मुख्य सामग्रीवर वगळा

कारगिल युद्ध स्मारक - ऑपरेशन विजय स्मृतिस्थल

 तीर्थक्षेत्रे- आपापल्या आराध्य देवतांच्या, कुलदैवतांच्या मंदिरात सगळे जातात. आदर्श अशा राष्ट्रपुरुषांच्या स्मारकांना देखील भेटी दिल्या जातात. ह्या शिवाय प्रत्येक भारतीयाने भेट दिलीच पाहिजे अशी तीर्थक्षेत्रे म्हणजे युद्ध स्मारके. स्वतंत्र भारताने लढलेल्या युद्धांची स्मारके. देशाच्या रक्षणासाठी धारातीर्थी पडलेल्या सैनिकांना मानवंदना देण्यासाठी उभारलेली गेलेली स्मारके. 

का भेट द्यायची? - समूहाची स्मरणशक्ती अल्पजीवी असते ह्याचा प्रत्यय अनेकदा येतो. १५ ऑगस्ट, २६ जानेवारीच्या दिवशी सकाळी उफाळून येणारे राष्ट्रप्रेम दुपारनंतर पुसट होत होत नाहीसे होते. युद्धकथा असलेला एखादा चित्रपट आला की त्या आठवणी ताज्या होतात. ते तेवढ्यापुरतेच. प्रसार माध्यमे स्वतःच्या चष्म्यातून एखाद्या घटनेकडे पाहायला लावतात आणि प्रेक्षकांची विचारशक्ती झाकोळली जाते. 

ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर युद्धस्मारके पाहताना त्या घटनेची सत्य माहिती मिळते. आपले मत स्वतःच्या विचारानुसार तयार होते. आपल्या सैनिकांनी केलेला त्याग पाहून त्यांच्याविषयीच्या आदराने आणि कृतज्ञतेने मन भरून येते. सैनिकांइतके मला जमले नाही तरी माझ्या राष्ट्राच्या सेवेसाठी, रक्षणासाठी आणि संवर्धनासाठी मला जमेल त्या पद्धतीने आणि जमेल ते सगळे मी करेन असा निश्चय मनात जागतो. 

त्यामुळे युद्ध स्मारके पाहायला खरे तर शालेय तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना तर घेऊन जायला हवेच पण प्रत्येक भारतीय नागरिकाने देखील ती पाहिली पाहिजेत. 

फक्त एक भान ही स्मारके बघताना, तिथे फोटो काढताना निश्चित बाळगले पाहिजे ते म्हणजे ही पर्यटन स्थळे नव्हेत. राष्ट्रप्रेमाची प्रेरणा देणारी, स्फूर्ती जागवणारी तीर्थक्षेत्रे आहेत. त्याच गांभीर्याने तिथे वावरले पाहिजे. 

कोणती पाहिली?- प्रत्यक्ष युद्ध जिथे झाले त्या स्थानाच्या जवळ उभारलेल्या युद्ध स्मारकांविषयी बोलायचे तर ह्या आधी आपण ब्लॉगपोस्ट मध्ये तवांग युद्ध स्मारकाविषयी तर वाचलेच आहे. शिवाय जैसलमेर जवळचे लोंगेवाला युद्ध स्मारक देखील मला पाहता आले आहे. आज लिहिते आहे ते नुकत्याच गेल्या महिन्यात पाहिलेल्या कारगिल युद्ध स्मारकाविषयी. 

कारगिल युद्ध स्मारक - ऑपरेशन विजय स्मृतिस्थल 

कारगिल युद्ध स्मारकाने सर्व राष्ट्रप्रेमी भारतीयांच्या मनात विशेष स्थान पटकावले आहे. 




कुठे आहे?- काश्मीर लडाख सीमेजवळ लडाख मधील द्रास जवळ हे स्मारक उभारले गेले आहे. कारगिल गाव ह्या स्मारकापासून साधारण ६०/७० किलोमीटरवर आहे. 

द्रास जवळ तोलोलिंग टेकड्यांच्या पायथ्याशी श्रीनगर लेह रस्त्यानजीक हे स्मारक आहे. अगदी हमरस्त्यालगतच हे स्मारक आहे. म्हणताना जरी टेकड्यांच्या पायथ्याशी म्हटले तरी समुद्र सपाटीपासून साधारण नऊ हजार फूट उंचीवर हे स्थान आहे. 

 आम्ही काश्मीर मधील सोनमर्गहून कारगिल युद्ध स्मारकात गेलो होतो. युद्ध स्मारक पाहणे हेच आमचे उद्दिष्ट्य असल्याने आम्ही पुढे कारगिल गावात गेलो नव्हतो. 

तुम्ही तुमच्या लेहलडाख ट्रीपमध्ये हे स्मारक पाहणार असाल तर लेहहून देखील तुम्हाला येत येईल. त्या वेळी आधी कारगिल गाव लागेल आणि मग स्मारक येईल. 

रस्ता कसा आहे?- काश्मीरच्या बाजूने स्मारकाकडे येणारा हा रस्ता खूपच थरारक अनुभव देणारा आहे. इतक्या अवघड ठिकाणी रस्ता तयार करणाऱ्या सीमा सडक संस्थेचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. 

अतिशय उंचावरून जाणारा चिंचोळा रस्ता, शेजारी अगदी खोल दरी आहे. खाली पाहिले की डोळे फिरतील इतकी खोल दरी आहे. 

📷 कौस्तुभ पटवर्धन 

हा पर्वताला गुंडाळलेला बारीक दोरा वाटतो आहे तो रस्ता आहे! रस्ता तसा चिंचोळा असल्याने मोठे ट्रक्स आले की वाहतूक कोंडी होऊ शकते. त्यामुळे सोनमर्गहून सकाळी अगदी लवकर निघून वाटेत फार वेळ न घालवता थेट कारगिल युद्ध स्मारक गाठावे हे उत्तम. अंतर तसे कमी असले तरी रस्ता अवघड असल्याने साधारण अडीच ते तीन तास लागू शकतात. तुम्ही जर का वाहतूक कोंडीत अडकलात तर मग किती वेळ लागेल ते सांगता येणार नाही. कारण ह्या भागात मोठ्या प्रमाणावर मिलिटरी ट्रक्स ची ये जा चालू असते. 

कधी पाहायचे ?- हिवाळ्यात इथे जाणे तर अशक्यच आहे. ह्या परिसरात तापमान अगदी कमी होते. बर्फामुळे रस्ते बंद होतात. त्यामुळे उन्हाळ्याच्या महिन्यातच जावे लागते. साधारण मे ते ऑक्टोबर मध्ये जाणे सोयीचे असेल. 

वाहनतळ?- स्मारकाच्या अगदी समोरच मोठा वाहनतळ

आहे. सरक्षेच्या कारणास्तव तुम्ही युद्धस्मारकात जाताना काहीही सामान सोबत घेऊन जाऊ शकत नाही. ते सर्व गाडीतच ठेवावे लागते. 

खिशात कार्ड, पैसे घेऊन जाऊ शकता. आत एक लहानसे दुकान आहे. तिथे स्मृतिचिन्हे विकत घेण्यासाठी पैसे लागतात.  

काय पहाल?- गाडीतून उतरल्यावर आपला प्रवास आणि इतर वैयक्तिक गोष्टींपासून बाजूला होऊन संपूर्ण लक्ष युद्ध स्मारकाकडे लागण्यासाठी मनोभूमिका तयार करते ते स्मारकासमोरचे हे दृश्य . 



📷 कौस्तुभ पटवर्धन 

नंतर दिसते प्रवेशद्वार. इथे नाव नोंदणी केल्यावर मग आपल्याला आत जाता येते. 

आत गेल्यावर दिसते ते भव्य आवार, समोर सरळ मोठा विजयपथ, दोन्ही बाजूला फडकणारे वीस ध्वज, मरणोत्तर परम वीर चक्र आणि महावीर चक्र पुरस्कारप्राप्त आठ वीरांचे पुतळे, तोफा आणि अगदी समोर बर्फाच्छादित पर्वतरांगांच्या पार्श्वभूमीवर उभे असलेले फिक्या गुलाबी दगडातील युद्ध स्मारक. 

📷 कौस्तुभ पटवर्धन 
आपला तिरंगा ध्वज डौलाने फडकतो तो वाऱ्यामुळे नव्हे तर शूर सैनिकांच्या श्वासामुळे, हे एका फलकावर वाचलेले वाक्य इथे प्रत्ययाला येते. 

📷 कौस्तुभ पटवर्धन 

प्रवेशद्वारातून आत गेल्यावर उजव्या हाताच्या इमारतीत ऑपरेशन विजयची म्हणजेच कारगिल युद्धाची माहिती देणारी एक चित्रफीत विनामूल्य दाखवली जाते. अत्यंत प्रभावी अशी ही चित्रफीत पाहून ज्याचे मन उचंबळून आले नाही असा एकही भारतीय नसेल. ती आधी बघून नंतर स्मारक बघितले तर आपल्याला स्मारक जास्त चांगले कळेल. 


इथे नजरेत भरतो तो अतिशय उंच आणि भव्य असा तिरंगा ध्वज. अमर जवान ज्योत मध्यभागी निरंतर तेवते आहे. त्याच्या बाजूने चार मिनार उभे आहेत. पाठीमागच्या भिंतीवर कारगिल युद्धात शहीद झालेल्या सर्व सैनिकांची नावे सोनेरी अक्षरात कोरलेली आहेत. 

मध्यभागी आहेत माखनलाल चतुर्वेदी ह्यांच्या पुष्प की अभिलाषा ह्या कवितेतील काही काव्यपंक्ती. 

"चाह नहीं मैं सुरबाला के
गहनों में गूंथा जाऊं,
चाह नहीं, प्रेमी-माला में
बिंध प्यारी को ललचाऊं,
चाह नहीं, सम्राटों के शव
पर हे हरि, डाला जाऊं,
चाह नहीं, देवों के सिर पर
चढूं भाग्य पर इठलाऊं।
मुझे तोड लेना वनमाली!
उस पथ पर देना तुम फेंक,
मातृभूमि पर शीश चढाने
जिस पथ जावें वीर अनेक

इथे साधारण प्रत्येक तासातून एकदा, एक जवान कारगिल युद्धाची म्हणजेच ऑपरेशन विजयची समग्र माहिती देतो. इतक्या उंचीवर इतका वेळ सलग बोलणे ते देखील माईक न घेता, खड्या आवाजात हे आपल्यासारख्या सामान्य जनतेसाठी अशक्यप्राय आहे. त्या साठी शारीरिक बळाची तर आहेच, त्या शिवाय मनात धगधगत असलेल्या कर्तव्यभावनेची देखील आवश्यकता आहे. 

स्मरण कुटीर -



मरणोत्तर परमवीरचक्र प्राप्त कॅप्टन मनोज कुमार पांडे ह्यांचे नाव असलेली हे स्मरणकुटीर म्हणजे ऑपरेशन विजयचे एक संग्रहालय आहे. 

वीरांचे फोटो, घटना कशा घडत गेल्या त्याचे वर्णन, काही वस्तू आणि प्रतिकृती ह्या सगळ्यांमुळे आठवणी जागवणारे आणि कायम आठवणीत राहणारे असेच हे संग्रहालय आहे. 

वीरभूमी - अमरज्योतीच्या दुसऱ्या बाजूला आहे वीरभूमी. त्या युद्धात तसेच त्या भागात आत्तापर्यंत विविध चकमकीत, मोहिमांमध्ये शहीद झालेल्या सैनिकांचे स्मरण करणारी वीरभूमी. 

📷 कौस्तुभ पटवर्धन 

📷 कौस्तुभ पटवर्धन 
कारगिल युद्ध कसे सुरु झाले ते तर आपल्या सगळ्यांना माहिती आहेच. मे १९९९ च्या पहिल्या आठवड्यात सुरु झालेले हे युद्ध २६ जुलै १९९९ ला भारताच्या विजयाने संपले. त्याविषयी विस्ताराने लिहिण्याची ही जागा नाही. द्रास, काकसार, मश्कोह, तोलोलिंग, टायगर हिल कारगिल, तुर्तुक ह्या ठिकाणच्या लढाया आणि अगदी संक्षिप्त घटनाक्रम एका पोस्टरवर दिलेला आहे. 

हे युद्ध करणारे आपले सैनिक आहेत हे तर पाकिस्तानने तर अनेक दिवस मान्यच केले नव्हते. पण मृत सैनिकांच्या जवळची ओळखपत्रे, शस्त्रे, त्यांचे बंकर्स ह्या सगळ्यांमुळे उशिरा का होईना पण अखेर पाकिस्तानलाही ह्या युद्धातील पाकिस्तानी सैन्याचा सहभाग मान्य करायलाच लागला. त्यातील काही बंकर्स आपल्याला स्मारकाच्या आवारात पाहायला मिळतात. 

कारगिल युद्ध स्मारकाच्या आवारात अनेक लहान लहान इमारती आहेत. त्यात काही संग्रहालये, छायाचित्र प्रदर्शने आहेत. सगळे नीट पाहण्यासाठी साधारण तीन ते चार तास राखून ठेवा. 

📷 कौस्तुभ पटवर्धन 


सर्वात उंचावर लढल्या गेलेल्या अत्यंत अवघड युद्धांपैकी एक म्हणून हे युद्ध जगभरात प्रसिद्ध आहे. ह्या युद्धात दोन्ही बाजूनी मोठ्या प्रमाणावर प्राणहानी झाली. दारुगोळा आणि शस्त्रात्रे प्रचंड प्रमाणात वापरली गेली. 

ह्या युद्धात भारत विजयी झाला पण त्यासाठी अनेक सैनिकांच्या प्राणांची किंमत  मोजावी लागली. अनेक विशी बाविशीतील तरुण सैनिकांनी देशाच्या रक्षणासाठी प्राणांची आहुती दिली. कॅप्टन सौरभ कालिया, कॅप्टन विक्रम बात्रा, कॅप्टन मनोज पांडे ही नावे आपल्या सगळ्यांच्या स्मरणात कोरलेली आहेतच. पण ह्यांच्याखेरीज आणखी शेकडो सैनिक धारातीर्थी पडले आहेत.  

ह्या युद्धाने भारताच्या संरक्षण धोरणाला एक वेगळे आणि प्रभावी वळण दिले. युद्धे होऊच नयेत असे आपल्याला कितीही वाटत असले तरी जोपर्यंत आपल्या शेजारी देशांनांही किंवा खरेतर जगातील सर्व देशांना जोपर्यंत ते पटत नाही तोपर्यंत अतिशय भक्कम संरक्षण व्यवस्था आपल्याकडे असणे गरजेचे आहे. 

ह्या युद्धस्मारकाच्या रस्त्यावरचे झोजिला पास, झिरो पॉईंट, द्रौपदी कुंड आणि प्रत्यक्ष रस्ता ह्याविषयी लिहायचे म्हटले तर ही पोस्ट खूप मोठी होईल. त्यामुळे त्यावर एक स्वतंत्र पोस्ट लिहीन. ती देखील वाचायला विसरू नका!


तुमच्या काश्मीर पर्यटनात तुमच्याकडे वेळ कमी असेल तर श्रीनगरमधील एखादी बाग नाही पाहिलीत तरी काही बिघडत नाही. पण कारगिल युद्ध स्मारकाचा समावेश मात्र अवश्य करा. एक दिवस ह्यासाठी खास राखून ठेवा. जोपर्यंत तुम्ही कारगिल युद्ध स्मारक पाहत नाही तोपर्यंत तुमची काश्मीर किंवा लेह ट्रिप पूर्ण झाली असे म्हणूच नका. 

"तुम्ही जेव्हा घरी जाल तेव्हा आमच्या विषयी देशवासियांना सांगा आणि सांगा की त्यांचा भविष्यकाल सुरक्षित व्हावा म्हणून आम्ही आमचा वर्तमान समर्पित केला आहे. - भारतीय सैनिक "


#kargil #operationvijay # vijaydiwas #dras # Kashmirtourism # Kargilwarmemorial # warmemorialsinIndia #Indianarmy # Indianmilitary #KargilVijayDiwas 


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कोस्टल कर्नाटक ३. -कुरु बेट, अनेगुड्डे श्री विनायक मंदिर, मणिपाल लेक

  कोस्टल कर्नाटक सहलीचा आमचा तिसरा दिवस देखील फार आनंदात गेला. काही गोष्टी ठरवल्याप्रमाणे होऊ शकल्या. काही गोष्टी ठरवल्याप्रमाणे अजिबात झाल्या नाहीत. पण तरी जमेची बाजूच जड झाली हे खरे.  उडुपीला सकाळी गाडी बोलावली होती आणि ती आम्हाला काही तास फिरवून आणणार होती. पहिले ठिकाण होते त्रासी मारवंते बीच.  फोटो बघूनच हा बीच पाहण्याची खूप उत्सुकता वाटत होती. हा अत्यंत अनोखा बीच आहे. रस्त्याच्या एक बाजूला सौपर्णिका नदी, दुसऱ्या बाजूला अरबी समुद्र - सिंधूसागर! त्रासी मरवंथे बीच  📷https://karnatakatourism.org/en/destinations/udupi उडुपीपासून निघून इकडे येऊन पोचलो. एका बाजूला नदी दिसत होती. दुसऱ्या बाजूला समुद्र किनाराही दिसत होता. पण फोटोत दाखवल्याप्रमाणे ठिकाण काही दिसेना.  मग चौकशी केल्यावर कळले की असे फक्त ड्रोनने काढलेल्या फोटोत दिसते. डोळ्यांना असे दिसत नाही!! एरवी आपण म्हणतो की डोळ्यांना जितके सुंदर दिसते तितके फोटोत उतरत नाही. पण इथे उलटे झाले होते!फोटोतल्याइतके सुंदर डोळ्यांना दिसत नव्हते!! पण असे दिसले नाही म्हणून काय झाले? रस्त्याच्या एका बाजूला नदी वाहते आहे...

कोस्टल कर्नाटक ६ - अविस्मरणीय शरावती बॅकवॉटर बोटिंग, शरावती कांडला मॅन्ग्रोव्ह बोर्ड वॉक

मी आधीच्या पोस्टमध्ये सांगितले होते की आजचा सूर्यास्त समुद्रात होता तर उद्याचा सूर्योदय शरावती नदीत असणार आहे! तोच हा सूर्योदय शरावती नदीत, कमळांच्या मध्ये.  शरावती बॅकवॉटर बोटिंग  दुसऱ्या दिवशी सकाळी सव्वा सहापर्यंत आम्ही बोटिंगच्या ठिकाणी पोचलो. कारण आम्हाला सूर्योदय चुकवायचा नव्हता. होनावर जवळचे शरावती नदीतील बोटिंग हा एक अविस्मरणीय अनुभव आहे.  आजूबाजूची शांतता, संथ पाणी, स्वच्छ नितळ पाण्यात वाकून आपले प्रतिबिंब न्याहाळणारी नारळाची झाडे, पाण्यात अध्ये मध्ये असलेली लहानशी बेटे, खारफूटीची जंगले, कमळाची पाण्यावर तरंगणारी पाने, उगवत्या सूर्याची पाण्यात मिसळणारी किरणे, त्याने तांबूस झालेले पाणी .. एक वेगळेच जग असते ते. तुम्ही जितक्या वेळासाठी बोट ठरवलेली असेल.. तास दीड तास..  तो वेळ, तुमच्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षणांपैकी एक असणार हे मी अगदी खात्रीने सांगू शकते.  आपोआप जगाचा, आयुष्याचा कोलाहल मंद होत जातो. पहाटेचा मवाळ प्रकाश, पाण्यावर हेलकावणारी नाव, हवेतला अगदी किंचितसा सुखद गारवा आणि मुरत जाणारी शांतता ह्या सगळ्याने मन निवळत जाते.  आम्ही गेलो त्या दिवशी,...

'रानी की वाव'

पाटण सर्वांना माहिती असते ते 'रानी की वाव' तिथे आहे म्हणून. भारतातील समृद्ध हातमाग कौशल्याचा उत्तम नमुना असलेली पटोला साडीदेखील पाटणचीच.  गुजराथमधील अहमदाबाद पासून साधारण दीडशे किलोमीटरवर असणारे पाटण जागतिक पर्यटनाच्या नकाशावर मानाचे स्थान पटकावून बसले आहे. युनेस्को चे जागतिक वारसा स्थळ म्हणून मानांकन मिळवलेले हे ठिकाण आहे.  रानी की वाव  रानी की वाव  रानी की वाव  रानी की वाव  रानी की वाव  'रानी की वाव' नावावरूनच आपल्या लक्षात येते की ही राणीने बांधलेली विहीर आहे. पण खरे तर ही नुसती वाव म्हणजे विहीर नसून  सुमारे 64 मीटर लांब, 20 मीटर रुंद आणि 27 मीटर खोल म्हणजे साधारण  सात मजल्यांइतकी खोली असलेले विष्णूचे मंदिर आहे असेच म्हणावे लागेल.  जमिनीपासून खोल खोल उतरत जाणारी अशी ही रचना आहे.  राणी उदयमती हिने तिचा पती  राजा भीमदेव पहिला याच्या स्मरणार्थ हे मंदिर बांधले म्हणून याचे नाव 'रानी की वाव' असे पडले. राजा भीमदेव पहिला म्हणजे अनहिलवाड किंवा अनहिल्लपूर पाटणच्या सोळंकी वंशाचा संस्थापक मुलराज ह्याचा मुलगा होता. ह्या वंशाने अनेक पराक्...

सोमनाथ - प्रभास पट्टण.

१९४७चे दीपावली पर्व. स्थळ होते सिंधुसागराच्या तीरावर असलेल्या सोमनाथ मंदिराच्या अवशेषांचे प्रवेशद्वार. तिथे उभे राहून सरदार वल्लभभाई पटेल यांनी दृढनिश्चय व्यक्त केला की भारतीय जनता आपले आराध्य दैवत असलेल्या सोमनाथ मंदिराला त्याची पूर्व प्रतिष्ठा आणि पूर्व वैभव प्राप्त करून देईल.  काय कारण होते ह्या प्रतिज्ञेचे? जर भारतीय जनतेचे आराध्य दैवत होते सोमनाथ तर आता मंदिराचे अवशेषच का उरले होते?  ह्या साठी आपल्याला जाणून घ्यावे लागेल सोमनाथ मंदिराच्या इतिहासाविषयी आणि सोमनाथच्या हिंदू जनमानसातील स्थानाविषयी.  हिंदूंन पूजनीय असलेल्या बारा ज्योतिर्लिंगापैकी सर्वात पहिले नाव असलेल्या आणि प्रथम स्थानी असलेले सोमनाथ. आपल्या सर्वाना माहिती असलेल्या स्तोत्राची सुरुवातच होते ती 'सौराष्ट्रे सोमनाथंच' पासून. त्यामुळेच त्याला 'आदि ज्योतिर्लिंग' म्हणून ओळखले जाते.  ऋग्वेदात तसेच अनेक पुराणात ज्याचा उल्लेख झाला आहे असे हे तीर्थधाम. ह्याविषयी आपल्याला अनेक कथा सापडतात.  शतकानुशतकांच्या मंदिराच्या इतिहासात नैसर्गिक रित्या पडझड झाल्यानंतर ते अनेक राजांकडून, भक्तांकडून सोने, च...

कवी केशवसुत स्मारक, मालगुंड

एका कवीचे स्मारक असावे आणि तेही कवीला साजेसे असावे ही दुर्मिळ गोष्ट आहे! पण असे एक स्मारक आपल्या महाराष्ट्रात आहे. रत्नागिरीजवळ मालगुंड येथे कवी केशवसुत म्हणजेच कृष्णाजी केशव दामले ह्यांचे एक सुंदर स्मारक उभारले आहे.  कवी केशवसुत जन्मस्थान  मार्गावरील फलक  प्रवेशद्वारातून दिसणारे दृश्य  कोकण मराठी साहित्य परिषदेने ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री मधू मंगेश कर्णिक ह्यांच्या संकल्पनेला प्रत्यक्षात उतरवले आहे.  एखाद्या कवीचे स्मारक कसे असावे हे एखाद्या साहित्यिकालाच चांगले कळू शकणार! स्मारकाच्या प्रवेशद्वारातून आपण आत गेलो की समोरच दिसते ते केशवसुत जन्मस्थान. हे जुने घर डागडुजी करून नीटनेटके ठेवले आहे. पडवीत मोठा झोपाळा आहे.  कवीच्या घरात कवीचे पुस्तक वाचताना  तिथेच केशवसुतांची काही पुस्तके तसेच को.म.सा.प.ची काही प्रकाशने विक्रीसाठी उपलब्ध आहेत.  घरातील आतल्या खोल्या तशा रिकाम्याच आहेत. काही थोडे जुने सामान तिथे ठेवले आहे .  माजघर  घराच्या मागच्या बाजूला कवीचे खरे स्मारक आहे. केशवसुतांनी त्या काळात म्हणजे दीडशे वर्षांपूर्वी कवितेत नवा प्रवाह आणला...

गणपतीपुळे

कोकणच्या निसर्गाविषयी किती आणि कितीदाही लिहिले तरी कमीच आहे. कोकणातल्या नारळी पोफळीच्या वाड्या, आंब्याची फणसाची झाडे, केळीच्या बागा, कौलारू घरे ह्यांनी नटलेली धरती, सोनचाफा बकुळीच्या सुगंधाने घमघमणारा आसमंत आणि कानावर येणारी समुद्राची गाज सारेच कसे मन प्रसन्न करणारे असते.  चराचरात वसणारा परमतत्वाचा अंश ह्या भूमीत प्रकर्षाने प्रत्ययाला येतो. ह्या भूमीत अनेक देवस्थाने नसती तरच नवल होते. ह्या देवस्थानांच्या जागा विलक्षण सुंदर आहेत. गणपतीपुळे हे असेच एका सुंदर स्थानी वसलेले श्री गणेशाचे स्वयंभू मंदिर. सिंधुसागराचा किनारा, चमकदार वाळूची पुळण आणि पाठीमागे गार्ड हिरव्या वनराईने झाकलेला डोंगर असे ह्या मंदिराचे नयनमनोहर ठिकाण आहे.  श्री गणपतीपुळे देवस्थान  ह्या स्वयंभू मूर्तीचा दृष्टांत पाचशे वर्षांपूर्वी भिडे गुरुजींना झाला. तिथे त्यांनी साधे गवताचे छप्पर उभारून पूजेला सुरुवात केली. त्यांची समाधी आपल्याला मंदिराच्या आवारातच बघायला मिळते.  समाधी  पुढे मग वेळोवेळी निरनिराळ्या भक्तांनी ह्या वास्तूची पुनर्बांधणी आणि दुरुस्ती केली. छत्रपती शिवाजी महाराजांचे सचिव अण्णाजी दत्त...

श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे जन्मस्थान - बर्वेवाडा, डुबेरे

काल दिनांक १८ ऑगस्ट २०२५. श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे ह्यांची ३२५ वी जयंती. श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे पुतळा, बर्वेवाडा श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे पुतळा, बर्वेवाडा श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे पुतळा, बर्वेवाडा आता बाजीराव म्हटले की केवळ बाजीराव मस्तानीच आठवणाऱ्या लोकांसाठी बाजीराव कोण ते सांगायला हवे. छत्रपती शिवाजी महाराजांनी पाहिलेले हिंदवी स्वराज्याचे स्वप्न प्रत्यक्षात जगणारे आणि हिंदवी साम्राज्य निर्माण करणारे बाजीराव बाळाजी पेशवे/ विश्वनाथ बल्लाळ भट हे शाहूछत्रपतींचे पेशवे म्हणजेच पंतप्रधान होते.  आपल्या वीस वर्षांच्या पेशवे म्हणून कारकीर्दीत ते चाळीसहून अधिक लढाया लढले आणि त्या सर्व लढायांत ते अजिंक्य राहिले. त्यांनी आपल्या कर्तृत्वाने मराठ्यांचे वर्चस्व अखंड भारतावर प्रस्थापित केले.  त्यांचा जन्म १८ ऑगस्ट १७००, भाद्रपद पौर्णिमा ह्या दिवशी डुबेरे येथे झाला. डुबेरे आजच्या सिन्नर तालुक्यात नाशिक जिल्ह्यात आहे.  ह्या गावी बाजीरावांच्या मातोश्री राधाबाई ह्यांचे भाऊ मल्हारराव बर्वे राहत असत. त्या बर्वे वाड्यात बाजीरावांचा जन्म झाला.  बर्वे वाडा  अवघ...

कोस्टल कर्नाटक ४ - शृंगेरी, मुकाम्बिका

कोस्टल कर्नाटक ४ - शृंगेरी, मुकाम्बिका  आज उडुपीहून लवकर निघून शृंगेरीला पोचण्याचा बेत आखला होता. त्याप्रमाणे आम्ही सकाळीच निघालो. रस्ता खूपच छान होता. आता खरं सांगायचे तर कोस्टल कर्नाटक प्रवासात रस्ता सुंदर होता म्हणणे ही द्विरुक्तीच आहे.  सगळ्या सडका अगदी एका पातळीतील आणि गुळगुळीत आहेत. खड्डे खळगे, रस्ते वर खाली असणे असे काही नसल्याने महाराष्ट्रातून गेलेल्या आम्हाला थोडे चुकल्यासारखे वाटले खरे!!! शिवाय रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे, स्वच्छता ह्यामुळे प्रवास फार आनंदाचा होतो. उडुपी शृंगेरी रस्ता तर आगुंबे जंगलातून जातो. त्यामुळे दाट झाडी होती. रस्त्यात सुप्रसिद्ध आगुंबे घाटही येतोच. सकाळची प्रसन्न वेळ आणि इतका छान रस्ता..दिवसाची चांगली सुरुवात होण्यासाठी आणखी काय पाहिजे?!!  आम्हाला वाटले होते इतक्या लवकर फारसे कोणी श्रुंगेरीत आलेले नसेल. पण शृंगेरीला पोचल्यावर लक्षात आले की आमच्यासारखाच विचार अनेकांनी केला होता!  अनेक बस रात्रभराचा प्रवास करून सकाळी शृंगेरीला पोचल्या होत्या. त्या लोकांच्या प्रातर्विधी आणि अंघोळीसाठी अनेक ठिकाणी माफक पैसे घेऊन उत्तम सोय केलेली होती....

कोस्टल कर्नाटक १ - मंगळुरू

  मंगळुरू- कुडला - मंगलोर - मंगलापूरम ही सगळी एकाच गावाची नावे. मंगलादेवी मंदिरावरून ह्या गावाचे नाव पडले मंगळुरू. दक्षिण कन्नड जिल्ह्याचे हे प्रमुख ठिकाण. सुंदर मंदिरे, स्वच्छ समुद्रकिनारे, नारळी-पोफळीची झाडे, आधुनिकतेच्या खुणा मिरवणारे मॉल्स आणि शहराबाहेरची पण तशी जवळच असणारी अनेक पर्यटन स्थळे.. ह्या साऱ्यामुळे मंगळुरु नेहमीच पर्यटकांचे आवडते राहिलेले आहे.  मंगळूरूला जाणारे आमचे विमान नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून होते. हा विमानतळ पाहण्याची उत्सुकता होतीच.  हा अतिशय भव्य आणि सुव्यवस्थित विमानतळ आहे. अनेक विमाने एकावेळी विमानतळावर आली तरी येणाऱ्या आणि जाणाऱ्या प्रवाशांच्यासाठी सर्व आवश्यक सुविधा केलेल्या आहेत.  जशी वर्दळ वाढेल तशी विमानतळावर जाण्यासाठी वाहतुकीची साधने देखील वाढतील अशी आशा आहे.  नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ  नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ  नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ  नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ  लहानशा प्रवासानंतर विमान मंगळुरुला उतरले. मंगळुरु विमानतळ म्हणजे टेबलटॉप रनवेज असणाऱ्या भारतातील मोजक्या विमानतळ...

कोस्टल कर्नाटक- २ मंगळुरू, मुलकी, उचिल, उडुपी

  आमच्या कोस्टल कर्नाटक सहलीचा दुसरा दिवस सुरु झाला तो काद्री मंजुनाथ मंदिर भेटीने. हे मंदिर अतिशय प्राचीन आहे. भारद्वाज संहितेत ह्या मंदिराचा उल्लेख आहे. त्या काळात ह्या भागाला सुवर्ण कदलीवन म्हटले जात होते आणि ह्या मंदिराला सर्वसिद्धिमहास्थान किंवा सर्वसौभाग्यदायक महास्थान असे म्हटले जाई. परशुरामाच्या तपाने प्रसन्न होऊन ब्रह्म,विष्णू आणि महेश ह्यांनी एकत्रितपणे मंजूनाथाच्या रूपात स्वतःला प्रगट केले असे कथा सांगते.  नाथ संप्रदायाच्या गोरक्षनाथ आणि मच्छिन्द्रनाथ ह्यांनी देखील ह्या मंदिराला भेट दिली होती आणि ह्या भागात वास्तव्य केले होते असे सांगितले जाते.  मंदिर खूप भव्य आहे. मुख्य देवता शंकर - मंजुनाथ आहे. मंदिराच्या आवारात गणेश, दुर्गा, हनुमान,अय्यप्पा, नागदेवता अशी मंदिरे आहेत. जवळच एक तलाव आहे. हे मंदिर काद्री टेकडीवर वसलेले आहे. जवळच काद्री हिल पार्क नावाचे एक भव्य उद्यान आहे. एक लहानसे तळे देखील जवळच आहे. स्नानासाठी कुंड ह्या मंदिराच्या आवारातच आहेत. एकूणच परिसर रम्य आणि मंदिरातील ऊर्जेने भारलेला आहे. अनेक भाविक इथे भेट देत असतात.  काद्री मंजुनाथ मंदिर  का...