Skip to main content

ग्यानबोक पॅलेस, सेऊल, साऊथ कोरिया

राष्ट्रीय अस्मितेची चिन्हे परकीय आक्रमक पुसून टाकायचा प्रयत्न करतात, करतातच. जगभर अशी असंख्य उदाहरणे सापडतील. कारण त्याशिवाय त्यांना त्यांची सत्ता निर्माण करता येणार नसते. पण मग त्या त्या देशातील, देशावर प्रेम असणारे लोक काय करतात हे जाणून घ्यायचे असेल तर एक उदाहरण सांगते. आपल्याला सेऊल मधील ग्यानबोक पॅलेस याच्याविषयी वाचायला हवे.

-------------

तसा पोचायला आम्हाला थोडा उशीरच झाला होता. शेवटची इंग्लिश गाईडेड टूर चुकते की काय अशी भीती वाटायला लागली होती. अनेक कोरियन युवक युवती राजवाड्याकडे जाताना दिसत होते. विशेष म्हणजे त्यांनी पारंपरिक कोरियन पोशाख घातले होते. फार छान दिसत होते ते सगळे. आम्ही गेलो होतो, कोरियाच्या सार्वभौमत्वाचे मानचिन्ह असलेल्या ग्यानबोक पॅलेसला ( Gyeongbok Palace ) भेट देण्यासाठी. 

तिकिटाच्या काउंटर जवळच राजवाड्याचे मुख्य प्रवेशद्वार आहे. त्याचे नाव आहे ग्वान्गमन गेट.(Gwanghwamun). सेऊलच्या पुरातन इतिहासाचे प्रतीक असलेले हे प्रवेशद्वार १३९५ मध्ये बांधले गेले आहे. आज हे प्रवेशद्वार कोरियाची ओळख बनलेले आहे. कोरियाच्या वास्तुशास्त्राप्रमाणे, कोरियाची भरभराट व्हावी म्हणून, राजाने राजवाड्यात कोणत्या दिशेने आत शिरायला हवे? आत शिरताच त्याच्या नजरेला काय काय दिसायला पाहिजे, कोणत्या दिशेला दिसायला पाहिजे? हे लक्षात घेऊन हे प्रवेशद्वार बांधले गेले होते. 

मुख्य प्रवेशद्वारातून आज जाताच नजरेला त्या राजवाड्याची भव्यता दिसते, विस्तार दिसतो आणि त्या मागे असलेल्या पर्वतरांगाही दिसतात. 


ग्यानबोक पॅलेस
ग्यानबोक पॅलेस
हानबोक - पारंपारिक पोशाख   
हानबोक - पारंपारिक पोशाख   
प्रवेशद्वारातून आत जाताच उजवीकडे इंग्लिश टूरची गाईड हातात झेंडा घेऊन उभी होती. तिने माहिती सांगायला सुरुवात केली. साऊथ कोरियाची राजधानी सेऊल आणि आसपासच्या परिसरात पाच भव्य राजवाडे बांधले गेले. त्यातील हा सर्वात मोठा आणि सर्वात सुंदर राजवाडा. या राजवाड्याचा परिसर 46 लाख स्क्वेअर फूट क्षेत्रफळाच्या जमिनीवर उभा राहिलेला आहे! चोसान डायनेस्टी ( Joseon Dynasty) स्थापन होताच लगेचच बांधला गेलेला हा राजवाडा कोरियाच्या इतिहासाचे अभिमानचिन्ह आहे. कोरियन सार्वभौमतेचे, कोरियन अस्मितेचे चिन्ह असलेला असा हा राजवाडा.
राजवाड्यातल्या पहिले द्वार पार करताच आपल्याला एक पूल दिसतो. एकुणातच ह्या राजवाड्यातील पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे! सध्या पुलाखाली फारसे पाणी नाही पण बाजूला झाडे मात्र फार छान लावलेली आहेत. ती झाडे आहेत चेरी ब्लॉसमची. गाईडने सांगितले हा साकुरा ( जपानी चेरी ब्लॉसम) नाही, कोरियन चेरी ब्लॉसम आहे. त्याला कोरियन भाषेत बॉक्कोत ( Beot -kkot )म्हटले जाते. ती झाडे अजून लहान असल्याने अजून बहरली नव्हती. मला थोडे नवलच वाटले की सेउल मधले सर्वात मोठे पर्यटन स्थळ असलेला हा राजवाडा आणि इथे का बरे ही नवी झाडे असतील? जुन्या झाडांना/ झाडांचे काय झाले असेल? कदाचित फार जुनी झाल्याने वाळवी लागली असेल. मनात असा विचार करत करत मी पुढे निघाले. 
राजवाड्यात अनेक इमारती आहेत. काही अगदी पुरातन तर काही तुलनेने खूपच चांगल्या स्थितीत असलेल्या अशा ह्या इमारती कोरियन वास्तु रचनेला अनुसरून बांधलेल्या आहेत.

ग्यानबोक पॅलेस

एक मुख्य दरबार हॉल आहे जिथे राजा त्याच्या सरदारांना भेटून देशाच्या कारभाराविषयी चर्चा करत असे. तसेच काही राष्ट्रीय महत्वाची घोषणा असेल तर ती देखील याच हॉलमधून व्हायची. याच हॉलमध्ये आपल्याला राजाचे सिंहासन देखील बघायला मिळते. 

सिंहासन 


नक्षीदार छत 

दुसऱ्या एका इमारतीत आपल्याला आधीच्या दरबार हॉलच्या तुलनेने थोडा साधा हॉल बघायला मिळतो. इथे राजा त्याच्या खास सरदारांना भेटत असे. हा सगळा परिसर अतिशय भव्य आहे आणि एक विशेष गोष्ट म्हणजे काही विशेष प्रसंगी या मैदानावर जेव्हा सरदारांना उभे राहायचे असेल तेव्हा त्यांना आपली उभे राहण्याची जागा कळावी म्हणून आपल्याकडे पूर्वी मैलाचे दगड असत तसे दगड, त्या त्या पदाचे नाव असणारे असे, उभारलेले आहेत. अशा रँक स्टोन्सच्या दोन लांब रांगा आपल्याला पाहायला मिळतात. इथे माणसाच्या नावाऐवजी त्या त्या पदाचे नाव घातलेले आहे. माणूस महत्वाचा नाही, त्याच्यावर असणारी जबाबदारी महत्वाची. माणसे येतील जातील, राज्यकारभार चालूच राहील असाच जणू संदेश देणारी ही रचना आहे.

रँक स्टोन्स 
मुख्य भागात असलेल्या इमारती ह्या खासे मंडळींच्या निवासस्थानांच्या आहेत. राजाची राहायची जागा, मुख्य राणीची राहायची जागा वेगवेगळी, राजपुत्राची वेगळी आणि राजमातेची वेगळी. ह्या चारी स्वतंत्र स्वयंपूर्ण इमारती तुलनेने एकमेकांच्या जवळ जवळ आहेत.

ग्यानबोक पॅलेस
ग्यानबोक पॅलेस


ह्या इमारतींमध्ये, प्रत्येक इमारत म्हणजेच एक राजवाडा वाटेल इतक्या खोल्या आहेत. ह्या सगळ्या राहण्याच्या जागांचे जोते उंच केलेले आहे व त्या खालून वाफेद्वारे जमीन तापवण्याची सोय केलेली आहे. त्यामुळे सेऊल मधील कडाक्याच्या थंडीतही ह्या खोल्या उबदार राहतील.

 धूर बाहेर जावा म्हणून जी चिमणी केलेली आहे तिच्या भिंतीवर कोरियन मान्यतेनुसार शुभ चिन्हे कोरलेली आहेत. अक्षय तारुण्य दर्शवणारे पाईन वृक्ष, हरीण, कासव आणि औषधी वनस्पती आहेत. दीर्घायुष्य दर्शवणारा सारस पक्षी आहे. संपत्तीचे प्रतीक असणारे वटवाघूळ आहे, दुष्ट शक्तीपासून वाचविणाऱ्या देवी देवता आहात.


शुभचिन्हे 


याखेरीज बाकी राण्या किंवा जो राज्यावर बसणार आहे त्या राजपुत्राखेरीज बाकी सगळे राजपुत्र यांच्या राहण्याच्या जागा थोड्या बाहेरच्या बाजूला आणि एका इमारतीत अनेक जणांची राहायची सोय असावी तश्या आहेत.

ह्या सर्व इमारतींपासून थोडे दूर राजाच्या राज्यकारभाराच्या जागा, खास लोकांना भेटायची जागा अशा सगळ्या इमारती आहेत. राजघराण्याची वाचनालयाची देखील एक सुंदर इमारत आहे. 

राजवाड्याच्या परिसरात अनेक सुंदर व वैशिष्ट्यपूर्ण उद्याने आहेत. काही तळी आहेत. एका मानव निर्मित तळ्यात Gyeonghoeru नावाची इमारत आहे. प्रचंड मोठ्या दगडी खांबांवर अत्यंत सुंदर लाकडी इमारत. शोभिवंत फुलझाडे, तळ्यातील नितळ पाणी, मागे दिसणारा पर्वत ह्या साऱ्यामुळे सर्वच परिसर अतिशय नयनरम्य आहे. ह्या इमारतीत शाही मेजवान्या होत असत. 

Gyeonghoeru
Gyeonghoeru

Gyeonghoeru

एखाद्या वास्तूने किती धक्के सहन करावेत? किती उतार चढाव पाहावेत? किती जखमा सोसाव्यात? मूळात मुख्य राजवाडा चोसान डायनेस्टी चा म्हणून १३९५ मध्ये बांधला गेला, त्यावेळी वैभवाने मिरवत राहिला. पंधराव्या शतकात एकदा आगीमुळे तर उरलेला १५९५ मधील जपानच्या आक्रमणांमुळे उध्वस्त झाला. नंतर मग दोन शतके राजवाडा नांदता झाला नाही. पण मग एकोणिसाव्या शतकात मात्र तो परत एकदा राजवाडा म्हणून उर्जितावस्थेत आला. थोड्या थोडक्या नाही तर जवळपास आठ हजार खोल्या आणि पाचशे इमारती पुनरुज्जीवित करण्यात आल्या. राजवाड्याचे वाईट दिवस संपले असे सगळ्यांना वाटले असेल पण ते समाधान क्षणभंगुर होते.

जपानी, चिनी आणि रशियन लोकांनी सतत कोरियाच्या राज्यकारभारावर वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न केला. ह्याच वर्चस्वाच्या चढाओढीत Empress Myung-Sung जिला Queen Min असे देखील म्हंटले जाते, तिचा 1895 मध्ये याच राजवाड्यात खूनही झाला. जपानी सैनिकांनी पद्धतशीरपणे योजना आखून हे घडवून आणले होते असे म्हणतात.

जपानने जेव्हा कोरियावर कब्जा केला तेव्हा कोरियन लोकांचा मानबिंदू असलेला हा राजवाडा, वेगवेगळ्या प्रदर्शनांची जागा आणि शासकीय इमारतींचे स्थान म्हणून वापरला गेला. एवढेच नव्हे तर आमच्या बरोबरचा एक जण म्हणाला की तिथे जपानी लोकांनी एका कोपऱ्यात झु देखील केले होते. जी जागा सामान्य लोकांना पाहायला देखील मिळणे कठीण, अशी जागा सर्रास अनेकांच्या पायाखाली तुडवली जाईल अशी व्यवस्था जपान सरकारने केली. 

राजवाड्यातील आधीच्या बागा काढून टाकून तिथे जपानी वनस्पती लावल्या गेल्या, ज्यायोगे शासनकर्त्या जपानी अधिकाऱ्यांना त्यांच्या सवयीचे दृश्य दिसू शकेल. त्याच वेळी कोरियन चेरी ब्लॉसम काढून टाकून जपानी चेरी ब्लॉसम लावला गेला होता. 

राजवाड्याची ओळख असलेले, कोरियाची भरभराट व्हावी म्हणून, कोरियन वास्तुशास्त्राप्रमाणे बांधले गेलेले राजवाड्याचे प्रचंड मोठे मुख्य प्रवेश द्वार देखील त्याच्या मूळ जागेवर हलवून दुसरीकडे नेले गेले. 

सर्वसाधारणपणे सगळे आक्रमक राज्यकर्ते, दुसऱ्यांच्या देशात आपले शासन स्थापित करण्यासाठी जे करतात तेच जपानी लोकांनी अधिक आक्रमकतेने केले. कोरियन लोकांची अस्मिता नष्ट व्हावी, त्यांची स्वतःची कोरियन म्हणून असलेली ओळखच ते विसरून जावेत याचा पूर्ण प्रयत्न जपानी शासकांनी केला. 
जे जे कोरियन संस्कृतीनुसार केलेलं होतं ते ते सगळं बदलून टाकलं अगदी प्रवेशद्वारासकट. प्रत्येक वेळी ह्या राजवाड्याची आठवण आली, राजवाडा दिसला की प्रत्येक कोरियन माणसाला आता आपण जपानच्या अधिपत्याखाली आहोत ह्याची जाणीव व्हायलाच हवी, अशी सर्व मोड तोड, बदल केले. 

त्याचाच एक भाग म्हणून कोरियाची राजभाषा जपानी केली गेली. कोरियन लोकांना त्यांची कोरियन आडनावे सोडून जापनीज आडनावे घेण्याची सक्ती केली गेली. शाळांमधून जुनी कोरियन लिपी आणि कोरियन इतिहास शिकवायला बंदी केली गेली.

कोरियन चेरी ब्लॉसम गेला, जापनीज आला. कोरियन भाषा गेली आणि जपानी आली. राजवाड्यातील कोरियन इमारती गेल्या आणि तिथे जपानी शासकांच्या कार्यालयांच्या, प्रदर्शनांच्या, त्यांच्या निवास स्थानांच्या इमारती आल्या. राजवाड्याच्या जमीनीची मालकी देखील जपानी गव्हर्नर जनरल कडे देण्यात आली. 


जपानने केले त्यात विशेष वेगळे काही नाही. सगळे आक्रमक असेच करतात. पण आता कोरिया आपली संस्कृती पुनरुज्जीवित करण्यासाठी जे प्रयत्न केलेले आहेत, करते आहे ते मात्र विशेष उल्लेखनीय आहेत.

मी सुरुवातीला लिहिले होते की पारंपरिक कोरियन पोशाख ( Hanbok ) घातलेले अनेक तरुण-तरुणी राजवाड्याकडे जाताना दिसत होते. त्याचे कारण म्हणजे कोरियाच्या सरकारने असे जाहीर केलेले आहे की जर का तुम्ही पारंपरिक कोरियन पोशाखात असाल तर तुम्हाला राष्ट्रीय स्मारकात येताना प्रवेश फी भरावी लागणार नाही! या आमिषामुळे म्हणा किंवा उत्तेजनामुळे म्हणा, अनेक कोरियन तरुण-तरुणी, जे एरवी अत्याधुनिक पोषाखात असतात ते, अशा ठिकाणी येताना पारंपारिक पोशाखात येत असतात. त्यांची फोटोसेशन तिथे चालू असतात. आपण अगदी इतिहासकाळात आहोत असेच ते पोशाख बघून वाटत असते. 


जपानी सरकारने राजवाड्याचे मुख्य प्रवेश द्वार मूळ जागेपासून हलवले होते ते आता परत मुळ जागी आणले गेले आहे. राजवाडा मूळ रूपात परत आणण्याचा एकूण चाळीस वर्षे चालणारा असा हा भव्य प्रकल्प हातात घेतला गेलेला आहे. 

जपानी राजवटीची आठवण करून देणारी इथली जपानी प्रशासकीय इमारत पाडली गेली. इमारत काही लहान-सहान नव्हती. जवळपास आपल्या संसदेइतकी मोठी आणि देखणी इमारत होती ती. पण ती पाडली गेली. ह्या आवारातील इतर सर्व जपानी इमारती देखील पाडल्या गेल्या. जुने नकाशे तसेच उपलब्ध असलेली छायाचित्रे बघून कोरियन वास्तू शास्त्राप्रमाणे, पूर्वी होत्या तशाच इमारती पुन्हा बांधण्याचे काम सध्या चालू आहे. 

ह्या राजवाड्यातील जपानी चेरी ब्लॉसम काढून टाकून तिथे कोरियन चेरी ब्लॉसम लावला गेला आहे. कोरियन लिपी पुनरुज्जीवित केली गेली आहे. 

आम्ही २०१९ मध्ये गेलो तेव्हाही राजवाड्यात थोडे काम चालूच होते. पण ते सर्व काम पूर्ण झाले आहे असे दोन तीन वर्षांपूर्वी बातम्यात वाचल्याचे आठवते.

दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी लक्षावधी कोरियन लोकांना पुरुषांना जपानी सैन्यात भरती केले गेले आणि लढायची सक्ती केली गेली. अक्षरशः दोन पिढ्या यात संपूर्ण गारद झाल्या. कोरियन महिलांवर तर मरण बरे असा प्रसंग ओढवला. कारण त्यांना जपानी सैनिकांच्या कम्फर्ट वूमन म्हणून सेक्स वर्करचे काम करावे लागले. त्यांच्या घरातून, गावातून पळवून नेलेल्या या स्त्रिया इतक्या अनन्वित अत्याचारांना बळी पडल्या की युद्धानंतर ना त्या घरी परतल्या, ना त्यांच्या कुटुंबाने समाजापुढे त्यांची ओळख उघड केली. अनेक वर्षे, आपली काहीही चूक नसताना त्यांनी अज्ञातवासात, विपन्नावस्थेत, रोगांशी झुंज देत काढली. अगदी अलीकडे 2015 साली जपानने आपली चूक कबूल करून, कोरियन कम्फर्ट वुमन्स च्या कल्याणासाठी एक बिलियन येन देऊ केले व त्यांची जाहीर माफी मागितली. 


साऊथ कोरिया आपली छिन्नविछिन्न झालेली संस्कृती आणि देशाची मानचिन्हे आता पुनर्स्थापित करत आहे. साऊथ कोरियाची गेली सत्तर वर्ष शांततेची नव्हतीच. अनेकदा राजवट बदलली. राजवट बदलली गेली पण कोणतीही राजवट आली तरी आपली संस्कृती पुनर्स्थापित करण्याचे प्रकल्प स्थगित किंवा रद्दबातल केले गेले नाहीत हे विशेष आहे. 

या एकजुटीमुळे, देशाचे भले कशात आहे याविषयीची निखळ दृष्टी असल्याने, सर्व आव्हानांवर मात करत आज कोरिया जगात एक बलाढ्य शक्ती म्हणून मानला जात आहे. 

अनेक वर्षांच्या परकीय राजवटीनंतर, दुसऱ्या महायुद्धातील आघातानंतर, शिवाय एकोणीसशे पन्नास-पंचावन्नमधला दोन कोरियातील लढा व त्यानंतर झालेले अनेक उठाव, राजवटीतील बदल, संघर्ष, निदर्शने, हरताळ, त्रस्त करणारा भ्रष्टाचार या सगळ्याला तोंड देऊन आज साऊथ कोरिया जगातील एक आघाडीचे प्रगत राष्ट्र म्हणून उदयास आलेला आहे. 

 तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात तर कोरिया अव्वल स्थानावर आहे. कोरियन सौंदर्यप्रसाधने आणि वस्त्रे आज जगभरातील चोखंदळ रसिकांना हवीहवीशी वाटत आहेत. कोरियन संगीत, टीव्ही सिरीयल्स आणि चित्रपट जगभरात गाजत आहेत. क्‍लिष्ट मानवी स्वभावाची व वागणुकीची कोरियन दृष्टीने मीमांसा करणारा पॅरासाईट नावाचा चित्रपट इतिहास घडवून गेला आहे. आत्तापर्यंत अनेक आंतरराष्ट्रीय महोत्सवातून पारितोषिके मिळवलेल्या ह्या चित्रपटाने २०२०च्या अकॅडमी अवॉर्ड्स सोहळ्यात अनेक नामांकने, अनेक पारितोषिके तर मिळवलीच पण परकीय भाषेतला असूनदेखील उत्तम चित्रपटाचे पारितोषिक मिळवणारा गेल्या 93 वर्षातला तो पहिला चित्रपट ठरला. आत्तापर्यंत इंग्रजी खेरीज इतर कोणत्याही भाषेतल्या चित्रपटाला हे पारितोषिक मिळालेले नव्हते.

 कोरियाची सर्वच क्षेत्रातील नेत्रदीपक प्रगती ही कोरियाने आपली संस्कृती पुनर्स्थापित करण्याच्या प्रयत्नाला मिळालेली दाद आहे, एक शुभचिन्ह आहे. मूळांकडे परत जाताना आकाशाला घातलेली गवसणी आहे. आपली पुरातन संस्कृती, आपली मानचिन्हे ह्यांचा बळी न देताही प्रगती साधता येतेच ह्याची खूणगाठ आहे. 


ग्यानबोक पॅलेस
ग्यानबोक पॅलेस

(हा लेख संक्षिप्त स्वरुपात चैत्रेय २०२० मध्ये प्रकाशित झाला होता. )

#Seoul #Gyeongbokgung #South Korea #Japanese Invasion 

Comments

Popular posts from this blog

महेश्वर

महेश्वर हे मध्यप्रदेश पर्यटन निगमच्या पर्यटन स्थळांमधले एक महत्वाचे नाव आहे. पण करोडो भारतीयांसाठी ते केवळ एक पर्यटन स्थळ नाही तर एक तीर्थस्थान असते. लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या वास्तव्याने पुनीत झालेले स्थान आहे.  महेश्वर किल्ला प्रवेशद्वार  राजवाडा प्रवेशद्वार  बाह्यरूप  पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर  राजवाडा प्रवेशद्वार  अहिल्याबाई होळकर हे केवळ भारताच्याच नव्हे तर विश्वाच्या इतिहासातील एक सोनेरी पान. संपूर्ण मानव विश्वातील यशस्वी स्त्री राज्यकर्त्यांची सूची करायची झाली तर अहिल्याबाई होळकरांचे नाव ठळकपणे लिहायला लागेल.   31 मे 2025 ला त्यांची तीनशेवी जयंती आहे. पण 300 वर्षांपूर्वी होऊन गेलेल्या अहिल्याबाईंचे आयुष्य अगदी आजच्या आधुनिक काळातल्या आव्हानातही मार्गदर्शक ठरावे असेच आहे.  त्यांच्याविषयीचा आदर मनात घेऊनच आपण महेश्वरला जातो आणि त्या भावनेच्या प्रकाशात महेश्वर पाहतो. महेश्वरला फार मोठी प्राचीन परंपरा आहे. स्कंद पुराणाच्या रेवा खंडात आणि वायू पुराणाच्या नर्मदा रहस्य मध्ये महिष्मती म्हणजे महेश्वरचे वर्णन आलेले आहे. 'गुप्...

सोमनाथ - प्रभास पट्टण.

१९४७चे दीपावली पर्व. स्थळ होते सिंधुसागराच्या तीरावर असलेल्या सोमनाथ मंदिराच्या अवशेषांचे प्रवेशद्वार. तिथे उभे राहून सरदार वल्लभभाई पटेल यांनी दृढनिश्चय व्यक्त केला की भारतीय जनता आपले आराध्य दैवत असलेल्या सोमनाथ मंदिराला त्याची पूर्व प्रतिष्ठा आणि पूर्व वैभव प्राप्त करून देईल.  काय कारण होते ह्या प्रतिज्ञेचे? जर भारतीय जनतेचे आराध्य दैवत होते सोमनाथ तर आता मंदिराचे अवशेषच का उरले होते?  ह्या साठी आपल्याला जाणून घ्यावे लागेल सोमनाथ मंदिराच्या इतिहासाविषयी आणि सोमनाथच्या हिंदू जनमानसातील स्थानाविषयी.  हिंदूंन पूजनीय असलेल्या बारा ज्योतिर्लिंगापैकी सर्वात पहिले नाव असलेल्या आणि प्रथम स्थानी असलेले सोमनाथ. आपल्या सर्वाना माहिती असलेल्या स्तोत्राची सुरुवातच होते ती 'सौराष्ट्रे सोमनाथंच' पासून. त्यामुळेच त्याला 'आदि ज्योतिर्लिंग' म्हणून ओळखले जाते.  ऋग्वेदात तसेच अनेक पुराणात ज्याचा उल्लेख झाला आहे असे हे तीर्थधाम. ह्याविषयी आपल्याला अनेक कथा सापडतात.  शतकानुशतकांच्या मंदिराच्या इतिहासात नैसर्गिक रित्या पडझड झाल्यानंतर ते अनेक राजांकडून, भक्तांकडून सोने, च...

गणपतीपुळे

कोकणच्या निसर्गाविषयी किती आणि कितीदाही लिहिले तरी कमीच आहे. कोकणातल्या नारळी पोफळीच्या वाड्या, आंब्याची फणसाची झाडे, केळीच्या बागा, कौलारू घरे ह्यांनी नटलेली धरती, सोनचाफा बकुळीच्या सुगंधाने घमघमणारा आसमंत आणि कानावर येणारी समुद्राची गाज सारेच कसे मन प्रसन्न करणारे असते.  चराचरात वसणारा परमतत्वाचा अंश ह्या भूमीत प्रकर्षाने प्रत्ययाला येतो. ह्या भूमीत अनेक देवस्थाने नसती तरच नवल होते. ह्या देवस्थानांच्या जागा विलक्षण सुंदर आहेत. गणपतीपुळे हे असेच एका सुंदर स्थानी वसलेले श्री गणेशाचे स्वयंभू मंदिर. सिंधुसागराचा किनारा, चमकदार वाळूची पुळण आणि पाठीमागे गार्ड हिरव्या वनराईने झाकलेला डोंगर असे ह्या मंदिराचे नयनमनोहर ठिकाण आहे.  श्री गणपतीपुळे देवस्थान  ह्या स्वयंभू मूर्तीचा दृष्टांत पाचशे वर्षांपूर्वी भिडे गुरुजींना झाला. तिथे त्यांनी साधे गवताचे छप्पर उभारून पूजेला सुरुवात केली. त्यांची समाधी आपल्याला मंदिराच्या आवारातच बघायला मिळते.  समाधी  पुढे मग वेळोवेळी निरनिराळ्या भक्तांनी ह्या वास्तूची पुनर्बांधणी आणि दुरुस्ती केली. छत्रपती शिवाजी महाराजांचे सचिव अण्णाजी दत्त...

श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे जन्मस्थान - बर्वेवाडा, डुबेरे

काल दिनांक १८ ऑगस्ट २०२५. श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे ह्यांची ३२५ वी जयंती. श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे पुतळा, बर्वेवाडा श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे पुतळा, बर्वेवाडा श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे पुतळा, बर्वेवाडा आता बाजीराव म्हटले की केवळ बाजीराव मस्तानीच आठवणाऱ्या लोकांसाठी बाजीराव कोण ते सांगायला हवे. छत्रपती शिवाजी महाराजांनी पाहिलेले हिंदवी स्वराज्याचे स्वप्न प्रत्यक्षात जगणारे आणि हिंदवी साम्राज्य निर्माण करणारे बाजीराव बाळाजी पेशवे/ विश्वनाथ बल्लाळ भट हे शाहूछत्रपतींचे पेशवे म्हणजेच पंतप्रधान होते.  आपल्या वीस वर्षांच्या पेशवे म्हणून कारकीर्दीत ते चाळीसहून अधिक लढाया लढले आणि त्या सर्व लढायांत ते अजिंक्य राहिले. त्यांनी आपल्या कर्तृत्वाने मराठ्यांचे वर्चस्व अखंड भारतावर प्रस्थापित केले.  त्यांचा जन्म १८ ऑगस्ट १७००, भाद्रपद पौर्णिमा ह्या दिवशी डुबेरे येथे झाला. डुबेरे आजच्या सिन्नर तालुक्यात नाशिक जिल्ह्यात आहे.  ह्या गावी बाजीरावांच्या मातोश्री राधाबाई ह्यांचे भाऊ मल्हारराव बर्वे राहत असत. त्या बर्वे वाड्यात बाजीरावांचा जन्म झाला.  बर्वे वाडा  अवघ...

कवी केशवसुत स्मारक, मालगुंड

एका कवीचे स्मारक असावे आणि तेही कवीला साजेसे असावे ही दुर्मिळ गोष्ट आहे! पण असे एक स्मारक आपल्या महाराष्ट्रात आहे. रत्नागिरीजवळ मालगुंड येथे कवी केशवसुत म्हणजेच कृष्णाजी केशव दामले ह्यांचे एक सुंदर स्मारक उभारले आहे.  कवी केशवसुत जन्मस्थान  मार्गावरील फलक  प्रवेशद्वारातून दिसणारे दृश्य  कोकण मराठी साहित्य परिषदेने ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री मधू मंगेश कर्णिक ह्यांच्या संकल्पनेला प्रत्यक्षात उतरवले आहे.  एखाद्या कवीचे स्मारक कसे असावे हे एखाद्या साहित्यिकालाच चांगले कळू शकणार! स्मारकाच्या प्रवेशद्वारातून आपण आत गेलो की समोरच दिसते ते केशवसुत जन्मस्थान. हे जुने घर डागडुजी करून नीटनेटके ठेवले आहे. पडवीत मोठा झोपाळा आहे.  कवीच्या घरात कवीचे पुस्तक वाचताना  तिथेच केशवसुतांची काही पुस्तके तसेच को.म.सा.प.ची काही प्रकाशने विक्रीसाठी उपलब्ध आहेत.  घरातील आतल्या खोल्या तशा रिकाम्याच आहेत. काही थोडे जुने सामान तिथे ठेवले आहे .  माजघर  घराच्या मागच्या बाजूला कवीचे खरे स्मारक आहे. केशवसुतांनी त्या काळात म्हणजे दीडशे वर्षांपूर्वी कवितेत नवा प्रवाह आणला...

लक्ष्मीकेशव मंदिर, कोळीसरे

  मंदिर म्हणजे एक उर्जाकेंद्र! प्राचीन काळापासून भाविक मंदिरात देवतांच्या दर्शनासाठी जात आले आहेत. आजही हिंदू लोक मंदिरात जाऊन, चित्त एकाग्र करून ध्यान, पूजा आणि आरती करतात. यामुळे त्यांना ऊर्जा आणि शांततेचा अनुभव मिळतो. प्रत्येक देवी-देवतेचे एक विशिष्ट मंदिर असते.  असेच कोळीसरे येथे श्री विष्णूचे - लक्ष्मीकेशवाचे सुंदर मंदिर आहे . रत्नागिरी शहरापासून फक्त ५० किलोमीटर अंतरावर किंवा गणपती पुळ्यापासून २१ किलोमीटर अंतरावर निसर्गसुंदर कोळीसरे गाव आहे. पुणे मुंबई हून रत्नागिरी जिल्ह्यातील कोळीसरे येथे जायचे असल्यास चिपळूण मार्गे जाता येईल. परशुराम - कोळीसरे रस्त्यात अशी नयनरम्य दृश्ये अनेकदा दिसतात. परशुराम कोळिसरे रस्ता अगदी कमी लोकवस्तीचे, घनदाट झाडी असलेले हे गाव कोळीसरे फाट्याहून आत गेल्यावर दीड दोन किलोमीटर प्रवास केल्यावर येते. रत्नागिरीहून बसने जाता येते अन्यथा मंदिरापर्यंत पोचण्यासाठी स्वतःचे वाहन असणे सोयीचे आहे.  गाडी पार्क केल्यानंतर काही पायऱ्या उतरून मग घनदाट झाडीत वसलेल्या ह्या मंदिरात जाता येते. ह्या रस्त्यावरून व्हील चेयर जाउ शकत नाही. पार्किंग पासून उ...

'कड्यावरचा गणपती.' - आंजर्ले

कोकण सुंदर आहेच. कोकणावर निसर्गाची अपरंपार कृपा आहे. काय नाही कोकणात? डोंगर, दऱ्या, नद्या, समुद्र, नारळीपोफळीच्या वाडया, आंब्या फणसाची झाडे, केळीच्या बागा हे तर आहेच. इतर फुलेही कोकणच्या मातीत जास्तच बहरतात. बकुळ, चाफ्याचे सगळे प्रकार, जास्वंद किती नावे लिहावीत!! कौलारू घरे, लाल मातीचे रस्ते, ताजा खवलेला नारळ घातलेले अवीट चवीचे खाद्यपदार्थ .. कोकणांत जायची किती कारणे हवीत अजून?  ह्या सोबत किंवा खूप जणांसाठी ह्याच्याही आधी कोकणात जाण्याचे महत्वाचे कारण असते ते म्हणजे तेथील मंदिरे. तर आज आपण आंजर्ले येथील एक मंदिर  पाहणार आहोत.  दापोली, गुहागर,आंजर्ले हा सगळा परिसर तर निसर्गसौंदर्याने नटलेला आहे. शहरीकरण, पर्यटकांची अमर्याद संख्या, गल्लोगल्ली झालेले होमस्टे, रिसॉर्ट्स आणि खानावळी इतके सगळे पचवून सुद्धा अजूनही  इथले वातावरण फार सुखद आहे.  रत्नागिरी जिल्ह्यात दापोलीजवळ आंजर्ले गाव आहे. त्या गावाच्या जवळ एका डोंगरावर असलेले मंदिर म्हणजे  'कड्यावरचा गणपती.'  पूर्वी पायऱ्या चढून जाणे हा एकमेव मार्ग होता.  आता चारचाकी गाडी सुद्धा आरामात मंदिरापर्यंत जाऊ श...

Prashanti Kutiram, Bangalore

I am happy to write my first post of 2022!! I am here with a really very special post! This is not a tourist place and still it holds a special place in each and every visitor’s mind. This is Prashanti Kutiram of Bangalore. Prashanti kutiram as the name suggests, surely makes your mind peaceful. It's around 70-80 kms from Bangalore airport but with the famous traffic jams of Bangalore, it may take two and half hours by taxi.  This is the place where The Swami Vivekananda Yoga Anusandhan Sansthan is situated on a sprawling 100 acres. Swami Vivekanand  Swami Vivekanand  Ramakrishna Paramahans and Sharada Mataji  SVyasa Founded in 1986, Svyasa follows Swami Vivekanand's teachings and combines best of east and West. So it combines Yoga and spirituality with modern sciences.  The first thing you will notice about Vyasa is the greenery. The campus is having umpteen trees. It's hilly area. The steep paths and slopes offer you the much needed exercise!! The Green Umbre...

नागाव

  नागाव म्हणजे माडापोफळींच्या वाड्या. नागाव म्हणजे केळीच्या बागा. नागाव म्हणजे सुंदर स्वच्छ समुद्रकिनारा.  नागाव म्हणजे वस्त्रगाळ मऊ वाळूचा किनारा.  नागाव म्हणजे अनेक मंदिरे. नागाव म्हणजे लक्षवेधी दीपमाळा. नागाव म्हणजे कोपऱ्या कोपऱ्यावर भेटणारे तळे! नागाव म्हणजे तळ्यात फुललेलीअनेकानेक कमळे!! नागावच्या शेजारचे  अक्षी, चौल, रेवदंडा ही देखील अशीच गावे. नितांतसुंदर, साधी. अलिबाग आणि ह्या सर्व गावांना मिळून अष्टागर असे म्हणत असत. आठ गावांचा समूह.  अलिबाग पर्यटन स्थळ म्हणून ७० च्या दशकापासूनच प्रसिद्ध झाले होते. तेव्हा शांत निवांत असलेले अलिबाग नंतर खूपच गजबजले आणि मग दुसऱ्या सहस्त्रकात अलिबागशेजारील रेवदंडा, नागाव, चौल ही लहान लहान गावे देखील पर्यटनस्थळे म्हणून विकसित होऊ लागली.  ह्या निवांत, शांत गावांना जणू अचानक खडबडून जाग आली. तिथेही पर्यटकांची गर्दी वाढू लागली. स्थानिक लोकांना रोजगार, विकासाची संधी, अर्थार्जनाची संधी त्यात दिसली.  गावांवर आधुनिक पेहराव चढला आणि तिथे उदयाला आली मुंबईकरांची आवडती पर्यटनस्थळे.  आता तर परिस्थिती अशी आहे की जवळ जवळ एका...

पैसाच्या खांबाचे मंदिर!

पैसाच्या खांबाचे मंदिर! अनेक वर्षांपूर्वी दुर्गा बाईंचे ' पैस ' हे पुस्तक वाचनात आले. त्यात होता हा पैसाचा खांब. पैस म्हणजे अवकाश. जिथे ज्ञानेश्वरी लिहिली गेली तो हा पैसाचा खांब. ज्ञानेश्वरीचे जन्मस्थान! खांबाला टेकून बसलेले, ज्ञानेश्वरी सांगत असलेले ज्ञानेश्वर आणि ती लिहून घेत असलेले लेखनिक सच्चिदानंद बाबा असे चित्र आधीही अनेकदा पाहिलेले होते. पण त्या खांबाला ' पैसाचा खांब' म्हणतात हे माहितीच नव्हते. पैस ह्या पुस्तकातील पैसाचा खांब हे प्रकरण वाचले आणि अक्षरशः थरारून गेले. 'पैसाच्या खांबाचे मंदिर' अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा या प्रवरा नदीच्या तीरावरील गावी आहे. नेवासे गावाच्या पश्चिमेला हे मंदिर आहे. 'शके बाराशे बारोत्तरे| तैं टीका केली ज्ञानेश्वरे| सच्चिदानंद बाबा आदरे| लेखकू जाहला|' असा उल्लेख सापडतो. मूर्त आणि अमूर्त ह्याची अशी जोडणी म्हणजे ज्ञानाच्या अनंत अवकाशात जाण्याची पहिली पायरीच जणू. ज्ञानेश्वरी वाचण्याएवढी आणि कळण्याएवढी योग्यता ह्या जन्मात अंगी येईल की नाही माहिती नाही. पण हा खांब पाहू या कधीतरी असे ठरवून टाकले. अवघड नव्हतेच जाणे. संभाजीनगर...