Skip to main content

ज्येजू - Seogwipo city- कॅनोलाची फुले

पिवळा रंग म्हणजे तेज. पिवळा रंग म्हणजे आनंद. पिवळा रंग म्हणजे सकारात्मकता. पिवळा रंग म्हणजे सूर्यप्रकाश. पिवळा रंग म्हणजे वसंत ऋतू!

गेल्या आठवड्यात भारतात आम्ही विजयादशमी साजरी केली. दारांना झेंडूच्या माळा बांधल्या. झेंडूचा तो झळाळता पिवळा आणि केशरी रंग खूपच ऊर्जा देणारा आहे. त्या पिवळ्या रंगाने मला आठवण झाली ती एका ठिकाणाची. असे ठिकाण की जिथे नजर पोचेल तिथपर्यंत, मला असा सुंदर ऊर्जादायी पिवळा रंग दिसला होता. 

ते ठिकाण होते दक्षिण कोरियामधील ज्येजू बेट. दक्षिण कोरियाला अपार नैसर्गिक सौंदर्याचे वरदान लाभलेले आहे आणि ज्येजू तर जणू त्या नैसर्गिक सौंदर्याचा मुकुटमणीच!

पूर्वी ज्येजू अनेक नावानी ओळखले जात असे. देवांची भूमी, कोरियाचे हवाई अशी अनेक नावे. त्यातील सर्वात योग्य नाव होते समदादो. समदादो म्हणजे तीन गोष्टी विपुल प्रमाणात असणारे बेट. कोणत्या होत्या त्या तीन गोष्टी? तर खडक, वारा आणि स्त्रिया. 
 
ज्वालामुखीच्या मुळे बनलेले बेट असल्याने सर्वत्र बसाल्ट खडक दिसतो. समुद्रात असलेले स्वतंत्र बेट आहे, त्यामुळे चहुबाजूनी वारा वर्षभर घोंघावत असतो. त्यामुळे ज्येजू ला कधी कधी वादळी रस्त्यावरचे वळण किंवा कोपरा असेही म्हटले जाते. कधी काळी ज्येजू ला मातृसत्ताक पद्धतीशी साधर्म्य असलेली कुटुंब पद्धती देखील होती. स्त्रियांनी ज्येजूची खडकाळ जमीन सुपीक बनवण्यासाठी शतकानुशतके अपार मेहनत केलेली आहे. शिवाय ज्येजू च्या हेनयो पाणबुड्या महिला तर जगप्रसिद्ध आहेत. कोणत्याही संरक्षक उपकरणांच्या शिवाय, खोल पाण्यात बुडी मारून अबलोन्स आणि इतर सागरी जीव संपत्ती कमावून आणणाऱ्या ह्या निधड्या महिला जगात एकमेव. 

मी तुम्हाला म्हणाले की झेंडूच्या उत्सवी पिवळ्या केशरी रंगामुळे मला ज्येजूची आठवण झाली. ज्येजूवरील पिवळा रंग आहे कॅनोला फुलांचा आणि केशरी रंग आहे संत्र्यांचा. 

गन्ग्यूल जातीची ही संत्री सगळीकडे तुम्हाला दिसतील. साधारण पणे मँडरिन ऑरेंजेस किंवा टॅन्ग्रीन्स सारखी असणारी ही छोटी छोटी संत्री. बागांतून तर असतातच पण अगदी रस्त्याच्या कडेला देखील, झुडुपांच्या रांगाच्या रांगा ह्या संत्र्यांनी लगडलेल्या दिसतात. काही संत्री तर जमिनीवर गळून पडलेली देखील असतात. पण कोणी ती उचलत नाहीत. ती शहराच्या नगरपालिकेच्या मालकीची असतात. हे पाहिल्यावर ज्येजूचे अजून एक नाव किती चपखल आहे त्याची जाणीव होते. अजून एक नाव होते सम्मोदो. त्याचा अर्थ तीन गोष्टी नसलेले बेट. कोणत्या होत्या त्या तीन गोष्टी? तर चोर, भिकारी आणि घरांची फाटके! चोर आणि भिकारी नसल्यामुळे घरांना फाटके लावायची गरज नव्हतीच. 

ज्येजूची अर्थव्यवस्था खरेतर उद्योगधंदे, शेती आणि मासेमारीवर अवलंबून होती. पण आता पर्यटन व्यवसायाने ह्या साऱ्यांना मागे टाकले आहे. दक्षिण कोरियातीलच नव्हे तर जगभरातील सगळ्यांनाच जिथे जायचे असते असे हे ठिकाण. अनेक गोष्टींसाठी ज्येजू प्रसिद्ध आणि प्रेक्षणीय आहे. दरवर्षी हजारो लाखो कोरियन आणि चिनी प्रवासी ज्येजूला भेट देतात. 

पर्यटनावर आधारलेली अर्थव्यवस्था असेल तरीही चिनी प्रवाशांची वाढती संख्या खरे तर स्थानिक लोकांना फारशी आवडत नाही. त्यांचे म्हणणे आहे की जरी चिनी लोक ज्येजूमध्ये येऊन पैसे खर्च करतात तरी ते पैसे नेहमी चिनी माणसाच्या हॉटेलमध्येच खर्च करतात. त्याचा स्थानिकांना काही उपयोग नाही. चिनी लोक जमिनीचे, जागेचे मालक असण्याचे प्रमाण गेल्या काही दशकात अनेक पटींनी वाढले आहे. 

पण मग नंतर आली चीन सरकारने साऊथ कोरियाला जाणारी तिकिटे विकू नयेत अशी चिनी पर्यटन कंपन्यांना केलेली सूचना. ह्याचे कारण होते दक्षिण कोरियाने उभारलेली Thadd- terminal high altitude area defense system. चीन सरकारला हे आवडले नव्हते. खरेतर चिनी लोक इतक्या जास्त प्रमाणात यायचे की ते यायचे बंद झाल्यावर पर्यटन व्यवसाय धोक्यातच आला असता. पण आता चिनी लोक येत नाहीत म्हटल्यावर, सगळीकडे त्यांचा गोंधळ नसेल असे जाणवल्यावर, दक्षिण कोरियाच्या मुख्य प्रदेशातील लोक जास्त प्रमाणात यायला लागले. ज्येजू ला भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढली. 

 


दिवसाची सुरुवात
थोडा ढगाळ दिवस!

तर आता परत वळू या आपल्या कॅनोलाच्या फुलांकडे! कॅनोला काय आहे? रॅपसीड नावाच्या तेलबियांपासून एक सुधारित वाण तयार केला गेला. हा वाण शोधला आणि तयार केला होता कॅनडा ने. त्यामुळे कॅन म्हणजे कॅनडा आणि ओला म्हणजे तेल. रॅपसीड पेक्षा कॅनोला अधिक चांगले कारण त्यात आम्ल कमी प्रमाणात असते. ह्या तेलात अँटीबॅक्टरीअल आणि इतरही औषधी गुणधर्म आहेत. मोहरीच्या जातीतील ह्या बिया आहेत. कॅनोला ला कोरियन भाषेत यूचे म्हणतात. पण त्याचे नाव घेताना म्हणतात यूक्कोत! म्हणजे यूचे चे फुल असे म्हणतात.

वसंत ऋतूचे आगमन ज्येजू बेटावर साधारणपणे मार्चच्या मध्यात होते. ज्येजूची खासियत अशी की तुम्ही चेरी ब्लॉसम (कोरियन भाषेत त्याला बेक्कोत म्हणतात.) आणि यूक्कोत चा बहर एका वेळी पाहू शकता! ह्याच मुळे ज्येजू हे वसंत ऋतूचा आनंद घेण्यासाठी सर्वांचे आवडते ठिकाण आहे. 
 


 नंतर काय दिसणार आहे ह्याची एक झलक
रस्त्याच्या बाजूला पडलेल्या चेरी ब्लॉसम आणि कॅनोलाच्या पाकळ्या.
 
चेरीब्लॉसम चा सरता बहर 
 
चेरी ब्लॉसम - बेक्कोत 


कॅनोला ची फुले


युक्कोतचा गुच्छ 

 Seogwipo शहर ज्याच्यासाठी प्रसिद्ध आहे ते सगळे!
घोडे, चेरी ब्लॉसम आणि कॅनोला ची फुले 


युक्कोत आणि बेक्कोत 

ह्या विस्तीर्ण पटावर बेक्कोतचा फिका गुलाबी आणि युक्कोत चा झगमगता पिवळा रंग अतिशय खुलून दिसतात. बेक्कोत ची झाडे उंच असतात तर यूक्कोत फुले झुडुपांवर येतात. लाल जमीन, पिवळे यूक्कोत, गुलाबी बेक्कोत, काळे बसाल्ट चे डोंगर आणि गडद निळे आकाश. रंगांचा आणि आकारांचा अतिशय मनोवेधक पट आपल्यासमोर उलगडत जातो! 

हे दोन्हीही म्हणजे चेरी ब्लॉसम आणि कॅनोला अल्पकाळासाठीच फुलतात. त्यामुळे तुम्हाला तुमची ट्रिप त्यांच्या फुलण्याच्या वेळा बघून त्याप्रमाणे ठरवायला लागते. आम्ही ज्येजूला एप्रिल २०१९ मध्ये भेट दिली होती आणि आमचे नशीब चांगले की आम्हांला बेक्कोतचा सरता बहर आणि यूक्कोतचा ऐन बहर बघता आला होता. 

ज्येजूच्या Seogwipo शहरात १९६० पासून कॅनोलाची मोठ्या प्रमाणात लागवड होते. जेव्हा ही फुले बघायला येणारे पर्यटक म्हणजे अर्थव्यवस्थेला भरती हे गणित स्थानिक ग्रामपरिषदांच्या लक्षात आले तेव्हा त्यांनी आणखी मोठ्या प्रमाणात कॅनोलाची लागवड करायला सुरुवात केली. 

Gasi Ri नावाचे गाव कॅनोलाच्या फुलांसाठी प्रसिद्ध आहे. सर्वात जास्त फुले बघायला मिळतात असे ते ठिकाण आहे. दरवर्षी एप्रिल महिन्यामध्ये तिथे ज्येजू कॅनोला पुष्प महोत्सव भरवला जातो. विविध कार्यक्रम होतात. सांस्कृतिक कार्यक्रम, शोभायात्रा, फोटो काढण्यासाठी तयार केलेली ठिकाणे, खाद्यपदार्थ स्पर्धा, कार्यशाळा आणि विक्री, गोंडस बालक स्पर्धा, भेटवस्तू, स्मृतिचिन्हे आणि कितीतरी कार्यक्रम असतात. तीन दिवसांसाठी हा महोत्सव चालतो. ह्या फुलांच्या बहराच्या काळात साधारणपणे १६०,००० लोक ज्येजूला भेट देतात.

 ह्या गावात १० किलोमीटर लांबीचा एक रस्ता आहे, त्याचे नाव Noksan-ro. हा रस्ता दक्षिण कोरियातील सर्वात सुंदर रस्त्यांपैकी एक म्हणून प्रसिद्ध आहे. का बरे? कारण त्याच्या दोन्ही बाजूला चेरी ब्लॉसम आणि कॅनोला फुले फुललेली असतात! दहा किलोमीटर लांबीच्या रस्त्यावर दुतर्फा हे पुष्पवैभव आपल्या डोळ्यांना, मनाला सुखावत असते. जेव्हा तो रस्ता समोर येतो तेव्हा त्यांच्या प्रथम दर्शनानेच आपण अवाक होऊन जातो. नक्कीच तो जगातील सर्वात नयनरम्य रस्त्यांपैकी एक आहे.

 
Noksan Ri 



 Noksan -ro वरून प्रवास करताना अर्थातच तुम्ही अनेकदा गाडी थांबवून खाली उतरता. फोटो घेण्यासाठी! तुम्ही स्वतःला थांबवूच शकत नाही. त्या सुंदर दृश्याने तुमचे भान हरपलेले असते. पण विरुद्ध दिशेने वेगात येणाऱ्या वाहनांकडे मात्र लक्ष राहू द्या!

 Noksan Ri - एक सुंदर रस्ता!

हा प्रवास झाल्यावर किंवा खरे तर ह्या सुंदर प्रवासातच तुम्ही पोचता Gas ri पवन ऊर्जा निर्मिती केंद्राच्या जवळच्या शेतांमध्ये. आमची गाडी जेव्हा मुख्य रस्त्यावरून डावीकडे वळली तेव्हा समोर एक अतिशय रुक्ष भिंत आली. एखाद्या गोदामाची असावी तितकीच अनाकर्षक. मला कळलेच नाही की इतक्या सुंदर रस्त्यावरून इतक्या रुक्ष ठिकाणी ड्रॉयव्हर आम्हाला का घेऊन आला असेल? त्याने नुसते सांगितले की आत जा. त्याच्या सूचनेप्रमाणे आम्ही आत गेलो आणि आमच्या समोर होते आयुष्यात क्वचितच पाहायला मिळते इतके सुंदर दृश्य! 

जिथपर्यंत नजर पोचेल तिथपर्यंत ही छोटुकली, नाजूक, झळाळत्या पिवळ्या रंगाची सुंदर फुले वाऱ्यावर डोलत होती. मी आयुष्यात कधीही हे दृश्य विसरणार नाही. जादुई दृश्य, दैवी दृश्य. शांतता देणारे दृश्य. जरी मुख्य रस्ता जवळच होता, तरी वाहनांचा आवाज शांती भंग करण्यासाठी कानांपर्यंत येत नव्हता. त्या पवन चक्क्या आणि डोंगर आजोबा ह्या शेतात खेळणाऱ्या कॅनोला बाळांवर लक्ष ठेवून होते. आकाश साक्षीभावाने माझ्या उचंबळून आलेल्या भावनांकडे पाहत होते. एकदम पारलौकिक, अद्भुत अनुभव होता तो. 


















फुलांच्या महासागरात हरवताना
चकित करणारा परमानंद अनुभवताना 
हरवून जाते भान स्थळकाळाचे 
वाटते अनंतकाळापासून आहोत असेच, इथेच.
निसर्गाबरोबर एकात्मभावाचा प्रत्यय येतानाच 
ते गारुड कब्जा घेते तुमचा, 
आता तुम्हाला आनंद नुसता वाटत नसतो..
तर तुम्हीच आनंदस्वरुप बनलेले असता!! 

तिथे कुंपणे नाहीत. तुम्ही फुलांच्या जवळ जाऊ शकता, फुलांच्या रांगांतून चालू शकता. फुलांची काळजी घेण्याची जबाबदारी तुमच्यावरच टाकलेली असते. तिथे कोणी रखवालदार नसतात. पण प्रत्येकाला हे माहिती असते, की तुमच्याकडे कोणी बघत नसताना देखील, तुम्ही कसे वागता ह्यावरून तुमची संस्कृती आणि संस्कार दिसतात! अर्थात काही नग तिथेही असतातच, की जे फुले तोडतात किंवा फोटो काढण्याच्या गडबडीत, खरे तर नशेत, फुले पायदळी तुडवतात. मात्र त्यांचे प्रमाण अत्यल्प आहे. बाकी सगळे अगदी जपूनच चालतात. 

आम्ही ज्येजू ला एप्रिल २०१९ मध्ये गेलो होतो. मला उत्सुकता होती २०२० च्या ज्येजू कॅनोला पुष्प महोत्सवाचे काय होणार ह्याची. दक्षिण कोरियाने कोरोनाचा अतिशय यशस्वी सामना केला होता. मार्च मध्येच त्यांच्याकडची रुग्णसंख्या खूप कमी झाली होती. 

मी बातम्यांवर लक्ष ठेवले होते. पण जे वाचायला मिळाले ते अतिशय धक्कादायक होते. फुले तर निसर्गनियमानुसार वेळच्या वेळीच फुलली होती. स्थानिक प्रशासन, लोकांना ज्येजूला भेट न देण्याचे, सोशल डिस्टंसिंग पाळण्याचे आवाहन करीत होते. हॉटेल्स आणि विमानकंपन्या मात्र ज्येजूला लोकांनी भेट द्यावी म्हणून, खास सवलती जाहीर करत होत्या. बाकी अनेक देशांनी विमान वाहतूक बंद केल्याने जे कोरियन लोक दुसरीकडे फिरायला जाऊ शकत नव्हते त्या सगळ्यांनी ह्या सवलतींचा लाभ घ्यायला सुरुवात केली. 

अशा बाहेरून येणाऱ्या प्रवाश्यांमुळे, स्थानिक लोकांना कोरोना संसर्ग होण्याच्या घटना आढळू लागल्या तशी स्थानिक जनतेला आणि प्रशासनाला चिंता वाटू लागली. Seogwipo नगर परिषदेला नाईलाजाने एक दुःखद आणि क्रूर निर्णय घ्यावा लागला. 

त्यांनी चक्क चार ट्रॅक्टर आणले आणि सगळ्या शेतातून फिरवून सर्व फुले तोडून टाकली. हेक्टर च्या हेक्टर जिथे फुललेले रान होते ते आता उजाड माळरान होऊन गेले. त्या गावात अनेक वयोवृद्ध लोक राहत असल्याने, त्यांना संसर्ग होऊ नये म्हणून स्थानिक प्रशासनाने हा निर्णय घेतला. येणाऱ्या लोकांना रोखण्यासाठी हा निर्णय घ्यावा लागला असे नगर परिषदेने जाहीर केले. 

तुम्ही इंटरनेट वर शोधलेत तर अजूनही ह्या बातम्या आणि फोटोज पाहू शकता. 
https://www.dailymotion.com/video/x7t6qhk ह्या लिंकवर विडिओ देखील पाहू शकता.
 
मी जेव्हा बातम्या वाचल्या, हा विडिओ पाहिला तेव्हा अतिशय दुःख झाले. माणसे त्यांची पैश्यांची हाव, त्यांच्या ईच्छा आणि लहरी ह्यावर नियंत्रण ठेवू शकत नाहीत ह्याची शिक्षा फुलांना का? त्यांचा काय दोष? माणसांना वळण लावणे अवघड आहे, फुलांना जमीनदोस्त करणे सोपे आहे.
 
जास्त प्रमाणात पर्यटक यावेत, पैसे मिळावेत म्हणून मोठ्या प्रमाणात फुलांची शेती केली गेली. येणाऱ्या लोकांपासून, प्राणांचे भय निर्माण झाले तेव्हा त्यांना येण्यापासून रोखण्यासाठी ती उपटून टाकली गेली. एक वर्तुळ पूर्ण झाले. 

#PlacesToSeeInSouthKorea #CanolaFestivalInJeju #HaenyeoInJeju #HaenyeoWomenBraveWomen #CherryBlossomInJeju #YellowFlowersInJeju


 

 

 


Comments

Popular posts from this blog

लक्ष्मीकेशव मंदिर, कोळीसरे

  मंदिर म्हणजे एक उर्जाकेंद्र! प्राचीन काळापासून भाविक मंदिरात देवतांच्या दर्शनासाठी जात आले आहेत. आजही हिंदू लोक मंदिरात जाऊन, चित्त एकाग्र करून ध्यान, पूजा आणि आरती करतात. यामुळे त्यांना ऊर्जा आणि शांततेचा अनुभव मिळतो. प्रत्येक देवी-देवतेचे एक विशिष्ट मंदिर असते.  असेच कोळीसरे येथे श्री विष्णूचे - लक्ष्मीकेशवाचे सुंदर मंदिर आहे . रत्नागिरी शहरापासून फक्त ५० किलोमीटर अंतरावर किंवा गणपती पुळ्यापासून २१ किलोमीटर अंतरावर निसर्गसुंदर कोळीसरे गाव आहे. पुणे मुंबई हून रत्नागिरी जिल्ह्यातील कोळीसरे येथे जायचे असल्यास चिपळूण मार्गे जाता येईल. परशुराम - कोळीसरे रस्त्यात अशी नयनरम्य दृश्ये अनेकदा दिसतात. परशुराम कोळिसरे रस्ता अगदी कमी लोकवस्तीचे, घनदाट झाडी असलेले हे गाव कोळीसरे फाट्याहून आत गेल्यावर दीड दोन किलोमीटर प्रवास केल्यावर येते. रत्नागिरीहून बसने जाता येते अन्यथा मंदिरापर्यंत पोचण्यासाठी स्वतःचे वाहन असणे सोयीचे आहे.  गाडी पार्क केल्यानंतर काही पायऱ्या उतरून मग घनदाट झाडीत वसलेल्या ह्या मंदिरात जाता येते. ह्या रस्त्यावरून व्हील चेयर जाउ शकत नाही. पार्किंग पासून उ...

नागाव

  नागाव म्हणजे माडापोफळींच्या वाड्या. नागाव म्हणजे केळीच्या बागा. नागाव म्हणजे सुंदर स्वच्छ समुद्रकिनारा.  नागाव म्हणजे वस्त्रगाळ मऊ वाळूचा किनारा.  नागाव म्हणजे अनेक मंदिरे. नागाव म्हणजे लक्षवेधी दीपमाळा. नागाव म्हणजे कोपऱ्या कोपऱ्यावर भेटणारे तळे! नागाव म्हणजे तळ्यात फुललेलीअनेकानेक कमळे!! नागावच्या शेजारचे  अक्षी, चौल, रेवदंडा ही देखील अशीच गावे. नितांतसुंदर, साधी. अलिबाग आणि ह्या सर्व गावांना मिळून अष्टागर असे म्हणत असत. आठ गावांचा समूह.  अलिबाग पर्यटन स्थळ म्हणून ७० च्या दशकापासूनच प्रसिद्ध झाले होते. तेव्हा शांत निवांत असलेले अलिबाग नंतर खूपच गजबजले आणि मग दुसऱ्या सहस्त्रकात अलिबागशेजारील रेवदंडा, नागाव, चौल ही लहान लहान गावे देखील पर्यटनस्थळे म्हणून विकसित होऊ लागली.  ह्या निवांत, शांत गावांना जणू अचानक खडबडून जाग आली. तिथेही पर्यटकांची गर्दी वाढू लागली. स्थानिक लोकांना रोजगार, विकासाची संधी, अर्थार्जनाची संधी त्यात दिसली.  गावांवर आधुनिक पेहराव चढला आणि तिथे उदयाला आली मुंबईकरांची आवडती पर्यटनस्थळे.  आता तर परिस्थिती अशी आहे की जवळ जवळ एका...

हनुमान जन्मस्थळ आणि शबरी धाम, जय श्रीराम, जय जय राम!

आज आपण रामायणातील दोन ठिकाणांना भेट देणार आहोत आणि दोन महान राम भक्तांच्या भेटीसाठी तुम्हाला घेऊन जाताना मला अतिशय आनंद झालेला आहे.  पहिल्यांदा आपण जाऊयात, हनुमानाच्या जन्मस्थानी अंजनेय टेकडीवर. ही टेकडी कर्नाटक मध्ये हंपीजवळच्या भागात आहे असे मानले जाते. ही जागा अंजनीच्या पुत्राचे, अंजनेयाचे म्हणजेच हनुमानाचे जन्मस्थळ आहे.  भारतात अजूनही इतर काही ठिकाणे आहेत की जी हनुमानाचे जन्मस्थळ म्हणून सांगितली जातात. पण अंजनेय टेकडी हे हनुमानाचे जन्मस्थळ असणे मला सर्वात जास्त संयुक्तिक वाटते. कारण ऋष्यमूक पर्वत, जिथे सुग्रीव, हनुमान आणि भगवान श्रीराम यांची भेट झाली होती तो इथून जवळच आहे. हंपीपासून अंजनेय टेकडीपर्यंतचा रस्ता नैसर्गिक सृष्टिसौंदर्याने अतिशय समृद्ध आहे. तुंगभद्रेच्या किनाऱ्यावर असल्यामुळे हा संपूर्ण प्रदेश अत्यंत सुपीक आहे रस्त्याच्या दोन्ही बाजूला सतत तुम्हाला भात शेती, नारळाची झाडे, केळीच्या बागा आणि अर्थातच प्रचंड मोठे खडक, जे ह्या भागाचे वैशिष्ट्य आहेत ते दिसत राहतात. हा संपूर्ण परिसर रामायणातला किष्किंधा भाग मानला जातो. भात शेती केळीच्या बागा भातशेतीचा मखमली गालिचा टे...

पैसाच्या खांबाचे मंदिर!

पैसाच्या खांबाचे मंदिर! अनेक वर्षांपूर्वी दुर्गा बाईंचे ' पैस ' हे पुस्तक वाचनात आले. त्यात होता हा पैसाचा खांब. पैस म्हणजे अवकाश. जिथे ज्ञानेश्वरी लिहिली गेली तो हा पैसाचा खांब. ज्ञानेश्वरीचे जन्मस्थान! खांबाला टेकून बसलेले, ज्ञानेश्वरी सांगत असलेले ज्ञानेश्वर आणि ती लिहून घेत असलेले लेखनिक सच्चिदानंद बाबा असे चित्र आधीही अनेकदा पाहिलेले होते. पण त्या खांबाला ' पैसाचा खांब' म्हणतात हे माहितीच नव्हते. पैस ह्या पुस्तकातील पैसाचा खांब हे प्रकरण वाचले आणि अक्षरशः थरारून गेले. 'पैसाच्या खांबाचे मंदिर' अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा या प्रवरा नदीच्या तीरावरील गावी आहे. नेवासे गावाच्या पश्चिमेला हे मंदिर आहे. 'शके बाराशे बारोत्तरे| तैं टीका केली ज्ञानेश्वरे| सच्चिदानंद बाबा आदरे| लेखकू जाहला|' असा उल्लेख सापडतो. मूर्त आणि अमूर्त ह्याची अशी जोडणी म्हणजे ज्ञानाच्या अनंत अवकाशात जाण्याची पहिली पायरीच जणू. ज्ञानेश्वरी वाचण्याएवढी आणि कळण्याएवढी योग्यता ह्या जन्मात अंगी येईल की नाही माहिती नाही. पण हा खांब पाहू या कधीतरी असे ठरवून टाकले. अवघड नव्हतेच जाणे. संभाजीनगर...

श्री व्याडेश्वर देवस्थान, गुहागर

  कोकणावर निसर्गाचा वरदहस्त आहेच. त्यातही काही गावांनी आपल्या सौंदर्याने विशेष स्थान मिळवले आहे. त्यातील एक महत्वाचे नाव म्हणजे गुहागर. सुंदर लहानसे गाव आहे. एक मुख्य रस्ता, त्याच्या दोन्ही बाजूला घरे, घरांच्या मागे नारळ सुपारीच्या वाड्या. रस्त्याच्या एका बाजूच्या प्रत्येक घराच्या मागच्या वाडीतून समुद्राला जाण्याचा रस्ता, भव्य स्वच्छ समुद्रकिनारा असे हे मोहात पाडणारे गुहागर गाव.  गुहागर प्रसिद्ध आहे व्याडेश्वरासाठी. व्याडेश्वर हे शंकराचे मंदिर अनेक कोकणवासीयांचे कुलदैवत आहे. कोकणातील सर्वात महत्त्वाच्या शिवमंदिरांपैकी एक म्हणजे गुहागरमधील श्री व्याडेश्वर देवस्थान.  श्री व्याडेश्वर देवस्थान.  श्री व्याडेश्वर देवस्थान.  तुम्हाला जर का कधी दक्षिणेतील मंदिरे पाहून वाटले असेल की अशी मंदिरे आपल्या महाराष्ट्रात का नाही?!! तर गुहागरच्या व्याडेश्वर मंदिराला भेट द्या. भव्य सुंदर देवालय आहे. मंदिराचे आवार स्वच्छ, प्रशस्त आहे. मुख्य म्हणजे अगदी नांदते, जागते मंदिर आहे. मंदिराची साफसफाई, निगराणी केली जाते आहे. आवारात भरपूर झाडे आहेत. श्री व्याडे...

श्री क्षेत्र गिरनार

  गिरनार माझ्यासाठी ते मोहक फळ होते, जे मिळायला अवघड होते आणि कितीही हवेहवेसे वाटले तरी त्यासाठी माझ्याकडून प्रयत्न मात्र अजिबात केले गेले नव्हते. गिरनारच्या अद्भुत कथा खूप ऐकल्या, वाचल्या होत्या. गिरनारची मनात ओढ होती. पण ते सगळे मनातच. प्रत्यक्षात कोणतेही ट्रीप ठरवताना, कुठे जायचे याचा विचार करताना पुढे होऊन गिरनारला जाऊयात असे कधी म्हटले नव्हते हेही तितकेच खरे.  श्री क्षेत्र गिरनार  काय आहे गिरनार?  गिरनार हा पर्वत समूह आहे. दत्तात्रेयांचा इथे निवास असल्याने ते हिंदूंच्यासाठी अत्यंत पवित्र आणि महत्वाचे धार्मिक स्थळ आहे.  हिमालयापेक्षाही जुना असलेला हा पर्वत अनेक नावांनी प्राचीन साहित्यात आलेला आहे. रेवतक हे त्यातील सर्वात जास्त माहिती असलेले नाव.  जैन लोकांसाठी देखील हे अत्यंत महत्वाचे ठिकाण आहे कारण इथे जैन मंदिर समूह देखील आहे. नेमिनाथ, आदिनाथ, मल्लिनाथ आणि इतर तीर्थंकरांची मंदिरे आहेत.  कुठे आहे गिरनार ? गुजराथ, सौराष्ट्र मधील जुनागढ जवळ गिरनारच्या पायथ्याचे, तलेटी नावाचे गाव आहे.  गिरनारला लोक का जातात? तेथील द...

हिंदवी स्वराज्याची राजधानी - किल्ले रायगड

रायगड! हे नाव घेताच मनात उठणारे भावतरंग अवर्णनीय असेच असतात. ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी म्हणजे 'शिव राज्याभिषेक दिन', 'हिंदू साम्राज्य दिन'. अभिमानाचा, गौरवाचा दिवस. भारतीय इतिहास हा संघर्षाचा व विजयाचा आहे. त्यातील झळाळून उठणारे तेजस्वी, सोनेरी पान म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे कर्तृत्व! शिवाजी महाराज आणि त्यांच्या मावळ्यांचे अविश्रांत परिश्रम पूर्णत्वाला पोचले ते ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी, १६७४ ह्या दिवशी. हा केवळ राज्याभिषेक नव्हता. हिंदवी स्वराज्याची स्थापना झाल्याची केवळ अधिकृत घोषणा नव्हती. तर संतांच्या उपदेशांनी जागलेली सज्जन शक्ती, मावळ्यांच्या रूपातील सामान्य जनतेच्या मनात जागलेली वीरवृत्ती ह्यांच्या संगमाने घडलेला तो एक अभूतपूर्व अविष्कार होता. राज्याभिषेक ही शिवाजी महाराजांची व्यक्तिगत महत्वाकांक्षा नव्हती. रोहिडेश्वर येथे लहानपणी घेतलेली प्रतिज्ञा अथक प्रयत्नांनी पूर्ण झाली होती. "हे हिंदवी स्वराज्य व्हावे हे तो श्रींची इच्छा" हे वचन सार्थ झाले होते. पण राज्याभिषेकाच्या निमित्ताने शिवाजीमहाराजांनी मोठ्या युक्तीने त्यांच्यावर असलेली लोकांची निष्ठा सिंहा...

परशुराम कुंड, अरुणाचल.

अरुणाचल मधील टेंगापानी, नामसाईच्या गोल्डन पॅगोडाहुन परशुराम कुंड ला जाण्यासाठी  आम्ही निघालो. ही गोष्ट आहे ऑक्टोबर २०१९ मधील.  त्या दिवशी सतत पाऊस पडत होता. सगळीकडे हिरवेगार तर अरुणाचल मध्ये नेहमीच असते. पावसात भिजलेली झाडे, स्वच्छ हिरवळ, मध्येच ढगांत अदृश्य होणाऱ्या पर्वतरांगा, वाहणारे थंडगार वारे, फार सुंदर होते ते सगळे.  अरुणाचल  डोंगरातला रस्ता होता. तुफान वारा होता. त्या सगळ्या अवाढव्य डोंगराळ प्रदेशात आमची गाडी म्हणजे एक ठिपका होती. वाऱ्याने उडून जायला वेळ लागणार नाही इतका जोरात वारा वाहत होता. एक खिडकी फोटो काढण्यासाठी उघडली तर ड्राइवर म्हणाला की दुसऱ्या बाजूची पण उघडा, नाहीतर आत आलेल्या वाऱ्याने गाडी हलायला लागेल. शेजारी खोल दरी दिसत असताना गाडी हलायच्या कल्पनेने अंगावर काटा आला आणि पहिली खिडकी देखील फोटो काढल्या काढल्या बंद केली..नकोच ती वाऱ्याची परीक्षा!  रस्ता कसा होता हे प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी पुढे दिलेल्या लिंकवर क्लिक करून विडिओ नक्की बघा. Namsai- Parshuram kund road ह्या नदीचे नाव लोहित आणि ह्या जिल्ह्याचेही नाव लोहित. लोहितचा अर्थ रक्त किंवा रक्...

सिद्धेश्वर मंदिर, टोके - प्रवरा संगमावर उमललेले दगडी बिल्वपत्र

भिंतीवरील कोरीवकाम  महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्ह्यातले टोके हे एक लहान गाव. अहिल्यानगर कडून छत्रपती संभाजीनगरला जाताना डावीकडे नदीच्या काठावर हे सुंदर मंदिर आपल्याला दिसते. जगप्रसिद्ध वेरूळ, अजिंठा लेणी बघायची असतील तर सांभाजीनगरला जावे लागते हे आपल्याला माहिती असेलच. सिद्धेश्वर मंदिर, टोके हे मला एखाद्या दगडी बेलपत्राप्रमाणे वाटले. हे बेलपत्र उमलले आहे अमृतवाहिनी प्रवरा आणि दक्षिणगंगा गोदावरीच्या संगमावर. त्या संगमाच्या, ज्याला प्रवरा संगम म्हणतात त्या परिसरात सिद्धेश्वर, घटेश्वर, मुक्तेश्वर, रामेश्वर, संगमेश्वर अशी अनेक मंदिरे आहेत. पण सर्वात खास आणि सुंदर आहे ते सिद्धेश्वर मंदिर. सिद्धेश्वर मंदिर परिसर बघा असा दिसतो! हा फोटो घेतला होता सप्टेंबर २०१९ मध्ये. पावसाळा भरपूर बरसून आता आपला मुक्काम आवरत होता आणि नद्यांना भरपूर पाणी होते तेव्हाचा! मंदिराचा परिसर  सिद्धेश्वर मंदिर समूह हा तुलनेने नवा समूह आहे, अठराव्या शतकात बांधला गेलेला. पेशव्यांच्या काळात बांधल्या गेलेल्या ह्या मंदिराला सभोवताली एखाद्या छोट्या किल्ल्यासारखी किंवा गढीसारखी उंच भिंत आहे. मुख्य मंदिर आहे शंकराचे...

शिवथरघळ

जर आपण भारताचा नकाशा पाहिला  तर आपल्याला नकाशात डावीकडे, गुजरात ते कन्याकुमारीपर्यंत काळसर  हिरवी रेषा दिसते. ही रेषा  गुजराथ येथून सुरु होते  आणि महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, तामिळनाडू मार्गे जाऊन केरळला पोहोचते. ती रेषा म्हणजेच पश्चिम घाट आहे. पश्चिम घाट म्हणजे दख्खनच्या पठाराची जणू किनारच आहे. दख्खन पठाराच्या काठावरच्या ह्या पर्वत रांगा आहेत.  या भागात बरीच जंगले, जलसाठे, धबधबे आहेत आणि जैवविविधता तसेच त्याचे वय यामुळे या भागाला 'युनेस्को जागतिक वारसा' म्हणून ओळखले गेले आहे. पश्चिम घाट हिमालयापेक्षाही जुना आहे! वरंधा घाट  📷विकिमीडिया कॉमन्स  पश्चिम घाट हा अनेक मुख्य नद्यांचे उगमस्थान आहे. वरील छायाचित्रात दिसते आहे त्या प्रमाणे, वर्षा ऋतूत या प्रदेशात अनेक धबधबे पाहायला मिळतात.  पश्चिम घाटातील (महाराष्ट्र) अनेक सुंदर धबधब्यांपैकी एक म्हणजे शिवथरघळ धबधबा. जेव्हा मुसळधार पाऊस पडतो तेव्हा धबधबा त्याच्या पूर्ण रौद्र सौंदर्यानिशी आणि ताकदीनिशी रोरावत खाली येताना दिसतो.  हा धबधबा सुमारे शंभर फूट उंचीवर...