Skip to main content

शांतिनिकेतन - रवींद्रनाथ टागोर

 माझ्यासाठी कोलकाता म्हणजे स्वामी विवेकानंद, नेताजी सुभाषचंद्र बोस आणि रवींद्रनाथ ठाकूर / टागोर. (आणि नंतर अर्थातच कोलकाता सुती साड्या!) 


आमचे कोलकाता येथील वास्तव्य काही महिन्यांपुरतेच होते, परंतु या सर्व महान व्यक्तींच्या निवासस्थानांना मी भेट देऊ शकले होते. 

स्वामी विवेकानंद आणि नेताजी सुभाषचंद्र यांची निवासस्थाने आता संग्रहालयात रूपांतरित झाली आहेत.

रवींद्रनाथ ठाकूर यांचे जन्मस्थान 'जोरासांको ठाकूर बारी' आहे आणि त्याच ठिकाणी त्यांनी शेवटचा श्वासदेखील घेतला. जेव्हा मी जोरासांको ठाकूर बारी बघायला गेले तेव्हा तिथेही संग्रहालय असेल ह्या अपेक्षेने गेले. पण तेथे गेल्यावर लक्षात आले की आता त्याचे रूपांतर रवींद्र भारती विद्यापीठात झाले आहे. 

त्या दिवशी रविवार नव्हता की कोणती सुट्टी नव्हती, तरी दरवाजे बंद होते आणि म्हणून मला ते बघता आले नाही.

पण या महान कवी, लेखक, कलाकार आणि शिक्षणतज्ज्ञ रवींद्रनाथ टागोर ह्यांचे जणू प्राण असलेले ठिकाण मला नक्की पाहता आले, ते म्हणजे शांतिनिकेतन! 

20/01/2010 रोजी भारताच्या पुरातत्व सर्वेक्षण विभागाने शांतिनिकेतन हे ठिकाण जागतिक वारसा यादीमध्ये समाविष्ट करावे असा अर्ज युनेस्कोला सादर केला. त्या नंतर काही महिन्यांनी, 21 ऑगस्ट 2010 ला आम्ही शांतिनिकेतनमध्ये होतो. 

शांतिनिकेतन कोलकत्यापासून १५० कि.मी. अंतरावर, पश्चिम बंगालमधील बीरभूम जिल्ह्यात आहे. रस्ता ग्रामीण भागातून जातो आणि दोन्ही बाजूंनी दिसणारी हिरवीगार शेते मन सुखावतात, शांतवतात. 

नुकत्याच झालेल्या पावसाने हिरवीगार दिसणारी झाडे, भाताच्या लवलवत्या शेतांनी दिलेले नव्या नव्हाळीचे हिरवेपण, अधून मधून आढळणारी केळीची बाग वा आमराई, ताडाची व नारळाची झाडे, शाकारलेली घरे, सतत सोबत करणारी अनेक छोटी छोटी तळी, निवांत चरणारी गुरे, शेतात, पाण्यावर, गुरांच्या पाठीवर बसलेले पक्षी, हे सारेच जणू स्वप्नवत होते. कुठल्यातरी दुसऱ्याच जगातले असावे तसे आणि ह्या जगातले सारे व्यापताप विसरायला लावणारे होते.











अशा सुंदर रस्त्यांवरून प्रवास करीत करीत आपण शांतीनिकेतन व श्री निकेतन परिसरात पोचतो. रस्त्याच्या दोन्ही बाजूला दिसणारी साधी, देखणी घरे, अंगणात उभारलेली शिल्पे, सृजनचे प्रवेशद्वार, सुगंधाची लयलूट करणारे वृक्ष आपल्याला आपण कलावंतांच्या जगात प्रवेश करतो आहोत ह्याचा प्रत्यय देत रहातात.

रवींद्रनाथांनी शांतिनिकेतनवर लिहिलेली कविता वाचली की कळते, शांतिनिकेतन त्यांना किती प्रिय होते ते!

Quote 

"She is our own, the darling of our hearts, Santiniketan.
Our dreams are rocked in her arms.
Her face is a fresh wonder of love every time we see her,
for she is our own, the darling of our hearts.
In the shadows of her trees we meet
in the freedom of her open sky.
Her mornings come and her evenings
bringing down heaven's kisses,
making us feel anew that she is our own, the darling of our hearts.
The stillness of her shades is stirred by the woodland whisper;
her amlaki groves are aquiver with the rapture of leaves.
She dwells in us and around us, however far we may wander.
She weaves our hearts in a song, making us one in music,
tuning our strings of love with her own fingers;
and we ever remember that she is our own, the darling of our hearts." Unquote


 सुरुवातीला १८६२ मध्ये जेव्हा रवींद्रनाथांच्या वडिलांनी हा परिसर पाहिला तेव्हा त्यांना वाटले की हा परिसर शांततेत मनन, चिंतन आणि ध्यान करण्यासाठी अगदी योग्य आहे. त्या जमिनीवर त्यांनी एक आश्रम बांधला आणि त्याला 'शांतिनिकेतन' हे नाव दिले. 

नंतर १९०१ मध्ये रवींद्रनाथ टागोर यांनी शांतीनिकेतनमध्ये प्रायोगिक शाळा सुरू केली. त्यांचे विचार असे होते, "सर्वोच्च व श्रेष्ठ शिक्षण तेच की जे केवळ आपल्याला माहिती देत ​​नाही तर आपले जीवन सर्व पर्यावरणाच्या, सृष्टीच्या अनुरूप बनवते. " 

त्यांना फक्त परिक्षेवर आधारित, पाश्चिमात्य शिक्षण प्रणालीप्रमाणे असलेले शिक्षण नको होते. (त्या काळात ब्रिटीश सरकार सर्वत्र अशीच शिक्षण प्रणाली सुरू करीत होते.) परंतु ते शिक्षण आपल्या पारंपारिक शिक्षण प्रणालीवरही आधारित असले पाहिजे. 

त्या दोन्ही शिक्षण प्रणालींच्या मधले उत्तम ते घेऊन, त्यांनी शांतिनिकेतनमध्ये एक विशेष शिक्षण प्रणाली सुरू केली. शांतिनिकेतनचे स्वप्न रवींद्रनाथांनी पाहिले तेच मुळी भारतीय संदर्भ घेत, विश्वभरातले ज्ञान देणारी, बंदिस्त नसलेली अशी गुरुकुल पद्धतीची शाळा उभारायची हे मनाशी पक्के करून.

इथे शिक्षण हे विद्यार्थ्यांच्या परिसराबरोबरच जागतिक संस्कृतीशी देखील जोडले गेले होते. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण व्यक्तिमत्व विकास त्यांना घडवून आणायचा होता.


The Banyan Tree


ह्या वटवृक्षाखाली गुरुदेव रवींद्रनाथ टागोर विद्यार्थ्यांना शिकवत असत. त्यांना नेहमी वाटे की चार भिंतींच्या मधील शिक्षणामुळे विद्यार्थ्यांची मानसिकता देखील बंदिस्त बनते. ग्रहणक्षमतेत अडथळा निर्माण होतो. म्हणून मग वर्ग असे मोकळ्यावर, झाडांच्या सान्निध्यात भरवले जात असत. 

आंब्याच्या आणि बकुळीच्या झाडाखाली अजूनही वर्ग भरवले जातात. हा परिसर आम्र वीथि आणि बकुल वीथि या नावाने ओळखला जातो. वीथि म्हणजे रांग/ रस्ता. छोट्या चबुतऱ्याच्या व्यासपीठावरील शिक्षक आणि बाजूच्या वर्तुळाकार पायरीवरील विद्यार्थी मिळून एक पूर्ण वर्तुळ तयार होते. 







ह्या वर्गांवर सावली ढाळत उभे आहेत ते बकुल व आम्र वृक्ष. वर्गात विद्यार्थी अभ्यास करत आहेत. नजर जाईल तिकडे त्यांना भव्य वृक्ष दिसत आहेत. वाऱ्याच्या एखाद्या झुळकीबरोबर आकाशातून बकुळपुष्पे तरंगत खाली येत आहेत. हे कल्पनाचित्रदेखील किती सुखावणारे आहे ना!


TaalDhwaj


एक मातीचे छोटेसे घर आपले लक्ष वेधुन घेते. त्याच्या छपराच्या मधोमध तालवृक्षाचा शेंडा डोकावत असतो. झाडांवर प्रेम असल्याने, झाड तसेच ठेवून त्याच्या भोवती आपले घर बांधणाऱ्या तेजेशचंद्र सेन ह्या शांतीनिकेतनातील पहिल्या पिढीच्या शिक्षकाच्या रसिकतेला आणि वृक्षप्रेमाला आपण मनोमन दाद देतो.


Department Of Philosophy and Religion. 



A building in Shantiniketan 



A building in Shantiniketan



A building in Shantiniketan


Kalo Bari



कालो बारी ही कोळसा आणि मातीच्या मिश्रणाने बनवलेली इमारत आहे. त्यात भिंतींवर काळ्या रंगाचे भित्तिचित्र आहे. आपण फोटो झूम केल्यास आपण ती पाहू शकाल. 


A building in Shantiniketan


हे बांधकाम अगदी कुतूहलजनक आहे. बहुतेक इथे विदयार्थ्यांची कलाकृती प्रदर्शित केली जाते.

शांतिनिकेतनचा एकूण परिसर सुमारे २० एकर असून आसपास वाहणाऱ्या दोन नद्यांच्यामुळे तो नेहमी हिरवागार असतो. त्यामूळे शांतिनिकेतनमध्ये पुष्कळ झाडे आणि फुले, पक्षी दिसू शकतात.

ह्या परिसरात आणखी एक, केवळ साहित्यात वाचलेले, ऐकलेले सुखनिधान लाभले ते म्हणजे 'माधोबी' (माधवी) ची फुले व वेल प्रत्यक्ष पहायला मिळाले. रवींद्रनाथांच्या कवितासंग्रहाचे नाव म्हणून, त्यांची 'माधोबी - द यंग स्प्रिंग फ्लॉवर' ही कविता वाचलेली होती म्हणून, तसेच इतरही जुन्या साहित्यात माधवी ह्या फुलांचे नाव अनेकदा ऐकले होते म्हणून, त्याविषयी खूप उत्सुकता होती. पण ती प्रत्यक्ष कधी पाहिली नव्हती. त्यांचा मंद सुगंध अनुभवला नव्हता. ती माधवी भेटली ती कवीच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या परिसरात!

इतकी फोफावलेली वेल. त्यावरची पांढरी नाजूक फुले, त्यांचा मंद सुगंध... मी आनंदाने तरंगत होते! (फोटोत खरेच मी तरंगते आहे का पाहायला जाऊ नये, तेव्हा पाय जमिनीवरच होते!)
 

Madhobi Flowers


Jarul


या फुलांना बंगाली भाषेत 'जारुल' म्हणतात. ही 'भारताचा गौरव - प्राईड ऑफ इंडिया' म्हणून ओळखली जातात आणि हे महाराष्ट्राचे राज्य फूलदेखील आहे. महाराष्ट्रात ते 'ताम्हण' म्हणून ओळखले जाते.

ह्या खेरीज अजूनही खूप झाडे फुललेली होती. तिथे जवळच, ऑगस्ट आला तरी अजूनही फुलत राहिलेला बहावा भेटला. बंगालीतले त्याचे नाव म्हणे ’ बांदरलाठी ’ म्हणजे माकडाच्या शेपटीसारखे घोस असणारे. 

साधारण आपल्या 'संकासुरा'च्या प्रकारच्या झाडाला ते म्हणतात,’राधाचुरा’ म्हणजे राधेचा केशसंभार!! राधेचे केस इतके कुरळ्या लटांचे व सुंदर असतील अशी कल्पना करून त्या झाडाचे नामकरण करणाऱ्या रसिकतेला सलाम! विविध छटांच्या जांभळ्या फुलांचे घोस असणाऱ्या झाडाला म्हणतात ’जारूल’ तर मग तशाच प्रकारच्या गुलाबी फुलांच्या झाडाला 'गोलोपी' म्हणतात की आणखी काही ते मात्र विचारायचे राहूनच गेले!
 
आता शांतीनिकेतनमधील एक खास इमारत पाहू. हे 'सिन्हा सदन' म्हणून ओळखले जाते. सिन्हामहाशयांनी दिलेल्या देणगीने हे बांधले गेले. ह्या इमारतीवर घड्याळ तसेच घंटा आहे.


Sinha Sadan



रवींद्रनाथ टागोर यांना ऑक्सफोर्ड विद्यापीठाने दिलेली सन्माननीय डॉक्टरेटची पदवी त्यांनी ह्याच इमारतीत स्विकारली. 

१९१३ मध्ये रवींद्रनाथ टागोर यांना 'गीतांजली'साठी, म्हणजे इंग्रजी भाषांतरासाठी - 'सॉन्ग ऑफरिंग्ज' साठी साहित्याचा नोबल पुरस्कार मिळाला. 

हे एखाद्या भारतीयाला प्राप्त झालेले पहिले नोबल पारितोषिक आहे. इतकेच नव्हे तर हा पुरस्कार मिळवणारे ते पहिले आशियाई आणि प्रथम नॉन युरोपियन व्यक्ती होते. 

त्यात म्हटले आहे, Quote "Because of his profoundly sensitive, fresh and beautiful verse, by which, with consummate skill, he has made his poetic thought, expressed in his own English words, a part of the literature of the West. "Unquote 

नोबेल पुरस्कार मिळाल्यानंतर त्यांनी शांति निकेतनमध्येच विश्व भारती महाविद्यालयाची स्थापना केली. महाविद्यालयाचे ब्रीदवाक्य म्हणजे 'यत्र दृश्यं भवत्येकनिडं' जिथे संपूर्ण जगाला घर सापडेल. ( संपूर्ण जगच जिथे घराप्रमाणे समजले जाईल?) 

त्यांच्या निधनानंतर महाविद्यालयाचे विद्यापीठात रूपांतर झाले. विश्वभारती विद्यापीठात देण्यात येणाऱ्या शिक्षण विषयांची यादी खूप विस्तृत आहे. यात शिक्षण, कृषी, सामाजिक विज्ञान, विज्ञान, ललित कला, परफॉर्मिंग आर्ट्स, ग्रामीण पुनर्निर्माण इत्यादींचा समावेश आहे. विद्यापीठातील 'कला भवन' - कला शाखा ही देशातील कला शिक्षण देणाऱ्या सर्वोत्कृष्ट संस्थांपैकी एक मानली जाते. 

यात काहीच आश्चर्य नाही की माजी विद्यार्थ्यांची यादी गौरवशाली आहे. नंदलाल बोस, रामकिंकर बैज, सत्यजित रे, अमर्त्य सेन इ. तसेच इतर देशांमधून आलेले बरेच विद्यार्थी आपापल्या क्षेत्रातील नामांकित व्यक्ती आहेत.
 

Amartya Sen's House in Shantiniketan 


Srujani Shilpgram 




आम्ही सृजनी शिल्पग्राममध्ये जाऊ शकलो नाही परंतु असे समजले की त्यामध्ये भारतातील पूर्व आणि उत्तर पूर्व राज्यातील कला, हस्तकला आणि संस्कृती विषयक प्रदर्शनी व विक्रीव्यवस्था आहे. 

कला भवनचे खुले कलादालन अप्रतिम आहे. शिल्पे आणि निसर्ग दोन्हींचे साहचर्य खूप प्रभावीपणे व्यक्त झालेले आहे. 













शांतिनिकेतनातील इमारतींची, रस्त्यांची, भागांची नावेदेखील रसिक व कविमनाची निदर्शक आहेत. सारीच नावे सुंदर व अर्थगर्भ.

विद्यापीठातील निरनिराळे विभाग पहात पहात आपण येऊन पोचतो, ’उत्तरायणात.’ उत्तरायण हा ठाकूर कुटुंबियांनी निरनिराळ्या वेळी बांधवून घेतलेल्या व रवीन्द्रनाथांनी वास्तव्य केलेल्या घरांचा समूह आहे.

सध्या तिथे उभ्या आहेत त्या उदयन, कोणार्क, श्यामली, पुन:श्च व उदिची ह्या वास्तू. 'कोणार्क' हे अगदी पहिले निवासस्थान. ते वापरले जायचे कविसंमेलन आणि नाटकाच्या सरावासाठी. आता तिथे एक प्रदर्शनीआहे.
’श्यामली’ आहे कविच्या स्वप्नातले मातीचे घर. ते काही वर्षांनी गळायला लागल्यावर नव्याने बांधलेली वास्तू ती 'पुन:श्च'. पुन:श्चमधे कोंडल्यासारखे वाटायला लागल्यावर कविला हवेसे वाटले ते खुलेपणाचा अनुभव देणारे, चहूबाजूंनी क्षितिज दिसणारे घर. ते झाले 'उदिची'. 'उदिची' च्या शेजारी आहे, रवींद्रनाथांचा हस्तस्पर्श व निगराणी लाभलेली मोठी व फुलांनी बहरलेली बाग. विविध वास्तूशैलींच्या संगमाने बनलेले 'उदयन' लक्षवेधक आहे. ह्याच घरातून रवींद्रनाथ अगदी शेवटी बोलपूरहून कोलकात्यास उपचारांसाठी गेले आणि मग परत आलेच नाहीत. 

त्यांच्या मृत्यूनंतर 'रवींद्र भारती' संग्रहालयाची उभारणी केली गेली. संग्रहालयात रवींद्रनाथांची छायाचित्रे, त्यांच्या उपयोगात असणाऱ्या वस्तू तसेच त्यांनी काढलेली चित्रे, ते वाजवत होते ती वाद्ये, एवढेच काय त्यांनी केलेले अप्रतिम लाकूडकाम, त्यांनी तयार केलेली पाठ्यपूस्तके, त्यांच्या कविता हे सगळे तिथे आपल्याला पाहायला मिळते. एकच माणूस आणि इतके विविध गुण! ह्याचा अचंबा परत परत वाटत रहातो. 

अर्थातच मी तिथे रवींद्रनाथांची अनेक पुस्तके विकत घेतली. पण फार वाईट ह्याचे वाटते की आता ती मला सापडत नाही आहेत. 

आता वाईट वाटण्याचा विषय निघालाच आहे तर अजून एकदोन गोष्टी सांगूनच टाकते! संग्रहालयाजवळच्या पुस्तकांच्या दुकानात गेले असताना पाहिले की पूर्ण दुकान अस्ताव्यस्त होते. पुस्तके जमिनीवर पडलेली होती. हे कशामुळे असे विचारले असता, तेथील विद्यार्थ्यांनी केले असे तो कर्मचारी म्हणाला. त्या आधी दोन महिने फी वाढीविरुद्ध तिथे विद्यार्थी आंदोलन चालू होते, असे कळले. तसेच विश्वभारतीचा मानबिंदू व खासियत असलेला वसंतोत्सवदेखील त्यावर्षी विद्यार्थ्यांच्या निदर्शनांमुळे होऊ शकला नव्हता.

जेव्हा २०१० मध्ये आम्ही भेट दिली होती तेव्हा ह्या सर्व परिसराला डागडुजीची, सुव्यवस्थेची गरज आहे असे सतत वाटत राहिले होते. आशा आहे की गेल्या दहा वर्षात ते झाले असेल. 

२००९ च्या बीरभूम अहवालाप्रमाणे दरवर्षी साधारण १२ लाख लोक शांतिनिकेतन बघण्यासाठी येतात. पण आम्ही गेलो होतो तेव्हा तरी तिथे गाईड व्यवस्था उपलब्ध नव्हती किंवा एखादी शांतिनिकेतन दर्शन फेरी पण उपलब्ध नव्हती. 

बहुतेक हे पण आता सुरु झाले असेल. आम्ही २०१० मध्ये गेलो होतो. आता आहे २०२१. शिवाय तिथून आणलेली पुस्तके पण सापडत नाही आहेत. शांतिनिकेतनला पुन्हा जाण्यासाठी एवढी कारणे पुरेशी आहेत ना?!!!

तोपर्यंत रवींद्रनाथांची अजून एक कविता. 

The Last Bargain
"Come and hire me," I cried, while in the morning I was walking on the stone-paved road.
Sword in hand, the King came in his chariot.
He held my hand and said, "I will hire you with my power."
But his power counted for nought, and he went away in his chariot.
In the heat of the midday the houses stood with shut doors.
I wandered along the crooked lane.
An old man came out with his bag of gold.
He pondered and said, "I will hire you with my money."
He weighed his coins one by one, but I turned away.
It was evening. The garden hedge was all aflower.
The fair maid came out and said, "I will hire you with a smile."
Her smile paled and melted into tears, and she went back alone into the dark.
The sun glistened on the sand, and the sea waves broke waywardly.
A child sat playing with shells.
He raised his head and seemed to know me, and said, "I hire you with nothing."
From thenceforward that bargain struck in child's play made me a free man.

#Shantiniketan #RobindronathThakur # Shriniketan # AroundKolkata #WestBengalTourism #BengalTouristSpot #WhatToSeeNearKolkata #PlacesToVisitInW.Bengal

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

महेश्वर

महेश्वर हे मध्यप्रदेश पर्यटन निगमच्या पर्यटन स्थळांमधले एक महत्वाचे नाव आहे. पण करोडो भारतीयांसाठी ते केवळ एक पर्यटन स्थळ नाही तर एक तीर्थस्थान असते. लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या वास्तव्याने पुनीत झालेले स्थान आहे.  महेश्वर किल्ला प्रवेशद्वार  राजवाडा प्रवेशद्वार  बाह्यरूप  पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर  राजवाडा प्रवेशद्वार  अहिल्याबाई होळकर हे केवळ भारताच्याच नव्हे तर विश्वाच्या इतिहासातील एक सोनेरी पान. संपूर्ण मानव विश्वातील यशस्वी स्त्री राज्यकर्त्यांची सूची करायची झाली तर अहिल्याबाई होळकरांचे नाव ठळकपणे लिहायला लागेल.   31 मे 2025 ला त्यांची तीनशेवी जयंती आहे. पण 300 वर्षांपूर्वी होऊन गेलेल्या अहिल्याबाईंचे आयुष्य अगदी आजच्या आधुनिक काळातल्या आव्हानातही मार्गदर्शक ठरावे असेच आहे.  त्यांच्याविषयीचा आदर मनात घेऊनच आपण महेश्वरला जातो आणि त्या भावनेच्या प्रकाशात महेश्वर पाहतो. महेश्वरला फार मोठी प्राचीन परंपरा आहे. स्कंद पुराणाच्या रेवा खंडात आणि वायू पुराणाच्या नर्मदा रहस्य मध्ये महिष्मती म्हणजे महेश्वरचे वर्णन आलेले आहे. 'गुप्...

सोमनाथ - प्रभास पट्टण.

१९४७चे दीपावली पर्व. स्थळ होते सिंधुसागराच्या तीरावर असलेल्या सोमनाथ मंदिराच्या अवशेषांचे प्रवेशद्वार. तिथे उभे राहून सरदार वल्लभभाई पटेल यांनी दृढनिश्चय व्यक्त केला की भारतीय जनता आपले आराध्य दैवत असलेल्या सोमनाथ मंदिराला त्याची पूर्व प्रतिष्ठा आणि पूर्व वैभव प्राप्त करून देईल.  काय कारण होते ह्या प्रतिज्ञेचे? जर भारतीय जनतेचे आराध्य दैवत होते सोमनाथ तर आता मंदिराचे अवशेषच का उरले होते?  ह्या साठी आपल्याला जाणून घ्यावे लागेल सोमनाथ मंदिराच्या इतिहासाविषयी आणि सोमनाथच्या हिंदू जनमानसातील स्थानाविषयी.  हिंदूंन पूजनीय असलेल्या बारा ज्योतिर्लिंगापैकी सर्वात पहिले नाव असलेल्या आणि प्रथम स्थानी असलेले सोमनाथ. आपल्या सर्वाना माहिती असलेल्या स्तोत्राची सुरुवातच होते ती 'सौराष्ट्रे सोमनाथंच' पासून. त्यामुळेच त्याला 'आदि ज्योतिर्लिंग' म्हणून ओळखले जाते.  ऋग्वेदात तसेच अनेक पुराणात ज्याचा उल्लेख झाला आहे असे हे तीर्थधाम. ह्याविषयी आपल्याला अनेक कथा सापडतात.  शतकानुशतकांच्या मंदिराच्या इतिहासात नैसर्गिक रित्या पडझड झाल्यानंतर ते अनेक राजांकडून, भक्तांकडून सोने, च...

गणपतीपुळे

कोकणच्या निसर्गाविषयी किती आणि कितीदाही लिहिले तरी कमीच आहे. कोकणातल्या नारळी पोफळीच्या वाड्या, आंब्याची फणसाची झाडे, केळीच्या बागा, कौलारू घरे ह्यांनी नटलेली धरती, सोनचाफा बकुळीच्या सुगंधाने घमघमणारा आसमंत आणि कानावर येणारी समुद्राची गाज सारेच कसे मन प्रसन्न करणारे असते.  चराचरात वसणारा परमतत्वाचा अंश ह्या भूमीत प्रकर्षाने प्रत्ययाला येतो. ह्या भूमीत अनेक देवस्थाने नसती तरच नवल होते. ह्या देवस्थानांच्या जागा विलक्षण सुंदर आहेत. गणपतीपुळे हे असेच एका सुंदर स्थानी वसलेले श्री गणेशाचे स्वयंभू मंदिर. सिंधुसागराचा किनारा, चमकदार वाळूची पुळण आणि पाठीमागे गार्ड हिरव्या वनराईने झाकलेला डोंगर असे ह्या मंदिराचे नयनमनोहर ठिकाण आहे.  श्री गणपतीपुळे देवस्थान  ह्या स्वयंभू मूर्तीचा दृष्टांत पाचशे वर्षांपूर्वी भिडे गुरुजींना झाला. तिथे त्यांनी साधे गवताचे छप्पर उभारून पूजेला सुरुवात केली. त्यांची समाधी आपल्याला मंदिराच्या आवारातच बघायला मिळते.  समाधी  पुढे मग वेळोवेळी निरनिराळ्या भक्तांनी ह्या वास्तूची पुनर्बांधणी आणि दुरुस्ती केली. छत्रपती शिवाजी महाराजांचे सचिव अण्णाजी दत्त...

श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे जन्मस्थान - बर्वेवाडा, डुबेरे

काल दिनांक १८ ऑगस्ट २०२५. श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे ह्यांची ३२५ वी जयंती. श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे पुतळा, बर्वेवाडा श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे पुतळा, बर्वेवाडा श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे पुतळा, बर्वेवाडा आता बाजीराव म्हटले की केवळ बाजीराव मस्तानीच आठवणाऱ्या लोकांसाठी बाजीराव कोण ते सांगायला हवे. छत्रपती शिवाजी महाराजांनी पाहिलेले हिंदवी स्वराज्याचे स्वप्न प्रत्यक्षात जगणारे आणि हिंदवी साम्राज्य निर्माण करणारे बाजीराव बाळाजी पेशवे/ विश्वनाथ बल्लाळ भट हे शाहूछत्रपतींचे पेशवे म्हणजेच पंतप्रधान होते.  आपल्या वीस वर्षांच्या पेशवे म्हणून कारकीर्दीत ते चाळीसहून अधिक लढाया लढले आणि त्या सर्व लढायांत ते अजिंक्य राहिले. त्यांनी आपल्या कर्तृत्वाने मराठ्यांचे वर्चस्व अखंड भारतावर प्रस्थापित केले.  त्यांचा जन्म १८ ऑगस्ट १७००, भाद्रपद पौर्णिमा ह्या दिवशी डुबेरे येथे झाला. डुबेरे आजच्या सिन्नर तालुक्यात नाशिक जिल्ह्यात आहे.  ह्या गावी बाजीरावांच्या मातोश्री राधाबाई ह्यांचे भाऊ मल्हारराव बर्वे राहत असत. त्या बर्वे वाड्यात बाजीरावांचा जन्म झाला.  बर्वे वाडा  अवघ...

कवी केशवसुत स्मारक, मालगुंड

एका कवीचे स्मारक असावे आणि तेही कवीला साजेसे असावे ही दुर्मिळ गोष्ट आहे! पण असे एक स्मारक आपल्या महाराष्ट्रात आहे. रत्नागिरीजवळ मालगुंड येथे कवी केशवसुत म्हणजेच कृष्णाजी केशव दामले ह्यांचे एक सुंदर स्मारक उभारले आहे.  कवी केशवसुत जन्मस्थान  मार्गावरील फलक  प्रवेशद्वारातून दिसणारे दृश्य  कोकण मराठी साहित्य परिषदेने ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री मधू मंगेश कर्णिक ह्यांच्या संकल्पनेला प्रत्यक्षात उतरवले आहे.  एखाद्या कवीचे स्मारक कसे असावे हे एखाद्या साहित्यिकालाच चांगले कळू शकणार! स्मारकाच्या प्रवेशद्वारातून आपण आत गेलो की समोरच दिसते ते केशवसुत जन्मस्थान. हे जुने घर डागडुजी करून नीटनेटके ठेवले आहे. पडवीत मोठा झोपाळा आहे.  कवीच्या घरात कवीचे पुस्तक वाचताना  तिथेच केशवसुतांची काही पुस्तके तसेच को.म.सा.प.ची काही प्रकाशने विक्रीसाठी उपलब्ध आहेत.  घरातील आतल्या खोल्या तशा रिकाम्याच आहेत. काही थोडे जुने सामान तिथे ठेवले आहे .  माजघर  घराच्या मागच्या बाजूला कवीचे खरे स्मारक आहे. केशवसुतांनी त्या काळात म्हणजे दीडशे वर्षांपूर्वी कवितेत नवा प्रवाह आणला...

लक्ष्मीकेशव मंदिर, कोळीसरे

  मंदिर म्हणजे एक उर्जाकेंद्र! प्राचीन काळापासून भाविक मंदिरात देवतांच्या दर्शनासाठी जात आले आहेत. आजही हिंदू लोक मंदिरात जाऊन, चित्त एकाग्र करून ध्यान, पूजा आणि आरती करतात. यामुळे त्यांना ऊर्जा आणि शांततेचा अनुभव मिळतो. प्रत्येक देवी-देवतेचे एक विशिष्ट मंदिर असते.  असेच कोळीसरे येथे श्री विष्णूचे - लक्ष्मीकेशवाचे सुंदर मंदिर आहे . रत्नागिरी शहरापासून फक्त ५० किलोमीटर अंतरावर किंवा गणपती पुळ्यापासून २१ किलोमीटर अंतरावर निसर्गसुंदर कोळीसरे गाव आहे. पुणे मुंबई हून रत्नागिरी जिल्ह्यातील कोळीसरे येथे जायचे असल्यास चिपळूण मार्गे जाता येईल. परशुराम - कोळीसरे रस्त्यात अशी नयनरम्य दृश्ये अनेकदा दिसतात. परशुराम कोळिसरे रस्ता अगदी कमी लोकवस्तीचे, घनदाट झाडी असलेले हे गाव कोळीसरे फाट्याहून आत गेल्यावर दीड दोन किलोमीटर प्रवास केल्यावर येते. रत्नागिरीहून बसने जाता येते अन्यथा मंदिरापर्यंत पोचण्यासाठी स्वतःचे वाहन असणे सोयीचे आहे.  गाडी पार्क केल्यानंतर काही पायऱ्या उतरून मग घनदाट झाडीत वसलेल्या ह्या मंदिरात जाता येते. ह्या रस्त्यावरून व्हील चेयर जाउ शकत नाही. पार्किंग पासून उ...

'कड्यावरचा गणपती.' - आंजर्ले

कोकण सुंदर आहेच. कोकणावर निसर्गाची अपरंपार कृपा आहे. काय नाही कोकणात? डोंगर, दऱ्या, नद्या, समुद्र, नारळीपोफळीच्या वाडया, आंब्या फणसाची झाडे, केळीच्या बागा हे तर आहेच. इतर फुलेही कोकणच्या मातीत जास्तच बहरतात. बकुळ, चाफ्याचे सगळे प्रकार, जास्वंद किती नावे लिहावीत!! कौलारू घरे, लाल मातीचे रस्ते, ताजा खवलेला नारळ घातलेले अवीट चवीचे खाद्यपदार्थ .. कोकणांत जायची किती कारणे हवीत अजून?  ह्या सोबत किंवा खूप जणांसाठी ह्याच्याही आधी कोकणात जाण्याचे महत्वाचे कारण असते ते म्हणजे तेथील मंदिरे. तर आज आपण आंजर्ले येथील एक मंदिर  पाहणार आहोत.  दापोली, गुहागर,आंजर्ले हा सगळा परिसर तर निसर्गसौंदर्याने नटलेला आहे. शहरीकरण, पर्यटकांची अमर्याद संख्या, गल्लोगल्ली झालेले होमस्टे, रिसॉर्ट्स आणि खानावळी इतके सगळे पचवून सुद्धा अजूनही  इथले वातावरण फार सुखद आहे.  रत्नागिरी जिल्ह्यात दापोलीजवळ आंजर्ले गाव आहे. त्या गावाच्या जवळ एका डोंगरावर असलेले मंदिर म्हणजे  'कड्यावरचा गणपती.'  पूर्वी पायऱ्या चढून जाणे हा एकमेव मार्ग होता.  आता चारचाकी गाडी सुद्धा आरामात मंदिरापर्यंत जाऊ श...

Prashanti Kutiram, Bangalore

I am happy to write my first post of 2022!! I am here with a really very special post! This is not a tourist place and still it holds a special place in each and every visitor’s mind. This is Prashanti Kutiram of Bangalore. Prashanti kutiram as the name suggests, surely makes your mind peaceful. It's around 70-80 kms from Bangalore airport but with the famous traffic jams of Bangalore, it may take two and half hours by taxi.  This is the place where The Swami Vivekananda Yoga Anusandhan Sansthan is situated on a sprawling 100 acres. Swami Vivekanand  Swami Vivekanand  Ramakrishna Paramahans and Sharada Mataji  SVyasa Founded in 1986, Svyasa follows Swami Vivekanand's teachings and combines best of east and West. So it combines Yoga and spirituality with modern sciences.  The first thing you will notice about Vyasa is the greenery. The campus is having umpteen trees. It's hilly area. The steep paths and slopes offer you the much needed exercise!! The Green Umbre...

नागाव

  नागाव म्हणजे माडापोफळींच्या वाड्या. नागाव म्हणजे केळीच्या बागा. नागाव म्हणजे सुंदर स्वच्छ समुद्रकिनारा.  नागाव म्हणजे वस्त्रगाळ मऊ वाळूचा किनारा.  नागाव म्हणजे अनेक मंदिरे. नागाव म्हणजे लक्षवेधी दीपमाळा. नागाव म्हणजे कोपऱ्या कोपऱ्यावर भेटणारे तळे! नागाव म्हणजे तळ्यात फुललेलीअनेकानेक कमळे!! नागावच्या शेजारचे  अक्षी, चौल, रेवदंडा ही देखील अशीच गावे. नितांतसुंदर, साधी. अलिबाग आणि ह्या सर्व गावांना मिळून अष्टागर असे म्हणत असत. आठ गावांचा समूह.  अलिबाग पर्यटन स्थळ म्हणून ७० च्या दशकापासूनच प्रसिद्ध झाले होते. तेव्हा शांत निवांत असलेले अलिबाग नंतर खूपच गजबजले आणि मग दुसऱ्या सहस्त्रकात अलिबागशेजारील रेवदंडा, नागाव, चौल ही लहान लहान गावे देखील पर्यटनस्थळे म्हणून विकसित होऊ लागली.  ह्या निवांत, शांत गावांना जणू अचानक खडबडून जाग आली. तिथेही पर्यटकांची गर्दी वाढू लागली. स्थानिक लोकांना रोजगार, विकासाची संधी, अर्थार्जनाची संधी त्यात दिसली.  गावांवर आधुनिक पेहराव चढला आणि तिथे उदयाला आली मुंबईकरांची आवडती पर्यटनस्थळे.  आता तर परिस्थिती अशी आहे की जवळ जवळ एका...

पैसाच्या खांबाचे मंदिर!

पैसाच्या खांबाचे मंदिर! अनेक वर्षांपूर्वी दुर्गा बाईंचे ' पैस ' हे पुस्तक वाचनात आले. त्यात होता हा पैसाचा खांब. पैस म्हणजे अवकाश. जिथे ज्ञानेश्वरी लिहिली गेली तो हा पैसाचा खांब. ज्ञानेश्वरीचे जन्मस्थान! खांबाला टेकून बसलेले, ज्ञानेश्वरी सांगत असलेले ज्ञानेश्वर आणि ती लिहून घेत असलेले लेखनिक सच्चिदानंद बाबा असे चित्र आधीही अनेकदा पाहिलेले होते. पण त्या खांबाला ' पैसाचा खांब' म्हणतात हे माहितीच नव्हते. पैस ह्या पुस्तकातील पैसाचा खांब हे प्रकरण वाचले आणि अक्षरशः थरारून गेले. 'पैसाच्या खांबाचे मंदिर' अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा या प्रवरा नदीच्या तीरावरील गावी आहे. नेवासे गावाच्या पश्चिमेला हे मंदिर आहे. 'शके बाराशे बारोत्तरे| तैं टीका केली ज्ञानेश्वरे| सच्चिदानंद बाबा आदरे| लेखकू जाहला|' असा उल्लेख सापडतो. मूर्त आणि अमूर्त ह्याची अशी जोडणी म्हणजे ज्ञानाच्या अनंत अवकाशात जाण्याची पहिली पायरीच जणू. ज्ञानेश्वरी वाचण्याएवढी आणि कळण्याएवढी योग्यता ह्या जन्मात अंगी येईल की नाही माहिती नाही. पण हा खांब पाहू या कधीतरी असे ठरवून टाकले. अवघड नव्हतेच जाणे. संभाजीनगर...