Skip to main content

बृहदेश्वर मंदिर - चोला वास्तुशास्त्राचा उत्कृष्ट नमुना

आज आपण बृहदेश्वर ला जाणार आहोत. जगातील सर्वात मोठ्या शिवलिंगांपैकी एक, असे शिवलिंग ज्या मंदिरात आहे, ते हे मंदिर! ज्याचे शिखर (विमान) जगातील सर्वात उंच मंदिर शिखरांपैकी एक आहे, असे हे मंदिर!
गोपुर आणि विमान ह्या दोन संकल्पनांमध्ये बऱ्याचदा गोंधळ होऊ शकतो. गोपुर हे प्रवेशद्वारावर असते तर विमान /शिखर हे गर्भगृहावर असते. अनेक वर्षे बृहदेश्वरचे शिखरच जगातील सर्वात उंच शिखर होते. पण नव्यानेच बांधलेले वाराणसीमधील मंदिर आणि अजून जे बांधून होते आहे असे वृन्दावनमधील कृष्णाचे मंदिर ही दोन मंदिरे आता जगातील सर्वात उंच शिखर/विमान असणारी मंदिरे आहेत.
बृहदेश्वर 
 कुठे आहे हे बृहदेश्वर? तामिळनाडूमधील तंजावर मध्ये हे मंदिर आहे. हो.. बरोबर! तेच हे तंजावर, जे कावेरी नदीच्या तीरावर आहे, जिथे छत्रपती शिवाजी महाराजांचे सावत्र बंधू एकोजी राजे सतराव्या शतकात राज्य करत होते आणि नंतर त्यांचे वंशज जिथे राज्य करीत होते. तेच हे तंजावर, जिथे विविध विषयांवरील हजारोंच्या संख्येने दुर्मिळ पुस्तके असलेले विश्व विख्यात सरस्वती महाल वाचनालय आहे. हे तेच तंजावर, जे तंजावर शैलीतील चित्रांसाठी प्रसिद्ध आहे. तेच हे तंजावर जिथे भरतनाट्यम नृत्याला, कर्नाटक संगीताला सुविहित रूप देणारी चार भावंडे, सुप्रसिद्ध तंजावर चौकडी जन्माला आली. 
पण ह्या सगळ्यासाठी प्रसिद्ध होण्याच्याही कितीतरी आधीपासून तंजावर प्रसिद्ध होते ते बृहदेश्वर मंदिरासाठी. हे मंदिर बांधले गेले १०१० मध्ये, म्हणजे बरोब्बर १०१० वर्षांपूर्वी!! महान राजा राजराजा चोला प्रथम ह्याने हे मंदिर बांधले आणि म्हणूनच ह्याचे नाव राजराजेश्वर मंदिर असे देखील आहे.
जेव्हा हा राजा सत्तेवर आला तेव्हा चोलांचे राज्य अगदी छोटे होते. पण नंतर राजराजा प्रथम ह्याने अतिशय कार्यक्षम सैन्य आणि शक्तिशाली नौदल उभारले. त्यांच्या जोरावर आपले छोटेसे राज्य, एक मोठे साम्राज्य बनवले. त्याने श्रीलंकेवर स्वारी करून लंका जिंकली होती तसेच त्याच्याच कार्यकाळात त्याच्या मुलाने, राजेंद्र प्रथम ह्याने पार श्रीविजय राज्यापर्यंत म्हणजे आजचे इंडोनेशिया आणि जवळपास सगळेच दक्षिण पूर्व आशिया इथपर्यंत मोहीम नेऊन तेथपर्यंत आपले राज्य वाढवले होते. आपण ह्या मोहिमांचे संदर्भ आधीच्या काही लेखांत वाचले होतेच. 
चोलांच्या नंतर ह्या प्रदेशावर राज्य केले ते पांड्या, नंतर नायक आणि त्या नंतर मराठ्यांनी. ह्या सर्वानी बृहदेश्वर मंदिराच्या आवारात आणखी काही मंदिरे उभारली. पण सुदैवाने ही नंतर उभारलेली मंदिरे देखील मूळ आराखड्याच्या सौंदर्यात भर घालतील, अशाच रीतीने उभारली गेली. 
ब्रिटिशांनी जेव्हा हा भाग काबीज केला होता तेव्हा म्हणजे साधारण १७७२- १८०१ मध्ये हे मंदिर, ब्रिटिश सैनिकांच्या बराकी म्हणून वापरले गेले आणि मंदिराचे बरेच नुकसान झाले. महाराज सर्फोजी राजे भोसले ह्यांनी १८०१ मध्ये पुढाकार घेतला आणि मंदिराची दुरुस्ती, संगोपन ह्यात लक्ष घातले. आज देखील भोसल्यांचेच वंशज मंदिराची व्यवस्था बघतात. 
इथे मला तुम्हाला काहीतरी सांगायचे आहे. जेव्हा मी जूनमध्ये अधिकृतरीत्या माझा प्रवास वर्णनाचा हा ब्लॉग लिहायला सुरुवात केली तेव्हा मला सारखे वाटत होते की आपल्याला ह्या सगळ्या मूर्तींच्या मागचा अर्थ माहिती असायला हवा. मूर्तिशास्त्राची, इंडॉलॉजीची माहिती हवी. तसे तर आपल्याला सगळ्यांनाच आपण प्राचीन मंदिरे, लेण्या पाहत असतो तेव्हा असेच वाटत असते. पण पावलो कोएलो ने अल्केमिस्ट मध्ये लिहिले आहे ," जेव्हा तुम्ही कशाची तरी मनापासून इच्छा करता तेव्हा हे संपूर्ण विश्व तुम्हाला ती गोष्ट मिळवून देण्यासाठी काम करायला लागते!" माझ्या बाबतीत तसेच झाले. VivekSaptahik मध्ये आलेली एका ऑनलाईन कोर्स विषयीची जाहिरात मला दिसली
ह्या वर्गात Virasat च्या इंद्रनील बंकापूरे ह्यांनी अत्यंत बारकाईने आणि सहनशीलतेने आम्हाला हिंदू मंदिरातील शिल्पकलेविषयी समजावून सांगितले. ह्यामुळे भारतीय तत्वज्ञान, वास्तुकला, कला आणि संस्कृती ह्याविषयी जास्तच उत्सुकता निर्माण झाली.
नंतर माहिती मिळाली ह्याच क्षेत्रात काम करणाऱ्या Haaक ह्या संस्थेविषयी आणि अगदी जेव्हा मी बृहदेश्वर मंदिराची पोस्ट लिहिण्यासाठी अभ्यास करत होते तेव्हाच haaक च्या क्षेत्रभेटीत (अर्थात ऑनलाईन क्षेत्रभेट!), उत्साही आणि ज्ञानी वक्त्या केतकी पटवर्धन ह्यांच्याबरोबर बृहदेश्वर ला भेट देता आली. खरेच संपूर्ण विश्व माझ्या मनातली इच्छा पूर्ण करण्यासाठी झटते आहे की नाही!! 
इतक्या मोठ्या प्रस्तावनेनंतर, चला तर जाऊ या आता बृहदेश्वर ला! जेव्हा तुम्ही ह्या मंदिराच्या जवळ येता तेव्हा प्रथमदर्शनीच भारावून जाण्याची अनुभूती मिळते. प्रचंड मोठे शिखर दुरूनही दिसते. मंदिराची भौमितिक रचना आहे आणि ती अगदी गणिती अचूकतेने उभारण्यात आली आहे. जेव्हा तुम्ही प्रवेशद्वाराशी उभे राहता, तेव्हा बाहेरचे गोपुर, आतले गोपुर, नंदी मंडप आणि मुख्य मंदिर सगळे अगदी एका सरळ रेषेत आहेत. ह्या फोटोत तुम्हाला हे दिसेलच. 
मुख्य प्रवेशद्वारा बाहेर 
गोपुरावरील सुंदर मूर्ती 
प्रवेशद्वार 
आहे ना हा वास्तुकलेचा विलक्षण सुंदर नमुना?! प्रवेशद्वारावर, गोपुरावर शेकडो प्रमाणबद्ध सुंदर मूर्ती आपल्याला दिसतात आणि पुढे आपल्याला चोला वास्तुशैलीचे अद्वितीय उदाहरण पाहायला मिळणार आहे ह्याची चुणूक दिसते.
फोटो काढण्याचे कसे थांबवणार?!!!
बृहदेश्वर ह्या नावात जाणवते ते सगळे गुण ह्या मंदिरात आहेत. ते उंच आहे, रुंद आहे, भव्य आहे, दणकट आहे, शक्तिवान आहे, सुंदर आहे... सगळे काही आहे. हा परिसरच भव्य आहे. नायक राजांनी ह्या मंदिराभोवती एक छोटा किल्ला, त्याच्या भोवती खंदक आणि एक तळेदेखील आहे असा किल्ला बांधला आहे. त्याचे नाव शिवगंगा. 
मंदिराचे प्राकार अतिशय भव्य आहे. त्यात अनेक मंदिरे आहेत. गणपती, कार्तिकेय म्हणजेच सुब्रमण्यम, पार्वती माता ही त्यातली काही मंदिरे. मी तुम्हाला ह्या प्राकाराच्या स्वरूपाविषयी कसे बरे सांगू? थांबा, मी १७ ऑगस्ट २०१८ ला काढलेला एक छोटासा व्हिडिओच बघा. म्हणजे तुम्हाला नीट कल्पना येईल. 
सुब्रमण्यम मंदिरात अतिशय शोभिवंत असे खांब असलेली रचना आहे. हे खांब अर्धे भिंतीत आहेत, आणि अर्धी बाहेर असलेली बाजू कोरीवकाम केलेली आहे. 
सुब्रमणियम मंदिर 
📷गिरीश टिळक 
गणपती मंदिर तसे त्या मानाने साधे आहे पण त्याचे शिखर मात्र कोरीव कामाने सजवलेले आहे. नऊ मजली इमारत असावी तेवढे उंच हे शिखर आहे.
गणेश 
📷गिरीश टिळक 

प्राकाराच्या बाहेरच्या भागाच्या केंद्रस्थानी आहे नंदी मंडप. हा महाकाय नंदी एकाच पाषाणातून अखंड कोरलेला आहे. किती असेल ह्याचा आकार? तर हा सोळा फूट लांब आणि तेरा फूट उंच आहे. 
नंदी 
📷गिरीश टिळक 
त्याच्या छतावरची चित्रे ही नंतरच्या म्हणजे बहुधा नायक राजांच्या काळातील असावीत असे म्हणतात. 
नंदी मंडप 
आता आपण मुख्य मंदिराकडे जाऊ या. प्राकाराच्या मागच्या भागाच्या अर्थातच केंद्रस्थानी आहे हे मुख्य मंदिर. 
शिवलिंगाची उंची आहे २. ७ मीटर! इतक्या उंच पिंडीच्या अभिषेकासाठी चक्क एक गॅलरीच बांधलेली आहे. मंदिरात फोटो काढायला परवानगी नाही. 
मंदिर सांधारा पद्धतीचे आहे. म्हणजे प्रदक्षिणा मार्ग आहे तो खांबा खांबांच्या गॅलरी ने बंदिस्त केलेला आहे. खालच्या भागात काही चित्रे रंगवलेली आहेत. वरच्या भागात १०८ नृत्यमुद्रा दाखवणाऱ्या मूर्ती आहेत. आपण आधी पाहिलेच होते की भरतनाट्यम नृत्याला आत्ताचे सुविहित रूप देण्यात बृहदेश्वरचा आणि तंजावरचा मोठा वाटा आहे. 
राजराजा १ला गुरूंच्या समवेत 
📷विकिपीडिया 
ते भव्य शिखर ज्याच्यामुळे मंदिराला बृहदेश्वर किंवा मोठे मंदिर हे नाव मिळाले ते शिखर आहे २१६ फूट उंचीचे! म्हणजे साधारण २१ मजली इमारती इतक्या उंचीचे! शिलालेखांतून त्याचा उल्लेख दक्षिण मेरू म्हणून केलेला आढळतो. 
मंदिर 
बृहदेश्वर मंदिर 
शिखराचा दोन मजली प्रस्तर आहे. त्यावर विविध मूर्ती कोरलेल्या आढळतात. त्यात प्रामुख्याने शिवाच्या मूर्ती दिसतात. शिखराच्या मध्ये आपल्याला काही खिडक्या देखील दिसतात. प्रस्तराच्या वर तेरा ताल आहेत. ताल म्हणजे शिखरावर असलेले मजले किंवा थर. वर जाताना हे क्षेत्रफळाने कमी कमी होत जातात आणि म्हणूनच शिखराला निमुळता आकार येतो.
तालांच्या वर अष्टकोनी पायावर बसवलेला गोल घुमट, कळस आहे. हा भाग आतून पोकळ आहे. नंदी प्रमाणेच हा देखील एका पाषाणातून कोरलेला असा अखंड, अवाढव्य कळस आहे. वजन आहे अवघे ८० टन. त्यावर एक तांब्याचा कलश आणि त्यावर सोन्याचा शिरोबिंदू स्थापिलेला आहे. 
मंदिराच्या भिंतींवर वेगवेगळ्या शतकात कोरले गेलेले विविध शिलालेख आहेत. 
शिलालेख 
शिलालेख 
राजाने आणि राजपरिवाराने मंदिराला दिलेल्या विविध देणग्या, भेटी, जडजवाहीर ह्यांची यादीच ह्या शिलालेखात दिलेली दिसते. ह्याखेरीज मंदिर कोणी, कसे, कधी उभारले? त्या सर्व कारागिरांची नावे, कोणत्या पूजा कधी, कशा व्हाव्यात? कोणी कराव्यात? त्याचा विधी काय? अगदी हे सगळे देखील शिला लेखात सविस्तर लिहिलेले आढळते. इतक्या सविस्तर नोंदी ठेवणारे हे कदाचित एकमेव मंदिर असावे. शिलालेखांचे १०७ परिच्छेद आहेत. 
शिखरातून वाहत येणाऱ्या पावसाच्या पाण्याला वाट करून देणारे पन्हाळ देखील अगदी बघण्याजोगे आहेत. 
मी तो भारवाही - पाण्याचे पन्हाळ 
बृहदेश्वर 
बृहदेश्वर हे भारतातील सर्वात जास्त पर्यटक भेट देतात अशा स्थानांपैकी एक आहे. शिवभक्त, वास्तुशास्त्र आणि इंडॉलॉजी चे अभ्यासक, पर्यटक, आंतरराष्ट्रीय पर्यटक आणि विद्वान लोक बृहदेश्वरला अनेकदा भेट देत असतात. छायाचित्रकारांसाठी तर तो स्वर्गच आहे. तुम्ही सकाळी लवकर भेट देऊन ह्या वातावरणाचा आनंद अनुभवू शकता. आम्ही तर सकाळी सहा वाजताच मंदिरात पोचलो होतो. त्यामुळे आकाशातल्या अनोख्या रंगछटा आणि उंचच उंच कळस ह्यांचे अद्भुत दर्शन झाले.
केवळ अद्भुत!
बृहदेश्वरचा समावेश युनेस्कोच्या विश्व वारसा स्थळांमध्ये द ग्रेट लिविंग चोला टेम्पल्स म्हणून झाला आहे. ह्या मध्ये बृहदेश्वर सोबतच गंगाईकोंडा चोलापूरम मंदिर आणि ऐरावतेश्वर मंदिर ह्यांचा समावेश आहे. लिविंग टेम्पल चा अर्थ आहे की जिथे पूर्वीपासून आजपर्यंत, अजूनही पूजा अर्चा होते आहे असे मंदिर. 
चोलांच्या शिवभक्तीचा बृहदेश्वर हा एक अप्रतिम पुरावा आहे. ते एक शैव संप्रदायाचे, चोला काळातील वास्तू शास्त्र, शिल्पकला, गणित, धातुशास्त्र आणि चित्रकलेतील प्राविण्याचे, प्रगतीचे अनुपम उदाहरण आहे. बृहदेश्वर मंदिर पाहून, तुमचे मन पुन्हा एकदा महान भारतीय वारसा, भारतीय कला आणि संस्कृती ह्या विषयीच्या अभिमानाने भारावून जाते.
राजा राजराजेश्वर स्वतःला शिवपाद शेखर म्हणवून घेत असे. शिवपाद शेखर चा अर्थ आहे, ज्याचा मुकुट शिवाच्या चरणी अर्पण केलेला आहे, जो शंकरा समोर नतमस्तक आहे. त्याने बहुधा शिवाचे, देवांच्या सर्वश्रेष्ठ शक्तीचे, सर्वत्र असणारे, सार्वकालिक महान अस्तित्व जगाला दाखवून देण्यासाठी, जाणवत राहावे म्हणूनच इतक्या भव्य राजराजेश्वर अर्थातच बृहदेश्वर मंदिराची निर्मिती केली. 
ह्यातील मूर्तींच्या विषयी अधिक जाणून घ्यायचे असेल तर वाचा ब्लॉगचा दुसरा भाग 



#TallestTempleInTheWorld #BrihdeshwarTempleFacts #TallestShivTemple #TheBigTemple
#TamilnaduTemples #HinduShivTemple #11thCenturyTemple #TallShivling


Comments

  1. Replies
    1. धन्यवाद अरुंधती! तू नियमितपणे वाचून कॉमेंट्स लिहितोस, फार हुरूप येतो त्याने! 

      Delete
  2. मावशी, खूप सविस्तर माहिती दिली आहेस. प्रवास हा एक अभ्यासाचं आहे, तो तुम्हाला प्रगल्भ बनवतो. हे मंदिर नक्की पाहीन मी. तुझं अभ्यासपूर्ण लेखन, फोटो यामुळे बरीच माहिती कळली. मी गेल्या आठवड्यात श्री वाघेश्वर मंदिर बघून आलो, त्याचा vlog केला आहे. तो तुला पाठवतो.
    - सचिन प्रदिप खरे.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

लक्ष्मीकेशव मंदिर, कोळीसरे

  मंदिर म्हणजे एक उर्जाकेंद्र! प्राचीन काळापासून भाविक मंदिरात देवतांच्या दर्शनासाठी जात आले आहेत. आजही हिंदू लोक मंदिरात जाऊन, चित्त एकाग्र करून ध्यान, पूजा आणि आरती करतात. यामुळे त्यांना ऊर्जा आणि शांततेचा अनुभव मिळतो. प्रत्येक देवी-देवतेचे एक विशिष्ट मंदिर असते.  असेच कोळीसरे येथे श्री विष्णूचे - लक्ष्मीकेशवाचे सुंदर मंदिर आहे . रत्नागिरी शहरापासून फक्त ५० किलोमीटर अंतरावर किंवा गणपती पुळ्यापासून २१ किलोमीटर अंतरावर निसर्गसुंदर कोळीसरे गाव आहे. पुणे मुंबई हून रत्नागिरी जिल्ह्यातील कोळीसरे येथे जायचे असल्यास चिपळूण मार्गे जाता येईल. परशुराम - कोळीसरे रस्त्यात अशी नयनरम्य दृश्ये अनेकदा दिसतात. परशुराम कोळिसरे रस्ता अगदी कमी लोकवस्तीचे, घनदाट झाडी असलेले हे गाव कोळीसरे फाट्याहून आत गेल्यावर दीड दोन किलोमीटर प्रवास केल्यावर येते. रत्नागिरीहून बसने जाता येते अन्यथा मंदिरापर्यंत पोचण्यासाठी स्वतःचे वाहन असणे सोयीचे आहे.  गाडी पार्क केल्यानंतर काही पायऱ्या उतरून मग घनदाट झाडीत वसलेल्या ह्या मंदिरात जाता येते. ह्या रस्त्यावरून व्हील चेयर जाउ शकत नाही. पार्किंग पासून उ...

नागाव

  नागाव म्हणजे माडापोफळींच्या वाड्या. नागाव म्हणजे केळीच्या बागा. नागाव म्हणजे सुंदर स्वच्छ समुद्रकिनारा.  नागाव म्हणजे वस्त्रगाळ मऊ वाळूचा किनारा.  नागाव म्हणजे अनेक मंदिरे. नागाव म्हणजे लक्षवेधी दीपमाळा. नागाव म्हणजे कोपऱ्या कोपऱ्यावर भेटणारे तळे! नागाव म्हणजे तळ्यात फुललेलीअनेकानेक कमळे!! नागावच्या शेजारचे  अक्षी, चौल, रेवदंडा ही देखील अशीच गावे. नितांतसुंदर, साधी. अलिबाग आणि ह्या सर्व गावांना मिळून अष्टागर असे म्हणत असत. आठ गावांचा समूह.  अलिबाग पर्यटन स्थळ म्हणून ७० च्या दशकापासूनच प्रसिद्ध झाले होते. तेव्हा शांत निवांत असलेले अलिबाग नंतर खूपच गजबजले आणि मग दुसऱ्या सहस्त्रकात अलिबागशेजारील रेवदंडा, नागाव, चौल ही लहान लहान गावे देखील पर्यटनस्थळे म्हणून विकसित होऊ लागली.  ह्या निवांत, शांत गावांना जणू अचानक खडबडून जाग आली. तिथेही पर्यटकांची गर्दी वाढू लागली. स्थानिक लोकांना रोजगार, विकासाची संधी, अर्थार्जनाची संधी त्यात दिसली.  गावांवर आधुनिक पेहराव चढला आणि तिथे उदयाला आली मुंबईकरांची आवडती पर्यटनस्थळे.  आता तर परिस्थिती अशी आहे की जवळ जवळ एका...

हनुमान जन्मस्थळ आणि शबरी धाम, जय श्रीराम, जय जय राम!

आज आपण रामायणातील दोन ठिकाणांना भेट देणार आहोत आणि दोन महान राम भक्तांच्या भेटीसाठी तुम्हाला घेऊन जाताना मला अतिशय आनंद झालेला आहे.  पहिल्यांदा आपण जाऊयात, हनुमानाच्या जन्मस्थानी अंजनेय टेकडीवर. ही टेकडी कर्नाटक मध्ये हंपीजवळच्या भागात आहे असे मानले जाते. ही जागा अंजनीच्या पुत्राचे, अंजनेयाचे म्हणजेच हनुमानाचे जन्मस्थळ आहे.  भारतात अजूनही इतर काही ठिकाणे आहेत की जी हनुमानाचे जन्मस्थळ म्हणून सांगितली जातात. पण अंजनेय टेकडी हे हनुमानाचे जन्मस्थळ असणे मला सर्वात जास्त संयुक्तिक वाटते. कारण ऋष्यमूक पर्वत, जिथे सुग्रीव, हनुमान आणि भगवान श्रीराम यांची भेट झाली होती तो इथून जवळच आहे. हंपीपासून अंजनेय टेकडीपर्यंतचा रस्ता नैसर्गिक सृष्टिसौंदर्याने अतिशय समृद्ध आहे. तुंगभद्रेच्या किनाऱ्यावर असल्यामुळे हा संपूर्ण प्रदेश अत्यंत सुपीक आहे रस्त्याच्या दोन्ही बाजूला सतत तुम्हाला भात शेती, नारळाची झाडे, केळीच्या बागा आणि अर्थातच प्रचंड मोठे खडक, जे ह्या भागाचे वैशिष्ट्य आहेत ते दिसत राहतात. हा संपूर्ण परिसर रामायणातला किष्किंधा भाग मानला जातो. भात शेती केळीच्या बागा भातशेतीचा मखमली गालिचा टे...

पैसाच्या खांबाचे मंदिर!

पैसाच्या खांबाचे मंदिर! अनेक वर्षांपूर्वी दुर्गा बाईंचे ' पैस ' हे पुस्तक वाचनात आले. त्यात होता हा पैसाचा खांब. पैस म्हणजे अवकाश. जिथे ज्ञानेश्वरी लिहिली गेली तो हा पैसाचा खांब. ज्ञानेश्वरीचे जन्मस्थान! खांबाला टेकून बसलेले, ज्ञानेश्वरी सांगत असलेले ज्ञानेश्वर आणि ती लिहून घेत असलेले लेखनिक सच्चिदानंद बाबा असे चित्र आधीही अनेकदा पाहिलेले होते. पण त्या खांबाला ' पैसाचा खांब' म्हणतात हे माहितीच नव्हते. पैस ह्या पुस्तकातील पैसाचा खांब हे प्रकरण वाचले आणि अक्षरशः थरारून गेले. 'पैसाच्या खांबाचे मंदिर' अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा या प्रवरा नदीच्या तीरावरील गावी आहे. नेवासे गावाच्या पश्चिमेला हे मंदिर आहे. 'शके बाराशे बारोत्तरे| तैं टीका केली ज्ञानेश्वरे| सच्चिदानंद बाबा आदरे| लेखकू जाहला|' असा उल्लेख सापडतो. मूर्त आणि अमूर्त ह्याची अशी जोडणी म्हणजे ज्ञानाच्या अनंत अवकाशात जाण्याची पहिली पायरीच जणू. ज्ञानेश्वरी वाचण्याएवढी आणि कळण्याएवढी योग्यता ह्या जन्मात अंगी येईल की नाही माहिती नाही. पण हा खांब पाहू या कधीतरी असे ठरवून टाकले. अवघड नव्हतेच जाणे. संभाजीनगर...

श्री व्याडेश्वर देवस्थान, गुहागर

  कोकणावर निसर्गाचा वरदहस्त आहेच. त्यातही काही गावांनी आपल्या सौंदर्याने विशेष स्थान मिळवले आहे. त्यातील एक महत्वाचे नाव म्हणजे गुहागर. सुंदर लहानसे गाव आहे. एक मुख्य रस्ता, त्याच्या दोन्ही बाजूला घरे, घरांच्या मागे नारळ सुपारीच्या वाड्या. रस्त्याच्या एका बाजूच्या प्रत्येक घराच्या मागच्या वाडीतून समुद्राला जाण्याचा रस्ता, भव्य स्वच्छ समुद्रकिनारा असे हे मोहात पाडणारे गुहागर गाव.  गुहागर प्रसिद्ध आहे व्याडेश्वरासाठी. व्याडेश्वर हे शंकराचे मंदिर अनेक कोकणवासीयांचे कुलदैवत आहे. कोकणातील सर्वात महत्त्वाच्या शिवमंदिरांपैकी एक म्हणजे गुहागरमधील श्री व्याडेश्वर देवस्थान.  श्री व्याडेश्वर देवस्थान.  श्री व्याडेश्वर देवस्थान.  तुम्हाला जर का कधी दक्षिणेतील मंदिरे पाहून वाटले असेल की अशी मंदिरे आपल्या महाराष्ट्रात का नाही?!! तर गुहागरच्या व्याडेश्वर मंदिराला भेट द्या. भव्य सुंदर देवालय आहे. मंदिराचे आवार स्वच्छ, प्रशस्त आहे. मुख्य म्हणजे अगदी नांदते, जागते मंदिर आहे. मंदिराची साफसफाई, निगराणी केली जाते आहे. आवारात भरपूर झाडे आहेत. श्री व्याडे...

देवरियाताल चंद्रशिला ट्रेक - भाग 4 - स्यालमी - बनियाकुंड

आदल्या संध्याकाळी भुरभुरत असलेल्या पावसाने हवेतला गारवा अजूनच वाढवला होता. इतक्या लहान तंबूमध्ये झोपण्याची पहिलीच वेळ होती. पण सुरुवातीचे दोन तास सोडले तर नंतरचे पाच तास चांगली झोप झाली. अगदी प्रसन्न जाग आली.काल एकदाच क्षणभर का होईना, मनात तरळून गेलेला,"आपण ट्रेक इथेच थांबवावा का?"ह्या विचाराचा आज कुठे मागमूसही उरला नव्हता. मनात होते,  "इरादे अगर पक्के हो, तो डगमगाए कदम क्यु? हौसले बुलंद हो तो सहमा सा हो मन क्यु? मंज़िल अब दूर नहीं.. बस संभल के चलना, कभी न रुकना, हार ना मानना, बस्स .. चलते रहना।" - वृंदा टिळक आमच्या सगळ्याच कॅम्पसाईट्स भन्नाट जागांवर होत्या. आजची स्यालमीची कॅम्प साईट देखील त्याला अपवाद नव्हती. नजर पोचेल तिथपर्यंत फक्त पर्वत रांगा आणि जंगल. मानवी वस्तीची जवळपास काहीच चाहूल नाही.  📷Samrat Darda  सगळ्यांचे आवरून वॉर्म अप करून आम्ही निघालो. आजचा सगळा रस्ता सुंदर असणार होता. काल इतके चढ उतार चढून उतरून आता सगळ्यांची चांगली तयारी झाली होती. शिवाय आज मी नीकॅप्स देखील घातल्या होत्या!! त्यामुळे समजा जरी आज रस्ता अवघड असला असता तरी काळजीचे काही कारण नव्हते....

देवरियाताल चंद्रशिला ट्रेक - भाग 3 - देवरियाताल -स्यालमी

ट्रेकचा तिसरा दिवस. कालचा सारी- देवरियाताल प्रवास तर खूपच छान झाला होता. पायही दुखले नव्हते की थकल्यासारखे देखील वाटले नव्हते. त्यामुळे उत्साहाने आजच्या दिवसाला सुरुवात केली. आजचा दिवस तसा अवघड असेल अशी, इंडियाहाईक्सच्या  वेब साईटवरचे वर्णन वाचून कल्पना आली होती. आज अंतर नऊ किलोमीटरपेक्षा जास्त होते. पण वाटेत अनेक शिखरे दिसणार होती. घनदाट जंगलातून जाणार होतो त्यामुळे अनेक पक्षीही दिसणार होते. त्याचीही उत्सुकता होती. सगळेजण देवरियाताल कॅम्पसाईट मधून बाहेर पडलो. अवघे एक दिवस वास्तव्य केलेले असले तरी मन थोडेतरी गुंतलेले असतेच.  देवरियातालच्या रस्त्याच्या डाव्या बाजूने एक जंगलवाटेचा फाटा होता. त्या वाटेने आम्ही निघालो. थोडा वेळ चालल्यावर आम्हाला पुन्हा एकदा चंद्रशिला शिखर दिसणार होते. अधून मधून दिसणारे हे शिखर आपल्याला कुठे पोचायचे आहे त्याची जाणीव करून द्यायचे, त्यानेही एक नवे बळ मिळायचे. पण आज आकाश इतके ढगाळ होते की शिखर दिसलेच नाही.उजवीकडे पुन्हा एकदा सारी गाव मात्र दिसले. 📷Cotrekker 📷Sumati Dhembre ह्या फोटोवरून कशा रस्त्याने आम्ही चालत होतो, चढ किती होता त्याची कल्पना येईल....

देवरियाताल चंद्रशिला ट्रेक - भाग 5- अंतिम भाग - बनियाकुंड- तुंगनाथ- चंद्रशिला

  📷Samrat Darda १५ एप्रिल, बनियाकुंड कॅम्पसाईट मधून काढलेला चंद्राचा सुंदर फोटो. त्या दिवशी शुक्ल पक्षातील सप्तमी किंवा अष्टमी असावी. कारण १७ एप्रिलला रामनवमी होती. सुंदर काळ्याभोर रात्रीचा सघन अंधार.. पौर्णिमा अजून साताठ दिवसांवर असली तरीही आत्तापासूनच तेजाळलेला चंद्र.. चमचमणारे, मध्येच ढगांच्या आड लपणारे चांदणे, आमच्या मनातील समिटविषयीची उत्सुकता..फार अनोखी रात्र होती ती.  उद्या पहाटे दोन वाजताचा वेकप कॉल असणार होता. आम्हाला आवरून, ब्रेकफास्ट करून तीन वाजता निघायचे होते. न विसरता घेण्याच्या गोष्टी तशा तर डे पॅक मध्ये भरूनच ठेवल्या होत्या. हेडलॅम्पच्या उजेडात सामान देखील आवरून ठेवले होते. पहाटे निघताना बाकी सामान मेन टेन्ट मध्ये नेऊन ठेवायचे होते.  इतक्या उंचीवर जायचे होते. काही तासांत आम्ही ४००० फुटांचा अल्टीट्युड गेन करणार होतो. झोपण्यासाठी डोळे मिटले खरे, पण मिटल्या डोळ्यांपुढेही बर्फाच्छादित शिखरांचीच दृश्ये तरळत होती. कधीतरी झोप लागली. सतत अधूनमधून जाग येऊन घड्याळात बघत होते. सगळे दोन वाजता उठणार, त्या आधी आपण आपले आवरून घेऊ या असा विचार डोक्यात होता तो बहुधा सतत ज...

श्री क्षेत्र गिरनार

  गिरनार माझ्यासाठी ते मोहक फळ होते, जे मिळायला अवघड होते आणि कितीही हवेहवेसे वाटले तरी त्यासाठी माझ्याकडून प्रयत्न मात्र अजिबात केले गेले नव्हते. गिरनारच्या अद्भुत कथा खूप ऐकल्या, वाचल्या होत्या. गिरनारची मनात ओढ होती. पण ते सगळे मनातच. प्रत्यक्षात कोणतेही ट्रीप ठरवताना, कुठे जायचे याचा विचार करताना पुढे होऊन गिरनारला जाऊयात असे कधी म्हटले नव्हते हेही तितकेच खरे.  श्री क्षेत्र गिरनार  काय आहे गिरनार?  गिरनार हा पर्वत समूह आहे. दत्तात्रेयांचा इथे निवास असल्याने ते हिंदूंच्यासाठी अत्यंत पवित्र आणि महत्वाचे धार्मिक स्थळ आहे.  हिमालयापेक्षाही जुना असलेला हा पर्वत अनेक नावांनी प्राचीन साहित्यात आलेला आहे. रेवतक हे त्यातील सर्वात जास्त माहिती असलेले नाव.  जैन लोकांसाठी देखील हे अत्यंत महत्वाचे ठिकाण आहे कारण इथे जैन मंदिर समूह देखील आहे. नेमिनाथ, आदिनाथ, मल्लिनाथ आणि इतर तीर्थंकरांची मंदिरे आहेत.  कुठे आहे गिरनार ? गुजराथ, सौराष्ट्र मधील जुनागढ जवळ गिरनारच्या पायथ्याचे, तलेटी नावाचे गाव आहे.  गिरनारला लोक का जातात? तेथील द...

हिंदवी स्वराज्याची राजधानी - किल्ले रायगड

रायगड! हे नाव घेताच मनात उठणारे भावतरंग अवर्णनीय असेच असतात. ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी म्हणजे 'शिव राज्याभिषेक दिन', 'हिंदू साम्राज्य दिन'. अभिमानाचा, गौरवाचा दिवस. भारतीय इतिहास हा संघर्षाचा व विजयाचा आहे. त्यातील झळाळून उठणारे तेजस्वी, सोनेरी पान म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे कर्तृत्व! शिवाजी महाराज आणि त्यांच्या मावळ्यांचे अविश्रांत परिश्रम पूर्णत्वाला पोचले ते ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी, १६७४ ह्या दिवशी. हा केवळ राज्याभिषेक नव्हता. हिंदवी स्वराज्याची स्थापना झाल्याची केवळ अधिकृत घोषणा नव्हती. तर संतांच्या उपदेशांनी जागलेली सज्जन शक्ती, मावळ्यांच्या रूपातील सामान्य जनतेच्या मनात जागलेली वीरवृत्ती ह्यांच्या संगमाने घडलेला तो एक अभूतपूर्व अविष्कार होता. राज्याभिषेक ही शिवाजी महाराजांची व्यक्तिगत महत्वाकांक्षा नव्हती. रोहिडेश्वर येथे लहानपणी घेतलेली प्रतिज्ञा अथक प्रयत्नांनी पूर्ण झाली होती. "हे हिंदवी स्वराज्य व्हावे हे तो श्रींची इच्छा" हे वचन सार्थ झाले होते. पण राज्याभिषेकाच्या निमित्ताने शिवाजीमहाराजांनी मोठ्या युक्तीने त्यांच्यावर असलेली लोकांची निष्ठा सिंहा...