देवरियाताल चंद्रशिला ट्रेक - भाग 5- अंतिम भाग - बनियाकुंड- तुंगनाथ- चंद्रशिला
📷Samrat Darda
१५ एप्रिल, बनियाकुंड कॅम्पसाईट मधून काढलेला चंद्राचा सुंदर फोटो. त्या दिवशी शुक्ल पक्षातील सप्तमी किंवा अष्टमी असावी. कारण १७ एप्रिलला रामनवमी होती. सुंदर काळ्याभोर रात्रीचा सघन अंधार.. पौर्णिमा अजून साताठ दिवसांवर असली तरीही आत्तापासूनच तेजाळलेला चंद्र.. चमचमणारे, मध्येच ढगांच्या आड लपणारे चांदणे, आमच्या मनातील समिटविषयीची उत्सुकता..फार अनोखी रात्र होती ती.
उद्या पहाटे दोन वाजताचा वेकप कॉल असणार होता. आम्हाला आवरून, ब्रेकफास्ट करून तीन वाजता निघायचे होते. न विसरता घेण्याच्या गोष्टी तशा तर डे पॅक मध्ये भरूनच ठेवल्या होत्या. हेडलॅम्पच्या उजेडात सामान देखील आवरून ठेवले होते. पहाटे निघताना बाकी सामान मेन टेन्ट मध्ये नेऊन ठेवायचे होते.
इतक्या उंचीवर जायचे होते. काही तासांत आम्ही ४००० फुटांचा अल्टीट्युड गेन करणार होतो. झोपण्यासाठी डोळे मिटले खरे, पण मिटल्या डोळ्यांपुढेही बर्फाच्छादित शिखरांचीच दृश्ये तरळत होती. कधीतरी झोप लागली. सतत अधूनमधून जाग येऊन घड्याळात बघत होते. सगळे दोन वाजता उठणार, त्या आधी आपण आपले आवरून घेऊ या असा विचार डोक्यात होता तो बहुधा सतत जाग आणत असावा!!
पहाटे पावणेदोनलाच उठले. टेन्टमेंटला त्रास होऊ नये म्हणून अगदी आवाज न करता टेन्ट उघडला. स्नेहाच्या टेन्टशी जाऊन तिला हाक मारली. ती पण जागी झालेलीच होती. मग आम्ही दोघी निघालो बायो टॉयलेट्स च्या दिशेने. कॅम्पसाईट्स वर सगळीकडे बायोटॉयलेट्सच होती आणि ती कधीच आमच्या टेन्ट्सच्या जवळ नसायची. थोडे चालून गेल्यावर, एखादा चढ चढल्या अथवा उतरल्यावर टॉयलेट्सचे टेन्ट असायचे. बनियाकुंड कॅम्पसाईट देखील त्याला अपवाद नव्हती. त्यात काल झालेल्या पावसाने झालेला थोडा चिखल, पहाटे पावणे दोनचा गडद अंधार, थंडी, आमच्या हेडलॅम्प्सचाच पडेल तितकाच उजेड अशा सगळ्या वातावरणात आम्ही टॉयलेट्स टेन्ट्सला जाऊन आलो. स्नेहाला झाडांमध्ये काहीतरी चमकल्यासारखे वाटले. पण पुन्हा पाहिले तर काही दिसले नाही. तसेही इतक्या अंधारात आणि आजूबाजूला असलेल्या दाट जंगलझाडीत काही असते तरी लक्षात येणार नव्हतेच.
दोन वाजता वेकप कॉल झाला. सगळेजण जण उठून आवरू लागले. ब्रेकफास्ट झाला. आता निघायच्या आधी टॉयलेटला पुन्हा जाऊन यावे म्हणून गेलेल्या दोन मैत्रिणी मेन डायनिंग टेन्ट मध्ये आम्ही सगळे होतो तिथे पळतच आल्या. इतके अंतर पळत आल्याने त्यांना धाप लागली होती. त्यांना चमकणारे डोळे आणि काही प्राणी दिसले होते. ट्रेक लीडर सांगत होता, प्राणी काही करणार नाहीत. आपण त्रास दिला नाही तर तेही काही करत नाहीत. मग मोठा घोळका आणि ट्रेक लीडरची मिरवणूक टॉयलेट्स च्या दिशेने निघाली. जवळच्या झाडीत, खरेच होते दोन/तीन प्राणी. पण काय आहे ते मात्र आमच्या हेड टॉर्च च्या अपुऱ्या उजेडात दिसले नाही. अशा तऱ्हेने वन्य प्राणी बघण्याची हौस देखील भागली!!
सगळ्यांचे आवरून तीन/ सव्वा तीन वाजता आम्ही निघालो. आमच्या हेडलॅम्पचा उजेड पायापुरता पडत होता. असे स्वयंतेजाने उजळलेले आम्ही अंधारात चालत होतो. इतके पंचवीस जण सोबत होतो, ओळीने चालत होतो म्हणूनच धीर वाटत होता. नाहीतर रस्ता दिसत नव्हता, डोंगरातला चढ, कडे, ओबडधोबड दगड, मध्येच डावीकडे आलेली दरी, एकट्यादुकट्याची अजिबात हिंमत झाली नसती.
आज आम्हाला वेळेची मर्यादा घातलेली होती. हिमालयात आणि इतक्या उंचीवर तर मोसम कधी बदलेल सांगता येत नाही. खूप पाऊस आला, वादळ झाले किंवा बर्फ पडायला लागला तर आम्हाला चालायला जास्त वेळ लागला असता. आम्हाला सांगितलेले होते की साडेनऊपर्यंत आम्ही चंद्रशिलाला पोचलेलो नसलो तरी जिथे असू तिथून परतीचा प्रवास सुरु करायचा. त्यामुळे आज कोणीच रेंगाळत नव्हते. मी अगदी दुसऱ्या नंबरला चालणार होते. म्हणजे ट्रेक गाईड पहिला आणि त्याच्या मागे मी. त्यामुळे मला तर भराभर चालण्याची विशेष ओढ वाटत होती. जितके लवकर पोचू तितका समिटवर जास्त वेळ मिळणार होता.
भरपूर चढ चढल्यावर, तासाभराने आम्हाला दोन मिनिटे बसता येईल, विश्रांती घेता येईल अशी जागा आली. कधीचा एक कुत्रा आमच्या सोबत चालत होता. तो देखील थांबला. आता पहाटेचे सव्वाचार वाजले होते.
📷Co trekker
इतक्यावेळ आम्हाला आजूबाजूचे काहीही दिसत नव्हते. कारण आम्ही डोंगरातूनच चालत होतो. पण आता इथून चोपटा शहराचे लाईट्स दिसले.
📷Co trekker
मिनी स्वित्झर्लंड म्हणून प्रसिद्ध असलेले चोपटा पर्यटकांचे आवडते ठिकाण आहे. चोपटा इथे जाण्यासाठी रुद्रप्रयाग हून गाडीचा रस्ता आहे. त्यामुळे तिथे सगळेजण जाऊ शकतात. अनेक रिसॉर्ट्स, हॉटेल्स आहेत. अनुपम सृष्टीसौंदर्य आहे.
थोड्या वेळात आम्ही चोपटा क्रॉस केले. घरे, हॉटेल्स लागली आणि भरपूर कचरा देखील दिसला. तीन चार दिवस जंगलात चालत होतो तेव्हा कचरा बघायची सवय मोडली होती. माणूस जिथे जाईल तिथे घाण करतो हे पुन्हा एकदा लक्षात आले.
चोपटाच्या पुढील तुंगनाथ पर्यंतचा रस्ता दगडांनी बांधलेला होता. त्यामुळे जरी चढ असला तरीही रानवाटांपेक्षा तुलनेने सोपा वाटला.
आता साडेपाच होत आले. दिशा उजळल्या होत्या. पर्वतशिखरांचे, झाडांचे आकार दिसू लागले.
📷Co trekker
एरवी इतके लक्षात येत नाही. पण आता अक्षरशः मिनिटामिनिटाने प्रकाश वाढत होता. आजूबाजूचे दृश्य त्या प्रकाशात एखाद्या जादुई विश्वासारखे दिसत होते.
📷Co trekker
📷Sumati Dhembre
आता सहा वाजत आले. आता पर्वतांची शिखरे प्रकाशाने उजळू लागली होती. अजून आम्हाला सूर्यदर्शन झालेच नव्हते.
📷Kedar Tembe
आता आम्हाला पाच मिनिटे विश्रांतीसाठी मिळाली. आजूबाजूचे अद्भुत दृश्य डोळे भरून पाहता आले. धुके आणि ढग दोन्हीही सतत येत जात होते. संपूर्ण रस्ता सतत चढाचाच होता. फक्त तो तीव्र चढ नव्हता इतकेच.
📷Sumati Dhembre
आता अधूनमधून थोडा बर्फ दिसू लागला. आम्हाला हिमालयन मोनाल पक्ष्यांची जोडी देखील दिसली. सुंदर रंगांची उधळण असलेला नर आणि तपकिरी एकरंगी मादी असे मोनाल पक्षी असतात. मी तरी ते पक्षी पहिल्यांदाच पाहिले.
📷Samrat Darda
मोरपिसाऱ्याची आठवण करून देणारे त्याचे अंग, मानेला आणि शेपटीला अजूनच वेगळे रंग, सगळीच झळाळती रंगसंगती नजर वेधून घेणारी होती. फोटो तितकासा स्पष्ट नाही. कारण एकतर तो पक्षी खूप दूर होता आणि खूप वेगात जात होता.
आता तुंगनाथ मंदिर आणि चंद्रशिला दिसू लागले.
📷Preeti Thakur
📷Co Trekker
अजूनही हा आमच्यासोबत होता. प्रत्येक दिवशी किती फेऱ्या करत असेल कोण जाणे!! तुंगनाथच्या रस्त्यावर आता इतर लोकदेखील दिसू लागले होते. कचरा देखील होताच. अन्नपदार्थांची रिकामी पॅकेट्स, टिश्यू पेपर्स, प्लॅस्टिकच्या बाटल्या आणखी कितीतरी गोष्टी आजूबाजूला फेकलेल्या होत्या. तरी अजून तुंगनाथ मंदिर बंद होते. बहुतेक सगळी दुकाने बंद होती. येणारे लोक म्हणजे पर्यटक आणि ट्रेकर्स इतकेच. तरी एवढा कचरा दिसत होता. जेव्हा म्हणजे मे मध्ये मंदिर उघडेल, तेव्हा दुकानेही उघडतील. लोकांची गर्दी वाढेल. तेव्हा किती कचरा असेल?
तुम्ही फोटोत आमच्या सगळ्यांच्या कमरेला पिवळ्या बॅग्स लावलेल्या पाहत असाल. त्या होत्या इंडियाहाईक्सने दिलेल्या इको बॅग्स. वाटेत कचरा दिसला की त्यात गोळा करायचा आणि कॅम्पसाईटवर वेगवेगळी पिंपे ठेवलेली असायची. त्यात तो वर्गवारी करून टाकायचा. इंडियाहाईक्सने आत्तापर्यंत असा कित्येक टन कचरा गोळा केला आहे. हिमालयाच्या डोंगर दऱ्यात, कचरा नेण्यासाठी, तिथे काही नगरपालिकांची व्यवस्था नाही! तिथून मग साधारण महिनाभराने एक संस्था तो गोळा करून घेऊन जाते. इंडियाहाईक्सच्या जागरूकतेची आणि पर्यावरण स्नेही धोरणांची ही झलक होती. आम्ही जो वैयक्तिक कचरा तयार करू तो मात्र आपापल्या बॅगमधून आपापल्या शहरात घेऊन जायला सांगितले होते.
आता पावणेसात वाजले होते. खूप चढ चढून झाला होता. आम्हाला स्नॅक्स साठी वेळ दिला होता.
📷Preeti Thakur
आता आजूबाजूला दिसणारा बर्फ वाढला होता.
📷Co Trekker
उंच चढाचे, वळणाचे रस्ते, विरळ होत जाणारी हवा ह्यामुळे आमच्या टीममधल्या काही जणांना हाय अल्टीट्युड सिकनेसची सौम्य लक्षणे दिसू लागली होती. त्यांचे डोके दुखू लागले. एकाला पोटदुखी आणि मळमळण्यामुळे आजच्या दिवसाच्या सुरुवातीलाच परत जावे लागले. त्या आमच्या टीममेटची आठवण आम्हाला सगळ्यांनाच सतत येत होतीच. इतके दिवस ट्रेक केल्यावर आजच्या समिटच्या दिवशी त्याला येता आले नाही ह्याचे वाईट वाटत होते. पण करेल तो ही पुन्हा कधीतरी हा ट्रेक पूर्ण, असे म्हणून आम्ही मनाचे समाधान करून घेत होतो.
अजून चढ चढणे चालूच होते. दगडांनी बांधलेला रस्ता चढायला सोपा की डोंगरवाटांनी नेणारा चढ सोपा ह्यावर मनात चर्चासत्र चालू होते. त्यात असे ठरले की डोंगरवाटा चढायला अवघड असल्या तरी जास्त इंटरेस्टिंग असतात. तर दगडी वाटा चालायला सोप्या पण कंटाळवाण्या वाटतात. अर्थात भवताल इतका सुरम्य होता की कंटाळा यायला वावच नव्हता. आमच्या नजरेच्या पातळीच्याही खाली बर्फाच्छादित शिखरे दिसत होती. इतका विस्तीर्ण, भव्य प्रदेश दृष्टीच्या टप्प्यात येत होता. इतक्यात सूर्यदर्शन झाले.
📷Kedar Tembe
ह्या सुंदर फोटोत आता सूर्य, तुंगनाथ मंदिर आणि चंद्रशिला शिखर तिन्ही एका ओळीत दिसते आहे. हवा क्षणाक्षणाला बदलत होती. कधी धुके, कधी ढग, त्यामुळे फोटो तितकेसे स्पष्ट येत नव्हते. पण निदान पाऊस किंवा बर्फ पडत नव्हता, वादळ नव्हते हे चांगले होते. आम्हाला शिखरावर थोडा जास्त वेळ थांबता येण्याची आशा वाटत होती. आधीच्या एका टीमला विपरीत हवामानामुळे केवळ मिनिटभर शिखरावर थांबता आल्याच्या कथा आम्ही ऐकल्या होत्या.
📷Kedar Tembe
आता साडेसात वाजले होते. आम्ही चालायला सुरुवात करून चार तास होऊन गेले होते. पण आता तुंगनाथ मंदिर अगदी जवळ दिसू लागले होते. त्यामुळे उत्साह टिकून होता.
📷Preeti Thakur
आमचे ट्रेक गाईड प्रमोदजी ह्यांचा देखील आमचा उत्साह टिकवून ठेवण्यात मोठा वाटा होता. ते सतत " चलते रहो, चलते रहो, खुद को पुश करो, अभी थोडाही बाकी हैं " असे सांगत प्रेरणा देत होते. प्रमोदजी, ट्रेक लीडर साहिल आणि दुसरे ट्रेक गाईड अमितजी ह्या तिघांनी आमच्या टीमला वेळोवेळी जे मार्गदर्शन आणि मदत केली त्याला तोड नाही. आमचा ट्रेक निर्विघ्न पार पडावा म्हणून त्यांनी अत्यंत तळमळीने आणि मनापासून प्रयत्न केले.
आता सगळ्यांचेच श्वासांचे मस्त आवाज येऊ लागले होते. कारण चढ खूप तीव्र होऊ लागला होता.
📷Preeti Thakur
📷Co Trekker
जाताना आम्ही मंदिरात न थांबता सरळ चंद्रशिला ला जाणार होतो. हवेचा मूड बदलायच्या आत तिथे पोचणार होतो. आत्तापर्यंतचा प्रवास अगदी वेळेत झाला होता. आता पुढचाही नक्की चांगला होईल असे वाटू लागले. दगडी रस्ता संपून आता डोंगरवाट आली. पण ती वाट तशी दिसत नव्हती. कारण सगळीकडे बर्फ होता!
📷Co Trekker
📷Co Trekker
तुम्ही फारच हळू चालता, मी कधीच पुढे आलो आहे. आता थोड्या वेळ सृष्टीसौंदर्य न्याहाळतो. असे तर म्हणत नसेल ना हा? हा तोच पायथ्यापासून आमच्यासोबत येणारा की हा वेगळा? कसे कळणार? सगळ्यांचेच काळे कोट सारखे!!
सगळीकडे दिसणारी बर्फाच्छादित शिखरे, आभाळाचे आणि धरतीचे अथांगपण, विस्तीर्ण अवकाश, स्वतःचे खुजेपण सगळे सगळे जाणवणारी दृश्ये आता दिसत होती. चंद्रशिला वरून दिसणारे दृश्य नक्कीच अप्रतिम आहे. पण तिथे जाणारी वाट देखील अशा दृश्यांनी विलक्षण सुंदर झाली आहे.
📷Co Trekker
📷Co Trekker
पण काही क्षणातच आमची दृष्टी फक्त पायांखाली राहू लागली. कारण आता बर्फ़ातूनच चालायचे होते. जिथे पावलांच्या खुणा दिसतील त्यात सावधपणे पाय ठेवत जायचे होते.
📷Co Trekker
📷Co Trekker
📷Co Trekker
लांबून बघताना रम्य वाटणारा बर्फ त्यावरून चालताना मात्र परीक्षा घेतो. माझ्यासारख्या उष्ण आणि दमट प्रदेशात राहणाऱ्या व्यक्तीला बर्फावर चालण्याचा अनुभव क्वचितच घेता येतो त्यामुळे मजाही येतेच. मात्र बर्फावर चालताना आपोआप चालण्याची गती थोडी कमी झाली. आता ९ वाजत आले. आता चढ खूपच जास्त झाला होता. पण काही मिनिटांतच आम्ही शिखरावर पोचलो.
तिथून दिसणाऱ्या दृश्याचे केवळ अद्भुत असेच वर्णन करू शकतो. जिथून ३६० अंशातून आपण हिमालय पाहू शकतो अशा अगदी मोजक्या जागांपैकी एक असे हे शिखर. इथून गढवाल आणि कुमाऊ च्या पर्वतरांगा दिसतात. अनेक सुप्रसिद्ध शिखरे दिसतात. नंदादेवी, चौखंबा, द्रोणागिरी, नीलकण्ठ, त्रिशूल, केदारकंठा, गंगोत्री रेंजेस आणि आणखी कितीतरी.
तिथे पोचल्याचा प्रचंड आनंद होईल असे वाटले होते. पण प्रत्यक्षात तिथे पोचल्यावर दिसणाऱ्या दृश्याने अवाक व्हायला झाले होते आणि मनही अतिशय आनंद, जिंकल्याची भावना ह्या सगळ्याच्या पार गेले होते. कपालभाती करुन झाल्यावर सेकंदभर श्वासविरहित अवस्था अनुभवता येते तसे काहीसे झाले होते मनाचे. थोडे भानावर आल्यावर मग ह्या दृश्याचा अनुभव घेता आला ह्याबद्दल मनात अपार कृतज्ञता होती.
आता अर्थातच होता फोटो टाइम. दिनांक १७ ला रामनवमी होती म्हणून आठवणीने नेलेला श्रीराम आणि रामजन्मभूमी प्रतिमा असलेला टी शर्ट घालून चंद्रशिलाला जिथे रामाने तपश्चर्या केली होती असे म्हणतात, तिथे फोटो काढता आला.
📷Sneha Tilak
📷Sneha Tilak
📷Sneha Tilak
📷Sneha Tilak
Amitji, Vrunda, Sahil, Pramodji, Sneha, Kedar
The Team
आम्ही सुदैवी होतो. आम्हाला चंद्रशिला शिखरावर जवळपास सव्वा तास मिळाला. पण आता निघायची वेळ झाली होती. एकेक करून उतरायला सुरुवात केली. चढताना माझा पहिला नंबर होता त्यामुळे अर्थातच उतरले देखील मीच आधी. उतरल्यावर 'माता ने ' ( जपानी वाक्प्रचार - अर्थ - पुन्हा भेटेपर्यंत, पुन्हा भेटू या !) म्हणत मागे वळून एक फोटो काढून ठेवला.
पुन्हा भेटेपर्यंत... 📷Vrunda Tilak
खाली उतरून चालायला सुरुवात झाली.
थोड्या वेळाने रस्ता असा होता. ती बारीक रेघ म्हणजे रस्ता आहे आणि त्यावरचे ठिपके म्हणजे आम्ही आहोत!!
📷Co Trekker
📷Co Trekker
तुंगनाथ मंदिरात गेलो. पंचकेदारांपैकी तृतीय केदार असलेले हे मंदिर हजार वर्षांपूर्वीचे आहे. मूळ मंदिर पांडवांनी बांधले होते असे म्हणतात. जगातील सर्वात जास्त उंचीवर असलेले मंदिर आहे हे.
आम्ही गेलो तेव्हा मंदिर बंद होते. केदारनाथ प्रमाणेच हिवाळ्यात हे मंदिरदेखील बंद असते. सर्वत्र बर्फच असतो. त्यावेळी तुंगनाथमधील विग्रह मक्कुमठ इथे हलवलेला असतो. ह्यावर्षी मंदिराची कपाटे १० मे ला उघडली जातील.
तुंगनाथ मंदिर 📷Vrunda Tilak
📷Sneha Tilak
तुंगनाथ मंदिर 📷Vrunda Tilak
तिथून खाली उतरायला सुरुवात केली. ऊन चांगलेच तापले होते. पण आता दगडी रस्त्याने उतरायचे होते, त्यामुळे तसे अवघड वाटत नव्हते.
वाटेत भेटणाऱ्या लोकांना," बस, अभी थोडा ही बाकी है।" सांगताना मस्त वाटत होते.
सकाळी चढताना हा रस्ता आम्ही मिट्ट काळोखात चढलो होतो. तेव्हा नुसते झाडांचे बाह्याकार दिसत होते. ती सर्व झाडे बुरांशच्या फुलांनी बहरलेली होती. किती सुंदर रंगछटांची फुले होती!! एखाददुसरे झाड नव्हे तर अशी शेकडो झाडे बहरलेली. रस्त्यावर, दरीत, डोंगरउतारावर..सगळीकडे फुललेली झाडे. डोळ्यांचे पारणे फिटावे असेच दृश्य होते ते.
📷Vrunda Tilak
📷Samrat Darda
📷Co Trekker
https://youtu.be/RGTpzUbdKuM
आता परतीच्या प्रवासात नेहमीच वाटते तशी हुरहूर लागलेली होती. संध्याकाळी सारी बेसकॅम्प ला आलो आणि दुसऱ्या दिवशी तेथून निघालो, ऋषिकेश किंवा परतीच्या आपापल्या प्लॅननुसार त्या त्या गावाला.
निघण्याआधी टीशर्ट्स विकत घेऊन फोटो तर काढायलाच हवा होता ना!!
आम्ही सगळे पाच दिवसांपूर्वी एकमेकांना ओळखत नव्हतो असे सांगितले तर आश्चर्य वाटावे इतकी छान मैत्री झाली होती. खूप मस्त, तरुण, उत्साही टीम होती आमची.
आता पुन्हा चंद्रशिलाला कधी जाणे होईल माहिती नाही. पण ट्रेक करत राहण्याची प्रेरणा मात्र आदल्या रात्री बक्षीस मिळालेल्या बॅजमूळे मिळाली. टीममधील 'ट्रेकर फॉर लाईफ' चा बॅज मला दिला गेला. तो बॅज मला सतत आठवण करून देत राहील..हिमालयाची आणि ट्रेकिंगची.
मंदिर म्हणजे एक उर्जाकेंद्र! प्राचीन काळापासून भाविक मंदिरात देवतांच्या दर्शनासाठी जात आले आहेत. आजही हिंदू लोक मंदिरात जाऊन, चित्त एकाग्र करून ध्यान, पूजा आणि आरती करतात. यामुळे त्यांना ऊर्जा आणि शांततेचा अनुभव मिळतो. प्रत्येक देवी-देवतेचे एक विशिष्ट मंदिर असते. असेच कोळीसरे येथे श्री विष्णूचे - लक्ष्मीकेशवाचे सुंदर मंदिर आहे . रत्नागिरी शहरापासून फक्त ५० किलोमीटर अंतरावर किंवा गणपती पुळ्यापासून २१ किलोमीटर अंतरावर निसर्गसुंदर कोळीसरे गाव आहे. पुणे मुंबई हून रत्नागिरी जिल्ह्यातील कोळीसरे येथे जायचे असल्यास चिपळूण मार्गे जाता येईल. परशुराम - कोळीसरे रस्त्यात अशी नयनरम्य दृश्ये अनेकदा दिसतात. परशुराम कोळिसरे रस्ता अगदी कमी लोकवस्तीचे, घनदाट झाडी असलेले हे गाव कोळीसरे फाट्याहून आत गेल्यावर दीड दोन किलोमीटर प्रवास केल्यावर येते. रत्नागिरीहून बसने जाता येते अन्यथा मंदिरापर्यंत पोचण्यासाठी स्वतःचे वाहन असणे सोयीचे आहे. गाडी पार्क केल्यानंतर काही पायऱ्या उतरून मग घनदाट झाडीत वसलेल्या ह्या मंदिरात जाता येते. ह्या रस्त्यावरून व्हील चेयर जाउ शकत नाही. पार्किंग पासून उ...
नागाव म्हणजे माडापोफळींच्या वाड्या. नागाव म्हणजे केळीच्या बागा. नागाव म्हणजे सुंदर स्वच्छ समुद्रकिनारा. नागाव म्हणजे वस्त्रगाळ मऊ वाळूचा किनारा. नागाव म्हणजे अनेक मंदिरे. नागाव म्हणजे लक्षवेधी दीपमाळा. नागाव म्हणजे कोपऱ्या कोपऱ्यावर भेटणारे तळे! नागाव म्हणजे तळ्यात फुललेलीअनेकानेक कमळे!! नागावच्या शेजारचे अक्षी, चौल, रेवदंडा ही देखील अशीच गावे. नितांतसुंदर, साधी. अलिबाग आणि ह्या सर्व गावांना मिळून अष्टागर असे म्हणत असत. आठ गावांचा समूह. अलिबाग पर्यटन स्थळ म्हणून ७० च्या दशकापासूनच प्रसिद्ध झाले होते. तेव्हा शांत निवांत असलेले अलिबाग नंतर खूपच गजबजले आणि मग दुसऱ्या सहस्त्रकात अलिबागशेजारील रेवदंडा, नागाव, चौल ही लहान लहान गावे देखील पर्यटनस्थळे म्हणून विकसित होऊ लागली. ह्या निवांत, शांत गावांना जणू अचानक खडबडून जाग आली. तिथेही पर्यटकांची गर्दी वाढू लागली. स्थानिक लोकांना रोजगार, विकासाची संधी, अर्थार्जनाची संधी त्यात दिसली. गावांवर आधुनिक पेहराव चढला आणि तिथे उदयाला आली मुंबईकरांची आवडती पर्यटनस्थळे. आता तर परिस्थिती अशी आहे की जवळ जवळ एका...
पैसाच्या खांबाचे मंदिर! अनेक वर्षांपूर्वी दुर्गा बाईंचे ' पैस ' हे पुस्तक वाचनात आले. त्यात होता हा पैसाचा खांब. पैस म्हणजे अवकाश. जिथे ज्ञानेश्वरी लिहिली गेली तो हा पैसाचा खांब. ज्ञानेश्वरीचे जन्मस्थान! खांबाला टेकून बसलेले, ज्ञानेश्वरी सांगत असलेले ज्ञानेश्वर आणि ती लिहून घेत असलेले लेखनिक सच्चिदानंद बाबा असे चित्र आधीही अनेकदा पाहिलेले होते. पण त्या खांबाला ' पैसाचा खांब' म्हणतात हे माहितीच नव्हते. पैस ह्या पुस्तकातील पैसाचा खांब हे प्रकरण वाचले आणि अक्षरशः थरारून गेले. 'पैसाच्या खांबाचे मंदिर' अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा या प्रवरा नदीच्या तीरावरील गावी आहे. नेवासे गावाच्या पश्चिमेला हे मंदिर आहे. 'शके बाराशे बारोत्तरे| तैं टीका केली ज्ञानेश्वरे| सच्चिदानंद बाबा आदरे| लेखकू जाहला|' असा उल्लेख सापडतो. मूर्त आणि अमूर्त ह्याची अशी जोडणी म्हणजे ज्ञानाच्या अनंत अवकाशात जाण्याची पहिली पायरीच जणू. ज्ञानेश्वरी वाचण्याएवढी आणि कळण्याएवढी योग्यता ह्या जन्मात अंगी येईल की नाही माहिती नाही. पण हा खांब पाहू या कधीतरी असे ठरवून टाकले. अवघड नव्हतेच जाणे. संभाजीनगर...
आज आपण रामायणातील दोन ठिकाणांना भेट देणार आहोत आणि दोन महान राम भक्तांच्या भेटीसाठी तुम्हाला घेऊन जाताना मला अतिशय आनंद झालेला आहे. पहिल्यांदा आपण जाऊयात, हनुमानाच्या जन्मस्थानी अंजनेय टेकडीवर. ही टेकडी कर्नाटक मध्ये हंपीजवळच्या भागात आहे असे मानले जाते. ही जागा अंजनीच्या पुत्राचे, अंजनेयाचे म्हणजेच हनुमानाचे जन्मस्थळ आहे. भारतात अजूनही इतर काही ठिकाणे आहेत की जी हनुमानाचे जन्मस्थळ म्हणून सांगितली जातात. पण अंजनेय टेकडी हे हनुमानाचे जन्मस्थळ असणे मला सर्वात जास्त संयुक्तिक वाटते. कारण ऋष्यमूक पर्वत, जिथे सुग्रीव, हनुमान आणि भगवान श्रीराम यांची भेट झाली होती तो इथून जवळच आहे. हंपीपासून अंजनेय टेकडीपर्यंतचा रस्ता नैसर्गिक सृष्टिसौंदर्याने अतिशय समृद्ध आहे. तुंगभद्रेच्या किनाऱ्यावर असल्यामुळे हा संपूर्ण प्रदेश अत्यंत सुपीक आहे रस्त्याच्या दोन्ही बाजूला सतत तुम्हाला भात शेती, नारळाची झाडे, केळीच्या बागा आणि अर्थातच प्रचंड मोठे खडक, जे ह्या भागाचे वैशिष्ट्य आहेत ते दिसत राहतात. हा संपूर्ण परिसर रामायणातला किष्किंधा भाग मानला जातो. भात शेती केळीच्या बागा भातशेतीचा मखमली गालिचा टे...
कोकणावर निसर्गाचा वरदहस्त आहेच. त्यातही काही गावांनी आपल्या सौंदर्याने विशेष स्थान मिळवले आहे. त्यातील एक महत्वाचे नाव म्हणजे गुहागर. सुंदर लहानसे गाव आहे. एक मुख्य रस्ता, त्याच्या दोन्ही बाजूला घरे, घरांच्या मागे नारळ सुपारीच्या वाड्या. रस्त्याच्या एका बाजूच्या प्रत्येक घराच्या मागच्या वाडीतून समुद्राला जाण्याचा रस्ता, भव्य स्वच्छ समुद्रकिनारा असे हे मोहात पाडणारे गुहागर गाव. गुहागर प्रसिद्ध आहे व्याडेश्वरासाठी. व्याडेश्वर हे शंकराचे मंदिर अनेक कोकणवासीयांचे कुलदैवत आहे. कोकणातील सर्वात महत्त्वाच्या शिवमंदिरांपैकी एक म्हणजे गुहागरमधील श्री व्याडेश्वर देवस्थान. श्री व्याडेश्वर देवस्थान. श्री व्याडेश्वर देवस्थान. तुम्हाला जर का कधी दक्षिणेतील मंदिरे पाहून वाटले असेल की अशी मंदिरे आपल्या महाराष्ट्रात का नाही?!! तर गुहागरच्या व्याडेश्वर मंदिराला भेट द्या. भव्य सुंदर देवालय आहे. मंदिराचे आवार स्वच्छ, प्रशस्त आहे. मुख्य म्हणजे अगदी नांदते, जागते मंदिर आहे. मंदिराची साफसफाई, निगराणी केली जाते आहे. आवारात भरपूर झाडे आहेत. श्री व्याडे...
महेश्वर हे मध्यप्रदेश पर्यटन निगमच्या पर्यटन स्थळांमधले एक महत्वाचे नाव आहे. पण करोडो भारतीयांसाठी ते केवळ एक पर्यटन स्थळ नाही तर एक तीर्थस्थान असते. लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या वास्तव्याने पुनीत झालेले स्थान आहे. महेश्वर किल्ला प्रवेशद्वार राजवाडा प्रवेशद्वार बाह्यरूप पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर राजवाडा प्रवेशद्वार अहिल्याबाई होळकर हे केवळ भारताच्याच नव्हे तर विश्वाच्या इतिहासातील एक सोनेरी पान. संपूर्ण मानव विश्वातील यशस्वी स्त्री राज्यकर्त्यांची सूची करायची झाली तर अहिल्याबाई होळकरांचे नाव ठळकपणे लिहायला लागेल. 31 मे 2025 ला त्यांची तीनशेवी जयंती आहे. पण 300 वर्षांपूर्वी होऊन गेलेल्या अहिल्याबाईंचे आयुष्य अगदी आजच्या आधुनिक काळातल्या आव्हानातही मार्गदर्शक ठरावे असेच आहे. त्यांच्याविषयीचा आदर मनात घेऊनच आपण महेश्वरला जातो आणि त्या भावनेच्या प्रकाशात महेश्वर पाहतो. महेश्वरला फार मोठी प्राचीन परंपरा आहे. स्कंद पुराणाच्या रेवा खंडात आणि वायू पुराणाच्या नर्मदा रहस्य मध्ये महिष्मती म्हणजे महेश्वरचे वर्णन आलेले आहे. 'गुप्...
गिरनार माझ्यासाठी ते मोहक फळ होते, जे मिळायला अवघड होते आणि कितीही हवेहवेसे वाटले तरी त्यासाठी माझ्याकडून प्रयत्न मात्र अजिबात केले गेले नव्हते. गिरनारच्या अद्भुत कथा खूप ऐकल्या, वाचल्या होत्या. गिरनारची मनात ओढ होती. पण ते सगळे मनातच. प्रत्यक्षात कोणतेही ट्रीप ठरवताना, कुठे जायचे याचा विचार करताना पुढे होऊन गिरनारला जाऊयात असे कधी म्हटले नव्हते हेही तितकेच खरे. श्री क्षेत्र गिरनार काय आहे गिरनार? गिरनार हा पर्वत समूह आहे. दत्तात्रेयांचा इथे निवास असल्याने ते हिंदूंच्यासाठी अत्यंत पवित्र आणि महत्वाचे धार्मिक स्थळ आहे. हिमालयापेक्षाही जुना असलेला हा पर्वत अनेक नावांनी प्राचीन साहित्यात आलेला आहे. रेवतक हे त्यातील सर्वात जास्त माहिती असलेले नाव. जैन लोकांसाठी देखील हे अत्यंत महत्वाचे ठिकाण आहे कारण इथे जैन मंदिर समूह देखील आहे. नेमिनाथ, आदिनाथ, मल्लिनाथ आणि इतर तीर्थंकरांची मंदिरे आहेत. कुठे आहे गिरनार ? गुजराथ, सौराष्ट्र मधील जुनागढ जवळ गिरनारच्या पायथ्याचे, तलेटी नावाचे गाव आहे. गिरनारला लोक का जातात? तेथील द...
रायगड! हे नाव घेताच मनात उठणारे भावतरंग अवर्णनीय असेच असतात. ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी म्हणजे 'शिव राज्याभिषेक दिन', 'हिंदू साम्राज्य दिन'. अभिमानाचा, गौरवाचा दिवस. भारतीय इतिहास हा संघर्षाचा व विजयाचा आहे. त्यातील झळाळून उठणारे तेजस्वी, सोनेरी पान म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे कर्तृत्व! शिवाजी महाराज आणि त्यांच्या मावळ्यांचे अविश्रांत परिश्रम पूर्णत्वाला पोचले ते ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी, १६७४ ह्या दिवशी. हा केवळ राज्याभिषेक नव्हता. हिंदवी स्वराज्याची स्थापना झाल्याची केवळ अधिकृत घोषणा नव्हती. तर संतांच्या उपदेशांनी जागलेली सज्जन शक्ती, मावळ्यांच्या रूपातील सामान्य जनतेच्या मनात जागलेली वीरवृत्ती ह्यांच्या संगमाने घडलेला तो एक अभूतपूर्व अविष्कार होता. राज्याभिषेक ही शिवाजी महाराजांची व्यक्तिगत महत्वाकांक्षा नव्हती. रोहिडेश्वर येथे लहानपणी घेतलेली प्रतिज्ञा अथक प्रयत्नांनी पूर्ण झाली होती. "हे हिंदवी स्वराज्य व्हावे हे तो श्रींची इच्छा" हे वचन सार्थ झाले होते. पण राज्याभिषेकाच्या निमित्ताने शिवाजीमहाराजांनी मोठ्या युक्तीने त्यांच्यावर असलेली लोकांची निष्ठा सिंहा...
अरुणाचल मधील टेंगापानी, नामसाईच्या गोल्डन पॅगोडाहुन परशुराम कुंड ला जाण्यासाठी आम्ही निघालो. ही गोष्ट आहे ऑक्टोबर २०१९ मधील. त्या दिवशी सतत पाऊस पडत होता. सगळीकडे हिरवेगार तर अरुणाचल मध्ये नेहमीच असते. पावसात भिजलेली झाडे, स्वच्छ हिरवळ, मध्येच ढगांत अदृश्य होणाऱ्या पर्वतरांगा, वाहणारे थंडगार वारे, फार सुंदर होते ते सगळे. अरुणाचल डोंगरातला रस्ता होता. तुफान वारा होता. त्या सगळ्या अवाढव्य डोंगराळ प्रदेशात आमची गाडी म्हणजे एक ठिपका होती. वाऱ्याने उडून जायला वेळ लागणार नाही इतका जोरात वारा वाहत होता. एक खिडकी फोटो काढण्यासाठी उघडली तर ड्राइवर म्हणाला की दुसऱ्या बाजूची पण उघडा, नाहीतर आत आलेल्या वाऱ्याने गाडी हलायला लागेल. शेजारी खोल दरी दिसत असताना गाडी हलायच्या कल्पनेने अंगावर काटा आला आणि पहिली खिडकी देखील फोटो काढल्या काढल्या बंद केली..नकोच ती वाऱ्याची परीक्षा! रस्ता कसा होता हे प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी पुढे दिलेल्या लिंकवर क्लिक करून विडिओ नक्की बघा. Namsai- Parshuram kund road ह्या नदीचे नाव लोहित आणि ह्या जिल्ह्याचेही नाव लोहित. लोहितचा अर्थ रक्त किंवा रक्...
भिंतीवरील कोरीवकाम महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्ह्यातले टोके हे एक लहान गाव. अहिल्यानगर कडून छत्रपती संभाजीनगरला जाताना डावीकडे नदीच्या काठावर हे सुंदर मंदिर आपल्याला दिसते. जगप्रसिद्ध वेरूळ, अजिंठा लेणी बघायची असतील तर सांभाजीनगरला जावे लागते हे आपल्याला माहिती असेलच. सिद्धेश्वर मंदिर, टोके हे मला एखाद्या दगडी बेलपत्राप्रमाणे वाटले. हे बेलपत्र उमलले आहे अमृतवाहिनी प्रवरा आणि दक्षिणगंगा गोदावरीच्या संगमावर. त्या संगमाच्या, ज्याला प्रवरा संगम म्हणतात त्या परिसरात सिद्धेश्वर, घटेश्वर, मुक्तेश्वर, रामेश्वर, संगमेश्वर अशी अनेक मंदिरे आहेत. पण सर्वात खास आणि सुंदर आहे ते सिद्धेश्वर मंदिर. सिद्धेश्वर मंदिर परिसर बघा असा दिसतो! हा फोटो घेतला होता सप्टेंबर २०१९ मध्ये. पावसाळा भरपूर बरसून आता आपला मुक्काम आवरत होता आणि नद्यांना भरपूर पाणी होते तेव्हाचा! मंदिराचा परिसर सिद्धेश्वर मंदिर समूह हा तुलनेने नवा समूह आहे, अठराव्या शतकात बांधला गेलेला. पेशव्यांच्या काळात बांधल्या गेलेल्या ह्या मंदिराला सभोवताली एखाद्या छोट्या किल्ल्यासारखी किंवा गढीसारखी उंच भिंत आहे. मुख्य मंदिर आहे शंकराचे...
Comments
Post a Comment