Skip to main content

टेराकोटा सेना - एक मोठे रहस्य 

मला वाटते तुम्ही आधी बाँपो म्युझियम बघून मनाची तयारी करावी, नंतर टेराकोटा योध्दे प्रतिकृती बनताना पाहून, मग आपल्याला काय पाहायचे आहे त्या विषयीच्या कल्पना कराव्यात आणि मग टेराकोटा योध्दे सापडले ते ठिकाण पाहायला जावे. सरळ टेराकोटा योध्देच बघायला जाणे थोडे धक्कादायक होऊ शकते.

टेराकोटा सेना 

आधुनिक काळातील उत्खननात टेराकोटा सेनेचे उत्खनन हे खूपच, जवळपास सर्वात महत्वाचे उत्खनन आहे. काय आहे ही टेराकोटा सेना आणि ती कशी सापडली? आपण ते नंतर बघू या. आधी मी म्हटले तसे बाँपो संग्रहालय बघायला जाऊ या. 


बाँपो म्युझियम 


चीन मधील शान्क्सि भागात बाँपो म्युझियम आहे. शियान शहराजवळच्या एका प्रागैतिहासिक उत्खनन स्थळाजवळ हे म्युझियम उभारलेले आहे. ६००० वर्षांपूर्वीच्या खेड्यातील जीवन कसे असेल ह्याची झलक आपल्याला इथे पाहायला मिळते. प्रदर्शन कक्षात उत्खननात सापडलेल्या अनेक कलाकृती पाहायला मिळतात. 

बाँपो येथे सापडलेली चित्राकृती


बाँपो येथे सापडलेली ही एक चित्राकृती. ह्या चित्रात मासे, माणूस आणि डोंगर दाखवला आहे. चित्रलिपीतील काही अक्षरे दगडावर किंवा एखाद्या खापरावर कोरलेली अशी देखील ह्या उत्खननात सापडली आहेत. 

बाँपो ला आपण एक व्यवस्थित आराखड्यानुसार आखलेली, सगळीकडून खंदकाने सुरक्षित केलेली अशी वसाहत, म्हणजे तिचे अवशेष पाहू शकतो. ह्या वसाहतीचा कालावधी आहे, ५००० B.C. ते ३००० B.C. म्हणजे जवळपास सहा ते सात हजार वर्षांपूर्वीच्या ह्या वसाहती आहेत. 

काही घरांचा पाया, जोती आपण ह्या उत्खनन स्थळी पाहू शकतो. 


सहा हजार वर्षांपूर्वीचा घराचा पाया 

त्या वेळी घरांच्या भिंती लाकडाच्या भुश्यापासून केलेल्या असाव्यात व वाळलेल्या गवताने शाकारलेली छपरे असावीत असा अभ्यासकांचा निष्कर्ष आहे. तिथे सापडलेल्या आराखड्यानुसार बांधलेली काही घरे प्रदर्शनीत आपण पाहू शकतो.

मूळ आराखड्यानुसार बांधलेली घराची प्रतिकृती


असे वाटते की त्या गावाचे तीन भाग असावेत. एक होता राहण्यासाठी घरे असलेला भाग. दुसरा होता कुंभारकाम चालायचे, त्यासाठी अवजारे आणि भट्ट्या असलेला भाग. इथे सापडलेली काही अवजारे आणि भट्ट्यांचे भाग प्रदर्शनीत मांडलेले आहेत. तिसरा होता दफन विधी साठी नियुक्त केलेला भाग. लहान मुलांना पुरण्यासाठी वापरले जाणारे रांजण आणि मोठ्या माणसांची थडगी उत्खननात सापडली आहेत. म्हणून मग गावातील ह्या भागाला दफनभूमी असे म्हटले जाते.


गावातली दफनभूमी

अभ्यासकांना असे पुरावे सापडले आहेत की बाँपो ही नवपाषाण युगातील मातृसत्ताक पद्धती अस्तित्वात असलेली वसाहत होती. Yangshao संस्कृती ( 5000-3000 B.C.) इथे असावी असा अभ्यासकांचा निष्कर्ष आहे. 
एक लक्ष वेधून घेणारी चिनी म्हण असलेली पाटी तिथे प्रदर्शनात लावलेली होती. 

प्रदर्शनातली चिनी म्हण 


इथे जवळच आपल्याला टेराकोटा सेनेच्या प्रतिकृती कशा तयार केल्या जातात ते पाहता येते. हे बघा, इथे अगदी मन लावून काम चालू आहे.
 

प्रतिकृती तयार होत आहेत. 


ह्या संग्रहालयाच्या आवारात आला आहात आणि असा फोटो काढला नाहीत तर चालतच नाही!! म्हणजे..शास्त्रच असते ते! तुम्ही ५००० वर्षे जुने आहेत असे क्षणभर वाटून गेल्यावर, त्यानंतर बाहेर आल्यावरचा सगळा काळ एकदम तरुणच की!! 

मी ५०००वर्षांची आहे???

हं.. आता बाँपो संग्रहालय, टेराकोटा सेनेच्या प्रतिकृती बघून झाल्यावर आता तुमच्या मनाची थोडी तरी तयारी झाली आहे, प्रत्यक्ष टेराकोटा सेना बघण्याची. बाँपो पासून साधारण ३० किलोमीटर प्रवास केलात की तुम्ही पोचता टेराकोटा सेनेच्या संग्रहालयाला. 

काय आहे ही टेराकोटा सेना? तर मातीचे पूर्णाकृती पुतळे आहेत. कोणाचे? तर सैनिक, घोडे आणि अधिकाऱ्यांचे. 

१९७४ मध्ये काही शेतकरी आपल्या शेतात विहीर खणत होते, तेव्हा त्यांना एक मातीचे मस्तक सापडले. मग पुरातत्व विभागाने त्या भागात उत्खनन केल्यावर ही सगळी सेना सापडली. हे पुतळे किती जुने आहेत? तर फक्त २००० वर्षे जुने आहेत. 

२२१ B.C.मध्ये राज्यावर आलेला चिनी सम्राट Qin Shi Huangdi ह्याच्या थडग्याजवळ काही किलोमीटर अंतरावर ही सगळी सेना सापडली आहे. त्या सम्राटाच्या थडग्याचे मात्र अजून उत्खनन करण्यात आलेले नाही. असे का? तर तिथे राजाच्या सोबतच विविध कलाकृती, मौल्यवान रत्ने आणि दागिने अशा गोष्टी पुरलेल्या आहेत. थडगे उघडले तर हवेच्या संयोगाने ते खराब होतील. म्हणून नवे तंत्रज्ञान सापडेपर्यंत ते थडगे तसेच ठेवण्याचा निर्णय चीन सरकारने घेतलेला आहे. 

असे म्हणतात की त्या थडग्यात पाऱ्याच्या नद्या आणि समुद्र करण्यात आले होते. थडगे उघडताच तेही विषारी ठरू शकेल. 

त्या थडग्यात स्वसंरक्षक रचना देखील केलेली आहे. म्हणजे जसे की दार उघडले जाताच आपोआप बाण लागेल असे. ते देखील प्राणघातक ठरू शकेल. ह्या सर्व कारणांमुळे खुद्द सम्राटाच्या थडग्याचे अजून उत्खनन केले गेले नाही. 

जरी प्रत्यक्ष थडग्याला स्पर्श केला गेला नसला तरी त्याच्या आजुबाजू च्या  परिसराचे उत्खनन झाले आहे. त्यात असे आढळले की राजासोबत त्याच्या अनेक तरुण उपपत्नी, रखेल्या पुरल्या गेल्या होत्या. 

सम्राटाच्या मृत्यूनंतर त्याचा मोठा मुलगा सिंहासनाचा वारस होता. पण त्याच्या दुसऱ्या मुलाला सत्ता हवी होती. त्यासाठी त्याने आपल्या सर्व सख्ख्या व सावत्र भावांना मारून टाकले. एवढेच काय सिंहासनाला आपल्याखेरीज इतर कोणीच वारसदार राहू नये म्हणून वडिलांच्या सर्व रखेल्याना देखील मारून टाकले. न जाणो, त्यातील एखादी सम्राटाच्या मृत्यूच्या वेळी गरोदर असेल, तो वारस कुठेतरी गुप्तपणे वाढवला जाईल आणि नंतर सिंहासनावर हक्क सांगायला येईल म्हणून. त्या सर्वांचे मृतदेह त्याच परिसरात पुरले गेले आहेत. 

इतक्या अघोरी रक्तरंजित मार्गाने सत्ता मिळवलेल्या त्या राजपुत्राला केवळ तीन वर्षे राज्य करता आले. 

जो सम्राट होता, Qin Shi Huangdi त्याला मृत्यूनंतर काय ह्याची खूप उत्सुकता होती. माणसाला अमर करणाऱ्या औषधीच्या शोधात त्याने अनेक प्रवास केले होते, अनेक वर्षे तो शोध घेत होता. मृत्यूनंतरच्या आयुष्यातही आपल्या सोबत असावी म्हणून त्याने ही सगळी टेराकोटा सेना उभारली असे म्हणतात. 

गेल्या जवळपास पन्नास वर्षात, अगदी नेमके सांगायचे तर ४६ वर्षात पुरातत्व खात्याला ६०० तळघरे सापडली आहेत. त्यातील काही तळघरे अजून उघडता आलेली नाहीत. काही तळघरात मात्र प्रवेश करता आला आहे. 

त्यातील दोन तळघरे अशी होती की त्यात काहीतरी संपूर्णपणे जाळून टाकले गेले होते. काय होते त्यात? कोणाला जाळले गेले? का जाळले गेले? कोणालाच माहिती नाही. 

बाकी तळघरातून सैनिकांच्या तुकड्या युद्ध करण्यासाठी तयार असलेल्या अवस्थेत उभ्या दिसतात. कोणाशी युद्ध? मृत्यूशी तर नव्हे? कोणालाच माहिती नाही. 

सेना संरक्षण करण्यासाठी नेमली गेली आहे का? कोणाचे आणि कशापासून संरक्षण? कोणालाच माहिती नाही.

हे सगळे सैनिक आपापल्या हुद्द्याप्रमाणे उभे आहेत. सर्वांचे तोंड पूर्वेकडे आहे. पायदळ, घोडेस्वार, शस्त्रधारी घोडेस्वार एका व्यूहरचनेत उभे आहेत. त्यांच्या अधिकाऱ्यांसाठी स्वतंत्र जागा आहे. बाजूच्या तळघरातून गायक, वादक, कसरतपटू, दरबारी अधिकारी, चित्रविचित्र प्राणी ह्यांचे पुतळे सापडले आहेत. 


टेराकोटा सेना


 

घोडदळ 


पायदळ 

तळघरे 

युद्धासाठी सज्ज

स्वारांची वाट पाहणारे घोडे 

पुतळ्यांची दुरुस्ती, देखरेख 


दर्शिका 

उच्चपदस्थ अधिकारी 

उच्चपदस्थ अधिकाऱ्याचे वर्णन 

विविध पदांवरील सैनिक आणि अधिकारी आपापल्या पदानुसार गणवेश घातलेले आणि शस्त्रे धारण केलेले दाखवले आहेत. 

धनुर्धारी 

धनुर्धाऱ्याचे वर्णन 

उत्खननात हजारो सैनिकांचे पुतळे सापडले. आत्तापर्यंत ८००० हुन अधिक सैनिक, शंभराहून अधिक रथ, पाचशे हुन अधिक घोडे असे पुतळे सापडले आहेत. अजूनही सापडत आहेत. नुकतेच तिथे २०० पुतळे सापडले अशी बातमी आहे. ते कोणाचे पुतळे आहेत ते मात्र अजून चीन ने जगाला सांगितलेलले नाही. प्रत्यक्षात एकूण किती योध्दे होते ते कदाचित कोणालाच, कधीच कळणार नाही. 

तिथे सापडलेले दोन हजार वर्षांपूर्वीचे दोन कास्य रथ हे तर एक अद्भुत नमुना आहेत. प्रदर्शनीत पाहायला मिळतात. 

ह्यातला प्रत्येक सैनिक वेगळा दिसतो. त्याची चेहरेपट्टी, चेहऱ्यावरचे भाव, अंगकाठी सर्व वेगवेगळे. एकही सैनिक दुसऱ्यासारखा नाही. किती कौशल्य त्या शिल्पकारांचे!!! मुळात त्यांचे कपडे रंगीत होते. पण उत्खनन झाल्यावर हवेचा स्पर्श झाल्याने ते रंग उडून गेले आहेत. आता सर्व जण राखाडी रंगा च्या कपड्यात दिसतात. कुठे कुठे मात्र थोडा थोडा रंग अजूनही शिल्लक आहे. 

हे सगळे पुतळे हाताने बनवलेले आहेत. त्यांची उंची आत्ताच्या सर्वसाधारण चिनी माणसापेक्षा खूप जास्त आहे. असे का? हे देखील नवलच आहे. कारण दोन हजार वर्षांपूर्वी देखील चिनी माणूस ह्या पुतळ्यांइतका उंच नव्हता. 

तिथे सापडणाऱ्या स्थानिक पिवळ्या मातीपासून हे पुतळे तयार केले गेलेले आहेत आणि नंतर भट्टीत भाजले गेले आहेत. आसपासच्या परिसरात भट्ट्यांचे अनेक अवशेष सापडले आहेत ते स्वाभाविकच आहे. 



गुडघ्यावर बसलेला धनुर्धारी 

गुडघे टेकलेला धनुर्धारी हा अगदी वैशिष्ट्यपूर्ण पुतळा आहे. त्याने डावा पाय दुमडला आहे आणि उजवा पाय जमिनीवर टेकलेला आहे. 

त्यांची अनेक शस्त्रे. काही शस्त्रांची धातूची टोके, २००० वर्षानंतर अजूनही अगदी चांगल्या स्थितीत आहेत हे एक आश्चर्यच आहे. काहींना तर अजिबात गंजदेखील लागलेला नाही. 

ह्या भव्य कबरीचा परिसर, त्यातील तळघरे आणि पुतळे तयार करण्यासाठी ७,००,००० कामगार जवळपास तीस ते चाळीस वर्षे काम करीत होते. त्यातले काही कैदी, वेठबिगार देखील होते. त्यांच्या हातातल्या बेड्या, गळ्यातले साखळदंड सापडले आहेत. कुठे सापडले? त्याचा उल्लेख नंतर येईलच.

सम्राट Qin Shi Huang मृत्यूनंतरच्या जीवनाच्या कल्पनेने भारून गेला होता, पछाडला गेला होता. राज्यावर आल्या आल्या लगेचच त्याने ह्या कबरींचे काम सुरु करवले होते. 

आपल्या कार्यकाळात त्याने, सतत आपसात लढाई करणाऱ्या वेगवेगळ्या राज्यांना एकत्र आणले. लिपी विकसित केली. नाणी प्रमाणित केली. वजनमापे प्रमाणित केली. वेगवेगळ्या राज्यातले कालवे आणि रस्ते एकमेकांना जोडले. संरक्षणासाठी पहिली भिंत बांधण्याची सुरुवात त्यानेच केली. त्याच भिंतीच्या पुढच्या आवृत्यांना चीनची प्रसिद्ध भिंत म्हणून ओळखले गेले. एकूणच त्याची कारकीर्द अतिशय प्रभावशाली ठरली. 

सर्वात मोठे उत्खनन,आधुनिक काळातला सर्वात मोठा शोध असल्याने टेराकोटा सेना संग्रहालयाला जगभरातुन हजारो लोक भेट देतात. हे संग्रहालय उत्खननाच्या ठिकाणीच उभारण्यात आले आहे. त्यामुळे तुम्हाला प्रत्यक्ष उत्खननाची जागा बघता येते. बाँपो आणि टेराकोटा सेनेच्या शोधामुळे वाढलेल्या पर्यटकांचा खूपच फायदा चीन सरकारला होतो आहे.

पण ज्या शेतकऱ्यांना विहीर खणताना हे सगळे सापडले त्यांचे काय झाले? त्यांची शेते आणि घरे सरकारने ह्या संग्रहालयासाठी, त्याच्या आजूबाजूला असलेल्या दुकानांसाठी घेऊन टाकली. त्यांना अतिशय नाममात्र मोबदला मिळाला. 

एकाने विपन्नावस्थेला कंटाळून, त्याला काही आजार झाला होता तर औषधासाठीही पैसे न उरल्याने गळफास लावून घेऊन आत्महत्या केली. अजून दोन जण काही विचित्र आजाराने ग्रासून मरण पावले. ह्यामुळे अनेक दंतकथा प्रचलित झाल्या. ते कबरस्थान उघडले गेल्याचा शाप शेतकऱ्यांना भोवला अशी चर्चा झाली. म्हणजे श्रीमंत झाले सरकार आणि शाप भोवला गरीब शेतकऱ्यांना. 

ह्यातले काही शेतकरी तुम्हाला पुस्तकांच्या दुकानाबाहेर बसलेले दिसतात. टेराकोटा सेनेविषयीचे एखादे पुस्तक आपण घेतले तर ते त्यावर सही करून देतात. त्याचे त्यांना अगदी थोडे पैसे मिळतात. पण हे शेतकरी खरेच ते शेतकरी आहेत, ज्यांच्या शेतात टेराकोटा सेना सापडली तेच आहेत की कोणी तोतया आहेत, हे मात्र कोणीच सांगू शकत नाही!! 

अजून कित्येक अवशेषांचे उत्खनन होणे बाकी आहे. बराच खजिना अजून जमिनीत दडलेला आहे. किती? ते माहिती नाही. 

स्थानिक लोककथा असेही सांगते की खरेतर ही सगळी खरीखुरी जिवंत सेना होती. एका शापाने ती संपूर्ण सेना मातीची झाली!!

विचार केल्यावर असे वाटते, की सम्राटाने त्याच्या राज्याची प्रतिकृतीच त्या कबर परिसरात उभारायचा प्रयत्न केला होता, मृत्यूनंतरही त्याचा उपभोग घेता यावा म्हणून. 

असे म्हणतात की तिथे काम करणाऱ्या सर्व कामगारांना म्हणजे ७,००,००० लोकांना नंतर मारून टाकण्यात आले. ह्या ठिकाणाचा पत्ता कोणालाही कळू नये म्हणून असे केले गेले असे म्हणतात. २००० वर्षे खरेच त्या ठिकाणाचा मागमूसदेखील जगाला लागला नव्हता. 

मगाशी मी म्हटले की त्यांच्या हातातील बेड्या, गळ्यातील साखळ्या सापडल्या आहेत त्या इथेच..जिथे सात लाख लोक पुरले गेले. 

मला तर सात लाख ह्या आकड्यात थोडी गडबड वाटते. कारण दोन हजार वर्षांपूर्वी जगाची लोकसंख्या किती कमी असेल? त्या काळी सात लाख मजूर आणणे किती अवघड आहे. पण अधिकृत रित्या हाच आकडा सांगितला जातो.

ह्या सर्व चमत्कारिक गोष्टींमुळे, रहस्यामुळे, इतक्या मोठ्या संख्येने पुतळे एकत्र सापडल्यामुळे, ते तयार करतानाच्या कला कौशल्यामुळे, धातुशास्त्राच्या प्रगतीमुळे चीनच्या शान्क्सि भागातील शियान जवळील हे टेराकोटा सेना स्थळ आज जगातील एक महत्वाचे आश्चर्य मानले जाते. मग युनेस्कोने १९८७ मध्ये ह्या ठिकाणाला जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केले त्यात काय नवल!

#LifeAfterDeath #ClayArmy #ChineseEmperorTomb #UnExcavatedTomb #TeracottaWarriors #BanpoCulture #MatriarchalClan #GreatestExcavationOn Earth
 

.


Comments

Popular posts from this blog

लक्ष्मीकेशव मंदिर, कोळीसरे

  मंदिर म्हणजे एक उर्जाकेंद्र! प्राचीन काळापासून भाविक मंदिरात देवतांच्या दर्शनासाठी जात आले आहेत. आजही हिंदू लोक मंदिरात जाऊन, चित्त एकाग्र करून ध्यान, पूजा आणि आरती करतात. यामुळे त्यांना ऊर्जा आणि शांततेचा अनुभव मिळतो. प्रत्येक देवी-देवतेचे एक विशिष्ट मंदिर असते.  असेच कोळीसरे येथे श्री विष्णूचे - लक्ष्मीकेशवाचे सुंदर मंदिर आहे . रत्नागिरी शहरापासून फक्त ५० किलोमीटर अंतरावर किंवा गणपती पुळ्यापासून २१ किलोमीटर अंतरावर निसर्गसुंदर कोळीसरे गाव आहे. पुणे मुंबई हून रत्नागिरी जिल्ह्यातील कोळीसरे येथे जायचे असल्यास चिपळूण मार्गे जाता येईल. परशुराम - कोळीसरे रस्त्यात अशी नयनरम्य दृश्ये अनेकदा दिसतात. परशुराम कोळिसरे रस्ता अगदी कमी लोकवस्तीचे, घनदाट झाडी असलेले हे गाव कोळीसरे फाट्याहून आत गेल्यावर दीड दोन किलोमीटर प्रवास केल्यावर येते. रत्नागिरीहून बसने जाता येते अन्यथा मंदिरापर्यंत पोचण्यासाठी स्वतःचे वाहन असणे सोयीचे आहे.  गाडी पार्क केल्यानंतर काही पायऱ्या उतरून मग घनदाट झाडीत वसलेल्या ह्या मंदिरात जाता येते. ह्या रस्त्यावरून व्हील चेयर जाउ शकत नाही. पार्किंग पासून उ...

नागाव

  नागाव म्हणजे माडापोफळींच्या वाड्या. नागाव म्हणजे केळीच्या बागा. नागाव म्हणजे सुंदर स्वच्छ समुद्रकिनारा.  नागाव म्हणजे वस्त्रगाळ मऊ वाळूचा किनारा.  नागाव म्हणजे अनेक मंदिरे. नागाव म्हणजे लक्षवेधी दीपमाळा. नागाव म्हणजे कोपऱ्या कोपऱ्यावर भेटणारे तळे! नागाव म्हणजे तळ्यात फुललेलीअनेकानेक कमळे!! नागावच्या शेजारचे  अक्षी, चौल, रेवदंडा ही देखील अशीच गावे. नितांतसुंदर, साधी. अलिबाग आणि ह्या सर्व गावांना मिळून अष्टागर असे म्हणत असत. आठ गावांचा समूह.  अलिबाग पर्यटन स्थळ म्हणून ७० च्या दशकापासूनच प्रसिद्ध झाले होते. तेव्हा शांत निवांत असलेले अलिबाग नंतर खूपच गजबजले आणि मग दुसऱ्या सहस्त्रकात अलिबागशेजारील रेवदंडा, नागाव, चौल ही लहान लहान गावे देखील पर्यटनस्थळे म्हणून विकसित होऊ लागली.  ह्या निवांत, शांत गावांना जणू अचानक खडबडून जाग आली. तिथेही पर्यटकांची गर्दी वाढू लागली. स्थानिक लोकांना रोजगार, विकासाची संधी, अर्थार्जनाची संधी त्यात दिसली.  गावांवर आधुनिक पेहराव चढला आणि तिथे उदयाला आली मुंबईकरांची आवडती पर्यटनस्थळे.  आता तर परिस्थिती अशी आहे की जवळ जवळ एका...

हनुमान जन्मस्थळ आणि शबरी धाम, जय श्रीराम, जय जय राम!

आज आपण रामायणातील दोन ठिकाणांना भेट देणार आहोत आणि दोन महान राम भक्तांच्या भेटीसाठी तुम्हाला घेऊन जाताना मला अतिशय आनंद झालेला आहे.  पहिल्यांदा आपण जाऊयात, हनुमानाच्या जन्मस्थानी अंजनेय टेकडीवर. ही टेकडी कर्नाटक मध्ये हंपीजवळच्या भागात आहे असे मानले जाते. ही जागा अंजनीच्या पुत्राचे, अंजनेयाचे म्हणजेच हनुमानाचे जन्मस्थळ आहे.  भारतात अजूनही इतर काही ठिकाणे आहेत की जी हनुमानाचे जन्मस्थळ म्हणून सांगितली जातात. पण अंजनेय टेकडी हे हनुमानाचे जन्मस्थळ असणे मला सर्वात जास्त संयुक्तिक वाटते. कारण ऋष्यमूक पर्वत, जिथे सुग्रीव, हनुमान आणि भगवान श्रीराम यांची भेट झाली होती तो इथून जवळच आहे. हंपीपासून अंजनेय टेकडीपर्यंतचा रस्ता नैसर्गिक सृष्टिसौंदर्याने अतिशय समृद्ध आहे. तुंगभद्रेच्या किनाऱ्यावर असल्यामुळे हा संपूर्ण प्रदेश अत्यंत सुपीक आहे रस्त्याच्या दोन्ही बाजूला सतत तुम्हाला भात शेती, नारळाची झाडे, केळीच्या बागा आणि अर्थातच प्रचंड मोठे खडक, जे ह्या भागाचे वैशिष्ट्य आहेत ते दिसत राहतात. हा संपूर्ण परिसर रामायणातला किष्किंधा भाग मानला जातो. भात शेती केळीच्या बागा भातशेतीचा मखमली गालिचा टे...

पैसाच्या खांबाचे मंदिर!

पैसाच्या खांबाचे मंदिर! अनेक वर्षांपूर्वी दुर्गा बाईंचे ' पैस ' हे पुस्तक वाचनात आले. त्यात होता हा पैसाचा खांब. पैस म्हणजे अवकाश. जिथे ज्ञानेश्वरी लिहिली गेली तो हा पैसाचा खांब. ज्ञानेश्वरीचे जन्मस्थान! खांबाला टेकून बसलेले, ज्ञानेश्वरी सांगत असलेले ज्ञानेश्वर आणि ती लिहून घेत असलेले लेखनिक सच्चिदानंद बाबा असे चित्र आधीही अनेकदा पाहिलेले होते. पण त्या खांबाला ' पैसाचा खांब' म्हणतात हे माहितीच नव्हते. पैस ह्या पुस्तकातील पैसाचा खांब हे प्रकरण वाचले आणि अक्षरशः थरारून गेले. 'पैसाच्या खांबाचे मंदिर' अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा या प्रवरा नदीच्या तीरावरील गावी आहे. नेवासे गावाच्या पश्चिमेला हे मंदिर आहे. 'शके बाराशे बारोत्तरे| तैं टीका केली ज्ञानेश्वरे| सच्चिदानंद बाबा आदरे| लेखकू जाहला|' असा उल्लेख सापडतो. मूर्त आणि अमूर्त ह्याची अशी जोडणी म्हणजे ज्ञानाच्या अनंत अवकाशात जाण्याची पहिली पायरीच जणू. ज्ञानेश्वरी वाचण्याएवढी आणि कळण्याएवढी योग्यता ह्या जन्मात अंगी येईल की नाही माहिती नाही. पण हा खांब पाहू या कधीतरी असे ठरवून टाकले. अवघड नव्हतेच जाणे. संभाजीनगर...

श्री व्याडेश्वर देवस्थान, गुहागर

  कोकणावर निसर्गाचा वरदहस्त आहेच. त्यातही काही गावांनी आपल्या सौंदर्याने विशेष स्थान मिळवले आहे. त्यातील एक महत्वाचे नाव म्हणजे गुहागर. सुंदर लहानसे गाव आहे. एक मुख्य रस्ता, त्याच्या दोन्ही बाजूला घरे, घरांच्या मागे नारळ सुपारीच्या वाड्या. रस्त्याच्या एका बाजूच्या प्रत्येक घराच्या मागच्या वाडीतून समुद्राला जाण्याचा रस्ता, भव्य स्वच्छ समुद्रकिनारा असे हे मोहात पाडणारे गुहागर गाव.  गुहागर प्रसिद्ध आहे व्याडेश्वरासाठी. व्याडेश्वर हे शंकराचे मंदिर अनेक कोकणवासीयांचे कुलदैवत आहे. कोकणातील सर्वात महत्त्वाच्या शिवमंदिरांपैकी एक म्हणजे गुहागरमधील श्री व्याडेश्वर देवस्थान.  श्री व्याडेश्वर देवस्थान.  श्री व्याडेश्वर देवस्थान.  तुम्हाला जर का कधी दक्षिणेतील मंदिरे पाहून वाटले असेल की अशी मंदिरे आपल्या महाराष्ट्रात का नाही?!! तर गुहागरच्या व्याडेश्वर मंदिराला भेट द्या. भव्य सुंदर देवालय आहे. मंदिराचे आवार स्वच्छ, प्रशस्त आहे. मुख्य म्हणजे अगदी नांदते, जागते मंदिर आहे. मंदिराची साफसफाई, निगराणी केली जाते आहे. आवारात भरपूर झाडे आहेत. श्री व्याडे...

श्री क्षेत्र गिरनार

  गिरनार माझ्यासाठी ते मोहक फळ होते, जे मिळायला अवघड होते आणि कितीही हवेहवेसे वाटले तरी त्यासाठी माझ्याकडून प्रयत्न मात्र अजिबात केले गेले नव्हते. गिरनारच्या अद्भुत कथा खूप ऐकल्या, वाचल्या होत्या. गिरनारची मनात ओढ होती. पण ते सगळे मनातच. प्रत्यक्षात कोणतेही ट्रीप ठरवताना, कुठे जायचे याचा विचार करताना पुढे होऊन गिरनारला जाऊयात असे कधी म्हटले नव्हते हेही तितकेच खरे.  श्री क्षेत्र गिरनार  काय आहे गिरनार?  गिरनार हा पर्वत समूह आहे. दत्तात्रेयांचा इथे निवास असल्याने ते हिंदूंच्यासाठी अत्यंत पवित्र आणि महत्वाचे धार्मिक स्थळ आहे.  हिमालयापेक्षाही जुना असलेला हा पर्वत अनेक नावांनी प्राचीन साहित्यात आलेला आहे. रेवतक हे त्यातील सर्वात जास्त माहिती असलेले नाव.  जैन लोकांसाठी देखील हे अत्यंत महत्वाचे ठिकाण आहे कारण इथे जैन मंदिर समूह देखील आहे. नेमिनाथ, आदिनाथ, मल्लिनाथ आणि इतर तीर्थंकरांची मंदिरे आहेत.  कुठे आहे गिरनार ? गुजराथ, सौराष्ट्र मधील जुनागढ जवळ गिरनारच्या पायथ्याचे, तलेटी नावाचे गाव आहे.  गिरनारला लोक का जातात? तेथील द...

हिंदवी स्वराज्याची राजधानी - किल्ले रायगड

रायगड! हे नाव घेताच मनात उठणारे भावतरंग अवर्णनीय असेच असतात. ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी म्हणजे 'शिव राज्याभिषेक दिन', 'हिंदू साम्राज्य दिन'. अभिमानाचा, गौरवाचा दिवस. भारतीय इतिहास हा संघर्षाचा व विजयाचा आहे. त्यातील झळाळून उठणारे तेजस्वी, सोनेरी पान म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे कर्तृत्व! शिवाजी महाराज आणि त्यांच्या मावळ्यांचे अविश्रांत परिश्रम पूर्णत्वाला पोचले ते ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी, १६७४ ह्या दिवशी. हा केवळ राज्याभिषेक नव्हता. हिंदवी स्वराज्याची स्थापना झाल्याची केवळ अधिकृत घोषणा नव्हती. तर संतांच्या उपदेशांनी जागलेली सज्जन शक्ती, मावळ्यांच्या रूपातील सामान्य जनतेच्या मनात जागलेली वीरवृत्ती ह्यांच्या संगमाने घडलेला तो एक अभूतपूर्व अविष्कार होता. राज्याभिषेक ही शिवाजी महाराजांची व्यक्तिगत महत्वाकांक्षा नव्हती. रोहिडेश्वर येथे लहानपणी घेतलेली प्रतिज्ञा अथक प्रयत्नांनी पूर्ण झाली होती. "हे हिंदवी स्वराज्य व्हावे हे तो श्रींची इच्छा" हे वचन सार्थ झाले होते. पण राज्याभिषेकाच्या निमित्ताने शिवाजीमहाराजांनी मोठ्या युक्तीने त्यांच्यावर असलेली लोकांची निष्ठा सिंहा...

परशुराम कुंड, अरुणाचल.

अरुणाचल मधील टेंगापानी, नामसाईच्या गोल्डन पॅगोडाहुन परशुराम कुंड ला जाण्यासाठी  आम्ही निघालो. ही गोष्ट आहे ऑक्टोबर २०१९ मधील.  त्या दिवशी सतत पाऊस पडत होता. सगळीकडे हिरवेगार तर अरुणाचल मध्ये नेहमीच असते. पावसात भिजलेली झाडे, स्वच्छ हिरवळ, मध्येच ढगांत अदृश्य होणाऱ्या पर्वतरांगा, वाहणारे थंडगार वारे, फार सुंदर होते ते सगळे.  अरुणाचल  डोंगरातला रस्ता होता. तुफान वारा होता. त्या सगळ्या अवाढव्य डोंगराळ प्रदेशात आमची गाडी म्हणजे एक ठिपका होती. वाऱ्याने उडून जायला वेळ लागणार नाही इतका जोरात वारा वाहत होता. एक खिडकी फोटो काढण्यासाठी उघडली तर ड्राइवर म्हणाला की दुसऱ्या बाजूची पण उघडा, नाहीतर आत आलेल्या वाऱ्याने गाडी हलायला लागेल. शेजारी खोल दरी दिसत असताना गाडी हलायच्या कल्पनेने अंगावर काटा आला आणि पहिली खिडकी देखील फोटो काढल्या काढल्या बंद केली..नकोच ती वाऱ्याची परीक्षा!  रस्ता कसा होता हे प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी पुढे दिलेल्या लिंकवर क्लिक करून विडिओ नक्की बघा. Namsai- Parshuram kund road ह्या नदीचे नाव लोहित आणि ह्या जिल्ह्याचेही नाव लोहित. लोहितचा अर्थ रक्त किंवा रक्...

सिद्धेश्वर मंदिर, टोके - प्रवरा संगमावर उमललेले दगडी बिल्वपत्र

भिंतीवरील कोरीवकाम  महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्ह्यातले टोके हे एक लहान गाव. अहिल्यानगर कडून छत्रपती संभाजीनगरला जाताना डावीकडे नदीच्या काठावर हे सुंदर मंदिर आपल्याला दिसते. जगप्रसिद्ध वेरूळ, अजिंठा लेणी बघायची असतील तर सांभाजीनगरला जावे लागते हे आपल्याला माहिती असेलच. सिद्धेश्वर मंदिर, टोके हे मला एखाद्या दगडी बेलपत्राप्रमाणे वाटले. हे बेलपत्र उमलले आहे अमृतवाहिनी प्रवरा आणि दक्षिणगंगा गोदावरीच्या संगमावर. त्या संगमाच्या, ज्याला प्रवरा संगम म्हणतात त्या परिसरात सिद्धेश्वर, घटेश्वर, मुक्तेश्वर, रामेश्वर, संगमेश्वर अशी अनेक मंदिरे आहेत. पण सर्वात खास आणि सुंदर आहे ते सिद्धेश्वर मंदिर. सिद्धेश्वर मंदिर परिसर बघा असा दिसतो! हा फोटो घेतला होता सप्टेंबर २०१९ मध्ये. पावसाळा भरपूर बरसून आता आपला मुक्काम आवरत होता आणि नद्यांना भरपूर पाणी होते तेव्हाचा! मंदिराचा परिसर  सिद्धेश्वर मंदिर समूह हा तुलनेने नवा समूह आहे, अठराव्या शतकात बांधला गेलेला. पेशव्यांच्या काळात बांधल्या गेलेल्या ह्या मंदिराला सभोवताली एखाद्या छोट्या किल्ल्यासारखी किंवा गढीसारखी उंच भिंत आहे. मुख्य मंदिर आहे शंकराचे...

शिवथरघळ

जर आपण भारताचा नकाशा पाहिला  तर आपल्याला नकाशात डावीकडे, गुजरात ते कन्याकुमारीपर्यंत काळसर  हिरवी रेषा दिसते. ही रेषा  गुजराथ येथून सुरु होते  आणि महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, तामिळनाडू मार्गे जाऊन केरळला पोहोचते. ती रेषा म्हणजेच पश्चिम घाट आहे. पश्चिम घाट म्हणजे दख्खनच्या पठाराची जणू किनारच आहे. दख्खन पठाराच्या काठावरच्या ह्या पर्वत रांगा आहेत.  या भागात बरीच जंगले, जलसाठे, धबधबे आहेत आणि जैवविविधता तसेच त्याचे वय यामुळे या भागाला 'युनेस्को जागतिक वारसा' म्हणून ओळखले गेले आहे. पश्चिम घाट हिमालयापेक्षाही जुना आहे! वरंधा घाट  📷विकिमीडिया कॉमन्स  पश्चिम घाट हा अनेक मुख्य नद्यांचे उगमस्थान आहे. वरील छायाचित्रात दिसते आहे त्या प्रमाणे, वर्षा ऋतूत या प्रदेशात अनेक धबधबे पाहायला मिळतात.  पश्चिम घाटातील (महाराष्ट्र) अनेक सुंदर धबधब्यांपैकी एक म्हणजे शिवथरघळ धबधबा. जेव्हा मुसळधार पाऊस पडतो तेव्हा धबधबा त्याच्या पूर्ण रौद्र सौंदर्यानिशी आणि ताकदीनिशी रोरावत खाली येताना दिसतो.  हा धबधबा सुमारे शंभर फूट उंचीवर...