मुख्य सामग्रीवर वगळा

देवरियाताल चंद्रशिला ट्रेक - भाग 2 - सारी - देवरियाताल

दुसऱ्या दिवशी सकाळी ट्रेकला सुरुवात झाली तीच एका तीव्र चढणीने!! चढताना एका क्षणी मागे वळून आम्ही सारी बेस कॅम्पचा निरोप घेतला. परत येउ तेव्हा ट्रेक यशस्वीरित्या पूर्ण केला असेल की नाही, ते माहिती नव्हते. पण अनुभवसमृद्ध मात्र नक्की होऊन परत येऊ ह्याची ग्वाही मनातच दिली.
सारी बेस कॅम्प
📷 Supan Shah
रस्ता ओबडधोबड दगडांनी तयार केलेला होता. पण भुसभुशीत मातीत पाय घसरण्यापेक्षा दगड परवडले असे मनाला सांगत चढण चढत होते.
📷 Pawan Gowda

ह्या फोटोवरून चढ किती होता त्याचा तर अंदाज येईल पण आम्ही सगळे कसे चढत होतो ते कळायचे असेल तर व्हिडिओ आहे ना!
विडिओ - सम्राट दर्डा
रस्त्याचा सुरुवातीचा काही भाग लोकवस्तीतून जाणारा. पण तेथील घरेही अगदी तुरळक आणि तशी लांब लांब. हिरवीगार शेते मात्र दिसत होती. डोंगर उतारावर पायऱ्यांसारखे बांध घालत केलेली ही शेती संपूर्ण उतार जिवंत करत होती.
The view 📷 Supan Shah
📷 Samrat Darda
तासभर तीव्र चढणीचा रस्ता पार केल्यानंतर थोडया वेळाने तुलनेने जरा सपाट भाग आला तेव्हा हृदयाने थँक्यू म्हणायला सुरूवात केली!! तिथून चंद्रशिला शिखराचे दर्शन देखील झाले.
साधारण तासा दीड तासाने आम्हाला थोडी विश्रांती मिळाली ती देखील जरा सपाट जागेवर!इथून पुन्हा एकदा थोड्या वेळासाठी सारी गाव दिसू लागले. चढणीने श्वासाचा वेग वाढलेला असला तरी इतक्या दिवसांच्या तयारी आणि वाट पाहण्यानंतर खरा ट्रेक सुरु झाल्याचा आनंद अवर्णनीय होता. वाटेत एखाद दुसरे बुरांशचे झाड फुललेले दिसले की पावलांचा वेग कमी होत होता. काहीजण फोटो काढत होते. तेव्हा ट्रेक गाईड सांगत होते की आपल्या कॅम्प जवळ भरपूर झाडे आहेत फुललेली.
रस्ता आता जंगलातून जात होता. आसपास मानवी वस्तीच्या खुणा नाहीत. झाडांतून गाळून येणारे ऊन, सतत एका बाजूने साथीला असणारा डोंगरकडा आणि आमची टीम.
काही वेळानंतर एक मोठे असे गवताळ पठार लागले. पठाराला उत्तराखंडमध्ये बुग्याल म्हणतात आणि प्रत्येक पठाराला शिवाय स्वतःचे नाव देखील असते. ह्याचे नाव होते रोपीनी बुग्याल. तिथे आम्हाला विश्रांतीसाठी थोडा वेळ मिळाला होता.
Near Ropini Bugyal
📷 Kedar Tembe
इथेच आम्हांला चौखंबा शिखरे देखील दिसली पण त्यांचा सतत लपंडाव चालू होता. क्षणार्धात दिसायची तर क्षणार्धात ढगांआड दडायची.
Chaukhamba peaks in the veil of clouds
📷 Kedar Tembe
📷 Samrat Darda
📷 Supan Shah
ढग येत जात असले तरी ऊन देखील होते. चालण्याच्या श्रमाने सगळेच घामेघूम झालो होतो. खडबडीत दगडी रस्ते, डोंगर वाटा ह्यातून काही तास चालल्यावर जंगलातला रस्ता आला. कितीतरी ऱ्होडोडेंड्रॉन्स फुलले होते. मन अगदी प्रसन्न झाले.
📷 Pawan Gowda
फोटोंसाठी रेंगाळणाऱ्या काहीजणांना आमचे ट्रेक गाईड "चलो चलो कीप मुविंग " म्हणत पुढे नेत होते. त्यांचेही बरोबर होते. कारण अजून एक अवघड चढण बाकी होती. माध्यान्हीचे ऊन तळपत होते.
📷 Sumati Dhembre
असे पाहताना चढण चढणे अवघड वाटले तरी खरी कसोटी लागते ती उतारावर!! इतका मोठा देह उतारावरून सरळ गडगडत खाली जाऊ नये म्हणून पाय जास्त रोवून टाकायला लागतात!!!
ह्या चढानंतरचा उतार उतरत असतानाच तळ्याची चाहूल लागू लागली. नितळ जलाशय दिसले की एक वेगळीच अनुभूती येते. देवरिया ताल दिसले आणि इतका वेळ चालण्याचे सगळे श्रम निमाले. फार सुंदर दृश्य होते ते.
हवा तेवढी स्वच्छ नव्हती म्हणून पर्वत शिखरांची प्रतिबिंबे मात्र पाण्यात पाहता आली नाहीत. एरवी हवा स्वच्छ असताना इथे चौखंबा शिखरे प्रत्यक्ष आणि त्यांची प्रतिबिंबे पाण्यात असे अप्रतिम दृश्य दिसते. पण जे पाहायला मिळाले तेही काही कमी सुंदर नव्हते.
📷 Sumati Dhembre
झाडीने वेढलेला जलाशय, अधून मधून पांढरी फुले फुललेली, जलाशया भोवतीचा रस्ता, शेजारून चढत जाणारी वाट सगळेच सुंदर होते.
आमच्या चार दिवसांच्या ट्रेकचा मार्ग असा होता. पहिला आणि सहावा दिवस सारी ते ऋषिकेश प्रवासासाठी होता. 
📷Indiahikes Website 

पण अर्थातच देवरियाताल च्या जवळ एखादा गाडीने येण्याजोगा रस्ता असणार.  सारी ते देवरियाताल ह्या जंगलातून डोंगरातून येणाऱ्या संपूर्ण रस्त्यात आम्हाला फक्त दोन स्थानिक महिला, त्याही  फांद्या आणि लाकडे जमा करण्यासाठी आलेल्या दिसल्या. 
पण देवरियातालच्या भोवती मात्र अनेक पर्यटक होते. फोटोज, सेल्फीज, रील्स साठी चित्रविचित्र गोष्टी करत होते. जवळच वनविभागाची केबिन होती. वनाधिकाऱ्यांनी पाण्यात जायला, पाण्यात काही टाकायला मनाई केलेली असताना देखील लोक पाण्यात उतरू पाहत होते. मग त्यांना अडवायसाठी वनाधिकाऱ्यांच्या शिट्ट्या वाजत होत्या. खरे तर ही वर्दळ आणि आवाज आपल्या शहरांशी तुलना करता, ०. ००१ % देखील नसेल. पण काही तास जंगलातील शांतता  अनुभवल्यावर इतका आवाजदेखील नकोसा वाटत होता. येणाऱ्या पर्यटकांनी टाकलेला थोडाफार कचरा आजूबाजूला दिसत होता. ते सगळे पाहून आपण बेजवाबदार पर्यटक नसून जबाबदार ट्रेकर आहोत ह्याचे हायसे वाटले. 
आमचा त्या दिवशीचा कॅम्प देवरियाताल येथेच होता. पण वनविभागाची तलावाजवळ कॅम्पिंग करायला परवानगी नसल्याने तिथून साधारण ५०० मीटर अंतरावर, त्याच वाटेने चढत जाऊन मग कॅम्प येणार होता.
आज सारीपासून देवरियाताल पर्यंत येताना आम्ही ६५६० फुटांपासून ते ७८१० फुटांपर्यंत मजल मारली होती.
📷 Supan Shah
Devriatal Camp📷 Sneha Tilak
कॅम्पवर पोचल्यावर जेवण झाले. कितीही दमला असाल तरी झोपू नका असे आम्हाला ट्रेकलीडर साहिल ने सांगितले होते. त्यामुळे जेवण झाल्यावर अजून उंचावर एक व्ह्यू पॉइंट होता तिथे जाऊन निवांत बसलो. 360 अंशातून दिसणाऱ्या पर्वतरांगा, थोडे धुके, थोडे ढग, बूरांश ची फुललेली झाडे, झाडांच्या आडून डोकावणारे देवरिया ताल ..ते दृश्य आता आठवणीत कायम राहणार आहे.
थोड्या वेळाने आम्ही सगळेजण पुन्हा देवरियाताल जवळ गेलो. तिथेच आमचे दुपारचे खाणे आणि चहा असणार होता. आता जवळपास सगळे पर्यटक परत गेले होते. आम्हां २५ जणांखेरीज  अगदीच एखाददुसरे कोणी त्या परिसरांत असेल. 
Sukun - Relaxed moment @ Devriyatal
Contemplative Devariatal
📷 Sneha Tilak
संध्याकाळच्या तिरप्या सूर्यकिरणांनी तळ्याचे रूप तर बदलले होतेच. आमच्या सगळ्यांचा मूड देखील बदलला होता.
📷 Sneha Tilak
थंडी आता चांगलीच जाणवू लागली होती. सगळ्यांनी स्वतःला जॅकेट्स आणि कॅप्स मध्ये लपेटून घेतले होते. आमचे ट्रेक गाईड अमितजी ह्यांनी तिथे आम्हांला यक्षप्रश्न ची कथा इतकी रंगवून सांगितली की ऐकण्यात आम्ही मग्न होऊन गेलो होतो.
📷 Samrat Darda
यक्षाच्या प्रश्नांना युधिष्ठिराने उत्तरे दिली. कथा संपली. आता स्वतःच्या मनातील विचारांना निरखत, सूर्यास्त अनुभवत त्या निरव वातावरणात आम्ही शांतपणे बसलो होतो.
कहीं दूर जब दिन ढल जाए,
साँझ की दुल्हन बदन चुराए
📷 Sumati Dhembre
📷 Sneha Tilak
📷 Samrat Darda
सूर्यास्त झाला. आता कॅम्पवर परत जायची वेळ झाली. पण इतक्या सुंदर ठिकाणी एक ग्रुप फोटो तर व्हायलाच हवा ना?!!
काल सकाळी अनोळखी असलेलो,पहिल्यांदा भेटलेलो आम्ही २२ जण आणि आमचे ट्रेक लीडर, ट्रेक गाईड असे तीन जण , आज संध्याकाळपर्यंत मैत्रीच्या धाग्याने जोडलो गेलो होतो. 
TEAM



#deoriatal #chopta #uttarakhand #chandrashila #deoria #tungnath #sarivillage #himalayas #uttarakhandheaven #mountains #instagram #trekking  #travel  #motivations #indiahikes 





टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कोस्टल कर्नाटक ३. -कुरु बेट, अनेगुड्डे श्री विनायक मंदिर, मणिपाल लेक

  कोस्टल कर्नाटक सहलीचा आमचा तिसरा दिवस देखील फार आनंदात गेला. काही गोष्टी ठरवल्याप्रमाणे होऊ शकल्या. काही गोष्टी ठरवल्याप्रमाणे अजिबात झाल्या नाहीत. पण तरी जमेची बाजूच जड झाली हे खरे.  उडुपीला सकाळी गाडी बोलावली होती आणि ती आम्हाला काही तास फिरवून आणणार होती. पहिले ठिकाण होते त्रासी मारवंते बीच.  फोटो बघूनच हा बीच पाहण्याची खूप उत्सुकता वाटत होती. हा अत्यंत अनोखा बीच आहे. रस्त्याच्या एक बाजूला सौपर्णिका नदी, दुसऱ्या बाजूला अरबी समुद्र - सिंधूसागर! त्रासी मरवंथे बीच  📷https://karnatakatourism.org/en/destinations/udupi उडुपीपासून निघून इकडे येऊन पोचलो. एका बाजूला नदी दिसत होती. दुसऱ्या बाजूला समुद्र किनाराही दिसत होता. पण फोटोत दाखवल्याप्रमाणे ठिकाण काही दिसेना.  मग चौकशी केल्यावर कळले की असे फक्त ड्रोनने काढलेल्या फोटोत दिसते. डोळ्यांना असे दिसत नाही!! एरवी आपण म्हणतो की डोळ्यांना जितके सुंदर दिसते तितके फोटोत उतरत नाही. पण इथे उलटे झाले होते!फोटोतल्याइतके सुंदर डोळ्यांना दिसत नव्हते!! पण असे दिसले नाही म्हणून काय झाले? रस्त्याच्या एका बाजूला नदी वाहते आहे...

सोमनाथ - प्रभास पट्टण.

१९४७चे दीपावली पर्व. स्थळ होते सिंधुसागराच्या तीरावर असलेल्या सोमनाथ मंदिराच्या अवशेषांचे प्रवेशद्वार. तिथे उभे राहून सरदार वल्लभभाई पटेल यांनी दृढनिश्चय व्यक्त केला की भारतीय जनता आपले आराध्य दैवत असलेल्या सोमनाथ मंदिराला त्याची पूर्व प्रतिष्ठा आणि पूर्व वैभव प्राप्त करून देईल.  काय कारण होते ह्या प्रतिज्ञेचे? जर भारतीय जनतेचे आराध्य दैवत होते सोमनाथ तर आता मंदिराचे अवशेषच का उरले होते?  ह्या साठी आपल्याला जाणून घ्यावे लागेल सोमनाथ मंदिराच्या इतिहासाविषयी आणि सोमनाथच्या हिंदू जनमानसातील स्थानाविषयी.  हिंदूंन पूजनीय असलेल्या बारा ज्योतिर्लिंगापैकी सर्वात पहिले नाव असलेल्या आणि प्रथम स्थानी असलेले सोमनाथ. आपल्या सर्वाना माहिती असलेल्या स्तोत्राची सुरुवातच होते ती 'सौराष्ट्रे सोमनाथंच' पासून. त्यामुळेच त्याला 'आदि ज्योतिर्लिंग' म्हणून ओळखले जाते.  ऋग्वेदात तसेच अनेक पुराणात ज्याचा उल्लेख झाला आहे असे हे तीर्थधाम. ह्याविषयी आपल्याला अनेक कथा सापडतात.  शतकानुशतकांच्या मंदिराच्या इतिहासात नैसर्गिक रित्या पडझड झाल्यानंतर ते अनेक राजांकडून, भक्तांकडून सोने, च...

'रानी की वाव'

पाटण सर्वांना माहिती असते ते 'रानी की वाव' तिथे आहे म्हणून. भारतातील समृद्ध हातमाग कौशल्याचा उत्तम नमुना असलेली पटोला साडीदेखील पाटणचीच.  गुजराथमधील अहमदाबाद पासून साधारण दीडशे किलोमीटरवर असणारे पाटण जागतिक पर्यटनाच्या नकाशावर मानाचे स्थान पटकावून बसले आहे. युनेस्को चे जागतिक वारसा स्थळ म्हणून मानांकन मिळवलेले हे ठिकाण आहे.  रानी की वाव  रानी की वाव  रानी की वाव  रानी की वाव  रानी की वाव  'रानी की वाव' नावावरूनच आपल्या लक्षात येते की ही राणीने बांधलेली विहीर आहे. पण खरे तर ही नुसती वाव म्हणजे विहीर नसून  सुमारे 64 मीटर लांब, 20 मीटर रुंद आणि 27 मीटर खोल म्हणजे साधारण  सात मजल्यांइतकी खोली असलेले विष्णूचे मंदिर आहे असेच म्हणावे लागेल.  जमिनीपासून खोल खोल उतरत जाणारी अशी ही रचना आहे.  राणी उदयमती हिने तिचा पती  राजा भीमदेव पहिला याच्या स्मरणार्थ हे मंदिर बांधले म्हणून याचे नाव 'रानी की वाव' असे पडले. राजा भीमदेव पहिला म्हणजे अनहिलवाड किंवा अनहिल्लपूर पाटणच्या सोळंकी वंशाचा संस्थापक मुलराज ह्याचा मुलगा होता. ह्या वंशाने अनेक पराक्...

कवी केशवसुत स्मारक, मालगुंड

एका कवीचे स्मारक असावे आणि तेही कवीला साजेसे असावे ही दुर्मिळ गोष्ट आहे! पण असे एक स्मारक आपल्या महाराष्ट्रात आहे. रत्नागिरीजवळ मालगुंड येथे कवी केशवसुत म्हणजेच कृष्णाजी केशव दामले ह्यांचे एक सुंदर स्मारक उभारले आहे.  कवी केशवसुत जन्मस्थान  मार्गावरील फलक  प्रवेशद्वारातून दिसणारे दृश्य  कोकण मराठी साहित्य परिषदेने ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री मधू मंगेश कर्णिक ह्यांच्या संकल्पनेला प्रत्यक्षात उतरवले आहे.  एखाद्या कवीचे स्मारक कसे असावे हे एखाद्या साहित्यिकालाच चांगले कळू शकणार! स्मारकाच्या प्रवेशद्वारातून आपण आत गेलो की समोरच दिसते ते केशवसुत जन्मस्थान. हे जुने घर डागडुजी करून नीटनेटके ठेवले आहे. पडवीत मोठा झोपाळा आहे.  कवीच्या घरात कवीचे पुस्तक वाचताना  तिथेच केशवसुतांची काही पुस्तके तसेच को.म.सा.प.ची काही प्रकाशने विक्रीसाठी उपलब्ध आहेत.  घरातील आतल्या खोल्या तशा रिकाम्याच आहेत. काही थोडे जुने सामान तिथे ठेवले आहे .  माजघर  घराच्या मागच्या बाजूला कवीचे खरे स्मारक आहे. केशवसुतांनी त्या काळात म्हणजे दीडशे वर्षांपूर्वी कवितेत नवा प्रवाह आणला...

गणपतीपुळे

कोकणच्या निसर्गाविषयी किती आणि कितीदाही लिहिले तरी कमीच आहे. कोकणातल्या नारळी पोफळीच्या वाड्या, आंब्याची फणसाची झाडे, केळीच्या बागा, कौलारू घरे ह्यांनी नटलेली धरती, सोनचाफा बकुळीच्या सुगंधाने घमघमणारा आसमंत आणि कानावर येणारी समुद्राची गाज सारेच कसे मन प्रसन्न करणारे असते.  चराचरात वसणारा परमतत्वाचा अंश ह्या भूमीत प्रकर्षाने प्रत्ययाला येतो. ह्या भूमीत अनेक देवस्थाने नसती तरच नवल होते. ह्या देवस्थानांच्या जागा विलक्षण सुंदर आहेत. गणपतीपुळे हे असेच एका सुंदर स्थानी वसलेले श्री गणेशाचे स्वयंभू मंदिर. सिंधुसागराचा किनारा, चमकदार वाळूची पुळण आणि पाठीमागे गार्ड हिरव्या वनराईने झाकलेला डोंगर असे ह्या मंदिराचे नयनमनोहर ठिकाण आहे.  श्री गणपतीपुळे देवस्थान  ह्या स्वयंभू मूर्तीचा दृष्टांत पाचशे वर्षांपूर्वी भिडे गुरुजींना झाला. तिथे त्यांनी साधे गवताचे छप्पर उभारून पूजेला सुरुवात केली. त्यांची समाधी आपल्याला मंदिराच्या आवारातच बघायला मिळते.  समाधी  पुढे मग वेळोवेळी निरनिराळ्या भक्तांनी ह्या वास्तूची पुनर्बांधणी आणि दुरुस्ती केली. छत्रपती शिवाजी महाराजांचे सचिव अण्णाजी दत्त...

श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे जन्मस्थान - बर्वेवाडा, डुबेरे

काल दिनांक १८ ऑगस्ट २०२५. श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे ह्यांची ३२५ वी जयंती. श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे पुतळा, बर्वेवाडा श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे पुतळा, बर्वेवाडा श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे पुतळा, बर्वेवाडा आता बाजीराव म्हटले की केवळ बाजीराव मस्तानीच आठवणाऱ्या लोकांसाठी बाजीराव कोण ते सांगायला हवे. छत्रपती शिवाजी महाराजांनी पाहिलेले हिंदवी स्वराज्याचे स्वप्न प्रत्यक्षात जगणारे आणि हिंदवी साम्राज्य निर्माण करणारे बाजीराव बाळाजी पेशवे/ विश्वनाथ बल्लाळ भट हे शाहूछत्रपतींचे पेशवे म्हणजेच पंतप्रधान होते.  आपल्या वीस वर्षांच्या पेशवे म्हणून कारकीर्दीत ते चाळीसहून अधिक लढाया लढले आणि त्या सर्व लढायांत ते अजिंक्य राहिले. त्यांनी आपल्या कर्तृत्वाने मराठ्यांचे वर्चस्व अखंड भारतावर प्रस्थापित केले.  त्यांचा जन्म १८ ऑगस्ट १७००, भाद्रपद पौर्णिमा ह्या दिवशी डुबेरे येथे झाला. डुबेरे आजच्या सिन्नर तालुक्यात नाशिक जिल्ह्यात आहे.  ह्या गावी बाजीरावांच्या मातोश्री राधाबाई ह्यांचे भाऊ मल्हारराव बर्वे राहत असत. त्या बर्वे वाड्यात बाजीरावांचा जन्म झाला.  बर्वे वाडा  अवघ...

कोस्टल कर्नाटक १ - मंगळुरू

  मंगळुरू- कुडला - मंगलोर - मंगलापूरम ही सगळी एकाच गावाची नावे. मंगलादेवी मंदिरावरून ह्या गावाचे नाव पडले मंगळुरू. दक्षिण कन्नड जिल्ह्याचे हे प्रमुख ठिकाण. सुंदर मंदिरे, स्वच्छ समुद्रकिनारे, नारळी-पोफळीची झाडे, आधुनिकतेच्या खुणा मिरवणारे मॉल्स आणि शहराबाहेरची पण तशी जवळच असणारी अनेक पर्यटन स्थळे.. ह्या साऱ्यामुळे मंगळुरु नेहमीच पर्यटकांचे आवडते राहिलेले आहे.  मंगळूरूला जाणारे आमचे विमान नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून होते. हा विमानतळ पाहण्याची उत्सुकता होतीच.  हा अतिशय भव्य आणि सुव्यवस्थित विमानतळ आहे. अनेक विमाने एकावेळी विमानतळावर आली तरी येणाऱ्या आणि जाणाऱ्या प्रवाशांच्यासाठी सर्व आवश्यक सुविधा केलेल्या आहेत.  जशी वर्दळ वाढेल तशी विमानतळावर जाण्यासाठी वाहतुकीची साधने देखील वाढतील अशी आशा आहे.  नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ  नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ  नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ  नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ  लहानशा प्रवासानंतर विमान मंगळुरुला उतरले. मंगळुरु विमानतळ म्हणजे टेबलटॉप रनवेज असणाऱ्या भारतातील मोजक्या विमानतळ...

रवींद्रनाथ टागोरांनाही भुरळ घालणारे 'कारवार'

कारवार - पांढऱ्या वाळूचे स्वच्छ समुद्रकिनारे, हिरव्या झाडांनी नटलेले डोंगर, काळी नदी, लाल माती असलेले सुंदर शहर. शहर होऊ पाहणाऱ्या किंवा खरे तर आता शहर झालेल्या कारवारने अजून आपले गावपण थोडे तरी टिकवून ठेवले आहे. शहरी बकालपणा मात्र टाळता आलेला नाही.   गोवा, कर्नाटक आणि महाराष्ट्र असा तिन्हींचा संगम आपल्याला कारवारमध्ये दिसतो. मराठी बोलणारी माणसेही भेटत राहतात.  गोव्यासारखे पर्यटकांचे लोंढे दिसत नाहीत. कदाचित आम्ही मार्चच्या अगदी सुरुवातीला गेलो तेव्हा अजून पर्यटकांचा ऐन हंगाम सुरु झाला नसावा!! उत्तर कन्नड जिल्ह्याची जीवनरेखा असणारी काळी नदी सदाशिवगड जवळ समुद्राला मिळते. तिथे एक मोठा पूल बांधलेला आहे. कारवार आणि गोव्याला जोडणारा हा पूल आता एक पर्यंटनस्थळच झाला आहे. सूर्योदय बघण्यासाठी पादचारी पुलावर जमलेले तुरळक पर्यटक, धावण्याचा सराव करणारे धावपटू, सायकलस्वार ह्यांच्या खेरीज सकाळच्या वेळी तिथे कोणीही नसते. आपल्या निसर्ग सौदर्यामुळे आणि शांततेमुळे हे ठिकाण अवश्य भेट देण्याजोगे आहे. आमचे हॉटेल ह्या पुलाच्या अगदी जवळ असल्याने आम्ही सूर्योदय अगदी मनसोक्त वेळ देऊन पाहू शकलो....

'कड्यावरचा गणपती.' - आंजर्ले

कोकण सुंदर आहेच. कोकणावर निसर्गाची अपरंपार कृपा आहे. काय नाही कोकणात? डोंगर, दऱ्या, नद्या, समुद्र, नारळीपोफळीच्या वाडया, आंब्या फणसाची झाडे, केळीच्या बागा हे तर आहेच. इतर फुलेही कोकणच्या मातीत जास्तच बहरतात. बकुळ, चाफ्याचे सगळे प्रकार, जास्वंद किती नावे लिहावीत!! कौलारू घरे, लाल मातीचे रस्ते, ताजा खवलेला नारळ घातलेले अवीट चवीचे खाद्यपदार्थ .. कोकणांत जायची किती कारणे हवीत अजून?  ह्या सोबत किंवा खूप जणांसाठी ह्याच्याही आधी कोकणात जाण्याचे महत्वाचे कारण असते ते म्हणजे तेथील मंदिरे. तर आज आपण आंजर्ले येथील एक मंदिर  पाहणार आहोत.  दापोली, गुहागर,आंजर्ले हा सगळा परिसर तर निसर्गसौंदर्याने नटलेला आहे. शहरीकरण, पर्यटकांची अमर्याद संख्या, गल्लोगल्ली झालेले होमस्टे, रिसॉर्ट्स आणि खानावळी इतके सगळे पचवून सुद्धा अजूनही  इथले वातावरण फार सुखद आहे.  रत्नागिरी जिल्ह्यात दापोलीजवळ आंजर्ले गाव आहे. त्या गावाच्या जवळ एका डोंगरावर असलेले मंदिर म्हणजे  'कड्यावरचा गणपती.'  पूर्वी पायऱ्या चढून जाणे हा एकमेव मार्ग होता.  आता चारचाकी गाडी सुद्धा आरामात मंदिरापर्यंत जाऊ श...

कोस्टल कर्नाटक- २ मंगळुरू, मुलकी, उचिल, उडुपी

  आमच्या कोस्टल कर्नाटक सहलीचा दुसरा दिवस सुरु झाला तो काद्री मंजुनाथ मंदिर भेटीने. हे मंदिर अतिशय प्राचीन आहे. भारद्वाज संहितेत ह्या मंदिराचा उल्लेख आहे. त्या काळात ह्या भागाला सुवर्ण कदलीवन म्हटले जात होते आणि ह्या मंदिराला सर्वसिद्धिमहास्थान किंवा सर्वसौभाग्यदायक महास्थान असे म्हटले जाई. परशुरामाच्या तपाने प्रसन्न होऊन ब्रह्म,विष्णू आणि महेश ह्यांनी एकत्रितपणे मंजूनाथाच्या रूपात स्वतःला प्रगट केले असे कथा सांगते.  नाथ संप्रदायाच्या गोरक्षनाथ आणि मच्छिन्द्रनाथ ह्यांनी देखील ह्या मंदिराला भेट दिली होती आणि ह्या भागात वास्तव्य केले होते असे सांगितले जाते.  मंदिर खूप भव्य आहे. मुख्य देवता शंकर - मंजुनाथ आहे. मंदिराच्या आवारात गणेश, दुर्गा, हनुमान,अय्यप्पा, नागदेवता अशी मंदिरे आहेत. जवळच एक तलाव आहे. हे मंदिर काद्री टेकडीवर वसलेले आहे. जवळच काद्री हिल पार्क नावाचे एक भव्य उद्यान आहे. एक लहानसे तळे देखील जवळच आहे. स्नानासाठी कुंड ह्या मंदिराच्या आवारातच आहेत. एकूणच परिसर रम्य आणि मंदिरातील ऊर्जेने भारलेला आहे. अनेक भाविक इथे भेट देत असतात.  काद्री मंजुनाथ मंदिर  का...