Skip to main content

शेगाव पदयात्रा

महाराष्ट्रातील भक्तिमार्गाची एक ठळक खूण म्हणजे वारी. दरवर्षी लाखो भाविक पायी चालत वारीसाठी जातात. मग ही वारी पंढरपूरला असो, शिर्डीला असो वा शेगावला असो. पायी चालताना हे वारकरी तर नामस्मरणात मग्न असतातच पण आपल्याबरोबर त्या मार्गातील सगळ्यांना भक्तिरंगात रंगवून टाकतात.

वारी असतो भक्तीचा एक सामूहिक अविष्कार. भक्तांच्या मनात एकाच वेळी उमटणारा नामाचा हुंकार. पाय चालत असतात, मार्गक्रमण करत असतात पण मन मात्र माउलींच्या चरणी लागलेले असते. वारी सर्व भेद विरघळवून टाकते. आपल्या शारीरिक मर्यादांवर मात करून कितीही अंतर सहजसाध्य करण्याची ऊर्जा देते. मला तर नेहमीच वारी म्हणजे समाजपुरुषाचा एक विराट अविष्कार आहे असेच वाटते. त्यातला प्रत्येक जण वैयक्तिक अस्तित्व विसरून जाऊन एका विराट रूपाचा भाग बनलेला असतो. 

असे म्हणतात की तुम्ही शुद्ध मनाने इच्छा करा, ती साध्य करण्याकरिता शक्य ते सर्व प्रयत्न करा आणि ह्या विश्वातील सकारात्मक शक्ती तुमची इच्छा पूर्ण करण्यासाठी सहाय्य करतील. माझी वारीत सहभागी होण्याची इच्छा अशीच पूर्ण झाली ती गजानन महाराज उपासना केंद्र, ठाणे ह्यांनी आयोजित केलेल्या पदयात्रेच्या निमित्ताने. 

ही पदयात्रा होती खामगाव – शेगाव अशी. साधारण १७ किलोमीटरचे अंतर पायी चालायचे होते. आम्ही आदल्या दिवशीच म्हणजे १० डिसेंबर २०२२ ला शेगावला पोचलो. 

विठू माझा लेकुरवाळा 

रेल्वे स्टेशनवरून रिक्षाने शेगाव संस्थानच्या भक्तनिवासात गेलो. इथे प्रत्यक्ष जाऊन जागेचे रिझर्वेशन करावे लागते आणि जे कोण राहणार असतील, ते तिथे उपस्थित लागतात. त्यामुळे कोणाच्या वतीने कोणीही रिझर्वेशन करते आहे, जागा बुक करून ठेवते आहे असे होत नाही. भक्त निवासात अत्यंत पारदर्शक व्यवहार आहे. 

माहिती फलक 
आनंदविहार भक्तनिवास संकुल 
आनंदविहार भक्तनिवास संकुल 
आनंदविहार भक्तनिवास संकुल 
वारी 
विठू माझा लेकुरवाळा 
आनंद विहार भक्त निवास परिसर भरपूर झाडे, फुले, शिल्पे, स्वच्छता ह्या सगळ्यांमुळे प्रसन्न वाटतो. 
 खोल्या चांगल्या आहेत. सर्व सोयींनी युक्त आणि स्वच्छ आहेत. अगदी लहान लहान गोष्टींचा पण विचार केलेला आहे. 
खोलीतील स्विच बोर्डला अडकवायला हुक, चार्जिंग करत असलेला मोबाईल तिथे लावून ठेवण्यासाठी स्टॅन्ड असे सर्व आहे. इतका विचार एखाद्या सार्वजनिक संस्थेत व्हावा ही फार दुर्मिळ गोष्ट आहे! 
स्विच बोर्ड 
भक्तनिवासातून मंदिरात तसेच रेल्वे स्टेशन अथवा बस स्टॅन्ड ला जायचे असल्यास बसेस ची सोय आहे. 
माहिती फलक 
बस स्टॉप 
बस स्टॉप 

त्या शिवाय मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेरच रिक्षा स्टॅन्ड आहे तिथून कधीही रिक्षा मिळू शकतेच. भक्तनिवासात भोजनगृह आहे. तिथे शुद्ध शाकाहारी नाश्ता, जेवण अल्पदरात व रुचकर मिळते. 

प्रसादालय 

दरपत्रक 

नाश्ता 

चपला बाहेर काढायला लागतात. त्या साठी स्टॅन्ड तर आहेतच पण कोणाला चपला घालताना, काढताना बसायला लागत असेल तर त्यांच्या साठी वेगवेगळ्या उंचीची आसने ठेवली आहेत. 
बसायची आसने 
चपला स्टॅन्ड 
त्या दिवशी आम्ही लाड कारंजा येथील दत्त मंदिर आणि नृसिंह सरस्वती जन्मस्थानाचे दर्शन घेऊन आलो. साधारण १०० किलोमीटर चे अंतर आहे. टॅक्सी ने साधारण एक दीड तासाचा प्रवास आहे. दोन्हीही स्थाने खूप महत्वाची आहेत,अवश्य भेट द्यावी अशीच आहेत. 
दत्त मंदिर 
दत्त मंदिर 
जन्मस्थान 
श्री नृसिंह सरस्वती जन्मस्थान 
श्री नृसिंह सरस्वती जन्मस्थान 
श्री नृसिंह सरस्वती जन्मस्थान 
त्या दिवशी शेगावला परत आल्यावर संध्याकाळी सामूहिक उपासना झाली. नंतर मंदिरात जाऊन दर्शन घेतले. 

शेगाव मंदिराविषयी सांगायचे झाले तर अत्यंत शिस्तबद्ध व्यवस्था आहे. रांगेत उभे राहिल्यावर दर्शनासाठी साधारण किती वेळ लागेल ह्याचे फलक सतत येत राहतात. पुढील सर्व फोटो रांगेत उभे राहिलेले असताना काढलेले आहेत. 

शेगाव मंदिर अंतरंग 

शेगाव मंदिर अंतरंग 
शेगाव मंदिर अंतरंग 
मंदिरात नेहमीच दर्शनोत्सुक भक्तांची गर्दी असते. भोजनालयात प्रसाद घेण्यासाठी देखील लांब रांगा लागलेल्या असतात. 
दुसऱ्या दिवशी पहाटे ५ वाजता सर्वजण एकत्र आले. 
पहाटे ५ ..
सर्वजण तयार 
बसने खामगावला जायचे होते आणि मग तिथून पायी चालत शेगाव अशी वारी होती. बसमध्ये देखील नामाचा गजर सुरु होता. 
वय वर्षे ९ ते ८५ ह्या वयोगटातील एकूण ५०० जण खामगावला पोचून, आरती होऊन, प्रत्यक्ष चालणे सुरवात व्हायला साडेसात वाजले.
@खामगाव - पदयात्रेसाठी तयार 
पदयात्रा 
पदयात्रा 


पदयात्रा 

‘मी’ लवकर उठले, ‘मी’ तयार झाले, म्हणजे आता लवकर निघायला हवे अशी आपल्या मनाची धारणा झालेली असते. पण ‘मी’ चा जेव्हा ‘आपण’ होतो तेव्हा केवळ ‘माझा’ नव्हे, तर ‘सर्वांचा’ विचार करायचा असतो हा पहिला धडा मिळाला. मनाचे उतावळेपण कमी करण्यासाठी हा वेळ खूप उपयोगी पडला. 

नामघोषात वारी निघाली. नाम घेता घेता पावले आपोआपच पडत होती. चालण्याचा उत्साह वाढत होता. त्या आधी अजिबात ओळख नसलेल्या पण वारीत जोडीदार बनलेल्या सगळ्याजणी आपल्या अगदी जुन्या मैत्रिणी आहेत असे वाटत होते. ‘ऐसी कळवळ्याची जाती।करी लाभाविण प्रीती’ ह्या संत तुकारामांच्या वचनाचा अल्पसा प्रत्यय येऊ लागला. 

साधारण सात किलोमीटर चालून झाल्यावर अन्नकुटी मध्ये न्याहारीची सोय केलेली होती. तिथे स्तोत्रपठण आणि न्याहारी झाली. तिथे आम्हाला दुसरी एक वारी भेटली. त्या वारीला पाहून अनेक गोष्टी शिकता आल्या. आमची वारीची तयारी म्हणजे चांगले बूट, बॅकपॅक, टोपी, पाण्याची बाटली, लागतील म्हणून औषधे अशी जय्यत तयारी होती. आम्हाला भेटलेल्या वारीतील बायकांकडे काहीच सामान नव्हते. कित्येकींच्या पायात साध्या चपला पण नव्हत्या. त्यांच्या डोळ्यातला निर्मळ भाव आणि चेहऱ्यावरचे प्रसन्न हास्य मात्र त्यांना कशाचीही कमतरता वाटत नाही असेच सांगत होते. 

आपल्या देहाला आणि मनाला लागलेल्या सुखसोयींच्या सवयी लगेच नाहीशा तर नाही होणार. पण त्यांचे अवडंबर शक्य तितके कमी करायला हवे हा धडा मिळाला. 

सुरुवातीला सुखद असणारे ऊन आता चांगलेच तापले होते. आयोजकांनी आधीच सांगितले होते की आपला चालण्याचा वेग कितीही असला तरी आपल्याला सगळ्यांच्या सोबत हळू हळूच जायचे आहे. आपण तसेच करायचे, वारीची शिस्त मोडायची नाही असे मनाशी पक्के ठरवले होते. सर्वच जण अगदी सावकाश, बाकी सगळ्यांच्या वेगाशी जुळवून घेत चालत होते. त्याची झलक ह्या विडिओमध्ये बघायला मिळते.

                 


भजने, गजर, मनात सतत चालू असलेली ‘ओम गजानन नमो नम: श्री गजानन नमो नम: जय गजानन नमो नम: गुरु गजानन नमो नमः ‘ नामामधून, मागे पडलेले प्रापंचिक विषय असा अगदी वेगळा अनुभव होता तो. आयोजक सतत आमचा उत्साह वाढवत होते, आमची काळजी घेत होते. 

वारीच्या अगदी सुरुवातीच्या भागात घातले जाणारे रिंगण, भजने आम्हाला दिसत वा ऐकू येत नव्हती. पण ह्या वेळी तिथे असा कार्यक्रम असेल हे आदल्या दिवशी कळले होते. त्यामुळे त्या वेळी जागच्या जागी पाय हलवत आम्ही मनोमन त्या भजनांची, भारुडांची, पावलीची आणि रिंगणाची कल्पना करत उभे होतो. वाटेतला ट्रॅफिक, त्यामुळे होणारा खोळंबा, माध्यान्हीचे वैदर्भी ऊन ह्या सगळ्याने प्रत्येकाची सहनशीलता वाढवली. साधारण दीड वाजता आम्हाला मंदिराचे दर्शन झाले. प्रत्यक्ष दर्शन घेणे शक्यच होणार नव्हते. त्या दिवशी रविवार आणि चतुर्थी होती. आमच्या आधी पाच सहा वाऱ्या येऊन पोचलेल्या होत्या. मंदिरात अतोनात गर्दी होती. त्यामुळे बाहेरून घडलेल्या मंदिराच्या दर्शनावर समाधान मानले. 

संतश्रेष्ठ श्री गजानन महाराजांचा जन्म कधी झाला हे तर कोणाला माहिती नाही, पण ते शेगावात २३ फेब्रुवारी १८७८ ह्या दिवशी प्रगट झाले. समाजातील दांभिकता,भेदभाव नष्ट होऊन एकता आणि अध्यात्मिक उन्नती साधण्यासाठी ह्या योगीराजाने आयुष्यभर प्रयत्न केले. त्यांनी ८ सप्टेंबर १९१० ला समाधी घेतली. आज इतकी वर्षे उलटून गेली, शेगावचे महत्व मात्र कमी न होता, दिवसेंदिवस वाढतच आहे. 

महाराजांनी सांगितल्यानुसार अतिशय शिस्तीचे, स्वच्छ, पारदर्शक आर्थिक व्यवहाराचे नियोजन असलेल्या शेगावच्या मंदिराला व्यवस्थापनाचा आदर्श मानले जाते. प्राचीन भारतीय संस्कृतीनुसार मंदिरे ही संस्कारांची केंद्रे असायची. तसेच आहे हे मंदिर. देवस्थानामुळे संपूर्ण परिसराचा कायापालट झाला आहे. 

#shegaon #akola #maharashtra #gajananmaharaj  #vidarbha #mh #marathi #buldana #buldhana #khamgaon #wardha  #ganganganatbote



Comments

Popular posts from this blog

लक्ष्मीकेशव मंदिर, कोळीसरे

  मंदिर म्हणजे एक उर्जाकेंद्र! प्राचीन काळापासून भाविक मंदिरात देवतांच्या दर्शनासाठी जात आले आहेत. आजही हिंदू लोक मंदिरात जाऊन, चित्त एकाग्र करून ध्यान, पूजा आणि आरती करतात. यामुळे त्यांना ऊर्जा आणि शांततेचा अनुभव मिळतो. प्रत्येक देवी-देवतेचे एक विशिष्ट मंदिर असते.  असेच कोळीसरे येथे श्री विष्णूचे - लक्ष्मीकेशवाचे सुंदर मंदिर आहे . रत्नागिरी शहरापासून फक्त ५० किलोमीटर अंतरावर किंवा गणपती पुळ्यापासून २१ किलोमीटर अंतरावर निसर्गसुंदर कोळीसरे गाव आहे. पुणे मुंबई हून रत्नागिरी जिल्ह्यातील कोळीसरे येथे जायचे असल्यास चिपळूण मार्गे जाता येईल. परशुराम - कोळीसरे रस्त्यात अशी नयनरम्य दृश्ये अनेकदा दिसतात. परशुराम कोळिसरे रस्ता अगदी कमी लोकवस्तीचे, घनदाट झाडी असलेले हे गाव कोळीसरे फाट्याहून आत गेल्यावर दीड दोन किलोमीटर प्रवास केल्यावर येते. रत्नागिरीहून बसने जाता येते अन्यथा मंदिरापर्यंत पोचण्यासाठी स्वतःचे वाहन असणे सोयीचे आहे.  गाडी पार्क केल्यानंतर काही पायऱ्या उतरून मग घनदाट झाडीत वसलेल्या ह्या मंदिरात जाता येते. ह्या रस्त्यावरून व्हील चेयर जाउ शकत नाही. पार्किंग पासून उ...

नागाव

  नागाव म्हणजे माडापोफळींच्या वाड्या. नागाव म्हणजे केळीच्या बागा. नागाव म्हणजे सुंदर स्वच्छ समुद्रकिनारा.  नागाव म्हणजे वस्त्रगाळ मऊ वाळूचा किनारा.  नागाव म्हणजे अनेक मंदिरे. नागाव म्हणजे लक्षवेधी दीपमाळा. नागाव म्हणजे कोपऱ्या कोपऱ्यावर भेटणारे तळे! नागाव म्हणजे तळ्यात फुललेलीअनेकानेक कमळे!! नागावच्या शेजारचे  अक्षी, चौल, रेवदंडा ही देखील अशीच गावे. नितांतसुंदर, साधी. अलिबाग आणि ह्या सर्व गावांना मिळून अष्टागर असे म्हणत असत. आठ गावांचा समूह.  अलिबाग पर्यटन स्थळ म्हणून ७० च्या दशकापासूनच प्रसिद्ध झाले होते. तेव्हा शांत निवांत असलेले अलिबाग नंतर खूपच गजबजले आणि मग दुसऱ्या सहस्त्रकात अलिबागशेजारील रेवदंडा, नागाव, चौल ही लहान लहान गावे देखील पर्यटनस्थळे म्हणून विकसित होऊ लागली.  ह्या निवांत, शांत गावांना जणू अचानक खडबडून जाग आली. तिथेही पर्यटकांची गर्दी वाढू लागली. स्थानिक लोकांना रोजगार, विकासाची संधी, अर्थार्जनाची संधी त्यात दिसली.  गावांवर आधुनिक पेहराव चढला आणि तिथे उदयाला आली मुंबईकरांची आवडती पर्यटनस्थळे.  आता तर परिस्थिती अशी आहे की जवळ जवळ एका...

पैसाच्या खांबाचे मंदिर!

पैसाच्या खांबाचे मंदिर! अनेक वर्षांपूर्वी दुर्गा बाईंचे ' पैस ' हे पुस्तक वाचनात आले. त्यात होता हा पैसाचा खांब. पैस म्हणजे अवकाश. जिथे ज्ञानेश्वरी लिहिली गेली तो हा पैसाचा खांब. ज्ञानेश्वरीचे जन्मस्थान! खांबाला टेकून बसलेले, ज्ञानेश्वरी सांगत असलेले ज्ञानेश्वर आणि ती लिहून घेत असलेले लेखनिक सच्चिदानंद बाबा असे चित्र आधीही अनेकदा पाहिलेले होते. पण त्या खांबाला ' पैसाचा खांब' म्हणतात हे माहितीच नव्हते. पैस ह्या पुस्तकातील पैसाचा खांब हे प्रकरण वाचले आणि अक्षरशः थरारून गेले. 'पैसाच्या खांबाचे मंदिर' अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा या प्रवरा नदीच्या तीरावरील गावी आहे. नेवासे गावाच्या पश्चिमेला हे मंदिर आहे. 'शके बाराशे बारोत्तरे| तैं टीका केली ज्ञानेश्वरे| सच्चिदानंद बाबा आदरे| लेखकू जाहला|' असा उल्लेख सापडतो. मूर्त आणि अमूर्त ह्याची अशी जोडणी म्हणजे ज्ञानाच्या अनंत अवकाशात जाण्याची पहिली पायरीच जणू. ज्ञानेश्वरी वाचण्याएवढी आणि कळण्याएवढी योग्यता ह्या जन्मात अंगी येईल की नाही माहिती नाही. पण हा खांब पाहू या कधीतरी असे ठरवून टाकले. अवघड नव्हतेच जाणे. संभाजीनगर...

हनुमान जन्मस्थळ आणि शबरी धाम, जय श्रीराम, जय जय राम!

आज आपण रामायणातील दोन ठिकाणांना भेट देणार आहोत आणि दोन महान राम भक्तांच्या भेटीसाठी तुम्हाला घेऊन जाताना मला अतिशय आनंद झालेला आहे.  पहिल्यांदा आपण जाऊयात, हनुमानाच्या जन्मस्थानी अंजनेय टेकडीवर. ही टेकडी कर्नाटक मध्ये हंपीजवळच्या भागात आहे असे मानले जाते. ही जागा अंजनीच्या पुत्राचे, अंजनेयाचे म्हणजेच हनुमानाचे जन्मस्थळ आहे.  भारतात अजूनही इतर काही ठिकाणे आहेत की जी हनुमानाचे जन्मस्थळ म्हणून सांगितली जातात. पण अंजनेय टेकडी हे हनुमानाचे जन्मस्थळ असणे मला सर्वात जास्त संयुक्तिक वाटते. कारण ऋष्यमूक पर्वत, जिथे सुग्रीव, हनुमान आणि भगवान श्रीराम यांची भेट झाली होती तो इथून जवळच आहे. हंपीपासून अंजनेय टेकडीपर्यंतचा रस्ता नैसर्गिक सृष्टिसौंदर्याने अतिशय समृद्ध आहे. तुंगभद्रेच्या किनाऱ्यावर असल्यामुळे हा संपूर्ण प्रदेश अत्यंत सुपीक आहे रस्त्याच्या दोन्ही बाजूला सतत तुम्हाला भात शेती, नारळाची झाडे, केळीच्या बागा आणि अर्थातच प्रचंड मोठे खडक, जे ह्या भागाचे वैशिष्ट्य आहेत ते दिसत राहतात. हा संपूर्ण परिसर रामायणातला किष्किंधा भाग मानला जातो. भात शेती केळीच्या बागा भातशेतीचा मखमली गालिचा टे...

श्री व्याडेश्वर देवस्थान, गुहागर

  कोकणावर निसर्गाचा वरदहस्त आहेच. त्यातही काही गावांनी आपल्या सौंदर्याने विशेष स्थान मिळवले आहे. त्यातील एक महत्वाचे नाव म्हणजे गुहागर. सुंदर लहानसे गाव आहे. एक मुख्य रस्ता, त्याच्या दोन्ही बाजूला घरे, घरांच्या मागे नारळ सुपारीच्या वाड्या. रस्त्याच्या एका बाजूच्या प्रत्येक घराच्या मागच्या वाडीतून समुद्राला जाण्याचा रस्ता, भव्य स्वच्छ समुद्रकिनारा असे हे मोहात पाडणारे गुहागर गाव.  गुहागर प्रसिद्ध आहे व्याडेश्वरासाठी. व्याडेश्वर हे शंकराचे मंदिर अनेक कोकणवासीयांचे कुलदैवत आहे. कोकणातील सर्वात महत्त्वाच्या शिवमंदिरांपैकी एक म्हणजे गुहागरमधील श्री व्याडेश्वर देवस्थान.  श्री व्याडेश्वर देवस्थान.  श्री व्याडेश्वर देवस्थान.  तुम्हाला जर का कधी दक्षिणेतील मंदिरे पाहून वाटले असेल की अशी मंदिरे आपल्या महाराष्ट्रात का नाही?!! तर गुहागरच्या व्याडेश्वर मंदिराला भेट द्या. भव्य सुंदर देवालय आहे. मंदिराचे आवार स्वच्छ, प्रशस्त आहे. मुख्य म्हणजे अगदी नांदते, जागते मंदिर आहे. मंदिराची साफसफाई, निगराणी केली जाते आहे. आवारात भरपूर झाडे आहेत. श्री व्याडे...

महेश्वर

महेश्वर हे मध्यप्रदेश पर्यटन निगमच्या पर्यटन स्थळांमधले एक महत्वाचे नाव आहे. पण करोडो भारतीयांसाठी ते केवळ एक पर्यटन स्थळ नाही तर एक तीर्थस्थान असते. लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या वास्तव्याने पुनीत झालेले स्थान आहे.  महेश्वर किल्ला प्रवेशद्वार  राजवाडा प्रवेशद्वार  बाह्यरूप  पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर  राजवाडा प्रवेशद्वार  अहिल्याबाई होळकर हे केवळ भारताच्याच नव्हे तर विश्वाच्या इतिहासातील एक सोनेरी पान. संपूर्ण मानव विश्वातील यशस्वी स्त्री राज्यकर्त्यांची सूची करायची झाली तर अहिल्याबाई होळकरांचे नाव ठळकपणे लिहायला लागेल.   31 मे 2025 ला त्यांची तीनशेवी जयंती आहे. पण 300 वर्षांपूर्वी होऊन गेलेल्या अहिल्याबाईंचे आयुष्य अगदी आजच्या आधुनिक काळातल्या आव्हानातही मार्गदर्शक ठरावे असेच आहे.  त्यांच्याविषयीचा आदर मनात घेऊनच आपण महेश्वरला जातो आणि त्या भावनेच्या प्रकाशात महेश्वर पाहतो. महेश्वरला फार मोठी प्राचीन परंपरा आहे. स्कंद पुराणाच्या रेवा खंडात आणि वायू पुराणाच्या नर्मदा रहस्य मध्ये महिष्मती म्हणजे महेश्वरचे वर्णन आलेले आहे. 'गुप्...

श्री क्षेत्र गिरनार

  गिरनार माझ्यासाठी ते मोहक फळ होते, जे मिळायला अवघड होते आणि कितीही हवेहवेसे वाटले तरी त्यासाठी माझ्याकडून प्रयत्न मात्र अजिबात केले गेले नव्हते. गिरनारच्या अद्भुत कथा खूप ऐकल्या, वाचल्या होत्या. गिरनारची मनात ओढ होती. पण ते सगळे मनातच. प्रत्यक्षात कोणतेही ट्रीप ठरवताना, कुठे जायचे याचा विचार करताना पुढे होऊन गिरनारला जाऊयात असे कधी म्हटले नव्हते हेही तितकेच खरे.  श्री क्षेत्र गिरनार  काय आहे गिरनार?  गिरनार हा पर्वत समूह आहे. दत्तात्रेयांचा इथे निवास असल्याने ते हिंदूंच्यासाठी अत्यंत पवित्र आणि महत्वाचे धार्मिक स्थळ आहे.  हिमालयापेक्षाही जुना असलेला हा पर्वत अनेक नावांनी प्राचीन साहित्यात आलेला आहे. रेवतक हे त्यातील सर्वात जास्त माहिती असलेले नाव.  जैन लोकांसाठी देखील हे अत्यंत महत्वाचे ठिकाण आहे कारण इथे जैन मंदिर समूह देखील आहे. नेमिनाथ, आदिनाथ, मल्लिनाथ आणि इतर तीर्थंकरांची मंदिरे आहेत.  कुठे आहे गिरनार ? गुजराथ, सौराष्ट्र मधील जुनागढ जवळ गिरनारच्या पायथ्याचे, तलेटी नावाचे गाव आहे.  गिरनारला लोक का जातात? तेथील द...

हिंदवी स्वराज्याची राजधानी - किल्ले रायगड

रायगड! हे नाव घेताच मनात उठणारे भावतरंग अवर्णनीय असेच असतात. ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी म्हणजे 'शिव राज्याभिषेक दिन', 'हिंदू साम्राज्य दिन'. अभिमानाचा, गौरवाचा दिवस. भारतीय इतिहास हा संघर्षाचा व विजयाचा आहे. त्यातील झळाळून उठणारे तेजस्वी, सोनेरी पान म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे कर्तृत्व! शिवाजी महाराज आणि त्यांच्या मावळ्यांचे अविश्रांत परिश्रम पूर्णत्वाला पोचले ते ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी, १६७४ ह्या दिवशी. हा केवळ राज्याभिषेक नव्हता. हिंदवी स्वराज्याची स्थापना झाल्याची केवळ अधिकृत घोषणा नव्हती. तर संतांच्या उपदेशांनी जागलेली सज्जन शक्ती, मावळ्यांच्या रूपातील सामान्य जनतेच्या मनात जागलेली वीरवृत्ती ह्यांच्या संगमाने घडलेला तो एक अभूतपूर्व अविष्कार होता. राज्याभिषेक ही शिवाजी महाराजांची व्यक्तिगत महत्वाकांक्षा नव्हती. रोहिडेश्वर येथे लहानपणी घेतलेली प्रतिज्ञा अथक प्रयत्नांनी पूर्ण झाली होती. "हे हिंदवी स्वराज्य व्हावे हे तो श्रींची इच्छा" हे वचन सार्थ झाले होते. पण राज्याभिषेकाच्या निमित्ताने शिवाजीमहाराजांनी मोठ्या युक्तीने त्यांच्यावर असलेली लोकांची निष्ठा सिंहा...

परशुराम कुंड, अरुणाचल.

अरुणाचल मधील टेंगापानी, नामसाईच्या गोल्डन पॅगोडाहुन परशुराम कुंड ला जाण्यासाठी  आम्ही निघालो. ही गोष्ट आहे ऑक्टोबर २०१९ मधील.  त्या दिवशी सतत पाऊस पडत होता. सगळीकडे हिरवेगार तर अरुणाचल मध्ये नेहमीच असते. पावसात भिजलेली झाडे, स्वच्छ हिरवळ, मध्येच ढगांत अदृश्य होणाऱ्या पर्वतरांगा, वाहणारे थंडगार वारे, फार सुंदर होते ते सगळे.  अरुणाचल  डोंगरातला रस्ता होता. तुफान वारा होता. त्या सगळ्या अवाढव्य डोंगराळ प्रदेशात आमची गाडी म्हणजे एक ठिपका होती. वाऱ्याने उडून जायला वेळ लागणार नाही इतका जोरात वारा वाहत होता. एक खिडकी फोटो काढण्यासाठी उघडली तर ड्राइवर म्हणाला की दुसऱ्या बाजूची पण उघडा, नाहीतर आत आलेल्या वाऱ्याने गाडी हलायला लागेल. शेजारी खोल दरी दिसत असताना गाडी हलायच्या कल्पनेने अंगावर काटा आला आणि पहिली खिडकी देखील फोटो काढल्या काढल्या बंद केली..नकोच ती वाऱ्याची परीक्षा!  रस्ता कसा होता हे प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी पुढे दिलेल्या लिंकवर क्लिक करून विडिओ नक्की बघा. Namsai- Parshuram kund road ह्या नदीचे नाव लोहित आणि ह्या जिल्ह्याचेही नाव लोहित. लोहितचा अर्थ रक्त किंवा रक्...

सिद्धेश्वर मंदिर, टोके - प्रवरा संगमावर उमललेले दगडी बिल्वपत्र

भिंतीवरील कोरीवकाम  महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्ह्यातले टोके हे एक लहान गाव. अहिल्यानगर कडून छत्रपती संभाजीनगरला जाताना डावीकडे नदीच्या काठावर हे सुंदर मंदिर आपल्याला दिसते. जगप्रसिद्ध वेरूळ, अजिंठा लेणी बघायची असतील तर सांभाजीनगरला जावे लागते हे आपल्याला माहिती असेलच. सिद्धेश्वर मंदिर, टोके हे मला एखाद्या दगडी बेलपत्राप्रमाणे वाटले. हे बेलपत्र उमलले आहे अमृतवाहिनी प्रवरा आणि दक्षिणगंगा गोदावरीच्या संगमावर. त्या संगमाच्या, ज्याला प्रवरा संगम म्हणतात त्या परिसरात सिद्धेश्वर, घटेश्वर, मुक्तेश्वर, रामेश्वर, संगमेश्वर अशी अनेक मंदिरे आहेत. पण सर्वात खास आणि सुंदर आहे ते सिद्धेश्वर मंदिर. सिद्धेश्वर मंदिर परिसर बघा असा दिसतो! हा फोटो घेतला होता सप्टेंबर २०१९ मध्ये. पावसाळा भरपूर बरसून आता आपला मुक्काम आवरत होता आणि नद्यांना भरपूर पाणी होते तेव्हाचा! मंदिराचा परिसर  सिद्धेश्वर मंदिर समूह हा तुलनेने नवा समूह आहे, अठराव्या शतकात बांधला गेलेला. पेशव्यांच्या काळात बांधल्या गेलेल्या ह्या मंदिराला सभोवताली एखाद्या छोट्या किल्ल्यासारखी किंवा गढीसारखी उंच भिंत आहे. मुख्य मंदिर आहे शंकराचे...