मुख्य सामग्रीवर वगळा

ग्यानबोक पॅलेस, सेऊल, साऊथ कोरिया

राष्ट्रीय अस्मितेची चिन्हे परकीय आक्रमक पुसून टाकायचा प्रयत्न करतात, करतातच. जगभर अशी असंख्य उदाहरणे सापडतील. कारण त्याशिवाय त्यांना त्यांची सत्ता निर्माण करता येणार नसते. पण मग त्या त्या देशातील, देशावर प्रेम असणारे लोक काय करतात हे जाणून घ्यायचे असेल तर एक उदाहरण सांगते. आपल्याला सेऊल मधील ग्यानबोक पॅलेस याच्याविषयी वाचायला हवे.

-------------

तसा पोचायला आम्हाला थोडा उशीरच झाला होता. शेवटची इंग्लिश गाईडेड टूर चुकते की काय अशी भीती वाटायला लागली होती. अनेक कोरियन युवक युवती राजवाड्याकडे जाताना दिसत होते. विशेष म्हणजे त्यांनी पारंपरिक कोरियन पोशाख घातले होते. फार छान दिसत होते ते सगळे. आम्ही गेलो होतो, कोरियाच्या सार्वभौमत्वाचे मानचिन्ह असलेल्या ग्यानबोक पॅलेसला ( Gyeongbok Palace ) भेट देण्यासाठी. 

तिकिटाच्या काउंटर जवळच राजवाड्याचे मुख्य प्रवेशद्वार आहे. त्याचे नाव आहे ग्वान्गमन गेट.(Gwanghwamun). सेऊलच्या पुरातन इतिहासाचे प्रतीक असलेले हे प्रवेशद्वार १३९५ मध्ये बांधले गेले आहे. आज हे प्रवेशद्वार कोरियाची ओळख बनलेले आहे. कोरियाच्या वास्तुशास्त्राप्रमाणे, कोरियाची भरभराट व्हावी म्हणून, राजाने राजवाड्यात कोणत्या दिशेने आत शिरायला हवे? आत शिरताच त्याच्या नजरेला काय काय दिसायला पाहिजे, कोणत्या दिशेला दिसायला पाहिजे? हे लक्षात घेऊन हे प्रवेशद्वार बांधले गेले होते. 

मुख्य प्रवेशद्वारातून आज जाताच नजरेला त्या राजवाड्याची भव्यता दिसते, विस्तार दिसतो आणि त्या मागे असलेल्या पर्वतरांगाही दिसतात. 


ग्यानबोक पॅलेस
ग्यानबोक पॅलेस
हानबोक - पारंपारिक पोशाख   
हानबोक - पारंपारिक पोशाख   
प्रवेशद्वारातून आत जाताच उजवीकडे इंग्लिश टूरची गाईड हातात झेंडा घेऊन उभी होती. तिने माहिती सांगायला सुरुवात केली. साऊथ कोरियाची राजधानी सेऊल आणि आसपासच्या परिसरात पाच भव्य राजवाडे बांधले गेले. त्यातील हा सर्वात मोठा आणि सर्वात सुंदर राजवाडा. या राजवाड्याचा परिसर 46 लाख स्क्वेअर फूट क्षेत्रफळाच्या जमिनीवर उभा राहिलेला आहे! चोसान डायनेस्टी ( Joseon Dynasty) स्थापन होताच लगेचच बांधला गेलेला हा राजवाडा कोरियाच्या इतिहासाचे अभिमानचिन्ह आहे. कोरियन सार्वभौमतेचे, कोरियन अस्मितेचे चिन्ह असलेला असा हा राजवाडा.
राजवाड्यातल्या पहिले द्वार पार करताच आपल्याला एक पूल दिसतो. एकुणातच ह्या राजवाड्यातील पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे! सध्या पुलाखाली फारसे पाणी नाही पण बाजूला झाडे मात्र फार छान लावलेली आहेत. ती झाडे आहेत चेरी ब्लॉसमची. गाईडने सांगितले हा साकुरा ( जपानी चेरी ब्लॉसम) नाही, कोरियन चेरी ब्लॉसम आहे. त्याला कोरियन भाषेत बॉक्कोत ( Beot -kkot )म्हटले जाते. ती झाडे अजून लहान असल्याने अजून बहरली नव्हती. मला थोडे नवलच वाटले की सेउल मधले सर्वात मोठे पर्यटन स्थळ असलेला हा राजवाडा आणि इथे का बरे ही नवी झाडे असतील? जुन्या झाडांना/ झाडांचे काय झाले असेल? कदाचित फार जुनी झाल्याने वाळवी लागली असेल. मनात असा विचार करत करत मी पुढे निघाले. 
राजवाड्यात अनेक इमारती आहेत. काही अगदी पुरातन तर काही तुलनेने खूपच चांगल्या स्थितीत असलेल्या अशा ह्या इमारती कोरियन वास्तु रचनेला अनुसरून बांधलेल्या आहेत.

ग्यानबोक पॅलेस

एक मुख्य दरबार हॉल आहे जिथे राजा त्याच्या सरदारांना भेटून देशाच्या कारभाराविषयी चर्चा करत असे. तसेच काही राष्ट्रीय महत्वाची घोषणा असेल तर ती देखील याच हॉलमधून व्हायची. याच हॉलमध्ये आपल्याला राजाचे सिंहासन देखील बघायला मिळते. 

सिंहासन 


नक्षीदार छत 

दुसऱ्या एका इमारतीत आपल्याला आधीच्या दरबार हॉलच्या तुलनेने थोडा साधा हॉल बघायला मिळतो. इथे राजा त्याच्या खास सरदारांना भेटत असे. हा सगळा परिसर अतिशय भव्य आहे आणि एक विशेष गोष्ट म्हणजे काही विशेष प्रसंगी या मैदानावर जेव्हा सरदारांना उभे राहायचे असेल तेव्हा त्यांना आपली उभे राहण्याची जागा कळावी म्हणून आपल्याकडे पूर्वी मैलाचे दगड असत तसे दगड, त्या त्या पदाचे नाव असणारे असे, उभारलेले आहेत. अशा रँक स्टोन्सच्या दोन लांब रांगा आपल्याला पाहायला मिळतात. इथे माणसाच्या नावाऐवजी त्या त्या पदाचे नाव घातलेले आहे. माणूस महत्वाचा नाही, त्याच्यावर असणारी जबाबदारी महत्वाची. माणसे येतील जातील, राज्यकारभार चालूच राहील असाच जणू संदेश देणारी ही रचना आहे.

रँक स्टोन्स 
मुख्य भागात असलेल्या इमारती ह्या खासे मंडळींच्या निवासस्थानांच्या आहेत. राजाची राहायची जागा, मुख्य राणीची राहायची जागा वेगवेगळी, राजपुत्राची वेगळी आणि राजमातेची वेगळी. ह्या चारी स्वतंत्र स्वयंपूर्ण इमारती तुलनेने एकमेकांच्या जवळ जवळ आहेत.

ग्यानबोक पॅलेस
ग्यानबोक पॅलेस


ह्या इमारतींमध्ये, प्रत्येक इमारत म्हणजेच एक राजवाडा वाटेल इतक्या खोल्या आहेत. ह्या सगळ्या राहण्याच्या जागांचे जोते उंच केलेले आहे व त्या खालून वाफेद्वारे जमीन तापवण्याची सोय केलेली आहे. त्यामुळे सेऊल मधील कडाक्याच्या थंडीतही ह्या खोल्या उबदार राहतील.

 धूर बाहेर जावा म्हणून जी चिमणी केलेली आहे तिच्या भिंतीवर कोरियन मान्यतेनुसार शुभ चिन्हे कोरलेली आहेत. अक्षय तारुण्य दर्शवणारे पाईन वृक्ष, हरीण, कासव आणि औषधी वनस्पती आहेत. दीर्घायुष्य दर्शवणारा सारस पक्षी आहे. संपत्तीचे प्रतीक असणारे वटवाघूळ आहे, दुष्ट शक्तीपासून वाचविणाऱ्या देवी देवता आहात.


शुभचिन्हे 


याखेरीज बाकी राण्या किंवा जो राज्यावर बसणार आहे त्या राजपुत्राखेरीज बाकी सगळे राजपुत्र यांच्या राहण्याच्या जागा थोड्या बाहेरच्या बाजूला आणि एका इमारतीत अनेक जणांची राहायची सोय असावी तश्या आहेत.

ह्या सर्व इमारतींपासून थोडे दूर राजाच्या राज्यकारभाराच्या जागा, खास लोकांना भेटायची जागा अशा सगळ्या इमारती आहेत. राजघराण्याची वाचनालयाची देखील एक सुंदर इमारत आहे. 

राजवाड्याच्या परिसरात अनेक सुंदर व वैशिष्ट्यपूर्ण उद्याने आहेत. काही तळी आहेत. एका मानव निर्मित तळ्यात Gyeonghoeru नावाची इमारत आहे. प्रचंड मोठ्या दगडी खांबांवर अत्यंत सुंदर लाकडी इमारत. शोभिवंत फुलझाडे, तळ्यातील नितळ पाणी, मागे दिसणारा पर्वत ह्या साऱ्यामुळे सर्वच परिसर अतिशय नयनरम्य आहे. ह्या इमारतीत शाही मेजवान्या होत असत. 

Gyeonghoeru
Gyeonghoeru

Gyeonghoeru

एखाद्या वास्तूने किती धक्के सहन करावेत? किती उतार चढाव पाहावेत? किती जखमा सोसाव्यात? मूळात मुख्य राजवाडा चोसान डायनेस्टी चा म्हणून १३९५ मध्ये बांधला गेला, त्यावेळी वैभवाने मिरवत राहिला. पंधराव्या शतकात एकदा आगीमुळे तर उरलेला १५९५ मधील जपानच्या आक्रमणांमुळे उध्वस्त झाला. नंतर मग दोन शतके राजवाडा नांदता झाला नाही. पण मग एकोणिसाव्या शतकात मात्र तो परत एकदा राजवाडा म्हणून उर्जितावस्थेत आला. थोड्या थोडक्या नाही तर जवळपास आठ हजार खोल्या आणि पाचशे इमारती पुनरुज्जीवित करण्यात आल्या. राजवाड्याचे वाईट दिवस संपले असे सगळ्यांना वाटले असेल पण ते समाधान क्षणभंगुर होते.

जपानी, चिनी आणि रशियन लोकांनी सतत कोरियाच्या राज्यकारभारावर वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न केला. ह्याच वर्चस्वाच्या चढाओढीत Empress Myung-Sung जिला Queen Min असे देखील म्हंटले जाते, तिचा 1895 मध्ये याच राजवाड्यात खूनही झाला. जपानी सैनिकांनी पद्धतशीरपणे योजना आखून हे घडवून आणले होते असे म्हणतात.

जपानने जेव्हा कोरियावर कब्जा केला तेव्हा कोरियन लोकांचा मानबिंदू असलेला हा राजवाडा, वेगवेगळ्या प्रदर्शनांची जागा आणि शासकीय इमारतींचे स्थान म्हणून वापरला गेला. एवढेच नव्हे तर आमच्या बरोबरचा एक जण म्हणाला की तिथे जपानी लोकांनी एका कोपऱ्यात झु देखील केले होते. जी जागा सामान्य लोकांना पाहायला देखील मिळणे कठीण, अशी जागा सर्रास अनेकांच्या पायाखाली तुडवली जाईल अशी व्यवस्था जपान सरकारने केली. 

राजवाड्यातील आधीच्या बागा काढून टाकून तिथे जपानी वनस्पती लावल्या गेल्या, ज्यायोगे शासनकर्त्या जपानी अधिकाऱ्यांना त्यांच्या सवयीचे दृश्य दिसू शकेल. त्याच वेळी कोरियन चेरी ब्लॉसम काढून टाकून जपानी चेरी ब्लॉसम लावला गेला होता. 

राजवाड्याची ओळख असलेले, कोरियाची भरभराट व्हावी म्हणून, कोरियन वास्तुशास्त्राप्रमाणे बांधले गेलेले राजवाड्याचे प्रचंड मोठे मुख्य प्रवेश द्वार देखील त्याच्या मूळ जागेवर हलवून दुसरीकडे नेले गेले. 

सर्वसाधारणपणे सगळे आक्रमक राज्यकर्ते, दुसऱ्यांच्या देशात आपले शासन स्थापित करण्यासाठी जे करतात तेच जपानी लोकांनी अधिक आक्रमकतेने केले. कोरियन लोकांची अस्मिता नष्ट व्हावी, त्यांची स्वतःची कोरियन म्हणून असलेली ओळखच ते विसरून जावेत याचा पूर्ण प्रयत्न जपानी शासकांनी केला. 
जे जे कोरियन संस्कृतीनुसार केलेलं होतं ते ते सगळं बदलून टाकलं अगदी प्रवेशद्वारासकट. प्रत्येक वेळी ह्या राजवाड्याची आठवण आली, राजवाडा दिसला की प्रत्येक कोरियन माणसाला आता आपण जपानच्या अधिपत्याखाली आहोत ह्याची जाणीव व्हायलाच हवी, अशी सर्व मोड तोड, बदल केले. 

त्याचाच एक भाग म्हणून कोरियाची राजभाषा जपानी केली गेली. कोरियन लोकांना त्यांची कोरियन आडनावे सोडून जापनीज आडनावे घेण्याची सक्ती केली गेली. शाळांमधून जुनी कोरियन लिपी आणि कोरियन इतिहास शिकवायला बंदी केली गेली.

कोरियन चेरी ब्लॉसम गेला, जापनीज आला. कोरियन भाषा गेली आणि जपानी आली. राजवाड्यातील कोरियन इमारती गेल्या आणि तिथे जपानी शासकांच्या कार्यालयांच्या, प्रदर्शनांच्या, त्यांच्या निवास स्थानांच्या इमारती आल्या. राजवाड्याच्या जमीनीची मालकी देखील जपानी गव्हर्नर जनरल कडे देण्यात आली. 


जपानने केले त्यात विशेष वेगळे काही नाही. सगळे आक्रमक असेच करतात. पण आता कोरिया आपली संस्कृती पुनरुज्जीवित करण्यासाठी जे प्रयत्न केलेले आहेत, करते आहे ते मात्र विशेष उल्लेखनीय आहेत.

मी सुरुवातीला लिहिले होते की पारंपरिक कोरियन पोशाख ( Hanbok ) घातलेले अनेक तरुण-तरुणी राजवाड्याकडे जाताना दिसत होते. त्याचे कारण म्हणजे कोरियाच्या सरकारने असे जाहीर केलेले आहे की जर का तुम्ही पारंपरिक कोरियन पोशाखात असाल तर तुम्हाला राष्ट्रीय स्मारकात येताना प्रवेश फी भरावी लागणार नाही! या आमिषामुळे म्हणा किंवा उत्तेजनामुळे म्हणा, अनेक कोरियन तरुण-तरुणी, जे एरवी अत्याधुनिक पोषाखात असतात ते, अशा ठिकाणी येताना पारंपारिक पोशाखात येत असतात. त्यांची फोटोसेशन तिथे चालू असतात. आपण अगदी इतिहासकाळात आहोत असेच ते पोशाख बघून वाटत असते. 


जपानी सरकारने राजवाड्याचे मुख्य प्रवेश द्वार मूळ जागेपासून हलवले होते ते आता परत मुळ जागी आणले गेले आहे. राजवाडा मूळ रूपात परत आणण्याचा एकूण चाळीस वर्षे चालणारा असा हा भव्य प्रकल्प हातात घेतला गेलेला आहे. 

जपानी राजवटीची आठवण करून देणारी इथली जपानी प्रशासकीय इमारत पाडली गेली. इमारत काही लहान-सहान नव्हती. जवळपास आपल्या संसदेइतकी मोठी आणि देखणी इमारत होती ती. पण ती पाडली गेली. ह्या आवारातील इतर सर्व जपानी इमारती देखील पाडल्या गेल्या. जुने नकाशे तसेच उपलब्ध असलेली छायाचित्रे बघून कोरियन वास्तू शास्त्राप्रमाणे, पूर्वी होत्या तशाच इमारती पुन्हा बांधण्याचे काम सध्या चालू आहे. 

ह्या राजवाड्यातील जपानी चेरी ब्लॉसम काढून टाकून तिथे कोरियन चेरी ब्लॉसम लावला गेला आहे. कोरियन लिपी पुनरुज्जीवित केली गेली आहे. 

आम्ही २०१९ मध्ये गेलो तेव्हाही राजवाड्यात थोडे काम चालूच होते. पण ते सर्व काम पूर्ण झाले आहे असे दोन तीन वर्षांपूर्वी बातम्यात वाचल्याचे आठवते.

दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी लक्षावधी कोरियन लोकांना पुरुषांना जपानी सैन्यात भरती केले गेले आणि लढायची सक्ती केली गेली. अक्षरशः दोन पिढ्या यात संपूर्ण गारद झाल्या. कोरियन महिलांवर तर मरण बरे असा प्रसंग ओढवला. कारण त्यांना जपानी सैनिकांच्या कम्फर्ट वूमन म्हणून सेक्स वर्करचे काम करावे लागले. त्यांच्या घरातून, गावातून पळवून नेलेल्या या स्त्रिया इतक्या अनन्वित अत्याचारांना बळी पडल्या की युद्धानंतर ना त्या घरी परतल्या, ना त्यांच्या कुटुंबाने समाजापुढे त्यांची ओळख उघड केली. अनेक वर्षे, आपली काहीही चूक नसताना त्यांनी अज्ञातवासात, विपन्नावस्थेत, रोगांशी झुंज देत काढली. अगदी अलीकडे 2015 साली जपानने आपली चूक कबूल करून, कोरियन कम्फर्ट वुमन्स च्या कल्याणासाठी एक बिलियन येन देऊ केले व त्यांची जाहीर माफी मागितली. 


साऊथ कोरिया आपली छिन्नविछिन्न झालेली संस्कृती आणि देशाची मानचिन्हे आता पुनर्स्थापित करत आहे. साऊथ कोरियाची गेली सत्तर वर्ष शांततेची नव्हतीच. अनेकदा राजवट बदलली. राजवट बदलली गेली पण कोणतीही राजवट आली तरी आपली संस्कृती पुनर्स्थापित करण्याचे प्रकल्प स्थगित किंवा रद्दबातल केले गेले नाहीत हे विशेष आहे. 

या एकजुटीमुळे, देशाचे भले कशात आहे याविषयीची निखळ दृष्टी असल्याने, सर्व आव्हानांवर मात करत आज कोरिया जगात एक बलाढ्य शक्ती म्हणून मानला जात आहे. 

अनेक वर्षांच्या परकीय राजवटीनंतर, दुसऱ्या महायुद्धातील आघातानंतर, शिवाय एकोणीसशे पन्नास-पंचावन्नमधला दोन कोरियातील लढा व त्यानंतर झालेले अनेक उठाव, राजवटीतील बदल, संघर्ष, निदर्शने, हरताळ, त्रस्त करणारा भ्रष्टाचार या सगळ्याला तोंड देऊन आज साऊथ कोरिया जगातील एक आघाडीचे प्रगत राष्ट्र म्हणून उदयास आलेला आहे. 

 तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात तर कोरिया अव्वल स्थानावर आहे. कोरियन सौंदर्यप्रसाधने आणि वस्त्रे आज जगभरातील चोखंदळ रसिकांना हवीहवीशी वाटत आहेत. कोरियन संगीत, टीव्ही सिरीयल्स आणि चित्रपट जगभरात गाजत आहेत. क्‍लिष्ट मानवी स्वभावाची व वागणुकीची कोरियन दृष्टीने मीमांसा करणारा पॅरासाईट नावाचा चित्रपट इतिहास घडवून गेला आहे. आत्तापर्यंत अनेक आंतरराष्ट्रीय महोत्सवातून पारितोषिके मिळवलेल्या ह्या चित्रपटाने २०२०च्या अकॅडमी अवॉर्ड्स सोहळ्यात अनेक नामांकने, अनेक पारितोषिके तर मिळवलीच पण परकीय भाषेतला असूनदेखील उत्तम चित्रपटाचे पारितोषिक मिळवणारा गेल्या 93 वर्षातला तो पहिला चित्रपट ठरला. आत्तापर्यंत इंग्रजी खेरीज इतर कोणत्याही भाषेतल्या चित्रपटाला हे पारितोषिक मिळालेले नव्हते.

 कोरियाची सर्वच क्षेत्रातील नेत्रदीपक प्रगती ही कोरियाने आपली संस्कृती पुनर्स्थापित करण्याच्या प्रयत्नाला मिळालेली दाद आहे, एक शुभचिन्ह आहे. मूळांकडे परत जाताना आकाशाला घातलेली गवसणी आहे. आपली पुरातन संस्कृती, आपली मानचिन्हे ह्यांचा बळी न देताही प्रगती साधता येतेच ह्याची खूणगाठ आहे. 


ग्यानबोक पॅलेस
ग्यानबोक पॅलेस

(हा लेख संक्षिप्त स्वरुपात चैत्रेय २०२० मध्ये प्रकाशित झाला होता. )

#Seoul #Gyeongbokgung #South Korea #Japanese Invasion 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कोस्टल कर्नाटक ३. -कुरु बेट, अनेगुड्डे श्री विनायक मंदिर, मणिपाल लेक

  कोस्टल कर्नाटक सहलीचा आमचा तिसरा दिवस देखील फार आनंदात गेला. काही गोष्टी ठरवल्याप्रमाणे होऊ शकल्या. काही गोष्टी ठरवल्याप्रमाणे अजिबात झाल्या नाहीत. पण तरी जमेची बाजूच जड झाली हे खरे.  उडुपीला सकाळी गाडी बोलावली होती आणि ती आम्हाला काही तास फिरवून आणणार होती. पहिले ठिकाण होते त्रासी मारवंते बीच.  फोटो बघूनच हा बीच पाहण्याची खूप उत्सुकता वाटत होती. हा अत्यंत अनोखा बीच आहे. रस्त्याच्या एक बाजूला सौपर्णिका नदी, दुसऱ्या बाजूला अरबी समुद्र - सिंधूसागर! त्रासी मरवंथे बीच  📷https://karnatakatourism.org/en/destinations/udupi उडुपीपासून निघून इकडे येऊन पोचलो. एका बाजूला नदी दिसत होती. दुसऱ्या बाजूला समुद्र किनाराही दिसत होता. पण फोटोत दाखवल्याप्रमाणे ठिकाण काही दिसेना.  मग चौकशी केल्यावर कळले की असे फक्त ड्रोनने काढलेल्या फोटोत दिसते. डोळ्यांना असे दिसत नाही!! एरवी आपण म्हणतो की डोळ्यांना जितके सुंदर दिसते तितके फोटोत उतरत नाही. पण इथे उलटे झाले होते!फोटोतल्याइतके सुंदर डोळ्यांना दिसत नव्हते!! पण असे दिसले नाही म्हणून काय झाले? रस्त्याच्या एका बाजूला नदी वाहते आहे...

कोस्टल कर्नाटक ६ - अविस्मरणीय शरावती बॅकवॉटर बोटिंग, शरावती कांडला मॅन्ग्रोव्ह बोर्ड वॉक

मी आधीच्या पोस्टमध्ये सांगितले होते की आजचा सूर्यास्त समुद्रात होता तर उद्याचा सूर्योदय शरावती नदीत असणार आहे! तोच हा सूर्योदय शरावती नदीत, कमळांच्या मध्ये.  शरावती बॅकवॉटर बोटिंग  दुसऱ्या दिवशी सकाळी सव्वा सहापर्यंत आम्ही बोटिंगच्या ठिकाणी पोचलो. कारण आम्हाला सूर्योदय चुकवायचा नव्हता. होनावर जवळचे शरावती नदीतील बोटिंग हा एक अविस्मरणीय अनुभव आहे.  आजूबाजूची शांतता, संथ पाणी, स्वच्छ नितळ पाण्यात वाकून आपले प्रतिबिंब न्याहाळणारी नारळाची झाडे, पाण्यात अध्ये मध्ये असलेली लहानशी बेटे, खारफूटीची जंगले, कमळाची पाण्यावर तरंगणारी पाने, उगवत्या सूर्याची पाण्यात मिसळणारी किरणे, त्याने तांबूस झालेले पाणी .. एक वेगळेच जग असते ते. तुम्ही जितक्या वेळासाठी बोट ठरवलेली असेल.. तास दीड तास..  तो वेळ, तुमच्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षणांपैकी एक असणार हे मी अगदी खात्रीने सांगू शकते.  आपोआप जगाचा, आयुष्याचा कोलाहल मंद होत जातो. पहाटेचा मवाळ प्रकाश, पाण्यावर हेलकावणारी नाव, हवेतला अगदी किंचितसा सुखद गारवा आणि मुरत जाणारी शांतता ह्या सगळ्याने मन निवळत जाते.  आम्ही गेलो त्या दिवशी,...

'रानी की वाव'

पाटण सर्वांना माहिती असते ते 'रानी की वाव' तिथे आहे म्हणून. भारतातील समृद्ध हातमाग कौशल्याचा उत्तम नमुना असलेली पटोला साडीदेखील पाटणचीच.  गुजराथमधील अहमदाबाद पासून साधारण दीडशे किलोमीटरवर असणारे पाटण जागतिक पर्यटनाच्या नकाशावर मानाचे स्थान पटकावून बसले आहे. युनेस्को चे जागतिक वारसा स्थळ म्हणून मानांकन मिळवलेले हे ठिकाण आहे.  रानी की वाव  रानी की वाव  रानी की वाव  रानी की वाव  रानी की वाव  'रानी की वाव' नावावरूनच आपल्या लक्षात येते की ही राणीने बांधलेली विहीर आहे. पण खरे तर ही नुसती वाव म्हणजे विहीर नसून  सुमारे 64 मीटर लांब, 20 मीटर रुंद आणि 27 मीटर खोल म्हणजे साधारण  सात मजल्यांइतकी खोली असलेले विष्णूचे मंदिर आहे असेच म्हणावे लागेल.  जमिनीपासून खोल खोल उतरत जाणारी अशी ही रचना आहे.  राणी उदयमती हिने तिचा पती  राजा भीमदेव पहिला याच्या स्मरणार्थ हे मंदिर बांधले म्हणून याचे नाव 'रानी की वाव' असे पडले. राजा भीमदेव पहिला म्हणजे अनहिलवाड किंवा अनहिल्लपूर पाटणच्या सोळंकी वंशाचा संस्थापक मुलराज ह्याचा मुलगा होता. ह्या वंशाने अनेक पराक्...

सोमनाथ - प्रभास पट्टण.

१९४७चे दीपावली पर्व. स्थळ होते सिंधुसागराच्या तीरावर असलेल्या सोमनाथ मंदिराच्या अवशेषांचे प्रवेशद्वार. तिथे उभे राहून सरदार वल्लभभाई पटेल यांनी दृढनिश्चय व्यक्त केला की भारतीय जनता आपले आराध्य दैवत असलेल्या सोमनाथ मंदिराला त्याची पूर्व प्रतिष्ठा आणि पूर्व वैभव प्राप्त करून देईल.  काय कारण होते ह्या प्रतिज्ञेचे? जर भारतीय जनतेचे आराध्य दैवत होते सोमनाथ तर आता मंदिराचे अवशेषच का उरले होते?  ह्या साठी आपल्याला जाणून घ्यावे लागेल सोमनाथ मंदिराच्या इतिहासाविषयी आणि सोमनाथच्या हिंदू जनमानसातील स्थानाविषयी.  हिंदूंन पूजनीय असलेल्या बारा ज्योतिर्लिंगापैकी सर्वात पहिले नाव असलेल्या आणि प्रथम स्थानी असलेले सोमनाथ. आपल्या सर्वाना माहिती असलेल्या स्तोत्राची सुरुवातच होते ती 'सौराष्ट्रे सोमनाथंच' पासून. त्यामुळेच त्याला 'आदि ज्योतिर्लिंग' म्हणून ओळखले जाते.  ऋग्वेदात तसेच अनेक पुराणात ज्याचा उल्लेख झाला आहे असे हे तीर्थधाम. ह्याविषयी आपल्याला अनेक कथा सापडतात.  शतकानुशतकांच्या मंदिराच्या इतिहासात नैसर्गिक रित्या पडझड झाल्यानंतर ते अनेक राजांकडून, भक्तांकडून सोने, च...

लोकमान्य टिळक जन्मस्थान, रत्नागिरी

लोकमान्य टिळक म्हणजेच   बाळ गंगाधर टिळक हे भारतीय स्वातंत्र्यसंग्रामातील एक महत्वाचे नाव.  केसरी आणि मराठाचे संपादक, गणित आणि कायदयाचे शिक्षक, स्वातंत्र्यसमराला दिशा देणारे एक प्रभावी राष्ट्रीय नेतृत्व, गीतेवर भाष्य लिहिणारे तत्वचिंतक, संशोधक अशा विविध रूपांत आपण त्यांना ओळखतो.  त्यांनी म्हटलेले 'स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच ' हे नुसते वाक्य किंवा घोषणा राहिली नाही तर ती भावना प्रत्येक भारतीयाच्या मनात रुजली. स्वातंत्र्यसंग्रामाला ह्यातून ऊर्जा मिळाली.  वंदे मातरमचा घोष बंगालासोबतच संपूर्ण देशांत गुंजला आणि स्वातंत्र्याची प्रेरणा बनला. त्यात 'लाल बाल पाल' ह्या त्रयीचा मोठा वाटा होता.  ब्रिटिश सरकार त्यांना 'भारतीय असंतोषाचे जनक' असे म्हणत असे. निद्रिस्त समाजाला जागे करण्याचे श्रेय लोकमान्य टिळकांना जाते.  त्यांचा जन्म २३ जुलै १८५६ ला रत्नागिरी येथे झाला. आज आपण पाहणार आहोत ते जिथे त्यांचा जन्म झाला ते रत्नागिरीमधील घर. आता तिथे स्मारक केलेले आहे.  वयाच्या साधारण दहाव्या वर्षापर्यंत लोकमान्य टिळक ह्या वास्तूत राहिले. ही वास्तू रत...

कवी केशवसुत स्मारक, मालगुंड

एका कवीचे स्मारक असावे आणि तेही कवीला साजेसे असावे ही दुर्मिळ गोष्ट आहे! पण असे एक स्मारक आपल्या महाराष्ट्रात आहे. रत्नागिरीजवळ मालगुंड येथे कवी केशवसुत म्हणजेच कृष्णाजी केशव दामले ह्यांचे एक सुंदर स्मारक उभारले आहे.  कवी केशवसुत जन्मस्थान  मार्गावरील फलक  प्रवेशद्वारातून दिसणारे दृश्य  कोकण मराठी साहित्य परिषदेने ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री मधू मंगेश कर्णिक ह्यांच्या संकल्पनेला प्रत्यक्षात उतरवले आहे.  एखाद्या कवीचे स्मारक कसे असावे हे एखाद्या साहित्यिकालाच चांगले कळू शकणार! स्मारकाच्या प्रवेशद्वारातून आपण आत गेलो की समोरच दिसते ते केशवसुत जन्मस्थान. हे जुने घर डागडुजी करून नीटनेटके ठेवले आहे. पडवीत मोठा झोपाळा आहे.  कवीच्या घरात कवीचे पुस्तक वाचताना  तिथेच केशवसुतांची काही पुस्तके तसेच को.म.सा.प.ची काही प्रकाशने विक्रीसाठी उपलब्ध आहेत.  घरातील आतल्या खोल्या तशा रिकाम्याच आहेत. काही थोडे जुने सामान तिथे ठेवले आहे .  माजघर  घराच्या मागच्या बाजूला कवीचे खरे स्मारक आहे. केशवसुतांनी त्या काळात म्हणजे दीडशे वर्षांपूर्वी कवितेत नवा प्रवाह आणला...

गणपतीपुळे

कोकणच्या निसर्गाविषयी किती आणि कितीदाही लिहिले तरी कमीच आहे. कोकणातल्या नारळी पोफळीच्या वाड्या, आंब्याची फणसाची झाडे, केळीच्या बागा, कौलारू घरे ह्यांनी नटलेली धरती, सोनचाफा बकुळीच्या सुगंधाने घमघमणारा आसमंत आणि कानावर येणारी समुद्राची गाज सारेच कसे मन प्रसन्न करणारे असते.  चराचरात वसणारा परमतत्वाचा अंश ह्या भूमीत प्रकर्षाने प्रत्ययाला येतो. ह्या भूमीत अनेक देवस्थाने नसती तरच नवल होते. ह्या देवस्थानांच्या जागा विलक्षण सुंदर आहेत. गणपतीपुळे हे असेच एका सुंदर स्थानी वसलेले श्री गणेशाचे स्वयंभू मंदिर. सिंधुसागराचा किनारा, चमकदार वाळूची पुळण आणि पाठीमागे गार्ड हिरव्या वनराईने झाकलेला डोंगर असे ह्या मंदिराचे नयनमनोहर ठिकाण आहे.  श्री गणपतीपुळे देवस्थान  ह्या स्वयंभू मूर्तीचा दृष्टांत पाचशे वर्षांपूर्वी भिडे गुरुजींना झाला. तिथे त्यांनी साधे गवताचे छप्पर उभारून पूजेला सुरुवात केली. त्यांची समाधी आपल्याला मंदिराच्या आवारातच बघायला मिळते.  समाधी  पुढे मग वेळोवेळी निरनिराळ्या भक्तांनी ह्या वास्तूची पुनर्बांधणी आणि दुरुस्ती केली. छत्रपती शिवाजी महाराजांचे सचिव अण्णाजी दत्त...

कोस्टल कर्नाटक ४ - शृंगेरी, मुकाम्बिका

कोस्टल कर्नाटक ४ - शृंगेरी, मुकाम्बिका  आज उडुपीहून लवकर निघून शृंगेरीला पोचण्याचा बेत आखला होता. त्याप्रमाणे आम्ही सकाळीच निघालो. रस्ता खूपच छान होता. आता खरं सांगायचे तर कोस्टल कर्नाटक प्रवासात रस्ता सुंदर होता म्हणणे ही द्विरुक्तीच आहे.  सगळ्या सडका अगदी एका पातळीतील आणि गुळगुळीत आहेत. खड्डे खळगे, रस्ते वर खाली असणे असे काही नसल्याने महाराष्ट्रातून गेलेल्या आम्हाला थोडे चुकल्यासारखे वाटले खरे!!! शिवाय रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे, स्वच्छता ह्यामुळे प्रवास फार आनंदाचा होतो. उडुपी शृंगेरी रस्ता तर आगुंबे जंगलातून जातो. त्यामुळे दाट झाडी होती. रस्त्यात सुप्रसिद्ध आगुंबे घाटही येतोच. सकाळची प्रसन्न वेळ आणि इतका छान रस्ता..दिवसाची चांगली सुरुवात होण्यासाठी आणखी काय पाहिजे?!!  आम्हाला वाटले होते इतक्या लवकर फारसे कोणी श्रुंगेरीत आलेले नसेल. पण शृंगेरीला पोचल्यावर लक्षात आले की आमच्यासारखाच विचार अनेकांनी केला होता!  अनेक बस रात्रभराचा प्रवास करून सकाळी शृंगेरीला पोचल्या होत्या. त्या लोकांच्या प्रातर्विधी आणि अंघोळीसाठी अनेक ठिकाणी माफक पैसे घेऊन उत्तम सोय केलेली होती....

कोस्टल कर्नाटक १ - मंगळुरू

  मंगळुरू- कुडला - मंगलोर - मंगलापूरम ही सगळी एकाच गावाची नावे. मंगलादेवी मंदिरावरून ह्या गावाचे नाव पडले मंगळुरू. दक्षिण कन्नड जिल्ह्याचे हे प्रमुख ठिकाण. सुंदर मंदिरे, स्वच्छ समुद्रकिनारे, नारळी-पोफळीची झाडे, आधुनिकतेच्या खुणा मिरवणारे मॉल्स आणि शहराबाहेरची पण तशी जवळच असणारी अनेक पर्यटन स्थळे.. ह्या साऱ्यामुळे मंगळुरु नेहमीच पर्यटकांचे आवडते राहिलेले आहे.  मंगळूरूला जाणारे आमचे विमान नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून होते. हा विमानतळ पाहण्याची उत्सुकता होतीच.  हा अतिशय भव्य आणि सुव्यवस्थित विमानतळ आहे. अनेक विमाने एकावेळी विमानतळावर आली तरी येणाऱ्या आणि जाणाऱ्या प्रवाशांच्यासाठी सर्व आवश्यक सुविधा केलेल्या आहेत.  जशी वर्दळ वाढेल तशी विमानतळावर जाण्यासाठी वाहतुकीची साधने देखील वाढतील अशी आशा आहे.  नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ  नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ  नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ  नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ  लहानशा प्रवासानंतर विमान मंगळुरुला उतरले. मंगळुरु विमानतळ म्हणजे टेबलटॉप रनवेज असणाऱ्या भारतातील मोजक्या विमानतळ...

रवींद्रनाथ टागोरांनाही भुरळ घालणारे 'कारवार'

कारवार - पांढऱ्या वाळूचे स्वच्छ समुद्रकिनारे, हिरव्या झाडांनी नटलेले डोंगर, काळी नदी, लाल माती असलेले सुंदर शहर. शहर होऊ पाहणाऱ्या किंवा खरे तर आता शहर झालेल्या कारवारने अजून आपले गावपण थोडे तरी टिकवून ठेवले आहे. शहरी बकालपणा मात्र टाळता आलेला नाही.   गोवा, कर्नाटक आणि महाराष्ट्र असा तिन्हींचा संगम आपल्याला कारवारमध्ये दिसतो. मराठी बोलणारी माणसेही भेटत राहतात.  गोव्यासारखे पर्यटकांचे लोंढे दिसत नाहीत. कदाचित आम्ही मार्चच्या अगदी सुरुवातीला गेलो तेव्हा अजून पर्यटकांचा ऐन हंगाम सुरु झाला नसावा!! उत्तर कन्नड जिल्ह्याची जीवनरेखा असणारी काळी नदी सदाशिवगड जवळ समुद्राला मिळते. तिथे एक मोठा पूल बांधलेला आहे. कारवार आणि गोव्याला जोडणारा हा पूल आता एक पर्यंटनस्थळच झाला आहे. सूर्योदय बघण्यासाठी पादचारी पुलावर जमलेले तुरळक पर्यटक, धावण्याचा सराव करणारे धावपटू, सायकलस्वार ह्यांच्या खेरीज सकाळच्या वेळी तिथे कोणीही नसते. आपल्या निसर्ग सौदर्यामुळे आणि शांततेमुळे हे ठिकाण अवश्य भेट देण्याजोगे आहे. आमचे हॉटेल ह्या पुलाच्या अगदी जवळ असल्याने आम्ही सूर्योदय अगदी मनसोक्त वेळ देऊन पाहू शकलो....