीवकाम आणि शिल्पे आता शिल्लक राहिली आहेत. तरीही दाराच्या चौकटीवरील नक्षीकाम गतवैभवाची साक्ष देते आहे. 

प्रेह खान

आज आपण पाहणार आहोत ते दुसरे मंदिर आहे 'प्रेह खान'. राजा जयवर्मन सप्तम ह्याने आपल्या वडिलांच्या, धरणींद्रवर्मन द्वितीय ह्यांच्या स्मरणार्थ बाराव्या शतकात हे मंदिर बांधले. 

कंबोडियातील सियामरीप जवळील अंगकोरवाट मंदिरापासून साधारण पाच किलोमीटर वर प्रेह खान  हे मंदिर आहे. हे  केवळ चार-पाचशे हिंदू देवतांच्या मूर्ती असलेले मंदिरच नव्हते. तर 'ता प्रोह्म' प्रमाणेच ते मंदिर, बौद्ध विहार, भिक्षूंना शिकण्यासाठी विद्यालय, सरकारी कार्यालये, राजवाडा असे सगळे देखील होते. साहजिकच हे आकाराने अवाढव्य असलेले शहर होते. जेव्हा राजा जयवर्मनची नवी राजधानी अंगकोर थोम तयार होत होती तेव्हा काही काळासाठी प्रेह खान हीच राजधानी देखील होती. ते अत्यंत वैभवशाली शहर होते. 

ह्या शहरचे मूळ संस्कृत नाव होते 'नगर श्रीजया' किंवा 'नगर जयश्री'. परकीय आक्रमकांना राजाने इथेच धूळ चारली म्हणून ह्या शहराचे नाव झाले विजय मिळवलेले शहर - नगर श्रीजया. गेली काही शतके मात्र शहराचे नाव झाले आहे 'प्रेह खान', ज्याचा अर्थ आहे पवित्र तलवार. असे म्हणतात की जयवर्मनने आपल्या वंशजांना एक तलवार दिली होती जिचे नाव जयश्री होते. 

ह्या मंदिरात बोधिसत्वाची मुख्य मूर्ती होती, जिचे नाव होते जयवर्मेश्वर. पण फक्त बुद्धाचीच  ह्या मंदिरातपूजा होत होती असे नाही, तर पश्चिमेला विष्णूची आणि उत्तरेला शंकराची मूर्ती देखील होती. 

हा मंदिर परिसर अवाढव्य आहे. मंदिराकडे जाताना खांबांच्या ओळी दिसतात. ह्यावर विविध प्राणी कोरलेले आहेत. कोणी म्हणतात हे दिव्याचे खांब होते, कोणी म्हणतात की ही मंदिराची हद्द होती. 
Close up!
कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे असे न म्हणता, हसत हसत शतकानुशतके वरच्या खांबाचा भार आनंदाने हसत हसत उचलणाऱ्या ह्या महाशयांचा जवळून एक फोटो तर काढायलाच हवा होता. त्याशिवाय त्यांचे दागदागिने, त्यांनी केलेला नट्टापट्टा कसा लक्षात येणार?!!

हातात साप धरलेल्या गरुडाचे देखील असेच अनेक पुतळे आपल्याला मंदिराच्या बाहेर दिसतात. पण माझ्याकडे त्याचा चांगला फोटो नाही. मग एका फोटोमध्ये मागे दिसणारे, हातात साप धरलेले गरुड शोधले आहे. त्यावरून तुम्हाला कल्पना येईल. 
गरुड 
ह्या मूर्तीने आपल्या डाव्या हातात साप धरला आहे. सापाच्या अंगाचे डिझाईन झिजले आहे. मात्र मानेचे डिझाईन शाबूत आहे. 

अंगकोर मधील सर्व मोठ्या आणि महत्वाच्या मंदिरांप्रमाणेच प्रेह खानच्या भोवती पाण्याचा कालवा असलेला खंदक आहे. पाण्यात कमळे आहेत. पाण्यावर पूल आहे. दोन्ही बाजूला विशाल आकारातले पुतळे आहेत. समुद्र मंथन करणाऱ्या देवदानवांचे बरेच पुतळे भग्नावस्थेत आहेत. 
समुद्रमंथन 

समुद्रमंथन 
मंदिर परिसर अतिशयच भव्य आहे. बाराव्या शतकात त्यात लाखभर लोकांचा वावर होता, अनेक गावांचे मिळून ते बनलेले होते म्हणजे परिसर किती भव्य असेल ह्याची आपण कल्पना करू शकता. आज बऱ्याच भागात जंगल आहे. 

अनेक इमारती, अनेक प्रांगणे, दोन भागांना जोडणारे आच्छादित रस्ते आहेत. तिथे हिंडायला पूर्ण दिवस तुमच्याकडे असेल तरच आपापले भटकायची जोखीम घेऊ शकाल. मर्यादित वेळात पाहायचे असेल तर आपल्या मार्गदर्शकाची साथ न सोडणे उचित होईल. 

बहुतेक सर्व इमारती एक मजली आहेत. अगदी एखाद दुसरी इमारत दोन मजली आहे. त्यातली एक वाचनालय म्हणून दाखवली जाते. 

वाचनालय 
गोपुर 
अशी भग्न गोपुरे अनेकदा  दिसत राहतात. 
इमारती बाहेरून तर भग्न दिसतातच पण आतली  शिल्पे देखील भग्नावस्थेत आहेत. जी आहेत त्यावरून त्यांची कलाकुसर पूर्वी कशी असावी ह्याचा अंदाज येऊ शकतो. 

हा खालचा फोटो आहे ते शिल्प बहुतेक राजघराण्यातील स्त्रीचे असावे. कदाचित राजा जयवर्मनाने प्रथम  पत्नी जयदेवी मृत्यू पावल्यावर जिच्याशी विवाह केला, तिचे-इंद्रदेवीचे असू शकेल. जयदेवीचे शिल्प पूर्ण अवस्थेत पाहायला मिळते अजूनही. त्याचे फोटो आपल्याला आंतरजालावर पाहायला मिळतील. 
???
अप्सरा नृत्य हा कंबोडियन संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. त्यामुळे पूर्वीच्या सर्व मोठ्या इमारत समूहांतून नृत्यशाळा असणे साहजिक आहे. आपल्याला अशी नृत्यमग्न अप्सरांची शिल्पे इथे, प्रेह खान मध्ये देखील आढळतात. 




वरवर पाहिलेत तर पहिल्या दोन फोटोंमधील अप्सरांच्या ओळी सारख्या वाटतील. त्या ओळीतल्या अप्सरांची नृत्यावस्था सारखी वाटेल. म्हणून मुद्दाम नंतर काही क्लोज अप्स दिले आहेत. त्यावरून तुमच्या लक्षात येईल की प्रत्येकीच्या देहाच्या ठेवणीनुसार तिचा पाय किंचित वेगवेगळा उचलला गेला आहे. गुडघा आणि कोपर ह्या मधले अंतर बदललेले आहे. तिने बोटांत वस्त्र धरले आहे ते धरण्याची नजाकत वेगवेगळी आहे. 

प्रत्येकीचे वय, वस्त्र, केशरचना, अलंकार, चेहऱ्यावरचे भाव हे सर्व वेगवेगळे आहे. अशा असंख्य अप्सरांच्या ओळी कोरताना एवढे वैविध्य कल्पनेत असणे आणि ते शिल्पात उतरवता येणे ..हे दोन्हीही जमलेल्या त्या शिल्पकारांना मनापासून प्रणाम. 
हातात त्रिशूल,  गुडघ्यापर्यंतचे कटिवस्त्र, दणकट मांड्या आणि पाय, कपाळावर तिसरा उभा डोळा... इतके सगळे वर्णन ऐकल्यावर ही मूर्ती कोणाची असेल ते लहान मूल देखील सांगू शकेल. शिवमूर्ती आहे. वेगळे आहेत ते अंगावरचे इतके अलंकार आणि चेहऱ्यावरचे शांत स्मितहास्य. 
केवळ मूर्तिस्वरूपात नाही तर पिंडीच्या रूपात पण शंकर आहेच. 

बौद्ध विहार होता हे दर्शवणारे एक स्तूप देखील ह्या मंदिरात आहे. 
स्तूपाची रोज पूजा होत आहे. फुले, उदबत्ती, नैवेद्य हे सर्व पूजा विधी होत आहेत असे दिसते. अनेक शतके आधी ह्याच जागी लोकेश्वराची - बुद्धाची मूर्ती होती असे म्हणतात. 

स्तूपाच्या मागे, भिंतींना जी भोके दिसतात त्यात कोणी म्हणतात पूर्वी तांब्याच्या पट्ट्या लावलेल्या होत्या सगळीकडे. त्यामुळे हे मंदिर कायम चमकत राहायचे. कोणी म्हणतात त्यात मौल्यवान रत्ने जडवलेली होती. खरे काय ते तो बुद्धच जाणे. 
बंद दार - सुंदर नक्षी 
अंतरंग 
आकाशाची चौकट 
अंतरंग 
कलाकुसर 
इमारतींच्या त्या जाळ्यातून तुम्ही गेलात तर काहींचे अंतरंग असे दिसेल. दारांवर अजूनही सुंदर नक्षी गतकाळाच्या वैभव खुणा मिरवते आहे. 
ह्या दारावरच्या नक्षीत फार सुंदर मानवाकृती आहेत. त्यातील काही नमनमुद्रेत आहेत. वेगवेगळे प्रसंग आहेत. पण फोटो पुरेसा स्पष्ट नसल्याने प्रसंग ओळखता येत नाही. 
ह्या फोटोत दारासमोरची मूर्ती स्पष्ट ओळखू येते आहे! पण दारावरच्या पॅनेलवरच्या मूर्ती नीट दिसत नाहीत. त्या पॅनेलवर  समोरची एक ओळ नमस्कार मुद्रेत बसलेल्या भक्तांची आहे आणि मागे भग्न मूर्ती आहे ती चतुर्भुज आहे. तेव्हा बुद्ध असू शकतो, विष्णू असू शकतो. नक्की माहिती नाही. 

हे दोन्ही एकाच इमारतीचे फोटोज. एक थोडा जवळून काढलेला. जरा नीट झूम करून पाहिलेत तर प्रवेशद्वाराच्या वर एक सुंदर शिल्प अजूनही पुष्कळ चांगल्या अवस्थेत आहे असे आपल्या लक्षात येईल. त्याचा अगदी जवळून फोटो असा दिसतो. 
आता हे कशाचे दृश्य आहे हे तर अगदी सगळ्यांना ओळखू येईल. जोरदार युद्ध चालू आहे. पायदळ आहे. ते सैनिक खाली लढत आहेत. घोडदळ आहे. रथ आहेत. इतकेच काय, काही आकाशात उड्डाण करत युद्ध करणारे देखील सैनिक आहेत. 

ह्यातील काही सैनिक उग्र चेहऱ्याचे आहेत. काहींचे चेहरे वानरासारखे आहेत. काहींना शेपटी दाखवली आहे. चित्रात अनेक इतर गोष्टी असल्या तरी नजर वेधून घेणाऱ्या दोन गोष्टी म्हणजे रथाची चाके. मग त्या चाकांवर असलेल्या रथातून ह्या प्रसंगातील मुख्य नायक बसलेले आहेत. 

डावीकडचा रथ पाहिलात तर त्यात सारथ्याशिवाय आणखी दोघे जण आहेत. एक जण दुसऱ्याला काहीतरी दाखवतो आहे, सांगतो आहे. पण तो सांगणारा सारथी नाही. इथेच मला वाटते डाव्या रथातले दोघे कोण हे स्पष्ट होते. त्या दोघांचीही देहबोली आत्मविश्वासपूर्ण आहे. डाव्या रथाचे घोडे चढाई करण्याच्या उडी मारून हवेत झेपावलेले आहेत. 

उजवीकडचा रथ पाहिलात की मग हे युद्ध कोणात आणि कोणाचे आहे हे नक्कीच कळते. उजव्या रथात आहे दशानन रावण. त्याची देहबोली आणि रथ बचावात्मक पवित्र्यात आहे आणि चेहरा थोडा गोंधळलेला. राम-रावण युद्धाचे अतिशय प्रत्ययकारी चित्रीकरण केलेले इथे आढळते. दगडात गती आणि हालचाल दाखवणाऱ्या ह्या शिल्पाचे कौतुक करावे तेवढे थोडे. 

ह्या खेरीज कृष्ण गोवर्धन पर्वत उचलतानाचे देखील शिल्प आहे म्हणतात. शेषशायी विष्णू आहे. पण ते आम्ही पाहिले नाही. ह्या मंदिरासाठी देखील जास्त वेळ ठेवून जायला हवे. 

आणि आता ज्या साठी प्रेह खान मंदिर प्रसिद्ध आहे ते फोटो. 
झाडांनी इथे पण इमारतींवर आपले जाळे पसरलेले आहे. त्यातील एक ... खरे म्हणजे ही दोन झाडे एकत्र वाढत होती. त्यातील एक तुटून पडले. तुटताना ते इमारतीचे काही चिरे दगड घेऊनच खाली आले. दुसरे मात्र जिवंत आहे. जोमाने शेजारच्या भिंती छपरावर वाढते आहे. 


अजून भिंतींवर वाढणारी झाडे ह्या मंदिरात अनेक ठिकाणी आहेत. किती फोटो काढणार? 
आम्ही गेलो २०१२ डिसेंबर मध्ये तेव्हा ह्या मंदिराच्या दुरुस्तीचे काम चालू होते. आता कदाचित झाली असेल दुरुस्ती पूर्ण. पण जिथे अशी झाडे सतत वाढत आहेत तिथे डागडुजीचे कामदेखील सतत चालू ठेवायला लागणार. 

आपल्या आईवडिलांच्या स्मरणार्थ राजा जयवर्धनाने बांधलेले हे दोन्ही विहार. शत्रूवर मिळवलेल्या विजयाचे, सत्तेचे, संपत्तीचे, बदललेल्या धर्मनिष्ठांचे चिन्ह मिरवणाऱ्या ह्या वास्तू. संपत्तीचे  सविस्तर वर्णन ह्या दोन मंदिरांच्या बाबतीत शिलालेखांत विशेषत्वाने केलेले आढळते. इतर मंदिरातून सोन्यानाण्याचे वर्णन करून ठेवलेले फारसे आढळत नाही. दैवदुर्विलास हा की आज तिथे संपत्ती तर नाहीच पण जंगली झाडे आपला विळखा घालून इमारतीदेखील नष्ट करू पाहत आहेत. 

पूर्वी कदाचित जंगल साफ करून, जमीन समप्रतल करून मंदिरे बांधली असतील, आज जंगले परत ती मंदिरे गिळून टाकू पाहत आहेत. 

अंगकोरवाट मंदिर समूहातील सगळीच मंदिरे मधली काही शतके दुर्लक्षित राहिली होती. जंगलाने वेढली गेली होती. पण ह्या मंदिरांइतकी दुरावस्था फारच क्वचित मंदिरांची झालेली दिसते. 

वैभवाच्या अत्युच्च शिखरावरून कधीतरी खाली यायचेच आहे ह्या शिकवणीची   तर ही दोन्ही मंदिरे साक्ष देत नसतील? नियतीचा न्याय अजब असतो हेच खरे. 

कंबोडिया मालिकेतील ह्या आधीचे लेख वाचण्यासाठी -
१. बांते स्रेइ एक सुखद स्वप्न 
https://silvervegantravels.blogspot.com/2022/07/blog-post_14.html
२. अंगकोरवाट - विश्वाची अमूल्य ठेव 
https://silvervegantravels.blogspot.com/2022/07/blog-post.html
३.PhnomPenh-कंबोडियाची राजधानी  
https://silvervegantravels.blogspot.com/2020/09/phnom-penh.html

#angkorwat #cambodia #siemreap #angkor #angkorwattemple #travel #khmer #siemreaptrip #travelphotography #phnompenh #angkortemples #angkorthom #cambodiatravel #asia #cambodiatrip #angkorwatcambodia #southeastasia #siemreapcambodia #taprohmtemple #travelgram #beautifulcambodia #adventure #cambodian #explorecambodia #visitcambodia #taprohm #wanderlust #angkorwatsunrise #travelcambodia #prehkhantemple

Comments

Popular posts from this blog

महेश्वर

महेश्वर हे मध्यप्रदेश पर्यटन निगमच्या पर्यटन स्थळांमधले एक महत्वाचे नाव आहे. पण करोडो भारतीयांसाठी ते केवळ एक पर्यटन स्थळ नाही तर एक तीर्थस्थान असते. लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या वास्तव्याने पुनीत झालेले स्थान आहे.  महेश्वर किल्ला प्रवेशद्वार  राजवाडा प्रवेशद्वार  बाह्यरूप  पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर  राजवाडा प्रवेशद्वार  अहिल्याबाई होळकर हे केवळ भारताच्याच नव्हे तर विश्वाच्या इतिहासातील एक सोनेरी पान. संपूर्ण मानव विश्वातील यशस्वी स्त्री राज्यकर्त्यांची सूची करायची झाली तर अहिल्याबाई होळकरांचे नाव ठळकपणे लिहायला लागेल.   31 मे 2025 ला त्यांची तीनशेवी जयंती आहे. पण 300 वर्षांपूर्वी होऊन गेलेल्या अहिल्याबाईंचे आयुष्य अगदी आजच्या आधुनिक काळातल्या आव्हानातही मार्गदर्शक ठरावे असेच आहे.  त्यांच्याविषयीचा आदर मनात घेऊनच आपण महेश्वरला जातो आणि त्या भावनेच्या प्रकाशात महेश्वर पाहतो. महेश्वरला फार मोठी प्राचीन परंपरा आहे. स्कंद पुराणाच्या रेवा खंडात आणि वायू पुराणाच्या नर्मदा रहस्य मध्ये महिष्मती म्हणजे महेश्वरचे वर्णन आलेले आहे. 'गुप्...

सोमनाथ - प्रभास पट्टण.

१९४७चे दीपावली पर्व. स्थळ होते सिंधुसागराच्या तीरावर असलेल्या सोमनाथ मंदिराच्या अवशेषांचे प्रवेशद्वार. तिथे उभे राहून सरदार वल्लभभाई पटेल यांनी दृढनिश्चय व्यक्त केला की भारतीय जनता आपले आराध्य दैवत असलेल्या सोमनाथ मंदिराला त्याची पूर्व प्रतिष्ठा आणि पूर्व वैभव प्राप्त करून देईल.  काय कारण होते ह्या प्रतिज्ञेचे? जर भारतीय जनतेचे आराध्य दैवत होते सोमनाथ तर आता मंदिराचे अवशेषच का उरले होते?  ह्या साठी आपल्याला जाणून घ्यावे लागेल सोमनाथ मंदिराच्या इतिहासाविषयी आणि सोमनाथच्या हिंदू जनमानसातील स्थानाविषयी.  हिंदूंन पूजनीय असलेल्या बारा ज्योतिर्लिंगापैकी सर्वात पहिले नाव असलेल्या आणि प्रथम स्थानी असलेले सोमनाथ. आपल्या सर्वाना माहिती असलेल्या स्तोत्राची सुरुवातच होते ती 'सौराष्ट्रे सोमनाथंच' पासून. त्यामुळेच त्याला 'आदि ज्योतिर्लिंग' म्हणून ओळखले जाते.  ऋग्वेदात तसेच अनेक पुराणात ज्याचा उल्लेख झाला आहे असे हे तीर्थधाम. ह्याविषयी आपल्याला अनेक कथा सापडतात.  शतकानुशतकांच्या मंदिराच्या इतिहासात नैसर्गिक रित्या पडझड झाल्यानंतर ते अनेक राजांकडून, भक्तांकडून सोने, च...

गणपतीपुळे

कोकणच्या निसर्गाविषयी किती आणि कितीदाही लिहिले तरी कमीच आहे. कोकणातल्या नारळी पोफळीच्या वाड्या, आंब्याची फणसाची झाडे, केळीच्या बागा, कौलारू घरे ह्यांनी नटलेली धरती, सोनचाफा बकुळीच्या सुगंधाने घमघमणारा आसमंत आणि कानावर येणारी समुद्राची गाज सारेच कसे मन प्रसन्न करणारे असते.  चराचरात वसणारा परमतत्वाचा अंश ह्या भूमीत प्रकर्षाने प्रत्ययाला येतो. ह्या भूमीत अनेक देवस्थाने नसती तरच नवल होते. ह्या देवस्थानांच्या जागा विलक्षण सुंदर आहेत. गणपतीपुळे हे असेच एका सुंदर स्थानी वसलेले श्री गणेशाचे स्वयंभू मंदिर. सिंधुसागराचा किनारा, चमकदार वाळूची पुळण आणि पाठीमागे गार्ड हिरव्या वनराईने झाकलेला डोंगर असे ह्या मंदिराचे नयनमनोहर ठिकाण आहे.  श्री गणपतीपुळे देवस्थान  ह्या स्वयंभू मूर्तीचा दृष्टांत पाचशे वर्षांपूर्वी भिडे गुरुजींना झाला. तिथे त्यांनी साधे गवताचे छप्पर उभारून पूजेला सुरुवात केली. त्यांची समाधी आपल्याला मंदिराच्या आवारातच बघायला मिळते.  समाधी  पुढे मग वेळोवेळी निरनिराळ्या भक्तांनी ह्या वास्तूची पुनर्बांधणी आणि दुरुस्ती केली. छत्रपती शिवाजी महाराजांचे सचिव अण्णाजी दत्त...

श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे जन्मस्थान - बर्वेवाडा, डुबेरे

काल दिनांक १८ ऑगस्ट २०२५. श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे ह्यांची ३२५ वी जयंती. श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे पुतळा, बर्वेवाडा श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे पुतळा, बर्वेवाडा श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे पुतळा, बर्वेवाडा आता बाजीराव म्हटले की केवळ बाजीराव मस्तानीच आठवणाऱ्या लोकांसाठी बाजीराव कोण ते सांगायला हवे. छत्रपती शिवाजी महाराजांनी पाहिलेले हिंदवी स्वराज्याचे स्वप्न प्रत्यक्षात जगणारे आणि हिंदवी साम्राज्य निर्माण करणारे बाजीराव बाळाजी पेशवे/ विश्वनाथ बल्लाळ भट हे शाहूछत्रपतींचे पेशवे म्हणजेच पंतप्रधान होते.  आपल्या वीस वर्षांच्या पेशवे म्हणून कारकीर्दीत ते चाळीसहून अधिक लढाया लढले आणि त्या सर्व लढायांत ते अजिंक्य राहिले. त्यांनी आपल्या कर्तृत्वाने मराठ्यांचे वर्चस्व अखंड भारतावर प्रस्थापित केले.  त्यांचा जन्म १८ ऑगस्ट १७००, भाद्रपद पौर्णिमा ह्या दिवशी डुबेरे येथे झाला. डुबेरे आजच्या सिन्नर तालुक्यात नाशिक जिल्ह्यात आहे.  ह्या गावी बाजीरावांच्या मातोश्री राधाबाई ह्यांचे भाऊ मल्हारराव बर्वे राहत असत. त्या बर्वे वाड्यात बाजीरावांचा जन्म झाला.  बर्वे वाडा  अवघ...

कवी केशवसुत स्मारक, मालगुंड

एका कवीचे स्मारक असावे आणि तेही कवीला साजेसे असावे ही दुर्मिळ गोष्ट आहे! पण असे एक स्मारक आपल्या महाराष्ट्रात आहे. रत्नागिरीजवळ मालगुंड येथे कवी केशवसुत म्हणजेच कृष्णाजी केशव दामले ह्यांचे एक सुंदर स्मारक उभारले आहे.  कवी केशवसुत जन्मस्थान  मार्गावरील फलक  प्रवेशद्वारातून दिसणारे दृश्य  कोकण मराठी साहित्य परिषदेने ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री मधू मंगेश कर्णिक ह्यांच्या संकल्पनेला प्रत्यक्षात उतरवले आहे.  एखाद्या कवीचे स्मारक कसे असावे हे एखाद्या साहित्यिकालाच चांगले कळू शकणार! स्मारकाच्या प्रवेशद्वारातून आपण आत गेलो की समोरच दिसते ते केशवसुत जन्मस्थान. हे जुने घर डागडुजी करून नीटनेटके ठेवले आहे. पडवीत मोठा झोपाळा आहे.  कवीच्या घरात कवीचे पुस्तक वाचताना  तिथेच केशवसुतांची काही पुस्तके तसेच को.म.सा.प.ची काही प्रकाशने विक्रीसाठी उपलब्ध आहेत.  घरातील आतल्या खोल्या तशा रिकाम्याच आहेत. काही थोडे जुने सामान तिथे ठेवले आहे .  माजघर  घराच्या मागच्या बाजूला कवीचे खरे स्मारक आहे. केशवसुतांनी त्या काळात म्हणजे दीडशे वर्षांपूर्वी कवितेत नवा प्रवाह आणला...

लक्ष्मीकेशव मंदिर, कोळीसरे

  मंदिर म्हणजे एक उर्जाकेंद्र! प्राचीन काळापासून भाविक मंदिरात देवतांच्या दर्शनासाठी जात आले आहेत. आजही हिंदू लोक मंदिरात जाऊन, चित्त एकाग्र करून ध्यान, पूजा आणि आरती करतात. यामुळे त्यांना ऊर्जा आणि शांततेचा अनुभव मिळतो. प्रत्येक देवी-देवतेचे एक विशिष्ट मंदिर असते.  असेच कोळीसरे येथे श्री विष्णूचे - लक्ष्मीकेशवाचे सुंदर मंदिर आहे . रत्नागिरी शहरापासून फक्त ५० किलोमीटर अंतरावर किंवा गणपती पुळ्यापासून २१ किलोमीटर अंतरावर निसर्गसुंदर कोळीसरे गाव आहे. पुणे मुंबई हून रत्नागिरी जिल्ह्यातील कोळीसरे येथे जायचे असल्यास चिपळूण मार्गे जाता येईल. परशुराम - कोळीसरे रस्त्यात अशी नयनरम्य दृश्ये अनेकदा दिसतात. परशुराम कोळिसरे रस्ता अगदी कमी लोकवस्तीचे, घनदाट झाडी असलेले हे गाव कोळीसरे फाट्याहून आत गेल्यावर दीड दोन किलोमीटर प्रवास केल्यावर येते. रत्नागिरीहून बसने जाता येते अन्यथा मंदिरापर्यंत पोचण्यासाठी स्वतःचे वाहन असणे सोयीचे आहे.  गाडी पार्क केल्यानंतर काही पायऱ्या उतरून मग घनदाट झाडीत वसलेल्या ह्या मंदिरात जाता येते. ह्या रस्त्यावरून व्हील चेयर जाउ शकत नाही. पार्किंग पासून उ...

'कड्यावरचा गणपती.' - आंजर्ले

कोकण सुंदर आहेच. कोकणावर निसर्गाची अपरंपार कृपा आहे. काय नाही कोकणात? डोंगर, दऱ्या, नद्या, समुद्र, नारळीपोफळीच्या वाडया, आंब्या फणसाची झाडे, केळीच्या बागा हे तर आहेच. इतर फुलेही कोकणच्या मातीत जास्तच बहरतात. बकुळ, चाफ्याचे सगळे प्रकार, जास्वंद किती नावे लिहावीत!! कौलारू घरे, लाल मातीचे रस्ते, ताजा खवलेला नारळ घातलेले अवीट चवीचे खाद्यपदार्थ .. कोकणांत जायची किती कारणे हवीत अजून?  ह्या सोबत किंवा खूप जणांसाठी ह्याच्याही आधी कोकणात जाण्याचे महत्वाचे कारण असते ते म्हणजे तेथील मंदिरे. तर आज आपण आंजर्ले येथील एक मंदिर  पाहणार आहोत.  दापोली, गुहागर,आंजर्ले हा सगळा परिसर तर निसर्गसौंदर्याने नटलेला आहे. शहरीकरण, पर्यटकांची अमर्याद संख्या, गल्लोगल्ली झालेले होमस्टे, रिसॉर्ट्स आणि खानावळी इतके सगळे पचवून सुद्धा अजूनही  इथले वातावरण फार सुखद आहे.  रत्नागिरी जिल्ह्यात दापोलीजवळ आंजर्ले गाव आहे. त्या गावाच्या जवळ एका डोंगरावर असलेले मंदिर म्हणजे  'कड्यावरचा गणपती.'  पूर्वी पायऱ्या चढून जाणे हा एकमेव मार्ग होता.  आता चारचाकी गाडी सुद्धा आरामात मंदिरापर्यंत जाऊ श...

Prashanti Kutiram, Bangalore

I am happy to write my first post of 2022!! I am here with a really very special post! This is not a tourist place and still it holds a special place in each and every visitor’s mind. This is Prashanti Kutiram of Bangalore. Prashanti kutiram as the name suggests, surely makes your mind peaceful. It's around 70-80 kms from Bangalore airport but with the famous traffic jams of Bangalore, it may take two and half hours by taxi.  This is the place where The Swami Vivekananda Yoga Anusandhan Sansthan is situated on a sprawling 100 acres. Swami Vivekanand  Swami Vivekanand  Ramakrishna Paramahans and Sharada Mataji  SVyasa Founded in 1986, Svyasa follows Swami Vivekanand's teachings and combines best of east and West. So it combines Yoga and spirituality with modern sciences.  The first thing you will notice about Vyasa is the greenery. The campus is having umpteen trees. It's hilly area. The steep paths and slopes offer you the much needed exercise!! The Green Umbre...

नागाव

  नागाव म्हणजे माडापोफळींच्या वाड्या. नागाव म्हणजे केळीच्या बागा. नागाव म्हणजे सुंदर स्वच्छ समुद्रकिनारा.  नागाव म्हणजे वस्त्रगाळ मऊ वाळूचा किनारा.  नागाव म्हणजे अनेक मंदिरे. नागाव म्हणजे लक्षवेधी दीपमाळा. नागाव म्हणजे कोपऱ्या कोपऱ्यावर भेटणारे तळे! नागाव म्हणजे तळ्यात फुललेलीअनेकानेक कमळे!! नागावच्या शेजारचे  अक्षी, चौल, रेवदंडा ही देखील अशीच गावे. नितांतसुंदर, साधी. अलिबाग आणि ह्या सर्व गावांना मिळून अष्टागर असे म्हणत असत. आठ गावांचा समूह.  अलिबाग पर्यटन स्थळ म्हणून ७० च्या दशकापासूनच प्रसिद्ध झाले होते. तेव्हा शांत निवांत असलेले अलिबाग नंतर खूपच गजबजले आणि मग दुसऱ्या सहस्त्रकात अलिबागशेजारील रेवदंडा, नागाव, चौल ही लहान लहान गावे देखील पर्यटनस्थळे म्हणून विकसित होऊ लागली.  ह्या निवांत, शांत गावांना जणू अचानक खडबडून जाग आली. तिथेही पर्यटकांची गर्दी वाढू लागली. स्थानिक लोकांना रोजगार, विकासाची संधी, अर्थार्जनाची संधी त्यात दिसली.  गावांवर आधुनिक पेहराव चढला आणि तिथे उदयाला आली मुंबईकरांची आवडती पर्यटनस्थळे.  आता तर परिस्थिती अशी आहे की जवळ जवळ एका...

पैसाच्या खांबाचे मंदिर!

पैसाच्या खांबाचे मंदिर! अनेक वर्षांपूर्वी दुर्गा बाईंचे ' पैस ' हे पुस्तक वाचनात आले. त्यात होता हा पैसाचा खांब. पैस म्हणजे अवकाश. जिथे ज्ञानेश्वरी लिहिली गेली तो हा पैसाचा खांब. ज्ञानेश्वरीचे जन्मस्थान! खांबाला टेकून बसलेले, ज्ञानेश्वरी सांगत असलेले ज्ञानेश्वर आणि ती लिहून घेत असलेले लेखनिक सच्चिदानंद बाबा असे चित्र आधीही अनेकदा पाहिलेले होते. पण त्या खांबाला ' पैसाचा खांब' म्हणतात हे माहितीच नव्हते. पैस ह्या पुस्तकातील पैसाचा खांब हे प्रकरण वाचले आणि अक्षरशः थरारून गेले. 'पैसाच्या खांबाचे मंदिर' अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा या प्रवरा नदीच्या तीरावरील गावी आहे. नेवासे गावाच्या पश्चिमेला हे मंदिर आहे. 'शके बाराशे बारोत्तरे| तैं टीका केली ज्ञानेश्वरे| सच्चिदानंद बाबा आदरे| लेखकू जाहला|' असा उल्लेख सापडतो. मूर्त आणि अमूर्त ह्याची अशी जोडणी म्हणजे ज्ञानाच्या अनंत अवकाशात जाण्याची पहिली पायरीच जणू. ज्ञानेश्वरी वाचण्याएवढी आणि कळण्याएवढी योग्यता ह्या जन्मात अंगी येईल की नाही माहिती नाही. पण हा खांब पाहू या कधीतरी असे ठरवून टाकले. अवघड नव्हतेच जाणे. संभाजीनगर...