मुख्य सामग्रीवर वगळा

नुरानंग फॉल्स आणि तवांग बौद्ध मठ

मागील पोस्टमध्ये आपण सेला आणि जसवंतगढ युद्ध स्मारकाला भेट दिली होती. युद्ध स्मारकाला भेट दिल्यानंतर आम्ही तवांगकडे निघालो. जाताना वाटेत नुरानंग फॉल्सना भेट दिली. 

नुरानंग फॉल्स हे अरुणाचल प्रदेशातील तवांग जिल्ह्यात आहेत. त्यांना जंग फॉल्स किंवा बॉंग बॉंग फॉल्स असे देखील म्हणतात. जास्त लोकांना अजून हे ठिकाण माहिती नाही. त्यामुळे तिथे पर्यटकांची गर्दी नसते. आजूबाजूला घनदाट जंगल असल्याने इथे खूप शांतता आहे. धबधब्याच्या पडणाऱ्या पाण्याचाच काय तो आवाज!


नुरानंग फॉल्स

शंभर मीटरवरून पडणारा हा धबधबा खूपच छान दिसतो. पाण्याचा वेग, सर्वत्र उडणारे तुषार ह्या सौंदर्यामुळे काळे डोंगर आणि हिरव्या जंगलाच्या पार्श्वभूमीवर हा शुभ्र पांढरा धबधबा शोभून दिसतो. तुम्ही सुदैवी असाल तर तुम्हाला इंद्रधनुष्ये देखील दिसू शकतात. 

तिथेच एक छोटेसे जलविद्युत केंद्र आहे. मला वाटते की ह्या जलविद्युत केंद्रासाठीच तिथे येणारी पक्की सडक बांधली गेली असावी.



धबधब्यापर्यंत जाण्यासाठी एक पायवाट आहे. थोडी निसरडी असणारी ही पायवाट तुम्ही ट्रेकिंग साठी शिकलेली कौशल्ये वापरायची संधी देते! पण ह्या वाटेने गेलात तर तुम्ही अगदी तळाशी, म्हणजे जिथे धबधबा जमिनीवर पडून तवांग नदीला मिळतो तिथे पोचू शकता. 

तवांगपासून साधारण ४० किलोमीटर वर असणारे हे धबधबे पाहायला जरी जास्त पर्यटक येत नसले, तरी ते धबधबे सिनेमातून मात्र आत्तापर्यंत हजारो लोकांनी पाहिले आहेत. 

माधुरी दीक्षित च्या कोयला ह्या सिनेमातील एक गाणे इथे चित्रित झाले होते. लोक धडपडत त्या पायवाटेने अगदी खालपर्यंत जाण्याचे एक महत्वाचे कारण हे देखील आहे, की जिथे माधुरी दीक्षितचे फोटो निघाले अगदी तिथेच आपलेही फोटो असावे!! 

जरी तवांगपर्यंतचे अंतर फक्त चाळीस किलोमीटर असले तरी डोंगरदऱ्यांचा  रस्ता असल्याने पोचायला वेळ लागू शकतो. जाताना तुम्हाला उत्तर हिमालय पर्वतरांगा दिसत राहतात. 

तवांगमध्ये खूप लवकर सूर्य मावळतो आणि उगवतो. हवा अगदी थंड आहे. ऑक्सिजनचे प्रमाण कमी आहे. हवामानाची स्वतःला सवय होण्यासाठी थोडी विश्रांती आवश्यक आहे. मला वाटते तीन दिवस आणि तीन रात्री तुम्ही तवांगसाठी ठेवू शकलात तर उत्तम होईल. 

तुम्हांला सगळ्यांना हे माहितीच असेल की तवांग पश्चिम अरुणाचल प्रदेशमध्ये आहे. ह्या जिल्ह्याच्या सीमा चीन आणि भूतान ला टेकलेल्या आहेत. बर्फाच्छादित पर्वतशिखरे, स्फटिकशुभ्र पाण्याची किंवा बर्फाची असंख्य तळी, विरळ लोकवस्ती, लहान लहान गावे आणि सौहार्दपूर्ण लोक ह्या सगळ्यामुळे पर्यटन स्थळांच्या यादीत तवांग अगदी वरची जागा पटकावून बसले आहे. खासकरून तवांग मध्ये तुम्हाला निसर्गाचे सौंदर्य आणि धार्मिक शिकवणुकीचा महिमा अनुभवता येतो.

दुसऱ्या दिवशी आम्ही अशा जागेला भेट दिली ज्या जागेमुळे शहराला आणि जिल्ह्याला तवांग हे नाव मिळाले आहे. शहरापासून साधारण २ किलोमीटर अंतरावर असलेला हा बौद्ध मठ, भारतातील सर्वात जुना व सर्वात मोठा मठ आहे. जगात तो दुसऱ्या क्रमांकावर आहे. जगातला सर्वात मोठा बौद्ध मठ ल्हासा, तिबेट येथे आहे. 

तवांग ह्या नावाची उत्पत्ती अशी आहे, त+ वांग. त म्हणजे घोडा आणि वांग म्हणजे निवडलेला. घोड्याने निवडलेली जागा ती तवांग. कथा सांगते की एक लामा, बौद्ध मठ स्थापन करण्यासाठी जागा शोधत होता. हिमालयाच्या पर्वतरांगांमधून तो खूप फिरला. पण मठाला हवी तशी जागा काही मिळाली नाही. शेवटी त्याने ठरवले की आपण ध्यान लावून ईश्वराचे काही मार्गदर्शन मिळते का पाहूया!

त्याने ध्यान लावून झाल्यावर डोळे उघडले तर त्याचा घोडा गायब झाला होता. लगोलग त्याने घोडा शोधायला सुरुवात केली. खूप वेळ शोधल्यावर अखेर घोडा एका थोड्या सपाट अशा डोंगरमाथ्यावर सापडला. हा ईश्वराचा संदेश आहे असे मानून घोडा जिथे सापडला त्या जागी मठाची स्थापना  करण्यात आली. अशा प्रकारे मेरा लामा लॉरडे गाईतसो ह्यांनी १६८१ मध्ये हा मठ स्थापन केला. 
 
ह्या मठाला ग्यालडेन नामगे लहात्से असेही म्हणतात. त्याचा अर्थ आहे, स्वच्छ रात्री दिसणारे स्वर्गीय नंदनवन. तवांगला येताना हिमालयाच्या वळणा वळणाच्या रस्त्यावरून तुम्हाला अधून मधून हा मठ दिसत राहतो. त्याच्या पिवळ्या छपरांवर सूर्याची किरणे पडतात तेव्हा तो विशेष चमकतो. हा मठ इतका भव्य आहे की पर्वताच्या पार्श्वभूमीवर दूरवरून तो दिसतोच दिसतो. 

तवांग मठ

हा मठ एखाद्या किल्ल्यासारखाच बांधला आहे. त्यात भिक्षु, विद्यार्थी ह्यांची निवासस्थाने, वाचनालय, संग्रहालय, मंदिर सर्व आहे. तो अशा मोक्याच्या ठिकाणी आहे जिथे पश्चिम कामेंग, तिबेट आणि भूतान येथून येणारे मार्ग एकत्र येतात.

तवांग मध्ये तुम्हाला तिबेटचा खूप प्रभाव पाहायला मिळतो. तिबेट मधील सर्वोच्च धार्मिक स्थानी असणारे दलाई लामा (चौदावे ) ह्यांना चीनने तिबेटवर कब्जा केला आणि अतोनात छळ करायला सुरुवात केली म्हणून, तिबेट सोडून निर्वासित होऊन, १९५९ मध्ये भारतात आश्रय घ्यायला लागला. सध्या ते उत्तर भारतात धरमशाला ह्या गावी राहतात. ते अनेकदा तवांग ला भेट देतात. तेव्हा तेव्हा त्यांची भेट ही जगातील अनेक वृत्तपत्रांची बातमी बनते. त्याचे कारण आहे चीनची ह्याविषयातील नाराजी आणि तवांगच्या बाबत भारत चीन संबंधात आलेला तणाव.

प्रवेशद्वार 
वाचनालय - Centre for Buddhist Cultural Studies

मंदिर आणि शाळेकडे जाणारा रस्ता 


आम्हाला तिथे खूप शेळ्या आणि मेंढ्या बघता आल्या. बहुधा शेळीच्या दुधापासून काहीतरी पदार्थ तयार करण्याचा प्रकल्प पण मठाच्या आवारात असावा. 

आवारातील इमारती

शाळेची इमारत

शिक्षण आणि व्हिटॅमिन D!

अजून एक वर्ग 

अनेक लहान लहान भिक्षु तिथे शिकत आहेत. स्थानिक लोकांकडून मिळालेल्या माहितीतील जे काय मला समजले ते असे, प्रत्येक बौद्ध घरातील एक तरी मुलगा ह्या शाळेत शिक्षण घ्यायला पाठवला जातोच. 

जपचक्रे 

अशी चक्रे परिसरात अनेक ठिकाणी आहेत. 
📷 Pradnya Sathe

मंदिरात बुद्धाची एक खूप उंच मूर्ती, तसेच इतर अनेक लहान मूर्ती, चित्रे, लेखन, पूजेचे साहित्य, नैवेद्य हे सगळे पाहायला मिळते. हे मंदिर खूप रंगीबेरंगी दिसते. 


८ मीटर उंच बुद्ध मूर्ती

मंदिरातील अजून एक मूर्ती 

आवारात अजून पण काही मंदिरे, प्रार्थना सभागृहे आहेत. इथे तुम्ही पूजेसाठी वापरल्या जाणाऱ्या विविध वस्तू तसेच दाखवले जाणारे नैवेद्य बघू शकता.

पूजा आणि नैवेद्य 

आम्हाला एका हॉलमध्ये मंत्रांचे पठण ऐकायला मिळाले. खूपच खास होती ती सगळीच प्रक्रिया. तुमच्यासाठी इथे व्हिडिओत दाखवते. 


आवारात एक संग्रहालय आहे. तिथे अत्यंत प्राचीन अशी कागदपत्रे, वस्तू, ऐतिहासिक तसेच धार्मिक महत्वाचे संदर्भ बघायला मिळतात. प्राण्यांपासून बनवल्या गेलेल्या काही विचित्र वस्तू पण बघायला मिळतात. तिथे जरी गाईड सेवा उपलब्ध नसली तरी सर्व नावे रोमन लिपीत लिहिलेली आहेत.

तवांग मध्ये अजून पण खूप आहे बघण्याजोगे. स्थानिक लोक ज्याला 'बिग बुद्धा टेम्पल' म्हणतात ते आहे. तवांग युद्ध स्मारक तर चुकवून चालणारच नाही. तिथे संध्याकाळी एक ध्वनिप्रकाश कार्यक्रम पण असतो. एक दिवस बुमला पास ला जायला राखून ठेवायला हवा. इथे फक्त भारतीय नागरिकच जाऊ शकतात, ते देखील विशेष परवानगी घेऊन. पुढच्या पोस्ट मध्ये मी ह्या सगळ्याबद्दल नक्की लिहिणार आहे. 

ह्या पोस्टचा समारोप करते आहे, तवांग महोत्सवाच्या वर्णनाने. आम्हाला अगदी अनपेक्षितपणे हा वार्षिक महोत्सव बघायला मिळाला. तिथे स्थानिक संगीत, नृत्य, नाट्य, तसेच देशभरातील नामवंत म्युझिक बँड्स असे सगळे बघायला, ऐकायला मिळते. कार्यक्रम एका मोठ्या मैदानात असतो आणि सगळ्यांसाठी मोफत असतो. स्टेडियम सारखी बसण्याची व्यवस्था, हिंडायला भरपूर जागा असलेला हा महोत्सव असतो. तुम्हाला स्थानिक जीवनाची इथे ओळख होऊ शकते. 

तवांग महोत्सव

तवांग महोत्सव

तवांग महोत्सवाला जाण्यासाठी पर्यटक जसे उत्सुक असतात तसेच स्थानिक लोक देखील ह्या महोत्सवाची आतुरतेने वाट पाहत असतात. आम्ही ज्या हॉटेल मध्ये उतरलो होतो तिथला कर्मचारीवर्ग देखील महोत्सवाला जाण्यासाठी उत्सुक होता!

त्या मैदानात हस्तकला, स्थानिक झाडे, खाद्यपदार्थ ह्यांचे देखील स्टॉल्स होते. तुम्ही इथे स्थानिक खास पदार्थ खाऊ शकता. मला तिथे दरवळत असलेला भाजल्या जाणारा मांसाचा वास अजिबातच सहन झाला नाही. 

अरुणाचल मधील खाद्यपदार्थ आणि त्यात वापरले जाणारे घटक ह्यात खूपच वैविध्य आहे. मला स्थानिक स्टॉल्स वर जिथे, घटक काय आहेत हे नीट कळू शकणार नाहीत, तिथे खायची हिंमत झाली नाही!! तुम्ही जिथे उतरला आहात त्या हॉटेलच्या रेस्टॉरंटमध्ये शाकाहारी अन्न बनवून घेणे हाच अरुणाचल मध्ये उत्तम पर्याय आहे!!

#PlacesToSeeNearTawang #TawangFestival #TawangMuseum #WhatYouShouldKnowBeforeVisitingTawang 


टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कोस्टल कर्नाटक ३. -कुरु बेट, अनेगुड्डे श्री विनायक मंदिर, मणिपाल लेक

  कोस्टल कर्नाटक सहलीचा आमचा तिसरा दिवस देखील फार आनंदात गेला. काही गोष्टी ठरवल्याप्रमाणे होऊ शकल्या. काही गोष्टी ठरवल्याप्रमाणे अजिबात झाल्या नाहीत. पण तरी जमेची बाजूच जड झाली हे खरे.  उडुपीला सकाळी गाडी बोलावली होती आणि ती आम्हाला काही तास फिरवून आणणार होती. पहिले ठिकाण होते त्रासी मारवंते बीच.  फोटो बघूनच हा बीच पाहण्याची खूप उत्सुकता वाटत होती. हा अत्यंत अनोखा बीच आहे. रस्त्याच्या एक बाजूला सौपर्णिका नदी, दुसऱ्या बाजूला अरबी समुद्र - सिंधूसागर! त्रासी मरवंथे बीच  📷https://karnatakatourism.org/en/destinations/udupi उडुपीपासून निघून इकडे येऊन पोचलो. एका बाजूला नदी दिसत होती. दुसऱ्या बाजूला समुद्र किनाराही दिसत होता. पण फोटोत दाखवल्याप्रमाणे ठिकाण काही दिसेना.  मग चौकशी केल्यावर कळले की असे फक्त ड्रोनने काढलेल्या फोटोत दिसते. डोळ्यांना असे दिसत नाही!! एरवी आपण म्हणतो की डोळ्यांना जितके सुंदर दिसते तितके फोटोत उतरत नाही. पण इथे उलटे झाले होते!फोटोतल्याइतके सुंदर डोळ्यांना दिसत नव्हते!! पण असे दिसले नाही म्हणून काय झाले? रस्त्याच्या एका बाजूला नदी वाहते आहे...

कोस्टल कर्नाटक ६ - अविस्मरणीय शरावती बॅकवॉटर बोटिंग, शरावती कांडला मॅन्ग्रोव्ह बोर्ड वॉक

मी आधीच्या पोस्टमध्ये सांगितले होते की आजचा सूर्यास्त समुद्रात होता तर उद्याचा सूर्योदय शरावती नदीत असणार आहे! तोच हा सूर्योदय शरावती नदीत, कमळांच्या मध्ये.  शरावती बॅकवॉटर बोटिंग  दुसऱ्या दिवशी सकाळी सव्वा सहापर्यंत आम्ही बोटिंगच्या ठिकाणी पोचलो. कारण आम्हाला सूर्योदय चुकवायचा नव्हता. होनावर जवळचे शरावती नदीतील बोटिंग हा एक अविस्मरणीय अनुभव आहे.  आजूबाजूची शांतता, संथ पाणी, स्वच्छ नितळ पाण्यात वाकून आपले प्रतिबिंब न्याहाळणारी नारळाची झाडे, पाण्यात अध्ये मध्ये असलेली लहानशी बेटे, खारफूटीची जंगले, कमळाची पाण्यावर तरंगणारी पाने, उगवत्या सूर्याची पाण्यात मिसळणारी किरणे, त्याने तांबूस झालेले पाणी .. एक वेगळेच जग असते ते. तुम्ही जितक्या वेळासाठी बोट ठरवलेली असेल.. तास दीड तास..  तो वेळ, तुमच्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षणांपैकी एक असणार हे मी अगदी खात्रीने सांगू शकते.  आपोआप जगाचा, आयुष्याचा कोलाहल मंद होत जातो. पहाटेचा मवाळ प्रकाश, पाण्यावर हेलकावणारी नाव, हवेतला अगदी किंचितसा सुखद गारवा आणि मुरत जाणारी शांतता ह्या सगळ्याने मन निवळत जाते.  आम्ही गेलो त्या दिवशी,...

'रानी की वाव'

पाटण सर्वांना माहिती असते ते 'रानी की वाव' तिथे आहे म्हणून. भारतातील समृद्ध हातमाग कौशल्याचा उत्तम नमुना असलेली पटोला साडीदेखील पाटणचीच.  गुजराथमधील अहमदाबाद पासून साधारण दीडशे किलोमीटरवर असणारे पाटण जागतिक पर्यटनाच्या नकाशावर मानाचे स्थान पटकावून बसले आहे. युनेस्को चे जागतिक वारसा स्थळ म्हणून मानांकन मिळवलेले हे ठिकाण आहे.  रानी की वाव  रानी की वाव  रानी की वाव  रानी की वाव  रानी की वाव  'रानी की वाव' नावावरूनच आपल्या लक्षात येते की ही राणीने बांधलेली विहीर आहे. पण खरे तर ही नुसती वाव म्हणजे विहीर नसून  सुमारे 64 मीटर लांब, 20 मीटर रुंद आणि 27 मीटर खोल म्हणजे साधारण  सात मजल्यांइतकी खोली असलेले विष्णूचे मंदिर आहे असेच म्हणावे लागेल.  जमिनीपासून खोल खोल उतरत जाणारी अशी ही रचना आहे.  राणी उदयमती हिने तिचा पती  राजा भीमदेव पहिला याच्या स्मरणार्थ हे मंदिर बांधले म्हणून याचे नाव 'रानी की वाव' असे पडले. राजा भीमदेव पहिला म्हणजे अनहिलवाड किंवा अनहिल्लपूर पाटणच्या सोळंकी वंशाचा संस्थापक मुलराज ह्याचा मुलगा होता. ह्या वंशाने अनेक पराक्...

सोमनाथ - प्रभास पट्टण.

१९४७चे दीपावली पर्व. स्थळ होते सिंधुसागराच्या तीरावर असलेल्या सोमनाथ मंदिराच्या अवशेषांचे प्रवेशद्वार. तिथे उभे राहून सरदार वल्लभभाई पटेल यांनी दृढनिश्चय व्यक्त केला की भारतीय जनता आपले आराध्य दैवत असलेल्या सोमनाथ मंदिराला त्याची पूर्व प्रतिष्ठा आणि पूर्व वैभव प्राप्त करून देईल.  काय कारण होते ह्या प्रतिज्ञेचे? जर भारतीय जनतेचे आराध्य दैवत होते सोमनाथ तर आता मंदिराचे अवशेषच का उरले होते?  ह्या साठी आपल्याला जाणून घ्यावे लागेल सोमनाथ मंदिराच्या इतिहासाविषयी आणि सोमनाथच्या हिंदू जनमानसातील स्थानाविषयी.  हिंदूंन पूजनीय असलेल्या बारा ज्योतिर्लिंगापैकी सर्वात पहिले नाव असलेल्या आणि प्रथम स्थानी असलेले सोमनाथ. आपल्या सर्वाना माहिती असलेल्या स्तोत्राची सुरुवातच होते ती 'सौराष्ट्रे सोमनाथंच' पासून. त्यामुळेच त्याला 'आदि ज्योतिर्लिंग' म्हणून ओळखले जाते.  ऋग्वेदात तसेच अनेक पुराणात ज्याचा उल्लेख झाला आहे असे हे तीर्थधाम. ह्याविषयी आपल्याला अनेक कथा सापडतात.  शतकानुशतकांच्या मंदिराच्या इतिहासात नैसर्गिक रित्या पडझड झाल्यानंतर ते अनेक राजांकडून, भक्तांकडून सोने, च...

कवी केशवसुत स्मारक, मालगुंड

एका कवीचे स्मारक असावे आणि तेही कवीला साजेसे असावे ही दुर्मिळ गोष्ट आहे! पण असे एक स्मारक आपल्या महाराष्ट्रात आहे. रत्नागिरीजवळ मालगुंड येथे कवी केशवसुत म्हणजेच कृष्णाजी केशव दामले ह्यांचे एक सुंदर स्मारक उभारले आहे.  कवी केशवसुत जन्मस्थान  मार्गावरील फलक  प्रवेशद्वारातून दिसणारे दृश्य  कोकण मराठी साहित्य परिषदेने ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री मधू मंगेश कर्णिक ह्यांच्या संकल्पनेला प्रत्यक्षात उतरवले आहे.  एखाद्या कवीचे स्मारक कसे असावे हे एखाद्या साहित्यिकालाच चांगले कळू शकणार! स्मारकाच्या प्रवेशद्वारातून आपण आत गेलो की समोरच दिसते ते केशवसुत जन्मस्थान. हे जुने घर डागडुजी करून नीटनेटके ठेवले आहे. पडवीत मोठा झोपाळा आहे.  कवीच्या घरात कवीचे पुस्तक वाचताना  तिथेच केशवसुतांची काही पुस्तके तसेच को.म.सा.प.ची काही प्रकाशने विक्रीसाठी उपलब्ध आहेत.  घरातील आतल्या खोल्या तशा रिकाम्याच आहेत. काही थोडे जुने सामान तिथे ठेवले आहे .  माजघर  घराच्या मागच्या बाजूला कवीचे खरे स्मारक आहे. केशवसुतांनी त्या काळात म्हणजे दीडशे वर्षांपूर्वी कवितेत नवा प्रवाह आणला...

गणपतीपुळे

कोकणच्या निसर्गाविषयी किती आणि कितीदाही लिहिले तरी कमीच आहे. कोकणातल्या नारळी पोफळीच्या वाड्या, आंब्याची फणसाची झाडे, केळीच्या बागा, कौलारू घरे ह्यांनी नटलेली धरती, सोनचाफा बकुळीच्या सुगंधाने घमघमणारा आसमंत आणि कानावर येणारी समुद्राची गाज सारेच कसे मन प्रसन्न करणारे असते.  चराचरात वसणारा परमतत्वाचा अंश ह्या भूमीत प्रकर्षाने प्रत्ययाला येतो. ह्या भूमीत अनेक देवस्थाने नसती तरच नवल होते. ह्या देवस्थानांच्या जागा विलक्षण सुंदर आहेत. गणपतीपुळे हे असेच एका सुंदर स्थानी वसलेले श्री गणेशाचे स्वयंभू मंदिर. सिंधुसागराचा किनारा, चमकदार वाळूची पुळण आणि पाठीमागे गार्ड हिरव्या वनराईने झाकलेला डोंगर असे ह्या मंदिराचे नयनमनोहर ठिकाण आहे.  श्री गणपतीपुळे देवस्थान  ह्या स्वयंभू मूर्तीचा दृष्टांत पाचशे वर्षांपूर्वी भिडे गुरुजींना झाला. तिथे त्यांनी साधे गवताचे छप्पर उभारून पूजेला सुरुवात केली. त्यांची समाधी आपल्याला मंदिराच्या आवारातच बघायला मिळते.  समाधी  पुढे मग वेळोवेळी निरनिराळ्या भक्तांनी ह्या वास्तूची पुनर्बांधणी आणि दुरुस्ती केली. छत्रपती शिवाजी महाराजांचे सचिव अण्णाजी दत्त...

श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे जन्मस्थान - बर्वेवाडा, डुबेरे

काल दिनांक १८ ऑगस्ट २०२५. श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे ह्यांची ३२५ वी जयंती. श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे पुतळा, बर्वेवाडा श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे पुतळा, बर्वेवाडा श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे पुतळा, बर्वेवाडा आता बाजीराव म्हटले की केवळ बाजीराव मस्तानीच आठवणाऱ्या लोकांसाठी बाजीराव कोण ते सांगायला हवे. छत्रपती शिवाजी महाराजांनी पाहिलेले हिंदवी स्वराज्याचे स्वप्न प्रत्यक्षात जगणारे आणि हिंदवी साम्राज्य निर्माण करणारे बाजीराव बाळाजी पेशवे/ विश्वनाथ बल्लाळ भट हे शाहूछत्रपतींचे पेशवे म्हणजेच पंतप्रधान होते.  आपल्या वीस वर्षांच्या पेशवे म्हणून कारकीर्दीत ते चाळीसहून अधिक लढाया लढले आणि त्या सर्व लढायांत ते अजिंक्य राहिले. त्यांनी आपल्या कर्तृत्वाने मराठ्यांचे वर्चस्व अखंड भारतावर प्रस्थापित केले.  त्यांचा जन्म १८ ऑगस्ट १७००, भाद्रपद पौर्णिमा ह्या दिवशी डुबेरे येथे झाला. डुबेरे आजच्या सिन्नर तालुक्यात नाशिक जिल्ह्यात आहे.  ह्या गावी बाजीरावांच्या मातोश्री राधाबाई ह्यांचे भाऊ मल्हारराव बर्वे राहत असत. त्या बर्वे वाड्यात बाजीरावांचा जन्म झाला.  बर्वे वाडा  अवघ...

कोस्टल कर्नाटक ४ - शृंगेरी, मुकाम्बिका

कोस्टल कर्नाटक ४ - शृंगेरी, मुकाम्बिका  आज उडुपीहून लवकर निघून शृंगेरीला पोचण्याचा बेत आखला होता. त्याप्रमाणे आम्ही सकाळीच निघालो. रस्ता खूपच छान होता. आता खरं सांगायचे तर कोस्टल कर्नाटक प्रवासात रस्ता सुंदर होता म्हणणे ही द्विरुक्तीच आहे.  सगळ्या सडका अगदी एका पातळीतील आणि गुळगुळीत आहेत. खड्डे खळगे, रस्ते वर खाली असणे असे काही नसल्याने महाराष्ट्रातून गेलेल्या आम्हाला थोडे चुकल्यासारखे वाटले खरे!!! शिवाय रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे, स्वच्छता ह्यामुळे प्रवास फार आनंदाचा होतो. उडुपी शृंगेरी रस्ता तर आगुंबे जंगलातून जातो. त्यामुळे दाट झाडी होती. रस्त्यात सुप्रसिद्ध आगुंबे घाटही येतोच. सकाळची प्रसन्न वेळ आणि इतका छान रस्ता..दिवसाची चांगली सुरुवात होण्यासाठी आणखी काय पाहिजे?!!  आम्हाला वाटले होते इतक्या लवकर फारसे कोणी श्रुंगेरीत आलेले नसेल. पण शृंगेरीला पोचल्यावर लक्षात आले की आमच्यासारखाच विचार अनेकांनी केला होता!  अनेक बस रात्रभराचा प्रवास करून सकाळी शृंगेरीला पोचल्या होत्या. त्या लोकांच्या प्रातर्विधी आणि अंघोळीसाठी अनेक ठिकाणी माफक पैसे घेऊन उत्तम सोय केलेली होती....

कोस्टल कर्नाटक १ - मंगळुरू

  मंगळुरू- कुडला - मंगलोर - मंगलापूरम ही सगळी एकाच गावाची नावे. मंगलादेवी मंदिरावरून ह्या गावाचे नाव पडले मंगळुरू. दक्षिण कन्नड जिल्ह्याचे हे प्रमुख ठिकाण. सुंदर मंदिरे, स्वच्छ समुद्रकिनारे, नारळी-पोफळीची झाडे, आधुनिकतेच्या खुणा मिरवणारे मॉल्स आणि शहराबाहेरची पण तशी जवळच असणारी अनेक पर्यटन स्थळे.. ह्या साऱ्यामुळे मंगळुरु नेहमीच पर्यटकांचे आवडते राहिलेले आहे.  मंगळूरूला जाणारे आमचे विमान नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून होते. हा विमानतळ पाहण्याची उत्सुकता होतीच.  हा अतिशय भव्य आणि सुव्यवस्थित विमानतळ आहे. अनेक विमाने एकावेळी विमानतळावर आली तरी येणाऱ्या आणि जाणाऱ्या प्रवाशांच्यासाठी सर्व आवश्यक सुविधा केलेल्या आहेत.  जशी वर्दळ वाढेल तशी विमानतळावर जाण्यासाठी वाहतुकीची साधने देखील वाढतील अशी आशा आहे.  नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ  नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ  नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ  नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ  लहानशा प्रवासानंतर विमान मंगळुरुला उतरले. मंगळुरु विमानतळ म्हणजे टेबलटॉप रनवेज असणाऱ्या भारतातील मोजक्या विमानतळ...

रवींद्रनाथ टागोरांनाही भुरळ घालणारे 'कारवार'

कारवार - पांढऱ्या वाळूचे स्वच्छ समुद्रकिनारे, हिरव्या झाडांनी नटलेले डोंगर, काळी नदी, लाल माती असलेले सुंदर शहर. शहर होऊ पाहणाऱ्या किंवा खरे तर आता शहर झालेल्या कारवारने अजून आपले गावपण थोडे तरी टिकवून ठेवले आहे. शहरी बकालपणा मात्र टाळता आलेला नाही.   गोवा, कर्नाटक आणि महाराष्ट्र असा तिन्हींचा संगम आपल्याला कारवारमध्ये दिसतो. मराठी बोलणारी माणसेही भेटत राहतात.  गोव्यासारखे पर्यटकांचे लोंढे दिसत नाहीत. कदाचित आम्ही मार्चच्या अगदी सुरुवातीला गेलो तेव्हा अजून पर्यटकांचा ऐन हंगाम सुरु झाला नसावा!! उत्तर कन्नड जिल्ह्याची जीवनरेखा असणारी काळी नदी सदाशिवगड जवळ समुद्राला मिळते. तिथे एक मोठा पूल बांधलेला आहे. कारवार आणि गोव्याला जोडणारा हा पूल आता एक पर्यंटनस्थळच झाला आहे. सूर्योदय बघण्यासाठी पादचारी पुलावर जमलेले तुरळक पर्यटक, धावण्याचा सराव करणारे धावपटू, सायकलस्वार ह्यांच्या खेरीज सकाळच्या वेळी तिथे कोणीही नसते. आपल्या निसर्ग सौदर्यामुळे आणि शांततेमुळे हे ठिकाण अवश्य भेट देण्याजोगे आहे. आमचे हॉटेल ह्या पुलाच्या अगदी जवळ असल्याने आम्ही सूर्योदय अगदी मनसोक्त वेळ देऊन पाहू शकलो....