Skip to main content

शिवसुताय नमोनमः - गणेश व शिव मंदिर, प्रम्बनन, इंडोनेशिया

 सध्या सर्वत्र साजऱ्या होत असलेल्या, माझ्या आवडत्या गणेशउत्सवात मनात काय येत असेल, तर फक्त गणपती! मग विचार केला तुम्हाला पण एका गणपती मंदिरातच का नको घेऊन जायला? चला तर मग!

File:Prambanan-ganesha.jpg - Wikimedia Commons
गणेश मूर्ती- ९ वे शतक- प्रम्बनन, इंडोनेशिया 
📷 आंतरजाल 


हे मंदिर बांधले गेले आहे ९व्या शतकात आणि मी ह्या मंदिराला भेट दिली होती १३ वर्षांपूर्वी - २००७ मध्ये. हे बहुतेक सर्वात मोठे शिवमंदिर असू शकेल. 
हे मंदिर आहे इंडोनेशिया मध्ये, योग्यकर्ता किंवा जोगजकार्ता जवळ. असे म्हणतात की योग्यकर्ता हे नाव आले भारतातल्या अयोध्येमुळे. लक्षात घेण्याजोगी गोष्ट आहे. त्या काळी श्रीरामांची जन्मभूमी असलेल्या अयोध्येचे किती आकर्षण जगभर होते! इंडोनेशिया मध्ये योग्यकर्ता आहे, थायलंड मध्ये अयुत्थ्या आहे. 
योग्यकर्तापासून जवळपास २० किलोमीटरवर हा हिंदू मंदिरांचा प्रचंड समूह आहे, नाव आहे प्रम्बनन. 


File:Indonesia regions map.png - Wikimedia Commons
इंडोनेशियाच्या नकाशात प्रम्बनन. 
📷 आंतरजाल 

रकाई पिकतान नावाच्या हिंदू संजय राजवटीच्या राजाने पहिले मंदिर बांधायला सुरुवात करून नवव्या शतकाच्या मध्यात पूर्ण केले. ह्या समूहातील बाकी मंदिरांची भर घातली ती राजा लोकपाल आणि बळीतुंग महा संभू नावाच्या मातरम राज्यातील राजांनी.
३० स्क्वेअर किलोमीटरच्या भव्य परिसरात हा मंदिर समूह आहे. मूळ नाव आहे शिवगृह -शिवाचे घर किंवा शिवालय -शिवाचे वसतिस्थान, राज्य. 


कॅण्डी- बहासा इंडोनेशिया मध्ये -मंदिर 

जेव्हा तुम्ही ह्या मंदिर समूहात प्रवेश करता किंवा खरे तर काही अंतरावरूनच ह्या मंदिरांचे उंचच उंच, निमुळते कळस तुम्हाला दिसू लागतात. ते दृश्य इतके सुंदर आणि संस्मरणीय आहे की आयुष्यभरात तुम्ही विसरू शकणार नाही. मला नेहमी वाटते की प्रम्बनन हा शब्द संस्कृत ब्रम्हानंद ( परम आनंद) ह्या शब्दाचे रूप असेल!

पहिली झलक

तुम्ही आवारात प्रवेश करताच तुम्हाला ब्रम्हा, विष्णू, शिव मंदिरांचे कळस दिसतातच पण सगळीकडे दगडांचे ढिगारेच्या ढिगारेदेखील दिसतात. कोसळलेल्या मंदिरांचे हे दगड आहेत. 

File:Yogyakarta Indonesia Prambanan-temple-complex-06.jpg ...
प्रम्बनन मंदिर समूह 
📷 आंतरजाल 

ह्या मंदिर समूहाला वेढणारी एक भिंत आणि आवार होते जे आता नाही. त्या भिंतीच्या आत पूर्वी एकूण २४० मंदिरे होती. त्यातील २२४ मध्यभागात होती. ही मंदिरे समकेंद्री चौकोनात बांधली गेलेली आहेत. त्यांना म्हणतात कॅण्डी पेरवारा ( प्रवर असणार). मध्यभागी जात जात ही संख्या कमी कमी होत जाते. ६८, ६०,५२, ४४ अशी ही समकेंद्री मंदिरांची रचना आहे. 

File:Prambanan Temple Compound Map en.svg
मंदिर समूहाचा नकाशा 
📷 आंतरजाल 

दुर्दैवाने ह्या भागातली बरीच मंदिरे कोसळलेली आहेत. नुसते दगडाचे ढिगारे उरलेले आहेत. आम्ही प्रम्बननला जून २००७ मध्ये गेलो होतो. त्या आधी २००६ मध्ये इंडोनेशियाला एक मोठा भुकंप, तीव्र धक्का देऊन गेला होता. त्यामुळे ह्यातील बरीच मंदिरे पडली होती. 

ढासळलेली मंदिरे

सर्वात आतल्या भागात आहेत उत्पत्ती, स्थिती आणि लय ह्यांच्या देवांची, ब्रम्हा, विष्णू आणि महेश ह्यांची मंदिरे. ह्या शिवाय त्या तिघांच्या वाहनांची, अनुक्रमे हंस, गरुड आणि नंदीची पण मंदिरे आहेत. 

मंदिर समूहाचा मध्य भाग

शिवमंदिर सर्वात उंच म्हणजे १५४ फूट उंच आहे आणि सर्वात जास्त कोरीवकाम केलेले आहे. त्यात चार मूर्ती आहेत. शंकर गुरुरूपात आहे, शिवपत्नी पार्वती आहे, मुलगा गणेश आहे आणि अगस्त्य ऋषी अशा चार मूर्ती आहेत. आम्ही २००७ मध्ये गेलो, तेव्हा तिथे दुरुस्तीचे काम चालू असल्याने आम्हाला मंदिरात आत, गर्भगृहात जाता आले नाही, दिलेले माहितीपत्रक बघून समाधान मानावे लागले. 

शिव मंदिरातील मूर्ती 
 
त्रिमूर्ती मंदिरांच्या भिंतींवर रामायण आणि महाभारत कथा शिल्पकृतींद्वारे चित्रित केली आहे. आम्ही मंदिराच्या गर्भगृहात जाऊ शकलो नाही तरी ही शिल्पे मात्र पाहू शकलो.

भिंतींवरील कोरीव काम 
 

बारीक कलाकुसरीची भित्तीशिल्पे 

कोरीवकाम 

प्रम्बनन मंदिरे 

प्रम्बनन मंदिरे 

ह्या मंदिरांचे स्थापत्य, उत्तुंग उंची, भव्य आवार, अप्रतिम भौमितिक रचना, ज्या उत्साहाने हे प्रचंड बांधकाम केले गेले ते, ह्या सगळ्या गोष्टी तेव्हाही म्हणजे नवव्या शतकात देखील मानववंश किती प्रगत होता हेच दाखवते. 
मला तर वाटते, प्रत्येकाने आयुष्यात एकदा तरी प्रम्बनन मंदिरे बघायलाच हवीत. ती पाहून इंडोनेशियातील ज्या हिंदू राजांनी हे भव्य स्वप्न पाहिले आणि ते स्वप्न प्रत्यक्षात आणले त्यांच्या विषयी प्रचंड आदर वाटतो. 


अच्छा प्रम्बनन मंदिरांनो - तुम्ही अलौकिक आहेत! 


ता. क. 
१. काही लोकांच्या मते प्रम्बनन हा शब्द परब्रह्म या संस्कृत शब्दावरून आला आहे. परब्रम्ह याचा अर्थ आहे सर्वोच्च तत्व, सर्वोच्च सत्य.
२. प्रम्बनन येथे सापडलेल्या शिलालेखानुसार या मंदिराची प्राणप्रतिष्ठा 12 नोव्हेंबर 856मध्ये झाली होती
३. आता नोव्हेंबर 2019 मध्ये म्हणजे त्याच्या उद्घाटना पासून ११६३ वर्षांनी तिथे पूजा, अभिषेक आणि प्रार्थना असा तीन दिवसांचा कार्यक्रम करण्यात आला. हे सगळे पूजा विधी तिथे सापडलेल्या हस्तलिखितानुसार केलेले होते
४. तुम्हाला प्रम्बननचे चांगले फोटो घ्यायचे असतील तर कृपया दिवसा उजेडी प्रम्बननची भेट ठरवा. जर का योग्यकर्ता ला राहत असाल तर तिथून सकाळी लवकर निघा आणि प्रम्बननला भेट द्या. 
५. तिथे प्रांगणात संध्याकाळी रामायणावर आधारित नृत्यनाट्य सादर होत असते.


Comments

Popular posts from this blog

लक्ष्मीकेशव मंदिर, कोळीसरे

  मंदिर म्हणजे एक उर्जाकेंद्र! प्राचीन काळापासून भाविक मंदिरात देवतांच्या दर्शनासाठी जात आले आहेत. आजही हिंदू लोक मंदिरात जाऊन, चित्त एकाग्र करून ध्यान, पूजा आणि आरती करतात. यामुळे त्यांना ऊर्जा आणि शांततेचा अनुभव मिळतो. प्रत्येक देवी-देवतेचे एक विशिष्ट मंदिर असते.  असेच कोळीसरे येथे श्री विष्णूचे - लक्ष्मीकेशवाचे सुंदर मंदिर आहे . रत्नागिरी शहरापासून फक्त ५० किलोमीटर अंतरावर किंवा गणपती पुळ्यापासून २१ किलोमीटर अंतरावर निसर्गसुंदर कोळीसरे गाव आहे. पुणे मुंबई हून रत्नागिरी जिल्ह्यातील कोळीसरे येथे जायचे असल्यास चिपळूण मार्गे जाता येईल. परशुराम - कोळीसरे रस्त्यात अशी नयनरम्य दृश्ये अनेकदा दिसतात. परशुराम कोळिसरे रस्ता अगदी कमी लोकवस्तीचे, घनदाट झाडी असलेले हे गाव कोळीसरे फाट्याहून आत गेल्यावर दीड दोन किलोमीटर प्रवास केल्यावर येते. रत्नागिरीहून बसने जाता येते अन्यथा मंदिरापर्यंत पोचण्यासाठी स्वतःचे वाहन असणे सोयीचे आहे.  गाडी पार्क केल्यानंतर काही पायऱ्या उतरून मग घनदाट झाडीत वसलेल्या ह्या मंदिरात जाता येते. ह्या रस्त्यावरून व्हील चेयर जाउ शकत नाही. पार्किंग पासून उ...

नागाव

  नागाव म्हणजे माडापोफळींच्या वाड्या. नागाव म्हणजे केळीच्या बागा. नागाव म्हणजे सुंदर स्वच्छ समुद्रकिनारा.  नागाव म्हणजे वस्त्रगाळ मऊ वाळूचा किनारा.  नागाव म्हणजे अनेक मंदिरे. नागाव म्हणजे लक्षवेधी दीपमाळा. नागाव म्हणजे कोपऱ्या कोपऱ्यावर भेटणारे तळे! नागाव म्हणजे तळ्यात फुललेलीअनेकानेक कमळे!! नागावच्या शेजारचे  अक्षी, चौल, रेवदंडा ही देखील अशीच गावे. नितांतसुंदर, साधी. अलिबाग आणि ह्या सर्व गावांना मिळून अष्टागर असे म्हणत असत. आठ गावांचा समूह.  अलिबाग पर्यटन स्थळ म्हणून ७० च्या दशकापासूनच प्रसिद्ध झाले होते. तेव्हा शांत निवांत असलेले अलिबाग नंतर खूपच गजबजले आणि मग दुसऱ्या सहस्त्रकात अलिबागशेजारील रेवदंडा, नागाव, चौल ही लहान लहान गावे देखील पर्यटनस्थळे म्हणून विकसित होऊ लागली.  ह्या निवांत, शांत गावांना जणू अचानक खडबडून जाग आली. तिथेही पर्यटकांची गर्दी वाढू लागली. स्थानिक लोकांना रोजगार, विकासाची संधी, अर्थार्जनाची संधी त्यात दिसली.  गावांवर आधुनिक पेहराव चढला आणि तिथे उदयाला आली मुंबईकरांची आवडती पर्यटनस्थळे.  आता तर परिस्थिती अशी आहे की जवळ जवळ एका...

हनुमान जन्मस्थळ आणि शबरी धाम, जय श्रीराम, जय जय राम!

आज आपण रामायणातील दोन ठिकाणांना भेट देणार आहोत आणि दोन महान राम भक्तांच्या भेटीसाठी तुम्हाला घेऊन जाताना मला अतिशय आनंद झालेला आहे.  पहिल्यांदा आपण जाऊयात, हनुमानाच्या जन्मस्थानी अंजनेय टेकडीवर. ही टेकडी कर्नाटक मध्ये हंपीजवळच्या भागात आहे असे मानले जाते. ही जागा अंजनीच्या पुत्राचे, अंजनेयाचे म्हणजेच हनुमानाचे जन्मस्थळ आहे.  भारतात अजूनही इतर काही ठिकाणे आहेत की जी हनुमानाचे जन्मस्थळ म्हणून सांगितली जातात. पण अंजनेय टेकडी हे हनुमानाचे जन्मस्थळ असणे मला सर्वात जास्त संयुक्तिक वाटते. कारण ऋष्यमूक पर्वत, जिथे सुग्रीव, हनुमान आणि भगवान श्रीराम यांची भेट झाली होती तो इथून जवळच आहे. हंपीपासून अंजनेय टेकडीपर्यंतचा रस्ता नैसर्गिक सृष्टिसौंदर्याने अतिशय समृद्ध आहे. तुंगभद्रेच्या किनाऱ्यावर असल्यामुळे हा संपूर्ण प्रदेश अत्यंत सुपीक आहे रस्त्याच्या दोन्ही बाजूला सतत तुम्हाला भात शेती, नारळाची झाडे, केळीच्या बागा आणि अर्थातच प्रचंड मोठे खडक, जे ह्या भागाचे वैशिष्ट्य आहेत ते दिसत राहतात. हा संपूर्ण परिसर रामायणातला किष्किंधा भाग मानला जातो. भात शेती केळीच्या बागा भातशेतीचा मखमली गालिचा टे...

पैसाच्या खांबाचे मंदिर!

पैसाच्या खांबाचे मंदिर! अनेक वर्षांपूर्वी दुर्गा बाईंचे ' पैस ' हे पुस्तक वाचनात आले. त्यात होता हा पैसाचा खांब. पैस म्हणजे अवकाश. जिथे ज्ञानेश्वरी लिहिली गेली तो हा पैसाचा खांब. ज्ञानेश्वरीचे जन्मस्थान! खांबाला टेकून बसलेले, ज्ञानेश्वरी सांगत असलेले ज्ञानेश्वर आणि ती लिहून घेत असलेले लेखनिक सच्चिदानंद बाबा असे चित्र आधीही अनेकदा पाहिलेले होते. पण त्या खांबाला ' पैसाचा खांब' म्हणतात हे माहितीच नव्हते. पैस ह्या पुस्तकातील पैसाचा खांब हे प्रकरण वाचले आणि अक्षरशः थरारून गेले. 'पैसाच्या खांबाचे मंदिर' अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा या प्रवरा नदीच्या तीरावरील गावी आहे. नेवासे गावाच्या पश्चिमेला हे मंदिर आहे. 'शके बाराशे बारोत्तरे| तैं टीका केली ज्ञानेश्वरे| सच्चिदानंद बाबा आदरे| लेखकू जाहला|' असा उल्लेख सापडतो. मूर्त आणि अमूर्त ह्याची अशी जोडणी म्हणजे ज्ञानाच्या अनंत अवकाशात जाण्याची पहिली पायरीच जणू. ज्ञानेश्वरी वाचण्याएवढी आणि कळण्याएवढी योग्यता ह्या जन्मात अंगी येईल की नाही माहिती नाही. पण हा खांब पाहू या कधीतरी असे ठरवून टाकले. अवघड नव्हतेच जाणे. संभाजीनगर...

श्री व्याडेश्वर देवस्थान, गुहागर

  कोकणावर निसर्गाचा वरदहस्त आहेच. त्यातही काही गावांनी आपल्या सौंदर्याने विशेष स्थान मिळवले आहे. त्यातील एक महत्वाचे नाव म्हणजे गुहागर. सुंदर लहानसे गाव आहे. एक मुख्य रस्ता, त्याच्या दोन्ही बाजूला घरे, घरांच्या मागे नारळ सुपारीच्या वाड्या. रस्त्याच्या एका बाजूच्या प्रत्येक घराच्या मागच्या वाडीतून समुद्राला जाण्याचा रस्ता, भव्य स्वच्छ समुद्रकिनारा असे हे मोहात पाडणारे गुहागर गाव.  गुहागर प्रसिद्ध आहे व्याडेश्वरासाठी. व्याडेश्वर हे शंकराचे मंदिर अनेक कोकणवासीयांचे कुलदैवत आहे. कोकणातील सर्वात महत्त्वाच्या शिवमंदिरांपैकी एक म्हणजे गुहागरमधील श्री व्याडेश्वर देवस्थान.  श्री व्याडेश्वर देवस्थान.  श्री व्याडेश्वर देवस्थान.  तुम्हाला जर का कधी दक्षिणेतील मंदिरे पाहून वाटले असेल की अशी मंदिरे आपल्या महाराष्ट्रात का नाही?!! तर गुहागरच्या व्याडेश्वर मंदिराला भेट द्या. भव्य सुंदर देवालय आहे. मंदिराचे आवार स्वच्छ, प्रशस्त आहे. मुख्य म्हणजे अगदी नांदते, जागते मंदिर आहे. मंदिराची साफसफाई, निगराणी केली जाते आहे. आवारात भरपूर झाडे आहेत. श्री व्याडे...

महेश्वर

महेश्वर हे मध्यप्रदेश पर्यटन निगमच्या पर्यटन स्थळांमधले एक महत्वाचे नाव आहे. पण करोडो भारतीयांसाठी ते केवळ एक पर्यटन स्थळ नाही तर एक तीर्थस्थान असते. लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या वास्तव्याने पुनीत झालेले स्थान आहे.  महेश्वर किल्ला प्रवेशद्वार  राजवाडा प्रवेशद्वार  बाह्यरूप  पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर  राजवाडा प्रवेशद्वार  अहिल्याबाई होळकर हे केवळ भारताच्याच नव्हे तर विश्वाच्या इतिहासातील एक सोनेरी पान. संपूर्ण मानव विश्वातील यशस्वी स्त्री राज्यकर्त्यांची सूची करायची झाली तर अहिल्याबाई होळकरांचे नाव ठळकपणे लिहायला लागेल.   31 मे 2025 ला त्यांची तीनशेवी जयंती आहे. पण 300 वर्षांपूर्वी होऊन गेलेल्या अहिल्याबाईंचे आयुष्य अगदी आजच्या आधुनिक काळातल्या आव्हानातही मार्गदर्शक ठरावे असेच आहे.  त्यांच्याविषयीचा आदर मनात घेऊनच आपण महेश्वरला जातो आणि त्या भावनेच्या प्रकाशात महेश्वर पाहतो. महेश्वरला फार मोठी प्राचीन परंपरा आहे. स्कंद पुराणाच्या रेवा खंडात आणि वायू पुराणाच्या नर्मदा रहस्य मध्ये महिष्मती म्हणजे महेश्वरचे वर्णन आलेले आहे. 'गुप्...

श्री क्षेत्र गिरनार

  गिरनार माझ्यासाठी ते मोहक फळ होते, जे मिळायला अवघड होते आणि कितीही हवेहवेसे वाटले तरी त्यासाठी माझ्याकडून प्रयत्न मात्र अजिबात केले गेले नव्हते. गिरनारच्या अद्भुत कथा खूप ऐकल्या, वाचल्या होत्या. गिरनारची मनात ओढ होती. पण ते सगळे मनातच. प्रत्यक्षात कोणतेही ट्रीप ठरवताना, कुठे जायचे याचा विचार करताना पुढे होऊन गिरनारला जाऊयात असे कधी म्हटले नव्हते हेही तितकेच खरे.  श्री क्षेत्र गिरनार  काय आहे गिरनार?  गिरनार हा पर्वत समूह आहे. दत्तात्रेयांचा इथे निवास असल्याने ते हिंदूंच्यासाठी अत्यंत पवित्र आणि महत्वाचे धार्मिक स्थळ आहे.  हिमालयापेक्षाही जुना असलेला हा पर्वत अनेक नावांनी प्राचीन साहित्यात आलेला आहे. रेवतक हे त्यातील सर्वात जास्त माहिती असलेले नाव.  जैन लोकांसाठी देखील हे अत्यंत महत्वाचे ठिकाण आहे कारण इथे जैन मंदिर समूह देखील आहे. नेमिनाथ, आदिनाथ, मल्लिनाथ आणि इतर तीर्थंकरांची मंदिरे आहेत.  कुठे आहे गिरनार ? गुजराथ, सौराष्ट्र मधील जुनागढ जवळ गिरनारच्या पायथ्याचे, तलेटी नावाचे गाव आहे.  गिरनारला लोक का जातात? तेथील द...

हिंदवी स्वराज्याची राजधानी - किल्ले रायगड

रायगड! हे नाव घेताच मनात उठणारे भावतरंग अवर्णनीय असेच असतात. ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी म्हणजे 'शिव राज्याभिषेक दिन', 'हिंदू साम्राज्य दिन'. अभिमानाचा, गौरवाचा दिवस. भारतीय इतिहास हा संघर्षाचा व विजयाचा आहे. त्यातील झळाळून उठणारे तेजस्वी, सोनेरी पान म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे कर्तृत्व! शिवाजी महाराज आणि त्यांच्या मावळ्यांचे अविश्रांत परिश्रम पूर्णत्वाला पोचले ते ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी, १६७४ ह्या दिवशी. हा केवळ राज्याभिषेक नव्हता. हिंदवी स्वराज्याची स्थापना झाल्याची केवळ अधिकृत घोषणा नव्हती. तर संतांच्या उपदेशांनी जागलेली सज्जन शक्ती, मावळ्यांच्या रूपातील सामान्य जनतेच्या मनात जागलेली वीरवृत्ती ह्यांच्या संगमाने घडलेला तो एक अभूतपूर्व अविष्कार होता. राज्याभिषेक ही शिवाजी महाराजांची व्यक्तिगत महत्वाकांक्षा नव्हती. रोहिडेश्वर येथे लहानपणी घेतलेली प्रतिज्ञा अथक प्रयत्नांनी पूर्ण झाली होती. "हे हिंदवी स्वराज्य व्हावे हे तो श्रींची इच्छा" हे वचन सार्थ झाले होते. पण राज्याभिषेकाच्या निमित्ताने शिवाजीमहाराजांनी मोठ्या युक्तीने त्यांच्यावर असलेली लोकांची निष्ठा सिंहा...

परशुराम कुंड, अरुणाचल.

अरुणाचल मधील टेंगापानी, नामसाईच्या गोल्डन पॅगोडाहुन परशुराम कुंड ला जाण्यासाठी  आम्ही निघालो. ही गोष्ट आहे ऑक्टोबर २०१९ मधील.  त्या दिवशी सतत पाऊस पडत होता. सगळीकडे हिरवेगार तर अरुणाचल मध्ये नेहमीच असते. पावसात भिजलेली झाडे, स्वच्छ हिरवळ, मध्येच ढगांत अदृश्य होणाऱ्या पर्वतरांगा, वाहणारे थंडगार वारे, फार सुंदर होते ते सगळे.  अरुणाचल  डोंगरातला रस्ता होता. तुफान वारा होता. त्या सगळ्या अवाढव्य डोंगराळ प्रदेशात आमची गाडी म्हणजे एक ठिपका होती. वाऱ्याने उडून जायला वेळ लागणार नाही इतका जोरात वारा वाहत होता. एक खिडकी फोटो काढण्यासाठी उघडली तर ड्राइवर म्हणाला की दुसऱ्या बाजूची पण उघडा, नाहीतर आत आलेल्या वाऱ्याने गाडी हलायला लागेल. शेजारी खोल दरी दिसत असताना गाडी हलायच्या कल्पनेने अंगावर काटा आला आणि पहिली खिडकी देखील फोटो काढल्या काढल्या बंद केली..नकोच ती वाऱ्याची परीक्षा!  रस्ता कसा होता हे प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी पुढे दिलेल्या लिंकवर क्लिक करून विडिओ नक्की बघा. Namsai- Parshuram kund road ह्या नदीचे नाव लोहित आणि ह्या जिल्ह्याचेही नाव लोहित. लोहितचा अर्थ रक्त किंवा रक्...

सिद्धेश्वर मंदिर, टोके - प्रवरा संगमावर उमललेले दगडी बिल्वपत्र

भिंतीवरील कोरीवकाम  महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्ह्यातले टोके हे एक लहान गाव. अहिल्यानगर कडून छत्रपती संभाजीनगरला जाताना डावीकडे नदीच्या काठावर हे सुंदर मंदिर आपल्याला दिसते. जगप्रसिद्ध वेरूळ, अजिंठा लेणी बघायची असतील तर सांभाजीनगरला जावे लागते हे आपल्याला माहिती असेलच. सिद्धेश्वर मंदिर, टोके हे मला एखाद्या दगडी बेलपत्राप्रमाणे वाटले. हे बेलपत्र उमलले आहे अमृतवाहिनी प्रवरा आणि दक्षिणगंगा गोदावरीच्या संगमावर. त्या संगमाच्या, ज्याला प्रवरा संगम म्हणतात त्या परिसरात सिद्धेश्वर, घटेश्वर, मुक्तेश्वर, रामेश्वर, संगमेश्वर अशी अनेक मंदिरे आहेत. पण सर्वात खास आणि सुंदर आहे ते सिद्धेश्वर मंदिर. सिद्धेश्वर मंदिर परिसर बघा असा दिसतो! हा फोटो घेतला होता सप्टेंबर २०१९ मध्ये. पावसाळा भरपूर बरसून आता आपला मुक्काम आवरत होता आणि नद्यांना भरपूर पाणी होते तेव्हाचा! मंदिराचा परिसर  सिद्धेश्वर मंदिर समूह हा तुलनेने नवा समूह आहे, अठराव्या शतकात बांधला गेलेला. पेशव्यांच्या काळात बांधल्या गेलेल्या ह्या मंदिराला सभोवताली एखाद्या छोट्या किल्ल्यासारखी किंवा गढीसारखी उंच भिंत आहे. मुख्य मंदिर आहे शंकराचे...