मुख्य सामग्रीवर वगळा

देवरियाताल चंद्रशिला ट्रेक - भाग 3 - देवरियाताल -स्यालमी

ट्रेकचा तिसरा दिवस. कालचा सारी- देवरियाताल प्रवास तर खूपच छान झाला होता. पायही दुखले नव्हते की थकल्यासारखे देखील वाटले नव्हते. त्यामुळे उत्साहाने आजच्या दिवसाला सुरुवात केली. आजचा दिवस तसा अवघड असेल अशी, इंडियाहाईक्सच्या  वेब साईटवरचे वर्णन वाचून कल्पना आली होती. आज अंतर नऊ किलोमीटरपेक्षा जास्त होते. पण वाटेत अनेक शिखरे दिसणार होती. घनदाट जंगलातून जाणार होतो त्यामुळे अनेक पक्षीही दिसणार होते. त्याचीही उत्सुकता होती.
सगळेजण देवरियाताल कॅम्पसाईट मधून बाहेर पडलो. अवघे एक दिवस वास्तव्य केलेले असले तरी मन थोडेतरी गुंतलेले असतेच. 
देवरियातालच्या रस्त्याच्या डाव्या बाजूने एक जंगलवाटेचा फाटा होता. त्या वाटेने आम्ही निघालो. थोडा वेळ चालल्यावर आम्हाला पुन्हा एकदा चंद्रशिला शिखर दिसणार होते. अधून मधून दिसणारे हे शिखर आपल्याला कुठे पोचायचे आहे त्याची जाणीव करून द्यायचे, त्यानेही एक नवे बळ मिळायचे. पण आज आकाश इतके ढगाळ होते की शिखर दिसलेच नाही.उजवीकडे पुन्हा एकदा सारी गाव मात्र दिसले.

📷Cotrekker
📷Sumati Dhembre

ह्या फोटोवरून कशा रस्त्याने आम्ही चालत होतो, चढ किती होता त्याची कल्पना येईल. (सर्वात उजव्या कोपऱ्यात लाल शर्ट मधील मला पाहायला विसरू नका!!) इतका चढ दिसत असला तरी हा दिवसातील सर्वात सोपा भाग होता किंवा आम्ही नुकतीच चालायला सुरुवात केली होती म्हणूनही तसे वाटत असेल. डोंगरकडयांवरून आम्ही चालत असल्याने दोन्हीकडची विस्तीर्ण भूप्रदेश दिसत होता.

📷Preeti Thakur

जंगलातील पायवाट अधूनमधून दगडांनी सुनिश्चित केलेली होती. त्यातच मध्येच झाडांची मूळे येत होती. ऱ्होडोडेंड्रॉनची अनेक झाडे फुललेली होती. आमच्या टीम खेरीज दुसरे कोणीही दिसत नव्हते.

📷Sumati Dhembre

इतकी चिंचोळी वाट होती. पण त्या दिवशी चालताना तसे विशेष जाणवले नव्हते. फक्त आम्हाला सूचना दिलेली होती की इतकी अरुंद जागा असेल तेव्हा वॉकिंग पोल टेकतांना डोंगराच्या बाजूला टेकायचा, दरीच्या नाही. कारण तिथे पानांखाली पोकळ जागा असेल तर दिसणार नाही आणि काठी घसरेल. 

📷Preeti Thakur

खरे तर कॅम्पमधून निघून पाऊणतासच झाला होता. पण इतके चढ उतार पार केल्याने बॅगसकटच दोन मिनिटे थांबलो होतो. हा एवढा चढ चढून गेलो की मग झंडी टॉप आलेच असते. तिथे असणार होता आमचा विश्रांतीचा टप्पा.
लवकरच झंडी टॉप आले. हवा स्वच्छ असती तर इथून हिमाच्छादित शिखरे दिसली असती. पण आज खूप ढग होते.

📷Sumati Dhembre



📷Samrat Darda

आम्हाला वाटेत खाण्यासाठी खाऊ म्हणून रोज एक सफरचंद आणि चणे, फुटाणे, खारका दयायचे!!संधी मिळाली की आधी सफरचंद खाण्याचे कारण म्हणजे तेवढीच बॅग हलकी होते आणि पाठीवर कमी ओझे वाहायला लागते!!आम्ही जिथे थांबलो होतो त्या ठिकाणालाच झंडी टॉप म्हणतात. नंतर कळले की त्या भागात टेकडीवरच्या सर्वात उंच ठिकाणाला झंडी टॉप किंवा झंडी धार म्हणतात. म्हणजे कदाचित असे अनेक झंडी टॉप प्रत्येक ट्रेकवर असतील!!

Jhandi Top
📷Supan Shah

झंडी टॉपहुन निघाल्यावर रस्ता अधिक सुंदर झाला. जंगल अधिक घनदाट झाले. माथ्यावर झाडे झुलत होती. त्यांच्या पानांचे रंग विलोभनीय होते. ही बहुतेक भारतीय मेपलची झाडे असावीत. रस्त्यावर माती दिसतच नव्हती. झाडावरून गळून पडलेल्या वाळलेल्या पानांच्या पायघड्या होत्या. त्यात मध्येच कुठे गवतफुले फुललेली होती. कुठे कुठे ऱ्होडोडेंड्रॉनच्या पाकळ्या दिसत होत्या.
📷Kedar Tembe
राह बन जाये
 जब मंजिल

📷Samrat Darda

कॅम्पमधून निघाल्या पासून आता जवळपास तीन तास झाले होते. सतत चढ उतार करून दगदग तर नक्कीच होत होती. पण समोर दिसणारे दृश्य असे असेल तर थकवा का जाणवेल?
📷Supan Shah

आता पुन्हा एकदा सगळीकडे ऱ्होडोडेंड्रॉन्स फुललेले दिसू लागले. त्यांचा आनंद घेणार इतक्यात पावसाला सुरुवात झाली. सगळ्यांची रेनकोट घालणे आणि बॅग कव्हर करणे ह्याची धावपळ झाली. पावसाने हात देखील गारठून गेले होते. त्यात रस्ता सतत चढ उताराचा.

📷Samrat Darda

📷Samrat Darda

असा चढाचा रस्ता पावसात पार केल्यावर आला पुन्हा उतार!! आज इतक्या तासात सपाट रस्ता फारच क्वचित मिळाला.
📷Preeti Thakur

चोहीकडे फुललेली लाल गुलाबी जांभळट फुले, त्यांच्या पाकळ्या गळून वाटेत पडलेल्या... ह्या सौंदर्यापुढे चढण उतरण ओलांडणे,पाऊस, दमणे सगळे क्षुल्लक होते! 'फूल खिलते रहेंगे दुनियामे ..रोज निकलगी बात फुलोंकी' ह्याच ओळी सतत आठवत राहिल्या.
पाऊस कमी झाला. तुलनेने थोडा सपाट भूभाग आला आणि मग आमची दुपारच्या जेवणाची जागा ठरली. आता कॅम्पमधून निघून पाच तास झाले होते. जेवणात आमच्या सोबतीला म्हणा किंवा राखणीला म्हणा दोन कुत्रे हजर होते.
📷Cotrekker

जेवणांनंतर परत चालायला सुरुवात केली. अजून बरीच मजल बाकी होती. पुन्हा उताराचा आणि चढाचा सिलसिला चालू राहिला. बऱ्याच वेळानंतर मग एक पठार आले.. सुप्रसिद्ध रोहिणी बुग्याल.

📷Cotrekker

आता हा आमचा फोटो बघताना डिस्कव्हरी चॅनल बघतो आहोत असे वाटते. इतक्या विस्तीर्ण पठारावर आम्ही चालतो आहोत ते फक्त ठिपक्यांसारखे दिसतो आहोत. निसर्गापुढे मानव किती क्षुद्र आहे ह्याची अगणित वेळा झालेली जाणीव पुन्हा एकदा नव्याने होते आहे. 

📷Gravit Jain

फार वेळ बसून चालणार नव्हतेच. अजून स्यालमी कॅम्पसाईट लांब होती. पुन्हा एक तीव्र चढ पार केला आणि मग आला अतिशय तीव्र उतार. आडवे आडवे पाऊल टाकत उतरले तरी तोल सावरताना पाय थरथरू लागले होते असा उतार. पावले ठाम होती पण त्यांच्यावरचे पाय मात्र थरथरत होते. म्हटले मी त्यांना ," असं करून कसं चालेल? पावले नेतील तिकडे जायलाच लागेल नं? मग थरथरायचे कशाला?" पण माझ्या counselling skills ची पायांनी पार ऐशी की तैशी केली आणि उतार संपेपर्यंत थरथरणे काही त्यांनी थांबवले नाही. एकच गोष्ट चांगली होती की थरथरत का होईना त्यांनी आपला वेग फारसा कमी केला नव्हता. त्यामुळे मी सर्वांच्या सोबतच राहू शकले. मागे पडले नाही. 
अर्थात उतरताना किंवा चढताना कधी हात द्यायला लागलाच तर केदार होता, ट्रेक लीडर साहिल होता, आमचे ट्रेक गाईड्स अमितजी आणि प्रमोदजी होते. 
 एक महत्वाचा धडा त्या दिवशी मिळाला की इतके तीव्र चढ उतार असतील त्या वेळी नी कॅप्स घालायला हव्या. मग दुसऱ्या दिवशीपासून नीकॅप्स घालायला सुरुवात केली आणि चढणे उतरणे खूपच सोपे झाले.
तसेच तुम्ही फोटोमध्ये आमच्या हातात वॉकिंग पोल्स पाहत असाल. त्याचा पण खूप फायदा होतो. स्यालमी कॅम्पसाईट वरून दिसू लागली आणि उरलेला उतार पटापट संपला.. किंवा निदान तसे वाटले तरी!!!

📷Sumati Dhembre 

📷Supan Shah 

आज आम्ही साधारण सात साडेसात तास चाललो होतो. खरे तर अंतर तसे ९. १ किलोमीटरच होते. पण सतत चढ आणि उतार आणि त्यात जंगलातल्या डोंगरवाटा त्यामुळे इतका वेळ लागला. अनेकदा उंचावर जात आणि नंतर उतरत अखेर आम्ही कालच्या कॅम्पपेक्षा दोनशे फूट खालीच आलो होतो.

📷Supan Shah 


त्या दिवसाविषयी आठवताना मी विचार करते की त्या दिवसाने मला काय दिले? 
संपूर्ण रस्ता कष्टप्रद होता हे तर खरेच. एरवी जे डोंगराचे चढ आणि उतार चित्रात, फोटोत किंवा लांबून बघताना मोहक वाटतात ते प्रत्यक्ष चालताना आपली फजिती करतात हे अनुभवले. 
शिखरे दिसणार होती ती ढगाळ हवामानामुळे दिसली नाहीत. पक्षी दिसणार होते तेही पावसामुळे विशेष दिसले नाहीत. एक सुतार पक्षी दिसला तेवढाच. इतर ऋतुत ह्याच ट्रेकला आले असते तर कदाचित ते सगळे दिसले असते. पण आत्ता मला फुले दिसली त्याचे काय? ती कशी इतर वेळी दिसली असती? तेव्हा जे मिळाले नाही त्या विषयी खंत करत न बसता, जे मिळाले आहे त्याचे मोल जाणण्याचा धडा पुन्हा एकवार मिळाला. 
'चरैवेती चरैवेती येही तो मंत्र है अपना' हे वारंवार स्वतःला सांगता आले. 
एका दिवसांत खूप काही शिकता आले. आमच्या टीममध्ये मी सर्वात मोठी. त्यामुळे दोन दिवस माझा उत्साह, निश्चय आणि फिटनेस चे भरपूर कौतुक झाले होते. पण थरथरलेल्या पायांनी मला माझी खरी जागा दाखवली!! आणि त्या कौतुकाला खरेच पात्र व्हायचे असेल तर भरपूर व्यायाम सातत्याने करायला हवा हे ही शिकवले. 
इतकेच काय कॅम्पवर आल्यावर मी स्नेहाला म्हटले सुद्धा ," मी इथेच थांबवू की काय ट्रेक?" अर्थात पुढे जायचे थांबवले असते तरी त्या कॅम्पवर कोणतेही वाहन येणे शक्यच नव्हते. आम्ही अगदीच दुर्गम ठिकाणी होतो. त्यामुळे तिथून कुठेतरी भरपूर चालत जाऊन मगच परत बेसकॅम्पवर जाता आले असते. पण स्नेहा म्हणाली,
"उद्याचा दिवस चाल .. मग बघू या!!!" 
उद्याचा दिवस खूप छान असणार होता. संपूर्ण वाट घनदाट जंगलातूनच जाणार होती. शिवाय एक नदी लागणार होती. 

 #deoriatal #chopta #uttarakhand #chandrashila #deoria #tungnath #sarivillage #himalayas #uttarakhandheaven #mountains #instagram #trekking  #travel  #motivations #indiahikes #Baniyakund #Syalmi


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कोस्टल कर्नाटक ३. -कुरु बेट, अनेगुड्डे श्री विनायक मंदिर, मणिपाल लेक

  कोस्टल कर्नाटक सहलीचा आमचा तिसरा दिवस देखील फार आनंदात गेला. काही गोष्टी ठरवल्याप्रमाणे होऊ शकल्या. काही गोष्टी ठरवल्याप्रमाणे अजिबात झाल्या नाहीत. पण तरी जमेची बाजूच जड झाली हे खरे.  उडुपीला सकाळी गाडी बोलावली होती आणि ती आम्हाला काही तास फिरवून आणणार होती. पहिले ठिकाण होते त्रासी मारवंते बीच.  फोटो बघूनच हा बीच पाहण्याची खूप उत्सुकता वाटत होती. हा अत्यंत अनोखा बीच आहे. रस्त्याच्या एक बाजूला सौपर्णिका नदी, दुसऱ्या बाजूला अरबी समुद्र - सिंधूसागर! त्रासी मरवंथे बीच  📷https://karnatakatourism.org/en/destinations/udupi उडुपीपासून निघून इकडे येऊन पोचलो. एका बाजूला नदी दिसत होती. दुसऱ्या बाजूला समुद्र किनाराही दिसत होता. पण फोटोत दाखवल्याप्रमाणे ठिकाण काही दिसेना.  मग चौकशी केल्यावर कळले की असे फक्त ड्रोनने काढलेल्या फोटोत दिसते. डोळ्यांना असे दिसत नाही!! एरवी आपण म्हणतो की डोळ्यांना जितके सुंदर दिसते तितके फोटोत उतरत नाही. पण इथे उलटे झाले होते!फोटोतल्याइतके सुंदर डोळ्यांना दिसत नव्हते!! पण असे दिसले नाही म्हणून काय झाले? रस्त्याच्या एका बाजूला नदी वाहते आहे...

सोमनाथ - प्रभास पट्टण.

१९४७चे दीपावली पर्व. स्थळ होते सिंधुसागराच्या तीरावर असलेल्या सोमनाथ मंदिराच्या अवशेषांचे प्रवेशद्वार. तिथे उभे राहून सरदार वल्लभभाई पटेल यांनी दृढनिश्चय व्यक्त केला की भारतीय जनता आपले आराध्य दैवत असलेल्या सोमनाथ मंदिराला त्याची पूर्व प्रतिष्ठा आणि पूर्व वैभव प्राप्त करून देईल.  काय कारण होते ह्या प्रतिज्ञेचे? जर भारतीय जनतेचे आराध्य दैवत होते सोमनाथ तर आता मंदिराचे अवशेषच का उरले होते?  ह्या साठी आपल्याला जाणून घ्यावे लागेल सोमनाथ मंदिराच्या इतिहासाविषयी आणि सोमनाथच्या हिंदू जनमानसातील स्थानाविषयी.  हिंदूंन पूजनीय असलेल्या बारा ज्योतिर्लिंगापैकी सर्वात पहिले नाव असलेल्या आणि प्रथम स्थानी असलेले सोमनाथ. आपल्या सर्वाना माहिती असलेल्या स्तोत्राची सुरुवातच होते ती 'सौराष्ट्रे सोमनाथंच' पासून. त्यामुळेच त्याला 'आदि ज्योतिर्लिंग' म्हणून ओळखले जाते.  ऋग्वेदात तसेच अनेक पुराणात ज्याचा उल्लेख झाला आहे असे हे तीर्थधाम. ह्याविषयी आपल्याला अनेक कथा सापडतात.  शतकानुशतकांच्या मंदिराच्या इतिहासात नैसर्गिक रित्या पडझड झाल्यानंतर ते अनेक राजांकडून, भक्तांकडून सोने, च...

'रानी की वाव'

पाटण सर्वांना माहिती असते ते 'रानी की वाव' तिथे आहे म्हणून. भारतातील समृद्ध हातमाग कौशल्याचा उत्तम नमुना असलेली पटोला साडीदेखील पाटणचीच.  गुजराथमधील अहमदाबाद पासून साधारण दीडशे किलोमीटरवर असणारे पाटण जागतिक पर्यटनाच्या नकाशावर मानाचे स्थान पटकावून बसले आहे. युनेस्को चे जागतिक वारसा स्थळ म्हणून मानांकन मिळवलेले हे ठिकाण आहे.  रानी की वाव  रानी की वाव  रानी की वाव  रानी की वाव  रानी की वाव  'रानी की वाव' नावावरूनच आपल्या लक्षात येते की ही राणीने बांधलेली विहीर आहे. पण खरे तर ही नुसती वाव म्हणजे विहीर नसून  सुमारे 64 मीटर लांब, 20 मीटर रुंद आणि 27 मीटर खोल म्हणजे साधारण  सात मजल्यांइतकी खोली असलेले विष्णूचे मंदिर आहे असेच म्हणावे लागेल.  जमिनीपासून खोल खोल उतरत जाणारी अशी ही रचना आहे.  राणी उदयमती हिने तिचा पती  राजा भीमदेव पहिला याच्या स्मरणार्थ हे मंदिर बांधले म्हणून याचे नाव 'रानी की वाव' असे पडले. राजा भीमदेव पहिला म्हणजे अनहिलवाड किंवा अनहिल्लपूर पाटणच्या सोळंकी वंशाचा संस्थापक मुलराज ह्याचा मुलगा होता. ह्या वंशाने अनेक पराक्...

कवी केशवसुत स्मारक, मालगुंड

एका कवीचे स्मारक असावे आणि तेही कवीला साजेसे असावे ही दुर्मिळ गोष्ट आहे! पण असे एक स्मारक आपल्या महाराष्ट्रात आहे. रत्नागिरीजवळ मालगुंड येथे कवी केशवसुत म्हणजेच कृष्णाजी केशव दामले ह्यांचे एक सुंदर स्मारक उभारले आहे.  कवी केशवसुत जन्मस्थान  मार्गावरील फलक  प्रवेशद्वारातून दिसणारे दृश्य  कोकण मराठी साहित्य परिषदेने ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री मधू मंगेश कर्णिक ह्यांच्या संकल्पनेला प्रत्यक्षात उतरवले आहे.  एखाद्या कवीचे स्मारक कसे असावे हे एखाद्या साहित्यिकालाच चांगले कळू शकणार! स्मारकाच्या प्रवेशद्वारातून आपण आत गेलो की समोरच दिसते ते केशवसुत जन्मस्थान. हे जुने घर डागडुजी करून नीटनेटके ठेवले आहे. पडवीत मोठा झोपाळा आहे.  कवीच्या घरात कवीचे पुस्तक वाचताना  तिथेच केशवसुतांची काही पुस्तके तसेच को.म.सा.प.ची काही प्रकाशने विक्रीसाठी उपलब्ध आहेत.  घरातील आतल्या खोल्या तशा रिकाम्याच आहेत. काही थोडे जुने सामान तिथे ठेवले आहे .  माजघर  घराच्या मागच्या बाजूला कवीचे खरे स्मारक आहे. केशवसुतांनी त्या काळात म्हणजे दीडशे वर्षांपूर्वी कवितेत नवा प्रवाह आणला...

गणपतीपुळे

कोकणच्या निसर्गाविषयी किती आणि कितीदाही लिहिले तरी कमीच आहे. कोकणातल्या नारळी पोफळीच्या वाड्या, आंब्याची फणसाची झाडे, केळीच्या बागा, कौलारू घरे ह्यांनी नटलेली धरती, सोनचाफा बकुळीच्या सुगंधाने घमघमणारा आसमंत आणि कानावर येणारी समुद्राची गाज सारेच कसे मन प्रसन्न करणारे असते.  चराचरात वसणारा परमतत्वाचा अंश ह्या भूमीत प्रकर्षाने प्रत्ययाला येतो. ह्या भूमीत अनेक देवस्थाने नसती तरच नवल होते. ह्या देवस्थानांच्या जागा विलक्षण सुंदर आहेत. गणपतीपुळे हे असेच एका सुंदर स्थानी वसलेले श्री गणेशाचे स्वयंभू मंदिर. सिंधुसागराचा किनारा, चमकदार वाळूची पुळण आणि पाठीमागे गार्ड हिरव्या वनराईने झाकलेला डोंगर असे ह्या मंदिराचे नयनमनोहर ठिकाण आहे.  श्री गणपतीपुळे देवस्थान  ह्या स्वयंभू मूर्तीचा दृष्टांत पाचशे वर्षांपूर्वी भिडे गुरुजींना झाला. तिथे त्यांनी साधे गवताचे छप्पर उभारून पूजेला सुरुवात केली. त्यांची समाधी आपल्याला मंदिराच्या आवारातच बघायला मिळते.  समाधी  पुढे मग वेळोवेळी निरनिराळ्या भक्तांनी ह्या वास्तूची पुनर्बांधणी आणि दुरुस्ती केली. छत्रपती शिवाजी महाराजांचे सचिव अण्णाजी दत्त...

श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे जन्मस्थान - बर्वेवाडा, डुबेरे

काल दिनांक १८ ऑगस्ट २०२५. श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे ह्यांची ३२५ वी जयंती. श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे पुतळा, बर्वेवाडा श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे पुतळा, बर्वेवाडा श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे पुतळा, बर्वेवाडा आता बाजीराव म्हटले की केवळ बाजीराव मस्तानीच आठवणाऱ्या लोकांसाठी बाजीराव कोण ते सांगायला हवे. छत्रपती शिवाजी महाराजांनी पाहिलेले हिंदवी स्वराज्याचे स्वप्न प्रत्यक्षात जगणारे आणि हिंदवी साम्राज्य निर्माण करणारे बाजीराव बाळाजी पेशवे/ विश्वनाथ बल्लाळ भट हे शाहूछत्रपतींचे पेशवे म्हणजेच पंतप्रधान होते.  आपल्या वीस वर्षांच्या पेशवे म्हणून कारकीर्दीत ते चाळीसहून अधिक लढाया लढले आणि त्या सर्व लढायांत ते अजिंक्य राहिले. त्यांनी आपल्या कर्तृत्वाने मराठ्यांचे वर्चस्व अखंड भारतावर प्रस्थापित केले.  त्यांचा जन्म १८ ऑगस्ट १७००, भाद्रपद पौर्णिमा ह्या दिवशी डुबेरे येथे झाला. डुबेरे आजच्या सिन्नर तालुक्यात नाशिक जिल्ह्यात आहे.  ह्या गावी बाजीरावांच्या मातोश्री राधाबाई ह्यांचे भाऊ मल्हारराव बर्वे राहत असत. त्या बर्वे वाड्यात बाजीरावांचा जन्म झाला.  बर्वे वाडा  अवघ...

कोस्टल कर्नाटक १ - मंगळुरू

  मंगळुरू- कुडला - मंगलोर - मंगलापूरम ही सगळी एकाच गावाची नावे. मंगलादेवी मंदिरावरून ह्या गावाचे नाव पडले मंगळुरू. दक्षिण कन्नड जिल्ह्याचे हे प्रमुख ठिकाण. सुंदर मंदिरे, स्वच्छ समुद्रकिनारे, नारळी-पोफळीची झाडे, आधुनिकतेच्या खुणा मिरवणारे मॉल्स आणि शहराबाहेरची पण तशी जवळच असणारी अनेक पर्यटन स्थळे.. ह्या साऱ्यामुळे मंगळुरु नेहमीच पर्यटकांचे आवडते राहिलेले आहे.  मंगळूरूला जाणारे आमचे विमान नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून होते. हा विमानतळ पाहण्याची उत्सुकता होतीच.  हा अतिशय भव्य आणि सुव्यवस्थित विमानतळ आहे. अनेक विमाने एकावेळी विमानतळावर आली तरी येणाऱ्या आणि जाणाऱ्या प्रवाशांच्यासाठी सर्व आवश्यक सुविधा केलेल्या आहेत.  जशी वर्दळ वाढेल तशी विमानतळावर जाण्यासाठी वाहतुकीची साधने देखील वाढतील अशी आशा आहे.  नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ  नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ  नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ  नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ  लहानशा प्रवासानंतर विमान मंगळुरुला उतरले. मंगळुरु विमानतळ म्हणजे टेबलटॉप रनवेज असणाऱ्या भारतातील मोजक्या विमानतळ...

कोस्टल कर्नाटक ४ - शृंगेरी, मुकाम्बिका

कोस्टल कर्नाटक ४ - शृंगेरी, मुकाम्बिका  आज उडुपीहून लवकर निघून शृंगेरीला पोचण्याचा बेत आखला होता. त्याप्रमाणे आम्ही सकाळीच निघालो. रस्ता खूपच छान होता. आता खरं सांगायचे तर कोस्टल कर्नाटक प्रवासात रस्ता सुंदर होता म्हणणे ही द्विरुक्तीच आहे.  सगळ्या सडका अगदी एका पातळीतील आणि गुळगुळीत आहेत. खड्डे खळगे, रस्ते वर खाली असणे असे काही नसल्याने महाराष्ट्रातून गेलेल्या आम्हाला थोडे चुकल्यासारखे वाटले खरे!!! शिवाय रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे, स्वच्छता ह्यामुळे प्रवास फार आनंदाचा होतो. उडुपी शृंगेरी रस्ता तर आगुंबे जंगलातून जातो. त्यामुळे दाट झाडी होती. रस्त्यात सुप्रसिद्ध आगुंबे घाटही येतोच. सकाळची प्रसन्न वेळ आणि इतका छान रस्ता..दिवसाची चांगली सुरुवात होण्यासाठी आणखी काय पाहिजे?!!  आम्हाला वाटले होते इतक्या लवकर फारसे कोणी श्रुंगेरीत आलेले नसेल. पण शृंगेरीला पोचल्यावर लक्षात आले की आमच्यासारखाच विचार अनेकांनी केला होता!  अनेक बस रात्रभराचा प्रवास करून सकाळी शृंगेरीला पोचल्या होत्या. त्या लोकांच्या प्रातर्विधी आणि अंघोळीसाठी अनेक ठिकाणी माफक पैसे घेऊन उत्तम सोय केलेली होती....

रवींद्रनाथ टागोरांनाही भुरळ घालणारे 'कारवार'

कारवार - पांढऱ्या वाळूचे स्वच्छ समुद्रकिनारे, हिरव्या झाडांनी नटलेले डोंगर, काळी नदी, लाल माती असलेले सुंदर शहर. शहर होऊ पाहणाऱ्या किंवा खरे तर आता शहर झालेल्या कारवारने अजून आपले गावपण थोडे तरी टिकवून ठेवले आहे. शहरी बकालपणा मात्र टाळता आलेला नाही.   गोवा, कर्नाटक आणि महाराष्ट्र असा तिन्हींचा संगम आपल्याला कारवारमध्ये दिसतो. मराठी बोलणारी माणसेही भेटत राहतात.  गोव्यासारखे पर्यटकांचे लोंढे दिसत नाहीत. कदाचित आम्ही मार्चच्या अगदी सुरुवातीला गेलो तेव्हा अजून पर्यटकांचा ऐन हंगाम सुरु झाला नसावा!! उत्तर कन्नड जिल्ह्याची जीवनरेखा असणारी काळी नदी सदाशिवगड जवळ समुद्राला मिळते. तिथे एक मोठा पूल बांधलेला आहे. कारवार आणि गोव्याला जोडणारा हा पूल आता एक पर्यंटनस्थळच झाला आहे. सूर्योदय बघण्यासाठी पादचारी पुलावर जमलेले तुरळक पर्यटक, धावण्याचा सराव करणारे धावपटू, सायकलस्वार ह्यांच्या खेरीज सकाळच्या वेळी तिथे कोणीही नसते. आपल्या निसर्ग सौदर्यामुळे आणि शांततेमुळे हे ठिकाण अवश्य भेट देण्याजोगे आहे. आमचे हॉटेल ह्या पुलाच्या अगदी जवळ असल्याने आम्ही सूर्योदय अगदी मनसोक्त वेळ देऊन पाहू शकलो....

'कड्यावरचा गणपती.' - आंजर्ले

कोकण सुंदर आहेच. कोकणावर निसर्गाची अपरंपार कृपा आहे. काय नाही कोकणात? डोंगर, दऱ्या, नद्या, समुद्र, नारळीपोफळीच्या वाडया, आंब्या फणसाची झाडे, केळीच्या बागा हे तर आहेच. इतर फुलेही कोकणच्या मातीत जास्तच बहरतात. बकुळ, चाफ्याचे सगळे प्रकार, जास्वंद किती नावे लिहावीत!! कौलारू घरे, लाल मातीचे रस्ते, ताजा खवलेला नारळ घातलेले अवीट चवीचे खाद्यपदार्थ .. कोकणांत जायची किती कारणे हवीत अजून?  ह्या सोबत किंवा खूप जणांसाठी ह्याच्याही आधी कोकणात जाण्याचे महत्वाचे कारण असते ते म्हणजे तेथील मंदिरे. तर आज आपण आंजर्ले येथील एक मंदिर  पाहणार आहोत.  दापोली, गुहागर,आंजर्ले हा सगळा परिसर तर निसर्गसौंदर्याने नटलेला आहे. शहरीकरण, पर्यटकांची अमर्याद संख्या, गल्लोगल्ली झालेले होमस्टे, रिसॉर्ट्स आणि खानावळी इतके सगळे पचवून सुद्धा अजूनही  इथले वातावरण फार सुखद आहे.  रत्नागिरी जिल्ह्यात दापोलीजवळ आंजर्ले गाव आहे. त्या गावाच्या जवळ एका डोंगरावर असलेले मंदिर म्हणजे  'कड्यावरचा गणपती.'  पूर्वी पायऱ्या चढून जाणे हा एकमेव मार्ग होता.  आता चारचाकी गाडी सुद्धा आरामात मंदिरापर्यंत जाऊ श...