मुख्य सामग्रीवर वगळा

पंचमहाभूत मंदिरे

पंचमहाभूत - या विश्वातील प्रत्येक गोष्टीच्या निर्मितीचा आधार असलेली पाच तत्त्वे किंवा पाच घटक. पृथ्वी, आप/ जल, तेज/अग्नी, वायु आणि आकाश/अवकाश ही ती पाच तत्वे.
आम्ही ऐकले होते की या पाच घटकांचे प्रतिनिधित्व करणारी अशी पाच शिव मंदिरे आहेत. ही मंदिरे दक्षिण भारतात आहेत. आम्ही ती मंदिरे बघण्याची संधीच शोधत होतो! ऑगस्ट २०१८ मध्ये आम्ही त्या पाचपैकी तीन मंदिरे पाहू शकलो.
आम्ही कन्याकुमारीपासून सुरुवात केली होती. कन्याकुमारी ते चेन्नई या मार्गावरील सर्वात जवळचे मंदिर असल्याने, आम्ही प्रथम जलतत्वाच्या मंदिराला भेट दिली.
जांबुकेश्वरम मंदिर - तिरुवनाईकावल
हे मंदिर त्रिची जिल्ह्यातील श्रीरंगम बेटावर आहे. श्रीरंगम बेट कावेरी आणि कोलाडम नद्यांनी वेढलेले आहे. हे मंदिर पंचमहाभूतातील जलतत्वाचे मंदिर आहे आणि म्हणून हे शिवलिंग अप्पू लिंगम म्हणून ओळखले जाते.
शिवलिंगाखाली पाण्याचा प्रवाह आहे जो पावसाळ्यात हळूहळू वाढतो. परंतु वर्षभर, ते पाणी दिसत नसले तरी तो क्षीण का होईना, पण जलप्रवाह असतो. मंदिरात शिवलिंगाच्या सभोवती वेढलेले वस्त्र, जमिनीलगत ओले होते त्यावरून त्या जलप्रवाहाचे अस्तित्व लक्षात येते.
मंदिराचा परिसर विशाल आहे. किल्ल्यासारखी रुंद व उंच अशी बाहेरील भिंत आहे. एकाच्या आत एक असे, पाच विशाल प्राकार आहेत. त्यांच्या आत गोपुरम आणि हजारो सुंदर खांब असलेली सभागृहे आहेत. पाण्याचे साठे आहेत.
या मंदिराशी अनेक दंतकथा जोडल्या गेलेल्या आहेत. जांब हे एक फळ आहे, ज्याला इंग्रजीमध्ये रोज ऍपल किंवा जावा सफरचंद म्हणतात. मी दंतकथांबद्दल काही तपशीलवार सांगणार नाही, परंतु आख्यायिका दर्शविणारी शिल्पे पाहण्यासारखी आहेत, हे मात्र नक्की सांगेन!
खांबांवरील कोरीव काम फार सुंदर आहे. या मंदिराबद्दल एक विलक्षण गोष्ट आहे ती म्हणजे गर्भगृहाचे प्रवेशद्वार. जेव्हा आपण सर्वात आतील प्राकारात जातो, तेव्हा गर्भगृहाचे प्रवेशद्वार एका दगडी खिडकीने बंद केले आहे, असे आपल्याला दिसते. त्या खिडकीला जाळी आहे. त्यातून आपल्याला शिवलिंग दिसू शकते. 
प्रवेशद्वारासाठी, आपल्या उजव्या बाजूला, डावीकडे वळावे लागते! प्रवेशद्वार खूपच लहान आहे. त्यातून गाभाऱ्यात जाण्यासाठी तुम्हाला मान खाली वाकवूनच जावे लागते.
मंदिराचा विशाल परिसर, गगनचुंबी गोपुरम आणि मंदिराच्या उंचच उंच भिंती लक्षात घेता, गर्भगृहाचे प्रवेशद्वार इतके छोटे का असेल याचा आपण विचार करत राहतो!
मंदिराच्या आवारात देवी अखिलानंदेश्वरी मंदिर आहे. १५ ऑगस्ट २०१८ ह्या दिवशी आम्ही ह्या मंदिरात गेलो होतो. तेव्हा अनपेक्षितपणे आम्हाला एक उत्सव आणि मिरवणूक पाहण्याचे भाग्य लाभले!
मिरवणुक आतल्या प्राकारातून सुरू झाली आणि फेरी मारत तिने परिसरातील तलावाला भेट दिली. देवांना घातलेले सुंदर आणि अनोखे पुष्पहार, त्या दिव्याचा उजेड, वाद्यांचा आवाज, भाविकांची गर्दी .. अनपेक्षितपणे आम्हाला ह्या साऱ्याचा आनंद घेता आला.
जंबुकेश्वर मंदिर 
जंबुकेश्वर मंदिर 
जंबुकेश्वर मंदिर 
जंबुकेश्वर मंदिर 
मंदिराच्या आवारात नादस्वरम नावाच्या पारंपरिक सुषिर वादनाचे शिक्षण देणारे विद्यालय आहे.
जंबुकेश्वर मंदिर 
जंबुकेश्वर मंदिर 
जंबुकेश्वर मंदिर 
जंबुकेश्वर मंदिर 
त्रिचीमध्ये, आणखी एक सुंदर मंदिर आहे जे पंचमहाभूत मंदिरात समाविष्ट नाही, परंतु हे भारतातील सर्वात मोठ्या मंदिरांपैकी एक आहे. ते म्हणजे रंगनाथस्वामी मंदिर.
हे एक अतिशय प्राचीन वैष्णव मंदिर आहे. चौदाव्या शतकात मोगलांनी अनेकदा लुटलेले व नष्ट केलेले असे हे अत्यंत प्राचीन मंदिर आहे. त्यावेळी मंदिराचे रक्षण करण्याच्या प्रयत्नात १०,००० हून अधिक वैष्णव भक्त मरण पावले होते. काही दशकांनंतर, विजयनगर राजवटीत ह्या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला. पुन्हा पुन्हा या मंदिर आणि शहराला बर्‍याच हल्ल्यांचा सामना करावा लागला. पण सर्व हल्ले सहन करून, आजही हे मंदिर मोठ्या वैभवाने तळपते आहे.
रंगनाथस्वामी मंदिर, श्रीरंगम, त्रिची 
रंगनाथस्वामी मंदिर, श्रीरंगम, त्रिची 

रंगनाथस्वामी मंदिर, श्रीरंगम, त्रिची 
रंगनाथस्वामी मंदिर, श्रीरंगम, त्रिची 
आम्ही पाहिलेले दुसरे पंचमहाभूत मंदिर होते चिदंबरम मंदिर.
थिल्लई नटराज मंदिर किंवा चिदंबरम नटराज मंदिर.
हे मंदिर तामिळनाडूमधील कुडलोर जिल्ह्यातील चिदंबरम शहरात आहे. हे पॉन्डिचेरी ६० कि.मी. आणि तंजावूरपासून १०० कि.मी. अंतरावर आहे. शिव आपले सुप्रसिद्ध दैवी नृत्य करत असतानाची मूर्ती ही मंदिरातील मुख्य देवता आहे.
विशाल आवाराच्या आत बरीच लहान मंदिरे आहेत आणि चिदंबरम मंदिराचे गोपुरम, भारतातील मंदिरांच्या सर्वात उंच गोपुरांपैकी एक आहे. हे मंदिर पंचमहाभूताच्या आकाश तत्त्वाला समर्पित आहे.
हे एक प्रसिद्ध, महत्वाचे व प्रमुख मंदिर असल्याने येथे नेहमीच गर्दी असते. येथील शिवलिंग खूपच विलक्षण आहे. नृत्य नटराजा शिव मूर्ती आहे आणि तिथेच उजवीकडे चितसभेत एक रिकामी जागा आहे.
ही जागा ग्रंथांमध्ये 'रहस्य' म्हणून सांगितली गेली आहे. ही एक पडद्याने झाकलेली जागा आहे, जी बहुधा वर आकाशाला खुली आहे. ही जागा म्हणजेच आकाश तत्वातील शिवलिंग आहे असे मानले जाते. जर तुम्हाला त्याची एक झलक पहायची असेल तर तुम्हाला लांबच लांब रांगेत उभे रहावे लागेल!
थिल्लरी नटराज मंदिर/ चिदंबरम मंदिर 

तिसरे पंचमहाभूत मंदिर, जे आम्ही पाहू शकलो ते कांची येथे होते.
एकंबरेश्वर मंदिर
हे मंदिर चेन्नई जवळच्या कांची येथे आहे. हे भारतातील सर्वात प्राचीन मंदिरांपैकी एक आहे आणि त्याचा उल्लेख प्राचीन ग्रंथांमध्ये सापडतो. येथे, गर्भगृहात, पृथ्वीचे तत्व दर्शविणारे एक शिवलिंग आहे. मंदिरातील गोपुरांमध्ये आहेत, सर्वात उंच गोपूर १९२ फूट आहे.
एकंबरेश्वर मंदिर, कांची 
📷विकिमिडीया कॉमन्स 
या मंदिराविषयी एक वेगळी गोष्ट म्हणजे ह्या मंदिर परिसरात पार्वती मंदिर नाही. असे म्हणतात की कांची येथील कामाक्षी मंदिर हीच एकंबरेश्वरची पार्वती आहे.

कांची कामाक्षी मंदिर.
देवीची अत्यंत सुंदर मूर्ती म्हणजे या मंदिराची मुख्य देवता. लांब रांगेत उभे रहायला लागेलच. पण तरीही देवीची मूर्ती पाहण्यास विसरू नका. अप्रतिम आहे.
कांची कामाक्षी मंदिर 
कांची कामाक्षी मंदिर 
हे मंदिर तुमच्या 'अवश्य भेट देण्याच्या ' यादीमध्ये असलेच पाहिजे. मी तर म्हणेन, सर्वात सुंदर देवी मंदिर आहे हे!
सुमारे पाच एकरांच्या विशाल परिसरामध्ये अनेक लहान मंदिरे तसेच तलाव /तीर्थे आहेत.
आपण कांचीमध्ये असतांना श्री कांची कामकोटी पीठमला भेट द्यायला विसरू नका आणि शक्य असल्यास तेथील पूजेच्या वेळी उपस्थित रहा. पाहण्या, अनुभवण्याजोगे आणि आयुष्यभर लक्षात राहण्याजोगेच दृश्य आहे ते.
कांची रेशमी आणि सुती साड्यांसाठी प्रसिद्ध आहे. व्हीगन असल्याने, रेशमी किड्यांचा संहार करून, रेशमी वस्त्र परिधान करणे मला अजिबातच मान्य नाही. म्हणून मी जरी रेशीम विकत घेत नसले तरी मला सुंदर सुती साड्या नक्कीच खरेदी करता आल्या! आम्ही ज्या दुकानात गेलो होतो त्या दुकानात मी आत्तापर्यंत पाहिलेल्या दुकानांपेक्षा कित्येक पटींनी मोठा असा साड्यांचा साठा होता!
ह्या फोटोला कॅप्शनची आवश्यकताच नाही!!
ह्या भागात असताना तुम्ही जेवणाची काळजीच करू नका. उत्तम, चविष्ट दक्षिण भारतीय शाकाहारी अन्न इथे मिळते.
अजून दोन पंचमहाभूत मंदिरे पाहायची राहिली आहेत. एक म्हणजे तामिळनाडू मधील अरुणाचलेश्वर मंदिर (अग्नि) आणि आंध्र प्रदेशातील श्रीकालहस्तेश्वर मंदिर (वायु). पण त्या ट्रिपमध्ये ह्या दोन्ही मंदिरांना भेट देता आली नाही.. आता पुन्हा कधीतरी.
चेन्नई हे कांचीहून सर्वात जवळचा विमानतळ आहे. ते कांचीपासून सुमारे 70 कि.मी. अंतरावर आहे.
विशेष सूचना - ज्या मंदिरात फोटो काढू नका असे लिहिलेले असेल तिथे कृपया फोटो काढू नका. 






टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कोस्टल कर्नाटक ३. -कुरु बेट, अनेगुड्डे श्री विनायक मंदिर, मणिपाल लेक

  कोस्टल कर्नाटक सहलीचा आमचा तिसरा दिवस देखील फार आनंदात गेला. काही गोष्टी ठरवल्याप्रमाणे होऊ शकल्या. काही गोष्टी ठरवल्याप्रमाणे अजिबात झाल्या नाहीत. पण तरी जमेची बाजूच जड झाली हे खरे.  उडुपीला सकाळी गाडी बोलावली होती आणि ती आम्हाला काही तास फिरवून आणणार होती. पहिले ठिकाण होते त्रासी मारवंते बीच.  फोटो बघूनच हा बीच पाहण्याची खूप उत्सुकता वाटत होती. हा अत्यंत अनोखा बीच आहे. रस्त्याच्या एक बाजूला सौपर्णिका नदी, दुसऱ्या बाजूला अरबी समुद्र - सिंधूसागर! त्रासी मरवंथे बीच  📷https://karnatakatourism.org/en/destinations/udupi उडुपीपासून निघून इकडे येऊन पोचलो. एका बाजूला नदी दिसत होती. दुसऱ्या बाजूला समुद्र किनाराही दिसत होता. पण फोटोत दाखवल्याप्रमाणे ठिकाण काही दिसेना.  मग चौकशी केल्यावर कळले की असे फक्त ड्रोनने काढलेल्या फोटोत दिसते. डोळ्यांना असे दिसत नाही!! एरवी आपण म्हणतो की डोळ्यांना जितके सुंदर दिसते तितके फोटोत उतरत नाही. पण इथे उलटे झाले होते!फोटोतल्याइतके सुंदर डोळ्यांना दिसत नव्हते!! पण असे दिसले नाही म्हणून काय झाले? रस्त्याच्या एका बाजूला नदी वाहते आहे...

कोस्टल कर्नाटक ६ - अविस्मरणीय शरावती बॅकवॉटर बोटिंग, शरावती कांडला मॅन्ग्रोव्ह बोर्ड वॉक

मी आधीच्या पोस्टमध्ये सांगितले होते की आजचा सूर्यास्त समुद्रात होता तर उद्याचा सूर्योदय शरावती नदीत असणार आहे! तोच हा सूर्योदय शरावती नदीत, कमळांच्या मध्ये.  शरावती बॅकवॉटर बोटिंग  दुसऱ्या दिवशी सकाळी सव्वा सहापर्यंत आम्ही बोटिंगच्या ठिकाणी पोचलो. कारण आम्हाला सूर्योदय चुकवायचा नव्हता. होनावर जवळचे शरावती नदीतील बोटिंग हा एक अविस्मरणीय अनुभव आहे.  आजूबाजूची शांतता, संथ पाणी, स्वच्छ नितळ पाण्यात वाकून आपले प्रतिबिंब न्याहाळणारी नारळाची झाडे, पाण्यात अध्ये मध्ये असलेली लहानशी बेटे, खारफूटीची जंगले, कमळाची पाण्यावर तरंगणारी पाने, उगवत्या सूर्याची पाण्यात मिसळणारी किरणे, त्याने तांबूस झालेले पाणी .. एक वेगळेच जग असते ते. तुम्ही जितक्या वेळासाठी बोट ठरवलेली असेल.. तास दीड तास..  तो वेळ, तुमच्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षणांपैकी एक असणार हे मी अगदी खात्रीने सांगू शकते.  आपोआप जगाचा, आयुष्याचा कोलाहल मंद होत जातो. पहाटेचा मवाळ प्रकाश, पाण्यावर हेलकावणारी नाव, हवेतला अगदी किंचितसा सुखद गारवा आणि मुरत जाणारी शांतता ह्या सगळ्याने मन निवळत जाते.  आम्ही गेलो त्या दिवशी,...

'रानी की वाव'

पाटण सर्वांना माहिती असते ते 'रानी की वाव' तिथे आहे म्हणून. भारतातील समृद्ध हातमाग कौशल्याचा उत्तम नमुना असलेली पटोला साडीदेखील पाटणचीच.  गुजराथमधील अहमदाबाद पासून साधारण दीडशे किलोमीटरवर असणारे पाटण जागतिक पर्यटनाच्या नकाशावर मानाचे स्थान पटकावून बसले आहे. युनेस्को चे जागतिक वारसा स्थळ म्हणून मानांकन मिळवलेले हे ठिकाण आहे.  रानी की वाव  रानी की वाव  रानी की वाव  रानी की वाव  रानी की वाव  'रानी की वाव' नावावरूनच आपल्या लक्षात येते की ही राणीने बांधलेली विहीर आहे. पण खरे तर ही नुसती वाव म्हणजे विहीर नसून  सुमारे 64 मीटर लांब, 20 मीटर रुंद आणि 27 मीटर खोल म्हणजे साधारण  सात मजल्यांइतकी खोली असलेले विष्णूचे मंदिर आहे असेच म्हणावे लागेल.  जमिनीपासून खोल खोल उतरत जाणारी अशी ही रचना आहे.  राणी उदयमती हिने तिचा पती  राजा भीमदेव पहिला याच्या स्मरणार्थ हे मंदिर बांधले म्हणून याचे नाव 'रानी की वाव' असे पडले. राजा भीमदेव पहिला म्हणजे अनहिलवाड किंवा अनहिल्लपूर पाटणच्या सोळंकी वंशाचा संस्थापक मुलराज ह्याचा मुलगा होता. ह्या वंशाने अनेक पराक्...

सोमनाथ - प्रभास पट्टण.

१९४७चे दीपावली पर्व. स्थळ होते सिंधुसागराच्या तीरावर असलेल्या सोमनाथ मंदिराच्या अवशेषांचे प्रवेशद्वार. तिथे उभे राहून सरदार वल्लभभाई पटेल यांनी दृढनिश्चय व्यक्त केला की भारतीय जनता आपले आराध्य दैवत असलेल्या सोमनाथ मंदिराला त्याची पूर्व प्रतिष्ठा आणि पूर्व वैभव प्राप्त करून देईल.  काय कारण होते ह्या प्रतिज्ञेचे? जर भारतीय जनतेचे आराध्य दैवत होते सोमनाथ तर आता मंदिराचे अवशेषच का उरले होते?  ह्या साठी आपल्याला जाणून घ्यावे लागेल सोमनाथ मंदिराच्या इतिहासाविषयी आणि सोमनाथच्या हिंदू जनमानसातील स्थानाविषयी.  हिंदूंन पूजनीय असलेल्या बारा ज्योतिर्लिंगापैकी सर्वात पहिले नाव असलेल्या आणि प्रथम स्थानी असलेले सोमनाथ. आपल्या सर्वाना माहिती असलेल्या स्तोत्राची सुरुवातच होते ती 'सौराष्ट्रे सोमनाथंच' पासून. त्यामुळेच त्याला 'आदि ज्योतिर्लिंग' म्हणून ओळखले जाते.  ऋग्वेदात तसेच अनेक पुराणात ज्याचा उल्लेख झाला आहे असे हे तीर्थधाम. ह्याविषयी आपल्याला अनेक कथा सापडतात.  शतकानुशतकांच्या मंदिराच्या इतिहासात नैसर्गिक रित्या पडझड झाल्यानंतर ते अनेक राजांकडून, भक्तांकडून सोने, च...

कवी केशवसुत स्मारक, मालगुंड

एका कवीचे स्मारक असावे आणि तेही कवीला साजेसे असावे ही दुर्मिळ गोष्ट आहे! पण असे एक स्मारक आपल्या महाराष्ट्रात आहे. रत्नागिरीजवळ मालगुंड येथे कवी केशवसुत म्हणजेच कृष्णाजी केशव दामले ह्यांचे एक सुंदर स्मारक उभारले आहे.  कवी केशवसुत जन्मस्थान  मार्गावरील फलक  प्रवेशद्वारातून दिसणारे दृश्य  कोकण मराठी साहित्य परिषदेने ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री मधू मंगेश कर्णिक ह्यांच्या संकल्पनेला प्रत्यक्षात उतरवले आहे.  एखाद्या कवीचे स्मारक कसे असावे हे एखाद्या साहित्यिकालाच चांगले कळू शकणार! स्मारकाच्या प्रवेशद्वारातून आपण आत गेलो की समोरच दिसते ते केशवसुत जन्मस्थान. हे जुने घर डागडुजी करून नीटनेटके ठेवले आहे. पडवीत मोठा झोपाळा आहे.  कवीच्या घरात कवीचे पुस्तक वाचताना  तिथेच केशवसुतांची काही पुस्तके तसेच को.म.सा.प.ची काही प्रकाशने विक्रीसाठी उपलब्ध आहेत.  घरातील आतल्या खोल्या तशा रिकाम्याच आहेत. काही थोडे जुने सामान तिथे ठेवले आहे .  माजघर  घराच्या मागच्या बाजूला कवीचे खरे स्मारक आहे. केशवसुतांनी त्या काळात म्हणजे दीडशे वर्षांपूर्वी कवितेत नवा प्रवाह आणला...

गणपतीपुळे

कोकणच्या निसर्गाविषयी किती आणि कितीदाही लिहिले तरी कमीच आहे. कोकणातल्या नारळी पोफळीच्या वाड्या, आंब्याची फणसाची झाडे, केळीच्या बागा, कौलारू घरे ह्यांनी नटलेली धरती, सोनचाफा बकुळीच्या सुगंधाने घमघमणारा आसमंत आणि कानावर येणारी समुद्राची गाज सारेच कसे मन प्रसन्न करणारे असते.  चराचरात वसणारा परमतत्वाचा अंश ह्या भूमीत प्रकर्षाने प्रत्ययाला येतो. ह्या भूमीत अनेक देवस्थाने नसती तरच नवल होते. ह्या देवस्थानांच्या जागा विलक्षण सुंदर आहेत. गणपतीपुळे हे असेच एका सुंदर स्थानी वसलेले श्री गणेशाचे स्वयंभू मंदिर. सिंधुसागराचा किनारा, चमकदार वाळूची पुळण आणि पाठीमागे गार्ड हिरव्या वनराईने झाकलेला डोंगर असे ह्या मंदिराचे नयनमनोहर ठिकाण आहे.  श्री गणपतीपुळे देवस्थान  ह्या स्वयंभू मूर्तीचा दृष्टांत पाचशे वर्षांपूर्वी भिडे गुरुजींना झाला. तिथे त्यांनी साधे गवताचे छप्पर उभारून पूजेला सुरुवात केली. त्यांची समाधी आपल्याला मंदिराच्या आवारातच बघायला मिळते.  समाधी  पुढे मग वेळोवेळी निरनिराळ्या भक्तांनी ह्या वास्तूची पुनर्बांधणी आणि दुरुस्ती केली. छत्रपती शिवाजी महाराजांचे सचिव अण्णाजी दत्त...

श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे जन्मस्थान - बर्वेवाडा, डुबेरे

काल दिनांक १८ ऑगस्ट २०२५. श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे ह्यांची ३२५ वी जयंती. श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे पुतळा, बर्वेवाडा श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे पुतळा, बर्वेवाडा श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे पुतळा, बर्वेवाडा आता बाजीराव म्हटले की केवळ बाजीराव मस्तानीच आठवणाऱ्या लोकांसाठी बाजीराव कोण ते सांगायला हवे. छत्रपती शिवाजी महाराजांनी पाहिलेले हिंदवी स्वराज्याचे स्वप्न प्रत्यक्षात जगणारे आणि हिंदवी साम्राज्य निर्माण करणारे बाजीराव बाळाजी पेशवे/ विश्वनाथ बल्लाळ भट हे शाहूछत्रपतींचे पेशवे म्हणजेच पंतप्रधान होते.  आपल्या वीस वर्षांच्या पेशवे म्हणून कारकीर्दीत ते चाळीसहून अधिक लढाया लढले आणि त्या सर्व लढायांत ते अजिंक्य राहिले. त्यांनी आपल्या कर्तृत्वाने मराठ्यांचे वर्चस्व अखंड भारतावर प्रस्थापित केले.  त्यांचा जन्म १८ ऑगस्ट १७००, भाद्रपद पौर्णिमा ह्या दिवशी डुबेरे येथे झाला. डुबेरे आजच्या सिन्नर तालुक्यात नाशिक जिल्ह्यात आहे.  ह्या गावी बाजीरावांच्या मातोश्री राधाबाई ह्यांचे भाऊ मल्हारराव बर्वे राहत असत. त्या बर्वे वाड्यात बाजीरावांचा जन्म झाला.  बर्वे वाडा  अवघ...

कोस्टल कर्नाटक ४ - शृंगेरी, मुकाम्बिका

कोस्टल कर्नाटक ४ - शृंगेरी, मुकाम्बिका  आज उडुपीहून लवकर निघून शृंगेरीला पोचण्याचा बेत आखला होता. त्याप्रमाणे आम्ही सकाळीच निघालो. रस्ता खूपच छान होता. आता खरं सांगायचे तर कोस्टल कर्नाटक प्रवासात रस्ता सुंदर होता म्हणणे ही द्विरुक्तीच आहे.  सगळ्या सडका अगदी एका पातळीतील आणि गुळगुळीत आहेत. खड्डे खळगे, रस्ते वर खाली असणे असे काही नसल्याने महाराष्ट्रातून गेलेल्या आम्हाला थोडे चुकल्यासारखे वाटले खरे!!! शिवाय रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे, स्वच्छता ह्यामुळे प्रवास फार आनंदाचा होतो. उडुपी शृंगेरी रस्ता तर आगुंबे जंगलातून जातो. त्यामुळे दाट झाडी होती. रस्त्यात सुप्रसिद्ध आगुंबे घाटही येतोच. सकाळची प्रसन्न वेळ आणि इतका छान रस्ता..दिवसाची चांगली सुरुवात होण्यासाठी आणखी काय पाहिजे?!!  आम्हाला वाटले होते इतक्या लवकर फारसे कोणी श्रुंगेरीत आलेले नसेल. पण शृंगेरीला पोचल्यावर लक्षात आले की आमच्यासारखाच विचार अनेकांनी केला होता!  अनेक बस रात्रभराचा प्रवास करून सकाळी शृंगेरीला पोचल्या होत्या. त्या लोकांच्या प्रातर्विधी आणि अंघोळीसाठी अनेक ठिकाणी माफक पैसे घेऊन उत्तम सोय केलेली होती....

कोस्टल कर्नाटक १ - मंगळुरू

  मंगळुरू- कुडला - मंगलोर - मंगलापूरम ही सगळी एकाच गावाची नावे. मंगलादेवी मंदिरावरून ह्या गावाचे नाव पडले मंगळुरू. दक्षिण कन्नड जिल्ह्याचे हे प्रमुख ठिकाण. सुंदर मंदिरे, स्वच्छ समुद्रकिनारे, नारळी-पोफळीची झाडे, आधुनिकतेच्या खुणा मिरवणारे मॉल्स आणि शहराबाहेरची पण तशी जवळच असणारी अनेक पर्यटन स्थळे.. ह्या साऱ्यामुळे मंगळुरु नेहमीच पर्यटकांचे आवडते राहिलेले आहे.  मंगळूरूला जाणारे आमचे विमान नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून होते. हा विमानतळ पाहण्याची उत्सुकता होतीच.  हा अतिशय भव्य आणि सुव्यवस्थित विमानतळ आहे. अनेक विमाने एकावेळी विमानतळावर आली तरी येणाऱ्या आणि जाणाऱ्या प्रवाशांच्यासाठी सर्व आवश्यक सुविधा केलेल्या आहेत.  जशी वर्दळ वाढेल तशी विमानतळावर जाण्यासाठी वाहतुकीची साधने देखील वाढतील अशी आशा आहे.  नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ  नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ  नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ  नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ  लहानशा प्रवासानंतर विमान मंगळुरुला उतरले. मंगळुरु विमानतळ म्हणजे टेबलटॉप रनवेज असणाऱ्या भारतातील मोजक्या विमानतळ...

रवींद्रनाथ टागोरांनाही भुरळ घालणारे 'कारवार'

कारवार - पांढऱ्या वाळूचे स्वच्छ समुद्रकिनारे, हिरव्या झाडांनी नटलेले डोंगर, काळी नदी, लाल माती असलेले सुंदर शहर. शहर होऊ पाहणाऱ्या किंवा खरे तर आता शहर झालेल्या कारवारने अजून आपले गावपण थोडे तरी टिकवून ठेवले आहे. शहरी बकालपणा मात्र टाळता आलेला नाही.   गोवा, कर्नाटक आणि महाराष्ट्र असा तिन्हींचा संगम आपल्याला कारवारमध्ये दिसतो. मराठी बोलणारी माणसेही भेटत राहतात.  गोव्यासारखे पर्यटकांचे लोंढे दिसत नाहीत. कदाचित आम्ही मार्चच्या अगदी सुरुवातीला गेलो तेव्हा अजून पर्यटकांचा ऐन हंगाम सुरु झाला नसावा!! उत्तर कन्नड जिल्ह्याची जीवनरेखा असणारी काळी नदी सदाशिवगड जवळ समुद्राला मिळते. तिथे एक मोठा पूल बांधलेला आहे. कारवार आणि गोव्याला जोडणारा हा पूल आता एक पर्यंटनस्थळच झाला आहे. सूर्योदय बघण्यासाठी पादचारी पुलावर जमलेले तुरळक पर्यटक, धावण्याचा सराव करणारे धावपटू, सायकलस्वार ह्यांच्या खेरीज सकाळच्या वेळी तिथे कोणीही नसते. आपल्या निसर्ग सौदर्यामुळे आणि शांततेमुळे हे ठिकाण अवश्य भेट देण्याजोगे आहे. आमचे हॉटेल ह्या पुलाच्या अगदी जवळ असल्याने आम्ही सूर्योदय अगदी मनसोक्त वेळ देऊन पाहू शकलो....