Skip to main content

मोरबे धरण -वावर्ले गाव

 रोज सूर्योदय आणि सूर्यास्त होतो आणि विशेष म्हणजे तो सर्वांसाठी फुकटात उपलब्ध असतो! तेव्हा तो चुकवू नका. प्रवास हा किलोमीटर मध्ये नव्हे तर प्रवासात मिळालेल्या आनंदात मोजायला हवा. तुम्ही हे दोन्ही,आधी कधी ऐकले होते का? 

मोरबे 

त्या दिवशी सुखद गार हवेने आमचे स्वागत केले. डोंगर, जंगल, तलावातील पाणी आणि ताजी हवा ..दिवसाची प्रसन्न सुरुवात व्हायला अजून काय हवे? माझी खात्री आहे, सूर्यदेखील इथे उगवताना मनात असेच म्हणत असेल!!


मोरबे धरणाच्या बांधावरून 

आम्ही मोरबे धरणाच्या बांधावर होतो. चालण्यासाठी, धावण्यासाठी हा उत्तम रस्ता आहे. इथे दिवसभर पर्यटकांना परवानगी नाही. फक्त सकाळी फिरायला येणाऱ्या लोकांसाठी सकाळी साधारण ८ वाजेपर्यंत हा परिसर सार्वजनिक वापरासाठी खुला असतो. आम्ही तिथे सकाळी खूप लवकरच पोचलो होतो. 
 
महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील खालापूरजवळ धावरी नदीवर बांधलेले हे धरण आहे. मोरबे हे तसे अलिकडच्या काळात बांधले गेलेले भारस्थायी धरण आहे. 

आधुनिक युगातील नोंदी बघितल्या तर लक्षात येते की सिंधुदुर्ग जिल्ह्यातील धामापूर हे धरण महाराष्ट्रातील सर्वात जुने धरण आहे. धामापूर धरणाचे बांधकाम १५३० मध्ये सुरु झाले आणि १६०० मध्ये ते पूर्ण क्षमतेने काम करत होते. पण ते मातीचे धरण होते. धामापूर म्हटल्यावर सुनीताबाईंची आठवण होते. सुनीताबाई देशपांडे ह्यांनी एका पुस्तकात धामापूर धरणावर लेख लिहिला आहे. ते चित्र डोळ्यांपुढे उभे राहते. 

प्राचीन काळातल्या, भारतातील सर्वात जुन्या धरणाचा उल्लेख सापडतो तो चोला राजांनी बांधलेल्या कल्लनाई धरणाचा. ह्या धरणाचे बांधकाम इ.पूर्व १०० मध्ये सुरु झाले. पहिल्या शतकाच्या अखेरीस हे धरण बांधून पूर्ण झाले होते. तंजावर जवळ कावेरी नदीवर बांधलेले हे धरण अजूनही कार्यक्षम आहे. कावेरी नदीचे पाणी अडवून शेतीसाठी वापरले गेले व तो सर्व भूभाग समृद्ध झाला. 

आधुनिक काळातील जुने भारस्थायी धारण आहे ते तुळशी धरण. मुंबईजवळील तुळशी नदीवर हे धरण १८७९ मध्ये बांधले गेले. 

मोरबे धरण २००६ मध्ये कार्यान्वित झाले. भारस्थायी धरण बांधायचे तर तिथे पाया भक्कम व मजबूत होण्यासाठी, विशिष्ट संरचनेची, खडकाळ जमीन आवश्यक असते. त्यावर मग दगडांच्या राशी व दगड, काँक्रीटचे बांधकाम केले जाते. मोरबे येथे पण आपल्याला दगडांच्या राशी व दगडी बांधकाम दिसते. अशी भारस्थायी धरणे ही स्वतःच्या वजनामुळे व विशिष्ट रचनेमुळे पाण्याच्या धडका वर्षानुवर्षे सहन करू शकतात. 

मोरबे धरण नवी मुंबईला पाणीपुरवठा करते. ह्या धरणाची मालकी नवी मुंबई महानगर पालिकेकडे आहे. एक धरण मालकीचे असणारी अशी, मला वाटते, ही एकमेव महानगर पालिका असेल. 

धरणाची सविस्तर माहिती 
📷 Wikimedia Commons



 चंद्रास्त 01/11/20

कोजागिरीचा पूर्ण चंद्र मावळण्याच्या तयारीत होता. हा फोटो सकाळी ६ . २६ ला घेतलेला आहे. ह्या फोटोत तुम्हाला धरणाचा दगडी बांध दिसेल. दुसऱ्या बाजूला दिशा उजळू लागल्या होत्या. सूर्य उगवण्याच्या तयारीत होता. ती नक्कीच एक अप्रतिम सुंदर सकाळ होती.

सूर्योदय 01/11/20

ते सुखद सुंदर वातावरण कोणत्याच कॅमेऱ्याने टिपता येणार नाही. तरीही मी माझ्या साध्या मोबाईल कॅमेऱ्याने टिपण्याचा प्रयत्न केला आहे. 






हे पहाटेचे दृश्य अनुभवण्यासाठी आम्ही आदल्या दिवशीच जवळच्या वावर्ले गावात जाऊन राहिलो होतो. मोरबे धरणापासून कारने दहा मिनिटांच्या अंतरावर असलेले ते एक छोटेसे गाव आहे. 

खालापूर जिल्ह्यात चौक कर्जत रस्त्यावर ह्या वावर्ले गावात आम्ही राहिलो होतो साठे फार्म वर. खूप मोठाली झाडे असलेली ही शांत जागा जणू ऑक्सिजन बँकच आहे. प्रशस्त आवार असल्याने, सध्याच्या दिवसात आवश्यक असणारी 'दो गज की दूरी' पण सहज शक्य होते. 


साठे फार्म वरील फुले 

हिरवाई 

ऊन सावल्या इथे खेळती, झाडांसंगे त्याही हिरवळती!

वावर्ले गाव आणि एकूणच हा सर्व परिसर टेकड्या, डोंगर, पाझरतलाव, ओढे, धबधबे, झाडे ह्या सगळ्यांमुळे निसर्गसमृद्ध आहे. दहा पंधरा मिनिटे चाललात आणि एक छोटासा चढ चढलात की तुम्ही ह्या तलावापाशी पोचता. पावसाचे पाणी इथे ह्या तलावात साठते. ह्या भागात भरपूर पाऊस असल्याने पावसाळ्यात खूप धबधबेदेखील असतात.

रस्त्याची सुरुवात आमराईतून होते आणि रानातील वळणवाटांनी आपण तलावापाशी पोचतो. इतकी शुद्ध मोकळी हवा शहरांत नक्कीच मिळत नाही.




तलावाचे विहंगम दृश्य

जेव्हा तुमच्या नजरेला असे विस्तीर्ण मोकळे रान, डोंगर आणि पाणी दिसते तेव्हा एका अवर्णनीय स्वातंत्र्याचा अनुभव येतो. 

वाऱ्याने हलते रान, बाकी सुनसान, जग हे सारे! 

जवळच एक लहानसे गणेश व शिवमंदिर आहे. जरी मंदिराचे बांधकाम नवे असले तरी शिव पिंडी आणि गणपती मात्र अनेक दशके पाहिलेले जुने जाणते दिसतात. काळाच्या धडका सोसून, त्या खुणा अंगाखांद्यावर वागवत आहेत.

मंदिर 

अजून मावळायला वेळ आहे, सूर्य नुसता डोंगराच्या मागे जाऊन बघतो आहे!

सूर्य मावळण्याच्या तयारीत !! 31/10/20


उगवता पूर्ण चंद्र दिसणे ह्यापेक्षा वेगळी, अशी एखाद्या दिवसाची काय सुंदर अखेर असू शकते?

रिसॉर्टच्या जेवणघरातून दिसलेला उगवता पूर्ण चंद्र! 31/10/20

स्वादिष्ट व्हीगन अन्नाचा आस्वाद घेता घेता कोजागिरीचा उगवणारा पूर्ण चंद्र दिसणे हा अपार आनंद होता. 

जवळच सोंडाई किल्ल्याचा ट्रेक करता येतो. मध्यम अवघड असा हा दोन तासांचा ट्रेक आहे. कोंढाणे बुद्ध लेणी देखील साठे फार्म पासून कार ने अर्ध्या तासाच्या अंतरावर आहेत. ही दोन्ही ठिकाणे पुढच्या ट्रीपला जाण्या साठी राखून ठेवली आहेत. 

जसे मी सुरुवातीला म्हणाले तसे, प्रवास हा किलोमीटर मध्ये नव्हे तर मिळालेल्या आनंदात मोजायला हवा. घरापासून साधारण ५० किलोमीटर वर असणाऱ्या ठिकाणाची दीड दिवसाची एक लहानशी ट्रिप देखील तुम्हाला ताजेतवाने करून टाकते! 
 

#ShortTripFromMumbai #ShortTripFromThane #ShortTripFromPune #SatheFarmsSatishSathe07738342820 #PlacesToVisitNearKarjatKhopli

Comments

  1. अप्रतिम पुढच्या वेळी आम्हाला पण घेऊन चल😍
    फोटो खूप छान 👌👌👌

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

लक्ष्मीकेशव मंदिर, कोळीसरे

  मंदिर म्हणजे एक उर्जाकेंद्र! प्राचीन काळापासून भाविक मंदिरात देवतांच्या दर्शनासाठी जात आले आहेत. आजही हिंदू लोक मंदिरात जाऊन, चित्त एकाग्र करून ध्यान, पूजा आणि आरती करतात. यामुळे त्यांना ऊर्जा आणि शांततेचा अनुभव मिळतो. प्रत्येक देवी-देवतेचे एक विशिष्ट मंदिर असते.  असेच कोळीसरे येथे श्री विष्णूचे - लक्ष्मीकेशवाचे सुंदर मंदिर आहे . रत्नागिरी शहरापासून फक्त ५० किलोमीटर अंतरावर किंवा गणपती पुळ्यापासून २१ किलोमीटर अंतरावर निसर्गसुंदर कोळीसरे गाव आहे. पुणे मुंबई हून रत्नागिरी जिल्ह्यातील कोळीसरे येथे जायचे असल्यास चिपळूण मार्गे जाता येईल. परशुराम - कोळीसरे रस्त्यात अशी नयनरम्य दृश्ये अनेकदा दिसतात. परशुराम कोळिसरे रस्ता अगदी कमी लोकवस्तीचे, घनदाट झाडी असलेले हे गाव कोळीसरे फाट्याहून आत गेल्यावर दीड दोन किलोमीटर प्रवास केल्यावर येते. रत्नागिरीहून बसने जाता येते अन्यथा मंदिरापर्यंत पोचण्यासाठी स्वतःचे वाहन असणे सोयीचे आहे.  गाडी पार्क केल्यानंतर काही पायऱ्या उतरून मग घनदाट झाडीत वसलेल्या ह्या मंदिरात जाता येते. ह्या रस्त्यावरून व्हील चेयर जाउ शकत नाही. पार्किंग पासून उ...

नागाव

  नागाव म्हणजे माडापोफळींच्या वाड्या. नागाव म्हणजे केळीच्या बागा. नागाव म्हणजे सुंदर स्वच्छ समुद्रकिनारा.  नागाव म्हणजे वस्त्रगाळ मऊ वाळूचा किनारा.  नागाव म्हणजे अनेक मंदिरे. नागाव म्हणजे लक्षवेधी दीपमाळा. नागाव म्हणजे कोपऱ्या कोपऱ्यावर भेटणारे तळे! नागाव म्हणजे तळ्यात फुललेलीअनेकानेक कमळे!! नागावच्या शेजारचे  अक्षी, चौल, रेवदंडा ही देखील अशीच गावे. नितांतसुंदर, साधी. अलिबाग आणि ह्या सर्व गावांना मिळून अष्टागर असे म्हणत असत. आठ गावांचा समूह.  अलिबाग पर्यटन स्थळ म्हणून ७० च्या दशकापासूनच प्रसिद्ध झाले होते. तेव्हा शांत निवांत असलेले अलिबाग नंतर खूपच गजबजले आणि मग दुसऱ्या सहस्त्रकात अलिबागशेजारील रेवदंडा, नागाव, चौल ही लहान लहान गावे देखील पर्यटनस्थळे म्हणून विकसित होऊ लागली.  ह्या निवांत, शांत गावांना जणू अचानक खडबडून जाग आली. तिथेही पर्यटकांची गर्दी वाढू लागली. स्थानिक लोकांना रोजगार, विकासाची संधी, अर्थार्जनाची संधी त्यात दिसली.  गावांवर आधुनिक पेहराव चढला आणि तिथे उदयाला आली मुंबईकरांची आवडती पर्यटनस्थळे.  आता तर परिस्थिती अशी आहे की जवळ जवळ एका...

हनुमान जन्मस्थळ आणि शबरी धाम, जय श्रीराम, जय जय राम!

आज आपण रामायणातील दोन ठिकाणांना भेट देणार आहोत आणि दोन महान राम भक्तांच्या भेटीसाठी तुम्हाला घेऊन जाताना मला अतिशय आनंद झालेला आहे.  पहिल्यांदा आपण जाऊयात, हनुमानाच्या जन्मस्थानी अंजनेय टेकडीवर. ही टेकडी कर्नाटक मध्ये हंपीजवळच्या भागात आहे असे मानले जाते. ही जागा अंजनीच्या पुत्राचे, अंजनेयाचे म्हणजेच हनुमानाचे जन्मस्थळ आहे.  भारतात अजूनही इतर काही ठिकाणे आहेत की जी हनुमानाचे जन्मस्थळ म्हणून सांगितली जातात. पण अंजनेय टेकडी हे हनुमानाचे जन्मस्थळ असणे मला सर्वात जास्त संयुक्तिक वाटते. कारण ऋष्यमूक पर्वत, जिथे सुग्रीव, हनुमान आणि भगवान श्रीराम यांची भेट झाली होती तो इथून जवळच आहे. हंपीपासून अंजनेय टेकडीपर्यंतचा रस्ता नैसर्गिक सृष्टिसौंदर्याने अतिशय समृद्ध आहे. तुंगभद्रेच्या किनाऱ्यावर असल्यामुळे हा संपूर्ण प्रदेश अत्यंत सुपीक आहे रस्त्याच्या दोन्ही बाजूला सतत तुम्हाला भात शेती, नारळाची झाडे, केळीच्या बागा आणि अर्थातच प्रचंड मोठे खडक, जे ह्या भागाचे वैशिष्ट्य आहेत ते दिसत राहतात. हा संपूर्ण परिसर रामायणातला किष्किंधा भाग मानला जातो. भात शेती केळीच्या बागा भातशेतीचा मखमली गालिचा टे...

पैसाच्या खांबाचे मंदिर!

पैसाच्या खांबाचे मंदिर! अनेक वर्षांपूर्वी दुर्गा बाईंचे ' पैस ' हे पुस्तक वाचनात आले. त्यात होता हा पैसाचा खांब. पैस म्हणजे अवकाश. जिथे ज्ञानेश्वरी लिहिली गेली तो हा पैसाचा खांब. ज्ञानेश्वरीचे जन्मस्थान! खांबाला टेकून बसलेले, ज्ञानेश्वरी सांगत असलेले ज्ञानेश्वर आणि ती लिहून घेत असलेले लेखनिक सच्चिदानंद बाबा असे चित्र आधीही अनेकदा पाहिलेले होते. पण त्या खांबाला ' पैसाचा खांब' म्हणतात हे माहितीच नव्हते. पैस ह्या पुस्तकातील पैसाचा खांब हे प्रकरण वाचले आणि अक्षरशः थरारून गेले. 'पैसाच्या खांबाचे मंदिर' अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा या प्रवरा नदीच्या तीरावरील गावी आहे. नेवासे गावाच्या पश्चिमेला हे मंदिर आहे. 'शके बाराशे बारोत्तरे| तैं टीका केली ज्ञानेश्वरे| सच्चिदानंद बाबा आदरे| लेखकू जाहला|' असा उल्लेख सापडतो. मूर्त आणि अमूर्त ह्याची अशी जोडणी म्हणजे ज्ञानाच्या अनंत अवकाशात जाण्याची पहिली पायरीच जणू. ज्ञानेश्वरी वाचण्याएवढी आणि कळण्याएवढी योग्यता ह्या जन्मात अंगी येईल की नाही माहिती नाही. पण हा खांब पाहू या कधीतरी असे ठरवून टाकले. अवघड नव्हतेच जाणे. संभाजीनगर...

श्री व्याडेश्वर देवस्थान, गुहागर

  कोकणावर निसर्गाचा वरदहस्त आहेच. त्यातही काही गावांनी आपल्या सौंदर्याने विशेष स्थान मिळवले आहे. त्यातील एक महत्वाचे नाव म्हणजे गुहागर. सुंदर लहानसे गाव आहे. एक मुख्य रस्ता, त्याच्या दोन्ही बाजूला घरे, घरांच्या मागे नारळ सुपारीच्या वाड्या. रस्त्याच्या एका बाजूच्या प्रत्येक घराच्या मागच्या वाडीतून समुद्राला जाण्याचा रस्ता, भव्य स्वच्छ समुद्रकिनारा असे हे मोहात पाडणारे गुहागर गाव.  गुहागर प्रसिद्ध आहे व्याडेश्वरासाठी. व्याडेश्वर हे शंकराचे मंदिर अनेक कोकणवासीयांचे कुलदैवत आहे. कोकणातील सर्वात महत्त्वाच्या शिवमंदिरांपैकी एक म्हणजे गुहागरमधील श्री व्याडेश्वर देवस्थान.  श्री व्याडेश्वर देवस्थान.  श्री व्याडेश्वर देवस्थान.  तुम्हाला जर का कधी दक्षिणेतील मंदिरे पाहून वाटले असेल की अशी मंदिरे आपल्या महाराष्ट्रात का नाही?!! तर गुहागरच्या व्याडेश्वर मंदिराला भेट द्या. भव्य सुंदर देवालय आहे. मंदिराचे आवार स्वच्छ, प्रशस्त आहे. मुख्य म्हणजे अगदी नांदते, जागते मंदिर आहे. मंदिराची साफसफाई, निगराणी केली जाते आहे. आवारात भरपूर झाडे आहेत. श्री व्याडे...

देवरियाताल चंद्रशिला ट्रेक - भाग 4 - स्यालमी - बनियाकुंड

आदल्या संध्याकाळी भुरभुरत असलेल्या पावसाने हवेतला गारवा अजूनच वाढवला होता. इतक्या लहान तंबूमध्ये झोपण्याची पहिलीच वेळ होती. पण सुरुवातीचे दोन तास सोडले तर नंतरचे पाच तास चांगली झोप झाली. अगदी प्रसन्न जाग आली.काल एकदाच क्षणभर का होईना, मनात तरळून गेलेला,"आपण ट्रेक इथेच थांबवावा का?"ह्या विचाराचा आज कुठे मागमूसही उरला नव्हता. मनात होते,  "इरादे अगर पक्के हो, तो डगमगाए कदम क्यु? हौसले बुलंद हो तो सहमा सा हो मन क्यु? मंज़िल अब दूर नहीं.. बस संभल के चलना, कभी न रुकना, हार ना मानना, बस्स .. चलते रहना।" - वृंदा टिळक आमच्या सगळ्याच कॅम्पसाईट्स भन्नाट जागांवर होत्या. आजची स्यालमीची कॅम्प साईट देखील त्याला अपवाद नव्हती. नजर पोचेल तिथपर्यंत फक्त पर्वत रांगा आणि जंगल. मानवी वस्तीची जवळपास काहीच चाहूल नाही.  📷Samrat Darda  सगळ्यांचे आवरून वॉर्म अप करून आम्ही निघालो. आजचा सगळा रस्ता सुंदर असणार होता. काल इतके चढ उतार चढून उतरून आता सगळ्यांची चांगली तयारी झाली होती. शिवाय आज मी नीकॅप्स देखील घातल्या होत्या!! त्यामुळे समजा जरी आज रस्ता अवघड असला असता तरी काळजीचे काही कारण नव्हते....

देवरियाताल चंद्रशिला ट्रेक - भाग 3 - देवरियाताल -स्यालमी

ट्रेकचा तिसरा दिवस. कालचा सारी- देवरियाताल प्रवास तर खूपच छान झाला होता. पायही दुखले नव्हते की थकल्यासारखे देखील वाटले नव्हते. त्यामुळे उत्साहाने आजच्या दिवसाला सुरुवात केली. आजचा दिवस तसा अवघड असेल अशी, इंडियाहाईक्सच्या  वेब साईटवरचे वर्णन वाचून कल्पना आली होती. आज अंतर नऊ किलोमीटरपेक्षा जास्त होते. पण वाटेत अनेक शिखरे दिसणार होती. घनदाट जंगलातून जाणार होतो त्यामुळे अनेक पक्षीही दिसणार होते. त्याचीही उत्सुकता होती. सगळेजण देवरियाताल कॅम्पसाईट मधून बाहेर पडलो. अवघे एक दिवस वास्तव्य केलेले असले तरी मन थोडेतरी गुंतलेले असतेच.  देवरियातालच्या रस्त्याच्या डाव्या बाजूने एक जंगलवाटेचा फाटा होता. त्या वाटेने आम्ही निघालो. थोडा वेळ चालल्यावर आम्हाला पुन्हा एकदा चंद्रशिला शिखर दिसणार होते. अधून मधून दिसणारे हे शिखर आपल्याला कुठे पोचायचे आहे त्याची जाणीव करून द्यायचे, त्यानेही एक नवे बळ मिळायचे. पण आज आकाश इतके ढगाळ होते की शिखर दिसलेच नाही.उजवीकडे पुन्हा एकदा सारी गाव मात्र दिसले. 📷Cotrekker 📷Sumati Dhembre ह्या फोटोवरून कशा रस्त्याने आम्ही चालत होतो, चढ किती होता त्याची कल्पना येईल....

देवरियाताल चंद्रशिला ट्रेक - भाग 5- अंतिम भाग - बनियाकुंड- तुंगनाथ- चंद्रशिला

  📷Samrat Darda १५ एप्रिल, बनियाकुंड कॅम्पसाईट मधून काढलेला चंद्राचा सुंदर फोटो. त्या दिवशी शुक्ल पक्षातील सप्तमी किंवा अष्टमी असावी. कारण १७ एप्रिलला रामनवमी होती. सुंदर काळ्याभोर रात्रीचा सघन अंधार.. पौर्णिमा अजून साताठ दिवसांवर असली तरीही आत्तापासूनच तेजाळलेला चंद्र.. चमचमणारे, मध्येच ढगांच्या आड लपणारे चांदणे, आमच्या मनातील समिटविषयीची उत्सुकता..फार अनोखी रात्र होती ती.  उद्या पहाटे दोन वाजताचा वेकप कॉल असणार होता. आम्हाला आवरून, ब्रेकफास्ट करून तीन वाजता निघायचे होते. न विसरता घेण्याच्या गोष्टी तशा तर डे पॅक मध्ये भरूनच ठेवल्या होत्या. हेडलॅम्पच्या उजेडात सामान देखील आवरून ठेवले होते. पहाटे निघताना बाकी सामान मेन टेन्ट मध्ये नेऊन ठेवायचे होते.  इतक्या उंचीवर जायचे होते. काही तासांत आम्ही ४००० फुटांचा अल्टीट्युड गेन करणार होतो. झोपण्यासाठी डोळे मिटले खरे, पण मिटल्या डोळ्यांपुढेही बर्फाच्छादित शिखरांचीच दृश्ये तरळत होती. कधीतरी झोप लागली. सतत अधूनमधून जाग येऊन घड्याळात बघत होते. सगळे दोन वाजता उठणार, त्या आधी आपण आपले आवरून घेऊ या असा विचार डोक्यात होता तो बहुधा सतत ज...

श्री क्षेत्र गिरनार

  गिरनार माझ्यासाठी ते मोहक फळ होते, जे मिळायला अवघड होते आणि कितीही हवेहवेसे वाटले तरी त्यासाठी माझ्याकडून प्रयत्न मात्र अजिबात केले गेले नव्हते. गिरनारच्या अद्भुत कथा खूप ऐकल्या, वाचल्या होत्या. गिरनारची मनात ओढ होती. पण ते सगळे मनातच. प्रत्यक्षात कोणतेही ट्रीप ठरवताना, कुठे जायचे याचा विचार करताना पुढे होऊन गिरनारला जाऊयात असे कधी म्हटले नव्हते हेही तितकेच खरे.  श्री क्षेत्र गिरनार  काय आहे गिरनार?  गिरनार हा पर्वत समूह आहे. दत्तात्रेयांचा इथे निवास असल्याने ते हिंदूंच्यासाठी अत्यंत पवित्र आणि महत्वाचे धार्मिक स्थळ आहे.  हिमालयापेक्षाही जुना असलेला हा पर्वत अनेक नावांनी प्राचीन साहित्यात आलेला आहे. रेवतक हे त्यातील सर्वात जास्त माहिती असलेले नाव.  जैन लोकांसाठी देखील हे अत्यंत महत्वाचे ठिकाण आहे कारण इथे जैन मंदिर समूह देखील आहे. नेमिनाथ, आदिनाथ, मल्लिनाथ आणि इतर तीर्थंकरांची मंदिरे आहेत.  कुठे आहे गिरनार ? गुजराथ, सौराष्ट्र मधील जुनागढ जवळ गिरनारच्या पायथ्याचे, तलेटी नावाचे गाव आहे.  गिरनारला लोक का जातात? तेथील द...

हिंदवी स्वराज्याची राजधानी - किल्ले रायगड

रायगड! हे नाव घेताच मनात उठणारे भावतरंग अवर्णनीय असेच असतात. ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी म्हणजे 'शिव राज्याभिषेक दिन', 'हिंदू साम्राज्य दिन'. अभिमानाचा, गौरवाचा दिवस. भारतीय इतिहास हा संघर्षाचा व विजयाचा आहे. त्यातील झळाळून उठणारे तेजस्वी, सोनेरी पान म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे कर्तृत्व! शिवाजी महाराज आणि त्यांच्या मावळ्यांचे अविश्रांत परिश्रम पूर्णत्वाला पोचले ते ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी, १६७४ ह्या दिवशी. हा केवळ राज्याभिषेक नव्हता. हिंदवी स्वराज्याची स्थापना झाल्याची केवळ अधिकृत घोषणा नव्हती. तर संतांच्या उपदेशांनी जागलेली सज्जन शक्ती, मावळ्यांच्या रूपातील सामान्य जनतेच्या मनात जागलेली वीरवृत्ती ह्यांच्या संगमाने घडलेला तो एक अभूतपूर्व अविष्कार होता. राज्याभिषेक ही शिवाजी महाराजांची व्यक्तिगत महत्वाकांक्षा नव्हती. रोहिडेश्वर येथे लहानपणी घेतलेली प्रतिज्ञा अथक प्रयत्नांनी पूर्ण झाली होती. "हे हिंदवी स्वराज्य व्हावे हे तो श्रींची इच्छा" हे वचन सार्थ झाले होते. पण राज्याभिषेकाच्या निमित्ताने शिवाजीमहाराजांनी मोठ्या युक्तीने त्यांच्यावर असलेली लोकांची निष्ठा सिंहा...