मुख्य सामग्रीवर वगळा

देवरियाताल चंद्रशिला ट्रेक- भाग 1 - तयारी !!

 आपण स्वप्न पाहतो… आपण स्वप्ने पाहतो… त्यातील एखाद दुसरेच प्रत्यक्षात यावे म्हणून धडपडतो आणि बाकीची स्वप्ने कधीतरी नवलाईने आंजारायला गोंजारायला असावीत म्हणून त्यांना स्वप्न म्हणूनच राहू देतो. 

हाय अल्टिट्युड ट्रेक हे माझे एक असेच स्वप्न होते, नेहमी भुरळ पाडणारे आणि तरीही प्रत्यक्षात आले तर इतक्या उंचीवर चालताना काहीशी धास्तीच वाटावी असे. त्यामुळे वर्षानुवर्ष ते स्वप्न प्रत्यक्षात न येता स्वप्नच राहिले होते. 

नोव्हेंबरमध्ये माझी मैत्रीण धनश्री जगताप इंडियाहाईक्सबरोबर देवरिया ताल चंद्रशिला हा ट्रेक करून आली. तिच्याशी गप्पा मारताना या ट्रेकची सविस्तर माहिती मिळाली. मार्च एप्रिलमध्ये या संपूर्ण रस्त्यावर ऱ्होडोडेंड्रॉनची फुले फुललेली असतात असेही कळले… आणि मनातल्या स्वप्नाला पुन्हा एकदा जाग आली. 

असे म्हणतात की देवरिया ताल म्हणजे जिथे यक्षाने युधिष्ठिराला प्रश्न विचारले ते तळे. वाटेत लागणारे तुंगनाथ हे तर जगातले सर्वात उंचावर असणारे शंकराचे मंदिर, पंच केदारापैकी एक. हे पांडवांनी बांधले आहे असे सांगितले जाते. ट्रेकचा समिट पॉईंट म्हणजे चंद्रशिला. जिथे चंद्राने तपश्चर्या केली ती जागा. असेही म्हणतात की राम रावण युद्धानंतर रामाने इथे तपश्चर्या केली होती. शिवाय ऱ्होडोडेंड्रॉन किंवा बुरांश या फुलांनी फुललेली जंगले हे देखील मोहात पाडायला पुरेसे होते. पाय मागे खेचणारी एकच गोष्ट होती ती म्हणजे या ठिकाणांची उंची!!! बारा हजार फूटांच्यापेक्षाही जास्त उंचीवर, हवा विरळ असताना, आपल्याला नीट श्वास घेता येईल का नाही याची भीती मनात होती. पण ह्या ट्रेकला गेले तर सोबत स्नेहा, केदार, राजश्री असणार होते. मग हिंमत गोळा करून रजिस्ट्रेशन केले आणि सुरू झाली ट्रेकची तयारी. 


रजिस्ट्रेशन केल्या गेल्या टीएमटी टेस्ट करून घेतली. 58 वर्षांवरच्या प्रत्येकासाठी इंडिया हाईक्सने ट्रेडमिलटेस्ट अनिवार्य केली आहे. ती नॉर्मल आल्यावर मग ट्रेक च्या फिटनेसच्या तयारीला सुरुवात केली. इंडिया हाइक्स फिटनेस विषयी खूपच जागरूक असते आणि फिटनेस सर्टिफिकेट मिळाल्याखेरीज तुम्हाला ट्रेकला जाता येत नाही. त्यामुळे मग वेगाने चालणे, भरपूर चालणे, त्याचे रेकॉर्ड् ठेवणे, जिने चढणे उतरणे, जवळपासच्या ठिकाणी हाईकना जाणे हे सुरू केले. 


पण म्हणतात तसे सगळेच सुरळीत पार पडत असले तर मग आयुष्यात थ्रिल ते काय !! टाच दुखायची थांबली होती, तिच्या लक्षात आले की आपले महत्व कमी होते आहे. तिने परत आपले स्वतंत्र अस्तित्व आणि इच्छा जाणवून द्यायला सुरुवात केली. मी टाच टेकायची म्हटली रे म्हटली की अशी काही चवताळून उठायची टाच, की मी आपली म्हणणार, “बरं बाई, तुझ्या मनासारखे ..नाही टेकत..मग तर झाले?!!! “ पण चालायला गेल्यावर मात्र मी तिचे काहीच ऐकत नाहीये असे तिच्या लक्षात आले. मग आपोआप सुतासारखी सरळ आली. अर्थात त्यासाठी माझ्या योगशिक्षिका ऋचा ताईंना विचारून पायाचे व्यायाम करायला सुरुवात केली होती. शिवाय एक छान गोल बाटली पावलाखाली धरून ती जोरात दाबून मागेपुढे गोल गोल फिरवायची असेही केले. त्या सगळ्याचा परिणाम म्हणून टाच एकदम शान्त ..म्हणजे बरी झाली. 

टाचेचे प्रकरण निभतंय की नाही तो अचानक डोळाच लाल झाला. एक दिवस वाट पाहून गेले डॉक्टरांकडे. कारण हाय अल्टीट्युड ला आणखी काही व्हायला नको. डॉक्टरांनी ड्रॉप्स घालायला दिले. पण दोन दिवसांनी तर डोळा इतका लालभडक झाला की मी आरामातच असले तरी माझ्याकडे पाहणाऱ्यांना माझा डोळा पाहवेना! परत माझी डॉक्टरांकडे फेरी. डॉक्टर म्हणाल्या की ही डोळा बरे होण्यातील एक स्टेज आहे आणि मी सुटकेचा नि:श्वास टाकला. तसेही आत्तापर्यंत माझा 'टाच दुखो की डोळा लाल होवो, आपण ट्रेकला जायचे म्हणजे जायचेच' असा दृढ का काय तो निश्चय झालाच होता!! 


मनाची आणि शरीराची अशी तयारी झाल्यानंतर सुरू झाली सामानाची जमवाजमव. आमच्या आधी ह्याच ट्रेकला जाऊन आलेला आमचा मित्र स्वप्नील लाखे म्हणाला होता की आपण ट्रेक साठी दहा हजार रुपये भरतो आणि ट्रेक साठीची खरेदीच 25 हजारांची करतो!! ते लक्षात होते. त्यामुळे कमीत कमी गोष्टी विकत घ्यायच्या असे ठरवले होते. 


ट्रेकसाठीचे विशेष बूट मात्र आधीच विकत घेतले आणि ते घालून चालायची प्रॅक्टिस केली. बूट आणि पावले ह्यांना एकमेकांची संगत सुसह्य व्हायची तर असे करणे आवश्यकच होते. ट्रेकिंग पोल्स आणि हेड लॅम्प्स हे इंडिया हाईक्सकडून भाड्याने घेतले. बाकी सामानापैकी घरात काही होते. भाचेसून आणि भाचा ट्रेक्सना जात असतात. त्यांचे काही सामान घेतले. बहिणीकडे थंडीत घालायची हलकी जॅकेट्स होती. ती घेतली आणि म्हणतात तसे सोंग सजले!! 


फिटनेस सर्टिफिकेट मिळाले आणि मग खऱ्या उत्साहाने ट्रेकची बॅग भरायला सुरुवात केली. कमीत कमी सामान न्यायचे, ड्रायफिट आणि हलके कपडे न्यायचे हे ठरवले होते. तयारीसाठी इंडिया हाईक्सच्या अनेक व्हिडिओज उपलब्ध आहेत, त्याचा खूप फायदा झाला. 


जरी हा एप्रिलमधला आणि स्प्रिंग हाईक होता, तरी कपड्यांचे तीन ते चार थर आवश्यक असणार होते. कारण तापमान बहुतेक दिवशी एक अंकीच असणार होते. शेवटच्या टप्प्यात बर्फही लागणार होता. त्या विचारानेच हुडहुडी भरत होती. कारण गेली अनेक वर्षे तापमान किमान विशीत खरे तर तिशीतच असायची सवय झाली होती. थंडीसाठी आवश्यक ते सगळे सामान भरले आणि डेहराडूनला जाणाऱ्या विमानात बसले. डेहराडून हुन आम्ही ऋषिकेशला टॅक्सीने जाणार होतो आणि तिथून ट्रेकमधील सर्वजण सोबतच सारीला म्हणजे बेसकॅम्पला जाणार होतो. 


वयाच्या साठीमध्ये आयुष्यातला पहिल्या हाय अल्टीट्युड ट्रेकसाठी निघताना मनात अपार उत्सुकता दाटून आली होती. सुरुवातीला वाटणारी भीती बरीचशी कमी झाली होती. डेहराडूनचा विमानतळ लहानसा,आटोपशीर, स्वच्छ आणि सुंदर आहे. बाहेरच्या सर्व खांबांवर गायत्री मंत्र कोरलेला आहे. आम्ही पोहोचलो तेव्हा सूर्याचे मावळते किरण त्या खांबांवर पडलेले होते. 

 

डेहराडून पासून ऋषिकेश टॅक्सीने साधारण अर्ध्या तासावर आहे. दुसऱ्या दिवशी ऋषिकेश मध्ये थोडेफार हिंडलो, काही खरेदी बाकी होती ती केली. तिसऱ्या दिवशी सकाळी इंडियाहाइक्स सांगितलेल्या ठिकाणी एकत्र जमलो आणि टीम मधले सर्वजण सोबतच सारी येथील बेस कॅम्पला गेलो.


📷Kedar Tembe 

अशी तीन वाहने होती. सकाळी साडेसात आठ ला ऋषिकेशहुन निघालेलो आम्ही, सारीला पोचायला दोन अडीच वाजले होते.

 

📷Supan shah 

त्यापुढे मग जे सामान भाड्याने घेण्यासाठी नोंदवले आहे ते ताब्यात घेणे, एकमेकांची ओळख, ट्रेक लीडर, ट्रेक गाईड्सची ओळख सत्रे झाली. प्रत्येकाचे फॉर्म्स चेक करून ट्रेक लीडर साहिल प्रत्येकाशी वैयक्तिकरित्या बोलला. नंतर ट्रेक मध्ये घ्यायची काळजी, नियम हे सगळे आम्हाला ट्रेक लीडर आणि ट्रेक गाईड्सनी समजावून सांगितले.


सारी कॅम्प मधून चंद्रशिला दिसते, ते बघताना, आपण चार दिवसांत तिथे, इतक्या उंचीवर असणार आहोत हे खरेच वाटत नव्हते. 


चंद्रशिला 

टेन्ट मधील बंकबेड्स, पाणी असलेली टॉयलेट्स, बसायला बाके आणि समोर टेबल असलेले जेवण घर ही ट्रेक मधली शेवटची चैन बेसकॅम्पमध्ये अनुभवली!! तसेही अंघोळ नामक प्रकार तर ट्रेक संपल्यावर परत ऋषिकेश मुक्कामी गेल्यावरच करता येणार होता!! रोज आंघोळ करणे ही अंधश्रद्धा आहे असेच सर्व ट्रेकर्सचे मत असावे!! 


📷Samrat Darda 





#deoriatal #chopta #uttarakhand #chandrashila #deoria #tungnath #sarivillage #himalayas #uttarakhandheaven #mountains #instagram #trekking #travel  #mountains #inspiration  #motivational #indiahikes




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कोस्टल कर्नाटक ३. -कुरु बेट, अनेगुड्डे श्री विनायक मंदिर, मणिपाल लेक

  कोस्टल कर्नाटक सहलीचा आमचा तिसरा दिवस देखील फार आनंदात गेला. काही गोष्टी ठरवल्याप्रमाणे होऊ शकल्या. काही गोष्टी ठरवल्याप्रमाणे अजिबात झाल्या नाहीत. पण तरी जमेची बाजूच जड झाली हे खरे.  उडुपीला सकाळी गाडी बोलावली होती आणि ती आम्हाला काही तास फिरवून आणणार होती. पहिले ठिकाण होते त्रासी मारवंते बीच.  फोटो बघूनच हा बीच पाहण्याची खूप उत्सुकता वाटत होती. हा अत्यंत अनोखा बीच आहे. रस्त्याच्या एक बाजूला सौपर्णिका नदी, दुसऱ्या बाजूला अरबी समुद्र - सिंधूसागर! त्रासी मरवंथे बीच  📷https://karnatakatourism.org/en/destinations/udupi उडुपीपासून निघून इकडे येऊन पोचलो. एका बाजूला नदी दिसत होती. दुसऱ्या बाजूला समुद्र किनाराही दिसत होता. पण फोटोत दाखवल्याप्रमाणे ठिकाण काही दिसेना.  मग चौकशी केल्यावर कळले की असे फक्त ड्रोनने काढलेल्या फोटोत दिसते. डोळ्यांना असे दिसत नाही!! एरवी आपण म्हणतो की डोळ्यांना जितके सुंदर दिसते तितके फोटोत उतरत नाही. पण इथे उलटे झाले होते!फोटोतल्याइतके सुंदर डोळ्यांना दिसत नव्हते!! पण असे दिसले नाही म्हणून काय झाले? रस्त्याच्या एका बाजूला नदी वाहते आहे...

सोमनाथ - प्रभास पट्टण.

१९४७चे दीपावली पर्व. स्थळ होते सिंधुसागराच्या तीरावर असलेल्या सोमनाथ मंदिराच्या अवशेषांचे प्रवेशद्वार. तिथे उभे राहून सरदार वल्लभभाई पटेल यांनी दृढनिश्चय व्यक्त केला की भारतीय जनता आपले आराध्य दैवत असलेल्या सोमनाथ मंदिराला त्याची पूर्व प्रतिष्ठा आणि पूर्व वैभव प्राप्त करून देईल.  काय कारण होते ह्या प्रतिज्ञेचे? जर भारतीय जनतेचे आराध्य दैवत होते सोमनाथ तर आता मंदिराचे अवशेषच का उरले होते?  ह्या साठी आपल्याला जाणून घ्यावे लागेल सोमनाथ मंदिराच्या इतिहासाविषयी आणि सोमनाथच्या हिंदू जनमानसातील स्थानाविषयी.  हिंदूंन पूजनीय असलेल्या बारा ज्योतिर्लिंगापैकी सर्वात पहिले नाव असलेल्या आणि प्रथम स्थानी असलेले सोमनाथ. आपल्या सर्वाना माहिती असलेल्या स्तोत्राची सुरुवातच होते ती 'सौराष्ट्रे सोमनाथंच' पासून. त्यामुळेच त्याला 'आदि ज्योतिर्लिंग' म्हणून ओळखले जाते.  ऋग्वेदात तसेच अनेक पुराणात ज्याचा उल्लेख झाला आहे असे हे तीर्थधाम. ह्याविषयी आपल्याला अनेक कथा सापडतात.  शतकानुशतकांच्या मंदिराच्या इतिहासात नैसर्गिक रित्या पडझड झाल्यानंतर ते अनेक राजांकडून, भक्तांकडून सोने, च...

'रानी की वाव'

पाटण सर्वांना माहिती असते ते 'रानी की वाव' तिथे आहे म्हणून. भारतातील समृद्ध हातमाग कौशल्याचा उत्तम नमुना असलेली पटोला साडीदेखील पाटणचीच.  गुजराथमधील अहमदाबाद पासून साधारण दीडशे किलोमीटरवर असणारे पाटण जागतिक पर्यटनाच्या नकाशावर मानाचे स्थान पटकावून बसले आहे. युनेस्को चे जागतिक वारसा स्थळ म्हणून मानांकन मिळवलेले हे ठिकाण आहे.  रानी की वाव  रानी की वाव  रानी की वाव  रानी की वाव  रानी की वाव  'रानी की वाव' नावावरूनच आपल्या लक्षात येते की ही राणीने बांधलेली विहीर आहे. पण खरे तर ही नुसती वाव म्हणजे विहीर नसून  सुमारे 64 मीटर लांब, 20 मीटर रुंद आणि 27 मीटर खोल म्हणजे साधारण  सात मजल्यांइतकी खोली असलेले विष्णूचे मंदिर आहे असेच म्हणावे लागेल.  जमिनीपासून खोल खोल उतरत जाणारी अशी ही रचना आहे.  राणी उदयमती हिने तिचा पती  राजा भीमदेव पहिला याच्या स्मरणार्थ हे मंदिर बांधले म्हणून याचे नाव 'रानी की वाव' असे पडले. राजा भीमदेव पहिला म्हणजे अनहिलवाड किंवा अनहिल्लपूर पाटणच्या सोळंकी वंशाचा संस्थापक मुलराज ह्याचा मुलगा होता. ह्या वंशाने अनेक पराक्...

कवी केशवसुत स्मारक, मालगुंड

एका कवीचे स्मारक असावे आणि तेही कवीला साजेसे असावे ही दुर्मिळ गोष्ट आहे! पण असे एक स्मारक आपल्या महाराष्ट्रात आहे. रत्नागिरीजवळ मालगुंड येथे कवी केशवसुत म्हणजेच कृष्णाजी केशव दामले ह्यांचे एक सुंदर स्मारक उभारले आहे.  कवी केशवसुत जन्मस्थान  मार्गावरील फलक  प्रवेशद्वारातून दिसणारे दृश्य  कोकण मराठी साहित्य परिषदेने ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री मधू मंगेश कर्णिक ह्यांच्या संकल्पनेला प्रत्यक्षात उतरवले आहे.  एखाद्या कवीचे स्मारक कसे असावे हे एखाद्या साहित्यिकालाच चांगले कळू शकणार! स्मारकाच्या प्रवेशद्वारातून आपण आत गेलो की समोरच दिसते ते केशवसुत जन्मस्थान. हे जुने घर डागडुजी करून नीटनेटके ठेवले आहे. पडवीत मोठा झोपाळा आहे.  कवीच्या घरात कवीचे पुस्तक वाचताना  तिथेच केशवसुतांची काही पुस्तके तसेच को.म.सा.प.ची काही प्रकाशने विक्रीसाठी उपलब्ध आहेत.  घरातील आतल्या खोल्या तशा रिकाम्याच आहेत. काही थोडे जुने सामान तिथे ठेवले आहे .  माजघर  घराच्या मागच्या बाजूला कवीचे खरे स्मारक आहे. केशवसुतांनी त्या काळात म्हणजे दीडशे वर्षांपूर्वी कवितेत नवा प्रवाह आणला...

गणपतीपुळे

कोकणच्या निसर्गाविषयी किती आणि कितीदाही लिहिले तरी कमीच आहे. कोकणातल्या नारळी पोफळीच्या वाड्या, आंब्याची फणसाची झाडे, केळीच्या बागा, कौलारू घरे ह्यांनी नटलेली धरती, सोनचाफा बकुळीच्या सुगंधाने घमघमणारा आसमंत आणि कानावर येणारी समुद्राची गाज सारेच कसे मन प्रसन्न करणारे असते.  चराचरात वसणारा परमतत्वाचा अंश ह्या भूमीत प्रकर्षाने प्रत्ययाला येतो. ह्या भूमीत अनेक देवस्थाने नसती तरच नवल होते. ह्या देवस्थानांच्या जागा विलक्षण सुंदर आहेत. गणपतीपुळे हे असेच एका सुंदर स्थानी वसलेले श्री गणेशाचे स्वयंभू मंदिर. सिंधुसागराचा किनारा, चमकदार वाळूची पुळण आणि पाठीमागे गार्ड हिरव्या वनराईने झाकलेला डोंगर असे ह्या मंदिराचे नयनमनोहर ठिकाण आहे.  श्री गणपतीपुळे देवस्थान  ह्या स्वयंभू मूर्तीचा दृष्टांत पाचशे वर्षांपूर्वी भिडे गुरुजींना झाला. तिथे त्यांनी साधे गवताचे छप्पर उभारून पूजेला सुरुवात केली. त्यांची समाधी आपल्याला मंदिराच्या आवारातच बघायला मिळते.  समाधी  पुढे मग वेळोवेळी निरनिराळ्या भक्तांनी ह्या वास्तूची पुनर्बांधणी आणि दुरुस्ती केली. छत्रपती शिवाजी महाराजांचे सचिव अण्णाजी दत्त...

श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे जन्मस्थान - बर्वेवाडा, डुबेरे

काल दिनांक १८ ऑगस्ट २०२५. श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे ह्यांची ३२५ वी जयंती. श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे पुतळा, बर्वेवाडा श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे पुतळा, बर्वेवाडा श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे पुतळा, बर्वेवाडा आता बाजीराव म्हटले की केवळ बाजीराव मस्तानीच आठवणाऱ्या लोकांसाठी बाजीराव कोण ते सांगायला हवे. छत्रपती शिवाजी महाराजांनी पाहिलेले हिंदवी स्वराज्याचे स्वप्न प्रत्यक्षात जगणारे आणि हिंदवी साम्राज्य निर्माण करणारे बाजीराव बाळाजी पेशवे/ विश्वनाथ बल्लाळ भट हे शाहूछत्रपतींचे पेशवे म्हणजेच पंतप्रधान होते.  आपल्या वीस वर्षांच्या पेशवे म्हणून कारकीर्दीत ते चाळीसहून अधिक लढाया लढले आणि त्या सर्व लढायांत ते अजिंक्य राहिले. त्यांनी आपल्या कर्तृत्वाने मराठ्यांचे वर्चस्व अखंड भारतावर प्रस्थापित केले.  त्यांचा जन्म १८ ऑगस्ट १७००, भाद्रपद पौर्णिमा ह्या दिवशी डुबेरे येथे झाला. डुबेरे आजच्या सिन्नर तालुक्यात नाशिक जिल्ह्यात आहे.  ह्या गावी बाजीरावांच्या मातोश्री राधाबाई ह्यांचे भाऊ मल्हारराव बर्वे राहत असत. त्या बर्वे वाड्यात बाजीरावांचा जन्म झाला.  बर्वे वाडा  अवघ...

कोस्टल कर्नाटक १ - मंगळुरू

  मंगळुरू- कुडला - मंगलोर - मंगलापूरम ही सगळी एकाच गावाची नावे. मंगलादेवी मंदिरावरून ह्या गावाचे नाव पडले मंगळुरू. दक्षिण कन्नड जिल्ह्याचे हे प्रमुख ठिकाण. सुंदर मंदिरे, स्वच्छ समुद्रकिनारे, नारळी-पोफळीची झाडे, आधुनिकतेच्या खुणा मिरवणारे मॉल्स आणि शहराबाहेरची पण तशी जवळच असणारी अनेक पर्यटन स्थळे.. ह्या साऱ्यामुळे मंगळुरु नेहमीच पर्यटकांचे आवडते राहिलेले आहे.  मंगळूरूला जाणारे आमचे विमान नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून होते. हा विमानतळ पाहण्याची उत्सुकता होतीच.  हा अतिशय भव्य आणि सुव्यवस्थित विमानतळ आहे. अनेक विमाने एकावेळी विमानतळावर आली तरी येणाऱ्या आणि जाणाऱ्या प्रवाशांच्यासाठी सर्व आवश्यक सुविधा केलेल्या आहेत.  जशी वर्दळ वाढेल तशी विमानतळावर जाण्यासाठी वाहतुकीची साधने देखील वाढतील अशी आशा आहे.  नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ  नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ  नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ  नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ  लहानशा प्रवासानंतर विमान मंगळुरुला उतरले. मंगळुरु विमानतळ म्हणजे टेबलटॉप रनवेज असणाऱ्या भारतातील मोजक्या विमानतळ...

रवींद्रनाथ टागोरांनाही भुरळ घालणारे 'कारवार'

कारवार - पांढऱ्या वाळूचे स्वच्छ समुद्रकिनारे, हिरव्या झाडांनी नटलेले डोंगर, काळी नदी, लाल माती असलेले सुंदर शहर. शहर होऊ पाहणाऱ्या किंवा खरे तर आता शहर झालेल्या कारवारने अजून आपले गावपण थोडे तरी टिकवून ठेवले आहे. शहरी बकालपणा मात्र टाळता आलेला नाही.   गोवा, कर्नाटक आणि महाराष्ट्र असा तिन्हींचा संगम आपल्याला कारवारमध्ये दिसतो. मराठी बोलणारी माणसेही भेटत राहतात.  गोव्यासारखे पर्यटकांचे लोंढे दिसत नाहीत. कदाचित आम्ही मार्चच्या अगदी सुरुवातीला गेलो तेव्हा अजून पर्यटकांचा ऐन हंगाम सुरु झाला नसावा!! उत्तर कन्नड जिल्ह्याची जीवनरेखा असणारी काळी नदी सदाशिवगड जवळ समुद्राला मिळते. तिथे एक मोठा पूल बांधलेला आहे. कारवार आणि गोव्याला जोडणारा हा पूल आता एक पर्यंटनस्थळच झाला आहे. सूर्योदय बघण्यासाठी पादचारी पुलावर जमलेले तुरळक पर्यटक, धावण्याचा सराव करणारे धावपटू, सायकलस्वार ह्यांच्या खेरीज सकाळच्या वेळी तिथे कोणीही नसते. आपल्या निसर्ग सौदर्यामुळे आणि शांततेमुळे हे ठिकाण अवश्य भेट देण्याजोगे आहे. आमचे हॉटेल ह्या पुलाच्या अगदी जवळ असल्याने आम्ही सूर्योदय अगदी मनसोक्त वेळ देऊन पाहू शकलो....

'कड्यावरचा गणपती.' - आंजर्ले

कोकण सुंदर आहेच. कोकणावर निसर्गाची अपरंपार कृपा आहे. काय नाही कोकणात? डोंगर, दऱ्या, नद्या, समुद्र, नारळीपोफळीच्या वाडया, आंब्या फणसाची झाडे, केळीच्या बागा हे तर आहेच. इतर फुलेही कोकणच्या मातीत जास्तच बहरतात. बकुळ, चाफ्याचे सगळे प्रकार, जास्वंद किती नावे लिहावीत!! कौलारू घरे, लाल मातीचे रस्ते, ताजा खवलेला नारळ घातलेले अवीट चवीचे खाद्यपदार्थ .. कोकणांत जायची किती कारणे हवीत अजून?  ह्या सोबत किंवा खूप जणांसाठी ह्याच्याही आधी कोकणात जाण्याचे महत्वाचे कारण असते ते म्हणजे तेथील मंदिरे. तर आज आपण आंजर्ले येथील एक मंदिर  पाहणार आहोत.  दापोली, गुहागर,आंजर्ले हा सगळा परिसर तर निसर्गसौंदर्याने नटलेला आहे. शहरीकरण, पर्यटकांची अमर्याद संख्या, गल्लोगल्ली झालेले होमस्टे, रिसॉर्ट्स आणि खानावळी इतके सगळे पचवून सुद्धा अजूनही  इथले वातावरण फार सुखद आहे.  रत्नागिरी जिल्ह्यात दापोलीजवळ आंजर्ले गाव आहे. त्या गावाच्या जवळ एका डोंगरावर असलेले मंदिर म्हणजे  'कड्यावरचा गणपती.'  पूर्वी पायऱ्या चढून जाणे हा एकमेव मार्ग होता.  आता चारचाकी गाडी सुद्धा आरामात मंदिरापर्यंत जाऊ श...

कोस्टल कर्नाटक- २ मंगळुरू, मुलकी, उचिल, उडुपी

  आमच्या कोस्टल कर्नाटक सहलीचा दुसरा दिवस सुरु झाला तो काद्री मंजुनाथ मंदिर भेटीने. हे मंदिर अतिशय प्राचीन आहे. भारद्वाज संहितेत ह्या मंदिराचा उल्लेख आहे. त्या काळात ह्या भागाला सुवर्ण कदलीवन म्हटले जात होते आणि ह्या मंदिराला सर्वसिद्धिमहास्थान किंवा सर्वसौभाग्यदायक महास्थान असे म्हटले जाई. परशुरामाच्या तपाने प्रसन्न होऊन ब्रह्म,विष्णू आणि महेश ह्यांनी एकत्रितपणे मंजूनाथाच्या रूपात स्वतःला प्रगट केले असे कथा सांगते.  नाथ संप्रदायाच्या गोरक्षनाथ आणि मच्छिन्द्रनाथ ह्यांनी देखील ह्या मंदिराला भेट दिली होती आणि ह्या भागात वास्तव्य केले होते असे सांगितले जाते.  मंदिर खूप भव्य आहे. मुख्य देवता शंकर - मंजुनाथ आहे. मंदिराच्या आवारात गणेश, दुर्गा, हनुमान,अय्यप्पा, नागदेवता अशी मंदिरे आहेत. जवळच एक तलाव आहे. हे मंदिर काद्री टेकडीवर वसलेले आहे. जवळच काद्री हिल पार्क नावाचे एक भव्य उद्यान आहे. एक लहानसे तळे देखील जवळच आहे. स्नानासाठी कुंड ह्या मंदिराच्या आवारातच आहेत. एकूणच परिसर रम्य आणि मंदिरातील ऊर्जेने भारलेला आहे. अनेक भाविक इथे भेट देत असतात.  काद्री मंजुनाथ मंदिर  का...