Skip to main content

नुरानंग फॉल्स आणि तवांग बौद्ध मठ

मागील पोस्टमध्ये आपण सेला आणि जसवंतगढ युद्ध स्मारकाला भेट दिली होती. युद्ध स्मारकाला भेट दिल्यानंतर आम्ही तवांगकडे निघालो. जाताना वाटेत नुरानंग फॉल्सना भेट दिली. 

नुरानंग फॉल्स हे अरुणाचल प्रदेशातील तवांग जिल्ह्यात आहेत. त्यांना जंग फॉल्स किंवा बॉंग बॉंग फॉल्स असे देखील म्हणतात. जास्त लोकांना अजून हे ठिकाण माहिती नाही. त्यामुळे तिथे पर्यटकांची गर्दी नसते. आजूबाजूला घनदाट जंगल असल्याने इथे खूप शांतता आहे. धबधब्याच्या पडणाऱ्या पाण्याचाच काय तो आवाज!


नुरानंग फॉल्स

शंभर मीटरवरून पडणारा हा धबधबा खूपच छान दिसतो. पाण्याचा वेग, सर्वत्र उडणारे तुषार ह्या सौंदर्यामुळे काळे डोंगर आणि हिरव्या जंगलाच्या पार्श्वभूमीवर हा शुभ्र पांढरा धबधबा शोभून दिसतो. तुम्ही सुदैवी असाल तर तुम्हाला इंद्रधनुष्ये देखील दिसू शकतात. 

तिथेच एक छोटेसे जलविद्युत केंद्र आहे. मला वाटते की ह्या जलविद्युत केंद्रासाठीच तिथे येणारी पक्की सडक बांधली गेली असावी.



धबधब्यापर्यंत जाण्यासाठी एक पायवाट आहे. थोडी निसरडी असणारी ही पायवाट तुम्ही ट्रेकिंग साठी शिकलेली कौशल्ये वापरायची संधी देते! पण ह्या वाटेने गेलात तर तुम्ही अगदी तळाशी, म्हणजे जिथे धबधबा जमिनीवर पडून तवांग नदीला मिळतो तिथे पोचू शकता. 

तवांगपासून साधारण ४० किलोमीटर वर असणारे हे धबधबे पाहायला जरी जास्त पर्यटक येत नसले, तरी ते धबधबे सिनेमातून मात्र आत्तापर्यंत हजारो लोकांनी पाहिले आहेत. 

माधुरी दीक्षित च्या कोयला ह्या सिनेमातील एक गाणे इथे चित्रित झाले होते. लोक धडपडत त्या पायवाटेने अगदी खालपर्यंत जाण्याचे एक महत्वाचे कारण हे देखील आहे, की जिथे माधुरी दीक्षितचे फोटो निघाले अगदी तिथेच आपलेही फोटो असावे!! 

जरी तवांगपर्यंतचे अंतर फक्त चाळीस किलोमीटर असले तरी डोंगरदऱ्यांचा  रस्ता असल्याने पोचायला वेळ लागू शकतो. जाताना तुम्हाला उत्तर हिमालय पर्वतरांगा दिसत राहतात. 

तवांगमध्ये खूप लवकर सूर्य मावळतो आणि उगवतो. हवा अगदी थंड आहे. ऑक्सिजनचे प्रमाण कमी आहे. हवामानाची स्वतःला सवय होण्यासाठी थोडी विश्रांती आवश्यक आहे. मला वाटते तीन दिवस आणि तीन रात्री तुम्ही तवांगसाठी ठेवू शकलात तर उत्तम होईल. 

तुम्हांला सगळ्यांना हे माहितीच असेल की तवांग पश्चिम अरुणाचल प्रदेशमध्ये आहे. ह्या जिल्ह्याच्या सीमा चीन आणि भूतान ला टेकलेल्या आहेत. बर्फाच्छादित पर्वतशिखरे, स्फटिकशुभ्र पाण्याची किंवा बर्फाची असंख्य तळी, विरळ लोकवस्ती, लहान लहान गावे आणि सौहार्दपूर्ण लोक ह्या सगळ्यामुळे पर्यटन स्थळांच्या यादीत तवांग अगदी वरची जागा पटकावून बसले आहे. खासकरून तवांग मध्ये तुम्हाला निसर्गाचे सौंदर्य आणि धार्मिक शिकवणुकीचा महिमा अनुभवता येतो.

दुसऱ्या दिवशी आम्ही अशा जागेला भेट दिली ज्या जागेमुळे शहराला आणि जिल्ह्याला तवांग हे नाव मिळाले आहे. शहरापासून साधारण २ किलोमीटर अंतरावर असलेला हा बौद्ध मठ, भारतातील सर्वात जुना व सर्वात मोठा मठ आहे. जगात तो दुसऱ्या क्रमांकावर आहे. जगातला सर्वात मोठा बौद्ध मठ ल्हासा, तिबेट येथे आहे. 

तवांग ह्या नावाची उत्पत्ती अशी आहे, त+ वांग. त म्हणजे घोडा आणि वांग म्हणजे निवडलेला. घोड्याने निवडलेली जागा ती तवांग. कथा सांगते की एक लामा, बौद्ध मठ स्थापन करण्यासाठी जागा शोधत होता. हिमालयाच्या पर्वतरांगांमधून तो खूप फिरला. पण मठाला हवी तशी जागा काही मिळाली नाही. शेवटी त्याने ठरवले की आपण ध्यान लावून ईश्वराचे काही मार्गदर्शन मिळते का पाहूया!

त्याने ध्यान लावून झाल्यावर डोळे उघडले तर त्याचा घोडा गायब झाला होता. लगोलग त्याने घोडा शोधायला सुरुवात केली. खूप वेळ शोधल्यावर अखेर घोडा एका थोड्या सपाट अशा डोंगरमाथ्यावर सापडला. हा ईश्वराचा संदेश आहे असे मानून घोडा जिथे सापडला त्या जागी मठाची स्थापना  करण्यात आली. अशा प्रकारे मेरा लामा लॉरडे गाईतसो ह्यांनी १६८१ मध्ये हा मठ स्थापन केला. 
 
ह्या मठाला ग्यालडेन नामगे लहात्से असेही म्हणतात. त्याचा अर्थ आहे, स्वच्छ रात्री दिसणारे स्वर्गीय नंदनवन. तवांगला येताना हिमालयाच्या वळणा वळणाच्या रस्त्यावरून तुम्हाला अधून मधून हा मठ दिसत राहतो. त्याच्या पिवळ्या छपरांवर सूर्याची किरणे पडतात तेव्हा तो विशेष चमकतो. हा मठ इतका भव्य आहे की पर्वताच्या पार्श्वभूमीवर दूरवरून तो दिसतोच दिसतो. 

तवांग मठ

हा मठ एखाद्या किल्ल्यासारखाच बांधला आहे. त्यात भिक्षु, विद्यार्थी ह्यांची निवासस्थाने, वाचनालय, संग्रहालय, मंदिर सर्व आहे. तो अशा मोक्याच्या ठिकाणी आहे जिथे पश्चिम कामेंग, तिबेट आणि भूतान येथून येणारे मार्ग एकत्र येतात.

तवांग मध्ये तुम्हाला तिबेटचा खूप प्रभाव पाहायला मिळतो. तिबेट मधील सर्वोच्च धार्मिक स्थानी असणारे दलाई लामा (चौदावे ) ह्यांना चीनने तिबेटवर कब्जा केला आणि अतोनात छळ करायला सुरुवात केली म्हणून, तिबेट सोडून निर्वासित होऊन, १९५९ मध्ये भारतात आश्रय घ्यायला लागला. सध्या ते उत्तर भारतात धरमशाला ह्या गावी राहतात. ते अनेकदा तवांग ला भेट देतात. तेव्हा तेव्हा त्यांची भेट ही जगातील अनेक वृत्तपत्रांची बातमी बनते. त्याचे कारण आहे चीनची ह्याविषयातील नाराजी आणि तवांगच्या बाबत भारत चीन संबंधात आलेला तणाव.

प्रवेशद्वार 
वाचनालय - Centre for Buddhist Cultural Studies

मंदिर आणि शाळेकडे जाणारा रस्ता 


आम्हाला तिथे खूप शेळ्या आणि मेंढ्या बघता आल्या. बहुधा शेळीच्या दुधापासून काहीतरी पदार्थ तयार करण्याचा प्रकल्प पण मठाच्या आवारात असावा. 

आवारातील इमारती

शाळेची इमारत

शिक्षण आणि व्हिटॅमिन D!

अजून एक वर्ग 

अनेक लहान लहान भिक्षु तिथे शिकत आहेत. स्थानिक लोकांकडून मिळालेल्या माहितीतील जे काय मला समजले ते असे, प्रत्येक बौद्ध घरातील एक तरी मुलगा ह्या शाळेत शिक्षण घ्यायला पाठवला जातोच. 

जपचक्रे 

अशी चक्रे परिसरात अनेक ठिकाणी आहेत. 
📷 Pradnya Sathe

मंदिरात बुद्धाची एक खूप उंच मूर्ती, तसेच इतर अनेक लहान मूर्ती, चित्रे, लेखन, पूजेचे साहित्य, नैवेद्य हे सगळे पाहायला मिळते. हे मंदिर खूप रंगीबेरंगी दिसते. 


८ मीटर उंच बुद्ध मूर्ती

मंदिरातील अजून एक मूर्ती 

आवारात अजून पण काही मंदिरे, प्रार्थना सभागृहे आहेत. इथे तुम्ही पूजेसाठी वापरल्या जाणाऱ्या विविध वस्तू तसेच दाखवले जाणारे नैवेद्य बघू शकता.

पूजा आणि नैवेद्य 

आम्हाला एका हॉलमध्ये मंत्रांचे पठण ऐकायला मिळाले. खूपच खास होती ती सगळीच प्रक्रिया. तुमच्यासाठी इथे व्हिडिओत दाखवते. 


आवारात एक संग्रहालय आहे. तिथे अत्यंत प्राचीन अशी कागदपत्रे, वस्तू, ऐतिहासिक तसेच धार्मिक महत्वाचे संदर्भ बघायला मिळतात. प्राण्यांपासून बनवल्या गेलेल्या काही विचित्र वस्तू पण बघायला मिळतात. तिथे जरी गाईड सेवा उपलब्ध नसली तरी सर्व नावे रोमन लिपीत लिहिलेली आहेत.

तवांग मध्ये अजून पण खूप आहे बघण्याजोगे. स्थानिक लोक ज्याला 'बिग बुद्धा टेम्पल' म्हणतात ते आहे. तवांग युद्ध स्मारक तर चुकवून चालणारच नाही. तिथे संध्याकाळी एक ध्वनिप्रकाश कार्यक्रम पण असतो. एक दिवस बुमला पास ला जायला राखून ठेवायला हवा. इथे फक्त भारतीय नागरिकच जाऊ शकतात, ते देखील विशेष परवानगी घेऊन. पुढच्या पोस्ट मध्ये मी ह्या सगळ्याबद्दल नक्की लिहिणार आहे. 

ह्या पोस्टचा समारोप करते आहे, तवांग महोत्सवाच्या वर्णनाने. आम्हाला अगदी अनपेक्षितपणे हा वार्षिक महोत्सव बघायला मिळाला. तिथे स्थानिक संगीत, नृत्य, नाट्य, तसेच देशभरातील नामवंत म्युझिक बँड्स असे सगळे बघायला, ऐकायला मिळते. कार्यक्रम एका मोठ्या मैदानात असतो आणि सगळ्यांसाठी मोफत असतो. स्टेडियम सारखी बसण्याची व्यवस्था, हिंडायला भरपूर जागा असलेला हा महोत्सव असतो. तुम्हाला स्थानिक जीवनाची इथे ओळख होऊ शकते. 

तवांग महोत्सव

तवांग महोत्सव

तवांग महोत्सवाला जाण्यासाठी पर्यटक जसे उत्सुक असतात तसेच स्थानिक लोक देखील ह्या महोत्सवाची आतुरतेने वाट पाहत असतात. आम्ही ज्या हॉटेल मध्ये उतरलो होतो तिथला कर्मचारीवर्ग देखील महोत्सवाला जाण्यासाठी उत्सुक होता!

त्या मैदानात हस्तकला, स्थानिक झाडे, खाद्यपदार्थ ह्यांचे देखील स्टॉल्स होते. तुम्ही इथे स्थानिक खास पदार्थ खाऊ शकता. मला तिथे दरवळत असलेला भाजल्या जाणारा मांसाचा वास अजिबातच सहन झाला नाही. 

अरुणाचल मधील खाद्यपदार्थ आणि त्यात वापरले जाणारे घटक ह्यात खूपच वैविध्य आहे. मला स्थानिक स्टॉल्स वर जिथे, घटक काय आहेत हे नीट कळू शकणार नाहीत, तिथे खायची हिंमत झाली नाही!! तुम्ही जिथे उतरला आहात त्या हॉटेलच्या रेस्टॉरंटमध्ये शाकाहारी अन्न बनवून घेणे हाच अरुणाचल मध्ये उत्तम पर्याय आहे!!

#PlacesToSeeNearTawang #TawangFestival #TawangMuseum #WhatYouShouldKnowBeforeVisitingTawang 


Comments

  1. किती छान स्वच्छ अणि मोठा परिसर आहे.

    ReplyDelete
    Replies
    1. हो!! स्वच्छ, सुंदर आणि शांत!

      Delete
  2. फोटो ,व्हिडिओ ,लिखाण सगळं अप्रतिम !!

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद अरुंधती!! तुझ्यासारखे नियमित वाचक ब्लॉग लिहित राहण्याची प्रेरणा देतात!

      Delete

Post a Comment

Popular posts from this blog

लक्ष्मीकेशव मंदिर, कोळीसरे

  मंदिर म्हणजे एक उर्जाकेंद्र! प्राचीन काळापासून भाविक मंदिरात देवतांच्या दर्शनासाठी जात आले आहेत. आजही हिंदू लोक मंदिरात जाऊन, चित्त एकाग्र करून ध्यान, पूजा आणि आरती करतात. यामुळे त्यांना ऊर्जा आणि शांततेचा अनुभव मिळतो. प्रत्येक देवी-देवतेचे एक विशिष्ट मंदिर असते.  असेच कोळीसरे येथे श्री विष्णूचे - लक्ष्मीकेशवाचे सुंदर मंदिर आहे . रत्नागिरी शहरापासून फक्त ५० किलोमीटर अंतरावर किंवा गणपती पुळ्यापासून २१ किलोमीटर अंतरावर निसर्गसुंदर कोळीसरे गाव आहे. पुणे मुंबई हून रत्नागिरी जिल्ह्यातील कोळीसरे येथे जायचे असल्यास चिपळूण मार्गे जाता येईल. परशुराम - कोळीसरे रस्त्यात अशी नयनरम्य दृश्ये अनेकदा दिसतात. परशुराम कोळिसरे रस्ता अगदी कमी लोकवस्तीचे, घनदाट झाडी असलेले हे गाव कोळीसरे फाट्याहून आत गेल्यावर दीड दोन किलोमीटर प्रवास केल्यावर येते. रत्नागिरीहून बसने जाता येते अन्यथा मंदिरापर्यंत पोचण्यासाठी स्वतःचे वाहन असणे सोयीचे आहे.  गाडी पार्क केल्यानंतर काही पायऱ्या उतरून मग घनदाट झाडीत वसलेल्या ह्या मंदिरात जाता येते. ह्या रस्त्यावरून व्हील चेयर जाउ शकत नाही. पार्किंग पासून उ...

नागाव

  नागाव म्हणजे माडापोफळींच्या वाड्या. नागाव म्हणजे केळीच्या बागा. नागाव म्हणजे सुंदर स्वच्छ समुद्रकिनारा.  नागाव म्हणजे वस्त्रगाळ मऊ वाळूचा किनारा.  नागाव म्हणजे अनेक मंदिरे. नागाव म्हणजे लक्षवेधी दीपमाळा. नागाव म्हणजे कोपऱ्या कोपऱ्यावर भेटणारे तळे! नागाव म्हणजे तळ्यात फुललेलीअनेकानेक कमळे!! नागावच्या शेजारचे  अक्षी, चौल, रेवदंडा ही देखील अशीच गावे. नितांतसुंदर, साधी. अलिबाग आणि ह्या सर्व गावांना मिळून अष्टागर असे म्हणत असत. आठ गावांचा समूह.  अलिबाग पर्यटन स्थळ म्हणून ७० च्या दशकापासूनच प्रसिद्ध झाले होते. तेव्हा शांत निवांत असलेले अलिबाग नंतर खूपच गजबजले आणि मग दुसऱ्या सहस्त्रकात अलिबागशेजारील रेवदंडा, नागाव, चौल ही लहान लहान गावे देखील पर्यटनस्थळे म्हणून विकसित होऊ लागली.  ह्या निवांत, शांत गावांना जणू अचानक खडबडून जाग आली. तिथेही पर्यटकांची गर्दी वाढू लागली. स्थानिक लोकांना रोजगार, विकासाची संधी, अर्थार्जनाची संधी त्यात दिसली.  गावांवर आधुनिक पेहराव चढला आणि तिथे उदयाला आली मुंबईकरांची आवडती पर्यटनस्थळे.  आता तर परिस्थिती अशी आहे की जवळ जवळ एका...

हनुमान जन्मस्थळ आणि शबरी धाम, जय श्रीराम, जय जय राम!

आज आपण रामायणातील दोन ठिकाणांना भेट देणार आहोत आणि दोन महान राम भक्तांच्या भेटीसाठी तुम्हाला घेऊन जाताना मला अतिशय आनंद झालेला आहे.  पहिल्यांदा आपण जाऊयात, हनुमानाच्या जन्मस्थानी अंजनेय टेकडीवर. ही टेकडी कर्नाटक मध्ये हंपीजवळच्या भागात आहे असे मानले जाते. ही जागा अंजनीच्या पुत्राचे, अंजनेयाचे म्हणजेच हनुमानाचे जन्मस्थळ आहे.  भारतात अजूनही इतर काही ठिकाणे आहेत की जी हनुमानाचे जन्मस्थळ म्हणून सांगितली जातात. पण अंजनेय टेकडी हे हनुमानाचे जन्मस्थळ असणे मला सर्वात जास्त संयुक्तिक वाटते. कारण ऋष्यमूक पर्वत, जिथे सुग्रीव, हनुमान आणि भगवान श्रीराम यांची भेट झाली होती तो इथून जवळच आहे. हंपीपासून अंजनेय टेकडीपर्यंतचा रस्ता नैसर्गिक सृष्टिसौंदर्याने अतिशय समृद्ध आहे. तुंगभद्रेच्या किनाऱ्यावर असल्यामुळे हा संपूर्ण प्रदेश अत्यंत सुपीक आहे रस्त्याच्या दोन्ही बाजूला सतत तुम्हाला भात शेती, नारळाची झाडे, केळीच्या बागा आणि अर्थातच प्रचंड मोठे खडक, जे ह्या भागाचे वैशिष्ट्य आहेत ते दिसत राहतात. हा संपूर्ण परिसर रामायणातला किष्किंधा भाग मानला जातो. भात शेती केळीच्या बागा भातशेतीचा मखमली गालिचा टे...

पैसाच्या खांबाचे मंदिर!

पैसाच्या खांबाचे मंदिर! अनेक वर्षांपूर्वी दुर्गा बाईंचे ' पैस ' हे पुस्तक वाचनात आले. त्यात होता हा पैसाचा खांब. पैस म्हणजे अवकाश. जिथे ज्ञानेश्वरी लिहिली गेली तो हा पैसाचा खांब. ज्ञानेश्वरीचे जन्मस्थान! खांबाला टेकून बसलेले, ज्ञानेश्वरी सांगत असलेले ज्ञानेश्वर आणि ती लिहून घेत असलेले लेखनिक सच्चिदानंद बाबा असे चित्र आधीही अनेकदा पाहिलेले होते. पण त्या खांबाला ' पैसाचा खांब' म्हणतात हे माहितीच नव्हते. पैस ह्या पुस्तकातील पैसाचा खांब हे प्रकरण वाचले आणि अक्षरशः थरारून गेले. 'पैसाच्या खांबाचे मंदिर' अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा या प्रवरा नदीच्या तीरावरील गावी आहे. नेवासे गावाच्या पश्चिमेला हे मंदिर आहे. 'शके बाराशे बारोत्तरे| तैं टीका केली ज्ञानेश्वरे| सच्चिदानंद बाबा आदरे| लेखकू जाहला|' असा उल्लेख सापडतो. मूर्त आणि अमूर्त ह्याची अशी जोडणी म्हणजे ज्ञानाच्या अनंत अवकाशात जाण्याची पहिली पायरीच जणू. ज्ञानेश्वरी वाचण्याएवढी आणि कळण्याएवढी योग्यता ह्या जन्मात अंगी येईल की नाही माहिती नाही. पण हा खांब पाहू या कधीतरी असे ठरवून टाकले. अवघड नव्हतेच जाणे. संभाजीनगर...

श्री व्याडेश्वर देवस्थान, गुहागर

  कोकणावर निसर्गाचा वरदहस्त आहेच. त्यातही काही गावांनी आपल्या सौंदर्याने विशेष स्थान मिळवले आहे. त्यातील एक महत्वाचे नाव म्हणजे गुहागर. सुंदर लहानसे गाव आहे. एक मुख्य रस्ता, त्याच्या दोन्ही बाजूला घरे, घरांच्या मागे नारळ सुपारीच्या वाड्या. रस्त्याच्या एका बाजूच्या प्रत्येक घराच्या मागच्या वाडीतून समुद्राला जाण्याचा रस्ता, भव्य स्वच्छ समुद्रकिनारा असे हे मोहात पाडणारे गुहागर गाव.  गुहागर प्रसिद्ध आहे व्याडेश्वरासाठी. व्याडेश्वर हे शंकराचे मंदिर अनेक कोकणवासीयांचे कुलदैवत आहे. कोकणातील सर्वात महत्त्वाच्या शिवमंदिरांपैकी एक म्हणजे गुहागरमधील श्री व्याडेश्वर देवस्थान.  श्री व्याडेश्वर देवस्थान.  श्री व्याडेश्वर देवस्थान.  तुम्हाला जर का कधी दक्षिणेतील मंदिरे पाहून वाटले असेल की अशी मंदिरे आपल्या महाराष्ट्रात का नाही?!! तर गुहागरच्या व्याडेश्वर मंदिराला भेट द्या. भव्य सुंदर देवालय आहे. मंदिराचे आवार स्वच्छ, प्रशस्त आहे. मुख्य म्हणजे अगदी नांदते, जागते मंदिर आहे. मंदिराची साफसफाई, निगराणी केली जाते आहे. आवारात भरपूर झाडे आहेत. श्री व्याडे...

श्री क्षेत्र गिरनार

  गिरनार माझ्यासाठी ते मोहक फळ होते, जे मिळायला अवघड होते आणि कितीही हवेहवेसे वाटले तरी त्यासाठी माझ्याकडून प्रयत्न मात्र अजिबात केले गेले नव्हते. गिरनारच्या अद्भुत कथा खूप ऐकल्या, वाचल्या होत्या. गिरनारची मनात ओढ होती. पण ते सगळे मनातच. प्रत्यक्षात कोणतेही ट्रीप ठरवताना, कुठे जायचे याचा विचार करताना पुढे होऊन गिरनारला जाऊयात असे कधी म्हटले नव्हते हेही तितकेच खरे.  श्री क्षेत्र गिरनार  काय आहे गिरनार?  गिरनार हा पर्वत समूह आहे. दत्तात्रेयांचा इथे निवास असल्याने ते हिंदूंच्यासाठी अत्यंत पवित्र आणि महत्वाचे धार्मिक स्थळ आहे.  हिमालयापेक्षाही जुना असलेला हा पर्वत अनेक नावांनी प्राचीन साहित्यात आलेला आहे. रेवतक हे त्यातील सर्वात जास्त माहिती असलेले नाव.  जैन लोकांसाठी देखील हे अत्यंत महत्वाचे ठिकाण आहे कारण इथे जैन मंदिर समूह देखील आहे. नेमिनाथ, आदिनाथ, मल्लिनाथ आणि इतर तीर्थंकरांची मंदिरे आहेत.  कुठे आहे गिरनार ? गुजराथ, सौराष्ट्र मधील जुनागढ जवळ गिरनारच्या पायथ्याचे, तलेटी नावाचे गाव आहे.  गिरनारला लोक का जातात? तेथील द...

हिंदवी स्वराज्याची राजधानी - किल्ले रायगड

रायगड! हे नाव घेताच मनात उठणारे भावतरंग अवर्णनीय असेच असतात. ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी म्हणजे 'शिव राज्याभिषेक दिन', 'हिंदू साम्राज्य दिन'. अभिमानाचा, गौरवाचा दिवस. भारतीय इतिहास हा संघर्षाचा व विजयाचा आहे. त्यातील झळाळून उठणारे तेजस्वी, सोनेरी पान म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे कर्तृत्व! शिवाजी महाराज आणि त्यांच्या मावळ्यांचे अविश्रांत परिश्रम पूर्णत्वाला पोचले ते ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी, १६७४ ह्या दिवशी. हा केवळ राज्याभिषेक नव्हता. हिंदवी स्वराज्याची स्थापना झाल्याची केवळ अधिकृत घोषणा नव्हती. तर संतांच्या उपदेशांनी जागलेली सज्जन शक्ती, मावळ्यांच्या रूपातील सामान्य जनतेच्या मनात जागलेली वीरवृत्ती ह्यांच्या संगमाने घडलेला तो एक अभूतपूर्व अविष्कार होता. राज्याभिषेक ही शिवाजी महाराजांची व्यक्तिगत महत्वाकांक्षा नव्हती. रोहिडेश्वर येथे लहानपणी घेतलेली प्रतिज्ञा अथक प्रयत्नांनी पूर्ण झाली होती. "हे हिंदवी स्वराज्य व्हावे हे तो श्रींची इच्छा" हे वचन सार्थ झाले होते. पण राज्याभिषेकाच्या निमित्ताने शिवाजीमहाराजांनी मोठ्या युक्तीने त्यांच्यावर असलेली लोकांची निष्ठा सिंहा...

परशुराम कुंड, अरुणाचल.

अरुणाचल मधील टेंगापानी, नामसाईच्या गोल्डन पॅगोडाहुन परशुराम कुंड ला जाण्यासाठी  आम्ही निघालो. ही गोष्ट आहे ऑक्टोबर २०१९ मधील.  त्या दिवशी सतत पाऊस पडत होता. सगळीकडे हिरवेगार तर अरुणाचल मध्ये नेहमीच असते. पावसात भिजलेली झाडे, स्वच्छ हिरवळ, मध्येच ढगांत अदृश्य होणाऱ्या पर्वतरांगा, वाहणारे थंडगार वारे, फार सुंदर होते ते सगळे.  अरुणाचल  डोंगरातला रस्ता होता. तुफान वारा होता. त्या सगळ्या अवाढव्य डोंगराळ प्रदेशात आमची गाडी म्हणजे एक ठिपका होती. वाऱ्याने उडून जायला वेळ लागणार नाही इतका जोरात वारा वाहत होता. एक खिडकी फोटो काढण्यासाठी उघडली तर ड्राइवर म्हणाला की दुसऱ्या बाजूची पण उघडा, नाहीतर आत आलेल्या वाऱ्याने गाडी हलायला लागेल. शेजारी खोल दरी दिसत असताना गाडी हलायच्या कल्पनेने अंगावर काटा आला आणि पहिली खिडकी देखील फोटो काढल्या काढल्या बंद केली..नकोच ती वाऱ्याची परीक्षा!  रस्ता कसा होता हे प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी पुढे दिलेल्या लिंकवर क्लिक करून विडिओ नक्की बघा. Namsai- Parshuram kund road ह्या नदीचे नाव लोहित आणि ह्या जिल्ह्याचेही नाव लोहित. लोहितचा अर्थ रक्त किंवा रक्...

सिद्धेश्वर मंदिर, टोके - प्रवरा संगमावर उमललेले दगडी बिल्वपत्र

भिंतीवरील कोरीवकाम  महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्ह्यातले टोके हे एक लहान गाव. अहिल्यानगर कडून छत्रपती संभाजीनगरला जाताना डावीकडे नदीच्या काठावर हे सुंदर मंदिर आपल्याला दिसते. जगप्रसिद्ध वेरूळ, अजिंठा लेणी बघायची असतील तर सांभाजीनगरला जावे लागते हे आपल्याला माहिती असेलच. सिद्धेश्वर मंदिर, टोके हे मला एखाद्या दगडी बेलपत्राप्रमाणे वाटले. हे बेलपत्र उमलले आहे अमृतवाहिनी प्रवरा आणि दक्षिणगंगा गोदावरीच्या संगमावर. त्या संगमाच्या, ज्याला प्रवरा संगम म्हणतात त्या परिसरात सिद्धेश्वर, घटेश्वर, मुक्तेश्वर, रामेश्वर, संगमेश्वर अशी अनेक मंदिरे आहेत. पण सर्वात खास आणि सुंदर आहे ते सिद्धेश्वर मंदिर. सिद्धेश्वर मंदिर परिसर बघा असा दिसतो! हा फोटो घेतला होता सप्टेंबर २०१९ मध्ये. पावसाळा भरपूर बरसून आता आपला मुक्काम आवरत होता आणि नद्यांना भरपूर पाणी होते तेव्हाचा! मंदिराचा परिसर  सिद्धेश्वर मंदिर समूह हा तुलनेने नवा समूह आहे, अठराव्या शतकात बांधला गेलेला. पेशव्यांच्या काळात बांधल्या गेलेल्या ह्या मंदिराला सभोवताली एखाद्या छोट्या किल्ल्यासारखी किंवा गढीसारखी उंच भिंत आहे. मुख्य मंदिर आहे शंकराचे...

शिवथरघळ

जर आपण भारताचा नकाशा पाहिला  तर आपल्याला नकाशात डावीकडे, गुजरात ते कन्याकुमारीपर्यंत काळसर  हिरवी रेषा दिसते. ही रेषा  गुजराथ येथून सुरु होते  आणि महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, तामिळनाडू मार्गे जाऊन केरळला पोहोचते. ती रेषा म्हणजेच पश्चिम घाट आहे. पश्चिम घाट म्हणजे दख्खनच्या पठाराची जणू किनारच आहे. दख्खन पठाराच्या काठावरच्या ह्या पर्वत रांगा आहेत.  या भागात बरीच जंगले, जलसाठे, धबधबे आहेत आणि जैवविविधता तसेच त्याचे वय यामुळे या भागाला 'युनेस्को जागतिक वारसा' म्हणून ओळखले गेले आहे. पश्चिम घाट हिमालयापेक्षाही जुना आहे! वरंधा घाट  📷विकिमीडिया कॉमन्स  पश्चिम घाट हा अनेक मुख्य नद्यांचे उगमस्थान आहे. वरील छायाचित्रात दिसते आहे त्या प्रमाणे, वर्षा ऋतूत या प्रदेशात अनेक धबधबे पाहायला मिळतात.  पश्चिम घाटातील (महाराष्ट्र) अनेक सुंदर धबधब्यांपैकी एक म्हणजे शिवथरघळ धबधबा. जेव्हा मुसळधार पाऊस पडतो तेव्हा धबधबा त्याच्या पूर्ण रौद्र सौंदर्यानिशी आणि ताकदीनिशी रोरावत खाली येताना दिसतो.  हा धबधबा सुमारे शंभर फूट उंचीवर...